म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लाखो रुपयांच्या अग्निशमन यंत्रणेच्या मुद्द्याचा साधा उल्लेखही न होता मासिक वर्गणी १० वरून २० रुपये करीत सावानाची २०१३ ते २०१५ ची वार्षिक सर्वसाधारण वादविवाद पार पडली. सावानाचे सभासद करून घेणे ऑडिटमुळे काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते, हा मुद्दा ऐरणीवर आणत जुन्या सभासदांनी नव्यांना सभासदत्वासाठी वेटिंगवर ठेवू नये, त्यांना तत्काळ सभासद करून घ्यावे, अशी एकमुखाने मागणी केली. या मागणीला कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी संमती दर्शवित लवकरच सभासदत्व देणे सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सावानाच्या स्व. माधवराव लिमये सभागृहात ही सर्वसाधारण सभा झाली. राष्ट्रगीताने सभेची सुरुवात झाली. सर्वप्रथम नरेश महाजन यांनी दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर अभिजीत बगदे यांनी इतिवृत्त वाचन केले. या वाचनानंतर सभासद वसंत खैरनार यांनी सरकारवाड्याच्या जागेचा मुद्दा सभेपुढे ठेवत ही जागा अखत्यारणाबाबत काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी 'ही जागा आता पुरातत्त्व खात्याच्या मालकीची झाली आहे. आमचे प्रयत्न थकले आहेत. दिल्लीत ओळख असेल त्यांनी आपले वजन वापरून ही जागा वाचनालयाला मिळवून द्यावी, असे आवाहन केले. त्यानंतर सभासदत्त्वाचा मुद्दा मुख्यत्वाने पुढे आला. त्यावर कार्यवाहांनी संगणक बंद अवस्थेत आहेत ते सुरू झाले की सर्व कामाला व्यवस्थित सुरूवात होईल, असे सांगितले.
सत्ताधाऱ्यांनी सुडाच्या भावनेने सावानाचे माजी कार्यवाह श्रीकांत बेणी, माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, हेमंत देवरे व श्रीकृष्ण शिरोडे यांचे सभासदत्त्व रद्द केले आहे. त्यांना पुन्हा सन्मानाने घ्या, अशी एकसुरात मागणी काही सभासदांनी केली. त्यावर प्रचंड गदारोळ झाला. कार्यवाह यांनी घटनेचा आधार घेऊनच त्यांचे सभासदत्त्व रद्द केल्याचे सांगत सभा पुढे नेली.
सावानासाठी खासदार व आमदार निधीतून ५० हजार रुपयांची पुस्तके मिळतात. परंतु, सावानाने कधीच अशा पुस्तकांसाठी पत्र पाठवलेले नाही. सध्याची कार्यकारिणी ही पाठपुरावा करण्यात कमी पडते, असे सांगत सभासदांनी चांगलेच कोरडे ओढले. त्यावर कार्यवाहांनी एकाच विषयावरील पुस्तके मिळत असतात, पुस्तक निवडीचे स्वातंत्र्य नसते असे सांगितले. पां.भा. करंजकर यांनी पोलिस संरक्षण का मागितले, अशी विचारणा केली तर हंसराज वडघुले यांनी काही सभासदांना कोणत्या घटनेच्या आधारे काढले असे प्रश्न विचारले. संविध इन्फोटेक कंपनीने सावानाला स्मार्ट कार्ड बनवून दिले होते, त्याचे काही पेमेंट बाकी असल्याचा मुद्दा मनोज चव्हाणके यांनी उपस्थित केला. परंतु, हा मुद्दा वैयक्तिक असल्याने सावाना कार्यालयात येऊन मिटवावा, असे कार्यवाहांनी सांगितले. वसंत खैरनार यांनी कार्यकारिणीवर आरोप केला की प्रदर्शनासाठी सूडबुध्दीने हॉल दिला नाही. परंतु, त्यावर कार्यवाहांनी काहीही प्रतिक्रिया न देता सभा पुढे नेली. यावेळी व्यासपीठावर कार्यवाह मिलिंद जहागिरदार, अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रा. विनया केळकर, नरेश महाजन, अभिजीत बगदे यांची उपस्थिती होती.
सभासदांच्या प्रमुख मागण्या
नव्यांना तत्काळ सभासद करून घ्यावे.
कर्मचाऱ्यांचा पगार वाढविण्याचा विचार करावा.
कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड असावा.
सर्वांसाठी दप्तरे खुली करून द्यावीत.
सभासदांना पत्राऐवजी एसएमएस पाठवावेत.
खासदार-आमदारांना पत्र लिहून पन्नास हजारांची पुस्तके मिळवावीत.
राज्यघटनेवर आधारित पुस्तके सावानात वाढवावीत.
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाची कोनशिला वर बसवावी.
यशवंतराव चव्हाण यांचा फोटो दर्शनी भागात लावावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट