जिल्ह्यातून ३.२४ टीएमसी पाणी जायकवाडीला म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक जायकवाडी धरणाला नाशिकहून सोडले गेलेले पाणी सोमवारी दुपारी ३ वाजता थांबवण्यात आले. दारणा धरण समूहातून या पाण्याचा गुरुवारपासून (दि. १) विसर्ग सुरू होता. ३.२४ टीएमसी पाणी सोडल्यानंतर ते थांबवण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणाचे गेट दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आले. त्यानंतर नाशिकमधून हा विसर्ग थांबला. समन्यायी पाणी वाटपातून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून ८.९९ टीएमसी पाणी देण्याचे आदेश गोदावरी मराठाडवाडा पाटबंधारे विभागाने दिला होता. त्यानंतर त्यावर नाशिक व नगर जिल्ह्यातून प्रचंड विरोध झाला. नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळी सोडण्यात आलेले पाणी सायंकाळी थांबवण्यात आले. त्यानंतर दारणा समूहातून सर्व पाणी देण्याचा निर्णय झाला व अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला. या पाणीवाटप प्रक्रियेत जलसंपदा, महसूल व पोलिस यंत्रणेवरही ताण होता. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवस अगोदरच पाणी सोडणे थांबवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला. असे गेले पाणी नाशिक जिल्ह्यातून सुरुवातीला गंगापूर व पालखेड धरण समुहातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. पण, पालखेड धरणात दुष्काळी गावांना पाणी टंचाई भासेल म्हणून अगोदर या धरण समूहातून पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले. पण, नाशिकला भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून पाणी थांबवण्यात आले. दरम्यानच्या काळात ६०० पैकी ८० दशलक्ष घनफूट सोडण्यात आले. त्यानंतर दारणातून पाणी सोडण्यात आले. त्यात गंगापूर धरणाचा आकडाही पकडण्यात आला. निळवंडेतून विसर्ग सुरुच दारणा, मुळा धरणाचा विसर्ग थांबवण्यात आला असला तरी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून विसर्ग मात्र सुरुच राहणार आहे. त्यासाठी किती वेळ लागेल हे सांगणे अधिकाऱ्यांनी टाळले. पण, आठ दिवस हे पाणी सुरुच राहणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट