Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वीस वर्षांचे स्मार्ट वाहतूक नियोजन

$
0
0

नाशिक : स्मार्ट सिटीकडे झेपावणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व दळणवळण व्यवस्थाही अधिक स्मार्ट होणार आहे. दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने (यूएमटीसी) शहराच्या पुढील वीस वर्षांच्या वाहतुकीचे स्मार्ट नियोजन केले असून वाहतूक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. त्यात लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने शहरात हाय कॅपेसिटी मास ट्रान्सपोर्टवर भर देण्यात आला आहे. बसेसची संख्या वाढवणे, ट्रामची व्यवस्था, रिंग रोड पूर्ण करणे आदींचा समावेश आहे. शहरातील रस्ते द्विपदरी करण्यासह मिसिंग पॉइंट जोडण्यावर भर दिला आहे. सोबतच या आराखड्यात बीआरटीएस, मोनोरेल संदर्भातही सूचना करण्यात आली आहे. प्रशासनाने त्यांच्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी केली तर शहरातील वाहतुकीच्या कोंडीतून सर्वसामान्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे.

नाशिक शहराची सध्याची लोकसंख्या ही २० लाखांच्या आसपास असून, येत्या २० वर्षांत ती दुपटीने वाढणार आहे. शहराचे नागरिकरण झपाट्याने होत असल्याने लोकसंख्यावाढीचा वेगही तेवढाच आहे. त्यातच नाशिकचा समावेश आता केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत झाला असून, नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. सद्यःस्थितीत शहरातील सर्वाधिक समस्या ही वाहतूक आणि पार्किंगची आहे. त्र्यंबकरोड, गंगापूररोड, नाशिकरोड ते शालिमार हे तीन रस्ते सोडले तर इतर रस्त्यांवर वाहतुकीचा कोंडमारा होत आहे. महापालिकेसमोरची ही सर्वात मोठी समस्या आहे. मुंबई- आग्रा महामार्गावर साडेआठ किलोमीटरचा उड्डाणपूल झाला असला तरी द्वारका, मुंबई नाका, इंदिरानगर अंडरपास येथे वाहतुकीची समस्या कायम आहे. विशेषतः जुने नाशिक, सीबीएस, अशोक स्तंभ, पंचवटी, या शहराच्या कोअर भागात तर वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर आहे. शहरातील रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतूक आणि पार्किंगच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तत्काल‌िन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट या कंपनीवर शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सोपविले होते.

गेल्या वर्षी एप्र‌िलमध्ये संबंधित कंपनीला शहरातील रस्त्यांचे सर्व्हेक्षण करून पुढील वीस वर्षांसाठी शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यात बीआरटीएसच्या चाचपणीसह मोनोरेलसंदर्भातही अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने गेले वर्षभर शहरातील सर्व रस्त्यांचा व पार्किंगच्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर आपला अहवाल तयार केला आहे. त्यात रस्ते, पूल यांच्यासह पार्किंगची कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. कंपनीच्या वतीने शहरात सद्यःस्थितीतील रस्त्यांची गरज पाहता हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्टवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील बससेवा सक्षम करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करून सन २०३६ मध्ये शहराला १३१९ बसेसची गरज असल्याची सूचना करण्यात आली आहे.

बीआरटीएस, ट्रामचाही विचार

आयटीडीपीने शहरातील तीन रस्त्यांवर बीआरटीएस प्रकल्पाला अनुकूलता दर्शवली होती. यूटीडीपीनेही बीआरटीएसचा अभ्यास केला आहे. सोबतच मेट्रो, मोनोरेल आणि ट्राम बसेसबाबतही त्यांनी आपला अहवाल तयार केला आहे. बसेसची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी बीआरटीएस आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून त्याचाही विचार केला जात आहे. प्रशासनाकडून त्याच्या अंमलबजावणीसाठीचे पावले टाकली जाणार आहेत. त्यामुळे या प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही अंशी फुटण्याची शक्यता आहे.


शिफारशी

बससेची संख्या वाढवणे

२२ वाढीव चौकांसाठी सिग्नल बसवणे

पादचाऱ्यांसाठी ९३ किमी पदपथ

५४ किमीचा सायकल ट्रॅक

शहराच्या सीमेवर ट्रक टर्मिनस तयार करणे

रिंगरोडची पूर्तता करणे

रस्त्यांची रुंदी वाढवणे

सिग्नलची संख्या वाढवणे

४० ठिकाणी पे अॅण्‍ड पार्किंग


शहराच्या वाहतूक व पार्किंगचे पुढील २० वर्षासाठीचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी दिल्लीस्थित यूएमटीसी कंपनीला आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा आराखडा सादर होणार असून, शहर विकासासाठी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

-अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉर्डन लावणार ट्रॅफिकला शिस्त

$
0
0

नाशिक: शहर वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी ट्रॅफिक वार्डन नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्याकडे लवकरच या संदर्भांत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यात शहर पोलिसांसाठी तब्बल ७५ ट्रॅफिक वार्डन मिळू शकतात.

शहर पोलिस दलात २९७ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या फक्त १९७ इतकी होती. वाहतूक विभागाची डिव्ह‌िजननिहाय कार्यालये सुरू होणार असल्याने मनुष्य बळ उपलब्ध करून देण्यात आले. शहरातून अनेक महत्वाचे महामार्ग तसेच राज्यमार्ग जातात. पर्यटकांचा राबता, शाळा तसेच कॉलेजसची वाढती संख्या संख्या, तसेच औद्योगिकीकरणामुळे वाहनांची वाढलेली संख्या याचा ताण शेवटी वाहतूक विभागावर पडतो. शहराच्या प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत भागातदेखील वाहतुकीच्या समस्यांना सर्वांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वार्डन देण्याचे धोरण आखले आहे. यासाठी काही महिन्यापूर्वी शहर पोलिसांनी ७५ ट्रॅफिक वार्डनची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयास पाठवला होता. याबाबत मुंबईत अनेकदा बैठका पार पडल्या. याच आठवड्याच्या अखेरीस पोलिस महासंचालकांनी बैठक आयोज‌ित केली आहे. या बैठकीत ट्रॅफिक वार्डनची संख्या निश्चित होऊ शकते. ट्रॅफिक वार्डन म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीस गृह विभाग मानधनदेखील देणार आहे. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, शहरातील महत्त्वपूर्ण रस्त्यांचा, तेथील वाहतूक कोंडीचा विचार होतो. मनुष्यबळाचा विचार करूनच नियोजन केले जाते. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे अनेकदा अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष होते. शाळा-कॉलेजेस, महत्वाची व्यावासायिक अस्थापने येथे होणारी वाहतूक कोंडी तसेच पार्कींगची समस्या सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा आवश्यक असून, ट्रॅफिक वार्डन त्यासाठी फायदेशीर ठरू शकतील, असा दावा संबंधीत अधिकाऱ्याने केला. ७५ ट्रॅफिक वार्डन मिळावेत, यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी किती जागांना मंजुरी मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल, असे संबंध‌ित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

ट्रॅफिक वार्डन नियुक्तीबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो. त्याचा निश्चितच फायदा होऊ शकेल. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक आपआपल्या परीने योगदान देऊ शकतात. इच्छुक नागरिकांनी तसा रस दाखवल्यास त्यांनाही सवडीच्या वेळेनुसार, तसेच जागेवर काम करण्याची संधी देण्यात येऊ शकते.

-डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशन होणार मॉलसारखे चकाचक

$
0
0

नाशिकः महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात करार झाला असून राज्यातील अनेक रेल्वे मार्ग त्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे भारतातील निवडक रेल्वे स्टेशन ‘स्विस चॅलेंज मेथड’च्या धर्तीवर विकस‌ित केले जाणार असून, त्यात नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. सध्या असलेले स्टेशन बहुमजली होणार असून त्याला मॉलचा दर्जा प्राप्त होणार आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानक हे उत्तर भारताकडे सर्वात जास्त वाहतूक करणारे स्टेशन आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रवासी वाहतूक करणारे केंद्र म्हणूनदेखील याची ख्याती आहे. सिंहस्थाच्या कालावधीत नाशिकरोड रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गाड्या थांबवण्यासाठी जागा नसल्याने ती बासनात गुंडाळण्यात आली. नाशिकरोड रेल्वे स्थानकाला पुरेशी जागा नसल्याने त्याचा विकास खुंटला आहे, असेही मानले जाते. परंतु, आता ती अडचण दूर होणार आहे. महाराष्ट्र व केंद्र सरकार यांच्यात करार झाला असून, लवकरच नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या उपक्रमांतर्गत भारतातील चारशे स्टेशनची निवड केली असून, त्यात नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरश‌िपच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. यात रेल्वे स्टेशन्सवर असलेली एअर स्पेस विकस‌ित करण्यात येणार असून, ग्राऊंड फ्लोअरवर रेल्वे स्टेशन, पहिल्या मजल्यावर रेल्वेची प्रशासकीय इमारत व प्रतिक्षालय, त्यानंतरचे मजले हे व्यावसायिक वापरासाठी विकासकाला देण्यात येणार आहेत.

या कामाचे पेपरवर्क तयार असून, त्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. यावेळी स्विस चॅलेंज मेथडचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे यात टेंडर सिस्ट‌िम नसेल. काय हवे याची माहिती रेल्वे प्रशासन वेबसाइटवर देणार असून, जे विकासक कमी दराने काम पूर्ण करतील त्यांना काम दिले जाणार आहे. यात मध्य रेल्वेचा आणि विकासकांचा दोघांचा फायदा होणार आहे. ४५ वर्षांच्या कराराने ही स्टेशन्स विकसित केली जाणार आहेत.


मध्य रेल्वेचे नाशिक हे एक प्रमुख ठिकाण असल्याने नाशिकचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही योजना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशान्वये अमलात आणण्यात येणार आहे. यासाठी काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास लवकरच या कामाला सुरुवात होईल. नाशिककरांना परदेशातील रेल्वे स्टेशनसारखे स्टेशन मिळेल.

-नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्यरेल्वे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ५२५ विद्यार्थ्यांना ‘युगांत’चे वरदान

$
0
0

शैक्षणिक वर्षात आठ शाळांना घेतले दत्तक

नाशिक : हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षणाला प्राधान्य देऊन कुटुंबाच्या भविष्याला उजाळी देऊ पाहणाऱ्या चिमुकल्यांसाठी पुढे येणारे मदतीचे हात हे एखाद्या देवासमान असतात. शिक्षणासाठी लागणारा आर्थिक भार, शैक्षणिक गरजा भागविणाऱ्या अशा काही व्यक्तींची त्यांना नेहमीच प्रतीक्षा असते. जिल्हा परिषदेच्या अशा शाळांमधील चिमुकल्यांसाठी युगांत फाउंडेशन वरदान ठरत आहे. शैक्षणिक दत्तक घेऊन या मुलांचे भवितव्य घडविण्याचे प्रयत्न या फाउंडेशनकडून केले जात असून, यंदा जिल्हा परिषदेच्या आठ शाळांमधील ५२५ विद्यार्थ्यांना युगांतचा आधार मिळणार आहे.

एकीकडे खासगी शाळांचे प्रस्थ, तेथील भौतिक सुविधा, लहान लहान मुलांच्या ओठी आलेली अस्खलित इंग्रजी या चित्रापुढे मराठी व त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुले मागे पडलेली दिसतात. शालेय अभ्यासक्रमांची पुस्तके या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात परंतु, वह्या, दप्तरे, रंगपेट्या, पेन, पट्टी अशा आवश्यक वस्तू घेण्यासाठीही येथील मुलांना झगडावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून युगांत फाउंडेशन कार्यरत आहे. जिल्ह्यातील ९७ शाळांमधील ३५०० विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक दत्तक घेऊन शिक्षणासाठी त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या आहेत. या शैक्षणिक वर्षातही ते हा उपक्रम राबवित असून, ५२५ विद्यार्थ्यांना यामार्फत दत्तक घेतले जाणार आहे. १७ जूनला जिल्ह्यातील आठ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील या शाळांचा समावेश

रानमळा १, रानमळा २, वाल्मिकनगर, सुल्तानपूर, विंचूर गवळी, टूंगलदरा, गवळवाडी, देहेरेवाडी

डिजिटलायझेशनसाठी प्रयत्न

डिजिटल स्कूल ही संकल्पना राज्यातील शाळांमध्ये सध्या जोर धरत आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शाळा यापासून अद्याप कोसो दूर आहेत. परंतु, काळाबरोबर चालायचे तर या मुलांनाही हे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. हे ओळखत युगांत फाउंडेशनकडून डिजिटल स्कूलसाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आवश्यक कॉम्प्युटर्स, प्रोजेक्टर आदी साहित्य पुरविण्यावर त्यांचा भर आहे.

या शाळांमधील ९९ टक्के मुले आर्थिकदृष्ट्या अतिशय मागास आहेत. स्थलांतरीत होऊन आलेली, हातावर पोट असलेल्यांची ही मुले आहेत. त्यांना शैक्षणिक आधार देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे कार्य यामार्फत करीत आहोत.

- प्राजक्ता देशमुख, अध्यक्ष, युगांत फाउंडेशन

पुस्तके सरकारकडून पुरविली जात असली तरी इतर शैक्षणिक साहित्याची गरज भागविणे या विद्यार्थ्यांसाठी कठीण जाते. या उपक्रमामुळे ते शक्य झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली. शिवाय, कॉम्प्युटर हाताळायला मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते.

- देवेंद्र पाटील, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद, साप्ते, त्र्यंबकेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन, घोषणाबाजी

$
0
0

पोलिस बंदोबस्तात सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीने निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून राज्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ७) धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीने दोन्ही जिल्ह्यातील खासदार, आमदारांच्या घराजवळ शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच खासदार व आमदारांच्या घरी त्यांच्या प्रतिनिधींना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील खासदारांच्या घराच्या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही जिल्ह्यात शेतकरी कष्टकरी सभेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

धुळे शहरात बुधवारी सकाळी शेतकरी कष्टकरी सभेचे किशोर ढमाले व शेतकरी संघटनेचे रवी देवांग यांच्या नेतृत्वाखाली साक्री तालुक्यासह ठिकठिकाणाहून आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांची कामगार कल्याण भवन येथे बैठक घेण्यात आली. त्यानंतर पायी चालत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारोळा रोडवरील निवासस्थानी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून त्यांचे प्रतिनिधी शांताराम पाटील यांना निवेदन दिले. त्यानंतर पुढे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या खोल गल्लीतील निवासस्थानी मोर्चेकरी पोहोचले. त्याठिकाणीदेखील आमदार गोटे उपस्थित नसल्याने त्यांच्या पत्नी हेमा गोटे व मुलगा तेजस गोटे यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात याव्या, असे सांगितले. शहरातील देवपूर परिसरात राहणारे धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील, साक्री तालुका आमदार डी. एस. अहिरे, तसेच मंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानीही जाऊन निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. रामसिंग गावित, कॉ. करणसिंग कोकणी, कॉ. साजूबाई गावित, कॉ. पवित्राबाई सोनवणे, कॉ. वंजी गायकवाड, कॉ. निंबाबाई ब्राम्हणे यांच्यासह महिला व पुरुषांचा मोर्चामध्ये सहभाग होता. जिल्हा पोलिसांकडून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांच्या कार्यालय व निवासस्थानाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

००

नंदुरबारलाही निवेदन

नंदुरबार जिल्ह्यातदेखील सत्यशोधक कष्टकरी सभेच्यावतीने खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घर आणि कार्यालयाबाहेर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. सोबतच शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदनही देण्यात आले.

००

शिरूड चौफुलीवर रास्ता रोको

शेतकरी संपाला धुळे जिल्हा राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (दि. ७) तालुक्यातील शिरूड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको करून शेतीमाल महामार्गावर फेकण्यात आला. यावेळी किरण शिंदे, किरण पाटील, प्रभाकर पाटील, अंकुश देवरे, अमोल पाटील, विनोद बच्छाव, निंबा पाटील आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृध्दीचा मार्ग धोत्रेत मोकळा

$
0
0

नाशिक ः समृध्दी महामार्गाला कडाडून विरोध करणाऱ्या धोत्रे गावातील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी देण्यास सहमती दर्शविली असून नुकतेच येथील जमिनींची मोजणी करण्यात आली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील १०० टक्के मोजणी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. समृध्दीचे महत्त्व शेतकऱ्यांच्या लक्षात येत असून, नाशिक जिल्ह्यातील विरोधही लवकरच शमेल आणि शेतकऱ्यांचा नकार होकारात बदलेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होऊ लागला आहे.

नाशिकमधील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यांतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारला समृध्दी महामार्गासाठी हव्या आहेत. परंतु, वडिलोपार्जित जमिनी सहजासहजी सरकारला देण्यास शेतकरी तयार नाहीत. याउलट विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे, पाथरे, डुबेरे यांसारख्या काही गावांमधील शेतकऱ्यांनी अजूनही विरोधाचे निशाण फडकावत ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही १०० टक्के मोजणी पूर्ण होऊ शकलेली नाही. अशीच परिस्थ‌िती काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात होती. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील शेतकऱ्यांकडून समृध्दी महामार्गाला प्रखर विरोध होता. तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे, घारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे या नऊ गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली. परंतु, धोत्रे गावातून तीव्र विरोध असल्याने नगर जिल्ह्यातील पुढील कार्यवाहीला ब्रेक लागला होता. आमच्या जमिनी सोडून अन्य कोठूनही या महामार्गासाठी जमिनी संपादीत करा, या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. त्यांनी सुचविल्याप्रमाणे प्रशासनाने अलाइनमेंट बदलण्याचे प्रयत्न केले. परंतु, ते व्यवहार्य ठरत नसल्याचे ग्रामस्थांना पटवून देण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रदीप चव्हाण या शेतकऱ्यासारखे जे लोक महामार्गाला तीव्र व‌िरोध करीत होते, ते आता प्रशासनाला मदत करू लागल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. हा विरोध मावळला असून, राज्यातील अन्य काही भागांतदेखील समृध्दीचे महत्व शेतकऱ्यांना पटू लागल्याचा दावा प्रशासनातील अधिकारी करीत आहेत.

४९ हेक्टर जमीन होणार संपादीत

धोत्रे गावातून ४.८८ किलोमीटरचा महामार्ग जातो. त्यासाठी सुमारे ४९ हेक्टर जमिनीची गरज आहे. शेतकऱ्यांची मनधरणी करून ही जमीन संपादीत करावी लागणार होती. सात-बारा नोंदींनुसार २९७ शेतकऱ्यांची जमीन या महामार्गामध्ये जात असून, शेतकऱ्यांनी जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी, शिर्डीचे प्रांताधिकारी, कोपरगावचे तहसीलदार, समृध्दी महामार्गाचे कामकाज पाहणारे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी धोत्रे ग्रामस्थांना समृध्दी महामार्गासाठी राजी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर शेळ्या जाणार परदेशी

$
0
0

नाशिक - गेल्या वर्षी १४ हजार शेळ्या-मेंढ्यांची ओझरहून आखाती देशात यशस्वी निर्यात झाल्यानंतर यंदा तब्बल एक लाख शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. जिवंत प्राणी निर्यातीसाठीचे अत्याधुनिक स्वरुपाच्या कार्गो विमानाची उपलब्धता केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून या शेळ्या-मेंढ्यांची खरेदी होणार असल्याने नजिकच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

ओझर येथील सुसज्ज विमानतळाच्या ठिकाणाहून आखाती देशामध्ये शेळ्यांची निर्यात करण्याचा यशस्वी प्रयोग गेल्या वर्षी झाला. कॉनकॉर ही कार्गो सेवा कंपनी, सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अमिगो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने ही निर्यात झाली होती. हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे महाव्यवस्थापक, हॅलकॉनचे सीईओ सुधाकर सेन, सानप प्रा. लि.चे संचालक जयंत सानप, शिवाजी सानप, अमिगो लॉजिस्टिकचे एमडी साजिद खान, सोव्हिका लॉजिस्टिकचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट एन. एस. हंस या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारतातून प्रथमच हवाईमार्गे शेळ्यांची निर्यात होऊ शकली. भारतातून समुद्रमार्गे आखाती देशात शेळ्या-मेंढ्यांसह ज‌िवंत प्राण्यांची वाहतूक केली जाते. मात्र, जून ते सप्टेंबर या काळात भारतामध्ये पावसाळा असल्याने समुद्रातील वाहतूक बंद असते. याच काळात आखाती देशांमध्ये शेळ्या-मेंढ्यांचा मोठा तुटवडा असतो. हीच बाब ओळखून गेल्यावर्षी थेट हवाईमार्गे शेळ्यांची निर्यात करण्यात आली. ८ कार्गो विमानांद्वारे एकूण १४ हजार शेळ्या-मेंढ्या दुबई येथे निर्यात झाल्या होत्या. २५हजारांहून अधिक शेळ्यांच्या निर्यातीचे उद्द‌िष्ट ठेवण्यात आले होते. गतवर्षीचा यशस्वी अनुभव लक्षात घेता यंदा तब्बल एक लाख शेळ्यांच्या निर्यातीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले आहे. या महिन्याच्या अखेरीसच ही निर्यात ओझरहून सुरू होणार आहे. जिवंत प्राण्यांच्या वाहतुकीसाठी अत्याधुनिक स्वरुपाचे कार्गो विमान उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या कार्गो विमानात एका वेळी हजारो शेळ्यांची निर्यात यशस्वी होऊ शकणार आहे. निर्यात होणाऱ्या या शेळ्यांची खरेदी ग्रामीण भागातून केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, दुबईहून ओझरला कार्गो विमान गेल्यावेळी रिकामेच येत असल्याने निर्यातीचा खर्च अधिक होता. यंदा आखाती फळे किंवा अन्य उत्पादने ओझरला आयात करण्याच्याही हालचाली गतिमान झाल्याने ओझरची कार्गो सेवा कात टाकणार असल्याचे कार्गो क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ घातला दातृत्वाचा आदर्श

$
0
0

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिला महिन्याभराचा पगार

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना केवळ त्यावर दुःख व्यक्त करीत सांत्वन करणाऱ्या राजकीय पक्षांपुढे आदर्श निर्माण केला आहे, तो एका नोकरदार माणसाने. त्यांनी आपला एक महिन्याचा पगार ५१ हजार रुपये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

राज्यात रोजच शेतकरी आत्महत्या होत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात राजकीय नेते धन्य मानतात. मात्र आपला खिसा कधीही रिता करीत नाहीत. मात्र एका नोकरदार माणसाने आपल्या महिनाभराचा पगार एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देऊन नक्कीच समाजाचे मन जिंकले आहे. कुंदेवाडीचे (ता. निफाड) भूमिपुत्र लक्ष्मण विनायक बेलदार (सहायक अभियंता महावितरण कंपनी, पंचवटी, नाशिक) असे या दातृत्वशील व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मण बेलदार यांनी नुकताच आपला एक महिन्याचा पगार रानवड येथील जितेंद्र तुकाराम वाघ या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास दिला. ५१ हजार रुपयांचा मदतनिधी देऊन समाजात एक शेतकरी कुटुंबाचा वारसा म्हणनू एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

मी ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या झळा विद्यार्थीदशेत मलाही बसल्या आहेत. शेतकरी आत्महत्येवर फक्त सांत्वन करण्यापेक्षा त्या कुटुंबाला सर्वप्रथम आधार द्यायचा असतो. म्हणून मी वाघ कुटुंबाला एक महिन्याचा पगार दिला असून, पुढील महिन्याचा पगारही एका आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देणार आहे.

- लक्ष्मण बेलदार, सहाय्यक अभियंता, महावितरण कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककर अनुभवणार आर्ट फेस्टची रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त १० व ११ जून रोजी सकाळी ९ वाजेपासून मविप्र आर्किटेक्ट कॉलेज, प्रसाद मंगलकार्यालयाजवळ आर्ट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट फेस्टचे उद्‍घाटन प्रसिध्द व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल उपस्थित रहाणार आहेत.

या फेस्टमध्ये नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे. नाशिकचे नामवंत शिल्पकार नीलेश ढेरे, यतीन पंडित, श्रेयस गर्गे, भूषण कोंबडे सहभागी होणार असून, ११ ते १ याकालवधीत त्यांचे प्रात्यक्षिक पहायला मिळणार आहे. दुपारी १ वाजेपासून चित्रकारांच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात होणार असून, यात संजय दुर्गावाड, बाळ नगरकर, कैलास परदेशी हे चित्रकार सहभागी होणार आहेत. हे प्रात्यक्षिक २.३० वाजेपर्यंत चालणार आहे. दुपारी ३ ते ४ याकालावधीत प्रभाकर झळके हे आपल्या कुंचल्याने कार्टून्सची मजा दाखवणार आहेत. श्रध्दा कारळे या ४ ते ५ या कालावधीत वारली पेंटिंग सादर करणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता प्रफुल्ल सावंत हे लॅन्डस्केप पेंटिंग तर राजेश सावंत हे क्रिएटीव्ह पेंटिंग सादर करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता प्रसाद पवार, समीर बोंदार्डे, संजय अमृतकर हे फोटोग्राफीविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. संध्याकाळी ६.३० वाजता नंदू गवांदे हे कॅलिग्राफी सादर करणार आहेत. तेव्हा नाशिककरांनी या आर्ट फेस्टला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन मटाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन प्रयोग मिळणार पहायला

नाशिकमधील परफॉर्मिंग आर्ट सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी हा या आर्ट फेस्टचा उद्देश आहे. या फेस्टमध्ये संगीत, वादन, नृत्य, चित्र, शिल्प या कलांचा संगम नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आंदोलनाची आज ठरणार दिशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची निश्चित दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी सुकाणू समितीची बैठक नाशिकमध्ये होत आहे. या बैठकीला खासदार राजू शेट्टींसह डॉ. बुधाजी मुळीक, अजित नवले, डॉ. गिरीधर पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, बाबा आढावांसह दिग्गज हजेरी लावणार आहेत. दुपारी बारा वाजता तुपसाखरे लॉन्सला ही बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीवर सरकारी यंत्रणाचे बारीक लक्ष राहणार आहे. सुकाणू समितीत राजू अनिल धनवट, हंसराज वडघुले, संतोष वाडेकर, संजय पाटील, बच्चू कडू, विजय जावंधिया, राजू देसले, गणेश काका जगताप, चंद्रकांत बनकर, शिवाजी नानखिले, डॉ. बुधाजी मुळीक, गणेश कदम, करण गायकर, अमृता पवार, रामचंद्र बापू पाटील यांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दरबारी शेतकऱ्यांचे ‘लोटांगण’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव मिळावा, शेतकऱ्यांना पेन्शन मिळावे, दुधाला पन्नास रुपये लिटर भाव मिळावा आदी मागण्यांसाठी वडाळी नजीक (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत आणि लोटांगण घालत पिंपळगाव पोलिस ठाण्यात यांना निवेदन सादर केले. शेतकरी कर्जमाफीसाठी गेल्या आठ दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. मात्र वडळी नजीक येथील शेतकऱ्यांनी कैलास होळकर यांच्या नेतृत्त्वाखाली केलेले या लोटांगण आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

पोलिसांना या अनोख्या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी एक दिवस आधीच सूचना दिली होती. तरीही या आंदोलनामुळे स्वरूप आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा लक्षात घेता पिंपळगाव पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक यावेळी सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने भजन करत व लोटांगण घालत पोलिस निरीक्षक देसले यांन निवेदन दिले. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. येथील ऋचा हॉटेलपासून कैलास होळकर यांनी लोटांगण घालण्यास सुरुवात केली. पोलिस स्टेशनपर्यंत लोटांगण घालत टाळ मृदूंग आणि भजनाच्या गजरात आंदोलन पोहोचले. यावेळी कैलास होळकर यांच्यासह बाळासाहेब झाल्टे, गोकूळ झाल्टे, किरण पगार, सोमनाथ झाल्टे, शिवाजी घोलप, केशव कडलग आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायगावात निषेध दिंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतकरी संपाच्या बुधवारच्या सातव्या दिवशी येवला तालुक्यात पूर्वीच्या सहा दिवसांच्या तुलनेत विविध आक्रमक आंदोलनांची धार काहीसी कमी झालेली दिसली. तालुक्यातील सायगांवसह इतर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन केले. संपात सहभागी गावोगावच्या शेतकऱ्यांनी बुधवारीही दूध संकलन केंद्रांवर दूध घातले नाही. शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने येवला बाजार समिती मुख्य बाजार आवार, अंदरसूल उपबाजार आवार सातव्या दिवशीही ठप्पच होते.

तालुक्यातील सायगांवमध्ये हाती काळे झेंडे नाचवत तसेच गळ्यात कांदा आणि भाजीपाल्याच्या माळा घालत निषेध दिंडी निघाली. शेतकऱ्यांच्या सहभाग असलेल्या या दिंडी आंदोलनात प्रत्येकाच्या मुखी गजर होत होता तो शासनाच्या निषेधाचा.

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवसापासून दररोजच वेगवेगळी आंदोलने करून शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या येवला तालुक्यातील सायगावात मंगळवारी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत अर्धनग्न मोर्चा काढला होता. बुधवारीही दिंडी काढून प्रशानावर कोरडे ओढले. शेतकऱ्यांच्या गळ्यातील कांदा व इतर भाजीपाल्यांच्या माळा, हातात निषेधाचे काळे झेंडे लक्षे वेधत होते. गावातील रोकडोबा पारावर सकाळी नऊ वाजता जवळपास दीड ते दोन हजार शेतकरी एकत्र जमले. त्यानंतर गावातून दिंडी काढण्यात आली.

शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव, भागुनाथ उशीर, अॅड. राहूल भालेराव यांच्यासह बबन सूर्यवंशी, विठ्ठल उशीर, सोपान उशीर, विजय खैरनार, छगन उशीर आदी शेतकरी सहभागी झाले होते.

बाजार ठप्पच

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार बुधवारीही ओस पडले होते. कांदा अथवा इतर कुठलाही शेतमाल घेवून एकही शेतकरी बाजारसमितीकडे न फिरकल्याने बाजार समित्यांमध्ये शांतता होती. अंदरसूल आवारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.

दूध संकलन केंद्रेही बंद

तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपाच्या सातव्या दिवशी देखील दुधाचा रतीब बंद ठेवला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी डेअरी अर्थातच दूध संकलन केंद्रासह इतर ठिकाणी आपल्याकडील दररोजचे दूध न घातल्याने अनेक ठिकाणची दुध संकल केंद्रे बंदच दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड ताबा कारवाई फोल

$
0
0

नाशिक ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत तब्बल १७९ उद्योजकांना भूखंड ताब्यात घेण्याच्या नोट‌िसा देऊन मोठी कारवाई केल्याच्या वल्गना केल्यानंतर आता केवळ दोनच भूखंड ताब्यात मिळणार असल्याचे बोलले जात आहे. नोटीस दिलेल्या बहुतांश उद्योजकांनी बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला (बीसीसी) नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या तांत्रिक गोष्टीची पूर्तता करून ते नियमित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

भूखंड ताब्यात घेण्याच्या या कारवाईतून मोठ्या प्रमाणात भूखंड एमआयडीसीला पुन्हा मिळेल अशी अपेक्षा होती तूर्त तरी ती फोल ठरली आहे. भूखंड ताब्यात घेण्याच्या या कारवाईत दोन उद्योजकांनी भूखंड ताब्यात घेतल्यानंतर मात्र कोणताच उद्योग सुरू केला नाही. त्यातील एक भूखंड सातपूर तर दुसरा अंबड येथे आहे. एमआयडीसने मे महिन्यात या उद्योजकांना नोट‌िसा दिल्या होत्या त्यात सातपूर येथील ३६ मोठे तर ८५ लघु उद्योगांचा समावेश होता. या नोटीस दिल्यानंतर बहुतांश उद्योजकांनी एमआयडीकडे धाव घेऊन आपल्या समस्या मांडल्या. त्यात वेगवेगळ्या कारणाने बीसीसी मिळाली नसल्याची बाब पुढे आली आहे. सातपूरप्रमाणे अंबड येथे नोटीस दिलेल्या १९ मोठे तर ३९ लघुउद्योग आहे यातही बीसीसीचाच प्रश्न मोठा आहे.

गेल्या काही महिन्यापासून राज्यभर विनावापर भूखंडाचा प्रश्न चर्चेत आहे. त्यातून एमआयडीसनेही मोठी कारवाई केली. मात्र त्यात त्यांना खूप यश आले नाही. या तांत्रिक गोष्टी पूर्ण का केल्या जात नाही, असाही प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे. ‘मेक इन नाशिक’मध्ये अनेक उद्योजकांनी गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यात बहुतांश उद्योजकांनी नाशिक येथेच जागा असावी, अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे आता या उद्योजकांना एमआयडीसी कोणते प्लॉट देईल असाही प्रश्न पुढे येणार आहे.

उद्योजकांना दिलेल्या भूखंडात बांधण्यात येणाऱ्या बांधकामासाठी अगोदर प्लॅन मंजूर करावा लागतो. त्यानंतर बांधकाम झाल्यानंतर त्याचा पूर्णत्त्वाचा दाखला घेणे गरजेचे आहे. बीसीसी पूर्णत्त्वाचा दाखला नसतांना बँकेने या उद्योगांना कर्ज दिले का? औद्योगिक परवाना कसा दिला? औद्योगिक सुरक्षेत 'बीबीसी'चे महत्त्व किती आहे? नाईस व एमआयडीसीने इतक्या दिवस हा गंभीर विषयावर काय कारवाई केली असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.


गेल्या महिन्यात १७९ उद्योजकांना नोट‌िसा दिल्या होत्या. त्यातील बहुतांश जणांना बीसीसीचा प्रश्न आहे. या नोट‌िसा दिल्यानंतर अनेक उद्योजकांनी आपले प्रश्न मांडले. ते सोडवण्याचा प्रयत्न करू. या नोटीसमुळे अवघे दोनच प्लॉट ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे.- हेमांगी पाटील-भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडचणी वाढल्या...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक,

महापालिकेचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन, माजी अधिक्षक अभियंता आर. के. पवार व विद्युत विभागाचे उपअभियंता नारायण आगरकर यांच्यासंदर्भात झालेल्या तक्रारीत प्राथमिक दृष्ट्या तथ्य आढळून आले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशीत कामकाजात चुकारपणा व गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे. त्यामुळे या त‌िघांची विभागिय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत. विभागीय चौकशीत अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता असल्याने या त‌िघांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महापालिकेतील अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारल्यानंतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांविरोधात पत्रकबाजी सुरू केली होती. परंतु आयुक्तांनी या प्रकाराला न जुमानता कारवाईचे हत्यार उपसले आहे. पालिकेतील २०२ कोटींच्या एलईडी घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता नारायण आगरकर दोषी आढळले होते. आगरकर सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांची विभागीय चौकशी प्रलंबित होती. तसेच अग्निशमन विभागाकडून रुग्णालये, हॉटेल्ससाठी अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घेणे बंधनकारक होते. परंतु दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तो आदेश रद्द करीत अशा प्रकारची परवानगी बंधनकारक नसल्याचे परिपत्रक काढले होते. सदरचे परिपत्रक दोन वर्ष दडवून ठेवल्याचा आरोप महाजन यांच्यावर होता. परंतु आपल्याला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनायाकडून परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचा दावा महाजनांनी केला होता. याप्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी केली होती. त्यात महाजन दोषी आढळल्याने त्यांची विभागिय चौकशी प्रस्तावित केली आहे.

यंत्रे धूळ खात

खतप्रकल्पावरील ६० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. २००७ ते २०१० या कालावधीमध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत खत प्रकल्पासाठी साठ कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली होती. यंत्रे चालविण्यासाठी कर्मचारी नसताना खरेदी झाली व अखेरपर्यंत विनावापर यंत्रे पडून होती. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले होते. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश महासभेत देण्यात आले होते. प्रशासन उपायुक्त, मुख्य लेखा परिक्षक व आरोग्य अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीने जानेवारी २०१६ मध्ये आयुक्तांना चौकशी अहवाल सादर केला होता. त्यात पवार दोषी आढळल्याने त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

महापौर आयुक्तांच्या पाठ‌िशी

आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संघटनेला महापौर रंजना भानसी यांनी दणका दिला असून, आपण आयुक्तांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. आयुक्तांनी गेले वर्षभरात शहर विकासासाठी चांगले काम केले असून शहराची प्रथम नागरिक म्हणून मी त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी जाहिर केले. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाचं पाहिजे अशी भूमिका घेत महापौरांनी आयुक्तांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेची हवा काढली आहे. पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी नाशिक म्युन्सिपल कार्पोरेशन ऑफ‌िसर्स असोसिएशनकडे धाव घेतली होती. या संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव, आमदारांना पत्राद्वारे तक्रार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आता पावसा मातीशी कर लगीन साजरं’

$
0
0

नाशिक ः शब्दांची गुंफण करणाऱ्या कवीचा मोठा सन्मान म्हणजे त्याचे शब्द घराघरात पोहोचणे. ही शब्दरूपी कविता प्रत्येकाच्या ओठी आली की त्याच्या श्रमाचे चीज होते. नाशिकचे प्रसिध्द कवी प्रशांत केंदळे यांनी लिहिलेल्या गीताला असाच सन्मान मिळाला आहे. आगामी ‘धोंडी’ या मराठी चित्रपटातून हे गीत संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हे गीत प्रशांत केंदळे यांच्याच स्वरात गुंफण्यात आलेले आहे.

‘माझं आभाळ तुला घे...तुझं आभाळ मला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला’ या कवी प्रकाश होळकर यांच्या कवितेने एकेकाळी धूम केली होती. हीच कविता पुढे गीत बनून ‘टिंग्या’ चित्रपटातून आली. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच पुढे महाराष्ट्रातील अनेक कवींनी गीतकार होण्याची वाट चोखाळली. मात्र, त्यात अनेकजण अपयशी ठरले. सांस्कृतिक नाशिकचा ज्यांना वारसा लाभला आहे असे मिलिंद गांधी, विष्णू थोरे यांसारखे कवी मात्र चित्रपटांतून गीतकार म्हणून चमकले. याच कवींच्या पावलावर पाऊल ठेवून नाशिकचे कवी प्रशांत केंदळे ९ जूनला प्रदर्शित होत असलेल्या धोंडी चित्रपटातील गीताच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहेत.

‘आता पावसा
मातीशी कर लगीन साजरं
गुलमोहराचं कुकू
तिच्या भांगामधी भर’

असे त्या गीताचे बोल असून, त्याला स्वरसाजही प्रशांत केंदळे यांचाच आहे. या गीताला चालही प्रशांत यांनीच दिली आहे. त्यांना हे गाणे मिळण्याची कहाणी भावनाशील आहे. कळवणच्या एका कार्यक्रमात शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांनी प्रशांत केंदळे यांच्या स्वरातील ही कविता ऐकली. लगेचच त्यांनी सयाजी शिंदे यांना ती कविता ऐकण्याविषयी सुचविले. प्रशांत यांचा नंबरही दिला. पाचच मिनिटांत प्रशांत यांना सयाजी शिंदे यांचा फोन आला व त्यांनी त्या कवितेची फर्माइश केली. पुढे या कवितेने त्यांच्यावर इतके गारूड केले की ‘धोंडी’ चित्रपटात या कवितेचे गाणे करून घ्यावे, असे त्यांनी दिग्दर्शकाला सुचविले. त्यानुसार चित्रपटाच्या क्लायमॅक्सला हृदयद्रावक प्रसंगी हे गीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मूळ टाकळी विंचूर येथील असलेले केंदळे वडिलांसोबत नाशिकला आले. कवितेच्या प्रेमात लहानपणापासून असल्याने शब्दांशी खेळण्याचा नाद त्यांना लागला. त्यातूनच ही ‘गुलमोहराचं कुकू’ ही कविता आली असून आतापर्यंत कवितेने खूप दिले असल्याची भावना केंदळे व्यक्त करतात. सध्या ते नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. शेतकरी संपाची पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ९) ‘धोंडी’ प्रदर्शित होत आहे.

टाकळी विंचूरला असताना दिवस-दिवसभर पावसाची वाट पाहत असायचो. त्यातून ही पावसाची कविता सुचली. आई-वडिलांना खूप कष्ट करताना पाहिले आहे. ते खूप प्रामाणिकपणे आयुष्य जगले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ या कवितेच्या रुपाने माझ्या पदरात पडले आहे. आता ही कविता घरोघर जाणार असल्याचा खूप आनंद आहे.
- प्रशांत केंदळे, कवी-गीतकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना पोस्टाने दाखले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फीमध्ये भरमसाठ शुल्कवाढ, आरटीई प्रवेशांमध्ये घोळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली केंब्रिज शाळा पुन्हा वादात फसली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नववीतून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात फी न भरल्याच्या मुद्यावरून शाळा सोडल्याचा दाखलाच टेकविले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेलाही शाळेने जुमानले नसून विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या भूमिकेवर ते अडून राहिले. दरम्यान, संतापलेल्या पालकांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये शाळेविरोधात तक्रार दिली आहे.

शहरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बेकायदेशीररित्या पालकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत असल्याची प्रकरणे वारंवार समोर येत आहे. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शेकडो पालक याविरोधात लढत आहेत. नुकतेच काही शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, असे असले तरी पालक व शाळा प्रशासन यांच्यातील जुन्या वादांचे मुद्दे पुन्हा नव्याने समोर उभे राहिले आहेत. त्याचेच चित्र बुधवारी इंदिरानगर येथील केंब्रिज शाळेसमोर दिसून आले. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेने घरचा रस्ता दाखवला. या विरोधात पालक शाळेबाहेर एकत्र जमले होते. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी शिवनाथ मंडलिक यांनी शाळेला पालकांशी चर्चा करण्याची दिलेली सूचनाही शाळेने झिडकारून लावली.

काय आहे प्रकरण?

नाशिक केंब्रिज शाळेतील बेकायदेशीररित्या फी वाढीविरोधात पालकांचे दीड वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. राज्याच्या विभागीय शुल्क नियमन समितीसमोर सुनावणीस असताना शाळेने हायकोर्टात याबाबत हरकत घेतली आहे. त्यामुळे हा विषय प्रलंबित आहे. असे असतानाही शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणास्तव शाळेबाहेर काढले आहे. तसेच ज्युनिअर व सिनिअर केजीच्या अशा विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याच्या सूचनाही पालकांना दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

फी न भरल्याचा रिमार्क

सिडको : पोस्टाने शाळासोडल्याचे दाखले पोचल्यानंतर संबंधित पालकांना हा प्रकार लक्षात आला. तसेच या पाठविलेल्या दाखल्यांवर फी न भरल्याचा रिमार्क स्पष्टपणे दर्शविण्यात आला आहे. अचानक झालेल्या या प्रकारातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशीच खेळण्याचा प्रकार शाळेकडून सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत त्यांनी इंदिरानगर पोलिसांनाही पत्र दिले आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची अडचण करू नये असे शाळेला बजावले आहे. पालक व शाळा प्रशासनाने फीचा मुद्दा चर्चेतून सोडविण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. मात्र, शाळा व पालक आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. शिक्षण उपसंचालकांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल. शाळेला नोटीसही बजावली आहे.
- नितीन उपासनी, प्रभारी शिक्षणाधिकारी जिप माध्यमिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिहेरी खून कुटुंब कलहातूनच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

कोकणगावमध्ये (ता. दिंडोरी) गत आठवड्यात झालेल्या तिहेरी खूनाच्या घटनेचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. कौटुंबिक कलहाने त्रस्त झालेल्या मोठ्या मुलानेच आई, वडील आणि लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ जगन्नाथ शेळके (२१) आला अटक करण्यात आलीआहे. कोकणगावमध्ये ३० मे रोजी जगन्नाथ शेळके, शोभा जगन्नाथ शेळके आणि हर्षद शेळके यांच्या डोक्यात घाव घालून त्यांचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. पुरेसे पुरावे मिळत नसल्याने पोलिसही सुरुवातीला चक्रावले. चौकशी दरम्यान प्रकरणाची उकल झाली.

यामुळे केले हत्याकांड

शेतीकडे लक्ष देत असूनही वडील सोमनाथला सतत दोष देत. याउलट काहीच काम न करणाऱ्या धाकटा भाऊ हर्षदही कुणी बोलत नसे. याबद्दलचा सोमनाथच्या मनात राग खदखदत होता. हर्षदचे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर शेळके कुटुंबात वाद सुरू झाले. जगन्नाथ शेळके हे सोमनाथलाही ‘तू दारू पितो, तुझेही अनैतिक सबंध आहेत’, असा आरोप करीत शिवीगाळ करू लागले. यावरून आई वडिलांचे भांडण सुरू होते. त्यावेळी राग अनावर झाल्याने सोमनाथने घरात ट्रॅक्टरच्या टॉपलिंगने वडील, आई व हर्षद या तिघांच्या डोक्यात घाव घालत त्यांची हत्या केल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानंतर सोमनाथ एका हळदीच्या कार्यक्रमाला गेला. तेथून परतल्यानंतर त्याने घटनेबाबत कांगावा केला होता.

पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर नवले, सहाय्यक निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मच्छिंद्र रनमाळे, अनिल धुमसे, अरुण पगारे, अमोल घुगे, रामहरी मुंढे, रविंद्र वानखेडे, कैलास देशमुख यांनी हा गुन्हा उघडकीस आला.

समाधानचा यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न

सोमनाथ हा अत्यंत रागीट स्वभावाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काम करूनही आई वडील सतत आपल्यालाच रागावतात याचा राग त्याच्या मनामध्ये धुमसत होता. आंब्याच्या झाडाच्या फांद्या छाटल्याच्या कारणावरून २०१३ मध्ये त्याने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

रागाच्या भरात खून केल्यानंतर आरोपीने थंड डोक्याने त्याबाबत बनाव रचला. परंतु, या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यात आम्ही यशस्वी झालो. संशयिताने वडील, आई, आणि भावाचा खून केल्याची कबुली दिली आहे.
- अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्युपिटर हॉटेलला लग्न पडले महागात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हळद व लग्नसोहळ्यात ठरल्याप्रमाणे सुविधा न देणे व जास्तीची रक्कम घेऊन सेवेत कमतरता ठेवल्याप्रकरणी पाथर्डी फाट्यावरील मिऊस ज्युपिटर हॉटेलला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दीड लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहे. तसेच अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये वेगळे देण्याचेही आदेश या आदेशात म्हटले आहे. सेवेतील कमतरता व शारिरीक व मानसिक त्रास दिल्याबद्दलचा हा निकाल हॉटेल व्यवसायात मनमानी करणाऱ्यांना चाप बसवणारा आहे.

राजीवनगर येथील लता भगवान चौधरी यांनी याबाबत ग्राहक मंचात तक्रार केली होती. चौधरी यांनी हळदी व लग्न सोहळ्यासाठी मिऊस ज्युपिटर हॉटेलमध्ये दोन दिवसासाठी हॉल, १५ रुम्स बुक केल्या. तसेच चहा, नाष्टा, जेवण कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य, स्टाफ व टॅक्स मिळून साडेचार लाख रुपये अदा केले. यात स्टाफ व चांगल्या सुविधा देण्याचे हॉटेलने सांगितले. पण पहिल्याच दिवशी सकाळी रुम्स उपलब्ध करून न दिल्याने दुसऱ्या हॉटेलमध्ये रुम्सची व्यवस्था करावी लागली. दुपारी चार वाजता हळदीच्या कार्यक्रमाला दिलेला हॉलही अडीच तास उशिरा दिला. सायंकाळी ठरल्याप्रमाणे जेवणाचा मेनू दिला नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर स्टाफ नसल्याने सेवा पुरवू शकत नसल्याचे कारण देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच लग्नाच्या दिवशी ७५ ते १०० नातेवाइकांनाच नाष्टा देण्यात आला. इतर नातेवाइकांना केवळ उपमा व पोहे देण्यात आले. तसेच हॉलमध्ये खुर्च्या, डोकेरेशन किंवा कोणतीही तयारी ठरल्याप्रमाणे केली नाही. जेवण नीट नव्हते, स्टाफही उपलब्ध नव्हता. हॉल सोडतेवेळी लग्नसोहळ्यास अधिक लोक आल्याचे कारण देत अतिरिक्त ७५ हजार रुपयांची मागणी झाली. तेही दिले. पण बिलाची मागणी केल्यानंतर रात्री येण्यास सांगितले. भाऊ बिल घेण्यासाठी रात्री गेल्यानंतर हॉटेल टॅक्स म्हणून दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर वाद घालत भावाला हॉटेलमधून बाहेर काढले. त्यामुळे नाईलास्तव दीड लाखाचा चेकही दिला. त्याबाबत इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता शेतकऱ्यांचा कट्टरवादही पाहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांवर दरोडा टाकला. तरीही शेतकऱ्यांवरच दरोड्याचे गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. शेतकऱ्यांवर जुलूम कराल तर वेळ पडल्यास शेतकरी सरकारी मालमत्तांवर दरोडे टाकण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. तलवारी चालवल्यात तर बॉम्ब फेकू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी नाशिकमध्ये दिला. आतापर्यंत सरकारने धर्मवाद पाहीले असतील. आता शेतकऱ्यांचा कट्टरवादही पहा, असा इशाराही कडू यांनी दिला.

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीच्यावतीने आयोजित शेतकरी संघटनांच्या बैठकीत आमदार कडू बोलत होते. नाशिक शहरातील तूपसाखरे लॉन्समध्ये ही बैठक झाली. यावेळी कडू म्हणाले, आम्ही पिक बदलून पाहीले. खते, बियाणे बदलून पाहीले, औषधे फवारणीची पद्धतही बदलली. परंतु शेतकऱ्यांची परिस्थ‌िती काही बदलली नाही. विरोधी पक्षात असताना सोयाबीनला किमान सहा हजार रुपये भाव मिळायलाच हवा अशी मागणी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते. परंतु आता त्यांचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा संपला का? तुम्ही खरे शेतकरी कोण हे शोधू, अशी भाषा वापरता मग तेव्हाचे फडणवीस खरे की आताचे, असा सवाल कडू यांनी उपस्थ‌ित केला. जो शेतकरी शेतीमध्ये नांगर घालतो तो सरकारदेखील घालवू शकतो, अशा शब्दात कडू यांनी संताप व्यक्त केला.

स्वामीनाथन आयोग लागू न करण्यासाठी सरकार अनेक कारणे पुढे करत आहे. पण हेच सरकार काम न करणाऱ्या, टेबलखालून पैसे घेणाऱ्यांसह सर्वांनाच सातवा वेतन आयोग कसा लागू करते, असा सवाल कडू यांनी उपस्थ‌ित केला. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या दानवे, हंसराज अहिर, माधव भंडारी यांच्यावरही या शेतकरी मेळाव्यात परखड शब्दांत टीका करण्यात आली. आतापर्यंतचे आंदोलन हा केवळ ट्रेलर होता. १३ जूनपासून खरा पिक्चर सुरू होईल. आंदोलनांद्वारे सरकारचे बारा वाजवू असा इशारा यावेळी देण्यात आला.

पोलिसांनो, शरम वाटू द्या

आमदार कडू यांनी पोलिसांच्या कार्यशैलीचा चांगलाच समाचार घेतला. गावांमध्ये दारूअड्डे सुरू असतात. परंतु ते तुम्हाला दिसत नाहीत. अवैध धंद्यावाल्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना पोलिसांनी मारहाण केली असे कधी ऐकीवात नाही. मात्र, शेतकऱ्यांवर लाठ्या चालविल्या जातात. शेतकऱ्यांवर लाठ्या चालविणे म्हणजे तुमच्या बापावर लाठ्या चालविणे होय. पोलिसांनी याची जरा तरी शरम बाळगावी असे कडू यांनी सुणावले. जेवढे तुमचे पोट वाढले आहे तेवढे या आंदोलनात कमी करू. वेळप्रसंगी पोलिस महासंचालकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यासही शेतकरी मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा पोलिसांना देण्यात आला. पोलिसांना एकाही शेतकऱ्याने मुलगी देऊ नये असा प्रस्ताव सभास्थळावरील गर्दीतून एका शेतकऱ्याने मांडला. त्यावेळी एकच हशा पिकला.

…तर ‘वर्षा’वर भाजीच होणार नाही

शेतकरी बेईमानीने कमावत नाही. तो रक्ताचे पाणी करून अन्नधान्य पिकवितो. शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची जमीन सरकण्यास वेळ लागणार नाही. मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेण्याची धमक शेतकऱ्यांमध्ये आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणारा भाजीपाला कसा रोखायचा हे आम्हाला माहीत असल्याचे कडू म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांचा भरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयसीआयसीआय बँकेच्या कालिका मंदिरजवळील आणि बोधलेनगर येथील शाखेत तब्बल ६७ हजार १०० रुपये किमतीच्या बनावट नोटांचा भरणा करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभराच्या कालावधीत अज्ञात ग्राहकानी या नोटांचा भरणा केला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

विनय प्रभाकर चंद्रात्रे (रा. तांबोळीनगर, हिरावाडीरोड) यांच्या तक्रारीनुसार, आसीआयसीआय बँकेच्या बोधलेनगर आणि कालिका मंदिर शाखेत या बनावट नोटांचा भरणा आढळून आला आहे. १ डिसेंबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान अज्ञात भामट्यांनी ५० रुपयांच्या दोन, शंभराच्या ३५, पाचशेच्या ७७ व एक हजाराच्या २५ बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून बँकेत भरणा केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

गंगापूररोडला घरफोडी

गंगापूररोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल एक लाख २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करण्यात आला असून, सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब कारभारी आहेर (रा. शीतल अपार्ट. गंगापूररोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आहेर कुटुंबीय मंगळवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील लॅपटॉप, सोन्याचांदीचे दागिने आणि २२ हजाराची रोकड असा सुमारे एक लाख २२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

बेकायदा गॅसभरणा अड्डा उद्‍ध्वस्त

घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून देणारा अड्डा भद्रकाली पोलिसांनी उद्‍ध्वस्त केला. जुन्या नाशिकमधील पंजाब हॉटेलमागे सुरू असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करीत दोन गॅस सिलिंडर टाक्यांसह गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी अड्डा मालकाविरूध्द भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर एडिसन खान (रा. हरिमंजिल, बागवानपुरा) या संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानने हॉटेल पंजाबच्या पाठीमागे पत्र्याचे शेड उभारून अवैध धंदा सुरू केला होता. या घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारला. शेडमध्ये दोन गॅस सिलिंडरच्या टाक्या आणि वाहनात गॅस भरणा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. या प्रकरणी संशयित मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

कोल्हापूरच्या प्रवाशाचा हॉटेलमध्ये मृत्यू

हॉटेल पंचवटीमध्ये थांबलेल्या कोल्हापूर येथील ४४ वर्षीय प्रवाशाचा आकस्मात मृत्यू झाला. सदर प्रवाशाचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अभिनंदन मधुकर गडकरी (रा. महाघररोड) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. गडकरी कामानिमित्त शहरात आले होते. हॉटेल पंचवटी येथे ते १८ मे रोजीपासून थांबले होते. बुधवारी दुपारपर्यंत ते आपल्या रूममधून बाहेर न पडल्याने लॉजिंग व्यवस्थापनाने चौकशी केली. ते रूममध्ये मृतावस्थेत मिळून आले. दुर्धर आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार धात्रक करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

लोहशिंगवे येथील ३० वर्षीय तरुणाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आनंद प्रभाकर मोरे (रा. लोहशिंगवे ता. जि. नाशिक) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आनंदने बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरातील छताच्या लोखंडी कडीला ओढणीने गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यास देवळाली कॅन्टोमेंट हॉस्पिटल दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक ढगे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images