गुरूचा सिंह राशीत प्रवेश झाला आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे पडघम वाजू लागले. सिंहस्थ कुंभमेळा हा फक्त स्नानाचा कार्यक्रम नसून त्यातून मानव कल्याण पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मानवता स्थापित करून दानवांचा संहार करण्याचे हे पर्व असल्याचे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी यावेळी मांडले.
रामकुंड येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजरोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भाजी बाजाराच्या पटांगणांत सभेचा कार्यक्रम पार पडला. या सभे दरम्यान मार्गदर्शन करताना ग्यानदास महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाही मिरवणुकीत किंवा स्नानात साधू महंताचे स्थान दुय्यम असते. शाहीस्नान हे साधू महंतांच्या इष्ट देवातांचे असते. त्यांचे स्नान आटोपल्यानंतर आम्ही साधू महंत स्नान रूपी प्रसादाचा लाभ घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शहरात दाखल होणार आहेत. त्यांचा योग्य सन्मान राखण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पवित्र पर्वाची सुरुवात मंगळवारी झाली. कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सरकार, प्रशासन साधू-महंतासमवेत सर्वसामन्यांचा पुढाकार आवश्यक असून त्यातूनच या सोहळ्याचे यथार्थ चित्रण जगभरात पोहचणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. विश्वकल्याणाची संकल्पना या कुंभमेळ्यात रुजण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. हरितकुंभ ही संकल्पना अत्यंत यशस्वी होत असल्याचा दावा करीत त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनात कोणतीही कमी राहणार नसल्याचे पालकमंत्र्यानी केले. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुध्दा आयोजनाचे कौतुक करीत यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. समाजाच्या सकारात्मक शक्तीचा योग्य वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभागी झालेल्या विविध संस्था तसेच व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जगदगुरू हंसदेवाचार्यजी महाराज, जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, महंत ग्यानदासजी महाराज, जगदगुरू हंसदेवाचार्य महाराज, जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज, दिगंबर आखाडा प्रमुख रामकृष्णजी महाराज व रामकिशोर दास महाराज, निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत धरमदासजी महाराज, निर्मोही आखाड्याचे प्रमुख राजेंद्रदास महाराज, वल्लभपीठाचे आचार्य वल्लभाचार्य महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, महंत भक्ती चरणदास महाराज आदी उपस्थित होते.
महाजन, महाराज कसे झाले?
पालकमंत्री गिरीश महाजन अनेक महिन्यांपासून कुंभमेळा आयोजनात आहेत. नियोजनात व्यग्र असलेले मंत्री मंडळातील सहकारी महाजन हे महाराज कधी झाले हे कोणालाच समजले नाही, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगताच उपस्थित सर्वांना हसू फुटले.
भक्तगणांची उपस्थिती
नाणिज पीठाचे जगदगुरू नरेंद्र महाराज यांनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हजेरी लावली. यावेळी महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने हजर होते. 'नरेंद्र महाराज की जय' अशा घोषणा त्यांच्या भक्तांनी दिल्या.
स्टेजवर गर्दी
गौरी पटांगणावर व्हीआयपी येणार असल्याने निमंत्रितांना सोडावे असे आदेश होते. मात्र, पोलिसांनी ओळखपत्र असलेल्यांना सोडले. त्यामुळे नगरसेवक पोलिसात शाब्दिक चकमकी झडल्या.
शैव-वैष्णवांमध्ये दुरावा कायम
महाराष्ट्र हे महान राष्ट्र असून येथील जनता प्रेमळ आहे. मुख्यमंत्र्यांना एकच काम नसते. त्यामुळे, एखाद्या महंतांनी ते भेटत नाही म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा करणे योग्य नसल्याची भूमिका महंत ग्यानदास महाराज यांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडली. त्र्यंबकेश्वरमधील शैव आखाड्यांचा तसेच तेथील महंताचा नामोल्लेख त्यांनी टाळाला असला तरी शैव वैष्णव आखाड्यांमध्ये अजूनही मतभेद कायम असल्याचे यातून स्पष्ट झाले. हा वाद प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार असून मंत्री व अधिकारी वादाचा किल्ला कसा लढवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट