वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास वेळेच अपव्यय तर होतोच; पण शेकडो जीवदेखील जातात. कायदा पाळणे हे नागरिकांचे कर्तव्य असून, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. नियम मोडणे क्षणीक मजेची बाब असली तरी यामुळे यंदा १९० अपघाती मृत्यू झाले आहेत. शहरातील बेशिस्त वाहतुकीचे चक्र तोडण्यासाठी पोलिसांची कठोर कारवाई व्हायला हवी, असे मत मान्यवरांनी 'मटा' राउंड टेबलच्या चर्चेत व्यक्त केले.
कायद्याचे पालन प्रत्येकाची जबाबदारी
सार्वभौम भारतासाठी कायदेमंडळ कायदे तयार करते. या कायद्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. कायद्याचे उल्लंघन होत असेल आणि त्याद्वारे समाजाचे नुकसान होण्याची भीती असेल, तर पोलिस कायदे मोडणाऱ्यांवर कारवाई करतात. भारतीय घटनेतील कायदा, नागरिक आणि पोलिसांचे हे अधिकार आणि कर्तव्ये स्पष्ट असून, वाहतूक प्रश्न याच पद्धतीने हाताळला जातो. या वर्षी आतापर्यंत १९० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. जर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष झाले नसते तर हा आकडा ७० पेक्षाही कमी असता. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असून, त्यामुळे हेल्मेट कारवाई, टोइंग सुरू झाले की मतप्रदर्शन केले जाते. त्याचे स्वागतच आहे. पण, यामुळे कारवाई थांबण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वाहतूक पोलिस मागील दोन ते अडीच वर्षांपासून सातत्याने प्रबोधन करीत आहेत. निबंधलेखन पार पडले, बेशिस्त वाहनचालकांना फुले देण्यात आली. आरतीचा कार्यक्रम पार पडला. एवढेच नव्हे तर हेल्मेट अथवा सीटबेल्ट सक्तीबाबत कारवाईचे नियोजन आखले की त्याची माहिती अगोदरच सोशल मीडिया आणि माध्यमांद्वारे प्रसारीत केली जाते. यापेक्षा अधिक जनजागृती काय करता येऊ शकते? शहरी भागात सुशिक्षितांचा टक्का मोठा आहे, हे विशेष! हेल्मेट-सीटबेल्टचा वापर, सिग्नल जम्पिंग, राँग साइड वाहन चालविणे अशा कॉमन नियमांकडे दुर्लक्ष म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण असते, हे समजून घ्यायला हवे. घराजवळच कसे पकडतात किंवा फक्त मुलाला सोडायला शाळेत चाललो होतो, असे प्रश्न अनेकदा उपस्थित केले जातात. पण, घराजवळ अपघात होणारच नाही, असे कोणी ठामपणे सांगू शकते काय? यावर्षी मृत्यूमुखी पडलेल्या १९० पैकी किमान २० किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती या घराजवळ काहीतरी खरेदी करण्यासाठी अथवा, मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना मृत्यूमुखी पडल्यात. रस्ते अपघातात जीव जाणाऱ्या ९० टक्के व्यक्ती या तरुण असून, यात दुचाकीस्वार ९५ टक्के आहेत. पोलिसांची कारवाई सुरू झाली की हेल्मेट वापरण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोहचते. तेच पोलिसांनी दुर्लक्ष केले की हे प्रमाण थेट ३० टक्क्यांवर येते. म्हणजे बहुतांश वाहनचालक आपल्या संरक्षणासाठी हेल्मेटचा वापरच करीत नाहीत. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध दबाव गट यांनी याचा विचार करायला हवा. सवंग लोकप्रियतेसाठी या कारवाईस विरोध करणे खूप धोकादायक ठरू शकते.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त
कारवाईचा धाक आवश्यकच
भारतात इतर देशांच्या तुलनेत मनुष्य सर्वात स्वस्त ठरतो. रस्ते वाहतूक नियमांना कधीच गांभीर्याने घेतले गेले नाही. परदेशात मनुष्याची किंमत ही इतर रिर्सोसेसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तिथे वाहतूक नियमांबाबत खूपच गांभीर्याने पाहिले जाते. रस्त्यावरील जीवघेणे अपघात कमी व्हावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. भारतात मात्र यापेक्षा उलट परिस्थिती आहे. लायसन्स नाही २०० रुपये, राँग साइड आला २०० रुपये, हेल्मेट नसेल तर ५०० रुपये असा दंड वसूल केला जातो. दुसरीकडे जीवघेण्या अपघातांतील संशयितांना पोलिस स्टेशनमध्ये जामीन मिळतो. अपघात या घटनेकडे फक्त अपघात म्हणूनच पाहिले जाते. त्याच्या कारणांचा विचार केला जात नाही. वास्तविक मनुष्याच्या जीवाचे मोल ठरविता येत नाही. त्यामुळे जीवघेण्या अपघातांमधील संशयितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल होणे अपेक्षीत आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या व्यक्तीस किमान सात वर्षे शिक्षा व्हायला हवी. याचमुळे नागरिकांमध्ये या कायद्याची जरब बसू शकते. वाहतुकीचा फज्जा उडतो याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे नागरिकांना देशाबद्दल, आपल्या गावाबाबत प्रेम नसणे. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो, ही भावना ज्यावेळी सर्वांच्या मनात निर्माण होण्यास सुरुवात होईल, त्यानंतर फक्त वाहतूकच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या मार्गी लागतील. यापुढे वाहनांची संख्या आणखी झपाट्याने वाढेल. जितकी वाहने रस्त्यावर, तितकी रस्ते अपघातात मृत्यूची शक्यता वाढीस लागते. त्यामुळे याबाबत नागरिकांनी सुशिक्षित नव्हे, तर सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. ही सुरुवात आपल्याच घरातून होणे आवश्यक आहे. दुसरीकडे महापालिकेने सुद्धा अंग झाडून हा प्रश्न हातात घ्यायला हवा. कधीकाळी शांत शहर अशी ओळख असलेल्या पुण्याची आजची स्थिती भीषण आहे. नाशिक तसे नसले तरी आज ना उद्या त्याची वाटचाल त्या दिशेने होणार आहे. पोलिस प्रशासन, महापालिका, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष अशा सर्वांनी एकत्र येऊन याकडे लक्ष दिले, तरच अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी होऊ शकते.
- धनराज दायमा, माजी सहायक पोलिस आयुक्त
कॉलेजांमध्ये हवी हेल्मेट सक्ती
वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असूनही हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या कमीच असल्याचे दिसते. वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांच्या कारवाईचा धाक तरुणाईत शिल्लक राहिला नसल्याने, दंड भरू पण नियम पाळणार नाही, अशी मानसिकता वाढते आहे. यामुळे वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह कायम असल्याचे दिसते. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक कारवाईबाबत अधिक कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे. शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या रस्ते अपघातांत तरुण वाहनचालक हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये फक्त जनजागृती केल्याने प्रश्न सुटणार नसून, त्यावर सक्ती हा एकमेव पर्याय असल्याचे वाटते. त्यासाठी पोलिस प्रशासनाने सर्व कॉलेजांना सूचित करावे, की कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे अनिवार्य असेल. विनाहेल्मेट कोणालाही कॅम्पसमध्ये सोडण्यात येऊ नये, अशी सूचना कॉलेजांना करावी. या सूचनेच्या अंमलबजावणीसाठी हेल्मेट ड्राइव्हसोबतच कॉलेजांच्या प्रवेशद्वारावर वाहतूक पोलिसांनी तपासणी करावी. ही तपासणी अचानक होणे गरजेचे आहे, जेणेकरुन तरुणांमध्ये पोलिसांप्रती वचक निर्माण होऊन, हेल्मेटचा वापर वाढेल. कॉलेजमध्ये हेल्मेट सक्ती झाल्यास प्राध्यापकांनाही शिस्त लागेल. याचा परिणाम आपोआप तरुणाईवर होईल. तरुणाईने वाहतुकीचे नियम पाळल्यास, शहरातील रस्ते अपघातात कमालीची घट झालेली जाणवेल.
- प्रा. जयंत भातांब्रेकर
वाहतूक सुरक्षेचा कोर्स असावा
वाहतूक सुरक्षेच्याबाबतीत फक्त दंडात्मक कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिस अनेकदा अरेरावीची भाषा वापरत वाहनचालकांकडून दंड वसूल करतात. तसेच हेल्मेट परिधान न करणाऱ्या तरुणांवर मुख्यत्वे कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात येते. अर्थातच, तरुणांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहेच, पण फक्त दंडात्मक कारवाई आणि जनजागृतीतून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी तरुणांची मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. जेव्हा वाहतूक सुरक्षेच्या कार्यात तरुण स्वतःहून पुढाकार घेतील, तेव्हा त्यांना हेल्मेट आणि सीट बेल्टच्या वापराची गरज समजेल. त्यासाठी शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती उपक्रमांच्या जोडीला वाहतूक सुरक्षा हा कोर्स सुरू करायला हवा. कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना सिग्नलवर वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यास उभे करावे. जेव्हा विद्यार्थी या मोहीमेत उतरतात, तेव्हा त्यांना वाहतूक सुरक्षेची गरज पटते. त्यातून ते स्वतः प्रेरीत होतात, शिवाय इतरांनाही वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रेरीत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सक्ती करीत, दंडवसुलीसोबत त्याचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे. जसे कॉलेजांमध्ये एनएसएसची शिबिरे घेतली जातात, त्याचप्रमाणे वाहतूक सुरक्षेच्या संदर्भातही शिबिरांचे आयोजन होणे महत्त्वाचे आहे. सध्या सर्व कॉलेजांमध्ये सुरू असलेल्या, डेमध्येही वाहतूक सुरक्षेवर भर देण्यात यावा. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षेची जबाबदारी प्रकर्षाने जाणवेल. सध्या रस्ते अपघातात तरुणांची संख्या अधिक असल्याने, त्यांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना वाहतूक सुरक्षेचे कोर्सरुपी शिक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी दंडात्मक रक्कम घेतल्यानंतर त्या वाहनधारकास हेल्मेट खरेदी करण्यास सांगावे, प्रबोधनासह दंडात्मक कारवाईचा अधिक सकात्मक परिणाम होईल.
- अजिंक्य गिते, विद्यार्थी नेता
हेल्मेट हवेच!
आठ दिवसांपूर्वी रात्री उशिराने घरी परतत असताना, गाडी घसरून माझा अपघात झाला. त्या अपघातावेळी मी हेल्मेट परिधान केले असल्याने, मला फक्त किरकोळ इजा झाली. जर मी हेल्मेट घातले नसते, तर आज जीवंत नसतो. त्यामुळे हेल्मेट ही जीवनदान देणारी बाब आहे. प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घालूनच दुचाकी चालवणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या मानसिकेमुळे अपघात झाल्यावर पटकन कोणीही मदतीला येत नाही. रात्री आणि पहाटे प्रत्येकजण मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवितात. त्यावेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असते. हेल्मेट असल्यास डोके सुरक्षित राहते. एकवेळ जखम आणि फ्रॅक्चरचे दुखणे सहन करता येते, पण मृत्यू झाल्यास सगळेकाही क्षणात संपते. त्या अपघातात मृत्यू अगदी जवळून पाहिला आहे. फक्त हेल्मेट असल्यामुळे वाचलो आहे. त्यासंदर्भात सगळीकडे जनजागृती करतो आहे. कोणत्या वाहनचालकाचा कधी आणि का अपघात होईल, याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे जसे वाहनाला पेट्रोलची आवश्यकता असते, अगदी त्याचप्रमाणे वाहनचालकाच्या जीवाला हेल्मेटची आवश्यकता असते, हे प्रत्येकाने समजून घ्यावे. त्यासोबतच प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीचा कोणताही नियम मोडणार नाही, असा निश्चय केल्यास हेल्मेटड्राइव्ह सारख्या दंडात्मक कारवाईचीही गरज उरणार नाही.
- प्रीतम भामरे, विद्यार्थी
समुपदेशनाची गरज
दोन वर्षांपासून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिस आणि वाहतूक सुरक्षा स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पण अद्याप अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईचादेखील फार फरक वाटत नाही. कारवाईच्या विरोधात ओरड केली जाते. दंडात्मक कारवाई होऊनही हेल्मेट आणि सीटबेल्टची गरज वाहनधारकांना समजलेली नाही. नाशिककरांच्या मानसिकतेत अद्याप बदल झालेला नाही. नियम मोडल्यास काय फरक पडतो, अशी मुजोरी कायम होताना दिसते. कॉलेज, स्वयंसेवी संस्था, पोलिस यांच्यावतीने कायमच वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येते. अतिशय चांगल्या पद्धतीने वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जागरूक करुनही, शहरात हवा तितका बदल घडलेला नाही. जेव्हा शहरातील सर्व वाहनधारक वाहतुकीचे सर्व नियम पाळतील तेव्हाच शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल. त्यासाठी दंडात्मक कारवाई, जनजागृती मोहीम यांच्या जोडीला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची मानसिकता बदलविण्यासाठी समुपदेशन होण्याची आवश्यकता आहे.
- सतीश महाजन, वाहतूक सुरक्षा प्रतिनिधी