Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बँक खात्यातून ६५ लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक नेटबँकिंगसाठी वापरला जाणाऱ्या रजिस्टर मोबाइल क्रमांकाचा वापर करीत एका हॅकरने राका कॉलनीत राहणाऱ्या व्यावसायिकाच्या बँक खात्यातील ६५ लाख १० रुपयांवर डल्ला मारला आहे. सरकारवाडा पोलिसांनी आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिसांचे दोन पथक या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात गुंतले आहेत. राका कॉलनीतील पूनम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दिनेश प्रकाश बदलानी (३७) यांच्या बँक खात्यात तांत्रिक हेरफार करीत संशयितांनी ६५ लाख १० हजार रुपये काढून घेतले. नेटबँकिंगसाठी रजिस्टर मोबाईल नंबरचा वापर केला जातो. बदलानी यांनीही ९३७३९०११९१ हा मोबाइल नंबर बँकेकडे रजिस्टर केला होता. आरोपींनी हाच नंबर सुरुवातीस बंद करून तोच नंबर पुन्हा मिळवला. या मोबाइल नंबरच्या मदतीने चोरट्यांनी पासवर्ड व इतर माहिती हॅक करण्यास सुरूवात केली. चोरट्यांनी आयसीआयसीआय बँक सांताक्रुझ, मुंबई, विजया बँक मुंबई, तसेच एचडीएफसी बँक गोमतीनगर, उत्तरप्रदेश या बँकांचे पासवर्ड एकएक करीत हॅक केले. पासवर्ड हॅक केल्यानतंर चोट्यांनी बदलानी यांच्या खात्यातील ६५ लाख १० हजार रूपये वरील तीन खात्यात वर्ग केले. दरम्यान, बदलानी यांनी बँकेचे व्यवहार तपासले असता मोठी रक्कम इतर खात्यात वर्ग झाल्याचे निर्दशनास आले. त्यांनी तत्काळ ही माहिती बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला कळवली. हा चोरीचा प्रकार असावा, याची जाणिव झालेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी बदलानी यांना तत्काळ पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. खाते हॅक करून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम लंपास होण्याची ही पहिलीच घटना शहरात घडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीप्रश्नी सोमवारी विशेष महासभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातून महापालिकेला मिळणाऱ्या पाण्यात कपात झाल्याने उर्वरित काळात पाणीपुरवठा करणे कसोटीचे ठरणार आहे. पाणीप्रश्न बिकट होत असतांना उर्वरित पाण्याच्या नियोजन व चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. ३०) विशेष महासभा बोलवण्यात आली आहे. पाणीप्रश्नावरील महासभेतही भाजपला घेरले जाण्याची शक्यता असल्याने भाजप त्याचा कसा सामना करते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

पाणीवाटपात नाशिकला गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी कमी मिळाले आहे. महापालिकेन या अगोदरच शहरात पाणीकपात केली असतांना त्यात पुन्हा कपात करावी लागणार आहे. तर दारणा धरणातून पाणी उचलण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. सध्याच्या आरक्षित पाणी ऑगस्टपर्यंत वापरण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. त्यामुळे उर्वरित काळात पाणीनियोजन करण्याची गरज असल्याने विशेष महासभा बोलविण्याची मागणी शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केली होती. सत्ताधारी मनसेने त्याची दखल घेत, स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या पत्राआधारे तातडीने विशेष महासभा आयोजित केली आहे.

यशवंत निकुळे, सुरेखा भोसले, मेघा साळवे, रत्नमाला राणे या सदस्यांनी महापौराना पत्र लिहून सभा घेण्याची मागणी केली. त्यामुळे ही तातडीने महासभा बोलविण्यात आली असून त्यात उर्वरित काळात पाणीवाटप कसे करायचे यावर खल केला जाणार आहे. पाण्याचे काटकसरीने वापर करण्यासह, अनधिकृत पाण्याचा वापर थांबवणे, नियमावली सक्त करणे यासह विविध उपाययोजनावर चर्चा केली जाणार आहे.

स्थायीची आज सभा

महापालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवारी (दि. २७) सभा होत असून त्यात मखमलाबाद येथील कचरा डेपोचे आरक्षण वाचवण्याचा बदल्यात ३९ कोटीचा आर्थिक मोबदला देण्याच्या विषयांसह, वृक्षारोपण व गोदावरी स्वच्छतेच्या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीची सभा होत आहेत. त्यात मखमलाबाद येथील ४१ हेक्टर कचरा डेपोची जागा वाचवण्यासाठी भूसंपादन मोबदला म्हणून ३९ कोटी रुपये अदा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सोबतच साडेचार कोटी रुपये खर्च करून शहरात वृक्षारोपण करण्याचे प्रस्ताव ठेवण्यात आले तर गोदावरी नदीतील पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा साफ करण्यासाठी महापालिका तीन महिन्यांच्या कालावधीसाठी फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिन भाडेतत्त्वावर घेणार आहे. यासाठी दिवसाला एक लाख १० हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे ठेकेदाराला ९९ लाख रुपये भाडे देण्याचा प्रस्ताव आहे. या तीनही प्रस्तांवावरून वादळी चर्चा होणार आहे.

भाजपची पुन्हा कोंडी

पाणीप्रश्नावर यापूर्वी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी भाजपची कोंडी केली होती. त्यावेळी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. तर आताही शिवसेनेचीच मागणी होती. त्यामुळे या सभेतही भाजपची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपचे सरकार असल्याने आज ही परिस्थिती ओढावल्यानेच भाजपला सर्वपक्षीयांकडून घेरले जाण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसेनेकडून भाजपला पुन्हा आव्हान दिले जाईल. त्यामुळे भाजपला महासभेत होणारा हल्ला रोखण्यासाठी रणनीती तयार करावी लागणार आहे. आमदारांसह नगरसेवकांना अभ्यास करूनच महासभेचा सामना करावा लागणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेंटावॅलंट’ लसीकरणास प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

लहान वयातील बालकांना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी व लहान मुलांचे मृत्यूदर कमी करण्यासाठी पाच रोग प्रतिबंधकांचा समावेश असलेली पेंटावॅलंट लस देण्यास प्रारंभ झाला. ही लस मोफत देण्यात येणार आहे. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात (डीपीटी), हिपॅटायटिस-बी या पूर्वीच्या लसींबरोबर आता नव्याने 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप-बी' या आजाराच्या लशीचा समावेश केला आहे.

पाच आजारांना प्रतिबंध करणारी ही पेंटावॅलंट लस नोव्हेंबरपासून राज्यभरात सर्वत्र देण्यात येणार असल्याची बातमी 'मटा'ने सर्वप्रथम दिली होती. 'पेटावॅलंट' ही पाच आजारांना रोखणारी लस आहे. राज्यातील २१ लाख बालकांना ही लस मोफत दिली जाईल. पूर्वी चार आजारांपासून रक्षण करणाऱ्या दोन लशींचे तीनदा डोस द्यावे लागत होते. त्यासाठी सहा वेळा सुई टोचली जात होती. आता पाच आजारांसाठी एकदाच सुई

टोचावी लागणार आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी 'मटा'ला दिली. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा हॉस्पिटल; तसेच महापालिकेच्या हॉस्पिटलमध्येही लस उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून

२१ लाख डोसेस उपलब्ध करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षातून तीन वेळा लस

'पेंटावॅलंट' लस ही दीड महिना, अडीच आणि साडेचार महिन्याच्या बालकांना वर्षातून तीनदा दिली जाईल. लहान मुलांमध्ये न्यूमोनिया, मेंदूज्वर ही मृत्यूची कारणे समजली जातात. मुलांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी 'पेंटावॅलंट' लस उपयुक्त ठरणार आहे. न्यूमोनिया; तसेच मेंदूज्वराचा आजार तसेच मृत्यू रोखण्यासाठी 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप' ही लस अंत्यत फायदेशीर आहे,' अशी माहिती आरोग्य परिमंडळाच्या पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी दिली.

शहरात मंगळवारपासून सेवा

'पेंटावॅलंट' लसीकरणास नाशिक महापालिकेकडून येत्या मंगळवारपासून म्हणजेच एक डिसेंबरपासून सुरुवात केली जाणार आहे. यासाठी शहरात १७ केंद्र निवडण्यात आले आहेत. याशिवाय नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, पंचवटीमधील इंदिरा गांधी रुग्णालय, जुने नाशिकमधील डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय आणि मोरवाडीमधील स्वामी समर्थ रुग्णालयात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार, बुधवारी व शुक्रवार लसीकरण केले जाणार आहे, अशी ल महापालिकेच्या प्रमुख हॉस्पिटलसह प्रभागांमधील महत्त्वाच्या आरोग्य केंद्रांमधून बालकांना या लसी दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक बी. आर. गायकवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णजडीत काळाराम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वर्षानुवर्षे काळ्या पाषाणात‌ील दागिन्यांनीच सुशोभित दिसणारा काळाराम आता सुवर्णालंकारांनी मंडित झाला असून, दर्शनाचे अभिलाषी असणाऱ्या भाविकांची 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' अशी भावविभोर अवस्था झाली आहे. देवदिवाळीचा मुहूर्त साधत कृतिका नक्षत्रावर हे दागिने तिन्ही मूर्तीना अर्पण करण्यात आले. सुवर्णजडीत काळारामाचे हे रूप अनेक उत्सवांमधून भाविकांच्या मनाचा वेध घेणारे ठरणार आहे.

काळाराम मंदिरात अनेक भाविक दान करीत असतात. यात चोख सोने, बिस्किटे याचा समावेश असतो. हे सोने तिजोरीत पडून न राहता प्रत्यक्ष रामरायाच्या आणि लक्ष्मण व सीतामातेच्या अंगावर त्यापासून घडविलेले दागिने असावे अशी कल्पना विश्वस्त मंडळाने मांडली होती. या कल्पनेला प्रतिसाद देत रामरायासाठी दागिने घडविण्यात आलेले आहेत. रामासाठी १० तोळ्याचा गळाहार, सीतामातासाठी ११ तोळ्याचा नेकलेस आणि लक्ष्मणासाठी भरजरी हार तयार करण्यात आला. राम व सीतेसाठी कोलकाताच्या कारागिराकडून हार तयार करून घेण्यात आले असून लक्ष्मणाचा हार मात्र गुरव अॅण्ड सन्स यांनी बनवला आहे. भारतीयांचा मुख्य सण असलेल्या दिवाळीमध्येच हे दागिने रामरायाला अर्पण करण्याची सर्वांची इच्छा होती; परंतु कारागिराकडून ते दागिने तयार न होऊ शकल्याने अर्पण करण्याची तिथी लांबली असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले.

दागिने बनविण्याची कल्पना विश्वस्त पांडुरंग बोडके, अॅड. अजय निकम, गिरीश पुजारी, वैभव पुजारी, मंदार जानोरकर, मंडालेश्वर काळे, ओमप्रकाश लोहिया, डॉ. अतुल वडगावकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी यांची होती. रामरायाला हे दागिने अर्पण केल्यानंतर विश्वस्तांनी गाभाऱ्यात महापूजा केली.

रामरायासाठी अनेक भाविक सोन्याच्या चीजवस्तू दान करीत असतात. त्यात चोख सोने, दागिने आणि बिस्किटांचा समावेश असतो. या सोन्याचा उपयोग करून मूर्तीसाठी कलाकुसर असलेले दागिने बनविण्यात आले असून रामराया, सीतामाता व लक्ष्मण यांच्या मूर्तीला अधिक झळाळी त्यामुळे प्राप्त झाली आहे. - पांडुरंग बोडके, विश्वस्त, काळाराम मंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यक्षमताच पालिकेच्या मुळावर !

$
0
0

अधिकच्या एलबीटी वसुलीने अनुदान कपातीचे संकट म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या एलटीबी धोरणात बदल होऊनही पूर्ण कार्यक्षमतेने एलबीटीची वसुली करण्याऱ्या नाशिक महापालिकेची कार्यक्षमता त्यांच्या मुळावर आली आहे. प्रशासनाच्या चांगल्या नियोजनामुळे अंदाजापेक्षा शंभर कोटी अधिक एलबीटी वसुली होणार आहे. मात्र शासन ७५० कोटीच्या उत्पन्नावरच अनुदान देणार असल्याने जानेवारीपासून पालिकेच्या अनुदानात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च हे तीन महिने महापालिकेसाठी कसोटीचे ठरणार आहेत.

राज्य सरकारने १ ऑगस्टपासून एलबीटी धोरणात बदल करत, ५० कोटीवर उत्पन्न असलेल्या उद्योग व व्यापाऱ्यांनाच एलबीटी लागू केली आहे. महापालिकेची बुडणारी एलबीटी सरकार अनुदान म्हणून महापालिकेला देते. महापालिकेचे वार्षिक उत्पन्न ७५१ कोटी गृहीत धरून सध्या सरकार ४६ कोटीचे अनुदान दरमहा देत, तर महापालिका दरमहा सरासरी ३० ते ३५ कोटी एलबीटी वसुली करत आहे. एलबीटी विभागाने कार्यक्षम पद्धतीने वसुली करत आपल्या वाट्यातील उत्पन्नात भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे मार्चपर्यंत महापालिकेचे उद्दिष्ट हे ८२५ ते ८५० कोटीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा तब्बल ७५ ते १०० कोटी रुपये अधिकचे वसूल होणार आहेत. मात्र महसूल वसुली चांगली होणार असली तरी, त्याचा फटका पालिकेलाच बसणार आहे. उद्दिष्टापेक्षा चांगली वसुली झाल्यास सरकार अनुदानापोटी दरमहा देत असलेल्या ४६ कोटींच्या अनुदानात कपात करणार आहे. जानेवारीपासून ही कपात लागू होण्याची शक्यता असल्याने महिन्याला सरासरी फक्त २० कोटीच्या आसपासच अनुदान मिळणार असल्याने पालिकेच्या विकासकामे व अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. चांगली वसुली करूनही महापालिकेला व नाशिककरांना याचा फटका सहन करावा लागणार असल्याचे दिसते.

महापालिकेची तीन महिने कसोटी

जानेवारी ते मार्च असे तीन महिने हे पालिकेसाठी आर्थिक उलाढालीचे असतात. त्याच काळात शासनाच्या अनुदानात मोठी कपात होईल. तर बिलांची उलाढाल याच काळात सर्वाधिक असते. अनुदानातील कपात ही आर्थिक डोलारा कोसळण्यावर होण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे हे तीन महिने कसोटीचे ठरणार असून, महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हटके गिफ्ट रॅपिंगचे धडे

$
0
0

गिफ्ट उघडण्याआधी त्याच्या पॅकिंगकडेही लक्ष आकर्षिले जाते. हटके गिफ्टसोबतच त्याचं पॅकिंगदेखील हटके करता यावं यासाठी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. क्राफ्ट एक्सपर्ट शुभांगी बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागींनी आकर्षक गिफ्ट रॅपिंगचे धडे गिरवले. यावेळी 'गिफ्ट रॅपिंग कसे करावे' याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सॅटीन, रिबीन, उली पेपर, हॅन्डमेज पेपर, पतंगीचा पेपर, न वापरलेले कापड, फुले, पीसे, नेट, गिफ्ट रॅपर यांचा वापर करून आकर्षक गिफ्ट रॅपिंग कसे करता येईल याविषयी सांगण्यात आले. यामध्ये टेडी बेअर, चॉकलेट यांसाठी कसे गिफ्ट रॅपिंग करावे हे शिकविण्यात आहे. गिफ्टच्या आकारप्रकारानुसार डेकोरेशन करण्याचे तंत्र यावेळी शिकविण्यात आले. गिफ्ट रॅपिंगच्या नवनवीन कल्पनादेखील सहभागींना या वर्कशॉपमध्ये पाहायला मिळाल्या. काडीपेटी, सुतळी, पिंपळपान यांचा डेकोरेशनसाठी वापर कसा करावा याविषयीच्या टिप्स वर्कशॉपमध्ये मिळाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा शहरवासीयांना तीन दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सटाणा नगरपरिषदेने तीन दिवसाआड नळपाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रात चणकापूर व पुनद धरणातून पाणीपुरवठा होत असतो. गत पावसाळ्यातील गणेशोत्सव कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे चणकापूर व पुनद धरण वाहू लागले होते. यामुळे गिरणा नदीतील पाणी ऑक्टोबरपर्यंत सुरू होते. यानंतर गिरणा नदीपात्रातील विहिरीतील जलस्त्रोत टिकून असल्याने शहराला पाणीपुरवठा होत होता. मात्र, गिरणा नदीपात्र कोरडे होऊन पाणीपुरवठा करण्यास गैरसोय झाली आहे. यामुळे आगामी काळात चणकापूर अथवा पुनदचे आर्वतन मिळाल्यास गिरणानदी वाहू लागल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. ऐन हिवाळ्यात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास पालिका प्रशासनाने प्रारंभ केला आहे. यामुळे शहरवासीय संताप व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णा मंदिर परिसराला पर्यटन विकासाची प्रतीक्षा

$
0
0

देवळालीगावाजवळ रोकडोबावाडीत चार वर्षापूर्वी एक एकरमध्ये हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. देशात पॉण्डेचेरीनंतर नवग्रहांची मंदिरे फक्त येथेच आहेत. दाक्षिणात्य शैलीतील या मंदिरातील मूर्ती काळ्या पाषणातील आहेत. गणेशाची ४२ फुटांची चुतर्रमुखाची भव्य मूर्ती फक्त येथेच आहे. ऊन व पावसापासून संरक्षणासाठी या मूर्तीला सिमेंट व जर्मन पॉलिसीचा मुलामा देण्यात आलेला आहे. रुद्राक्ष महादेव, चामुंडादेवी कार्तिकेय तसेच दत्तगुरुंचेही मंदिर आहे. शिव परिवारातील सर्व सदस्य येथे एकाच ठिकाणी आहेत. चेन्नईच्या कारागीरांनी दोन वर्षात ही मंदिरे उभारलेली आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण नक्षत्रवनम एक एकरचा परिसर अत्यंत स्वच्छ असून अनेक वैशिष्ट्यपूर्ण फुलझाडे येथे आहेत. जास्वंदाची सर्व रंगातील फुलेझाडे, पिवळे, केसरी व पांढरे झेंडू, २१ गणेश पत्रींची झाडे, सोळा प्रकारची तुळस नवग्रहांची तसेच नक्षत्रांची २७ सर्व झाडे, औषधी वनस्पती येथे आहेत.

पार्किंग, कठडे हवेत कार्तिक पौर्णिमा, गणेश जयंती, अंगारकी चतुर्थीवेळी येथे भाविकांची गर्दी असते. शेजारीच वालदेवी नदी आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग अरुंद आहे. वाहने नदीत कोसळण्याचा धोका असल्याने येथे संरक्षण कठडे हवेत. पार्किंग व्यवस्था प्रशस्त करावी. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नदीच्या उतारावर लोकांनी कचराकुंडी केली आहे. पर्यटन विकसासाठी नाशिक दर्शनमध्ये या स्थळाचा समावेश केल्यास आणि महत्त्वाच्या ठिकाणी मंदिराचे फलक लावल्यास भाविकांचा ओघ वाढून रोजगार निर्मिती होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेणुकानगर सोसायटीची रविवारी निवडणूक

$
0
0

सन १९८० साली निर्माण झालेली रेणुकानगर सोसायटीमध्ये तीन मजलीच्या एकूण २६ इमारती आहेत. यात साडे तिनशे फ्लॅट आहेत. जिल्हा परिषदचे तत्कालीन अध्यक्ष मधुकर सोनवणे यांनी ही सोसायटी उभारली आहे. महिला बँकेच्या डॉ. शशीताई अहिरे यांचे एकता पॅनल आणि विरोधकांचे विकास पॅनल निवडणूक रिंगणात आहे. सोसायटीत अतिक्रमणे वाढली असून विकासासाठी सत्तारुढ पॅनलने कोणतेही प्रयत्न केले काही. याउलट सोसायटीवर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असल्याचा आरोप विकास पॅनलने केला आहे. रेणुकानगर सोसायटीचा विकास साधून सभासदांचे फ्लॅटचे खरेदीखत करून सातबारावर नावेनोंदणी करण्याचा आणि इमारतीनुसार स्वतंत्र सोसायटी नोंदणी करण्याचे आश्वासन विकास पॅनलने दिले आहे. तर गेल्या २५ वर्षांपासून संघर्ष करून विकास साधला आहे. यापुढेही विकासाची मालिका सुरू राहील, असा जाहीरनामा सत्ताधारी एकता पॅनलने मतदारांपुढे मांडला आहे. दरम्यान, रेणुकानगर सोसायटीत उखडलेले रस्ते, पाणीप्रश्न, तुटलेल्या सरंक्षक भिंती, अंधाराचे साम्राज्य, वाढत्या चोऱ्या, गुंडांचा हैदोस आदी समस्या असल्याचे रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन लाखाचा ऐवज लुटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

येथील स्टेशन रस्त्यावरील गुंजाळ पेट्रोल पंपासमोरील मे. जे. आर. ठाकूर या सराफी दुकानाची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांने सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले. यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुकानचालक नितीन शांताराम ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादी दिली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी (दि.२६) १० वाजता दुकान उघडले असता दुकानातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची वायर व एक कॅमेरा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. दुकानामागील खोलीतील मागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करताच प्रथम सीसीटीव्ही फुटेजची वायर व एक कॅमेरा तोडून दुकानातील १०० ग्रॅम वजनाची सोन्याची मोड व काऊंटरमधील ड्रावरमध्ये ठेवलेले चांदीच्या तोरड्या, जोडवे, सरी, कडे असा १० किलो चांदीचा असा अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपयाचा ऐवज चोरी झाला आहे.

दुकानातील उर्वरित सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये पहाटे ३.३७ ला दुकानात शिरलेला २० ते २५ वयोगटातील अज्ञात चोरटा शरीराने मजबूत तरूण, तोंड बांधलेले तसेच हातात ग्लोज घालून मोबाइल बॅटरीच्या उजेडात काऊंटरमधील प्रत्येक कप्पे हाताळतांना दिसून आला. घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक आवारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनाही मायेचा फुटतो पाझर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

लहान मुलांमधील निरागसता आमच्यासारख्या कठोर प्रसंगांना सामोऱ्या जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना देखील मायेचा पाझर फोडते. लहान वयातच अशा प्रकारचे चांगले ज्ञान व चांगले संस्कार मिळणारे मुले खरोखरच भाग्यवान असल्याचे प्रतिपादन सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी केले.

येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्ट वतीने आयोजित साने गुरूजी कथामाला व संस्कार शिबिराच्या सांगता समारंभाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड होते. यावेळी पी. टी. पाटील म्हणाले की, संस्कार शिबिरात पूज्य साने गुरूजींचे संस्कारांचे बाळकडू आपण विसरायला नको. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा साने गुरुजींचा एकमेव मंच जो आपण सर्वांनी आचरणात आणला तरी या शिबिराची यशस्वीता झाली, असे म्हणता येईल असे ही उद्गार पाटील यांनी काढले.

काकडे गुरूजी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा. बी. जी. पगार, प्रा. बी. डी. बोरसे, किरण दशमुखे, सीमा सोनवणे, परचुरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास देवस्थानचे विश्वस्त बाबुराव सोनवणे, कौतिक सोनवणे आदी उपिस्थत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांना वाढीव अधिकार

$
0
0

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामे लागणार मार्गी; वन व महसूल विभागाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाटबंधारे प्रकल्पांमुळे बाधितांचे पुनर्वसन करताना नवीन गावठाणात उपलब्ध करून द्यावयाच्या नागरी सुविधांच्या कामांना आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देऊ शकणार आहेत. एक कोटी रुपयांपर्यतच्या कामांना जिल्हाधिकारी तर १० कोटींपर्यंतच्या कामांना विभागीय महसूल आयुक्त मंजुरी देऊ शकणार आहेत.

राज्यात अनेकदा नवीन प्रकल्प हाती घेताना काहीवेळा संपूर्ण गावाचे तर, काहीवेळा गावांमधील काही भागांचे पुनर्वसन करावे लागते. बाधितांच्या पुनर्वसन अधिनियमानुसार मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आराखडा बनविण्याचे आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली जाते. पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांची कामे जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत केली जातात. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव आणि माहिती जलसंपदा विभागाकडून जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना पुरविली जाते. पुनर्वसनाचे काम मागणीनुसार पूर्ण न झाल्यास प्रकल्पग्रस्तांकडून प्रकल्पांची कामे रोखली जातात. परिणामी प्रकल्पही रेंगाळत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच पुनर्वसनाचे अधिकार त्या त्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीण मुंढे यांनी हा निर्णय १९ नोव्हेंबरला निर्गमित केला आहे.

त्यानुसार प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांच्या प्रकल्प आराखडयातील एक कोटी रुपयांपर्यंतच्या कामांच्या अंदाजपत्रकास वित्तीय आणि प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर १० कोटींपर्यंतच्या कामांना मान्यता देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असणार आहेत. त्याहून अधिक रकमेच्या कामांना मात्र राज्य सरकारकडून प्रशासकीय मंजुरी आवश्यक असणार आहे. या निर्णयामुळे कामांना होणारी दिरंगाई टळू शकणार असली तरी निधीच्या उपलब्धतेवरच अंमलबजावणीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा महिन्यांनी मिळाले जिल्हा पुरवठा अधिकारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यात निलंबनाच्या कारवाईनंतर रिक्त झालेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर आर. एम निफाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहा महिन्यांनंतर जिल्ह्याला पूर्णवेळ जिल्हा पुरवठा अधिकारी मिळाले आहेत. निफाडकर यापूर्वी याच पदावर यवतमाळमध्ये काम पहात होते.

सुरगाणा येथे झालेल्या कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यामुळे केवळ जिल्हा पुरवठा विभागाचीच नव्हे तर जिल्हा प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली. पाच कोटींहून अधिक किमतीच्या धान्याच्या अपहाराचा विषय राज्यभर गाजला. त्याची दखल घेऊन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तत्कालीन जिल्हापुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांच्यासह नऊ तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त होते. रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला होता. सुरगाणा धान्य घोटाळ्याची दखल थेट राज्य सरकारने घेतल्यामुळे या पदावर रूजू होण्यास कुणी फारसे इच्छुक नव्हते. या प्रकरणानंतर जिल्ह्यातील धान्य पुरवठा यंत्रणेवरही विपरीत परिणाम झाला. सुरगाणा घोटाळ्यात वाहतूक ठेकेदारावरही निलंबनाची

कारवाई झाल्याने वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. सोमवारपासून ते पदावर रूजू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात दारूबंदीचा निर्णय तूर्त अशक्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बिहारच्या धर्तीवर राज्यात दारूबंदी करणे तूर्त शक्य नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे महसूल व राज्य उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. राज्याला तब्बल वीस हजार कोटींचा महसूल हा दारूतूनच मिळत असल्याने राज्यात दारूबंदीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. हिवाळी अधिवेशनापूर्वीच राज्यमंत्री मंडळात फेरबदल केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सेना-भाजपात कुठलाही कलह नसल्याचा दावा त्यांनी केला.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना ना. खडसे म्हणाले की, बिहारने फक्त दारूबंदीची घोषणा केली. अजून दारूबंदी झालेली नाही. या धर्तीवर महाराष्ट्रात दारूबंदी हा निर्णय सध्यातरी शक्य नाही. दारूच्या महसुलातूनच राज्याला वीस हजार कोटींचा महसूल मिळतो. त्यामुळेच राज्यात दारुबंदी शक्य नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केलं. येत्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार हा होणारच असा दावाही केला. शिवसेना आणि भाजपात कुठलेही मतभेद नाहीत. उद्या उद्धव ठाकरे हे आपल्या मंत्र्यांसोबत मराठवाडा दौरा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवंत अनुभवाचे ‘फूटपाथ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे प्रस्तूत 'फूटपाथ' हे नाटक सादर करण्यात आले.

महात्मा गांधी मार्गावरील फूटपाथवर बबन, सावित्री हे जोडपे शरद, दारुड्या, तुक्या व शिरपा हे एकत्रित रहात असतात. दिवसभर भीक मागून खाणे, रात्री फूटपाथवर झोपणे असा दिनक्रम सुरू असतानाच फूटपाथवर अतिक्रमण केले म्हणून काही अधिकारी यांना तेथून निघून जाण्याची नोटीस देतात. त्यातच सुमी नावाची एक मुलगी त्यांच्याकडे येऊन रहाते. गुंडापासून बबन व शरद तिची सोडवणूक करतात. हे फूटपाथच घर असलेल्या बबन-सावित्रीला मोठा प्रश्न पडतो की आता जायचे कुठे? दुसऱ्या अनेक जागांचा शोध ते घेतात मात्र कोठेही जागा मिळत नाही. हवालदार मात्र फूटपाथवर रहायचे असेल तर रोजच दहा रुपये मागतो. हे पैसे आणावे कोठून असे शरद, शिरपा यांना वाटते. हवालदाराच्या माराला कंटाळलेल्या या माणसांकडे एक मोठा नेता येतो व मला मते द्या, मी तुम्हाला रहायला चांगली घरे देतो असे आमिष दाखवतो. मात्र, त्याचा फक्त बोलाचाच भात व बोलाचीच कढी असे त्याला हे सर्व भुलतात. अशा आशयाचे फूटपाथ हे नाटक होते. नाटकाचे लेखन प्रा. अरविंद चौधरी यांनी केले. दिग्दर्शन सुजय भालेराव यांनी केले. निर्मिती विजय मंगळे यांची होती. या नाटकात कार्टीन खैरनार, शीतल थोरात, निकिता पवार, कुणाल खैरनार, राहुल मंगळे, संजय विसपुते, प्रसेनजित जगदेव, विशाल महाले, सिध्दांत मंगळे व अब्दुल अन्सारी, रोहित लोहार, पूजा कासार, राजेश बिऱ्हाडे, हर्षल सोनवणे, ऋचिका पांडे, शिवांजली सापे, सौरभ कासार, चैतन्य मोरे, सनी चव्हाण, अक्षय मालुसरे यांनी भूमिका केल्या. नेपथ्य राहुल मंगळे, प्रकाशयोजना हेमंत कोतवाल, संगीत जयवंत पाटील, रंगभूषा सुजय भालेराव, वेशभूषा सीमा महाजन व रंगमंच सहाय्य हर्षल सोनवणे आणि सनी चव्हाण यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या नाशिकचा बदलणार चेहरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत रेट्रोफिटींगमध्ये महापालिका जुन्या नाशिकची पुर्नबांधणी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या गावठाण भागाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी रेट्रोफिटींग अंतर्गत करावयाच्या रिडेव्हलपिंगचे सादरीकरण लोकप्रतिनिधींसमोर केले.

जुन्या नाशिकमधील नदीच्या दोन्ही बाजूकडील सातशे एकरचा परिसर पर्यटन व सांस्कृतिकदृष्ट्या विकसीत केला जाणार असून, त्यासाठी दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे एवढ्या अवाढव्य प्रस्तावावर लोकप्रतिनिधीच सांशक झाले असून, त्यांनी आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार केला. वाढीव एफएसआय व पूररेषेतून हे शक्य असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या चार पर्यायांपैकी रेट्रोफिटींग हा एक पर्याय असून, यात शहरातील एका भागाची पुर्नबांधणी करण्याचा प्रस्ताव आहे. क्रिसीलने यासाठी जुन्या नाशिकची निवड केली असून, या भागाच्या करावयाच्या विकासाचे सादरीकरण महापौर, उपमहापौर, गटनेते व नगरसेवकांसमोर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

नदीकाठावरील सातशे एकरचा परिसर निवडून त्यात रिडेव्हलपिंग केले जाणार आहे. त्यासाठी वाढीव एफएसआयच्या प्रस्तावासह, हेरिटेज इमारतींचा पर्यटनासाठी विकास, नदीकाठावरील भागाचे राष्ट्रीय नदी पुर्नरुथ्थान योजनेअंतर्गत विकास करणे, नदी बाजूला सायकलिंग ट्रॅक, पादचारी मार्ग, मनपा इमारतीत म्युझियम, आनंदवल्ली ते टाळकुटेश्वर परिसरातील नदीकाठाचा पुर्नविकास करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आले. या भागातील नागरिकांना जादा एफएसआय देवून पुर्नविकास शक्य असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. त्यासाठी करवाढ करणेही आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आयुक्तांच्या सादरीकरणानंतर नगरसेवकांनी अरुंद रस्ते, इमारतीची उंची, वाड्यांचा वाद, भाडेकरूंचा प्रश्न, निधी कुठून आणणार अशा प्रश्नांची सरबत्ती लावली. क्लस्टरअंतर्गत हा विकास होवू शकतो असा दावा आमदार देवयानी फरांदे यांनी केला. तर वाढीव एफएसआयचा वापर या भागात करता येणे शक्य नसल्याचे उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी सांगितले. पूररेषेत बांधकामे कसे होणार, असा सवालही लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर सर्व काही शक्य असल्याचा दावा आयुक्तांनी केला.

करवाढ नको

स्मार्ट सिटी हवी असेल तर सध्याच्या मालमत्ता करासह, पाणीपट्टी करात वाढ करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगून वास्तवतेचा विचार करावा असे आवाहन केले. पंरतु, पुढे निवडणुका असल्याने वाढ करण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्याऐवजी सध्याच्या कररचनेतील त्रुटी दूर करून करवाढ करावी अशा सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला संविधान दिन साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

संविधान गौरव दिनानिमित्त नाशिकरोड परिसरातील शाळा, कॉलेजेस, शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमापूजन झाले. संघटनांतर्फे रॅली काढून संविधानाचे वाचन करण्यात आले.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अप्पर आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकात्मतेची प्रतिज्ञा दिली. उपायुक्त अनंत दहिफळे, सतिश

देशमुख, रावसाहेब बागडे, विकास शाखेचे नेमाने, तहसिलदार एस. डी. मोहिते, श्रीमती घाटगे, जी. के. पोटे, डी. एम. कासार, एस. एल. माळवे, ए. एम. चुंबळे आदी उपस्थित होते.

प्रेसमध्ये कार्यक्रम

प्रेसमध्ये एससी एसटी असोसिएशनतर्फे संविधान गौरव दिन साजरा झाला. सीएनपीचे महाप्रबंधक संदीप जैन, आयएसपीचे उपमहाप्रबंधक मुजुमूदार, सुनील दुपारे, अशोक अरोरा, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, संदीप विश्वास, नितीन चौधरी, देवीदास गोडसे, गोकुळ काळे, रामभाऊ जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. विजय जाधव यांनी प्रास्तविक केले. संस्थेचे सरचिटणीस प्रकाश पगारे, दिलीप बर्वे, विजय मोगरे आदींनी संयोजन केले.

मजदूर संघ कार्यालय

प्रेसच्या मजदूर संघ कार्यालयात संविधानदिन उत्साहात झाला. स्टाफ युनियनचे सरचिटणीस संदीप बिश्वास यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, माधवराव लहांगे, सुनिल आहिरे, नंदू पाळदे, उत्तमराव रकिबे, जयराम कोठुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उल्हास भालेराव, रमेश खुळे, इरफान शेख, दिनकर खर्जुल आदींनी संयोजन केले.

बिटको कॉलेज

बिटको कॉलेजमध्ये संविधानदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, मराठी विभागप्रमुख डा. इंदिरा आठवले, उपप्राचार्या डा. अंजली गौतम, प्रा. राजेंद्र कुलकर्णी, प्रा. जयंत भाभे, जनरल सेक्रेटरी रोहन जाधव व्यासपीठावर होते.

रिपब्लिकनचे पुतळा पूजन

रिपब्लिकन पार्टीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, युवा जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, नगरसेवक सुनील वाघ, समीर शेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे नाशिकरोडला संविधान गौरव रॅली काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपो बिल्डरच्या घशात?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद येथील कचरा डेपोच्या ४१ हेक्टर जागा वाचवण्यासाठी प्रशासनाने धावपळ सुरू केली असतांना स्थायी समितीच्या सदस्यांनी विकासकामांना निधी मिळत नसल्याने कारण पुढे करत भूसंपादनाच्या आर्थिक मोबदल्याला खो लावला आहे. सदस्यांच्या दबावानंतर ३९ कोटी रुपये भरण्याचा प्रस्ताव स्थायीने फेटाळला आहे. त्यामुळे या जागेवरील आरक्षण आता व्यपगत होण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा शहरातील एका बड्या बिल्डराला होणार आहे. दरम्यान स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी या जागेवरील आरक्षण कायम रहावे म्हणून तिचा पर्पज बदलण्याच्या सूचना केल्या आहेत.

स्थायी समितीवर शुक्रवारी मखमलाबाद येथील कचरा डेपोसाठी आरक्षित असलेल्या सर्व्हे क्रमांक ३२५ मधील ४१ हेक्टर जागेच्या भूसंपादनासाठी ३८ कोटी ८५ रुपयांचा आर्थिक मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरण्याचा प्रस्ताव ठेवला होता. न्यायालयाने या जागेवरील एका जागा मालकाला जागा परत करण्याचा निर्णय दिल्याने प्रशासनाने जागा जावू नये स्थायीवर हा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, सदस्यांनी विकासकामे होत नसल्याने एवढा निधी देण्यास विरोध केला. रंजना भानसी यांनी प्रभागाचे काम होत नसल्याने आक्रमक होत 'पहिले नगरसेवकांची कामे करा', असे सुनावले. तसेच 'कोणत्या हेडखाली निधी देणार?' असा प्रश्न उपस्थित केला. इतर सदस्यांनाही तीच री पकडल्याने सभापतींनी हा विषय अखेर फेटाळण्याचा निर्णय घेतला.

जागा भूसंपादनाचा आर्थिक मोबदल्याचा प्रस्ताव फेटाळल्याने संबंधित शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावून ही जमीन आरक्षणातून मुक्त करण्याचा धोका आहे. ही जमीन आरक्षणातून मुक्त झाल्यास महापालिकेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शहरातील एका बड्या बिल्डराने ही जमीन विकत घेतली असून आरक्षण रद्द झाल्यास शेतकऱ्यांचे नव्हे तर बिल्डराचेच भले होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही सदस्यांनी सभापतींनी परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर आरक्षण रद्द होवू देणार नसल्याचे सांगितले. संबंधित जागेवरील आरक्षणाचे पर्पज बदलून ती कायम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिनला मंजुरी

गोदावरी नदीतील पानवेली, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा साफ करण्यासाठी तीन महिन्यांसाठी फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिन भाडेतत्त्वावर घेण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ निधीतील ही रक्कम असल्याने, ती व्यापगत होण्याची शक्यता असल्याने प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी आरोग्य अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे सभापतींनी ९९ लाखाचा हा विषय मंजूर केला असून पानवेली वाढतील तेव्हाच गोदावरी स्वच्छतेचे काम या मशीनद्वारे होईल, असे आश्वासन आरोग्याधिकाऱ्यांनी दिले आहे. या कामासाठी दिवसाला एक लाख १० हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे ठेकेदाराला ९९ लाख रुपये भाडे देण्याचा प्रस्ताव आहे. सिंहस्थात याच मशीनद्वारे स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे त्याचा मोबदला आहे का असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

पेठरोडवरील आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात सुनंदा चिरू भोये (वय २१) या विद्यार्थिनीने शुक्रवारी आत्महत्या केल्याचे समोर आले. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुनंदाने वसतिगृहाच्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुनंदाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थिनी वसतिगृहात खळबळ उडाली आहे. सुनंदाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

जुगार अड्डा उद्‍ध्वस्त

अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील शांतीनगर येथील पंपिंग स्टेशनजवळ सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्‍ध्वस्त केला. पोलिसांनी दुपारच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून मुख्य संशयित अनिल कांबळे याच्यासह कमलेश कांबळे, संदीप पवार, अनिल कांबळे, किशोर शिंदे, इम्तियाज अन्सारी यांना अटक केली. सर्व संशयित गरवारे परिसरातील झोपडपट्टीत राहतात. पोलिसांनी या संशयितांकडून सहा मोबाइल, २४ हजार ८४० रुपयांची रोकड, सहा दुचाकी असा २ लाख ८३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या भागातील जुगार अड्ड्यांवर छापे मारण्याचे काम सुरू असून, पंचवटीत ही कारवाई केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चेकद्वारे फसवणूक

कंपनीच्या नावे दिलेल्या चेकमध्ये स्वतःचे नाव टाकून ९९ हजार ८८० रुपयांची फसवणूक करणाऱ्या योगेश धनराज बच्छाव या संशयिताविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई येथे राहणाऱ्या सलिल शशीधर मेन्नुर यांनी अनमोल पॅकेजर्स प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावे चेक दिला होता. सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथे राहणाऱ्या योगेश बच्छावने मात्र, या चेकमध्ये आपले नाव टाकून खात्यातील पैसे काढून

घेतले. हा प्रकार १९ सप्टेंबर २०१५ रोजी कॅनडा कॉर्नर येथील ओरिएंटल बँकेत घडला. सरकारवाडा पोलिसांनी बच्छावविरोधात कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पीएसआय पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अन्यथा मीच टाकेल प्रभाग सभेवर बहिष्कार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापालिकेच्या सातपूर प्रभागाची तब्बल तीन महिन्यांनी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वच नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांवर तक्रारींचा पाऊस पाडला. नगरसेवकांची कामे न केल्यास प्रभाग सभेवरच बहिष्कार टाकण्याचा इशारा देत सातपूर प्रभाग समिती अध्यक्षा उषा शेळके यांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या कुठल्याच विभागातील अधिकारी नागरी समस्या सोडवत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. पाण्याची बिले वेळेवर दिली जात नसल्याचा आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला. सभेत फक्त दोन विषय मंजुरीवरून देण्यात आली. नगरसेवक दिनकर पाटील यांनी सर्वच विभागातील अधिकारी कामे करत नसून केवळ सह्याजीराव म्हणून महापालिकेत येत असल्याचे म्हणाले. तसेच नागरी समस्या महापालिका अधिकाऱ्यांना सांगितल्यावर त्याकडे टाळाटाळ करत असल्याचा आरोप नगरसेवक पाटील यांनी केला. नगरसेवक मते यांनी पाणी मिटरचे कनेक्शन देण्यासाठी रहिवाशांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याचे सांगितले. तर घंटागाडी ठेकेदाराला आरोग्य विभाग पाठिशी घालत असल्याने घंडागाडी अनियमित प्रभाग येत असल्याचा आरोपही नगरसेवक मते यांनी केला. सातपूरमध्ये महापालिकेचे अधिकारी मनमानी कारभार करत असून नागरी समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप नगरसेविका नंदिनी जाधव यांनी केला. नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी देखील कामचुकार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का करू नये, असा सवाल उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images