त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवार पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असून, दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची तारांबळ उडाली. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत असून, मंदिर दर्शनबारीच्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे. काही हजार किलोमीटर अंतरावरून आलेले हजारो भाविक दर्शनापासून वंचित राहण्याचे प्रकार दररोज घडत होते. यामुळे रात्री एक ते तीन या कालावधी व्यतिरिक्त मंदिर कायमस्वरुपी उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहाटे सुरू झालेली दर्शनरांग काही वेळातच शहराच्या एका टोकापासून विस्तारत दुसऱ्या टोकाला पोहचते. किंबहुना कित्येक भाविक दर्शनबारी आणि परिसरातच मुक्काम ठोकत आहेत. दोन दिवसांपूर्वी पाऊस नव्हता, तेव्हा रस्त्यावर मिळेल तेथे पथाऱ्या टाकून भाविक झोपत होते. परंतु, पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांचे हाल होत आहेत.
मध्यंतरी काही दिवस सर्व शहरात दर्शनरांग पोहचल्याचा अद्भुत प्रकार पहावयास मिळाला आहे. दर्शनरांग पूर्वदरवाच्या बाजुने स्मशानघाट तेथून अहिल्या नदीच्या बाजूने बडा उदासीन ते नया उदासीन, टेलिफोन एक्सचेंज तेथून एमटीडीसी चढ चढून आणि उतार उतरून निर्मल पंचायती आखाड्याच्या बाजूने देशमुख चौकातून पुन्हा निवृत्तीनाथ मंदिराकडे पोहचल्याने शहरभर भाविक रांगेत उभे असलेले दिसत होते. विशेष म्हणजे गर्दीच्या कालावधीत भाविक कुशावर्तावर चांगलीच रपेटमारून शहराला फेरा देऊन आणल्यानंतर दर्शनासाठी असलेल्या भाविकांना मेनरोडने सोडण्यात येत होते. दर्शनबारीच्या मंडपात पोहचलेले भाविक रात्री अकरा वाजेपर्यंत दर्शनासाठी प्रतीक्षा करीत होते. हजारो भाविकांना मंदिराचा कळस देखील दिसलेला नाही. यामुळे भाविक दर्शनापासून वंचित राहू नये म्हणून रात्री एक ते तीन या कालावधीतच साफसफाईसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट