Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

करवाढ मागे घेण्यासाठी भाजप-सेनेचा रेटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने नवीन मिळकतींना लाखोंच्या घरपट्ट्या पाठविण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांचा राजकीय पक्षांवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे करयोग्य मूल्याबाबत तुकाराम मुंढे यांनी महासभेला डावलून काढलेला आदेश क्र. ५२२ रद्द करण्यासाठी नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सर्वपक्षीयांनी रेटा लावला आहे. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने, तसेच भाजपच्या आमदार सीमा हिरेंनी सोमवारी आयुक्त गमेंची भेट घेऊन अन्यायकारक करवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.

मुंढे यांनी नाशिककरांवर लादलेल्या एकतर्फी करवाढीच्या नोटिसा नागरिकांच्या हातात पडल्यानंतर नागरिक भयभीत झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ६२ हजार मिळकतींना नोटिसा पाठविल्या जात आहेत. शहरातील २.६९ हजार मिळकतीही मुंढेंनी अनधिकृत ठरवल्या आहेत. त्यामुळे नाशिककर दहशतीखाली असतानाच, मुंढेंची बदली होऊन पालिकेत आता नूतन आयुक्त आले आहेत. त्यामुळे मुंढेंच्या काळात झालेल्या सर्व विषयांचा फेरआढावा घेण्याची मागणी केली जात असून, ही करवाढ मागे घेण्याबाबतही आयुक्तांना साकडे घातले जात आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महापालिकेकडून ६२ हजार मिळकतींना बजावल्या जात असलेल्या घरपट्ट्यांच्या नोटिसा थांबविण्याची मागणी केली. आयुक्तांनी यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

आमदार हिरेंनी घेतली भेट

महापालिकेने केलेली अवाजवी करवाढ रद्द करण्यासाठी आमदार सीमा हिरे यांनीही सोमवारी आयुक्त गमेंची भेट घेतली. यावेळी नगरसेवक नीलेश ठाकरे, नगरसेविका प्रतिभा पवार, अलका अहिरे, माधुरी बोलकर, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, पुष्पा आव्हाड, पल्लवी पाटील, दिलीप देवांग उपस्थित होते. नागरिक दडपणाखाली असून मनपा प्रशासनाकडून रोज नोटिसा काढल्या जात आहेत. कधी अतिक्रमण विभागाची धास्ती तर कधी मिळकत व विविध कर विभागाकडून मिळकतींवर अन्यायकारक कर आकारणी. सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील नवीन इमारतींना बांधकामासाठी कपाटांच्या तांत्रिक मुद्द्यावरुन पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसल्याने त्या सर्व इमारती अनधिकृत ठरवून विविध कर विभागाने सरसकट तिप्पट दंडात्मक आकारणीच्या नोटिसा पाठवल्या. ही तिप्पट करआकारणी थांबवण्याची मागणी हिरे यांनी केली.

रद्द कामे पुन्हा घ्या

उपमहापौर प्रथमेश गिते यांनीही सोमवारी आयुक्त गमेंची भेट घेऊन महासभा व स्थायी समितीने मंजूर केलेली परंतु, मुंढेंनी त्रिसूत्रीच्या नावाने रद्द केलेली कामे पुन्हा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. शहरातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा या कामांचा पाठपुरावा करून नगरसेवकांनी ती मंजूर केली. निविदा प्रक्रियाही राबवली. परंतु, मुंढे यांनी अचानक या कामांना ब्रेक लावला. त्यामुळे रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा व उद्यानांचा प्रश्न बिकट बनला आहे. महासभा, स्थायी समितीने प्रभागातील मंजूर केलेली कामे तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हरसूलमध्ये शनिवारी साहित्य संमेलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक, कला, क्रीडा, साहित्य व संस्कृती संवर्धन मंडळ इगतपुरी तालुका व साहित्य परिषद प्रकाशन संस्था आहुर्ली, (ता. इगतपुरी) यांच्यातर्फे सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे साहित्य संमेलन नगरी, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हरसूल येथे यंदाचे सातवे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन शनिवारी (दि. १५) होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु प्रा. डॉ.एन.एस उमरानी यांच्या हस्ते तर सुप्रसिध्द दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संमेलनाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित, माजी आ. काशीनाथ मेंगाळ, शिवराम झोले, जि. प. उपाध्यक्षा नयना गावित, जि. प. सदस्य रूपांजली मालेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रथम उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक हभप देवीदास वारुंगसे, सूत्रसंचलन प्रा. डॉ. पी. शेवाळे, प्रा. एस. के. सानप करणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता प्रा. डॉ.संजय लोहकरे, अमरावती यांचे 'स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान' या विषयावर व्याख्यान होईल. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती व संस्थाचा विविध आदर्श पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. साहित्य परिषद प्रकाशन यांच्या वतीने प्रसिद्ध साहित्य संमेलन विशेषांक, पुस्तक व कॅलेंडर प्रकाशन सोहळा रंगणार आहे.

दुपारी १ वाजता नाशिक येथील जे. डी. आर्ट महाविद्यालयाचे चित्रकार विद्यार्थी कलाकारांचे चित्र प्रदर्शन भरणार असून त्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत सावळीराम तिदमे यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात विनोद जमधडे, सिद्धार्थ माछी, चेतन पाटील, वैभव गायकवाड, विजय देवकर आदींचा सहभाग असेल. त्यानंतर मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील. यात डॉ. देवराम गायकवाड देवगावकर यांचे भारुड, तर जादूगार रूपचंद डगले यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.

दुपारी २ वाजता कथाकथन सत्र होईल. त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. जयप्रकाश घूमटकर यांची 'कोळी वाडा ते नागपाडा : एक प्रवास' या विषयावर प्रकट मुलाखत होईल. ३ ते ५ या वेळेत भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा होईल. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर म्हरसाले, सुभाष सबनीस व भीमराव कोते पाटील हे करतील. ज्येष्ठ साहित्यिक शरद पुराणिक व देवीदास खडताले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होईल. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी अलका कोठावदे या तर प्रमुख पाहुणे म्हणून मनीषा कुलकर्णी व प्रा. डॉ. मोरे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवास साहित्यिक साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक नवनाथ गायकर व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेट बँकेत हॅकर्सचा डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

भारतीय स्टेट बँकेच्या अशोकनगर व एमआयडीसी सातपूर येथील दहा ते बारा खातेदारांचे पैसे ठाणे, गया आदि ठिकाणच्या एटीएममधून काढून परस्पर काढून घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खात्यातून इतर ठिकाणाहून पैसे काढले गेल्याचा मेसेज आल्यानंतर ग्राहकांनी बँकेत विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असल्याने ग्राहकांचा या बँकेवर विश्वास आहे. मात्र, या बँकेलाही हॅकर्सनी लक्ष्य केले असून, ग्राहकांच्या पैशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सातपूर, अशोकनगर भागातील काही खातेदारांना मंगळवारी विविध ठिकाणच्या एटीएममधून पैसे काढण्यात आल्याचे मेसेज आले. यामुळे घाबरलेल्या खातेदारांनी बँकेत धाव घेतली. मात्र, बँकेतून त्यांच्या तक्रारीचे निरसन न करता पोलिस स्टेशनला जाण्याचा सल्ला तेथील अधिकाऱ्यांनी दिला. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे सोमवारी रात्री ८ वाजेनंतर व मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या आत एका रात्रीतून काढण्यात आले आहेत.

हाफिजा पिंजारी यांचे स्टेट बँकेच्या सातपूर एमआयडीसी शाखेत खाते आहे. सोमवारी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज आला. पुन्हा ८ वाजून १२ मिनिटांनी त्याच एटीएममधून १० हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. याबाबत हाफिजा यांचे पती जावेद पिंजारी यांनी बँकेत धाव घेऊन याबाबत विचारणा केली.

साहेबराव कोरडे हे सीआरपीएफमधून निवृत्त झालेले असून, त्यांच्याही खात्यातून ८ डिसेंबरला सातपूरच्या स्टेट बँकेच्या खात्यातून मंगळवारी पहाटे ५ वाजता आधी २० हजार रुपये काढले गेले व नंतर पुन्हा २ हजार ५०० रुपये काढण्यात आले. सोनू पाथी यांच्या खात्यातूनही मंगळवारी पहाटे खात्यातून आधी २० हजार व नंतर ६ हजार रुपये काढण्यात आले. हे पैसे परत मिळण्यासाठी खातेदारांनी बँकेत गर्दी केली. मात्र, बँकेने त्यांना पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला. या ग्राहकांनी पोलिस स्टेशन गाठून परस्पर पैसे काढण्यात आल्याची तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर फसवणूक

$
0
0

बँकेचे कार्ड क्लोन करून परस्पर परजिल्ह्यात पैसे काढण्यात आल्याचा हा प्रकार दिसतो. याबाबत तीन ते चार तक्रारदारांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असून, त्यांचे अर्ज दाखल करून घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

- देवराज बोरसे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छ’ सर्वेक्षणाची तयारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात जानेवारी २०१९ स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येणार असून, नाशिकमध्ये केंद्राचे पथक स्वच्छतेच्या पाहणीसाठी येत्या ४ ते ३१ जानेवारीदरम्यान दाखल होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने या सर्वेक्षणासंदर्भात जनजागृती सुरू करण्यात आली असून, ठिकठिकाणी फलक लावण्यात येत आहेत. गेल्या वेळी अमृत योजनेतील पाचशे शहरांमध्ये पालिकेचा ६३ वा क्रमांक लागला होता. परंतु, यंदा यंदा महापालिकेची स्पर्धा देशभरातील ४२०३ शहरांसोबत होणार असल्याने सध्याचा क्रमांक टिकवून ठेवण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी देशभरातील ७३ शहरांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत नाशिकचा ३१वा क्रमांक आला होता. दुसऱ्या वर्षी ४७४ शहरांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत नाशिकची क्रमवारी १५१ व्या क्रमांकावर घसरली होती. गेल्या वर्षी नाशिकला ४१४१ शहरासोबत स्पर्धा करावी लागली होती. सोबतच केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या ५०० शहरांच्या स्वतंत्र वर्गवारीत नाशिकचा क्रमांक ६३ वर आला होता. परंतु, चार हजार शहरांमध्ये मात्र तो तळाला गेला होता. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दहामध्ये नाशिकचा क्रमांक यावा अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतरही नाशिकचा क्रमांक घसरला होता. त्यामुळे यंदा हा क्रमांक वर येण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यंदा महापालिकेची स्पर्धा देशभरातील ४२०३ शहरांसोबत होणार असल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. या स्पर्धेसाठी पाच हजार गुण ठेवण्यात आले आहेत. गेल्या वेळी महापालिका जनजागृती करण्यात आणि नागरिकांच्या प्रतिसादात कमी पडली होती. त्यामुळे यंदा डिसेंबरमध्येच जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्रात जनजागृतीपर प्रबोधनात्मक डिजिटल बॅनर्स, होर्डिंग्ज उभारले जात आहेत. सोबतच नागरिकांना हस्तपत्रके, स्टिकर्सद्वारे अभियानाची माहिती दिली जाणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, उघड्यावर शौचास प्रतिबंध, स्वच्छ व साफ शौचालये, कचरा इतरत्र न फेकणे यासाठी प्रबोधनात्मक रथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भिंतींवर प्रबोधनात्मक रंगकाम केले जाणार आहे.पहिल्या दहा मध्ये नाशिकला आणण्यासाठी आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली आहे.

असे असेल गुणांकन

महापालिकेची सेवा- १२५० गुण

कचरामुक्त शहरासाठी - १२५० गुण

केंद्राच्या पथकाहाती गुण- १२५० गुण

नागरिकांचा प्रतिसाद - १२५० गुण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीच्या चर्चेत काँग्रेसचा वरचष्मा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेसने तीन राज्यांमध्ये मारलेल्या मुसंडीचे महाराष्ट्राच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा जागांबाबत सुरू असलेली बोलणी काँग्रेस नेतृत्वाने मध्येच स्थगित केली होती. ११ डिसेंबरनंतरच ही बोलणी होऊ शकतात, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. आता तीन राज्यांमध्ये काँग्रेसची जोरदार घोडदौड पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसला हव्या त्या व हव्या तेवढ्या जागा काँग्रेसकडून सोडल्या जाण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २४-२४ किंवा २५-२३ असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला होता. राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये वाद होता. काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्याची मागणी काँग्रेसकडून होती तर काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत होती. राष्ट्रवादी काँग्रेसला आता हव्या त्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर मनातून राग असणरे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत. त्यात राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. काँग्रेसचा राजकारणातील वाढलेला प्रभाव पाहता, आता या नेत्यांना बळ मिळणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांमध्ये सुरू होणाऱ्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहणार आहे.

दुसरीकडे या पाच राज्यांमधील निकालांकडे डोळे लावून बसलेल्या शिवसेनेकडूनही भाजपसोबत बोलणी करताना अधिक कठोर सूर लावला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अत्यंत चांगले राजकीय संबंध ठेवले असले तरी शिवसेना येत्या लोकसभा निवडणुका व मुख्य म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभांसाठी जोरदार मोर्चेबांधणी या निकालांनंतर करणार असल्याचे शिवसेनेच्या गोटात बोलले जाते. लोकसभेला शिवसेनेसोबत युती करण्यास भाजप अत्यंत आसुसलेला आहे. मात्र लोकसभेपेक्षा विधानसभेत शिवसेनेला अधिक रस आहे. त्यामुळे लोकसभेची बोलणी यशस्वी झाल्यानंतर विधानसभेला शिवसेना फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला मान्य करेल किंवा कसे, याबाबत शिवसेना नेतृत्वाच्या मनात शंका आहेत. त्यामुळे लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका घेण्याचा आग्रह शिवसनेकडून होऊ शकतो. तसेच विधानसभेला समसमान जागा वाटप केल्याशिवाय तर लोकसभेलाही युती होऊ शकत नाही. २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या १२३ जागा निवडून आल्या होत्या, तर सेनेच्या ६३ अशा वेळी समसमान म्हणजे प्रत्येकास १४४ जागांचे वाटप करायचे असल्यास भाजपला मोठा त्याग करावा लागणार आहे, तसेच इतर छोट्या मित्र पक्षांचीही नाराजी पत्करावी लागणार आहे. मात्र पाच राज्यांमधील निवडणूक निकालांमुळे शिवसेना भाजप नेतृत्वाला नाक मुठीत धरायला लावणार असल्याची चर्चा शिवसेनेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएम चषकासाठी ३३ हजार खेळाडूंची नोंदणी…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे आयोजित सीएम चषक क्रीडा व कला स्पर्धेस पूर्व विधानसभा मतदार संघात उदंड प्रतिसाद लाभला असून, आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आठ क्रीडा व चार कला प्रकार आहेत.

नाशिकपूर्व विधानसभा मतदारसंघात १४ डिसेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत तपोवन येथे क्रिकेट, १५ व १६ डिसेंबर दरम्यान श्रीराम विद्यालय, सेवाकुंज, पंचवटी येथे कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल, कॅरम व कुस्ती स्पर्धा होणार आहेत. १६ डिसेंबर रोजी १०० मी व ४०० मी धावणे ही स्पर्धा स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकूल, पंचवटी येथे होतील. २२ व २३ डिसेंबर रोजी गायन व नृत्य स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, स्वामी नारायण नगर, औरंगाबाद नाका, पंचवटी येथे होतील. २३ डिसेंबर रोजी भाजीबाजार, पटांगण रामघाट, पंचवटी येथे व नाशिकरोड विभागासाठी शिखरेवाडी हॉल, नाशिक रोड येथे रांगोळी स्पर्धा होतील. २५ डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पंचवटी आणि नाशिकरोड भागासाठी राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे चित्रकला स्पर्धा होतील. स्पर्धेचे उद्घाटन १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता श्रीराम विद्यालय, पंचवटी होणार आहे. महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. जास्तीत जास्त खेळाडू व विद्यार्थी महिला भगीनींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहिदांच्या वारसांना एसटीत नोकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मातृभूमीच्या संरक्षणार्थ शत्रूशी लढताना शहीद झालेल्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सामावून घेण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंर्तगत या घटकांना एसटी महामंडळात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहीद जवानांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विचाराधीन होते. अशा जवानांप्रतीचा आदर जपतानाच त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाने याबाबतचे आदेश जारी केले असून नाशिक विभागालाही हे आदेश प्राप्त झाले आहेत. देशाच्या सिमांवर मातृभूमीचे रक्षण करताना जवानांना शत्रूशी दोन हात करावे लागतात. यामध्ये जवानांना वीरमरण प्राप्त होते अशा शहीद झालेल्या संरक्षण दलातील अधिकारी आणि जवानांच्या वारसांना शहीद सन्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा वारसांना सरकार मान्यतेने वर्ग तीन प्रवर्गात नेमणूक मिळू शकणार आहे. वर्ग तीनची पदे वगळता अन्य पदांसाठी शहिदांच्या वारसांना अर्ज करता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.

अर्ज पाठविण्याचे आवाहन

शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना एक वर्षांच्या कालावधीत नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. परंतु, शहिदांचे पाल्य अर्ज करण्यासाठी पात्र नसतील अथवा त्यांच्याकडे आवश्यक ती शैक्षणिक अर्हता नसेल तर अहर्ता प्राप्त केल्यापासून एक वर्षाच्या आत सुयोग्य पदासाठी अर्ज करण्याची मुभा त्यांना असणार आहे. अनुकंपा तत्वावर नोकरी देताना कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी आहे. एन. डी. पटेल रोडवरील नाशिक विभागीय कार्यालयात याबाबतची अर्जप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून कामकाजाच्या वेळेत आस्थापना शाखेतून अर्ज घ्यावेत, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.

महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत. शहीद जवानांच्या वारसांनी आमच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. शैक्षणिक अहर्तेनुसार पात्र लाभार्थींना वर्ग तीन म्हणून नोकरीची संधी मिळू शकेल.

- नितीन मैंद, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंढेंच्या बदलीमुळे वाहतुकीचे प्रश्न मार्गी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ट्रॅफिक सिग्नल्स, प्रमुख चौकांचे सुशोभिकरण, धोकादायक स्पीड ब्रेकरऐवजी आधुनिक रॅम्बलर टाकणे अशा विविध वाहतुकीसंबंधी रखडलेच्या कामांच्या प्रस्तावास चालना देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या महत्त्वाच्या कामांना कात्री लावत नागरिकांनाच शिस्त पाळण्याचे आवाहन केले होते.

शहरात वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियोजन करतात. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून दंडात्मक स्वरूपात मिळालेले पैसे शासनदरबारी जमा करण्यात येतात. वाहतुकीबाबत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम पोलिसांकडे नाही. हे काम स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका करीत असते. वाहतूक पोलिस वेळोवेळी सर्व्हे करून कोणत्या चौकात सिग्नल्सची, स्पीड ब्रेकरची अथवा इतर पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे याची नोंद करतात. यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून महापालिकेला सादर केला जातो. या प्रस्तावावर पुढे महापालिका प्रशासन काम करते. याच माध्यमातून शहर पोलिसांनी शरणपूररोड सिग्नल सुशोभिकरणाचे काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढे शहरातील किमान १७ चौक या पद्धतीने तयार करण्यात येणार होते.

शहरातील गंगापूररोड, महात्मानगर अशा काही रस्त्यांवर बिल्कर्स बसविण्यात आले. धोकादायक स्पीड ब्रेकरला रम्बलर हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. पोलिस आणि महापालिका प्रशासन परस्पर सामज्यातून ही कामे पूर्णत्वास नेत होती. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत होती. तसेच वाहनचालकांनाही नियमांची जाणीव होत होती. मात्र, मुंढे यांनी या कामांना खीळ घातली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हे सर्व प्रस्ताव बासनात गुंडाळले. काही दिवसांपूर्वी सरकारने मुंढेंची बदली केली. नवीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पदभार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने रखडलेल्या प्रस्तावांना गती देण्यासाठी चाचपणी सुरू आहे. यावेळी नूतन महापालिका आयुक्त पोलिसांबरोबर हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार काय, याची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राजक्ता बियाणी नेट जेआरएफ उत्तीर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील आरवायके कॉलेजची माजी विद्यार्थिनी प्राजक्ता प्रमोद बियाणी हिने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणाऱ्या सीएसआयआर नेट परीक्षेत यश मिळविले आहे.

जून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 'लाईफ सायन्स' या विषयात प्राजक्ताला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली असून त्यासाठी अखिल भारतीय स्तरावर तीला ६८ वे मानांकन मिळाले आहे. प्राजक्ता सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) भोपाळ या संस्थेत एम. एस्सी. च्या अंतिम वर्षात शिकते आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सेवा विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद बियाणी यांची ती कनिष्ठ कन्या आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून विजयाचा जल्लोष

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने घवघवीत यश संपादन केल्यानंतर काँग्रेसचा विजयोत्सव शहर काँग्रेसमध्येही जल्लोषात साजरा करण्यात आला. शहर काँग्रेस, युवक काँग्रेससह ग्रामीण काँग्रेसने फटाके फोडून तीन राज्यातील विजयाचा आंनद साजरा केला. यावेळी राहुल गांधींच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. एकमेकांना पेढे वाटून काँग्रेसने हा आनंद साजरा करण्यात आला आहे. आता भाजपचे बुरे दिन सुरू झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

अनेक निवडणूकांपासून सपाटून मार खात असलेल्या काँग्रेसला राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या निवडणूक निकालाने मोठा आधार मिळाला आहे. लोकसभेची सेमिफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून पक्षाला २०१४ नंतर प्रथमच एवढे यश प्राप्त झाले आहे. निवडणुकांच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर शहर काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. ढोल-ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शहराध्यक्ष शरद आहेर, गटनेते शाहू खैरे, तालुकाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे, राजेंद्र बागूल यांच्यासह नेते उपस्थित होते.

'एनएसयूआय'च्या वतीने अॅड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्त्वाखाली आनंदोस्तव साजरा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीनंतर तसेच देशातील अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेली मोदी लाट ओसरून संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट आली असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मत माजी आमदार, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी व्यक्त केले आहे.

भाजपचे 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी, गोरगरिबांना साडेचार वर्षात कोणताच लाभ मिळाला नाही. परंतु, भाजपने आकड्यांचा जुमला केला आहे. भाजपने घोर फसवणूक केल्याने आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळात काम केल्याने काँग्रेसचा हा विजय झाला आहे.

- शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसची ही अस्तित्वाची लढाई होती. सद्यस्थितीत देशात निर्माण झालेले असहिष्णू वातावरण दूर करून धर्मनिरपेक्षता, संविधानाचा आदर करणारे शासन व विकास यांची सांगड घालण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत. मोदी लाट ओसरली असून संपूर्ण देशभरात आता परिवर्तनाची लाट येणार आहे.

- अॅड. जयप्रकाश छाजेड, माजी आमदार

नोटबंदी, जीएसटी, गगनाला भिडलेली महागाई, शेतमालाचे कोसळले भाव त्यामुळे देशातील जनता त्रस्त झाली असून त्याचाच परिणाम आज पाच राज्यांच्या निवडणुकीत दिसून आला आहे. जनतेला दाखवलेली खोटी स्वप्ने आणि आश्वासनांची पूर्तता करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपण लाचारी पत्करली नाही!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके आणि सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यात आता वाकयुद्ध सुरू झाले असून, आहेर-आडके यांच्या आरोपावर पाटील यांनीही पलटवार केला आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर आपण आजही ठाम असून, मुंढेंची कधीही लाचारी पत्करली नाही असा टोला त्यांनी सभापतींनी लगावला आहे. स्वार्थासाठी आपण कोणाशी हातमिळवणी केली नसून मुंढेंच्या समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांना मदतही केली नाही, अशा आशयाचे पत्र पाटील भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व महापौर रंजना भानसी यांना सादर केले आहे.

गंगापूररोडवरील वादग्रस्त सर्व्हे क्रमांक ७०५च्या आरक्षित भूखंडाच्या संपादनापोटी रोखीने मोबदला अदा करण्याच्या प्रशासनाच्या कृतीनंतर सभागृहनेते पाटील व सभापती आहेर-आडके यांच्यात आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक संघर्षाने मात्र भाजपचीच अडचण झाली आहे. पक्षशिस्त शिकवण्यासह वैयक्तिक टीकेवर कायदेशीर उत्तर देण्याचा इशारा सभापती आहेर यांनी दिल्यानंतर पाटील यांनी शहराध्यक्ष सानप तसेच महापौर भानसी यांना पत्र पाठवत आपली भूमिका मांडली आहे. यात पाटील यांनी सभापतींवर हल्लाबोल केला आहे. आपल्या पक्षशिस्तीबाबत पक्षश्रेष्ठींना चांगली माहिती आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवाजी सहाणे यांना मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. त्यावेळी आपण विरोधी उमेदवार दराडे यांना मदत केली नाही. जिल्ह्यात कोणी किती वेळा पक्ष बदलले, कोण किती गरीब-श्रीमंत आहे, हे स्वत:हून सांगणे आपल्याला उचित वाटत नाही. मी सुसंस्कृत भारताचा नागरीक आहे. माझी संस्कृती ही महिलांना बहीण म्हणून आदर करणे आहे, असे नमूद करत आलेल्या पाहुण्यांना आपण देव समजतो, असा चिमटाही पाटील यांनी या पत्राद्वारे काढला आहे. पक्षात भांडण होऊ नये म्हणून लक्ष द्यावे, असा सल्ला शहराध्यक्षांना पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसवाय, टीवायच्या निकालात गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या एसवाय व टीवायच्या परीक्षेच्या ऑनलाइन निकालात मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. एसवायचे विद्यार्थी थेट टीवाय परीक्षा उत्तीर्ण दिसणे, परीक्षेसाठी न घेतलेल्या विषयाला मार्क मिळणे, विषयच बदलणे, मार्च २०१८ चेच मार्क विद्यार्थ्यांना मिळणे अशा गंभीर चुका गुणपत्रिकेत दिसत आहेत. त्यामुळे ही गुणपत्रिका रद्द करावी, फेरतपासणी करावी अशी मागणी नांदगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या गोंधळाला पुणे विद्यापीठ व परीक्षा समिती जबाबदार असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक सुनील कोल्हे, तालुका प्रमुख योगेश सोनार, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे,यांनी प्राचार्य पटेल यांना निवेदन दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयाने प्रयत्न करावेत, फेरतपासणी करण्याचा आग्रह करू नये, या बाबतचे शुल्क रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली. नांदगाव कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल म्हणाले की, ऑनलाइन निकालात चुका दिसत आहेत. प्रत्यक्ष गुणपत्रिका येतील तेव्हा त्यात त्या नसतील. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आलेल्या गुणपत्रिका न पाहता ऑनलाइन गुणपत्रिका पाहिल्यामुळे मुलांचा गोंधळ उडालेला असून, यात नांदगाव महाविद्यालयाचा काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

जे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत, त्यांना अनुत्तीर्ण शेरा आला आहे. विद्यापीठाने धावपळीत निकाल लावल्याचे दिसते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

- योगेश सोनार, मनसे पदाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्हीपॅटची कार्यपद्धती समजून घ्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपण दिलेले मत संबंधित उमेदवारालाच मिळाले का याची खातरजमा व्हावी, यासाठी यंदा लोकसभा निवडणुकीत व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल मशिनचा (व्हीव्हीपॅट) वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या काळात ययाबाबतची माहिती नागरिकांना दिली जाणार असून मतदारांनी व्हीव्हीपॅटची कार्यपद्धती अवश्य समजून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मंगळवारी केले.

अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे अधिकाऱ्यांसाठी इव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती मोहीम व प्रशिक्षण बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, निवडणूक शाखेचे तहसीलदार गणेश राठोड, नायब तहसीलदार अमित पवार यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माने यांनी व्हीव्हीपॅटची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना करण्यात आले. नागरिकांनीही व्हीव्हीपॅटची कार्यपद्धती जाणून घ्यायला हवी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने नाशिकमध्ये आलेले अभियंता बसंतकुमार यांनी व्हीव्हीपॅट यंत्राची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. इव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र एम-३ प्रकारचे असून मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने पार पडण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राची माहिती प्रत्येक गावात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या जनजागृती मोहिमेला शनिवारपासून (दि. १५) सुरुवात होणार आहे.

प्रत्येक तालुक्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ३९ पथक बनविण्यात आले असून १५ डिसेंबरपासून ही पथके जिल्हाभर रवाना होणार आहेत. एखादा मतदार इव्हीएम मशिनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो त्याचवेळी मतदान केल्याची पावती व्हीव्हीपॅट या मशिनमध्ये दिसते. तसेच मतदार इव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो त्याचवेळी उमेदवारांचे नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप सात सेकंदात मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुसावळमध्ये रेल्वेचा प्रकल्प!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

भुसावळ येथे रेल्वेने ४७२ कोटी रुपये खर्चून एलएचबी या आधुनिक कोचेसचा ओव्हरऑइलिंगचा म्हणजेच संपूर्ण दुरुस्तीचा कारखाना उभारण्यास मान्यता दिली आहे. प्रदीर्घ काळानंतर भुसावळ विभागात अशी मोठी गुंतवणूक होत आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती आणि परिसराचा विकास हे हेतू साध्य होणार आहेत, तसेच रेल्वेच्या पायाभूत सुविधाही अधिक मजबूत होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. भुसावळ विभागाचे मुख्य व्यवस्थापक आर. के. यादव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सूत्रांनी सांगितले, की आधी हा प्रकल्प नागपूरला होणार होता; परंतु एकाचा तोटा म्हणजे दुसऱ्याचा फायदा या तत्त्वाने नागपूरला प्रकल्प उभारण्यासाठी जास्त खर्च येणार होता. त्यामुळे भुसावळला हा प्रकल्प मिळाला. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी त्याला मान्यता दिली आहे. नागपूर येथे हा प्रकल्प उभारला असता तर ५०७ कोटी ६४ लाख रुपये खर्च आला असता; परंतु भुसावळ येथे रेल्वेची स्वतःची मोठी जमीन उपलब्ध असल्याने ४७२ कोटींचा खर्च येणार आहे. प्रकल्पात ३५ कोटींची बचत झाली आहे. त्यामुळेच भुसावळला रेल्वेने पहिली पसंती दिली आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी बांधकाम खर्च ३०६ कोटींचा, तर यांत्रिक खर्च १४० कोटींचा असेल.

भुसावळच्या प्रस्तावित प्रकल्पातून एलएचबी कोचेसची (बोगी) पूर्ण दुरुस्ती केली जाईल. इंटिग्रल कोच फॅक्टरी सध्या पारंपरिक कोचेसचे उत्पादन करते. मात्र, त्यांचा वापर आता थांबवण्यात आला असून, एलएचबी कोचेसचा वापर रेल्वे देशभरात करू लागली आहे. नाशिक, भुसावळचा समावेश असलेल्या मध्य रेल्वेला अशाच प्रकल्पाची मोठी गरज होती. एलएचबी कोचचा मेटेनन्स, रिपेअरिंग किंवा ओव्हरऑइलिंग ही कामे भुसावळ प्रकल्पात होतील. मुंबई आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणावर रेल्वेगाड्या सोडल्या जातात. या गाड्यांमध्ये एलएचबी कोचचा वापर केला जातो. हे कोच दुरुस्तीसाठी नागपूरला पाठवावे लागले असते. आता भुसावळला प्रकल्प झाल्यानंतर वेळ आणि खर्चात बचत होणार आहे.

धाडसाचा फायदा

भुसावळ रेल्वे विभागाने पोलिसांच्या मदतीने भुसावळ आणि मनमाड येथे गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचे धाडस दाखवले. रेल्वेच्या जागेवरील हे अतिक्रमणे हटविल्याने भुसावळ विभागाकडे मोक्याच्या जागी मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध झाली आहे. या जागेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांनी रेल्वेच्या वीज व अन्य सुविधांचा वापर सुरू केला होता. त्याचा फटकाही रेल्वेला बसत होता. आता अतिक्रमण हटविल्याने मोठी जमीनही मिळाली आणि रेल्वेचा खर्चही वाचला आहे. प्रस्तावित प्रकल्पाला जागा मिळाल्याने खर्चही वाचला आहे. स्थानिकांना रोजगार मिळणार असून, उद्योग- व्यवसायालाही चालना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सेनापतींच्या स्मारकाची जागा बदला’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

सेनापती तात्या टोपे यांच्या येवल्यातील नियोजित स्मारकासाठी केंद्र शासनाने १० कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र या स्मारकासाठी नगरपालिकेने निवडलेली जागा अडगळीची असल्यामुळे स्मारकाची जागा बदलण्यासाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय येवलेकर आक्रमक झाले आहेत. स्मारकाच्या निविदा प्रक्रियेस तत्काळ स्थगिती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पालिकेने स्मारकासाठी शहरापासून दूर असलेली व शहरवासियांचा आक्षेप असलेली बाभूळगाव शिवारातील अडगळीची जागा निश्चित केली आहे. आता बांधकामाची निविदाही काढल्याने शहरातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेस तत्काळ स्थागिती देण्यात यावी तसेच स्मारकाची बाभूळगाव शिवारातील जागा बदल करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नगरपरिषेदेने १६ डिसेंबरपर्यंत निर्णय बदलला नाही तर नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा राजेश भंडारी, एकनाथ गायकवाड, रुपेश घोडके, धीरज परदेशी, गौरव कांबळे, दीपक लोणारी, अविनाश कुक्कर, सुभाष गांगुर्डे, धनंजय कुलकर्णी, अतुल घटे, राजेंद्र नागपुरे, भूषण लाघवे, विशाल परदेशी, ऋषिकेश कुलकर्णी आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोगो : धगधगते नाशिकरोड - भाग १

$
0
0

गुन्हेगारी, मटका अड्डे, वाळू आणि भूमाफियांची दादागिरी, राजकीय गुन्हेगारी मंडळींचा वाढलेला सुळसुळाट, केबलवॉर, जीवघेणे हल्ले, एकलहरे येथील राख वाहतूक आणि मध्य रेल्वेतील कोळसा चोरीतून निर्माण झालेल्या गुन्हेगारीच्या ज्वालामुखीवर नाशिकरोड सध्या येऊन थांबलेले आहे. या धगधगत्या नाशिकरोडमधील गुन्हेगारी आणि समस्यांचा काट्याचा नायटा होण्यापूर्वीच नायनाट करणे आवश्यक आहे. पोलिसांपुढे हे मोठेच आव्हान आहे. याचा वेध घेणारी ही वृत्तमालिका आजपासून.

..

गुन्हेगारीमुळे नाशिकरोडची बिकट वाट

..

मटका, जुगाराचा सुळसुळाट

..

टीम मटा, नाशिकरोड

जुगार आणि मटक्याचा गंभीर विळखा शहरातील काही भागाला बसला असून, त्याविरोधात कारवाई होत नसल्याने हे अड्डे गुन्हेगारीचे केंद्रेही बनले आहेत. यामुळे नाशिकरोडच्या कायदा आणि सुव्यवस्थेलाही बाधा पोहचत असली तरी त्याचे सोयरसूतक पोलिसांना नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी सर्वसामान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विभागलेले आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त, विभाग चारचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांची कार्यालयेही याच विभागात कार्यरत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा रात्रंदिवस शहरात राबता असूनही जुगार आणि मटक्याचे अड्डे सर्रास सुरू आहेत. पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय हे अड्डे सुरू राहूच शकत नाही, अशी जनतेची भावना आहे. शहरात इंगळेनगर पाण्याची टाकी, देवळालीगाव, बिटको रुग्णालयाची मागील बाजू, सिन्नर फाटा रेल्वे प्रवेशद्वार, गोसावी वाडी, सुभाषरोड, रोकडोबावाडी, गुलाबवाडी, रेल्वे स्टेशनजवळील परिसर या ठिकाणी जुगार व मटका अड्डे दिवसाढवळ्या सुरू आहेत. यातील काही ठिकाणी यापूर्वी पोलिसांनी छापे मारून कारवाईही केली होती. मात्र हे मटका अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत.

..

राजकीय कार्यकर्त्यांचाही सहभाग

शहरात सुरू असलेले मटका व जुगारअड्डे काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशीच संबंधित आहेत. जेलरोडवरील मटका अड्डा एका माजी नगरसेवकामार्फत चालविला जातो. देवळालीगाव, रोकडोबावाडी, सुभाष रोड, गोसावीवाडी, रेल्वे स्टेशन परिसर, सिन्नर फाटा प्रवेशद्वार या ठिकाणी सुरू असलेले मटका व जुगार अड्डेदेखील शिवसेना आणि आरपीआय या दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून चालविले जातात. यात काही आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. परिणामी शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत आहे.

..

दारुविक्रीही जोरात

शहरातील विविध भागासह चेहेडी जकात नाका, सिन्नर फाटा, गुलाबवाडी, एकलहरे, शिंदे, पळसे, बेलतगव्हाण, पिंपळगाव खांब, बागूलनगर, चेहेडी शिव, अरिंगळे मळा, जुना ओढारोड या भागात देशी दारुची बेकायदेशीर विक्री सर्रास सुरू आहे. गुन्हे शोध पथकाकडून या दारू विक्रीच्या अड्ड्यांवर कारवाई केल्याची पोलिस दप्तरी नोंदही आहे. परंतु, हा केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोल्डन एज बॅडमिंटन लीग शनिवारपासून

$
0
0

रचना स्पोर्ट्स, कल्चर अकादमीतर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रचना स्पोर्ट्स आणि कल्चर अकादमीतर्फे 'गोल्डन एज बॅडमिंटन लीग' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सावरकर नगर, गंगापूर रोड येथील रचना अकादमीच्या बॅडमिंटन कोर्टवर १५ आणि १६ डिसेंबर दरम्यान ही व्हेटरन गटाच्या खेळाडूंसाठी (वयोगट ३५ पुढील) होणाऱ्या या स्पर्धेचे दुसरे पर्व रंगणार आहे.

लीग पद्धतीने खेळली जाणारी नाशिकमधील ही पहिली बॅडमिंटन स्पर्धा असून, एकूण सहा संघ एकमेकांशी विजेतेपदासाठी लढतील. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात महिला संघाचाही समावेश करण्यात आला आहे. ३० वर्षांवरील १० महिला खेळाडूंसह एकूण १०८ खेळाडू सहभागी होणार आहेत. संतोष पाटील, आशिष तोरणे आणि आदित्य कासार यांचा मराठा वॉरियर्स तर विशाल शाह, संजय म्हात्रे आणि हर्षद परांजपे यांचा हॉटशॉट, डॉ. प्रीतम जपे आणि रवी आढाव यांचा सुपर जायंट्स, मुकेश पवार आणि योगेश दुसाने यांचा नाशिक सुपर किंग्ज तर नितिन वाघस्कर, करण गुप्ता यांचा निवेक मास्टर्स, डॉ. सुहास राहणे आणि संजय चंदोई खान यांचा डॉल्फिन शटलर्स अशा सहा संघाचा या लीगमध्ये समावेश असणार आहे.

अनुक्रमे चंदन जाधव, सिद्धार्थ वाघ, अमित देशपांडे, योगेश एकबोटे, आदित्य शिरसाठ आणि आदित्य आर्डे हे या संघांचे प्रशिक्षक आहेत.

सहा संघमालकांनी उत्कृष्ट खेळाडूंना बोली लावून आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. तर महिला खेळाडू मिश्र दुहेरीत खेळतील. प्रत्येक संघात १८ खेळाडूंचा समावेश असून, मुख्य स्पर्धेत १४ खेळाडू तर बोली न लागलेले प्रत्येकी ४ खेळाडू ६ संघांकडून जंबल डबल प्रकारात खेळतील.

भरघोस बक्षिसे

स्पर्धेत विजयी संघ आणि खेळाडूंना १ लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. शनिवारी (१५ डिसेंबर) रोजी सकाळी साडेआठ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस सहा सत्रात स्पर्धा होणार असून रविवारी (१६ डिसेंबर) संध्याकाळी अंतिम सामने रंगतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर गारठले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रात थंडी परतली असून मंगळवारी नाशिकमध्ये ९.४ अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हे यंदाच्या वर्षातील सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. राज्यातील सर्वात कमी ९.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद अहमदनगरमध्ये झाली.

हुडहुडी भरविणारी थंडी नाशिककरांना नवीन नाही. त्यामुळेच थंड हवेचे ठिकाण म्हणूनही नाशिक ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात तापमानाचा पारा १०.२ अंश सेल्सियपर्यंत खाली आला होता. हे जिल्ह्यातील किमान तापमान ठरले होते. त्यानंतर तापमान वाढत जाऊन १४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातून थंडी गायब झाल्याचे बोलले जाऊ लागले. परंतु, पुन्हा तापमान घसरण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी (दि. १०) रोजी १२.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे सोमवारचे हे राज्यातील सर्वात निचांकी तापमान ठरले. मंगळवारी तापमानात अधिकच घसरण झाली. नाशिकमधील किमान तापमान ९.४ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. चालू वर्षातील हे सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. मंगळवारी सर्वात निचांकी तापमानाची नोंद अहमदनगर जिल्ह्यात झाली असून ९.२ अंश सेल्सियस ऐवढे किमान तापमान नोंदविण्यात आले.

हुडहुडी भरणार

या आठवड्यात थंडी गायब होणार असा अंदाज सोमवारी वर्तविणाऱ्या भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मात्र वेगळाच अंदाज वर्तविला आहे. या आठवड्यात जिल्ह्यातील किमान तापमान घसरत जाणार असून, टप्प्याटप्प्याने ते आठ अंश सेल्सियसपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे चालू आठवड्यात नाशिककरांना थंडी हुडहुडी भरवेल, अशी शक्यता बळावली आहे. या आरोग्यदायी हंगामाचा लाभ घेण्यासाठी शहरातील जॉगिंग ट्रॅकवर गर्दी वाढू लागली आहे.

दिनांक किमान तापमान

१२ डिसेंबर ९.०

१३ डिसेंबर ९.०

१४ डिसेंबर ८.०

१५ डिसेंबर ८.०

१६ डिसेंबर ८.०

१७ डिसेंबर ८.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरव समाजाच्या कॅलेंडरचे प्रकाशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

शैवगुरव समाज या संस्थेची बैठक नुकतीच पंचवटी येथे झाली. यावेळी समाजाच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष सुधीर चांदसरकर, डॉ. नागेश गुरव, रमेश पवार, संजय गुरव, सुरेंद्र सोनवणे, भाऊसाहेब गुरव, सुरेश गुरव, राजेंद्र पवार, गणेश, सोनवणे, बाळासाहेब महाजन, राजेंद्र दावलकर, संतोष सोनवणे, रमेश गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती. नितीन काळे यांनी प्रास्तविक केले. भाऊसाहेब गुरव म्हणाले की, समाज विकासासाठी सर्व पोटजातींनी एकत्र येऊन एकजुटीने काम करण्याची गरज चांदसरकर यांनी व्यक्त केली. डॉ. नागेश गुरव यांनी समाजाचे मंगल कार्यालय व सामाजिक भवन उभारण्याची गरज व्यक्त केली.

सुधीर चांदसरकर म्हणाले, की गुरव समाजाच्या पोटशाखा एकत्र येत आहेत ही ऐतिहासिक घटना असून समाज विकासाच्या मार्गातील मैलाचा दगड ठरेल. मंगेश भांडारे यांनी सूत्रसंचलन केले. पराग गुरव, राजेंद्र पवार, विजय शिंदे, रविंद्र सोनोने, शिरीष गुरव, मीना सोनवणे, शामराव गाढे, ऊर्मिला काळे,कल्पना चांदसरकर, जयश्री शिंदे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images