अरविंद जाधव, नाशिक
साधुग्राममधील जागेची कमतरता आता वादाचे कारण बनत असून हक्काच्या जागेसाठी साधू-महंत आपापसात संघर्ष करीत आहेत. रामसृष्टीमधून औरंगाबादरोडवरील सेक्टर तीनमध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या खालशांच्या जागेवरून सामेवारी वाद झाला. निर्वाणी आखाड्याचे महामंत्री गौरीशंकरदास यांनी लाकडाच्या सहाय्याने प्लॉटमधील पत्रेच पाडून टाकले. तसेच दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकृष्णदास शास्त्री यांनाही धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
साधुग्रामच्या २०० एकर जागेत सव्वाशे एकर जमिनीची यंदा वाढ करण्यात आली. तरीही सध्या खालशांना जागेसाठी मरमर करावी लागते आहे. गुरूपौर्णिमेनंतर साधू-महंत साधुग्राममध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली असून जमिनीची उपलब्धता हा वादाचा विषय ठरतो आहे. काही दिवसांपूर्वी रामसृष्टी प्रकल्पात वसलेल्या २५ ते ३० खालशांना औरंगाबाद रोडवरील मिर्ची ढाब्याच्या अलिकडे, मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले. तेथे रस्त्याच्या कडेलाच तीन ते चार प्लॉट असून त्यांच्या वाटपावरून वादाची ठिणगी पडली. निर्वाणी आखाड्याचे महामंत्री गौरीशंकरदास आणि दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकृष्णदास शास्त्री यांच्यात बचाबाची झाली. दोन्ही आखाड्याच्या खालशांना एकाच ठिकाणी जागा देण्यात आली असून कोणाला किती प्लॉट मिळाला यावरून या वाद वाढला. गौरीशंकरदास यांनी तेथेच पडलेल्या बल्लीच्या सहाय्याने प्लॉटमध्ये टाकण्यात आलेले पत्रे पाडून टाकले. त्यास रामकृष्णदास यांनी हरकत घेतली असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. महंत भक्तीचरणदास यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो विफल ठरला. आपण दिलेल्या खालशालाच जागा मिळणार, असा दावा करीत महामंत्री तेथून निघून गेले. यानंतर रामकृष्णदास शास्त्री, दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. झालेला प्रकार दुर्दैवी असून यावर सकारत्मक मार्ग काढणार असल्याची माहिती भक्तीचरणदास महाराज यांनी दिली. साधू महंतांमध्ये साधुग्राममधील जागेवरून पेटलेला वाद कधी आणि कसा मिटणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
मोजणीची डोकेदुखी
नाशिकमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा चांगल्या असून कुंभमेळ्यासाठी शतप्रतिशत खालसे हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, जागेचे वाटप यापूर्वीच झाले असून काहींना तीन तर काहींना एकच प्लॉट मिळाला आहे. गुरूपौर्णिमेनंतर साधु महंत साधुग्राममध्ये दाखल होत असून प्लॉटचा मोजणीचा अंदाज येत नसल्याने वादाला हवा मिळत आहे. पैशांची देवाण घेवाण हा सुध्दा मुद्दा असून याबाबत बोलण्यास कोणीही राजी होत नाही. दरम्यान, अनेक खालसे जागेपासून वंचित असल्याबाबत महंत ग्यानदास यांच्याकडे विचारणा केली असता, १० ते २० खालशांचा प्रश्न असून त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे ग्यानदास महाराजांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट