पंडित निकम यांचा इशारा म. टा. वृत्तसेवा, कळवण वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास मागील गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत 'वसाका'चा चालू गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडित निकम यांनी दिला आहे. वसाकाच्या ऊस उत्पादकांच्या मागील गळीत हंगामाच्या देणीबाबत निकम यांनी देवळा येथे पत्रकार परिषद घेतली. वसाकाच्या यंदाच्या गाळप हंगामाला साखर आयुक्तांनी परवानगी दिली नसताना नुकतेच या साखर कारखान्याचे बॉयलर पूजन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक सभासदांचा दिशाभूल करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप निकम यांनी केला. कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली अडकला असल्याने तो या वर्षांपासून धाराशिव साखर कारखान्याला भाडेतत्त्वावर चालवायला दिला आहे. या कारखान्याकडे उस उत्पादकांचे व कामगारांचे देणी थकली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत ऊस उत्पादकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील असे आश्वासन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात एक हजार रुपये प्रमाणेच देणी दिली. गव्हाण पूजनाच्या पूर्वी जर ऊस उत्पादकांचे ऊस बिल दिले नाही तर सुरू होणाऱ्या हंगामासाठी गव्हाण पूजन करू दिले जाणार नाही असे निकम यांनी पत्रकात नमूद केले आहे. प्राधिकृत मंडळाच्या कारकिर्दीत कामगारांचा संपूर्ण पगार बाकी ठेवला. तर १५/१६ च्या गळीत हंगामात ९२ हजार टन ऊस गाळप केला व ऊस उत्पादकांना फक्त १७४० रुपये भाव दिला. हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. मात्र इतर साखर कारखान्यांनी २१०० रुपये भाव दिला आहे. दरम्यान वसाकाने चालूगळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊस उत्पादकांचे पैसे दिले नाही तर गव्हाण पूजनाचा कार्यक्रम हाणून पाडू असा इशारा कारखान्याचे सभासद व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांनी दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट