'सावाना'तील कलहाची परिणीती म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सार्वजनिक वाचनालयातील कलहाची परिणीती अखेर प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्या राजीनाम्याने झाली आहे. अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी राजीनामा स्वीकारला असून बेणी यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रमुख सचिवपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कार्यक्षम आमदार पुरस्कार समारंभ सोहळ्यात बेणी यांनी त्यांच्या भाषणात काही आरोप केले. पुरस्कारासाठी धनंजय मुंढे यांची निवड केल्याने दबावासाठी फोन आल्याचे त्यांनी समारंभात सांगितले. याप्रकरणी सावाना अध्यक्षांनी खुलासा करून तसे काही नसल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने सावानामध्ये उभी फूट पडल्याचे समोर आले. पुढेही ही धुसफूस कायमच होती. नवीन पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये उघड दोन गट पडले होते. प्रमुख सचिव या पदासाठी काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. गेल्या आठवड्यातील बैठकीत स्वाभाविकपणेच त्याचा स्फोट झाला. या बैठकीत बेणी व पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एकमेकाच्या गळ्याला हात लावण्यापर्यंत वेळ गेली. एका महिला पदाधिकाऱ्याबद्दल अश्लाघ्य शेरेबाजीही झाली. या बैठकीचा बभ्रा माध्यमांमध्ये झाल्यानंतर या कलहाची परिणीती कोणाच्या तरी बळीत होणार हे अपेक्षित होतेच. यापार्श्वभूमीवर बेणी यांनी मिलिंद जहागिरदार, स्वानंद बेदरकर व विनया केळकर यांच्या चौकशीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठविले. त्याची पत्रपरिषदेत माहिती दिली. ही माहिती बेणी देत असताना उर्वरित सर्व पदाधिकारी त्यांच्यापासून फटकून तर होतेच; शिवाय या पत्राबाबत आमचा काहीही संबंध नाही, असे सांगत होते. त्यामुळे 'सावाना'तील कलह आता टिपेला पोहचल्याचे दिसून आले. कार्यकारिणीतील बदलते वारे लक्षात घेऊन बेणी यांनी रातोरात अध्यक्षांकडे राजीनामा दिला. अध्यक्ष औरंगाबादकर यांनीही तात्काळ तो स्वीकारुन बेणी यांना कार्यमुक्त करण्याची तत्परता दाखविली. यातून हा संघर्ष किती तीव्र झाला होता, याची प्रचिती आली आहे. बेणी यांनी राजीनामा दिल्यानंतर घटनेची सर्व चौकशी करून आणि 'सावाना'च्या हितास्तव बेणी यांना पदमुक्त केले आहे. - विलास औरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना भ्रष्टाच्या विविध आरोपांमध्ये अटक होऊन जामिनावर सुटका झालेली व्यक्ती वाचनालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत पदाधिकारी म्हणून मिरविते हेच मुळात सावानचे दुर्दैव आहे. जेथे तात्यासाहेब, म्हात्रे, बाळासाहेब दातार यांच्यासारख्या दिग्गज मंडळींनी काम केले तेथे बेणीसारख्या व्यक्तीचे असणे धोकादायक आहे. अशा गुन्हेगारी व्यक्तीचे सामान्य सभासदत्वही रद्द केले गेले पाहिजे. - रमेश जुन्नरे, माजी पदाधिकारी, सावाना
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट