Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

माणिकराव कोकाटेंच्या मिसळ पार्ट्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांसोबतच अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव कोकाटेंनीही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासह मिसळपार्ट्यांतून मतपेरणी सुरू केली आहे. कोकाटेंनी सिन्नर, इगतपूरीत प्रचार केल्यानंतर बुधवारी नाशिकमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत अपक्ष उमेदवारीवर आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले. वंचित आघाडीबाबतचा आपला प्रचार चुकीचा असून, आपण अपक्ष म्हणूनच रिंगणात कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनीही मतदारांच्या भेटी सुरू केल्या आहेत. कोकाटेंच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसतो, यावरही चर्चा रंगू लागली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ या तुल्यबळ उमेदवारांसोबतच भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कोकाटेच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे हेंमत गोडसेंसमोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी त्यांची उमेदवारी फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोकाटेची एकीकडे युतीकडून मनधरणी सुरू असली तरी, दुसरीकडे कोकाटे उमेदवारीवर ठाम आहेत. कोकाटेंना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी गेल्या दहा दिवसापासून अपक्ष म्हणून प्रचाराला सुरूवात केली आहे. सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक तालुक्यात त्यांनी मतदाराच्या गाठीभेटी घेत, मतदारांना पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कोकाटेंनी आता प्रचाराचा अनोखा फंडा अवलंबला असून, मिसळपार्ट्यांद्वारे ते मतदारांशी तसेच समर्थक पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे मात्र वंचित आघाडीच्या उमेदवारीबाबत त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपण वंचित आघाडीची उमेदवारी घेणार नसल्याचे सांगत, अपक्ष म्हणूनच निवडणूक रिंगणात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ९ तारखेच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोकाटेंच्या या मेळाव्याकडे लक्ष लागून आहे.

भाजपकडून अर्ज

दरम्यान, कोकाटेंचे समर्थक असलेल्या ज्ञानेश्वर तांबेनी कोकाटेंसाठी घेतलेल्या उमेदवारी अर्जावर भाजप असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना आणि भाजपची युती असताना कोकाटेंच्या समर्थकांनी भाजपसाठी अर्ज नेत असल्याचा उल्लेख केला आहे. कोकाटे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे कोकाटेंच्या या अर्जामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

पवारांच्या गाठीभेटी

वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनीही ग्रामीण भागात मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. नाशिकरोड, सातपुर, त्र्यंबकेश्वर परिसरात पवार यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. वंचित आघाडीचे स्थानिक पदाधिकारीही त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पवार यांच्याकडूनही वातावरण निर्मितीसाठी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा नेत्यांना पवारांचा शिवनीतीचा उपदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच लक्ष घालायला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या समस्त मराठा नेत्यांना पाचारण करून समीर भुजबळ यांच्या पाठीशी राहण्याचा आदेशच त्यांनी दिला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समीर भुजबळ, तर शिवसेनेच्यावतीने हेमंत गोडसे रिंगणात आहेत. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही अपक्ष म्हणून उभे राहण्याची तयारी चालविली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे पवन पवार, मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, माकपतर्फे इरफान शेख उमेदवार आहेत. सध्या तरी बहुरंगी लढत दिसत असली तरी खरी लढत गोडसे व भुजबळ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच होईल हे उघड आहे. भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असल्याने त्यांना मराठा समाजाचा असलेला विरोध सर्वश्रुत आहे. त्यांची लढत नेमकी गोडसे या मराठा उमेदवाराशी होत असल्याने मतांचे ध्रुवीकरण होण्याची भीती आहे. यापूर्वी राष्ट्रवादीतीलच मराठा समाजाच्या नेत्यांनी निवडणुकीत भुजबळांना विरोध केला होता. २००९ मध्ये मनसे व शिवसेना यांच्यातील मतविभागणीमुळे समीर भुजबळ यांना निसटता विजय मिळाला होता. २०१४ मध्ये तर मोदी लाटेचाही प्रभाव पडून गोडसेंनी छगन भुजबळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. गेल्या वर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली निघालेले विराट मोर्चे व युती सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा सहानुभूतीदार मराठा मतदार पक्षाबरोबरच रहावा यासाठी खुद्द पवारांनीच पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी आघाडीच्या सर्व मराठा नेत्यांना बोलावून समीर भुजबळ यांच्यासाठी रदबदली केली. मराठा एके मराठा करीत बसाल तर इतर समाज आपल्याशी फटकून राहतील. त्याचा फटका इतर मतदारसंघांत बसेल. निवडून येण्यासाठी सर्वच समाजाची गरज लागते, असे वडीलकीच्या नात्याने त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारबरोबर ठेऊन स्वराज्य उभे केले, हे देखील पवारांनी उपस्थित मंडळींना समजावून सांगितले. झाले गेले आता विसरा आणि भुजबळांना साथ द्या, असे आर्जव करतानाच यावेळेस काही दगाफटका कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा सूचक दम देण्यासही ते विसरले नाहीत.

मतविभागणीच कळीचा मुद्दा!

या बैठकीस राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेस व मनसेचे काही नेतेही उपस्थित होते. विशेष म्हणजे समीर भुजबळ यांच्या उपस्थितीतच ही चर्चा झाल्याने समीर यांच्या जीवात जीव आल्याचे समजते. यावेळेस २००९ प्रमाणे दोन मराठा व एक ओबीसी अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुजबळ कॅम्प खुश असला तरी पवन पवार यांच्यानिमित्ताने दलित मागासवर्गीय मतदारांचीही विभागणी होत असून, कोकाटे व पवार हे कोणाची अधिक मते विभागतात, यावर निकालाचे गणित अवलंबून असल्याने पवार यांनी यंदा स्वत:च लक्ष घालायचे ठरविलेले दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगावसाठी तीन तर रावेरसाठी पाच अर्ज दाखल

$
0
0

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या सातव्या दिवशी बुधवारी (दि. ३) जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी तीन तर रावेरसाठी पाच अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीकडून गुलाबराव बाबूराव देवकर यांनी तर मुकेश राजेश कुरील व सतीश भास्करराव पाटील यांनी अपक्ष म्हणून जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि. ३) नजमीन शेख रमजान व सुनील संपत जोशी यांनी अपक्ष तर राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीकडून अजित नामदार तडवी, इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून रोशन आरा सादीक अली आणि बहुजन समाज पार्टीकडून योगेंद्र विठ्ठल कोलते यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

जळगाव लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत नऊ उमेदवारांनी बारा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघात सात उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेजत. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ६३ उमेदवारांनी १५० अर्ज नेले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ३६ उमेदवारांनी ९३ अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली. आज (दि. ४) दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, नेमके कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जळगाव’चा संभ्रम कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यांनी पक्षाच्या ए. बी. फॉर्मसह नामनिर्देशनपत्र दाखल करून प्रचारालादेखील सुरुवात केली. मात्र, आता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना या जागेसाठी तयार रहा, अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून आल्याने भाजपच्या जळगाव मतदारसंघातील उमेदवारीचा संभ्रम वाढला आहे. पक्षाकडून सूचना आल्याच्या वृत्ताला उन्मेष पाटील यांनीही ‘मटा’शी बोलताना दुजोरा दिला आहे.

भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापल्यापासून भाजपमध्ये मोठा अंतर्गत कलह सुरू आहे. आमदार स्मिता वाघ यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरूनदेखील पक्षात दोन गट पडले आहेत. एकंदरीत दगाफटका टाळण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी सावधता बाळगली आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना बुधवारी (दि. ३) वरिष्ठांकडून तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, याबाबत भाजपकडून कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सुरुवातीपासून उमेदवारीचे त्रांगडे
खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हापासून या जागेच्या उमेदवारीबाबत त्रांगडे कायम आहे. या जागेसाठी तब्बल बारा जणांची यादीच स्थानिक पातळीवरून वरिष्ठांना पाठवण्यात आली होती. यामधूनच आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर करण्यात आले. परंतु, यानंतर ए. टी. पाटील हे प्रचंड नाराज होत त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. दरम्यान, ए. टी. पाटील यांच्या बंडखोरीने पक्षाला मोठा फटका बसण्याचा धोका लक्षात घेता स्मिता वाघ यांचे तिकीट बदलवून आता आमदार उन्मेष पाटील यांना देण्यासाठी दिल्ली येथे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे कळते.

कार्यकर्त्यांची धावपळ
भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. तर आमदार उन्मेष पाटील यांना पक्षाकडून तयार राहण्याच्या सूचना करण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे अमळनेर येथील भाजपाचे सह्योगी आमदार शिरीष चौधरी यांनी मात्र, मलाच उमेदवारी मिळेल असे ठामपणे सांगितल्याने या उमदेवारीचा कौल कोणाला मिळणार, यामुळे कार्यकर्ते गोंधळात आहेत. नेमका प्रचार कोणाचा करावा, हाही प्रश्न त्यांना पडला आहे.

भाजपची राजकीय खेळी?
काही राजकीय जाणकारांच्या मते आमदार उन्मेष पाटील हे डमी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, आमदार स्मिता वाघ यांच्या उमेदवारीने विद्यमान खासदार ए. टी. पाटील व भाजपचे सह्योगी आमदार शिरीष चौधरी हे नाराज आहेत. त्यांच्याकडून होणारी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यासाठी भाजपनेच उमेदवार बदलत असल्याची राजकीय खेळी केली असल्याचीही शहरात चर्चा होती.

‘सोशल मीडियावर कधी करण पाटील, कधी आमदार उन्मेष पाटील, कधी साधना महाजन यांना उमेदवारी मिळाल्याचे कळते. त्यामुळे पक्षाने मला उमेदवारी दिलेली असून, त्यानुसार माझा प्रचार जोरात सुरू आहे. आतापर्यंत सहा दिवसांत ७८ गावांना भेटी दिल्या आहेत. उमेदवारी बदलाबाबत मला काही माहिती नाही.
- आमदार स्मिता वाघ, भाजप-शिवसेना युती उमेदवार

भाजपतर्फे जळगाव लोकसभेसाठी मुंबईहून दोन नावे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. यात आमदार उन्मेष पाटील व माझे नाव आहे. रात्रीतून याचा निर्णय होणार असून, मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष अर्ज आज (दि. ४) दाखल करणार आहे.
- शिरीष चौधरी, भाजपचे सह्योगी आमदार

पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाचा आदेश मानून आपण तयारीला लागलो असून, लवकरच जळगावच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा होईल.
- उन्मेष पाटील, आमदार, चाळीसगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढीपाडवानिमित्त मालेगावी ‘स्मरण तीन ताऱ्यांचे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील एकता सांस्कृतिक मंचातर्फे गुढीपाडवानिमित्त मालेगावकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ५ व ६ एप्रिल रोजी 'स्मरण तीन ताऱ्यांचे' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती मंचाचे प्रमुख डॉ. विनोद गोरवाडकर, स्वप्नील कोळपकर यांनी ही माहिती दिली.

शुक्रवारी 'इंद्रायणी काठी' हा पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या, गायलेल्या भावगीत, भक्तिगीत व चित्रपट गीतांच्या मैफलीचा कार्यक्रम होईल. शनिवारी 'विकत घेतला शाम' हा ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या भावगीते, भक्तिगीते व चित्रपटगीतांचा कार्यक्रम होइल. या कार्यक्रमात शंकर महाजन, भावपा पोफळे, अमृता कुंभकर्ण, हरिप्रिया धर्माधिकारी, मंदार जोशी, भूषण घोडके, सायली पाटील, नारायण महाजन आदी गायक भावगीते सादर करतील. शहरातील कॅम्प भागातील गोरवाडकर वाडा येथे रात्री ८.३० वा. हे कार्यक्रम होणार असून रसिकांनी त्यास उपस्थित राहावे असे आवाहन एकता सांस्कृतिक मंचतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमावास्येचा अर्जांना ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी सिन्नरचे माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याअगोदर या मतदारसंघातून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण पाच उमेदवारांचे अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत.

गुरुवारी अमावास्या असल्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे टाळल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. अॅड. कोकाटे यांनी अमावास्येअगोदरचा मुहूर्त साधत अर्ज भरला, तर इतरांनी अर्जही नेले. या मतदारसंघातून अर्ज नेणाऱ्यांची संख्या गुरुवारी नऊ होती. त्यात इगतपुरी तालुक्यातील नांदगाव येथील बाबूराव पागेरे, पंचवटी येथील सतीश निकम, नाशिकरोड येथील विलासराज गायकवाड, राणेनगर येथील प्रकाश विलास सोमठाणकर, बाजीराव पंढरीनाथ गायकर, सिन्नर येथील रंगनाथ सोनवणे, मनमाड येथील बादशहा रहमान पाररू शहा, नाशिक येथील भीमराव जयराम पांडवे, दीपक रंगनाथ डोके यांनी अर्ज नेले आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार हेमंत गोडसे दि. ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, तर राष्ट्रवादीतर्फे माजी खासदार समीर भुजबळ दि. ९ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. इतर इच्छुक उमेदवारांनी अद्याप आपल्या उमेदवारी अर्जांबाबतची तारीख जाहीर केलेली नाही.

--

सोमवारी-मंगळवारी गर्दीची चिन्हे

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत ५० नामनिर्देशनपत्रे नेण्यात आली आहेत. पण, अर्ज भरणाऱ्यांची संख्या अद्यापर्यंत पाचच आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे.

------ दुसरी बातमी----

दिंडोरीत उघडले खाते

--

निवृत्त सनदी अधिकारी टी. के. बागुल यांचा अर्ज दाखल

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज नाशिकचे निवृत्त सनदी अधिकारी टी. के. बागुल यांनी अपक्ष म्हणून दाखल केला आहे. दोन एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी तिसऱ्या दिवशी पहिला अर्ज दाखल झाला.

या मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी आतापर्यंत ४७ नामनिर्देशनपत्रे उमेदवारांनी नेलेली आहेत. पण, त्यातील एकच अर्ज दाखल झाला आहे. आता ९ एप्रिलपर्यंत यातील किती उमेदवार अर्ज दाखल करतात त्यत्रून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण, राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार धनराज महाले व भाजपतर्फे डॉ. भारती पवार, माकपतर्फे जिवा पांडू गावित व वंचित बहुजन विकास आघाडीचे बापू बर्डे हे प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यातील भाजपच्या डॉ. पवार ८ एप्रिल, तर राष्ट्रवादीचे महाले ९ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. इतर उमेदवारांच्या अद्याप तारखा निश्चित झालेल्या नाहीत. एकाच वेळेस या उमदेवारांनी अर्ज दाखल केले, तर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. गुरुवारी सहा उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज नेले. यात धनराज महाले, हेमराज वाघ, अर्जुन शिवराम वाघने, शिवाजी लुकडू मोरे, सुभाष सोनवणे, पुंडलिक माळी यांचा समावेश आहे.

--

अधिकाऱ्यांना वाटले हायसे

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. गेले दोन दिवस एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे यंत्रणा बसून होती. पण, गुरुवारी अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांनाही हायसे वाटले. त्यातील पहिलाच अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी असलेले बागुल यांचा असल्यामुळे त्याचा आनंदही होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार प्रचारकांची मांदियाळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवार (दि. ९)ची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यात देश आणि राज्यातील हेविवेट नेत्यांच्या प्रचार सभांनी राजकीय मैदाने गाजणार आहेत.

दि. १० ते २५ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींच्या सभांनी निवडणुकीचा फीवर चढणार आहे. या दिग्गज नेत्यांच्या सभांचे नियोजन राजकीय पक्षांकडून सुरू आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहे.

जिल्ह्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हेविवेट नेत्यांच्या प्रचार सभांद्वारे मतदारांना आकर्षित केले जाणार आहे. त्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीतर्फे नियोजन सुरू आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसेंसमोर राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांचे आव्हान आहे. त्यातच माजी आमदार माणिकराव कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीने रंगत वाढली आहे. दिंडोरीत राष्ट्रवादीचे धनराज महाले, भाजपच्या डॉ. भारती पवार आणि माकपच्या जे. पी. गावितांमध्ये तिरंगी लढत आहे. शिवसेनेने नाशिकची, तर राष्ट्रवादीने नाशिक आणि दिंडोरीची जागा प्रतिष्ठेची केली असल्याने दिग्गज नेत्यांना प्रचारांच्या मैदानात उतरवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पिंपळगाव बसवंत घेण्याचे नियोजन भाजपतर्फे केले जात आहे. नाशिक आणि दिंडोरीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त सभेचे नाशिकमध्ये नियोजन केले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा घेण्याचे नियोजन राष्ट्रवादीतर्फे सुरू आहे. शरद पवार यांच्या नाशिक आणि दिंडोरी येथे स्वतंत्र सभा घेतल्या जाणार आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही दिंडोरी, नाशिकमध्ये स्वतंत्र सभा होणार आहेत. भाजकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनाही सिन्नरमध्ये प्रचारासाठी आणण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात दिग्गज नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

---

मुख्यमंत्री, ठाकरेंची २४ रोजी सभा

नाशिक आणि दिंडोरीतील शिवसेना आणि भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची गोल्फ क्लब मैदानावर एकत्रित सभा होणार आहे. येत्या २४ एप्रिल रोजी सायंकाळी गोल्फ क्लब मैदानावर ही सभा होणार आहे. दोन्ही नेते एकाच वेळी व्यासपीठावर येऊन गोडसे, पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत. या सभेच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपचे वातावरणनिर्मितीचे प्रयत्न असून, ही सभा भव्य करण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिका निवडणुकीत याच मैदानावरून मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करीत भाजपची सत्ता आणली होती. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्कांसाठी लाल सलाम!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

'राज्यच नव्हे; तर देशभरात अन्नदाता शेतकरी अनेक प्रश्नांनी हैराण आहे. शेतीचा पाणीप्रश्न, शेतमाल भाव, शेतकऱ्यांच्या रोज होणाऱ्या आत्महत्या तसेच तरुणांना भेडसावणारा रोजगाराचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकच पर्याय आहे अन् तो म्हणजे लाल सलाम.' असे आवाहन चांदवड येथील प्रचाराच्या श्रीगणेशा सभेप्रसंगी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉ. सीताराम येचुरी यांनी केले.

दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे उमेदवार कॉ. जे. पी. गावित प्रचाराचा शुभारंभ गुरुवार चांदवड येथील बाजारतळ येथील सभेप्रसंगी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते शांताराम बापू जाधव होते. तर व्यासपीठावर सीपीआयचे राजू देसले, वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीचे के. एन. आहिरे, मनसेचे माजी आ. नितीन भोसले, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, विश्वास देवरे, येवल्याचे सचिन अलगट, किसन गुजर, सीताराम ठोंबरे, अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, धर्मराज शिंदे आदी उपस्थित होते.

येचुरी म्हणाले, 'मोदी सरकारने देशात बरबादी आणली असून, देशाला नेता नकोय, तर नीती हवी आहे. नीतीची लढाई आपण लढत आहोत. देश वाचवायचा असेल तर आपल्याला भाजप सरकार हटवायला हवे.' शास्त्रंज्ञांची कामगिरी स्वता:चीच असल्याचे सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

'अन्न, पाणी, शेती व रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी तुमचा आवाज दिल्लीत पोहचायला हवा, त्यासाठी तुम्ही सर्वांनी यासाठी तुम्ही कॉ. गावितांना साथ देत निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भाजपाला वाईट दिवसात साथ देणाऱ्या खासदार हरिचंद्र चव्हाण यांच्यावर सर्वात मोठा अन्याय असून, भाजपाने त्यांचा उपयोग करून घेत त्यांची उपयोगिता संपल्यावर त्यांना घरात बसण्याची वेळ आणली असून, उमेदवारी कोणाला तर, दारुण पराभव झालेल्या भारती पवारांना दिल्याचा टोलाही कॉ. गावित यांनी लगावला.

यावेळी राजू देसले, के. एन. आहिरे, माजी आ. नितीन भोसले, डॉ. डी. एल. कराड, सचिन अलगट आदींची भाषणे झाली. सभेचे प्रास्ताविक कॉ. हेमंत वाघेरेनी तर सूत्रसंचालन सुनील मालुसरे यांनी केले. सभेसाठी मार्क्सवादीचे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

भुजबळांनी मांजरपाड्याच गाजर दाखवलं...

दिंडोरी लोकसभा मतदार संघात पूर्व भागात पाणीप्रश्न गंभीर असून, या पाणीप्रश्नावर भुजबळांनी नेहमी राजकारण करत मांजरपाड्याच पाणी येवलाच्या नागरिकांना मिळवून देत येवला सुजलाम सुफलाम् करू, अशी स्वप्ने दाखवत निवडणुका लढविल्यात अन् जिंकल्यात. मात्र पाणी आलेच नाही आणि भुजबळ आपल्यात असेपर्यंत पाणी काही येणारच नाही, असे म्हणतं भुजबळांनी लोकांना मांजरपाड्याच गाजर दाखविल्याची टीका कॉ. जे. पी. गावित यांनी केली.

राष्ट्रवादीने साथ द्यावी

दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता, त्यांनी शिवसेनेतून उमेदवार आयात करण्याऐवजी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा द्यायला हवा होता, अशी अपेक्षा कॉ. सीताराम येचुरी यांनी भाषणातून बोलून दाखविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्दोष मुक्तता

$
0
0

निर्दोष मुक्तता

नाशिक : देवळाली कॅम्प येथील पारसी आग्यारी मंदिरात २० ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या चोरीच्या घटनेत पुजारी होमियार होमी सिदवा यांची प्रथम न्यायदंडाधिकारी आरती शिंदे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या घटनेत सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मंदिराच्या विश्वस्ताचा समावेश होता. सिदवा यांच्यातर्फे अॅड. अनिरुद्ध पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १४५ हरकती!

$
0
0

सुनावणीनंतर उर्वरित धार्मिक स्थळांवर हातोडा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने मोकळ्या भूखंडांवरील ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत घोषित केल्यानंतर त्यांच्याबाबत तितक्याच हरकती येणे अपेक्षित होते. परंतु, महापालिकेने दिलेल्या मुदतीत केवळ १४५ हरकती प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या १४५ हरकतींवर सुनावणी घेतली जाणार असून, त्यात पुरावे सादर करणाऱ्या धार्मिक स्थळांना अभय मिळणार आहे, तर पुरावे नसलेली धार्मिक स्थळे अतिक्रमित ठरवून हटवली जाणार आहेत.

उच्च न्यायालयाने शहरातील धार्मिक स्थळांबाबत फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर सहा विभागांत ८९९ पैकी ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरविण्यात आली होती. नव्याने हरकती घेण्याचे आदेश दिल्याने महापालिकेने या धार्मिक स्थळांची यादीच प्रसिद्ध करीत त्यावर हरकती व सूचना सादर करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात धार्मिक स्थळ बचाव कृती समितीच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी बैठक घेतली होती. महासभेने मोकळ्या भूखंडांवरील पारित केलेला व शासनाकडे प्रलंबित असलेला ठराव मंजूर करून आणण्यासाठी शहरातील तीनही आमदारांवर दबाव आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले होते. तसेच, शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच महापालिकेने हरकती घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने ४ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. या वेळेत नागरिकांकडून हरकती व पुरावे सादर करणे अपेक्षित होते. परंतु, ४ एप्रिलपर्यंत अवघ्या १४५ हरकती दाखल झाल्या आहेत. ज्या धार्मिक स्थळांबाबतचे पुरावे सादर झाले नाहीत, त्यांच्यावर हातोडा चालविला जाणार आहे.

...

मुदतवाढीची मागणी

या धार्मिक स्थळांबाबत हरकती दाखल करण्यासाठी महापालिकेने ४ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. परंतु, प्रतिसाद मिळाला नसल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षाने हरकती दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी रामसिंग बावरी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्याची निफाडमध्ये पोलिसांच्या हाती तूरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील न्यायालयात तारखेसाठी हजर करण्यात आलेला कैदी पोलिसांच्या हाताला झटका देऊन दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसून पळून गेला. निफाड बस स्थानक आवारात ही खळबळजनक घटना घडली आहे . श्रावण सुरेश पिंपळे उर्फ सावण्या(वय २५) असे या कैद्याचे नाव आहे.

नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या श्रावणला तारखेसाठी निफाड येथील न्यायालयात आणण्यात आले होते. त्याला १८ एप्रिल अशी पुढील तारीख मिळाल्यानंतर पोलिस हवालदार एस. यू. शिरसाठ व कॉन्स्टेबल बी. आर. नाथ यांनी नाशिकरोडला नेण्यासाठी बस स्थानकात आणले. पाणी पिण्याच्या बहाण्याने थांबलेला श्रावण ग्लास फेकून आणि पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळाला. काही अंतरावर एका हेल्मेट घातलेल्या चालकाच्या दुचाकीवर बसून तो फरार झाला .

पोलिसांनी पाठलाग केला पण हा कैदी फरार होण्यात यशस्वी झाला. बस स्थानक परिसरात आलेल्या दुचाकीवरून तो फरार झाल्याने हा पूर्वनियोजित डाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी करीत कैद्यासह फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या दुचाकीचालकाचाही शोध सुरू केला आहे. श्रावणने अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याच्यावर जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर अनेक जबरी गुन्हे दाखल आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस हजार चौरस फूट महारांगोळीने वेधले लक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारी राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४२१ व्या जयंती वर्ष निमित्ताने २५,००० चौरस फुटाची महारांगोळी पाडवा पटांगण, गोदाघाट येथे रेखण्यात आली. अंजनेरी येथील विवेकानंद आश्रमाचे स्वामी अखंडानंद, सिनेट सदस्य रुपाली खैरे, समाजसेविका वृंदा लवाटे, वीर पत्नी रुपाली बच्छाव यांच्या उपस्थितीत गुढी पूजनाने महारांगोळीस प्रारंभ करण्यात आला. यावर्षी आपले सण आपली संस्कृती हा महारांगोळीची विषय असून मानवी जीवन, संस्कृती व अध्यात्म यांचे सामंजस्य महारांगोळीतून दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानवी शरीरातील सप्तधातू हे विविध सात रंगांनी दर्शविण्यात आले आहेत. उत्पत्ती, स्थीती आणि लय यांची दैवते म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. यासोबत वात-पित्त-कफ हे त्रिदोष, सत्व-रज-तम हे तीन गुण, चतुर्वेद-चतुर्पुरुषार्थ-चतुराश्रम यांचे दिग्दर्शन या रांगोळीतून करण्यात आले असून, या भव्य रांगोळीला समर्पण भावाचे प्रतीक असणाऱ्या कासवाचा आकार देण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीतील त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्या रंगाला भव्य प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. याशिवाय महारांगोळी पूर्वी शहरातून गटनिहाय ज्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या त्यातील चरित्र निर्माण, कौटुंबिक स्नेहभाव, स्वावलंबन, आरोग्यविचार, कृतज्ञता, नारी शक्ती आदी विषयांना सुद्धा या महारांगोळीत महत्त्वाचे स्थान देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभरवेळा दूषित पाणीपुरवठा

$
0
0

पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातील धक्कादायक माहिती

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करीत असल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला असून, गेल्या ११ महिन्यांमध्ये शहरातील विविध भागांत तब्बल ११४ वेळा दूषित पाणीपुरवठा झाल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. शहरात गावठाण आणि जुने नाशिक भागात सर्वाधिक ३० वेळा दूषित पाणीपुरवठा झाला आहे. शहरात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे मात्र नाशिककरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे समोर आले आहे.

सुमारे वीस लाख लोकसंख्या असेलल्या नाशिक शहराला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या सहा जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील विविध भागातील सुमारे १०९ जलकुंभांपर्यंत पोहोचवले जाते. या जलकुंभातून सुमारे १८०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे ते नागरिकांच्या घरोघरी पोहोचविले जाते. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होतोय की नाही याची पडताळणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने केली जाते. नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होऊ नये तसेच, पाण्यासंदर्भात कोणी घातपाती कारवाया करू नये, याची दक्षता पालिकेकडून घेतली जाते. पालिकेकडून दरमहा शहरातील पाण्याचे नमुने तपासले जातात. पाणीपुरवठा विभागातर्फे पंपिंग स्टेशन ते नागरिकांच्या घरापर्यंत पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची विविध पातळ्यांवर वेळोवेळी तपासणी केली जात असते. या माध्यमातून गेल्या ११ महिन्यांत तब्बल १०,४४१ पाणी नमुन्यांची तपासणी केली गेली. यापैकी ११४ ठिकाणचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले, तर १० हजार ३,३२६ पाणीपुरवठ्याचे नमुने शुद्ध असल्याचे आढळून आले. क्लोरिनेशनच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होणे, व्हॉल्व तसेच जलवाहिनी लिकेज होऊन त्यात सांडपाणी प्रवाहित होणे, जंतूंचा संसर्ग होणे, जलकुभांचे झाकण उघडे राहून त्यात पक्षी मरून पडणे आदी कारणांमुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

...

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक दूषित पाणी

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत ११४ पैकी सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वाधिक ४६ पाणीनमुने दूषित असल्याचे आढळून आले. विशेषत: ११४ पैकी सर्वाधिक दूषित ३० नमुने हे जुने नाशिक, रविवार कारंजा, द्वारका परिसरात आढळून आले. या भागातील पाइपलाइन खराब झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. सातपूरमध्ये सर्वाधिक कमी दूषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्ज दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

वंचित बहुजन आघाडीतर्फे जळगाव लोकसभेसाठी अंजली बाविस्कर यांनी तर रावेर मतदारसंघासाठी नितीन कांडेलकर यांनी गुरुवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी दोन्ही उमेदवारांनी दुपारी १ वाजता जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले.

या वेळी जळगाव लोकसभेच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी प्रमोद इंगळे, किशोर निकुंभ, सुजाता ठाकूर, दिनेश ठाकूर, सूर्यकांत भालेराव उपस्थित होते. तर रावेर मतदारसंघाचे उमेदवार नितीन कांडेलकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, बाळा पवार, छाया सावळे व संजय कांडेलकर उपस्थित होते. आज दुपारी सागर पार्क वरुन शक्ती प्रदर्शन करीत शेकडो कार्यकर्तेसह जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात दाखल झाले होते.

रावेर मतदारसंघाचे निरीक्षक जळगावात
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार हे जळगावात दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघनिहाय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. अजयकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीसंबंधी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२९४५४२८ हा आहे. नागरिकांना निवडणुकीसंबंधी काहीही तक्रार दाखल करावयाची असल्यास त्यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहननिवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाम्पत्यासह पुतण्याचाखाणीत बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीसह पुतण्याचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. ४) सकाळी दहाच्या सुमारास सय्यद पिंप्री येथे घडली. सविता नंदू वराडे (वय ३०), नंदू वराडे (३४) आणि केशव वराडे (२३) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत.

सय्यदपिंप्रीजवळ खाणीत पाणी साचले असून, तिथे सविता कपडे धुण्यासाठी गेल्या. एक चादर पाण्यात थोडी दूर गेली. ती घेण्यासाठी पुढे वाकलेल्या सविता यांचा तोल गेल्याने बुडाल्या. त्याच वेळी सविता यांना वाचविण्यासाठी पती नंदू वराडे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने दोघांनी बचावासाठी आरडाओरड केली. हा प्रकार पाहून त्यांचा पुतण्या केशव बचावासाठी पुढे आला. त्यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, खोल पाणी आणि चिखल यात केशव फसला. खाणीजवळ सुरू असलेल्या या मृत्युतांडवाची माहिती ग्रामस्थांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच तिघांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाला तब्बल अडीच तासांच्या शोधमोहिमेनंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सार्थक नेहते तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्वानाच्या पिलास रॉडने मारहाण

$
0
0

श्वानाच्या पिलास

रॉडने मारहाण

नाशिक : रॉडने मारहाण करीत श्वानाच्या पिलास गंभीर जखमी केल्याप्रकरणी भरत नेरकर (रा. एकदंत अपार्ट, मखमलाबाद) याच्याविरूद्ध प्राणी क्रुरता निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शरण्या शशिकांत शेट्टी यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नेरकर यांनी १ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घरासमोर बसलेल्या श्वानाच्या पिलास लोखंडी रॉडने जबर मारहाण करीत जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच शेट्टी यांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. शेट्टी या भटक्या श्वानांच्या पूनर्वसनासाठी काम करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’संगे शिका डेझर्ट मेकिंग

$
0
0

'मटा'संगे शिका डेझर्ट मेकिंग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डेझर्ट हा सर्वांच्याच आवडता प्रकार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गोड डेझर्ट आकर्षित करत असतात. हल्ली तर परदेशात आवडीचे असलेले डेझर्ट आपल्याकडेही सहजपणे मिळतात. परंतु, असे डेझर्ट घरी बनविण्याची मजा वेगळीच असते. हे ओळखत महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे डेझर्ट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल रॉयल हेरिटेज, शालिमार येथे हे वर्कशॉप होणार आहे. फज ब्राउनी, रेड वेलवेट लावा केक, चिया फ्रुट कस्टर्ड पुडिंग असे विविध प्रकारचे डेझर्ट रितू मेहरा यावेळी शिकविणार आहेत. कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून ९४२२५१३५६९ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर संपर्क दुपारी १ ते ५ वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादकांचा सटाण्यात रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सटाणा

तब्बल आठ दिवसांपासून बंद असलेल्या सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव गुरुवारी होण्यापूर्वीच संतप्त कांदा उत्पादकांनी बाजार समिती कार्यालयाबाहेर घोषणा देत सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावर रास्तारोको केला. दरम्यान प्रशासनाने तातडीने संचालक मंडळाची बैठक घेवून दुपारी दोन वाजेनंतर कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने उत्पादकांनी रास्तारोको मागे घेतला.

सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार २८ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. आज गुरुवारी लिलाव घेवून पुन्हा शुक्रवारी ५ रोजी अमावस्येनिमित्त बाजार समितीमधील व्यापार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर सोमवार ८ एप्रिलपासून दैनंदिन लिलाव सुरू होणार होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी तालुक्यातील कांदा उत्पादकांनी साठविलेला नवीन कांदा विक्रीसाठी बाजार समिती आवारात आणला होता. मात्र बाजार समितीने लिलावात भाग घेणाऱ्या व्यापाऱ्यांना आपले परवाने मधील तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासंदर्भात सुचित केले होते. यामुळे बाजार समिती प्रशासन व व्यापारी वर्गात समन्वय न होवू शकल्याने सकाळी कांदा लिलाव सुरू नसल्याचे एका व्यापाऱ्याने स्पष्ट केले. परिणामी कांदा विक्रीसाठी आलेल्या कांद्याचा लिलाव न झाल्याने संतप्त शेतकरी वर्गाने रस्त्यावर येत रास्ता रोकोस प्रारंभ केला.

दोन तास ठिय्या

तब्बल दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या रास्ता रोकोमुळे पोलिस प्रशासन व बााजर समिती प्रशासनाची धावपळ उडाली. दरम्यान बाजार समिती सभापती मंगला सोनवणे यांनी तातडीने संचालकमंडळाची सभा घेवून दुपारी २ वाजता बाजार समितीमधील कांदा लिलाव सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकरी वर्गाने रास्तारोको मागे घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हर डाऊनचा वैताग

$
0
0

कर्ज नूतनीकरण व वाढीव कर्जासाठी मिळेना सातबारा

...

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ऑनलाइन सातबारा उतारे आणि नोंदी मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ऑनलाइन प्रक्रियेतील सर्व्हर डाऊन झाल्याने ऑनलाइन नोंदीचे बारा वाजले आहेत.

काही संस्थांमध्ये मार्च एंडची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. शेतकऱ्यांना आपल्या कर्जाचे नूतनीकरण व नवीन कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा व ऑनलाइन नोंदी आवश्यक आहेत. मात्र सर्व्हर डाऊन असल्याचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. महसूल विभागाने लोकसभा निवडणुकीच्या कामाबरोबरोरच मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी मांडल्या.

शासनाने लोकांना घरच्या घरी उतारे उपलब्ध व्हावे, यासाठी सात वर्षांपूर्वी ऑनलाइन प्रक्रियेला सुरुवात केली. बहुतेक तालुक्यांचे काम पूर्ण झाले आहे. तलाठी, सर्कल या सर्वांनी सातबाराचे रेकॉर्ड संगणकीकृत केले. यात बराच काळ गेला. यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांचा फायदाही झाला. सद्यस्थितीत सर्व्हर डाऊनमुळे तोटा होत असल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदी होणे तर दूरच पण सातबारा उतारा मिळणेही अवघड होऊन बसले आहे. मार्च महिना नुकताच संपला असून, शेतकऱ्यांना विविध संस्था व बँकाकडून घेतलेले कर्ज नूतनीकरण करावयाचे, तर काही शेतकऱ्यांना नवीन कर्ज घ्यावयाचे आहे. आपल्या शेतीचे नजरगहाण व डिक्लेरेशन केल्याशिवाय कोणतीही बँक जादा कर्ज देत नाही. त्यासाठी ऑनलाइन नोंदीची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांना वारस नोंद, शेती वाटपाची नोंद, विविध संस्थांचे नाव कमी करण्याच्या नोंदी टाकायची गरज आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे नोंदीचा खेळखंडोबा झाला आहे. या नोंदी मिळवण्यासाठी शेतकरी तलाठ्याकडे चकरा मारून वैतागला आहे.

..

कांदा उत्पादकांनाही फटका

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले. त्यासाठी तीन वेळा योजनेच्या तारखांत वाढ केली. शेवटीची मुदत ३१ मार्च होती. मात्र सर्व्हर डाऊनमुळे हजारो शेतकऱ्यांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे अनुदानाच्या अर्जासाठी १५ एप्रिल ही मुदत वाढवावी व तेथून पुढे बाजार समित्यांनाकडून जिल्हा निबंधकांना १५ दिवस माहिती पाठवायला द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा

$
0
0

निफाड-पिंपळगाव रोडवर अघोषित मेगाब्लॉक

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड पिंपळगाव रस्त्याचे प्रस्तावित रुंदीकरणाच्या पूर्वतयारीसाठी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांची कत्तल सुरू आहे. मात्र ही झाडे तोडताना कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने तसेच पर्यायी वाहतुकीची व्यवस्था न केल्याने या मार्गावर अघोषित मेगाब्लॉकचा तापदायक अनुभव या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना येत आहे.

सुरत-शिर्डी मार्गावर सतत वाहतुकीची वर्दळ असते. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. हे काम करण्यापूर्वी रुंदीकरणात अडसर असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील झाडे जमीनदोस्त केली जात आहेत. या मार्गावरील लिंब, वड, पिंपळ अशी १०० वर्षे वयाची डेरेदार वृक्ष आहेत. ती जमिनीवर कटरच्या सहाय्याने पाडल्यानंतर संपूर्ण रस्ता बंद होतो. तोडलेल्या झाडांच्या संगळ्या फांद्या कापून काढेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. यामध्ये अर्धा ते पाऊण तास वेळ जातो, अशा तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. वास्तविक अशी मोठी झाडे तोडायची असतील तर या ठिकाणी तात्पुरती पर्यायी व्यवस्था निर्माण करायला हवी. मात्र संबंधितांकडून अशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी दिसत नाही. शिवाय दोन्ही बाजुंनी वाहनचालकांना या बाबतीत असणाऱ्या सूचनाही पाहायला मिळत नाही. रात्री काही झाडांचे मोठमोठे ओंडके रस्त्यावरच असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम घेतलेल्या कंपनीने रस्ता सुरक्षेबाबत काळजी घ्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images