नाशिक शहराची सध्याची लोकसंख्या ही २० लाखांच्या आसपास असून, येत्या २० वर्षांत ती दुपटीने वाढणार आहे. शहराचे नागरिकरण झपाट्याने होत असल्याने लोकसंख्यावाढीचा वेगही तेवढाच आहे. त्यातच नाशिकचा समावेश आता केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत झाला असून, नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. सद्यःस्थितीत शहरातील सर्वाधिक समस्या ही वाहतूक आणि पार्किंगची आहे. त्र्यंबकरोड, गंगापूररोड, नाशिकरोड ते शालिमार हे तीन रस्ते सोडले तर इतर रस्त्यांवर वाहतुकीचा कोंडमारा होत आहे. महापालिकेसमोरची ही सर्वात मोठी समस्या आहे. मुंबई- आग्रा महामार्गावर साडेआठ किलोमीटरचा उड्डाणपूल झाला असला तरी द्वारका, मुंबई नाका, इंदिरानगर अंडरपास येथे वाहतुकीची समस्या कायम आहे. विशेषतः जुने नाशिक, सीबीएस, अशोक स्तंभ, पंचवटी, या शहराच्या कोअर भागात तर वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर आहे. शहरातील रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतूक आणि पार्किंगच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट या कंपनीवर शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सोपविले होते.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संबंधित कंपनीला शहरातील रस्त्यांचे सर्व्हेक्षण करून पुढील वीस वर्षांसाठी शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यात बीआरटीएसच्या चाचपणीसह मोनोरेलसंदर्भातही अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने गेले वर्षभर शहरातील सर्व रस्त्यांचा व पार्किंगच्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर आपला अहवाल तयार केला आहे. त्यात रस्ते, पूल यांच्यासह पार्किंगची कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. कंपनीच्या वतीने शहरात सद्यःस्थितीतील रस्त्यांची गरज पाहता हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्टवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील बससेवा सक्षम करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करून सन २०३६ मध्ये शहराला १३१९ बसेसची गरज असल्याची सूचना करण्यात आली आहे.
बीआरटीएस, ट्रामचाही विचार
आयटीडीपीने शहरातील तीन रस्त्यांवर बीआरटीएस प्रकल्पाला अनुकूलता दर्शवली होती. यूटीडीपीनेही बीआरटीएसचा अभ्यास केला आहे. सोबतच मेट्रो, मोनोरेल आणि ट्राम बसेसबाबतही त्यांनी आपला अहवाल तयार केला आहे. बसेसची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी बीआरटीएस आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून त्याचाही विचार केला जात आहे. प्रशासनाकडून त्याच्या अंमलबजावणीसाठीचे पावले टाकली जाणार आहेत. त्यामुळे या प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही अंशी फुटण्याची शक्यता आहे.
शिफारशी
बससेची संख्या वाढवणे
२२ वाढीव चौकांसाठी सिग्नल बसवणे
पादचाऱ्यांसाठी ९३ किमी पदपथ
५४ किमीचा सायकल ट्रॅक
शहराच्या सीमेवर ट्रक टर्मिनस तयार करणे
रिंगरोडची पूर्तता करणे
रस्त्यांची रुंदी वाढवणे
सिग्नलची संख्या वाढवणे
४० ठिकाणी पे अॅण्ड पार्किंग
शहराच्या वाहतूक व पार्किंगचे पुढील २० वर्षासाठीचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी दिल्लीस्थित यूएमटीसी कंपनीला आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा आराखडा सादर होणार असून, शहर विकासासाठी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
-अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट