मटा फोकस
संकलन ः कैलास येवला
--
सेवा-सुविधांअभावी मांगीतुंगीची गेली रया
--
दिगंबर जैन धर्मीयांचे दक्षिण भारतातील समेध शिखर म्हणून परिचित असलेल्या सिद्धक्षेत्र श्री मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीचा पंचकल्याण व महामस्तकाभिषेक सोहळा उलटून वर्षपूर्ती झाली आहे. मात्र, अजूनही परिसरासह मांगीतुंगीचा विकास खुंटल्याची स्थिती आहे. देश-विदेशांतून येणाऱ्या भाविकांना पुरेशा सुविधा देण्यासाठी संस्थानकडून विशेष लक्ष देण्यात येत असले, तरीही अपुऱ्या सेवा-सुविधांमुळे बाहेरून येणारे पर्यटक, भाविकांकडून नाराजीची भावना व्यक्त होताना दिसून येत आहे. सोहळ्यावेळी आलेली रया गेल्याची स्थिती येथे उद्भवली अाहे. येथील स्थितीवर टाकलेला फोकस...
--
तेरा वर्षांची मेहनत
बागलाण तालुक्यातील श्री सिद्धक्षेत्र मांगीतुंगी या दिगबंर जैन धर्मीयांच्या पवित्र धार्मिकस्थळी जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव महाराज यांची १०८ फुटी पूर्णाकृती मूर्ती आहे. जगभरात एकाच पाषाणात अखंड मूर्ती असलेले एकमेव ठिकाण म्हणून या तीर्थस्थानाची ओळख आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मांगी डोंगरावर १०८ फुटांची मूर्ती उभारण्यासाठी तब्बल तेरा वर्षे लागली. येथे भगवान महावीर यांचे मंदिर आहे. जैन धर्मात सिद्धक्षेत्राला अतिशय महत्त्व असते. या ठिकाणाहून असंख्य जैन मुनींनी आजवर तपश्चर्या करून मोक्षप्राप्ती केल्याने देशात मांगीतुंगी धार्मिकदृष्ट्या दुसऱ्या स्थानावर आहे. या ठिकाणी असलेल्या मांगी व तुंगी या दोन्ही डोंगरांवर हजारो वर्षांपूर्वीच्या भगवान महावीर यांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे देशभरातूनच नव्हे, तर देशाबाहेरूनदेखील मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
--
मंदिरे अन् मानस्तंभ
मांगीतुंगी पर्वतराजीच्या कुशीत अन् तुंगाडी नदीच्या किनारी भिलवाड हे आदिवासीबहुल गाव आहे. या गावातच श्री १००८ विश्वहितंकर सातीशय चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर, सहस्रकुट कमल, मानस्तंभ, मुनिसुव्रतनाथ, आदिनाथ आदी मंदिरे एकाच परिसरात विशाल पटांगणावर आहेत. भिलवाड गावात धर्मशाळेच्या पटांगणात मुख्य चार मंदिरे आहेत. पहिले जैन मंदिर भगवान पार्श्वनाथांचे आहे. या मंदिरातच विश्वहितंकर १००८ भगवान पार्श्वनाथांच्या काळ्या पाषाणातील अतिशय मूळ नायक मूर्तीसह इतर ७५ मूर्ती आहेत. दुसऱ्या मंदिरात भगवान आदिनाथ स्थापित आहेत. तिसरे मंदिर भगवान मुनी सुव्रतनाथांचे आहे. या मंदिरात ३१ फूट उंचीची भगवान सुव्रतनाथ यांची शनिग्रह निवारक मूर्ती आहे. भरत, बाहुबली, भगवान पद्सिद्ध, भगवान शांतिनाथ, तसेच इतर २४ तीर्थंकरांच्या खड्गासनातील मूर्ती येथे आहेत. १९९६ मध्ये सहस्रकुंट कमल मंदिर उभारले गेले. या मंदिरासमोरच १९५० मध्ये ४० फूट उंचीचा मानस्तंभ बांधलेला आहे. मात्र, अलीकडच्या काळाचा परिसराचा विकास खुंटल्याची स्थिती आहे.
--
ट्रस्टमधील कलहाचा फटका
भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माणापूर्वी येथील कारभार श्री मांगीतुंगीजी दिगबंर जैन सिद्धक्षेत्र कमिटी या एकाच ट्रस्टच्या माध्यमातून सुरू होता. मात्र, मूर्ती निर्माण करण्यासाठी नव्याने भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण कमिटीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीचे निर्माण होईपर्यंत अर्थात, १३ वर्षे सलोख्याने कारभार सुरू होता. मात्र, महामस्तकाभिषेक सोहळ्यापासूनच या दोन्ही ट्रस्टमध्ये अंतर्गत कलह, वादविवाद सुरू झाले. आर्थिक उत्पन्न वाढू लागल्याने साहजिकच दोन्ही ट्रस्टमध्ये हवेदावे सुरू झाल्याने परिसराचा विकास खुंटल्याचा आरोप पसिरातील ग्रामस्थ व भाविक करू लागले आहेत.
--
४० कोटी निधीनंतरही ओसाड
पवित्र तीर्थस्थानाच्या उत्सवाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी देऊन कायमस्वरूपी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरीही पंचकल्याण महामस्तकाभिषेक सोहळ्याप्रसंगी नटलेली ही नगरी आज मात्र ओसाड दिसू लागली आहे. मोकळ्या विस्तीर्ण पटांगणावर आता शेती, बागबगीचे दिसत असल्याने हीच ती नटलेली नगरी होती का, असा सवाल आज उपस्थित होत आहे.
--
प्रसादालयाची सुविधा
नवीन कमिटीने आपला स्वतंत्र कारभार राष्ट्रीय महामार्गापासून मांगीतुगी फाट्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील चार एकरच्या विस्तीर्ण जागेवरून सुरू केलेला आहे. या ठिकाणी येताच भाविकांना प्रवेशद्वारवरच नवग्रह शांती जिन मंदिराचे दर्शन होते. यामुळे अत्यंत प्रसन्न व मोहक वातावरण बघावयास मिळते. या ठिकाणी यात्री निवास, भक्त निवासाचे टोलेजंग काम सुरू केलेले आहे. ते पूर्णत्वास येईपर्यंत भाविक, यात्रेकरूंसाठी तात्पुरती पत्र्याची निवासस्थाने उभारलेली आहेत. शेकडो भाविक एकाच वेळी प्रसाद घेऊ शकतील, असे प्रसादालय या ठिकाणी उभारण्यात आले आहे. अवघ्या ५० रुपयांत पोटभर प्रसाद या ठिकाणी देण्यात येतो. त्यामुळे मूळ भिलवाड गावातील पूर्वीचे जैन मंदिर असलेल्या ट्रस्टवर साहजिकच याचा परिणाम झाला आहे.
--
वाहने बंद, लिफ्ट वापराविना
भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्तीपर्यंत जाण्यासाठी महास्तकाभिषेक समारंभापूर्वी थेट मूर्तीच्या पायथ्याजवळ जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा कच्चा रस्ता करण्यात आला होता. त्यामुळे बालगोपाळांसह अबालवृद्धदेखील कमिटीच्या वाहनांद्वारे तेथे जात होते. भाविक व पर्यटकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, महामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर वन विभागाने आपल्या हद्दीतील राखीव वन असल्याकारणाने सदरचा रस्ता बंद केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे थेट जाणारी वाहने बंद झाली आहेत. परिणामी मूर्तीसह मांगीतुंगीच्या डोंगरावर दर्शनासाठी जैन भाविकांना जाण्यासाठी पायरी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहने बंद करण्यामागील कारणाचा शोध घेतला असता दोन्ही ट्रस्टने भाविकांसाठी स्वतंत्र वाहनांची सोय उपलब्ध केली होती. मात्र, एका ट्रस्टने विरोध दर्शविल्याने वाहन सेवा बंद केल्याचे सांगण्यात येते. ट्रस्टकडून या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार देत वन विभागाकडे बोट केले जात आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने जास्त असताना तेथून कमिटीने तयार केलेल्या लिफ्टने दर्शनासाठी थेट नेण्यात येत होते. मात्र, सद्यस्थितीत वाहने जात नसल्याने येथील लिफ्टचा वापर करणेही दुरापास्त झाले आहे. परिणामी लिफ्ट असूनही तिचा उपयोग होताना दिसत नाही.
--
रोजगारसंधी अन् पाठपुरावा
मांगीतुंगीवर जाण्यासाठी तब्बल ४५०० पायऱ्या चढून वर जावे लागत असल्याने साहजिकच वेळेअभावी भाविक व पर्यटक कंटाळा करू लागले आहेत. यामुळे बहुतांश वयोवृद्ध भाविक डोलीचा वापर करून वर जात असतात. चार भाविक डोली तयार करून भाविकांना ऋषभदेवाच्या पायापर्यंत पोहोचवित आहेत. यामुळे स्थानिक आदिवासींना रोजगार मिळाला असला, तरीही कमिटीची वाहने सुरू असताना या डोली वाहकांनी बराच गोंधळ घातल्याने तेव्हाही कमिटीला नमते घ्यावे लागले होते. येथील महिलावर्गानेही परिसरातील फळविक्रीतून रोजगार शोधला आहे. सीझनप्रमाणे फळविक्रीतून त्या उदरनिर्वाह करीत असतात. या ठिकाणी रोजगाराला मोठा वाव असला, तरीही परिसराचा कायापालट झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास होणे शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामस्तकाभिषेक सोहळ्याप्रसंगी परिसर विकासासाठी तब्बल २५० कोटी रुपयांचा विकास कृती आराखडा घोषित केला आहे. परिसरात अनेक पर्यटनस्थळेदेखील आहेत. त्यात साल्हेर, मुल्हेर, श्री क्षेत्र अंतापूर, गुजारतमधील सापुतारा आदींचा समावेश आहे. त्यामुळे येथील पर्यटनाच्या दृष्टीने पाठपुरावा होणे गरजेचे आहे.
--
बससेवा, विजेचा अभाव
येथे भाविकांना येण्या-जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून बसेस उपलब्ध होत नसल्याचीही तक्रार आहे. ग्रामस्थांनासाठीही दोनच एसटी बसेस असून, दिवसभर खासगी वाहनानांनी ये-जा करावी लागत आहे. ताहाराबादसह दहा गावे वीज वितरण कंपनीने मांगीतुंगीसाठी जोडल्याने विजेचा गंभीर प्रश्न अनेक वेळा या ठिकाणी उपस्थित होत असतो. हा परिसर ग्रामीण भागात मोडत असल्याने भारनियमन कालावधीत १२-१२ तास वीज नसल्याने या ठिकाणी भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
--
मांगीतुंगी देवस्थानासाठी जैन बांधवाकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या देण्यात येत असून, त्यांचा उपयोग देवस्थान परिसर विकासासाठी करावयास पाहिजे. मात्र, हा निधी इतरत्र देवस्थान विकासासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. परिणामी महामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर अपेक्षित विकास खुंटला आहे.
-शिवाजी पवार, ग्रामस्थ, भिलवाड
--
येथील मूर्ती बघण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना थेट घेऊन जाणारी वाहनसेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे बहुतांश भाविकांना मनस्ताप होत आहे. यासाठी वन विभागाने तातडीने रस्ता पूर्ववत सुरू केल्यास भाविकांचा आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल.
-राजेंद्र जैन, भाविक, कर्नाटक
--
मांगीतुंगी परिसरात भाविक, पर्यटकांची वर्दळ आहे. त्यामुळे लहान-मोठे व्यवसाय तग धरून आहेत. मूर्ती निर्माणानंतर भाविकांचा राबता वाढेल व परिसरातील आदिवासी बांधवाच्या उदरनिर्वाहाला मोठा हातभार लागेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. विकास नसल्याने मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकलेली नाही.
-किरण जाधव, स्थानिक व्यावसायिक
--
येथील दोन्ही ट्रस्टमधील वाद विकोपाला गेलेला आहे. वाद मिटविण्यासाठी लवकरच ग्रामस्थांच्या वतीने पुढाकार घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. वाद मिटल्यास निश्चितपणे देवस्थान व परिसर विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारसंधीदेखील उपलब्ध होणार आहे.
-मुरलीधर पवार, सरपंच, भिलवाड
--
श्री मांगीतुंगीजी दिगबंर जैन सिद्धक्षेत्र कमिटीतर्फे पूर्वीचे भक्त निवास पाडण्यात आले आहेत. भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माणानंतर भाविकांचा राबता या परिसरात वाढल्याने यात्रेकरूंसाठी ६० भक्त निवास नव्याने बांधण्यात येत असून, ते अत्यंत सुसज्ज व अद्ययावत असणार आहेत.
-सूरजमल जैन, श्री मांगीतुंगीजी दिगबंर जैन सिद्धक्षेत्र कमिटी
--
भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण कमिटीतर्फे नव्याने चार एकर जागेत भव्य भक्त निवास, यात्री निवास उभारण्यात येत आहे. पार्किंगचे काम प्रगतिपथावर असून, या देवस्थान परिसरात भाविकांसाठी मिनी रिसॉर्ट निर्माण करण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे.
-विशालभाई जैन, व्यवस्थापक, भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण कमिटी
--
बागलाण मतदारसंघातील श्री सिद्धक्षेत्र मांगीतुंगी परिसरात तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन क्षेत्र विकास झाल्यास या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये निधी द्यावा याकरिता आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीपर्यंत वन विभागाने केलेल्या वाहनबंदीबाबत समन्वयातून मार्ग काढणार आहोत.
-दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट