म. टा. वृत्तसेवा, मनमाड नांदगाव तालुक्यासाठी सिंचनाची एकही जलयोजना नसणे हा अन्यायच आहे. भावी पिढीच्या दृष्टीने नार-पार जलयोजना आमच्यासाठी भावनिक अस्मितेचा प्रश्न झाला असून, आम्ही राजकीय जोडे बाहेर काढून एकजुटीने लढ्यात उतरलो आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी केले. तालुका सर्वपक्षीय जलहक्क समितीतर्फे नांदगाव तालुक्यातील दहेगाव येथे आयोजित नार-पार जलप्रबोधन गावसभेत संतोष गुप्ता बोलत होते. दुष्काळात तालुका होरपळत असताना माणिकपुंजचे पाणी चाळीसगावकडे पळवून नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे पाणी तातडीने रोखायला हवे. अन्यथा तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार माजेल, असा इशारा गुप्ता यांनी दिला. समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी एकजुटीने लढा उभारण्याचे आवाहन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष नीलेश चव्हाण, 'आम आदमी'चे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले, राजाराम जाधव, अर्जुन महाजन, भगवान डांगे-पाटील यांनीही लढा उभारण्याचे आवाहन केले. निवडणुकीवर बहिष्कार? तालुक्यात दुष्काळ पडलेला असून, आमदार-खासदार व इतर लोकप्रतिनिधी जनतेकढे ढुंकूनही पाहत नाही. नार-पार प्रकल्पाबाबतही कमालीचे उदासीन आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनतेने मतदानावर बहिष्कार टाकून त्यांना धडा शिकवावा, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट