समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू केली असली तरी अजूनही बहुतांश मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पावसामुळे मूल्यांकनात अडथळे येत असून हे काम रखडले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनाचा १ ऑक्टोबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या घोषणेपासूनच त्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाची धार तीव्र असतानाही सरकारने शेतकऱ्यांची मनधरणी करण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे. संपादित करावयाच्या जमिनींसाठी चांगले दर देऊनही अद्याप काही शेतकरी जमिनच न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. जमिनीबरोबरच घरे, विहिरी, झाडे, पाइपलाइन, गोठे देखील या महामार्गात जाणार असल्याने त्याचाही मोबदला सरकारकडून दिला जाणार आहे. परंतु, नेमका मोबदला देता यावा यासाठी संपादन प्रक्रियेत जाणाऱ्या या सर्व बाबींचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. या मूल्यांकनाचे काम सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात सुरू करण्यात आले असले तरी ते अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन मूल्यांकन होणे आवश्यक असले तरी पावसामुळे या कामात अनेक अडथळे येत आहेत. इगतपुरीत तर सातत्याने पाऊस सुरू असल्याने मूल्यांकन करणारी यंत्रणा गावांमध्ये पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये अद्याप मूल्यांकनाच्या कामाला सुरुवातच होऊ शकलेली नाही.
समृद्धी महामार्गासाठी अपेक्षित खर्च मोठा असून हे काम मुदतीत सुरू करून मुदतीतच संपविण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासनापुढे आहे. कामाचा कालावधी वाढला तर त्याचा खर्चही वाढणार आह. त्यामुळे १ ऑक्टोबर २०१७ पासून जिल्ह्यात कामास प्रारंभ करण्याचा सरकार आणि प्रशासनाचा मानस आहे. परंतु, पावसाने मूल्यांकनाचे काम रखडल्याने प्रारंभालाही विलंब होण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. मूल्यांकनाचे काम केव्हापर्यंत पूर्ण करायचे याची निश्चित मुदत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पावसाने उघडीप दिल्याशिवाय मूल्यांकनाच्या कामाला गती मिळणार नाही. सिन्नर तालुक्यातील पाच गावांचा अजूनही या महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे या सर्व अडचणी दूर झाल्यानंतरच जमिनींचे संपादन आणि पुढील कार्यवाही होऊ शकणार आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता बळावल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
प्रत्येक सोमवारी आढावा
सिंहस्थ कुंभमेळा काळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक आठवड्याला ठराविक दिवशी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला जात होता. समृद्धी महामार्गाबाबतही तेच धोरण अवलंबिण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी कार्यवाहीचा आढावा घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कामकाजास गती मिळू शकणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट