म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात गेल्या १२ दिवसांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ११ व्यक्ती दगावल्या असून, त्यापैकी आठ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली आहे. याशिवाय ४३ जनावरे (जित्राब) मृत्युमुखी पडली असून, त्यापैकी २२ जनावरांसाठी ५ लाख ६७ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात तीन जून ते १३ जून या कालावधीत अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. वीज अंगावर पडून १० जणांचा, तर दरड कोसळून एक जणाचा मृत्यू झाला होता. यापैकी सर्वाधिक तीन घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडल्या. मालेगाव आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी दोन, तर बागलाण, चांदवड आणि नांदगाव तालुक्यात प्रत्येकी एक घटना घडली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत ११ पैकी आठ जणांच्या कुटुंबीयांना मदत मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित तीन जणांच्या कुटुंबीयांनाही येत्या दोन- तीन दिवसांत मदत मंजूर केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय ४४) आणि मयूर रघुनाथ मवाळ (वय १८, दोघेही रा. चोंढी, सिन्नर) आणि विठोबा कमू उघडे (वय २५, रा. खेड देवाचीवाडी, इगतपुरी) यांना मदत मिळणे बाकी आहे.
मृत जनावरांसाठी ५.६७ लाख
गाय आणि म्हैस यांसारखी दुधाळ जनावरे नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडली तर त्यासाठीही सरकार आर्थिक मदत करते. अशी सात जनावरे मृत्युमुखी पडली असून, प्रतिजनावर ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यानुसार मृत जनावरांच्या मालकांना दोन लाख १० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे, तर शेळीसारखी चार लहान दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. मात्र, त्यांच्या मालकांना अद्याप मदत देण्यात आली नाही. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये एवढी मदत केली जाते. अशा १९ जनावरांचा मृत्यू झाला असून, १३ जनावरांच्या मालकांना तीन लाख २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. ओढकाम करणाऱ्या छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी १६ हजार रुपये याप्रमाणे ३२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
आपत्तीतील मृतांची नावे
विठोबा कमू उघडे (वय २५, रा. खेड देवाचीवाडी, इगतपुरी), सोनीबाई पुंडलिक आंबेकर (४५, रा. वायघेळपाडा, त्र्यंबकेश्वर), अरुण पुंडलिक आंबेकर (२२, रा. वायघेळपाडा, त्र्यंबकेश्वर), आनंदा पुंडलिक गमे (२४, रा. मेटघर किल्ला), समाधान बहादूरसिंग सुमराव (३०, रा. टोकडे, मालेगाव), सुनंदा दिनकर गायकवाड (३२, रा. गरबड, मालेगाव), जागृती हिरामण बच्छाव (१४, रा. देवळाणे, बागलाण), कविता बापू ठाकरे (३२, रा. उर्धूळ, चांदवड), रामदास पोपट राठोड (३०, रा. कसाबखेडा, नांदगाव), रघुनाथ कोंडाजी मवाळ (४४, रा. चोंढी, सिन्नर), मयूर रघुनाथ मवाळ (१८, रा. चोंढी, सिन्नर).
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट