November 16, 2017, 3:18 pm
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबक पालिका निवडणूक जवळ येताच शहरात पक्षांतराला वेग आला आहे. गुरुवारी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धनंजय तुंगार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही पक्षप्रवेश मुंबई येथे पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत झाले.
धनंजय तुंगार यांनी शिवेसनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. तर योगेश तुंगार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते पंजाचा तिरंगा हाती घेतला आहे. धनंजय तुंगार हे थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. सन २००७ आणि २०१२ य दोन पंचवार्षीकला ते अपक्ष नगरेसवक म्हणून निवडून आले होते. यापूर्वी ते काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. तथापि २०१५ मध्ये झालेल्या नगराध्यक्षांच्या निवडणूक पेचप्रसंगात ते भाजपमध्ये गेले होते. इगतपुरी नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक युवराज भोंडवे, नरेंद्र कुमरे, धनंजय पवार, नगरसेविका उज्वला जगदाळे, वसीम सय्यद, सीमा जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 16, 2017, 3:19 pm
म. टा. वृत्तसेवा, घोटी
इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बुधवारी सायंकाळी घोटी येथे जिल्हा संपर्कनेते तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी दिसून आली. अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केल्याने बैठकीतले वातावरण तापले होते. दरम्यान, मोठा पक्ष असल्याने या बाबी होत असल्या तरी आगामी
काळात कार्यकर्त्यानी व पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून पक्षकार्यालयात झोकून द्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
बैठकीच्या प्रारंभीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या स्पष्ट भावना व्यक्त केल्या. त्यावर पाटील यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मौलिक सूचना केल्या. यापुढे पक्षवाढीसाठी व संघटनात्मक वाढीसाठी सर्वांनी पुढे येऊन मोर्चे बांधणी करावी, तातडीने सभासद नोंदणी हाती घेऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. महिला कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी, तातडीने नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जि. प. सदस्य उदय जाधव, प्रभारी तालुकाध्यक्ष उमेश खातले, पांडुरंग वारुंगसे, सुनील वाजे, बाळासाहेब गाढवे यांनी आपल्या परखड भावना व्यक्त केल्या. नामदेव वाघचौरे, हिरामण खोंसकर, विष्णुपंत म्हैसधुणे, रामदास घारे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, नाशिक शहराध्यक्ष अर्जुन टिळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, नंदन भास्करे आदी उपस्थित होते.
इगतपुरी नगरपालिका प्रभारी निरीक्षक म्हणून अर्जुन टिळे व विष्णुपंत म्हैसधुणे यांची नियुक्ती करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 16, 2017, 3:26 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अर्धवट सोडलेली पूजा पूर्ण केली नाही तर तुझे वडील मरतील, पूजा करावीच लागेल; अन्यथा मंत्राच्या शक्तीने तुला व तुझ्या वडीलांना ठार मारेल, अशी भीती घालून १८ वर्षाच्या मुलीकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याच्या घरी सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने झाडाझडती घेतली. त्यात, पोलिसांनी पूजेसाठी वापरली जाणारे वेगवेगळी साधनसामग्री जप्त केली.
उद्यराज रामआश्रम पांडे (४९, रा. वांगणी, अंबरनाथ, जि. ठाणे) या भोंदुबाबास मंगळवारी (दि. १४) सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. पांडेला कोर्टाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील एका १८ वर्षीय मुलीने ओळखीच्याच घरात तब्बल १४ लाख रुपये आणि १५ तोळे सोने चोरी केल्याची घटना उघड झाल्यानंतर बाबाचे भिंग फुटले. ठाणे येथे राहणारा बाबा काही भक्तांच्या ओळखीमुळे पीडित कुटुंबियाच्या ओळखीचा झाला होता. याचा फायदा घेत बाबाने गृहकलह मिटवण्यासाठी एका मोठ्या पूजेचे सोंग उभे केले. या पूजेदरम्यान दिवा विझल्याचे नाटक करीत १८ वर्षीय मुलीला धमकी देत संशयित पांडेने पैसे उकळण्यास सुरुवात केली. हा घटनाक्रम लक्षात येताच सरकारवाडा पोलिसांनी बाबाच्या मुसक्या आवळल्या. बाबाला बुधवारी (दि. १५) घेऊन पोलिसांचे पथक ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे पोहचले. तेथे पूजेसाठी लागणारे काळे कपडे, काळेतीळ यासारखे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. विशेष म्हणजे यावेळी अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्यकर्ते पोलिसांच्या सोबत होते. त्यातील दोघांनी पंच म्हणून काम पाहिले.
अश्लिल फोटोचा तपास
संबंधित भोंदू बाबा विवाहित असून, पोलिसांनी झडती घेतली त्यावेळी त्याची पत्नी, चार मुलगे व एक मुलगी हजर होती. बाबाचा ठाणे येथे एक फ्लॅट असून, त्याचीही माहिती घेतली जाते आहे. दरम्यान, बाबाच्या मोबाइलमध्ये १५ ते २० युवती व महिलांचे अश्लिल फोटोग्राफ्स सापडले होते. पोलिस त्याचाही बारकाईने तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 16, 2017, 3:29 pm
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
तडीपार असल्याने केरळ येथे रहात असलेल्या समीर उर्फ सोनू निजामुद्दीन शेख याने १५ हजार रुपये दिले नसल्याचा राग धरत थेट पित्यालाच ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश न आल्याने नंतर त्याने स्वतःच्याच हातावर ब्लेडने वार करून घेतले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत मुलगा व वडील यांच्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वडाळा गावातील जय मल्हार कॉलनीत निजामुद्दीन कासमअली शेख हे कुटूंब राहते. त्यांचा मुलगा समीर उर्फ सोनू निजामुद्दीन शेख याला काही दिवसांपूर्वी परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी तडीपार केले. तेव्हापासून तो केरळ येथे राहत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी समीर आपल्या घरी आला. त्याने रात्री वडिलांकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, वडिलांनी पैसे नसल्याचे सांगत त्यास नकार दिला. समीरने वडिलांसह आई जुबेदा व बहीण साजिया यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आईवडिलांनी विरोध केल्यावर त्याने गळा दाबून पित्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी साजियाने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनेची पोलिसांना तातडीने माहिती दिली. त्याचवेळी समीरने घरातील ब्लेडच्या सहाय्याने स्वत:च्या हातावर वार करून घेत तुम्हीच मला मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत करणार असल्याची धमकी दिली. इंदिरानगर पोलिसांनी पित्यासह समीर यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी समीर याच्याविरुद्ध वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच समीरनेही पित्याविरोधात इंदिरानगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. तू तडीपार आहे, व्यवस्थित रहा असे सांगून कुरापत काढत निजामउ्द्दीन यांनी कोयत्याने वार केल्याचा आरोप समीरने केला आहे. यामुळे इंदिरानगर पोलिस ठाण्यात पितापुत्राविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न
शहर पोलिसांकडून विविध ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जात होती. यापूर्वी, तडीपारीचे प्रमाण अधिक होते. सध्या पोलीसांकडून तडीपारीची प्रक्रिया राबविली जात नाही. तरी यापूर्वी तडीपार केलेले अनेक गुन्हेगार शहरात सर्रासपणे फिरत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. या प्रकाराने तडीपारांचा शहरात मुक्त वावर आल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 16, 2017, 3:34 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलिस उपनिरीक्षकांसह एक सहायक पोलिस उपनिरीक्षक, हवालदार आणि एका महिला पोलिस शिपायास जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी गुरूवारी निलंबित केले. यात, मालेगाव तालुका, मालेगाव कॅम्प आणि नांदगाव पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिस उपनिरीक्षक संतोष प्रभाकर तिगोटे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपट भिका पाटील, यमुना रामदास बर्डे (सर्व नेमणूक, मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशन), हवालदार कैलास यशवंत जगताप (तत्कालीन नेमणूक मालेगाव तालुका पो. स्टे.) आणि पोलिस उपनिरीक्षक बी. यू. पद्मणे (नेमणूक नांदगाव पो. स्टे.) अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
घरफोडीच्या घटनेकडे दुर्लक्ष
मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत गायत्रीनगर येथील मेहता रेसीडन्सीतील फ्लॅट क्रमांक आठमध्ये १४ नोव्हेंबरच्या पहाटे पाऊणेतीन ते तीन वाजेच्या सुमारास घरफोडी झाली. चोरट्यांनी तब्बल चार लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. तीन चोरटे इमारतीत घुसून घरफोडीचा प्रयत्न करीत असल्याची बाब एका सजग नागरिकाने पाहून लागलीच पोलिस स्टेशनला माहिती कळवली. मात्र, सुरुवातीस फोनच रिसिव्ह करण्यात आला नाही. थोड्या वेळाने ठाणे अमलदाराने फोन घेऊन एक पथक घटनास्थळी रवाना केले. पीएसआय तिगोटे, एएसआय पोपट पाटील आणि शिपाई बर्डे हे घटनास्थळी पोहचण्यापूर्वी चोरटे पायी निघून गेले. घरफोडीचा एवढा प्रकार घडूनही कर्तव्यावरील पोलिसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली नाही. नाकाबंदी लावण्यासाठी प्रयत्न केला नाही. घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना संबंधित पोलिसांनी कर्तव्यात कसूर केला. या पार्श्वभूमीवर अपर पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर केला. तिघांवर निलंबनाची कारवाई करीत तिगोटेंची बदली नियंत्रण कक्षात तर दोघांची बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली.
गुन्हे तपासात दिरंगाई
नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पीएसआय बी. यू. पद्मणे यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली आहे. पद्मणे यांच्याकडे २०१५ पासून २०१७ या दोन वर्षाच्या कालावधीत भाग एक ते पाच २७, भाग सहाचा एक, नशाबंदीचे दोन आणि आकस्मात मृत्युच्या पाच गुन्ह्यांचा तपास सोपवण्यात आला. मात्र, या प्रलंबित प्रकरणांपैकी फक्त १५ गुन्ह्यांची माहिती त्यांनी वरिष्ठांना सादर केली. उर्वरित गुन्ह्यांच्या तपासाबाबत वेळोवेळी माहिती विचारूनही सादर होत नसल्याने प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम झाला. ही बाब गंभीर असल्याने अखेर पद्मणे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
हवालदार झाला फितूर
पोलिस खात्यात कार्यरत असताना खटल्यावर परिणाम होईल अशा पद्धतीने कोर्टात साक्ष फिरवल्याने मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत तत्कालीन हवालदार कैलास जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. कलम ३२८, ४२० अन्वये दाखल गुन्ह्याची मालेगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. २०११ मधील या खटल्याच्या सुनावणीत जगताप महत्त्वाचे साक्षीदार होते. मात्र, १७ डिसेंबर २०१६ रोजी साक्षी पुरावा नोंदवत असताना जगताप यांनी साक्ष फिरवली. त्यामुळे त्यांना फितूर घोषित करण्यात आले. खटल्यावरच परिणाम होण्याची शक्यता असल्याने खात्यातंर्गत चौकशी करण्यात आली. या अहवालानुसार जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करण्यात आली. मालेगाव शहरात घरफोडीचे प्रकार वाढत असताना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी सजगता दाखवयला हवी होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा परिणाम नागरिकांसह पोलिसांवर होतो. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची होती.
- संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 17, 2017, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मंत्रालयापाठोपाठ जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या सरकारी कार्यालयांमध्ये आजपासूनच प्लास्टिक बाटल्या हटावची मोहीम राबविणे आवश्यक होते. मात्र, अशा बाटल्यांचाच सर्रासपणे वापर सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
राज्य सरकारने मंत्रालयात प्लास्टिक बाटल्यांना बंदी घातली असून, त्याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. सरकारने प्लास्टिकविरोधात अनेकदा मोहीम उघडली. मात्र, ठोस कार्यवाहीअभावी ही मोहीम बासनात गुंडाळली गेली. पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकबंदी आवश्यक असून, त्यासाठी आता सरकारनेच आश्वासक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयामध्येच सर्वप्रथम पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सला बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, सरकारी बाबूंचे घोडे सरकारी आदेशापुढे अडून बसले आहे. त्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी करणाऱ्या आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोहिमा राबविणाऱ्या जिल्हा प्रशासनाला आजपासूनच कार्यालयांना प्लास्टिक बॉटलमुक्त करण्यासाठी पुढाकार घेता आला असता. मात्र, तसे होऊ शकले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्रासपणे प्लास्टिक बॉटल्सचा वापर होत असल्याचे दिसून आले. प्लास्टिक बॉटल्सना लगेचच उपलब्ध होऊ शकेल असा पर्याय कोणता, हा सवाल अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे.
संपूर्ण जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी असो की अभ्यांगत सर्वांनाच पाणी पाजण्यासाठी सर्रास प्लास्टिक बॉटल्सचा वापर केला जातो. कार्यालयाच्या आवारातील नियोजन हॉल असो किंवा मध्यवर्ती सभागृह येथे विविध समित्यांच्या समन्वयाच्या बैठकी होत असतात. अशा प्रत्येक वेळी उपस्थितांना पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सचे वाटप केले जाते. कार्यालयामध्ये काही ना काही कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी प्लास्टिक बॉटल्स भरून ठेवलेल्या असतात. सरकारच्या आदेशामुळे या पाणी बॉटल्सचा वापर बंद करावा लागणार असला तरी पाणीवाटपासाठी कसला वापर केला जाणार, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. सरकारने गुटखाबंदी केल्यानंतरही वेगवेगळ्या मार्गांनी गुटखा ग्राहकांपर्यंत पोहोचतोच आहे. पाणी बॉटल्सला बंदी केली तरी त्याचा वापर खरोखरच थांबणार का, याची उत्सुकता त्यामुळे निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह कोर्ट परिसर, अन्य कार्यालयांमध्येही प्लास्टिक बॉटल्सद्वारेच अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांची तृष्णातृप्ती केली जात होती. मंत्रालयात प्लास्टिक बॉटल्सबंदीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी अन्य सरकारी कार्यालयांमध्ये ती केव्हा होणार याची प्रतीक्षा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पाणीचोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने दंडात्मक शुल्काद्वारे अनधिकृत नळजोडण्या नियमित करण्यासाठी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी अभय योजनेला मुदतवाढीनंतरही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
मुदतवाढीनंतरही शहरातून जेमतेम ७४६ अनधिकृत नळजोडणीधारकांनी या योजनेसाठी आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत. या योजनेच्या लाभासाठी दिलेल्या मुदतवाढीचा कालावधी येत्या २२ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळ कनेक्शन उघडकीस येण्याची प्रशासनाची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे.
पाणीचोरीचे प्रमाण रोखण्यासाठी तेलंगणामधील अब्दुल करीमनगरच्या धर्तीवर महापौर रंजना भानसी यांनी नाशिकमध्ये अनधिकृत नळजोडणीधारकांसाठी अभय योजना सुरू केली होती. प्रशासनाने ७ सप्टेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. या योजनेंतर्गत अनधिकृत नळजोडणीधारकांनी ७ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत महापालिकेकडे अर्ज करून विहित दंडात्मक शुल्काद्वारे नळजोडणी अधिकृत घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या योजनेंतर्गत निवासी वापराच्या अर्धा इंची नळजोडणीसाठी पाचशे रुपये दंडात्मक शुल्क आकारण्यात आले. या माध्यमातून सुमारे १० ते १५ हजार अनधिकृत नळजोडण्या नियमित करून होणारी पाणीचोरी रोखता येईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. मात्र, विहित कालावधीत अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी अवघे ४९४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे या योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, ही मुदत संपुष्टात येण्यासाठी जेमतेम पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अनधिकृत नळजोडणी नियमित करणाऱ्यांची संख्या जेमतेम ७४६ वर पोहोचू शकली आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी योजनेतील सहभागी मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोडणीधारकांची संख्या जेमतेम हजाराच्या आसपास पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेच्या आशेवरच पाणी फिरणार आहे.
---
५ ते ५० हजारांपर्यंत दंड
अभय योजनेची मुदत संपल्यानंतर शहरात अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम राबविली जाणार आहे. त्यात बेकायदा जोडणी आढळल्यास घरगुती नळजोडणीधारकांना पाच ते २५ हजार रुपये व बिगर घरगुती नळजोडणीसाठी दहा ते ५० हजार रुपये शुल्क व दंड आकारला जाणार आहे. रक्कम वसुलीसाठी अनधिकृत जोडणीधारकाच्या घरपट्टीवर बोजा चढविला जाणार आहे. नळजोडणीधारक व प्लंबरविरोधात पाणीचोरीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
--
सातपूरला धडक वसुली मोहीम
सातपूर : ज्या ग्राहकांनी वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही अशांकडून महापालिकेने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. घरपट्टी भरलेली नसेल, तर घरातील वस्तू जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पाणीपट्टी थकविली असल्यास तात्काळ नळ कनेक्शनच बंद करण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी सांगितले. महापालिकेच्या या धडक वसुली मोहिमेत ज्यांनी पाणीपट्टी अधिक थकविली असेल त्यांचे नळ कनेक्शन तात्काळ बंद करण्यात येत आहे. सातपूर विभागातील घरपट्टी, पाणीपट्टी व विविध कर भरणाऱ्या करदात्यांनी महापालिकेची थकीत बिले तात्काळ अदा करावीत अन्यथा धडक कारवाईला समोरे जावे लागेल, असे विभागीय अधिकारी गायकवाड यांनी कळविले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 2:32 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा व डुकरांनी थैमान घातले असून, या मोकाट कुत्र्यांनी गेल्या दोन दिवसांत शहरातील १५ जणांना चाव घेतला आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असून पालिकेकडून याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
शहरात गुरुवारी शाळेतून घरी परतत असताना चार तर घराच्या अंगणात खेळत असताना एका मुलीस मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली. तसेच शहरातील वेगवेगळ्या भागातील अकरा लोकांना देखील चावा घेतल्याचे समोर आले आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते व वसाहतीमध्ये मोकाट कुत्र्यांचे टोळके सर्रास फिरताना दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. कुत्रे आणि डुकरांचे मोकाट झुंड शहरात फिरत असतात. शहरातील प्रमुख रस्त्यांवर बहुतांशीवेळा सकाळी व सायंकाळी मोकाट कुत्र्यांचे झुंड फिरत असतात. याच वेळी रस्त्यांवर शाळेत जे जा करणाऱ्या विद्यार्थांची मोठी गर्दी असते.
पशुवैद्यकीय अधिकारीच नाही
शहरात रोजच मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याचा घटना घडत असून पालिका प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही उपाय योजना केल्या केल्या नाहीत. पालिकेकडून कुत्री पकडण्यासाठी स्वतंत्र वाहन व पथक तयार करण्यात आलेले असले तरी कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिकेला यश आलेले नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 2:33 pm
म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसंवत
कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या मुख्य कार्यलयाकडे जाणाऱ्या जोपुळरोडची अत्यंत वार्इट अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळमुळे जोपुळरोड, चिचंखेडरोड परिसरातील नागरिकांचे आणि शेतीचेही आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील नागरिक व शेतीच्या आरोग्याचा विचार करून तातडीने जोपुळरोडचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.
पिंपळगाव बाजार समीतीत सध्या टोमॅटोचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे जिल्हाभरातून येणाऱ्या हजारो वाहनांची जोपुळ रस्त्यावर दिवसभर ये-जा सुरू असते. टोमॅटोच्या वाहनांबरोबर दररोज परप्रांतात टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या शेकडो अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. मात्र हा रस्ता पूर्ण उखडला आहे. त्यामुळे धुळ, माती सतत उडत असते. या खड्ड्यांमध्ये टाकलेल्या मुरूममुळे अवघा रस्ता धुळीने व्यापला आहे.
रस्त्या लगतच्या द्राक्षबागा, डाळिंब, वांगी, शेवगा, भाजीपाला आदी पकिांवर याचा विपरित परिणाम होत आहे. दररोजच्या त्रासामुळे या भागातील शेतकरी, नागरिक वैतागले आहेत. पिंपळगाव बाजार समतिीने संपूर्ण जोपुळ रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, चिंचखेड चौफुलीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.
या धुळीमुळे रस्त्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. या धुळीमुळे माझी शेवगा बाग, वांगी, द्राक्षाची रोपे नुकसानग्रस्त झाली आहेत. तर द्राक्षबांगांचा दर्जाही धुळीमुळे घसरला आहे.
- शामराव विधाते, शेतकरी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 17, 2017, 2:34 pm
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होत असला तरीही बागलाण तालुक्यात आतापर्यंत केवळ दहा शेतकऱ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही १२ हजार ३४० लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्यभर मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. यासाठी कर्जघेतलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन माहिती भरून देण्यासाठी सोसायटी, तहसील आदी ठिकाणी उंबरठे झिजवावे लागले. आज ना उद्या कर्जमाफी मिळेल या भाबड्या आशेवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन माहिती भरणे, आपल्याकडील असलेल्या कर्जाची परतफेड करणे आदी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. यामुळे आपल्या नावाची कर्जमाफी आज होईल उद्या होईल या आशेवर त्यांनी सोसायटी, जिल्हा बँका तसेच तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात खेटे मारणे सुरू केले.
या योजनेची कर्जमाफी पात्र लाभार्थी यादी तयार करून संबंधित यादीची लेखापरिक्षण ५ विभागातून एम. के. घुगे, आर. डी. पाटील, आर. वाय. जाधव, आर. एम. गांगुर्डे, के. ए. कापडे यांच्या मार्फत करून घेतली. यानुसार तालुक्यातील १५ शाखा, १०१ संस्था, एकूण लाभार्थी संख्या १२३५०, शाखा संस्था १२३५० यांच्याद्वारे पूर्ण छाननी केली.
सभासद डबल अकॉऊंट करण्यात आल्याने त्यातून ३१ सभासद कमी करण्यात झाले. तसेच १२३८१ वरून १२३५० अंतिम लाभार्थी यादी राज्य शासनाला सादर करण्यात आली आहे. सदरच्या यादीबाबत अजुनही विविध तांत्रिक मुद्याची चौकशी व छाननी सुरू असुन आजपावेतो या यादीमधील अवध्या १० लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असल्याने उर्वरित लाभार्थी वर्गास लाभ मिळावा यासाठी तातडीने गती देण्याची मागणी शेतकरी बांधवाकडून करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 2:49 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात राज्यभरात तीव्र असंतोष असल्याने जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. दादा भुसे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
बैठकीप्रसंगी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळात राजेंद्र दिघे, भरत शेलार, संजय शेवाळे, किशोर सोनजे, अनिल जगताप आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. चर्चेत प्रामुख्याने वरीष्ठ व निवड श्रेणी बाबतीत लावलेल्या जाचक अटीमुळे सदर निर्णय रद्द करण्यात यावा, सर्वसाधारण बदल्यांच्या २७ फेब्रुवारीच्या शासननिर्णयात असलेल्या त्रुटी दुरुस्ती करण्यात याव्यात, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी यासह संगणक परीक्षेसाठी मार्चपर्यंत मुदतवाढ मिळावी या मागण्या करण्यात आल्या. भुसे यांनी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.बैठकीस कैलास पगार, नामदेव बच्छाव, मिलिंद भामरे, गिरीश सूर्यवंशी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 2:54 pm
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
त्र्यंबकरोडवरील मायको सर्कलजवळ गुरुवारी रात्री (दि. १६) असलेल्या धामणकर कार्नरजवळ दुभाजकाला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चालक तरुणाचा मृत्यू झाला. सागर घाटोळ (२५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सागरच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले आहे. आता मुलाचाही अपघाती मृत्यू झाल्याने जन्मदेत्या आईने कुणाकडे पाहून जगायचे असा भावनिक सवाल सागरच्या कुटुंबीयांनी केला आहे. सातपूर गावातील काही तरुणांनी जेवणासाठी शहरातील एका हॉटेलात जाण्याच हट्ट धरला. मात्र हॉटेलात जाणे या तरुणांसोबत असलेल्या सागरच्या जिवावर बेतले. जेवणासाठी जात असतांना मायको सर्कलच्या पुढे असलेल्या धामणकर कार्नरजवळ दुचाकी स्लिप झाली. दुभाजकाला गाडी धडकल्याने सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने सागरचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 2:57 pm
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वीज कंपनीकडून भरमसाठ विजेची बिले येत आहेत. तसेच महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव येथे वीज कंपनीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वीज नसताना बिले कशी पाठवली जातात असा सवाल करत शिवसेनेने वीज प्रश्नी रस्त्यावर उतरून असंतोषाला वाट करून दिली. या आंदोलनामुळे नांदगाव-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
शिवसेनेतर्फे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढविण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली शेतकऱ्यांना थकीत रकमेचे हफ्ते करून देण्याची मागणी करण्यात आली. रोहित्र बंद असल्याने पिके जळाली त्यामुळे आधीच हवालदिल शेतकऱ्यांना वीज बिले आकारून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप कांदे यांनी केला. आंदोलनात ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, राजाभाऊ जगताप, मयूर बोरसे व शिवसैनिक उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 17, 2017, 2:57 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गरीबीचे चटके सहन करून झोपडपट्टीतील जीवन तसेच सामाजिक व्यवस्थेला धडक देणाऱ्या पाच महिला व एक पुरूष यांची संवेदनात्मक कथा म्हणजेच ‘तितिक्षा’. सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत डॉ. समीर मोने लिखित ‘तितिक्षा’ हे नाटक सादर करण्यात आले.
तितिक्षा म्हणजे भल्या-बुऱ्याचा विचार न करता सहन करण्याची ताकद. ही सहनशीलता महिलांच्या अंगी उपजत असते. या व्यवस्थेने तशी सोयच करून ठेवलेली आहे. नवरा नावाचे रसायन आणि त्याच्यावरील अपार प्रेमासाठी वाट्टेल तो त्रास सहन करण्याची किमया महिलांमध्येच असते. एका पत्र्याच्या झोपडीत राहणाऱ्या सहा जणांभोवती या नाटकाची कथा फिरते. घराची मालकीण शांताबाय बब्बनला तिच्या जाळ्यात ओढते. त्याच्याबरोबर विविध कौटुंबिक वातावरणातील महिला या पत्र्याच्या घरात निवाऱ्याला येतात. त्यांच्या व्यथा, हाल, अपेष्टा आणि त्यांच्यावर अंकुश ठेऊन असलेली शांताबाय हे एक अडाणी पण करारी व्यक्तिमत्त्व. खिसे पाकिट मारणारी पम्मी, वेश्या व्यवसाय करणारी मालन हे अगोदरच पत्र्याच्या घरात राहतात. तेथे अनुराधा येते, तिच्या नवऱ्याला एड्स झालेला असतो. त्यामुळे ती घराबाहेर निघते. आंधळी, वेडी बब्बनची बहीण किरण बाळंतीण झाल्यावर तिला नवऱ्याने टाकून दिलेले असते आणि या सर्व पोरींच्या परिस्थितीचा फायदा शांताबाय घेते. पम्मीला पिकपॉकेटिंगला लावणारी शांताबाय बब्बनला तिचा नवरा म्हणूनच वापरते. नवऱ्याला सुधार केंद्रात टाकलेले असल्याने त्याला पैसे द्यायला लागतात. म्हणून मालन वेश्या व्यवसाय करते. लग्नाआधी एड्स असलेला नवरा पदरात पडलेली अनुराधा आणि बहिणीला बरे करण्यासाठी शांताबायची गुलामी करणारा बब्बन अशा पात्रांभोवती कथानक फिरते; मात्र मध्येच शांताबायचा नवरा परत येतो, ती बब्बनला त्याचा खून करायला लावते; मात्र त्याची बहीण घरातून निघून गेली म्हणून बब्बन तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. अशा आशयाची तितिक्षा नाटकाची कथा होती.
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले. निर्मिती प्रमुख राजू नाईक, भिमराव कोते तर दिग्दर्शन रविकांत शार्दुल यांचे होते. लेखन डॉ. समीर नारायण मोने यांचे हाते. नेपथ्य व संगीत विनय कटारे, निषाद जोशी यांचे तर रंगभूषा माणिक कानडे, प्रकाशयोजना विनोद राठोड, वेशभूषा भावना कुलकर्णी यांची होती. रंगमंच व्यवस्था विलास नलावडे, अभिजित शार्दुल, आबासाहेब थोरात, प्रसाद जोशी तर विशेष सहकार्य मायको एम्प्लॉईज फोरमचे होते. नाटकात दीपक चव्हाण, शब्दजा वेलदोडे, प्रज्ञा गोपाळे, भावना कुलकर्णी, पूजा सोनार, स्वप्ना शार्दुल यांनी भूमिका केल्या.
आजचे नाटक : ये मामला गडबड है
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह
वेळ : सायंकाळी ७ वाजता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 3:00 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हल्ली कामाकडे पाहण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन अतिशय सहज, कॅज्युअल होत चालला आहे. प्रत्येक कलाकाराने अभ्यासपूर्ण असायला हवे व अभ्यासपूर्णच कलेची मांडणी केली पाहिजे. कलाकृतीच्या दर्जाची काळजी घ्यायला हवी, अशी भूमिका अभिनेता सचिन खेडेकर यांनी मांडली.
शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी खेडेकर बोलत होते. कोणत्याही क्षेत्रात शिस्तीचे महत्त्व मोठे आहे. विनय आपटे, शाम बेनेकर या व्यक्ती माझ्या गुरू आहेत. त्यांच्यामुळे नाटकामध्ये काम करताना त्यातील बारकावे, मांडणी अभ्यासता आली. आपटे यांच्यामुळे नाटकाबाबत लागलेली शिस्त आयुष्यभर कामी आली. शिक्षकही विद्यार्थ्याला अशीच शिस्त लावतो जी त्याला आयुष्यभर पुरते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौतुकाने प्रोत्साहन द्या; परंतु त्यांचे चुकल्यास त्यांना ती चूकदेखील प्रेमाने दाखवून द्या, असे खेडेकर यांनी शिक्षकांना उद्देशून सांगितले.
हेमंत मराठे व मिलिंद चिंधडे यांनी मुलाखत स्वरुपात खेडेकर यांच्याशी संवाद साधला. शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कार्य केलेल्या शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. मधुवती देशपांडे आणि स्वाती मराठे यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे दिलीपसिंग बेनिवाल यांनी प्रास्ताविक केले. राधेय येवले यांनी आभार मानले.
यांचा झाला सन्मान
शिक्षण क्षेत्रातील तुषार उगले, नीता ताकतराव, राजेंद्र भावसार, रामनाथ जाधव, देवेंद्र सोनार, गोपाल बैरागी, रामदास तळपे, भूपेंद्र शुक्ल, नरेंद्र पाटील, हेमलता भामरे, शैलजा भागवत, मकरंद देव, कला क्षेत्रातील नितिन पवार, मकरंद हिंगणे, सुमुखी अथनी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासणी यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 3:00 pm
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जासोबत जोडावयाचे दाखले आणि आवश्यक माहिती याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतेही मागर्दशन मिळत नसल्याने उमेदवारांचा घोळ होत असला तरी या हंगामाचा फायदा घेण्यासाठी खासगी मागर्दशन केंद्र पुढे सरसावले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या केंद्राच्या सहाय्याने डिजिटल आणि स्मार्ट प्रचारावर भर दिला आहे.
पालिका कार्यालयासमोरच असे केंद्र कार्यान्वति झाले असून, उमेदवाच्या अर्ज भरण्यापासून ते खर्चाचा तपशील दाखल करण्यापर्यंत सर्व जबाबदारी ठरावकि रक्कम आकारून घेतली जात आहे. संगणकीय क्रांतीचा खऱ्या अर्थाने या निवडणुकीत वापर होत असून, हायटेक प्रचारावर भर दिला जात आहे. त्र्यंबक पालिकेत अद्यापही आवश्यक नसलेली शिफारस पत्र देऊन नाहक गोंधळ निर्माण होईल असे प्रकार घडत आहेत.
यादी, मोबाइल मेसेजवर भर
उमेदवारी करणारे अद्याक्षरांच्या क्रमवारीने मतदार यादी तयार करून घेत आहेत. अशी यादी प्रिंट करून देण्याच्या व्यवसायास बरकत आली आहे. अडनावाप्रमाणे, जातीप्रमाणे विभागणी करून मतदारांची वाटणी करण्यात येत आहे. यादीच्या सोबतच मोबाइल मेसज तयार करून तो पाठविणे यावर देखील भर दिला जात आहे.
खर्चाची मर्यादा वाढणार?
नगरसेवकांसाठी दीड लाख आणि नगराध्यक्षांसाठी पाच लाख अशी खर्च मर्यादा आहे. निवडणूक कालावधीत अप्रत्यक्ष खर्च किती होतो, याला काही मर्यादा नसते. डिजटिल प्रचार आणि फोरकलर पत्रकांचा पाऊस यावर होणारा खर्च खूप मोठा असेल असे दिसते.
सर्व राजकीय पक्षांच्या मुलाखती होत आहेत. यामध्ये इलेक्टीव मेरिट म्हणून आर्थिक निकष महत्त्वाचे असल्याचे चर्चेतून लक्षात येते. त्र्यंबकची निवडणूक आर्थिक उलाढालींची मानली जाते. एका प्रमुख पक्षाच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीची शहरात चर्चा होत आहे. काही इच्छुक उमेदवार थेट लाखात बोलतात आणि मुलाखतीत खर्च किती करणार याचे उत्तर देतांना तीस पस्तीस लाख करू शकतो असे बेधडक सांगतात, अशीही चर्चा आहे. उद्या, शनिवारी आणि रविवारी अर्ज दाखल करण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळणार नाही. मात्र सोमवारी शहरातील बहुसंख्य उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.
उमेदवारी याद्यांबाबत ‘आस्तेकदम’
शहकाटशहाच्या राजकारणाने पक्ष उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. शहरातील सर्व जागांसाठी भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. भाजपच्या उमेदवार जाहीर होण्यावर बहुतेकांचे अंदाज आराखडे अवलंबून असल्याचे लोकचर्चेतून जाणवत आहे. काँग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषति करून एक पत्ता उघड केला आहे. आणि त्याचा परिणाम भाजपच्या उमेदवारीवर निश्चतिच झाला आहे. थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी करतांना विजयासाठी प्रत्येक पक्षाला प्रभागातील सर्व समकिरणांचा ताळेबंद मांडावा लागणार आहे.
काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी सुनील अडसरे यांची उमेदवारी जाहीर केली आणि जातीपातीच्या समकिरणांची नवी मांडणी करण्याची वेळ इतर पक्षावर येवून ठेपली आहे. भाजपकडे विजयाची उमेदवारी म्हणून पाहिले जाते. तथापि इच्छुकांची संख्या पाहता नाकारलेल्यांची नाराजी घातक ठरणार आहे. बहुतेकांनी एकाच वेळेस दोनपेक्षा अधिक पक्षांकडे उमेदवारीची मागणी केल्याचे निदर्शनास येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 3:02 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
समृद्धी महामार्गाला विरोध करण्यात अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील संघर्ष समितीच्या एका नेत्यानेच या प्रकल्पासाठी जमिन दिल्याने या आंदोलनात फूट पडली आहे. त्यामुळे या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाचा मात्र उत्साह दुणावला आहे. कचरू पाटील-डुकरे यांनी जमीन सरकारच्या घशात घालून आंदोलनाशी गद्दारी केल्याचा आरोप एकीकडे होत असताना आता समृद्धीच्या जमीन संपादन प्रक्रियेला अधिक गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होऊ लागला आहे.
समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मावळावा आणि शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी द्याव्यात यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची मनधरणी सुरू आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत आहे. इगतपुरी तालुक्यात या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविणारे आणि तालुक्यातील विरोधक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे कचरू पाटील-डुकरे यांनी त्यांची जमीन या प्रकल्पासाठी दिली आहे. प्रशासनाने या जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया गुरूवारी (दि. १६) पूर्ण केली. प्रमुख विरोधकाचेच मनपरिवर्तन करण्यात प्रशासनाला यश आल्याने अधिकाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. मोठा मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत अनेक शेतकरी जमिनी देण्यास तयार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जाऊ लागला आहे.
लढण्याचा समितीचा निर्धार
पाटील-डुकरे यांनी जमीन दिल्याने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद व्हॉट्स-अॅप सारख्या सोशल मीडियामधूनही उमटू लागले आहेत. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार समृद्धीबाधितांच्या संघर्ष समितीने केला आहे.
व्हॉट्स-अॅपवर टीकेचा भडीमार
समृद्धीबाधितांचे अनेक व्हॉट्स-अॅप ग्रुप असून या माध्यमातूनही शेतकरी संघटीत झाल्याचे पहावयास मिळते आहे. यापैकी काही ग्रुपवर प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रखरपणे टीका होऊ लागली आहे. त्यामध्ये शिवराळ भाषेचाही वापर होत असून त्यामुळे शाद्बिक वादाचे प्रसंगही उदभवू लागले आहेत.
जमिनीच्या बदल्यात जमीनखरेदी
जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना मिळतो आहे त्यातून गावापासून काही अंतरावरच जमीन खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. जमिनी दिल्याच्या मोबदल्यात जे पैसे मिळतात त्यातून संबंधित शेतकऱ्याने शेतजमीनच खरेदी करावी असा सरकार आणि प्रशासनाचाही आग्रह आहे. शेतकरीही जमिनी खरेदीस पसंती देत असून गावापासून काही अंतरावर तुलनेने माफक किमतीत अधिक जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे.
समृद्धीसाठी जमीन देणारा मी पहिला शेतकरी नाही. अनेकांनी जमिनी दिल्या आहेत. समृद्धी महामार्गाला विरोध करताना आम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. परंतु, त्यातून काही मार्ग निघेल, असे शेतकऱ्यांना वाटत नव्हते. म्हणूनच शेतकरी जमिनी देऊ लागले. ज्यांचे प्रतिनिधित्व करायचे ते शेतकरीच सोबत नाहीत याची जाणीव होऊ लागली. त्यामुळे प्रकल्पासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला. मी आजही शेतकऱ्यांसोबत असून त्यांना अधिकाधिक मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
- कचरू पाटील-डुकरे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 17, 2017, 3:04 pm
Gautam.Sancheti@timesgroup.com
नाशिक : भाडेनियंत्रण कायद्याने सर्व करार मुद्रांक विभागात नोंदणी करणे कायदेशीररित्या बंधनकारक असतांना शहर व परिसरात लिव्ह अॅण्ड लायनसन्स कराराची नोंदणी अल्प होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ ३ हजार २२६ करार लिव्ह अॅण्ड लायसन्सचे नोंदले गेले. या वर्षीच्या तर सात महिन्यात हीच संख्या २ हजार ३९१ इतकीच आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी सुद्धा भाडेकरुंची माहिती पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे. पण, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शहर व परिसरात भाडेकरूंची संख्या मोठी असली तरी त्याची अधिकृत नोंद मात्र प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरली आहे.
घर, फ्लॅट, दुकान किंवा कोणतीही मालमत्ता भाड्याने दिल्यास त्याचा करारनामा केला व त्याची अधिकृत नोंदणी केल्यास त्याचा फायदा मालमत्ताधारकांना होणार असतो.पण, या नोंदणीकडे शुल्क लागत असल्यामुळे त्यांनी पाठ फिरवली आहे. नोंदणीकृत भाडेकरार न केल्याने भाड्याने दिलेल्या घरात भाडेकरूंनी केलेले गैरकृत्य असो की, घर खाली करण्याचा प्रश्न यात कायदेशिर पेच निर्माण होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. त्यामुळे अधिकृत नोंदणी करण्यासाठी आता नोंदणी व मुद्रांक विभागाने मोहीम उघडली आहे. फ्लॅट किंवा कोणतीही मालमत्ता देतांना १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार केला जातो. काही ठिकाणी केवळ कागदावर लिहिले जाते. तर काहीजण तोंडी बोलणी करून भाड्याने मालमत्ता देतात. पण, कायद्याने ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’ची नोंदणी मुद्रांक भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.
कराराचे शुल्क
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’च्या करारनाम्याची नोंदणी करता येते. यासाठी शहरी भागासाठी एक हजार तर ग्रामीण भागासाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. या शुल्काबरोबरच ०.२५ टक्के मुद्राक शुल्क एकूण कराराच्या भाड्याच्या रक्कमेवर घेतले जाते. एक महिन्यापासून तर पाच वर्षांपर्यंत हे ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’चे करार करता येतात.
कायदेशीर महत्त्व
घर असो की कोणतीही मालमत्ता ती खाली करतांना या नोंदणीकृत कराराचा फायदा होतो. हे दस्तऐवज कायदेशीर वैध असल्याने त्याचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे लाखोची मालमत्ता दुसऱ्याला भाडेतत्वाने देतांना कायदेशीर त्याला महत्त्व आहे.
सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे
‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’ करारामध्ये भाडेकरूंची सर्व माहिती अधिकृतपणे नोंद केली जाते. त्यात नाव, आधारकार्ड, पत्ता यासह इतर माहिती असते. त्यामुळे मालमत्ताधारकाला त्याचा फायदाच होतो. हा करारनामा पोलिसांना दिला तर त्याचा उपयोगही कायदेशीररित्या काही प्रसंग उदभवल्यास त्यात होतो.
ऑनलाइनही सुविधा
नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’ करारानाम दस्तऐवज ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा आहे. त्याचा लाभही सर्वांना घेता येणार आहे.
भाडेनियंत्रण कायदा कलम ५५ अन्वये सर्व करारनामे नोंदणीकृत करणे मिळकतधारक यांच्या लाभाचे आहे. अशा करारनाम्यास कायदेशीर सरंक्षण प्राप्त होते. त्यामुळे सर्वांनी ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’चे करारनाने नोंदणी करून घ्यावे. ज्यांचे राहिले आहे, त्यांना सुद्धा ते नोंदवता येणार आहे. यासाठी ऑनलाइन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
- मनोज वावीकर, मुद्रांक जिल्हाधिकारी
मुद्रांक विभागात नोंदणी झालेले करार
कार्यालय....ठिकाण....................२०१६-१७........२०१७-१८ (ऑक्टोबरपर्यंत)
- नाशिक १....जिल्हाधिकारी कार्यालय....१०४२........७६८
- नाशिक २....नाशिकरोड कार्यालय........५७९ - ४३१
- नाशिक ३ /४....त्र्यंबक नाका............९३५........६२३
- नाशिक ५....ठक्कर बाजार कार्यालय........३८७........२४८
- नाशिक ६/७....कांदा बटाटा भवन........२८३........३२१
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 3:07 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
समृद्धी महामार्गासाठी लवकर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जिल्ह्यात २०४.३९ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २३८ कोटी ५४ लाख रुपयांचे ४८७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्याची उपराजधानी आणि राजधानीला अतिशय वेगवान रस्त्याने जोडण्याचे काम या महामार्गामुळे होणार आहे. १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतजमिनींचे भूसंपादन करावे लागणार आहे. जमीन खरेदी प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहेत. जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधून तब्बल १२९० हेक्टर जमिनीचे संपादन प्रशासनाला करावयाचे आहे. त्यापैकी १ हजार २३१ हेक्टर जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या असून आतापर्यंत २०४.३९ हेक्टर क्षेत्राची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
सिन्नरमध्ये ३१६ शेतकऱ्यांचे एकूण १४० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. २६ पैकी १७ गावांमध्ये २३२ खरेदीखतं झाली असून शेतकऱ्यांना एकूण १५९ कोटी २४ लाख १३ हजार ५७० रुपये मोबदला वितरित करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातही २३ पैकी १६ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७१ शेतकऱ्यांचे ६४.१४ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या शेतकऱ्यांना ७९ कोटी २९ लाख ९४ हजार ४८५ रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ पैकी ३३ गावांमधील ४८७ शेतकऱ्यांनी भूसंपादनाला परवानगी दिली आहे. त्यांचे एकूण २०४ हेक्टर क्षेत्र संपादित झाले असून त्यांना २३८ कोटी ५४ लाख आठ हजार ५५ रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2017, 3:10 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधीसभा निवडणुकीतील नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून जयकर ग्रुप व विद्यार्थी हक्क समितीच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ विकास मंडळाच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख संस्थांसह मतदारांच्या गोठीभेटी घेऊन जोमाने प्रचार सुरू केला आहे. रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या मांडणी व विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे उमेदवार अॅड. बाकेराव बस्ते यांनी सांगितले.
निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार नाशिकचे प्रथितयश कायदेतज्ज्ञ अॅड. बाकेराव बस्ते, डॉ. भरत कर्डक (नगर), योगेश लांडे (पुणे), महिला प्रवर्गातील तबस्सुम इनामदार, अनुसुचित जाती प्रवर्गातील सुभाष चिंधे, भटक्या विमुक्त प्रवर्गातील अमोल खाडे, युवक क्रांती दलाचे प्रदेश कार्यवाह संदीप बर्वे, जिल्हाध्यक्ष सुदाम लगड, स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे अमोल हिप्पागे, वीर भगतसिंग विद्यार्थी संघटनेचे अविनाश शिंदे, श्याम लांडे, सागर डाळिंबकर आदींनी या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे.
नवीन युगाच्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाणारी व्यवसायिक शिक्षण पद्धती, सामाजिक व संस्कृतिक मुल्ये जपणारी तसेच रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची मांडणी करणे, विद्याविकासात पूरक उपक्रमांसाठी पाठपुरावा, विद्यार्थी, अध्यापक कल्याण, क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाची नैपुण्य घडविण्यासाठी अभ्यासक्रम, वार्षिक वित्तीय अंदाजपत्रकात विद्यापीठाचे हित जोपासण्यास कायदेपूरक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमचे पॅनेल कटिबद्ध असल्याचे अॅड. बस्ते यांनी यावेळी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧