Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आस्थापनांच्या ललाटी मराठीचाच टिळा

$
0
0

Pravin.bidve@timesgroup.com
नाशिक : मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यात नाशिककर कसूर करीत नाहीत. दुकानांवरील पाट्या पदोपदी याचीच प्रचिती देतात. शहरातील दुकानांवर इंग्रजी भाषेच्या पाट्याही आहेत. परंतु, मराठी भाषेतील पाट्यांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. विशेष म्हणजे व्यावसायिक हेतूने इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतही पाट्या लावणाऱ्या व्यावसायिकांची संख्या लक्षणीय आहे.

मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान असायलाच हवा असा आग्रह राजकीय पक्ष आणि साहित्यिक धरतात यात वावगे नाही. 'स्वातंत्र्य देवीची विनवणी' या तात्यासाहेब शिरवाडकरांच्या कवितेने मराठी भाषेची थोरवी सांगितली आहे. त्यांच्यासह अनेक सारस्वतांच्या सिद्धहस्त लेखणीमधून मराठीबद्दलची आत्मीयता आणि प्रेम निरंतर ओसंडले आहे. परभाषेतही पारंगत होऊन ज्ञानसाधना करा असा संदेश देतानाच मायमराठी मरणार नाही याचीही पुरेपूर काळजी घ्या असा संदेश कुसुमाग्रजांनी दिला. मराठी भाषेला स्वत:च्याच मातीत उपेक्षिताचे जगणे जगावे लागू नये अशी त्यामागची तळमळ असून नाशिककरांनीही ती तेवढ्याच प्रेमाने जपली आहे. आस्थापनांच्या ललाटास आवर्जून मराठीतच टिळा लावल्याचे चित्र शहरात फेरफटका मारल्यास नजरेत भरते. शहराचीमध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणारा मेनरोड असो अथवा मेहेर चौकापासून पिंपळपारापर्यंतचा परिसर असो येथील दुकानांवर मराठीत पाट्या लावण्यास व्यावसायिकांनी पसंती दिली आहे.

मुख्य बाजारपेठेत मराठीचेच साम्राज्य

मेनरोड आणि मेहेरचौकापासून दहीपुलापर्यंत तब्बल ६०२ दुकाने आहेत. त्यापैकी ८५ टक्के दुकानांवरील पाट्या मराठीत आहेत. येथील ५०४ दुकानांवर मराठी अक्षरांत पाट्या आहेत. मेहेर चौक ते वंदे मातरम चौक (धुमाळ पॉईंट), तेथून पिंपळपारापर्यंतची बाजारपेठ, धुमाळ पॉइंटपासून डावीकडे मंगेश मिठाईपर्यंत आणि उजवीकडे गाडगेबाबा चौकापर्यंतची मुख्य बाजारपेठ या परिसरात एकूण ६०२ दुकाने आहेत. मेहेर चौक ते रेडक्रॉस चौक यामार्गावर ८७ दुकाने आहेत. तर रेडक्रॉस ते वंदे मातरम चौकापर्यंत १०३ दुकाने आहेत. वंदे मातरम चौकापासून पिंपळपारापर्यंतच्या दुकानांची संख्या १७२ असून याच चौकापासून मंगेश मिठाईपर्यंत १०५ आणि गाडगेबाबा चौकापर्यंत १३५ दुकाने आहेत. त्यापैकी ५०४दुकानांवरील पाट्या मराठीत असून केवळ ९८ दुकानांवर इंग्रजीत पाट्या आहेत. त्यापैकी निम्म्या दुकानांवर इंग्रजी आणि मराठी अशादोन्ही भाषेत पाट्या असल्याचे आढळून आले. कॉलेजरोड, गंगापूर रोड, रविवार कारंजा, पंचवटी यासह उपनगरांमध्येही मराठी व्यावसायिकांची संख्या अधिक असून बहुतांश पाट्याही मराठीतच असल्याचे पहावयास मिळतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाचनसंस्कृतीचा नंदादीप : सुभाष सार्वजनिक वाचनालय

$
0
0

वाचनसंस्कृतीचा नंदादीप : सुभाष सार्वजनिक वाचनालय


वाचन संस्कृतीचे दुवे

जितेंद्र तरटे


स्वातंत्र्यपूर्व कालखंडात म्हणजे १९४२ मधील स्वातंत्र्य चळवळीच्या वातावरणात मुहूर्तमेढ रोवले गेलेले नाशिकमधील एक जुने वाचनालय म्हणून सुभाष वाचनालयाची स्वतंत्र ओळख आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून नामकरण झालेल्या या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासूनच्या पिढ्यांपासून आजच्या नवीन पिढ्यांपर्यंत सर्वांशी वाचन संस्काराची नाळ या वाचनालयाने जोडून ठेवली आहे. जुने नाशिक परिसरात स्थित असलेल्या या वाचनालयाच्या कार्यात पुन्हा बळ भरण्यामागे साने गुरुजींची प्रेरणा होती. हा वाचनप्रेरणेचा वारसा या वाचनालयाने आजही जपला आहे.

स्वातंत्र्यपूर्व चळवळीच्या कालखंडात नाशिकमधील सामान्य जनतेलाही स्वातंत्र्य लढा आणि तत्कालीन जागतिक घडामोडी यांची माहिती व्हावी, वैचारिक चळवळ रुजावी या उद्देशाने जुन्या नाशिकमधील हुदलीकरांच्या वाड्यात सुभाष सार्वजनिक वाचनालयाची मुहूर्तमेढ सन १९४२ च्या दरम्यान रोवली गेली. त्यावेळी जुन्या नाशिकमध्ये स्वातंत्र्य चळवळीचे कार्य जोरदारपणे सुरू होते. त्यावेळच्या तरुणपिढीवर असणारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारकांचा प्रभाव विचारात घेऊन तत्कालीन मार्गदर्शकांनी या वाचनालयाचे नामकरण सुभाष सार्वजनिक वाचनालय केले.

वाचनालयाच्या स्थापनेनंतर इंग्रजांकडून काही कार्यकर्त्यांची झालेली धरपकड आणि वाचनालयाच्या कामात परिणामी उभा राहिलेला अडसर यामुळे काही वेळ हे वाचनालय बंद पडले. पण, स्वातंत्र्योत्तर कालखंडात शिक्षकी पेशातील कार्यकर्ते यशवंतराव शिंदे यांच्या पुढाकाराने साने गुरुजींच्या कानावर वाचनालयाच्या कार्याची ख्याती गेली, तेव्हा साने गुरुजींनी या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत पुन्हा विजयादशमीच्या औचित्यावर १७ ऑक्टोबर १९५३ रोजी वाचनालय सुरू केले. वाचनालयाचे संस्थापक कै. यशवंतराव शिंदे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांचे या कार्यासाठी असणारे योगदान अतुलनीय आहे. या वाचनालयाच्या मार्गक्रमणात १९५३ ते १९७० ही वर्षे बिकट ठरली. मात्र, अडचणींवर मात करून या वाचनालयाने आजवर अस्तित्व टिकविले. त्यानंतर प्रगतीच्या दिशेने झेपावताना वाचनालयाने १९६५ मध्ये नवी जागा खरेदी करून प्रथम दोन मजल्यांचे बांधकाम केले. त्यात आणखी भर पडून १९७८ मध्ये आणखी दोन मजल्यांच्या कामाची भर वाचनालयाच्या वास्तूत पडली.

५० हजार पुस्तकांचे भांडार

नाशिकमधील जुन्या वाचनालयांपैकी एक असलेल्या सुभाष सार्वजनिक वाचनालयात आजमितीस सुमारे ५० हजार पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू या भाषांमधील शंभरावर नियतकालिके उपलब्ध आहेत. 'अ' वर्ग तालुका ग्रंथालय दर्जाचे हे वाचनालय आहे. विशेष म्हणजे जुने नाशिक परिसरात उर्दू भाषिक नागरिकांची संख्या विचारात घेत १९७७ पासून येथे उर्दू विभाग सुरू करण्यात आला. या विभागात उर्दू दैनिके, साप्ताहिके, मासिके यांसह चार हजार उर्दू पुस्तके उपलब्ध आहेत.

या सुधारणांची गरज

वाचनालयात उपलब्ध पुस्तकसंख्या आणि सेवा समाधानकर असली, तरीही यात आधुनिक काळानुसार गतिमानता येण्यासाठी संगणकीकरण व्हायला हवे, जेणेकरून पुस्तकांच्या गतीने देव-घेवीसोबतच हजारो पुस्तकांच्या अद्ययावत नोंदी ठेवणे सोपे होईल. सोबतच वाचकांसंदर्भातील महत्त्वाची माहिती त्वरित पोहोचविण्यासाठी इंटरनेटही उपयुक्त ठरेल. शिवाय मोबाइल एसएमएस सुविधेचाही उपयोग यात झाल्यास वाचकांना व्यवहार करणे अधिक सुलभ होईल, अशा अपेक्षा सभासदांकडून व्यक्त होत आहेत.

स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून नाशिककरांच्या सेवेत असणारे सुभाष वाचनालय हे एक जुने वाचनालय आहे. स्वातंत्र्यपूर्व चळवळ आणि नंतरच्या कालखंडात नाशिककरांच्या जडणघडणीत या वाचनालयाचे मोठे योगदान आहे. वाचनालय आणि त्याच्याशी संबंधित घटक जपताना सरकारने उपक्रमांचे देखावे सोडून प्रत्यक्षात या घटकांच्या गरजा विचारात घ्यायला हव्यात. त्या पूर्ण करायला हव्यात, तरच नवीन पिढ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजण्यास मदत होईल.

-दत्ता पगार, प्रमुख ग्रंथपाल, सुभाष वाचनालय

आकडे बोलतात...

५० हजार : एकूण ग्रंथसंख्या

४ हजार : उर्दू पुस्तके व इतर साहित्य

६०० : सभासद संख्या

७० : वाचन कक्ष दैनंदिन सरासरी

२१० : वाचन कक्ष मासिक सरासरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी चित्रपटसृष्टीला नाशिकच्या गीतकारांची भुरळ

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : मराठी चित्रपटात नाशिकने अनेक कलाकार दिले असले तरी येथील गीतकारांच्या गाण्यांची चर्चा मात्र फारशी झालेली नाही. नव्या पिढीतील अनेक तरुण कवींची गाणी आता मराठी चित्रपटात झळकू लागली आहेत. यातील काही गीतकारांनी मराठी मनाला भुरळही घातली आहे. त्यात लासलगावचे प्रकाश होळकर हे कवी आघाडीवर आहेत, तर त्या पाठोपाठ नव्या पिढीचे चांदवड येथील कवी विष्णू थोरे यांची गाणी आता गाजू लागली आहेत.

नाशिकच्या कवींच्या रचना आताच चित्रपटात झळकतात असे नाही. यापूर्वी कवी कुसुमाग्रज, राम उगावकर, योगेश्वर अभ्यंकर, किशोर पाठक, सतीश पिंपळगावकर यांसारख्या जुन्या पिढीतील अनेक कवींची गीतेही चित्रपटात आली आहेत. त्यानंतर मराठी चित्रपटात नाशिकच्या कवींची गीते मात्र दिसत नव्हती. मात्र, 'टिंग्या' चित्रपटात प्रकाश होळकर यांचे 'माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला' हे गीत सर्वत्र गाजले. त्यानंतर नाशिकच्या कवींना मराठी चित्रपटाची दारे खुली झाली. होळकर यांनी आतापर्यंत तब्बल २२ चित्रपटांमध्ये गाणी लिहिली आहेत, तर थोरे यांनी तीन चित्रपटांत गीतरचना लिहिल्या आहेत. त्याचबरोबर मालेगावचे प्रशांत मोरे, प्रशांत केंदाळे व अहिराणी चित्रपटात दाभाडीतील डॉ. एस. के पाटील यांची गीतेही गाजली आहेत.

मराठी रंगभूमीला नाशिकने कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता असे सर्व दिले असले तरी त्यांची संख्या तुलनेत कमी आहे; पण या सर्वांनी आपला ठसा उमटवला हे विशेष. याच कलाकारांच्या यादीत आता कवींनी आपले नाव कोरले आहे. नाशिक जिल्हा हा कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यानंतरही हा वारसा नव्या दमाच्या कवींनी जपला आहे.

होळकर यांनी 'टिंग्या'बरोबरच सर्जाराजा, बाबू बँडबाजा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, चिनू, धूळमाती, टपाल प्रियतमा यांसारख्या अनेक चित्रपटात गाणी लिहिली. त्यांच्या गीतांना राज्य सरकारची चार पारितोषिके मिळाली. त्यापाठोपाठ फिल्मफेअर अॅवॉर्ड, व्ही. शांताराम अॅवॉर्ड अशी किती तरी बक्षिसे मिळाली. थोरे यांचेही शौर्य चित्रपटातील 'पायरीला गेले तडे, पाय झाले जड' हे गाणे सर्वत्र गाजले. आता त्यांचे 'घाटी' व 'गैरी' या चित्रपटात गाणी असून, ते प्रदर्शनाच्या टप्यावर आहेत. विशेष म्हणजे या नाशिकच्या गीतकारांची गाणी वैशाली सामंत, कुणाल गांजावाला, स्वप्नील बांदेकर, बेला शेंडे, रवींद्र साठे यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी गायली असून, ती निश्चितच नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोलांबिका देवी व गंगाद्वार ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर यांच्या जमीन वादाप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी सचिन दप्तरी यांनी अर्ज केला आहे. सरकारी पक्षाने कुळ लागत नसल्याचा तसेच सरकारची परवानगी घेण्याची आणि होणार असलेल्या कामांसाठी परवानगी घेण्यात आला नसल्याचा ठपका ठेवला आहे. त्यासंदर्भात दप्तरी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. दाखल गुन्ह्यातील हे मुद्दे दप्तरी यांनी फेटाळून लावत ९ वर्षांपर्यंतच्या भाडेकरारासाठी धर्मदाय आयुक्तांची मंजुरी घेण्याची आवश्यकता नसल्याचा मुद्दा दप्तरी यांनी मांडला. सरकारला अशी माहिती कळविण्याबाबत कायदेशीर तरतूदच नसल्याचे दप्तरी यांनी स्पष्ट केले. कुळ लागत नसल्याचाबाबतचा मुद्दाही खोडून काढण्यात आला असून, पहिल्या करारनाम्यात काही विकास कामांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यात जर काम हाती घेण्यात आली तर संबंधीत विभागांची मंजुरी घेण्यात यावी, यातील जर हा शब्द नमूद करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मूळ करारनामा झाला त्याच्या पाचव्या दिवशी नव्याने करारनामा करण्यात आल्याचे दप्तरी यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. दप्तरी यांनी दिलेली कागदपत्रे कोर्टत सादर झाली असून, लवकरच सुनावणीची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वांजुळपाणी पेटण्याची चिन्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गिरणा खोऱ्यात हक्काचे पाणी मिळावे यासाठी वांजुळ पाणी संघर्ष समिती पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे. यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महतत्त्वाची बैठक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे.

वांजुळ पाणी सर्वेक्षणाचे त्वरित आदेश द्यावे, वांजुळ पाणी व मांजरपाडा-२ प्रकल्पास एक महिन्याच्या आत प्रशासकीय मंजुरी मिळावी व नार-पार-अंबिका-औरंगा-तान-मान या पश्चिम वाहिनी नद्यांचे महाराष्ट्राच्या हद्दित १०६५ चौरस किलोमीटर परिसरात पडलेले पाणी प्रवाही वळण योजनेद्वारे नैसर्गिक उतारने वांजुळ पाणी येथे आणून गिरणा नदीत टाकण्यात यावे, या मागणीसाठी वांजुळ पाणी संघर्ष समितीतर्फे मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. उपोषण सोडतांना गिरणा खोरे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधित मागणीच्या सर्वेक्षण मंजुरीसाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर पुढील कार्यवाही दोन महिन्याच्या आत न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा समितीतर्फे देण्यात आला होता. त्यामुळे वांजुळ पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

आंदोलनाची रुपरेषा निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी बुधवारी मालेगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. गिरणा-तापी खोऱ्यातील कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, चाळीसगाव भागातील शेतकरी, नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वांजुळ पाणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.

गिरणा खोऱ्यावर अन्याय

मागील आठवड्यात आमदार जे. पी. गावित यांनी सुरगाणा येथे या भागातील ३० हजाराच्यावर नागरिकांचा मोर्चा काढून गुजरातला पाणी देण्यास विरोध दर्शविला होता. तसेच वांजुळ पाणी ही प्रवाही वळण योजना मार्गी लावून स्थानिकांना त्यांच्या हक्काचे पाणी देऊन उर्वरित पाणी गिरणा खोऱ्यात 'कसमादेना' या भागाला द्यावे अशी मागणी केली होती. दमनगंगा नदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देवून डीपीआर बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु त्रुटीच्या गिरणा खोऱ्याची मांजरापाडा २, नार-पार, वांजुळ पाणी व इतर योजनांबाबत शासन कोणतीही सकारात्मक भूमिका घेत नसून हा गिरणा खोऱ्यावर अन्याय होत आहे.

दोन्ही जिल्ह्यांचा पाणीप्रश्न रखडला

नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव या पाच तालुक्यात दर दोन ते तीन वर्षांनी पाणीटंचाईचे समस्या उभी राहते. वास्तविक गिरणा, मोसम नदीपात्र असूनही या तालुक्यांसाठी मोठी जलयोजना न राबविल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रातही सातत्याने घट होत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील जळवपास आठ तालुक्यांच्या पाणीपुरवठा योजना या गिरणा नदीवर आणि धरणातील साठ्यावर निर्भर आहेत. त्यामुळे या नाशिकसह जळगाव जिल्ह्यासाठी तत्काळ पाऊले उचलणे गरजेचे आहे. याऊलट दमनगंगा नदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पाला सरकारने तत्काळ मान्यता दिली. याबाबत पुढील कार्यवाही देखील सुरू झाली आहे. मात्र गिरणा खोऱ्यातील गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या योजनांबाबत सरकरने अद्याप कोणतेही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. मांजरापाडा २, नार-पार, वांजुळ पाणी व इतर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच येत्या काळात या योजनांवर मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगात दौडले अश्व...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कुणाचा 'सोन्या'...'लकी', तर कुणाचा 'बंटी' यासारखे दृष्टीक्षेपात पडणारे एकापेक्षा एक सरस असे जातीवंत ऐटबाज अश्व...ग्रीन सिग्नल मिळताच अगदी वायुवेगाने निर्धारित अंतर पार करण्यासाठीची त्यांची धडपड...क्षणोक्षणीची ही उत्सुकता व उत्कंठता रविवारी येवल्यात दिसली. निमित्त ठरले ते येथील काही अश्वप्रेमींनी यंदाही आयोजित केलेल्या 'हॉर्स रेसिंग' स्पर्धेचे.

पुणे व मुंबईसारख्या मोठ्या नगरांमधील रेसकोर्स मैदानावर रंगणारी घोड्यांची स्पर्धा आता नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात देखील जोर पकडू लागली आहे.

अश्वशौकीनांच्या वतीने येवल्यासारख्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून अशा पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही आयोजित केलेल्या स्पर्धेच्या निमित्ताने येवला शहर आणि परिसरातील नागरिकांनी रविवारी स्पर्धेचा मोठा चित्तथरार याची देही याची डोळा अनुभवला. तब्बल सात तास अगदी ही स्पर्धा रंगली. राज्यातील ठिकठीकाणच्या स्पर्धकांसह गुजरातहूनही काही स्पर्धक आपापल्या रुबाबदार घोड्यांसह स्पर्धेत सहभागी झाले होते. पप्पू गांगुर्डे, झामभाऊ पैलवान जावळे, पोपटराव वाघ, पिंटू परदेशी, विनोद परदेशी, सागर गांगुर्डे, चरण गांगुर्डे ही त्यातील अग्रेसर यांनी येवला शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव चौकीलगत ही स्पर्धा रविवारी (दि.२५) भरवली. १३० अश्व, प्रत्येक फेरीत प्रत्येकी १३ अश्वांचा समावेश करताना एकण रंगलेल्या नऊ फेऱ्या यात ही स्पर्धा रंगली.

'विज्या'ने मारली बाजी

या स्पर्धेत येवला शहरातील रोकडोबा परिसरातील विष्णू पवार यांच्या 'विज्या' हा अश्व प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. मनमाड जवळील भडाणे येथील यांच्या 'सोन्या'ने दुसरा, शिरसगाव (नांदगाव) येथील 'बुच्च्या'ने तिसरा, तर सिन्नर येथील बोळे सरांच्या 'लकी'ने चौथा क्रमांक पटकावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणी फी अव्वाच्या सव्वा

$
0
0


arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: डॉक्टरी पेशा अनुभवाने समृद्ध होतो, याच अनुभवाचा आधार घेत कन्सल्टंट फीमध्ये जबरदस्त वाढ करण्यात आली आहे. कन्सलटंट फीच्या मदतीला डायग्नोस्टिक कीटही असल्याने एका वेळी पेशंटकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यात येत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे.

नाशिकमध्ये जनरल प्रॅक्टिस करणाऱ्यांच्या बरोबरीने तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. याशिवाय वेगवेगळी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स नाशिकमध्ये दाखल झाली आहेत आणि होत आहेत. एकाच आजाराबाबत किती तपासणी शुल्क असावे, याबाबत काही वर्षांपूर्वी कायदा करण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, मेडिकल असोसिएशनने त्यास हरकत घेतली. वकील तसेच आर्किटेक्ट आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून वेगवेगळी फी आकारून ग्राहकहिताचे काम करतात, अगदी त्याच पद्धतीने डॉक्टरांचे काम असून, त्यांना आपल्या कामाचा मोबदला ठरविण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. आयएमएकडून होणारा विरोध लक्षात घेता सरकारने हा संभाव्य कायदाच बासनात गुंडाळून ठेवला. यामुळे आज एकाच आजाराबाबत तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळे शुल्क आकारताना दिसतात. या तपासणी शुल्काला कोणताही आधार नसल्याने डॉक्टरांना वाटते तितके शुल्क आकरले जाते. याचा ताण पेशंटच्या खिशावर पडतो. गरजवंताला अक्कल नसते, या म्हणीचा प्रत्यय प्रत्येक पेशंटला येत असतो. कॉर्पोरेट अथवा भव्य दिव्य हॉस्पिटल्समध्ये चालणाऱ्या या प्रकारांचा परिणाम मध्यम अथवा अगदीच लहान क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांवर पडत आहे. पैसे कमावण्याची अहमहमिका थांबविण्यासाठी आजमितीस कायदा अपुरा असून, यात भरडल्या जाणाऱ्या पेशंटचे दुखणे वाढतेच आहे. उपनगरांमध्ये लहान-मोठे क्लिनिक थाटलेले डॉक्टर्स संदर्भ देण्याचे काम करतात. आवश्यकता असो की नसो पेशंटला अमूक एका स्पेशालिस्टला दाखवून घ्या, असे म्हणत दुसऱ्या ठिकाणी धाडले जाते.

असे आहे तपासणी शुल्क

बीएएमएस किंवा बीएचएमएस डॉक्टर - ५० ते १०० रुपये

एमबीबीएस डॉक्टर - २०० ते ५०० रुपये

एमडी डॉक्टर - ५०० ते ८०० रुपये

एखाद्या रोगाचे विशेष तज्ज्ञ - १००० ते १५०० रुपये

डॉक्टरांचे शुल्क हे त्यांच्या अनुभवानुसार तसेच येणाऱ्या रिझल्टवर अवलंबून असते. कोणी किती शुल्क आकारावे आणि जास्त शुल्क असलेल्या डॉक्टरांकडे जावे की न जावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या सुविधा, डॉक्टरांचा अनुभव याचा परिणाम शेवटी तपासणी शुल्कावर होणारच.

- डॉ. मंगेश थेटे, अध्यक्ष आयएमए, नाशिक


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषेबाबत तरुणाईचे ‘अगाध’ ज्ञान

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

'श्यामची आई' पुस्तक सावरकरांनी लिहिले, पहिले ज्ञानपीठ 'बा.बा.' आमटेंना मिळाले, शिवकालिन मराठी शिवलिपीत लिहिले गेले, 'तळे राखील तो पाणी चाखेल' या म्हणीचा अर्थ सेल्फिश होणे असा आहे... ही साध्या प्रश्नांची ही गजब उत्तरे आहेत महाविद्यालयीन तरुणाईची. मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या प्रश्नोत्तरांमध्ये तरुणाईकडून मराठी भाषेच्या या 'अगाध' ज्ञानाचा उलगडा झाला आहे. त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांची नावे धड माहीत नाहीत, ना साहित्यिकांची. बाबा आमटे यांच्या नावातील 'बाबा' ही आद्याक्षरे (बा.बा) आहेत, असाही शोध या तरुणाईकडून लागला!

मराठी भाषेवर इंग्रजीचे आक्रमण होत आहे. ग्लोबल स्तरावर पाहिले तर मराठीच्या तुलनेत इंग्रजी भाषा अधिक प्रभावी ठरत असून, ती बोलणे अधिक सन्मानाचे समजले जात आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन तरुणाईमध्ये मराठी भाषेची सद्य:स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही प्रश्नोत्तरे विचारण्यात आली. विचारलेल्या एकूण २० प्रश्नांपैकी केवळ चार-पाच प्रश्नांची अचूक उत्तरे आली.

आळंदी ही तुकाराम महाराजांसाठी प्रसिद्ध आहे, श्यामची आई हे पुस्तक वीर सावरकरांनी लिहिले आहे, ज्ञानपीठ व. पु. काळे व ना. धों. महानोरांना मिळाले आहे, शाळा कादंबरी ग. दि. माडगुळकरांनी लिहिली आहे, लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ, तमाशातील काळूबाळू हे साहित्यातील विनोदवीर आहेत, सुमित राघवन हाच फास्टर फेणे आहे ही व यांसारखी भयावह उत्तरे तरुण-तरुणींनी दिल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

मराठी भाषेविषयी तरुणाईला आस्थाच नाही, असे सर्वेक्षणाअंती आढळून आले. कारण आज मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्किंग साइटचा वापर होत असूनही त्यावर मराठी भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण अल्प आहे. मराठीतील पाच कादंबऱ्या, पाच लेखक किंवा पाच नाटके तरुणाईला माहीत नाहीत हे मराठीचे मोठे दुर्दैवच 'मटा'ने घेतलेल्या प्रश्नोत्तरांतून अधोरेखित झाले.

नाशिकची तरुणाई नेटसॅव्ही

नाशिकच्या तरुणाईची भाषेविषयी अतिशय बिकट परिस्थिती असताना ते शंभर टक्के नेटसॅव्ही आहेत, ही बाब मात्र सकारात्मक आहे. ई-मेलवर मराठी टंकलेखन (टायपिंग) करीत नसले तरीही मराठी ब्लॉग वाचण्यात मात्र ते आघाडीवर आहेत. भलेही ब्लॉग्सची नावे ते सांगू शकत नसतील, परंतु त्यावरील राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक वाचन त्यांना खुणावते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रौर्याची गाठली परिसीमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रौर्याची परिसीमा गाठत आईसह तिच्या प्रियकाराने अवघ्या सहा वर्षांच्या बालकाची हत्या केल्याची धक्कादायक बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. निरंजन उर्फ साहील चतुर्वेदी आणि सोनूबाई उर्फ सोनाली थोरात अशी संशयितांची नावे आहेत.

सोनाली थोरातचे यापूर्वी दोन विवाह झाले असून, पहिल्या पतीपासून तिला दोन मुलगे आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. सध्या ती एक वर्षापासून शरणपूररोडवरील मिशन मळा येथे एका भाड्याच्या घरात निरंजनसोबत राहते. निरंजनबरोबर तिचा विवाह झालेला नाही. सोनालीबरोबर नकूल थोरात (वय ६), नंदिनी (वय १०) आणि विघ्नेश ही मुले राहत होती. सोनालीने त्यांना महिरावणी परिसरातील एका आश्रमशाळेत टाकले होते. शनिवार, रविवारी सुटी असल्याने ही दोन्ही बालके आईकडे आली होती. सोनाली जेव्हापासून निरजंनसोबत राहते तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांमुळे निरंजन या मुलांना बेदम मारहाण करीत होता. सतत मारहाणीमुळे ही मुले दहशतीखाली वावरत होती. या क्रौर्याची परिसीमा गाठत रविवारी दोघांनी जबर मारहाण करीत चिमुकल्या नकूलचा जीव घेतला.

सजग नागरिकांमुळे उघड झाली हत्या

सकाळी दोघे नकूलला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यानंतर सोनालीसह निरजंन नकूलचा मृतदेह घेऊन घरी परतले. रात्री झालेल्या हाणामारीच्या प्रकाराबाबत शेजारी अवगत होते. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधून परतलेल्या दोघांची देहबोली लक्षात घेता, शेजारी राहणारे सतीश दलाल, सुमन खरे, कविता गाडे, सुरेखा मोजेस, सुवंदिता मकासरे, शॉरलेट गोम्स असे इतर नागरिक थेट घरात घुसले. तिथे निपचित पडलेल्या नकूलला पाहून सरकारवाडा पोलिस स्टेशनला माहिती कळवण्यात आली. त्याचे पूर्ण शरीर हाणामारीची साक्ष देत होते. दुसरीकडे पलंगाखाली क्षीण झालेली नंदिनी शेजाऱ्यांना दिसली. प्रचंड ताप आलेली नंदिनी घाबरलेली होती. नागरिकांनी १०८ अॅम्ब्युलन्सला बोलावून तिला औषधोपचारासाठी दवाखान्यात हलवले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी पुढील कार्यवाही करून सुरुवाम्ला सोनालीला, तर काही वेळातच निरंजनलला अटक केली. या प्रकरणी सतीश दलाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिसांनी दोघांविरोधात हत्या, तसेच हत्येचा प्रयत्न या कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांच्या गुरुंचा साकारला पुतळा

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
tweet : @FanindraMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू व सहकार चळवळीत योगदान देणारे लक्ष्मणराव इनामदार यांचा अर्धकृती पुतळा नाशिकमध्ये साकारण्यात आला आहे. इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राजधानी दिल्लीतील सहकार भारतीच्या राष्ट्रीय सहकारी अनुसंधान आणि विकास अकादमीत तो बसविला जाणार आहे. हा पुतळा नाशिकचे शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारला असून, सरसंघचालकांच्या हस्ते त्याचे अनावरण बुधवारी होणार आहे.

इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार सहकार भारतीच्या कार्यालयात मोठे तैलचित्र लावावे, असे काही पदाधिकाऱ्यांनी सुचवले; परंतु सहकार भारतीचे सतीश मराठे यांनी डोंबिवली येथील लोकमान्य गुरुकुलात लोंढे यांनी साकारलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा पाहिला होता. त्यावरून लोंढे यांच्याकडूनच हा पुतळा तयार करून घेऊ, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. पदाधिकाऱ्यांनीही लगेच होकार दिला. दीड महिन्यापूर्वी लोंढे यांना फोनवरून माहिती देण्यात आली. पुतळा तयार करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी आवश्यक असलेले फोटो व त्यांच्या संबंधित पुस्तकाचे वाचन करून तो पुतळा दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय संवयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह उपस्थित रहाणार आहे. यावेळी मूर्तीकार संदीप लोंढे यांचा मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

असा आहे पुतळा

हा पुतळा ब्रांझ धातूत तयार करण्यात आला असून, अवघ्या दीड महिन्यात तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला हा पुतळा मातीत बनवण्यात आला होता. त्यावरुन त्याचा मोल्ड तयार करण्यात आला. या मोल्डवरून ब्रांझचा पुतळा तयार करण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरुन हा अर्धकृती पुतळा दिल्ली येथे नुकताच रवाना करण्यात आला.

कोण आहेत इनामदार?

मूळचे सातारा जिल्ह्यातील खटावचे रहिवासी असलेल्या लक्ष्मणराव इनामदारांनी गुजरातेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रुजविला होता. आपल्याला संघाच्या शाखेत आणणारे आणि संघ संस्कार करणारे लक्ष्मणरावच होते, असे मोदी आवर्जून सांगतात आणि तसे त्यांनी ‘ज्योतिपुंज’ या पुस्तकामध्ये लिहिलेदेखील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या सेतुबंध या पुस्तकात नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मणराव इनामदार यांचा सातत्याने उल्लेख केलेला आढळतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक पत्नीवर पतीचा चाकूहल्ला

$
0
0

नाशिक:

नाशिक उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेवर त्यांच्या पतीनंच चाकूनं हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तारा मधुकर मोरे (वय ५४) असं या मुख्याध्यापिकेचं नाव आहे. त्या नेहरूनगर येथे राहणाऱ्या आहेत. शाळेच्या आवाराच्या बाहेर असताना पती मधुकर मोरे यानं त्यांच्या हात, पाय आणि चेहऱ्यावर धारदार चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात तारा मोरे गंभीर जखमी झाल्या आहेत. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. हल्ल्यानंतर मधुकर मोरे फरार झाला असून उपनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोपर्यंत मराठीत स्वप्न तोपर्यंत मराठी सुरक्षित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भाषा जपण्याचे किंवा वाढविण्याचे काम साहित्यिक नव्हे, तर सर्वसामान्य करतात. जोपर्यंत आपण मराठीत बोलू, भांडू किंवा जोपर्यंत आपली स्वप्ने मराठीतून येतील तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही. भाषा जपणे आणि ती वाढविणे यात सर्वसामान्यांचे योगदान मोठे आहे हे कुणीही नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन विशाखा पुरस्कारप्राप्त कवी सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

उत्तमनगर येथील वावरे महाविद्यालयात मराठी गौरवदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी शिंदे बोलत होते. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य डॉ. नितीन पाटील, डॉ. ए. के. शिंदे, डॉ. किरण रकिबे, प्रा. सोमनाथ घुले, डॉ. के. एम. खालकर, प्रा. दिलीप जाधव, डॉ. राहुल पाटील, विद्यापीठ प्रतिनिधी गणेश फडोळ आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्यसंपदेची माहिती दिली. विद्यापीठ प्रतिनिधी फडोळ याने मनोगत व्यक्त केले. मराठी गौरव दिनानिमित्त आयोजित निबंध, हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी गौरविण्यात आले. यात कावेरी भालेराव, अर्चना कुमावत, जागृती शिंदे, स्नेहा वाणी, हर्षदा आहेर, पूनम पवार आदींना पारितोषिके मिळाली. प्रा. सोमनाथ घुले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. एम. खालकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निगडोळ येथे आढळले बिबट्याचे बछडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे आढळल्याने परिसरात घबराट पसरली असून, ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

शेतात ऊसतोडणी सुरू असताना कामगारांना एक बिबट्या व दोन बछडे आढळले. कामगारांना बघून बिबट्या मादी नदीकडे निघून गेली, तर बछडे ऊसातच राहिले. शेतकऱ्यांनी ही माहिती उपसरपंच शरद मालसाने यांना दिली. त्यांनी वनाधिकारी सुनील वाडेकर यांना कळविले. वाडेकर यांनी तातडीने वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तेथे एक बछडा आढळला. त्यास मादी ज्या भागात गेली त्या कोलवन नदी परिसरातील झाडाझुडपांकडे सुरक्षित हुसकून लावण्यात आले. या मादी बछड्यांना घेऊन जंगलात जाण्याचा अंदाज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. तूर्तास वनविभागाने येथे बंदोबस्त तैनात करीत ग्रामस्थांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

बिबट्याचे बछडे हे अंदाजे एक महिन्याचे असून, त्यास पकडून अन्यत्र नेले तर सदर मादी त्याच्या शोधात परिसरात येत बछडा न सापडल्यास हल्ला करू शकते. त्यामुळे बिबट्याला तेथेच सुरक्षित सोडले आहे. पिंजरा लावण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. नागरिकांना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

- सुनील वाडेकर, वनाधिकारी दिंडोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीचा जयघोष

$
0
0

जिल्हाभरात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथदिंडी, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सामूहिक वाचन उपक्रम, अभिमान गीताचे समूह गायन आदी उपक्रम राबवत मराठीचा जागर करण्यात आला.

मालेगावात विविध उपक्रम

मालेगाव : येथील शाह विद्यालयात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य संजय बेलन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक ए. डी. तावडे, के. पी. मुसळे, एन. के. गायकवाड, एस. पी. बेलन, व्ही. पी. आर्विकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. या निमित्ताने प्रारंभी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान केली होती. यानंतर सभागृहात मराठी अभिमान गीताचे समूह गायन करण्यात आले. यावेळी निबंध, अक्षरलेखन स्पर्धा, वाचन उपक्रम राबविण्यात आले. पी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

उज्ज्वल प्राथमिक विद्यालय

संगमेश्वर भागातील उज्ज्वल प्राथमिक विद्यालयातील चिमुरडे विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रंथदिंडी काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मराठी वेशभूषा परिधान करून हातात घोषवाक्य घेत विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष केला. मुख्याध्यापिका अर्चना गरुड यांनी अध्यक्षस्थान भूषविले. संस्थेचे सचिव रईस शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी अभिमान गीताचे समूह गायन करण्यात आले.

काकाणी वाचनालय

प. बा. काकाणी नगर वाचनालय येथे संदर्भ ग्रंथ व कोष वाङ्मय प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात मराठी विश्वकोष, महाराष्ट्र सांस्कृतिक कोष, वृत्तपत्रीय परिभाषा कोष, ज्ञानकोष, भूगोल कोष, शब्दकोष, चरित्र कोष, देविकोष, शासकीय पदनाम कोष, ऐतिहासिक शब्दकोष असे विविध प्रकारचे कोष, वाङ्मय, पुस्तके व ग्रंथ वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे ग्रंथप्रदर्शन काकाणी वाचनालयात रसिकवाचक व अभ्यासकांसाठी दोन दिवस विनामूल्य खुले राहील, असे आयोजकांनी कळविले आहे.

व्ही. जे. हायस्कूल

मनमाड : मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांचे स्वरचित काव्यवाचन घेण्यात आले. मयंक वाघ, सुहास सूर्यवंशी, ओम परदेशी यांच्या काव्यवाचनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. कवी बापू गोविंद यांनी ज्ञानपीठ पुरस्कारासंबंधी माहिती दिली. सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, उपमुख्याध्यापक संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मनमाड वाचनालय

मनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालयात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त व स्वा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वाचनालयात वाचनासाठी खास निमंत्रित करण्यात आले होते. छत्रे न्यू इंग्लिश स्कूल व मरेमा विद्यालयमधील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सलग तीन तास आपल्या आवडीची पुस्तके निवडून सामूहिक वाचनाचा उपक्रम राबविला. सर्वप्रथम इंडियन हायस्कूलची विद्यार्थिनी नूपूर आहेर व छत्रे न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी संजीवनी मोरे यांच्या हस्ते कवी कुसूमाग्रज व स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी आदी उपस्थित होते.

बेज विद्यालय

कळवण : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेज येथे आयोजित मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. प्राचार्य पी. एम. बागूल अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून अभिनवचे मुख्याध्यापक भिमराव रौंदळ उपस्थित होते. यावेळी विलास शेवाळे, जीवन बागूल, दीपक कापडणीस, प्रभाकर पवार आदी उपस्थित होते. कैलास हिरे यांनी सूत्रसंचालन केले.

दिंडोरीत गौरव दिन

दिंडोरी : येथील मविप्र महाविद्यालयात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रम उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. देवीदास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आर. आर. झोमन, एन. के. नवले, सुधीर मुरकुटे, बलराम कांबळे, डॉ. ज्योती पवार उपस्थित होते.

कुसुमाग्रज विद्यालय

निफाड : निफाड तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या तात्यासाहेब शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांच्यामुळे शिरवाडे गावाचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. त्याचा अभिमान बाळगून शिक्षणक्षेत्रात गावाने नावलौकिक मिळवावा, असे आवाहन निफाड पंचायत समितीचे सभापती पंडित आहेर यांनी केले.

मविप्रच्या कविवर्य कुसुमाग्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आहेर बोलत होते. यावेळी येथे असणाऱ्या कुसुमाग्रज ग्रंथालयात राज्यसेवा व लोकसेवा आयोगाचे अभ्यासपुस्तके स्वखर्चाने देणार असल्याचे आहेर म्हणाले. यावेळी कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन सभापती आहेर, मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक प्रल्हाद गडाख, उत्तम भालेराव, उपजिल्हाधिकारी पाटील, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, वैशाली झनकर, मुख्याध्यापक व्ही. आर. थोरात यांनी केले

रानवड विद्यालय

निफाड : रानवड कारखाना येथील क. का. वाघ विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कवि ऐश्वर्य पाटेकर, प्राचार्य विकास शिरसाट, प्राचार्य पगार, पर्यवेक्षक ढोमसे उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी मराठी भाषा काल आणि आज व कविवर्य कुसुमाग्रज या विषयावर मार्गदर्शन केले.

सटाणा नगरपालिका

सटाणा : येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे सभापती शमा अरीफ मन्सुरी, माजी उपनगराध्यक्षा निर्मला भदाणे, नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते राकेश खैरनार, बांधकाम सभापती सुनीता मोरकर, उपसभापती शमिम शफीक मुल्ला, नगरसेविका भारती सूर्यवंशी, डॉ. विद्या सोनवणे, सोनाली बैताडे, संगीता देवरे, नगरसेवक बाळू बागूल, मुख्याधिकारी हेमलता डगळे, दीपक नंदाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आप’चा निफाडमध्ये मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सुकेणे येथील आदिवासी वस्ती कायम करावी व इतर मागण्यांसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने निफाड तालुकाध्यक्ष उत्तम निरभवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात 'आप'चे जिल्हाप्रमुख अॅड. बायचले सहभागी झाले होते. सुकेण्यातील आदिवासी वस्ती कायम करण्यात येऊन त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व २०११चा शासन निर्णय लागू करावा, अनागोंदी कारभार करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या मोर्चात अनिल कौशिक, अल्ताफ शेख, सुरेश देवकर, संतोष पगारे, संतोष गांगुर्डे, भारत पवार, राजाराम गोटरणे, सुनंदा गांगुर्डे, मीरा पवार, शीतल पवार, लता हिंगमिरे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आधार’साठी धावाधाव

$
0
0

शिवाजीनगर केंद्रात गर्दी; उर्वरित भागात नवीन केंद्र सुरू करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक जिल्हा प्रशासनाने गरजेचे असलेले आधार कार्ड काढण्यासाठी ठिकठिकाणी केंद्र सुरू केले होते. परंतु, यात आधार कार्ड केंद्र चालकांकडून चुकीचे कामे केली जात असल्याचे समोर आल्याने अनेक आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत. यामुळे सातपूर भागातील शिवाजीनगर या एकमात्र शिल्लक आधार केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असून, नागरिकांची धावपळ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सातपूर भागात प्रशासनाकडून तीन आधार केंद्र देण्यात आली होती. त्यात दोन केंद्रांवर चुकीचे काम होत असल्याने त्या केंद्रांना कुलूप ठोकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एकाच शिवाजीनगरच्या आधार कार्ड केंद्रावर नागरिकांनी कार्ड काढण्यासाठी गर्दी केलेली आहे. अशात एकाचवेळी अनेकजण आधार कार्ड काढण्यासाठी येत असल्याने येथील केंद्र चालकही हैराण झाले आहेत. प्रशासनाने नवीन आधार केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गैरसोय दूर करावी

शासकीय कामकाजात आधार कार्ड सरकारने सक्तीचे केले आहे. यामुळे सहाजिकच ज्यांनी आधार कार्ड काढलेले नाही. ते कार्ड काढण्यासाठी केंद्रांवर येत असतात. सातपूर भागात तीन ठिकाणी आधार कार्ड काढण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली होती. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे दोन आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत. यात केवळ शिवाजीनगर भागात एकमेव आधार केंद्र सुरू असल्याने त्याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सोयीकरीता नव्याने आधार केंद्र सुरू करीत होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी आता केली जात आहे.

चुकीच्या कामामुळे केंद्र बंद

बंद करण्यात आलेल्या आधार केंद्रांवर चुकीचे कामे होत असल्याचा आरोपही काहीजणांनी केला आहे. त्या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अव्यवस्था तसेच चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळेच जे केंद्र बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. कुठलाही पुरावा नसताना आधार कार्ड काढले जात असल्याने प्रशासनाने आधार केंद्र बंद करण्याचा निर्णय़ घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवननगरला हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
नाशिक महानगरपालिकेने सध्या सिडकोतील अतिक्रमणाच्या समस्येकडे लक्ष दिल्याचे दिसत असून, मागील आठवड्यात सलग तीन दिवस त्रिमूर्ती चौक परिसरात अतिक्रमण मोहीम राबविली होती. मंगळवारी सिडकोतील पवननगर ते उत्तमनगरच्या मुख्य रस्त्यावरील सुमारे दीडशे ठिकाणांचे अतिक्रमण काढले. काहीजणांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतल्याचेही दिसून आले. आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सिडको परिसरातील मुख्य रस्त्यांवर सर्वाधिक अतिक्रमण झाले असून, वाहने चालविणेसुद्धा अवघड होत असते. त्यामुळे महानगर पालिकेने सुरुवातीला त्रिमूर्ती चौक भागातील भाजीबाजाराचा प्रश्न सोडवून प्रशासनाने त्रिमूर्ती चौक ते दुर्गानगर या मुख्य रस्त्यावरील दुकानांचे अतिक्रमण काढले. त्यानंतर मंगळवारी पवननगर येथून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. दुकानांच्या समोर असलेले पक्के ओटे, पत्र्यांचे शेड यांसह अतिक्रमणे प्रशासनाने हटविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही व्यवसायिकांनी अतिक्रमण काढण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने कोणालाच न जुमानता संपूर्ण रस्त्यावरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढले. पवननगर हा अत्यंत वर्दळीचा चौक असून या चौकात भाजी बाजारही असल्याने सायंकाळी या ठिकाणी चौकात वाहतुकीची कोंडी होत असते. त्यावर उपाय म्हणून हे अतिक्रमण प्रशासनाने काढले. परंतु, हे अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दिवसभर सुरू असलेल्या या मोहिमेत दीडशे अतिक्रमणे काढण्यात आली. ही अतिक्रमण मोहीम दोन जेसीबींसह पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी राबविली.

गल्लीबोळातील अतिक्रमणांचे काय?

महापालिकेने सिडकोतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सिडकोतील गल्लीबोळातील अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अनेकदा अनेक राजकीय नेत्यांचे सिडको परिसरात अतिक्रमण असताना प्रशासनाकडून त्याकडे काणाडोळा केला जात असून, सर्वांना समान न्याय प्रशासनाने दिला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सिडकोत आजही अनेक ठिकाणी रिक्षासुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिक्रमणांकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

ओटे तोडले

सिडकोत महापालिकेने राबविलेली ही मोहीम प्रथमच अशा पद्धतीने राबविण्यात आली आहे. प्रत्येक दुकानाचा ओटा काढण्याबरोबरच रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढल्याने हा रस्ता ओळखूच येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच उत्तमनगर येथे एका राजकीय माजी पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमणसुद्धा प्रशासनाने काढल्याने नवनियुक्त आयुक्तांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासऱ्याचा खून करणारा जावई पाच वर्षांनी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलीला नांदायला पाठवत नाही, या कारणातून सासऱ्याचा खून करून परागंदा झालेल्या जावयाला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच वर्षांनी शोधून बेड्या ठोकल्या. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे १९ ऑगस्ट २०१३ मध्ये खुनाची घटना घडली होती.

सोमनाथ फुलाजी मोरे (रा. खंबाळे, ता. सिन्नर) असे या संशयिताचे नाव आहे. पत्नीस नांदवण्यास पाठवत नाही या कारणातून मोरेने सासरे आत्माराम सूर्यवंशी यांची नांदूरशिंगोटे शिवारात हत्या केली होती. हत्येच्या घटनेपासून संशयित आरोपी वेगवेगळे नाव धारण करून नंदूरबारसह इतर ठिकाणी लपून राहत होता. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी फरारी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवी वानखेडे, पोलिस नाईक दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने मोरेचा शोध घेतला. मोरेला चांदवड तालुक्यातील बोपाणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासाका, निसाकाला संजीवनी?

$
0
0

अभ्यासगटाकडून कारखान्यांची पाहणी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांपैकी दहा साखर कारखान्यांना जीवदान देण्यासाठी सहकार खात्याने पुढाकार घेतला असून, या कारखान्यांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील नासाका आणि निसाका या दोन साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील या दहा साखर कारखान्यांचे बॉयलर पुन्हा पेटविण्यासाठी वास्तव परिस्थितीच्या अभ्यासासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाचीही स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटाकडून आज (दि.२८) बुधवारी नाशिक सहकारी साखर कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

अवाढव्य कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरलेल्या राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता मावळली असल्याचे चित्र आहे. या साखर कारखान्यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देखील कोणीही तयार होत नसल्याने आता शासनानेच या साखर कारखान्यांपैकी निवडक दहा साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी या निवडक दहा साखर कारखान्यांच्या सद्यपरिस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी दि.२१ फेब्रुवारी रोजी पुणे येथे साखर आयुक्तांच्या कार्यालयात या दहा साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकही झाली. तत्पूर्वीच राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या साखर कारखान्यांच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका अभ्यासगटाचीही स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटात वसंतदादा पाटील शूगर इन्स्टिट्यूटचाही समावेश आहे. जिल्ह्यातील नासाका आणि निसाका या दोन साखर कारखान्यांचा या दहा साखर कारखान्यांत समावेश आहे. जिल्ह्यातील निफाड सहकारी साखर कारखान्याचीही या पथकाकडून मंगळवारी (दि.२७) पाहणी करण्यात आली आहे.

नासाकाला आज भेट देणार

आज (दि.२८) बुधवारी वसंतदादा पाटील शूगर इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांचे एक पथक नाशिक सहकारी साखर कारखान्याचा पाहणी दौरा करणार आहे. या पाहणी दौऱ्यानंतर हे पथक राज्याच्या साखर आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार असून, या दहा साखर कारखान्यांचा एकत्रित अहवाल पुढे राज्याच्या सहकारंत्र्यांना सादर केला जाणार आहे. त्यानुसार या साखर कारखान्यांचे भवितव्य ठरणार आहे. आज पाहणीसाठी येणाऱ्या पथकाने नासाकाच्या बाबतीत अनुकूल अहवाल सादर केल्यास नासाकाचा बॉयलर पुढील गळीत हंगामात धगधगण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजतारेमुळे डाळिंबबागेचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

चौगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोगदरा शिवारातील लताबाई वसंत शेवाळे, भास्कर रतन शेवाळे यांच्या शेतातील डाळिंबबागेस दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीजतारेची ठिणगी पडल्याने बाग जळून अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

चौगाव शिवारातील भोगदर येथे वीज वितरण कंपनीच्या तारा शेतातून गेल्या आहेत. तारांच्या झोळामुळे शॉटसर्किट होऊन लताबाई शेवाळे यांच्या शेतातील डाळिंब बागेचे नुकसान झाले. डाळिंबाची झाडे, ठिबक, पाइपलाइनला आगीचा फटका बसला आहे. तीन वर्षांपूर्वी लताबाई त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या आपल्या दोन मुलांसह शेती कसतात. लताबाई यांनी बँकेकडून सात लाख रुपयांचे कर्ज व तीन लाख रुपयांचे सोने तारण ठेवत डाळिंब बाग लावली. पाण्याचा तुटवडा असतानादेखील व्याजाने पैसे घेऊन डाळिंब बागेस सटाणा परिसरातून पाणी विकत घेत डाळिंब पिकास टँकरने पाणी देत होत्या. दोन महिन्यात डाळिंब बाग काढणीवर येणार असताना अचानक बागेस आग लागून सर्व झाडे, ठिबक, पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले आहे.

शेजारील भास्कर शेवाळे यांच्यादेखील दीड एकरमधील साडेपाचशे डाळिंबाची झाडे जळून खाक झाली. प्रभाकर गांगुर्डे यांच्या शेततळ्यातील प्लास्टिक कागदालादेखील बहुतांश ठिकाणी छिद्रे पडलेले आहेत. या आगीमुळे सुमारे आठ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. तलाठी व कृषी सहायक अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images