म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराच्या आरोपांमुळे काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार ट्रस्टच्या विद्यमान कार्यकारिणी बरखास्तीचा ठराव रविवारी दुपारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने सर्वानुमते संमत करण्यात आला.
बुद्धविहार ट्रस्टवर विद्यमान कार्यकारिणीने नवीन सभासद नोंदणीवर आजवर घातलेली बंदीही उठवण्यात आली. मात्र, ट्स्टच्या विद्यमान अध्यक्षांनी ही सभाच बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. येथील देवी चौकात ऐतिहासिक बुद्धविहार आहे. त्याची व्यवस्था नोंदणीकृत बुद्धविहार पब्लिक ट्रस्टर्फे बघितली जाते. परंतु, या ट्रस्टच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कामकाजावर मनमानीबरोबरच भ्रष्टाचाराचेही आरोप झाले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून बुद्धविहार ट्रस्टचा कारभार चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी बुद्धविहार बचाव कृती समितीची स्थापना झाली होती. या समितीत विद्यमान कार्यकारिणीतील विलास गांगुर्डे आणि माणिक साळवे या दोघा ट्र्स्टींचाही समावेश होता. या सभेस विश्वस्त विलास गांगुर्डे, शशिकांत उन्हवणे, प्रकाश बागुल,चावदास भालेराव, पी. के. गांगुर्डे, अमोल घोडे, रविकांत भालेराव, पुंडलिक बर्वे, भीमचंद चंद्रमोरे, इंद्रजित भालेराव, उन्मेश थोरात, मानसी जाधव, स्वाती भुजबळ आदींसह बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.
---
सर्व ट्रस्टींच्या विचारविनिमय व परवानगीशिवाय बुद्धविहार ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण बोलावण्याचा अधिकार इतरांना नाही. त्यामुळे रविवारची सभाच बेकायदेशीर आहे.
-भास्कर कटारे, अध्यक्ष, बुद्धविहार पब्लिक ट्रस्ट
०००
नंदिनी नदीच्या नावासाठी साकडे
म. टा. वृत्तसेवा, सिडको
शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीचे रूप गेल्या अनेक वर्षांत बदलून गेले असून, या नदीचे नावसुद्धा नासर्डी झाले आहे. नंदिनीची स्वच्छता करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत असून, सरकारदप्तरी आता नासर्डी हे नाव न वापरता नंदिनी हेच नाव वापरण्यात यावे, असे साकडे गोदा संवर्धन मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
निवेदन देताना जय बजरंग युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, निशिकांत पगारे, पंकज भिंगारे, नितीन कोलेकर, विनोद पाटील, विपुल आपटे, अनुजा कुलकर्णी, सुजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शहरातून वाहणारी नासर्डी नसून, नंदिनीच आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, त्याचा अद्यापही कोठेही बदल झाल्याचे दिसत नाही. सरकारी कागदोपत्री आजही नासर्डी हा उल्लेख करण्यात येत आहे. नंदिनी उल्लेख करून त्याला अधिकृतपणे प्रेक्षणीय स्थळ म्हणून उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नंदिनी हे नाव सरकारच्या गॅझेटमध्येच समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नंदिनी नदीलगत आजही अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर होत असून, नदीत प्लास्टिक व कचरा टाकला जात आहे. वारंवार संस्थांकडून नदीची सफाई होत असली, तरी असा कचरा किंवा प्लास्टिक नदीत येणारच नाही यासाठी सरकारी यंत्रणेने पुढाकार घेऊन कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे. सरकारी दस्ताऐेवजात किंवा कोठेही फलक लावतांना तो नासर्डी असा न लावता नंदीनी हाच उल्लेख झाला पाहिजे यासाठी पुढाकार घेण्यात यावा व ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचावेोवी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नासर्डी हा शब्दच नाशिककरांबरोबरच बाहेरून येणार्या पर्यटकांच्या तोंडून हद्दपार होवून नंदीनी हेच नाव आले पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली असून यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.