म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात छोटी मोठी एकूण २३ धरणे आहेत. तरीही नाशिक जिल्हा हा तहाणलेला आहे. आजमितीस जिल्ह्यात खासगी व सरकारी अशा एकूण ६९ टँकरव्दारे १०२ गावे, १६९ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्याच्या मध्यान्हात ही स्थिती आहे. अनेक गाव व वाड्यांचे टँकरचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र होणार आहेत. लवकर पावसाला सुरुवात झाली नाही तर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या १९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ येवला, नांदगाव, सुरगाणा, बागलाण व पेठ या तालुक्यांना बसली आहे. या पाच गावांमध्येच सुमारे ७८ गावे व ८० वाड्यांना एकूण ३५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कळवण व निफाड या दोन तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसलेली नाही.
चांदवड
सहा गावांची तहान भागतेय टँकरवर
दुष्काळग्रस्त भाग म्हणून परिचित असलेला पण यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः हैराण झालेल्या चांदवड तालुक्यात पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी तीन शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एक विहीरही अधिग्रहीत करण्यात आली आहे.
तालुक्यातील बोपाणे, परसूल, हिरापूर, देवरगाव, गुरहाडे आणि तीसगाव या सहा गावांत पाणीप्रश्न भेडसावत असून, या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दह्याणे येथील विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. ४४ गांव पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यात पाणीटंचाईच्या समस्येने या उन्हाळ्यात गेल्या
काही वर्षांच्या तुलनेत उग्र रूप धारण केलेले नाही. तरीही आणखी काही टँकर प्रशासनाला सुरू करावे
लागतील असा जाणकरांचा अंदाज आहे. सोळा गांव पाणीपुरवठा योजनेचा लाभ तालुक्याला असूनही, काही गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. याकडे लोकप्रतिनिधिंनी लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
चांदवड शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, हे दिवस कमी कसे होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जावे. येत्या काही दिवसात यामध्ये वाढ होऊ शकते. लोकप्रतिनिधिंनी याबाबत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यांनी उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला यापुढील काळात पाणीटंचाईशी सामना करावा लागू नये, उन्हाचे तडाखे बसत असताना निदान पाण्याअभावी हाल होऊ नये, अशी माफक अपेक्षा बाळगून आहेत.
नांदगाव
कृत्रिम पाणीटंचाईचा बसतोय फटका
नांदगाव शहर परिसरात ५६ खेडी पाणीपुरवठा योजना आणि माणिकपुंज पूरक योजनेमुळे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. भूजल पातळी शाबूत असूनही केवळ पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाअभावी आणि तांत्रिक कारणांमुळे शहराला कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
सात दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दहा ते बारा दिवसाआड होत आहे. वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे रात्री अपरात्री पाणी येत असल्याने नांदगावकर हवालदिल झाले आहेत. भरभरून पाणी आहे पण विजेची समस्या, सातत्याने बंद पडणारे पंप, वाहिनीला गळती होण्याचे वाढते प्रमाण, पाणी वितरण व्यवस्थेतील असमतोल या कारणांमुळे दहा ते बारा दिवसाआड नांदगाव शहरात पाणीपुरवठा होत आहे. तीस हजार लोकसंख्येसाठी दोन योजना पूरेशा असूनही, केवळ नियोजनाअभावी नांदगावच्या अनेक भागात पाणी वितरण असमतोल असल्यामुळे समस्या उद्धभवली आहे. आपल्याच भागात पाणी सोडण्याचा काही नगरसेवकांचा अट्टाहास हा देखील कृत्रिम पाणीटंचाईस कारणीभूत ठरत असल्याची ओरड होत आहे. आमदार पंकज भुजबळ यांनी पालिका प्रशासनावर अंकुश ठेवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. नूतन नगराध्यक्ष शैला गायकवाड यांनी पथकाद्वारे पाहणी करून गळती थांबवू तसेच, पाणी क्षमता वाढवून पाणीपुरवठा पाच दिवसाआड करण्याचा प्रयत्न करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
तालुक्यात १० टँकरने पाणीपुरवठा
नांदगाव तालुक्यात पाणीटंचाई ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. तब्बल १० टँकरने तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा होत आहे. एकूण सात विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मंगळाने, परधाडी, इंदिरानगर या वीस-एकवीस लाखांच्या पाणी योजना ९० टक्के पूर्ण आहेत. तर, सतरा योजना अंतिम टप्प्यात आहेत. तालुक्यात चार पाणीपुरवठा योजना पूर्णपणे सुरू झाल्या आहेत. तर, २२ योजना प्रगतीपथावर आहेत. तालुक्यात दहा शासकीय टँकरने पाणी पुरविले जात असून, विहिरी, हातपंप याद्वारे समस्या कमी करण्याचे प्रयत्न नांदगाव तालुक्यात सुरू आहेत.
कळवण
आवर्तनासाठी साकडे
कळवण तालुक्यात यावर्षी दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील धरणांच्या साठ्यात घट झाली आहे. धरणांमध्ये असलेला अल्प पाणीसाठ्यात उन्हाळा कसा पार पाडावा याची चिंता प्रशासनासह नागरिकांना सतावत आहे.
विविध गावांमधून पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणीमुळे पाटबंधारे विभागही पेचात सापडल्याचे चित्र सध्या तालुक्यात आहे. प्रत्येक गावातून पाण्याच्या आवर्तनासाठी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व पाटबंधारे बिभाग यांच्याकडे होणाऱ्या मागणीमुळे प्रशासन व पाटबंधारे विभाग पेचात सापडला आहे. पावसाची सरासरी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने कमी होत आहे. तालुक्यात काही ठिकाणी आता टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
अभोणा, बार्डे, कळथे, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक, एकलहरे वाडी बुद्रुक, नाकोडा, नवी बेज, जुनी बेज, पिळकोस, भादवण, विसापूर, रवळजी, मोकभणगी, देसराणे या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कळवण तालुक्यात एकूण १५२ गावे, ८९ आदिवासी पाडे आहेत. त्यातील ६५ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेली आहे, तर ४२ गावांमध्ये ही योजना वीजपंपांसह कार्यान्वित आहे. एकूण ४५० हातपंप असून पाण्याअभावी त्यापैकी ३१ बंद पडले आहेत. ३७९ चालू आहेत. त्यापैकी ४० ठिकाणी पातळी खालावल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यस्थितीनुसार जून महिन्यात वेळेवर पाऊस पडला नाही, तर पिण्याच्या पाण्याबरोबरच कळवण तालुक्याला चाराटंचाईचाही सामना करावा लागणार आहे. पाच गावातील विंधनविहरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, उर्वरित गावांकरिता गरजेनुसार विहिरी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाचवीला पुजलेली पाणीटंचाई
बागलाण
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
बागलाण तालुक्यातील दुष्काळाची दाहकता आणि भीषणता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सरत्या मे महिन्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जूनच्या प्रारंभीच पावसाने दिलासा दिल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल. अन्यथा, पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागणार आहे.
बागलाण तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. सुमारे ५० हून अधिक गावांसह वाड्या व वस्त्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. मात्र, शासकीय दप्तरी अवघ्या ११ गावांना चार शासकीय व एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुमारे नऊ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव शासकीय पातळीवर दिले आहेत. आठ ठिकाणी खासगी विहीर अधिग्रहीत करून नळपाणीपुरवठा करण्यात येत आहेत. गत पाच वर्षापासून सातत्याने सरासरी ३०० ते ३६६ टक्के पुढे पावसाची नोंद झालेली नाही. त्याचबरोबर पावसाचे जून, जुलै कोरडे जाऊन ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होऊन तालुक्यातील केळझर व हरणबारी ही दोघेही धरणे भरलेली आहेत. परिणामी पावसाची घसरती आकडेवारी ही तालुकावासीयांना चिंताजनक ठरणारी आहे. पावसाने केलेली अवकृपा परिणामी शेती सिंचनावर मोठा परिणाम होऊन शेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यातील कृषी उद्योगावर मोठा विपरित परिणामी करणारी आहे. घटत्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील विहिरी, तलाव, नद्या, नाले व धरणांची परिस्थिती दरवर्षी जेमतेम होऊन शेती सिंचनासाठी पाणी साठविणे गरजेचे झाले आहे. साठवण तलाव देखील पूर्ण भरत नसल्याने पिण्याच्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणूव लागली आहे.
पाणी आरक्षण
शेती सिंचनासाठी उभारलेली धरणे आता पिण्याचा पाण्यासाठी आरक्षित होऊ लागली आहेत. दसाने, पठावे, जाखोड व कोळीपाडा ही लपा तलाव परिसरातील गावांची तहान भागवू लागली आहेत. केळझर व हरणबारी धरणातील दोन आवर्तने ही रब्बी पिकासाठी देण्यात आल्यानंतर उर्वरित आवर्तने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करून एप्रिल व मे महिन्यात देण्यात येतात. या पाण्याचा उपयोग शेती सिंचनाऐवजी पिण्याच्या पाण्यासाठी होऊ लागला आहे.
तालुक्यातील गिरणा, मोसम, आरम, करंजाड, कान्हेरी, हत्ती, दोध्याड या नद्या एकेकाळी बारमाही वाहणाऱ्या होत्या. मात्र, कमी पर्जन्यमानामुळे या नद्यामधील खडक आता डोकेवर काढू लागले आहेत. त्यात वाळू माफियांच्या कारभारामुळे तर नद्यांमध्ये बारा फुटापेक्षाही अधिक खोलीचे खड्डे दिसू लागल्याने पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तालुक्यातील राहुड, चिराई, महड व काटवन परिसरातील गावांबरोबच सटाणा शहरालगत असलेल्या भाक्षी, मुळाणे, अजमीर सौंदाणे, रामतीर, रातीर, सारदे, इजमाने, देवळाणे, सुराणे, खिरमाणी या गावांना तर वर्षभर टँकरने पाणी पुरवावे लागते.
सद्यस्थितीत तालुक्यातील अजमेर सौंदाणे, सुराणे, लोणारवाडी, कातरवेल, रातीर, रामतीर, खिरमाणी, भाक्षी, सारदे, इजमाने चौगांव, पिंपळदर या अकरा गावांना चार शासकीय व एक खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसभरातून उपरोक्त गावांना किमान चार व कमाल दोन वेळा टँकरच्या फेऱ्या करण्यात येऊन पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. दऱ्हाणे व इंदिरानगरकरिता परशुराम पाकळे, भाक्षीकरिता शशिकांत खैरनार, बिजोरसेकरिता प्रवीण देवरे, चौंधाणेकरिता दगुबाई मोरे, नामपूरकरिता वर्षा सावंत, कऱ्हेकरिता सुनील जाधव यांच्या विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, सटाणा व आराई येथील विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
तरसाळी, नवेगाव, जुनी शेमळी, किरायतवाडी, जामनवाडी, नवी शेमळी, खमताणे, बिजोटे, डोंगरेज, जोरण, चिराई व महड या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत शासकीय पातळीवर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या गिरणा नदीपात्रातील पाणी संपले आहे. यामुळे चणकापूर अथवा पुनदचे आवर्तन आल्यानंतर गिरणानदी दुथडी भरून वाहू लागल्यानंतर सटाणा शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सटाण्यात आजमितीस एक ते दोन दिवसाआड नळपाणीपुरवठा करण्यात येत आहे. केळझर धरणातील तिसरे व अखेरचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. आवर्तनामुळे आरमनदीला पाणी येऊन आठ दिवस पाण्याचा लाभ मिळू शकेल.
योजनांवरच भर
तालुक्यातील भारत निर्माण व पेयजल योजनेंतर्गत अनेक गावांच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना धूळखात आहेत. किंबहुना ग्रामपंचायत व ठेकेदारांच्या हातमिळवणीमुळे देखील कृत्रिम पाणीटंचाईचा फटका बसत आहेत. औदांणे पाच गांव पाणीपुरवठा योजना, ताहाराबाद पाणीपुरवठा योजना, अंबासन पाणीपुरवठा योजना, तिळवण पाणीपुरवठा योजना, सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केळझर पाणीपुरवठा योजनांवर प्रकाशझोत टाकणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट