बुद्धी आणि भावना हे एक लोकप्रिय द्वंद्व आहे. आजच्या विज्ञान युगात प्रगती करायची तर केवळ बौद्धिक क्षमतांचा विकास केला की पुरे अशी आपली समजूत होऊन बसली आहे. त्यात स्पर्धेचे भूत डोक्यात घुसलेले. त्यामुळे व्यक्तिमत्त्वात कमालीचे एकारलेपण व शेवटी एकाकीपण येऊ लागते. डिप्रेशन हा एकविसाव्या शतकाचा रोग म्हणून ओळखला जाऊ लागलाय तो यामुळेच.
हे टाळणे आवश्यक आहे आणि शक्यही आहे. मानसशास्त्राच्या संशोधनातून लक्षात येतं की व्यवसायातील यश किंवा नोकरीतील उच्चपदापासून चांगला मित्र परिवार, आनंदी-समाधानी आयुष्यापर्यंत कोणतीही गोष्टी मिळण्यासाठी फक्त चांगला बुध्यांक (I.Q.) पुरेसा नसतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचा ठरतो तो भावनांक (E.Q.)! शाळा-कॉलेजमधे हुशार ठरलेली मुले बरेचदा पुढच्या आयुष्यात आपल्याला मागे पडलेली दिसतात ती भावनिक अक्षमतेमुळेच. भावनिक सक्षमता म्हणजे स्वत:च्या व इतरांच्या भावना समजून घेता येणे व त्याला योग्य तो प्रतिसाद देता येणे. कुठल्याही क्षेत्रात माणसांचे योग्य व्यवस्थापन हाच प्रश्न सर्वात महत्त्वाचा बनतो. त्यावेळी इतरांच्या भावनांना सकारात्मक प्रतिसाद देण्यातूनच त्यांच्यातील सर्वोच्च क्षमतांचा वापर करता येणे शक्य होते. हेच खरं म्हणजे सेव्हन हॅबिट्स, यशशास्त्र सारखी पुस्तके सांगत असतात, पण केवळ ते वाचून यश प्राप्त होत नाही तर भावनांचे महत्त्व समजून घेऊन, स्वत: सक्षम झाल्यानेच प्राप्त होते.
ही संकल्पना लहानपणापासून मुलांमध्ये रुजवणे शक्य आहे. पण त्यासाठी आधी शिक्षक व पालकांनी स्वत:च्या भावना नीट जाणून घेणे व मुलांपर्यंत त्या स्पष्ट शब्दात योग्य प्रकारे पोहोचवणे आवश्यक आहे. आता बघा एखादे मूल उंच ठिकाणी धोकादायक अवस्थेत उभे आहे आणि आईने जाऊन त्याला एक फटका दिला, तर त्याला वाटेल की आईला राग आलाय, पण प्रत्यक्षात आईच्या मनात असेल काळजी किंवा भीती. कधी आपण मुलांशी अबोला धरतो, तेव्हाही मुलांपर्यंत आपली योग्य भावना पोहोचेलच असे नाही. आपल्याला तशी अपेक्षा असते, पण त्यामुळे मुलांच्या मनात उलट गोंधळच निर्माण होतो. मुलांनी चुका केल्या तरी, तुम्ही मला आवडत नाही असे न म्हणता, तुम्ही मला आवडता पण तुमचे हे-हे वर्तन मला आवडत नाही, असे म्हणायला हवे. कोणतीच भावना चुकीची किंवा बरोबर नसते. तेव्हा स्वत:ची भावना समजून घेऊन त्याचा स्वीकार करायला मुलांना शिकवता येईल. एखाद्या मुलाला किरकोळ गोष्टीची भीती वाटत असेल तर आपण चटकन म्हणतो, त्यात काय घाबरायच? त्याऐवजी तुला भीती वाटतेय ना? ठीक आहे वाटू शकते, पण आता ती कमी कशी करता येईल त्यावर आपण उपाय शोधू, असा दृष्टीकोन मुलाला जास्त उपयोगी ठरतो. म्हणूनच भावनांना योग्य प्रकारे सकारात्मक प्रतिसाद देता येणे शिकायला हवे व मुलांना शिकवायला हवे.
हे सहजपणे शिकण्याचा मार्ग म्हणजे गटकाम. यात मुले एकमेकांच्या कमतरता व बलस्थाने ओळखून, त्याचा सुयोग्य वापर करुन, गटकामाची फलनिष्पत्ती चांगली कशी होईल त्याकडे लक्ष द्यायला शिकतात. तेव्हा शिक्षणात याचा भरपूर वापर करायला हवा. मात्र त्यासाठी मुलांच्या आणि पालकांच्या मनात सहकाराचे महत्त्व रुजायला हवे! मुलांच्या मनात भावनांचा गोंधळ असेल तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. शिवाय आनंद असो वा दु:ख दोन्ही भावनांचा अतिरेक त्रासदायकच. म्हणूनच भावनांचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते कोणत्याही प्रसंगी आपण जसा विचार करतो त्यानुसार आपल्या मनात भावना निर्माण होतात. हे जर आपण मुलांना शिकवले तर त्यांना हेही सांगता येईल 'विचार बदल म्हणजे जग बदलेल'.
(लेखिका आनंद निकेतनच्या संचालिका आहेत)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट