म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही' अशा आशयाचे फलक झळकावून 'तिहेरी तलाक'संदर्भातील विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे, या मागणीसाठी मुस्लिम महिलांनी मूक मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने सहभागी होत महिलांनी एकजुटीचे दर्शन घडविले. मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिसांकडून मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने काही चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
तिहेरी तलाक विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी शरियत बचाव कमिटीने मोर्चाची साद घातली होती. त्याला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने महिला या मूक मोर्चात सहभागी झाल्या. दुपारी अडीच वाजता जुन्या नाशिकमधील बडी दर्गाच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली़ दूध बाजार, खडकाळी, जिल्हा परिषद, त्र्यंबकनाकामार्गे मोर्चा गोल्फ क्लब मैदानावर दाखल झाला. त्यानंतर 'शरियत बचाव' कमिटीतील फरहात आसिफ हरणेकर (महिला धर्मगुरू, मदरसा सरकारे कला), सायमा खानम (महिला धर्मगुरू, सुन्नी दावते इस्लामी), हुमेरा सय्यद (महिला धर्मगुरू, मदरसा कथडा), इनामदार नुसरत, देशमुख इरम फातेमा, अन्सारी मुनाफ, शेख नाझफातेमा, शेख कश्मिरा या महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन दिले़ इस्लाम धर्मात महिला कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली इस्लामी कायद्यात सरकार ढवळाढवळ करीत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. 'इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही' अशा आशयाचे फलक झळकावून शरियतमध्ये कोणीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही देण्यात आला़
शिक्षेची तरतूद कशासाठी?
भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, प्रत्येक धर्मियांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे़ 'तिहेरी तलाक'संदर्भात पूर्वीपासून कायदा अस्तित्वात असताना सरकारने नव्याने विधेयक सादर करण्याची गरज नाही, असे 'शरियत बचाव' समितीने निवेदनात म्हटले आहे. तलाक हा पूर्णत: वैवाहिक स्वरुपाची बाब असून, ती दिवाणी स्वरूपाची आहे. देशातील सर्वधर्मियांमध्ये तलाक (घटस्फोट) दिल्यास शिक्षेची तरतूद नाही. मग नव्या विधेयकानुसार मुस्लिम धर्मियांना तलाकबाबत (घटस्फोट) शिक्षेची तरतूद कशासाठी, असा प्रश्नही समितीने उपस्थित केला. यानंतर त्र्यंबकरोडवरील शहाजहांनी ईदगाह मैदानावर मुस्लीम महिला धर्मगुरूंची प्रवचन सभा झाली़ सायंकाळी पाच वाजता शहरे ए खतिब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रार्थनेने या मोर्चाचा समारोप झाला़
वाहतुकीची कोंडी
महिलांची प्रचंड गर्दी झाल्याने त्र्यंबक नाक्याकडे येणाऱ्या सर्व मार्गांवरील वाहतूक सुमारे एक तास बंद करण्यात आली. परिणामी द्वारका सर्कल, मुंबईनाका, जुने सीबीएस, शालिमार, महात्मा गांधी रोड, चांडक सर्कल या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली. पायी चालणाऱ्या नागरिकांना मोर्चा मार्गातून येण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे पोलिस आणि पादचारी यांच्यातही वाद झाले.
चोख बंदोबस्त
अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे ५५० अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर होते. त्यामध्ये पोलिस उपायुक्त - २, सहायक पोलिस आयुक्त - २, पोलिस निरीक्षक - १०, उपनिरीक्षक - ३२, पुरुष कर्मचारी - ३०२, महिला कर्मचारी - १७५, स्ट्रायकिंग फोर्स - २, निर्भया पथक - १, वाहतूक पोलिस - १७५ यांचा समावेश होता.