Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मुलांच्या भावनांशी मैत्री करा

$
0
0

विनोदिनी काळगी

बुद्धी आणि भावना हे एक लोकप्रिय द्वंद्व आहे. आजच्या विज्ञान युगात प्रगती करायची तर केवळ बौद्धिक क्षमतांचा विकास केला की पुरे अशी आपली समजूत होऊन बसली आहे. त्यात स्पर्धेचे भूत डोक्यात घुसलेले. त्यामुळे व्यक्तिमत्त्वात कमालीचे एकारलेपण व शेवटी एकाकीपण येऊ लागते. डिप्रेशन हा एकविसाव्या शतकाचा रोग म्हणून ओळखला जाऊ लागलाय तो यामुळेच.

हे टाळणे आवश्यक आहे आणि शक्यही आहे. मानसशास्त्राच्या संशोधनातून लक्षात येतं की व्यवसायातील यश किंवा नोकरीतील उच्चपदापासून चांगला मित्र परिवार, आनंदी-समाधानी आयुष्यापर्यंत कोणतीही गोष्टी मिळण्यासाठी फक्त चांगला बुध्यांक (I.Q.) पुरेसा नसतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचा ठरतो तो भावनांक (E.Q.)! शाळा-कॉलेजमधे हुशार ठरलेली मुले बरेचदा पुढच्या आयुष्यात आपल्याला मागे पडलेली दिसतात ती भावनिक अक्षमतेमुळेच. भावनिक सक्षमता म्हणजे स्वत:च्या व इतरांच्या भावना समजून घेता येणे व त्याला योग्य तो प्रतिसाद देता येणे. कुठल्याही क्षेत्रात माणसांचे योग्य व्यवस्थापन हाच प्रश्न सर्वात महत्त्वाचा बनतो. त्यावेळी इतरांच्या भावनांना सकारात्मक प्रतिसाद देण्यातूनच त्यांच्यातील सर्वोच्च क्षमतांचा वापर करता येणे शक्य होते. हेच खरं म्हणजे सेव्हन हॅबिट्स, यशशास्त्र सारखी पुस्तके सांगत असतात, पण केवळ ते वाचून यश प्राप्त होत नाही तर भावनांचे महत्त्व समजून घेऊन, स्वत: सक्षम झाल्यानेच प्राप्त होते.

ही संकल्पना लहानपणापासून मुलांमध्ये रुजवणे शक्य आहे. पण त्यासाठी आधी शिक्षक व पालकांनी स्वत:च्या भावना नीट जाणून घेणे व मुलांपर्यंत त्या स्पष्ट शब्दात योग्य प्रकारे पोहोचवणे आवश्यक आहे. आता बघा एखादे मूल उंच ठिकाणी धोकादायक अवस्थेत उभे आहे आणि आईने जाऊन त्याला एक फटका दिला, तर त्याला वाटेल की आईला राग आलाय, पण प्रत्यक्षात आईच्या मनात असेल काळजी किंवा भीती. कधी आपण मुलांशी अबोला धरतो, तेव्हाही मुलांपर्यंत आपली योग्य भावना पोहोचेलच असे नाही. आपल्याला तशी अपेक्षा असते, पण त्यामुळे मुलांच्या मनात उलट गोंधळच निर्माण होतो. मुलांनी चुका केल्या तरी, तुम्ही मला आवडत नाही असे न म्हणता, तुम्ही मला आवडता पण तुमचे हे-हे वर्तन मला आवडत नाही, असे म्हणायला हवे. कोणतीच भावना चुकीची किंवा बरोबर नसते. तेव्हा स्वत:ची भावना समजून घेऊन त्याचा स्वीकार करायला मुलांना शिकवता येईल. एखाद्या मुलाला किरकोळ गोष्टीची भीती वाटत असेल तर आपण चटकन म्हणतो, त्यात काय घाबरायच? त्याऐवजी तुला भीती वाटतेय ना? ठीक आहे वाटू शकते, पण आता ती कमी कशी करता येईल त्यावर आपण उपाय शोधू, असा दृष्टीकोन मुलाला जास्त उपयोगी ठरतो. म्हणूनच भावनांना योग्य प्रकारे सकारात्मक प्रतिसाद देता येणे शिकायला हवे व मुलांना शिकवायला हवे.

हे सहजपणे शिकण्याचा मार्ग म्हणजे गटकाम. यात मुले एकमेकांच्या कमतरता व बलस्थाने ओळखून, त्याचा सुयोग्य वापर करुन, गटकामाची फलनिष्पत्ती चांगली कशी होईल त्याकडे लक्ष द्यायला शिकतात. तेव्हा शिक्षणात याचा भरपूर वापर करायला हवा. मात्र त्यासाठी मुलांच्या आणि पालकांच्या मनात सहकाराचे महत्त्व रुजायला हवे! मुलांच्या मनात भावनांचा गोंधळ असेल तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. शिवाय आनंद असो वा दु:ख दोन्ही भावनांचा अतिरेक त्रासदायकच. म्हणूनच भावनांचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते कोणत्याही प्रसंगी आपण जसा विचार करतो त्यानुसार आपल्या मनात भावना निर्माण होतात. हे जर आपण मुलांना शिकवले तर त्यांना हेही सांगता येईल 'विचार बदल म्हणजे जग बदलेल'.

(लेखिका आनंद निकेतनच्या संचालिका आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विज्ञान संस्कृतीचा जोपासक

$
0
0

fanindra.mandlik@

timesgroup.com

नाशिकमधील आरवायके कॉलेजमधून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या व्ही. बालसुब्रमण्यम यांनी रसायन शास्त्रात संशोधन केले असून वयाच्या ८४ व्या वर्षी देखील त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. शहरातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून अनेक रसायन शास्त्रज्ञ त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात.

व्ही. बालसुब्रमण्यम यांचा जन्म तामिळनाडूतील तंजावरचा. घरची अर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी बी.एस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बी.एस्सी झाल्यानंतर काय करावे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे होता. शिक्षणाला अनुसरून नोकरी न मिळाल्याने त्यांना शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करावी लागली. पण नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. त्यांची ही अवस्था शाळेतील एका शिक्षकाने ओळखली आणि त्यांची चौकशी केली. शिक्षकाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी लगेचच एम.एस्सी करण्याचा निर्णय घेतला. अण्णामलाई युनिव्हर्सिटीमध्ये एम.एस्सीसाठी त्यांना प्रवेश मिळाला आणि ते उत्तम यश मिळवून बाहेर पडले. त्यांनतर त्यांनी केमिस्ट्री या विषयात पी.एचडी मिळवली.

पुढे काही काळासाठी ते अमेरिकेत संशोधनासाठी गेले. तेथे रसायनशास्त्रात भरपूर संशोधन केले. दरम्यान पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये त्यांना नोकरी लागली. मात्र १९६९ मध्ये त्यांना नाशिकला येण्याची संधी मि‍ळाली व ते नाशिकच्या एचपीटी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथे त्यांना वसंत कानेटकर, आंबेकरसर, सोनी सर यांचा सहवास लाभला. निवृत्त झाल्यानंतर माझ्या कामाला खरी सुरुवात झाल्याचे ते म्हणतात. त्यांच्याकडे विविध कंपन्याचे अधिकारी, शास्त्रज्ञ सल्ले घेण्यासाठी येत असतात. त्यांनी औषधांवर जास्त संशोधन केले असून कमीतकमी किमतीत चांगली औषधे रुग्णांपर्यंत कशी मिळतील याबाबत ते कंपन्यांना मार्गदर्शन करीत असतात. तसेच औद्योगिक कामात वापरण्यात येणारे अॅडेसिव्ह तयार करण्यात त्यांचा हातखंडा असून विविध कंपन्यांना त्याचे फॉर्म्युला तयार करुन देतात.

ग्लेन्मार्क, खादी ग्रामोद्योग, आदिवासी विकास भवन, वन विभाग यांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू असते. त्याचप्रमाणे विविध संस्था, औद्येगिक आस्थापने यांना आयएसओ मिळवून देण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. याचबरोबर प्रॉडक्ट रिसर्च, क्वालिटी कंट्रोल यावर विविध कंपन्यांच्या तज्ज्ञांना ते मार्गदर्शन करतात त्यांचा मुलगा व मुलगी दोघेही परदेशात असून नाशिक ही माझी कर्मभूमी आहे. ती सोडून मी येणार नाही असे त्यांना आवर्जून सांगतात. सकाळी पाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. सकाळी सात वाजता बॅडमिंटन खेळणे, पियानो वाजविणे, बागकाम करणे असा त्यांचा दिनक्रम असतो. आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी द्यावा यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. अनेक गरीब मुलांना ते आर्थिक सहाय्य करतात. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी सायन्स फोरमची त्यांनी स्थापना केली आहे. याद्वारे लहान मुलांना कायम मार्गदर्शन सुरू असते. विज्ञानाबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. तसेच समाजातील अनिष्ठ चालीरितींना आळा बसावा यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीद्वारे त्यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गोखले एज्युकेशन सोसायटी, पुणे विद्यापीठ, सार्वजनिक वाचनालय तसेच भारतातील विविध संस्था, भारताबाहेरील अनेक संस्थांनी त्यांना गौरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईतही पाण्याची नासाडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात केवळ दहा टक्के पाणीसाठा असून, त्यावर देखील मालेगाव-जळगाव असा पाण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. या गिरणा धरणातून मालेगाव शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला मात्र जागोजागी नादुरुस्तीमुळे रोज हजारो लिटरची पाण्याची गळती होऊन वाया जात आहे. याबाबत मात्र मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

या पाइपलाइनच्या देखरेखीसाठी गस्त घालणाऱ्या पथकाला मात्र हे वाया जाणारे पाणी दिसत नसावे का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. गिरणा धरण ते शहरातील पाणीपुरवठा केंद्र दरम्यान असलेल्या पाइपलाइनला दरेगाव नजीक मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असून, हजारो लिटर पाणी वाया जाते आहे. वाहनधारक आता येथे वाहने धुण्यासाठी आणत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाजांवर पोलिसांच्या नजरा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक
नववर्षाचे स्वागत करताना होणाऱ्या हुल्लडबाजीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी आतापासूनच टवाळखोरांना रडारवर घेतले आहे. मागील दोन दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई केली जात असून न्यु इयर सेलिब्रेशन करताना कायद्याचे भान असू द्या, असा सल्लाही पोलिसांमार्फत दिला जातो आहे.

नववर्षाचे स्वागत करताना आयोजीत होणारे कार्यक्रम शांततेत पार पडावे, यासाठी पोलिसांकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. तरीही मद्यपींचा राडा किंवा छेडछाडीच्या घटना घडतच असतात. हा अनुभव पाठीशी असलेल्या पोलिसांनी यंदा विशेष काळजी घेण्याचे ठरवले असून मागील दोन दिवसांपासून चौकात उभे असणारे टोळके, धोकादायक पध्दतीने वाहन हाकणारे तसेच उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. नववर्षाच्या स्वागता दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमानंतर अनेक अपघात होतात. विशेषतः दुचाकी वाहनधारकांच्या अपघाताचे प्रमाण लक्षणीय असते. वेळेवर अशी कृत्य थांबवणे अवघड बनते. त्यामुळे आतापासूनच कारवाई सुरू केल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली. परिमंडळ दोनमधील नाशिकरोड, देवळाली कँम्प, उपनगर, इंदिरानगर, सातपूर आणि अंबड या पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांनी ३२२ टवाळखोरांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई केली. याबरोबर जोरात वाहन हाकणाऱ्या १५९ तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०२ जणांवर कायद्याचा बडगा उचलण्यात आला. पोलिस स्टेशन हद्दीतील प्रमुख कॉलेजेस, क्लासेस, चायनिज गाड्या, मोकळी मैदाने आदी ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केल्याचे उपायुक्त धिवरे यांनी सांगितले. लवकरच शहरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होईल. कोर्टाने दिलेल्या वेळेच्या बंधनाचा नियम प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून ज्याठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसेल त्याठिकाणी असणार्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन धिवरे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुजनांकडून आदिवासींचे शोषणच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
सूर्याच्या अस्तित्त्वापासून व पृथ्वीच्या निर्मितीपासून आदिवासींची जीवनप्रणाली अविरत सुरू आहे. बहुजन समाजाकडून आदिवासींचे नेहमीच शोषण होत आले आहे. व्यवस्थेतील हा भेदाभेद ज्यादिवशी मिटेल तो सोनियाचा दिनु असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वाहरू दादा सोनवणे यांनी व्यक्त केले.

लोकलढा सांस्कृतिक चळवळ, आदिवासी भटके, ओबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक आयोजित पहिले दलित साहित्य संमेलन पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात रविवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाहरू सोनवणे बोलत होते. साहित्य संमेलनात अनेक नामवंत साहित्यिकांनी विचार मांडताना आदिवासी भटके दलित आणि ओबीसी सर्वांनी आपापल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासठी संघटीत होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. सोनवणे यांनी आदिवासींची आधीची जीवन प्रणाली, संपत्ती, बहुजन समाजाकडून होणारे शोषण, शासन व्यवस्था,

श्रमाची निर्मिती, कुटुंबव्यवस्था, श्रीयांची आभूषणे, पुरुषप्रधान संस्कृती, आदिवासी यांच्यातील संघर्ष, व्यवस्थेतील भेदाभेद याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात अनुभवी आणि नवोदित कवींचे कवी संमेलन झाले. या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी लोकांनी जलसा आणि आदिवासी समूहनृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पहिल्या सत्रात मुंबई मंत्रालयातील अप्पर सचिव अंबादास चंदनशिवे, विक्रीकर विभागाचे सहआयुक्त कैलास चतुर, नगरसेवक दामोदर मानकर यांनी विचार मांडले.

दुसऱ्या सत्रात 'आजचा सांस्कृतिक दहशतवाद आणि दलित, आदिवासी भटके, ओबीसी कष्टकऱ्यांच्या एकजूटी समोरील आव्हाने' या विषयावर जेष्ठ विचारवंत कुमार शिरवळकर, प्रा.राजेश ढवळे (नांदेड), प्रा.सचिन गरुड (इस्लामपुरा), प्रा.डी.ए.दळवी (मुंबई) यांनी आपले विचार मांडले. यावेळी कवी विजयकुमार मीठे, कवी तुकाराम धांडे, प्रा.गंगाधर अहिरे यांच्यासह रवींद्र मालुंजकर, मनीषा पिंगळे, रमेश भोये, सोमनाथ भावे, सचिन गांगुर्डे, राजेश जाधव, देवदत्त चौधरी, प्रमोद अहिरे, हेमंत भोये, प्रमोद देशमुख, प्रशांत केंदळे यांनी विविध कविता सादर केल्या. पुंडलिक भोये, विठ्ठल शिंगरे आदिंनी जलसा सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याणीच्या शिरपेचात दोशी फेलोशिपचा तुरा

$
0
0

Prashant.bharvirkar

@timesgroup.com

नाशिक : साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे कलेच्याप्रती समर्पित वृत्तीने काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विनोद दोशी फेलोशीपची यंदाची नावे जाहीर झाली असून, त्यात नाशिकची गुणी अभिनेत्री कल्याणी मुळे हिचा समावेश आहे. कल्याणीची निवड ही भारतातील रंगकर्मींमध्ये असून, एक लाख रुपये अशी फेलोशीपची रक्कम आहे. ही फेलोशिप मिळणे रंगकर्मींसाठी अत्यंत मानाचे समजले जाते.

फेलोशीपचे यंदा अकरावे वर्ष आहे. कलेच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्या व कला क्षेत्रातच महत्त्वाकांक्षी कारकीर्द करू इच्छिणाऱ्या तरूण रंगकर्मींना साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे ही फेलोशीप दिली जाते. फेलोशीप वितरण समारंभ २१ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे. या पुरस्काराचे यंदाचे अकरावे वर्ष असून, आतापर्यंत ४७ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कल्याणी मुळे हिने नात्याची गोष्ट, मिडनाईट फ्ल्यूट या एकांकिका केल्यावर संगीत समिती स्वयंवर, ती खिडकी, सावित्रीचे उपाख्यान या नाटकांमध्ये तिने मुख्य भूमिका केल्या. त्यासाठी तिला दोन्ही राऊंडमध्ये अभिनयाचे मेडलही मिळाले होते. नाशकातून तिने अनेक नाट्यअभिवाचनाचे प्रयोगही केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) तिची झालेली निवड ही तिच्या करिअरसाठी चार चाँद लावणारी होती. तिला एनएसडीमध्ये अभिनयाचे गोल्ड मेडलदेखील मिळाले. एनएसडीच्या ब्रोशरवर झळकणारी उत्तर महाराष्ट्रातील ती एकमेव अभिनेत्री आहे. सध्या ती गोव्याच्या रंगभूमीवर काम करीत असून, 'अनसीन' नावाचा तिचा प्ले अत्यंत गाजत आहे. एका सिरियलमध्येही तिने भूमिका केलेली आहे.

या पुरस्कारासाठी विनोद आणि शरयू दोशी फाउंडेशनकडून प्रतिष्ठानला दरवर्षी पाच लाख रुपयांची देणगी मिळते. प्रत्येकी एक लाख रुपयांचा हा पुरस्कार शिष्यवृत्ती स्वरुपाचा असून त्यासाठी पुरस्कार विजेत्याला अर्ज करावा लागत नाही. त्याचप्रमाणे हा पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकार आपल्या इच्छेनुसार ही रक्कम खर्च करू शकतो. पुरस्काराची रक्कम कलाकारांना १२ धनादेशांद्वारे दिली जाते. त्यामुळे कलाकारांना मासिक खर्चासाठी चांगला हातभार मिळतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन महाराष्ट्र’ला खीळ?

$
0
0

नाशिक विभागात असलेल्या पाच जिल्ह्यांसाठी सरकारने उद्योग भवनाची निर्मिती त्र्यंबकेश्वर रोडवरील आयटीआय सिग्नलच्या बाजूला केली. यात नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना लागणारे सर्वच विभागीय कार्यालये उद्योग भवनात आहे. यामध्ये एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य व सुरक्षा संचलनालय, कामगार उपायुक्त कार्यालय व अन्न व औषध प्रशासन मंडळांची उद्योग भवनात कार्यालये आहेत. तसेच उद्योग भवनाच्याच शेजारी जिल्हा उद्योग केंद्राचे कार्यालय उभारण्यात आले आहे. उद्योजकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्यात याव्या यासाठीच उद्योग भवनात उद्योजकांना लागणाऱ्या कार्यालयांची उभारणी करण्यामागे सरकारचा हेतू होता. परंतु, सध्या उद्योग भवनात उद्योगांना लागणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामांचा बोजा सहन करावा लागत आहे. यात दोन महिन्यांपासून एमआयडीसी कार्यालयात प्रादेशिक अधिकारीच नाही, प्रादेशिक अधिकाऱ्यांचा अतिरिक्त भार एमआयडीसीच्या विभागीय व्यवस्थापक संध्या घोडके यांच्याकडे आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्राला देखील महाव्यवस्थापक व उपसचांलक ही दोनही पदे डी. एस. जोशी सांभाळत आहेत. तसेच जिल्हा उद्योग केंद्रात विविध पदे अनेक वर्षांपासून भरली न गेल्याने रिक्त आहेत. तर कामगार उपायुक्त कार्यालयात तर प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा बोजा पडला आहे. सहाय्यक कामगार आयुक्तांकडे नाशिकसह इतर जिल्ह्यांतील कामांचीही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. उद्योजकांना लागणाऱ्या विविध परवानगी व समस्या सोडवितांना अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने वेळेवर कामे होत नसल्याचे निमा, आयमासह उद्योजक सांगतात. यासाठी सरकारने 'मेक इन महाराष्ट्र' घडवितांना रिक्त पदे तत्काळ भरून उद्योजकांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.

उद्योग भवनात उद्योगांना लागणाऱ्या सर्वच विभागांची कार्यालये सरकारने उभारली आहेत. परंतु, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे उद्योजकांची कामे वेळेवर होत नाही. - संजीव नारंग, अध्यक्ष, निमा

'मेक इन महाराष्ट्रा'ची घोषणा मुख्यंमत्र्यांनी केली आहे. परंतु, नाशिक विभागात उद्योगांना चालना देण्यासाठी तत्काळ कामे केले जात नाही. कमचारी टंचाईचे कारण सांगितले जाते. - विवेक पाटील, अध्यक्ष, आयमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटकोत माजी विद्यार्थी मेळावा; शालेय आठवणींना उजाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सकाळी ११ वाजता शाळेची घंटा वाजली... सर्व विद्यार्थी पटापट आपल्या वर्गाकडे वळाले... एक साथ नमस्ते म्हणून शिक्षकांना अभिवादन करण्यात आले. प्रार्थना झाली... तास सुरू झाला... हा तास कोणत्याही शैक्षणिक विषयाचा नसून शाळेविषयीच्या आठवणींचा होता. सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी आठवणींची ही अनमोल कुपी उघडली अन् बालपण परतून आल्यासारखे सगळेच त्यात हरखून गेले.

निमित्त होते, दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अमृतपूर्ती महोत्सव वर्षाचे. सीबीएसजवळील डा. दे. बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रविवारी हा अभूतपूर्व सोहळा रंगला. १९५२ पासूनचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व निवृत्त शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते. प्रत्येक वर्गात सुविचार लिहिण्यात आले होते. परिपाठाच्या तासानी शाळेला सुरूवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना बोधकथा सांगून नंतर बातम्यांचे वाचन करण्यात आले. शाळेत असताना वर्गात जे काही व्हायचे त्याची प्रचिती पुन्हा या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना आली.

आठवणींच्या तासांनंतर मधली सुटी झाली. सर्व माजी विद्यार्थी, शिक्षकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पुन्हा सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. शिक्षक भि. रा. सावंत यांनी चित्रकलेचा तास घेतला. अत्यंत मनोरंजक पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना चित्र काढण्याच्या युक्त्या सांगितल्या. त्यानंतर झालेल्या खुल्या अधिवेशनात भारती आव्हाड या माजी विद्यार्थिनीने गणेश वंदना सादर केली. माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आले. माजी शिक्षक भास्कर तानपाठक, द. श्री. भटमुळे यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रकाश अकोलकर व वि. वि. करमरकर यांनी मान्यवर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तर सचिन जोशी व आनंद तुपसाखरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी संस्थेची भूमिका मांडली. तर सेक्रेटरी हेमंत बरकले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवडे बाजार पुन्हा मूळ जागी स्थिरावला

$
0
0

आठवड्याच्या प्रत्येक रविवारी देवळालीतील नागरिकांना मुख्य रस्त्यांवरून चालणे कठीण होत असे. लामरोड मार्गे देवळालीत प्रवेश करणे तर दिव्यच झाले होते. या सर्व बाबींवर सातत्याने विविध घटकांकडून आवाज उठविला जात होता. याची दखल घेत प्रशासनाने सर्व व्यापारी व नागरिकांसाठी सूचना देत मूळ बाजार परिसर वगळता इतरत्र बसणाऱ्या विक्रत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानुसार रविवारी पहाटे ५ वाजेपासूनच प्रशासनाने खबरदारी घेतली. आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे, निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यापारी व शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली. तसेच सर्व रस्ते खुले राहिल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाचे देवळालीकरांनी स्वागत केले आहे. बोर्ड प्रशासनाने वाढीव जागेत केलेले सपाटीकरण योग्य असले तरी तेथे लवकर काँक्रिटीकरण करावे, पुरेसा विद्युत पुरवठा असावा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, बाजाराच्या मधोमध असलेले सार्वजनिक शौचालय स्थलांतरित करावे, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, संपूर्ण बाजार परिसराला संरक्षक भिंत असावी अशा विविध मागण्या शेतकरी व व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याला गरज २७० टँकर्सची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ टँकर्सद्वारे तहान भागविली जात असली तरी जुलै २०१६ पर्यंत तब्बल २७० टँकर्सची आवश्यकता भासेल अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, लवकरच टँकर वाटपाचे अधिकारी संबंधित तहसीलदारांकडे हस्तांतरीत केले जातील, अशी ग्वाही प्रशासनाने शनिवारी राज्य महसूल मंत्र्यांना दिली.

पावसाने यंदा जिल्ह्यावासियांवर वक्रदृष्टी केली. त्यामुळे सर्वाधिक धरणांचा जिल्हा असूनही बराचशी धरणे भरू शकली नाहीत. त्यामुळे यंदा संबंध जिल्ह्यावरच पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. जिल्ह्यात दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या मंत्री गटाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेतला. सद्यस्थितीत जिल्ह्यात बागलाण, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यातील एकूण १८ गावे आणि ६६ वाड्यांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र, दिवसेंदिवस धरण पातळी खालावेल तसे पाणीटंचाईचे हे संकट अधिकच गडद होत जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी या बैठकीत दिली. सद्यपरिस्थितीचा अंदाज घेता जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील अनेक गावे आणि शेकडो वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी २७० टँकर्सची मदत घ्यावी लागणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

अजुनही काही गावांमध्ये टँकर्सची मागणी होत असली तरी ते पुरविले जात नसल्याच्या तक्रारी आमदारांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे केल्या. विशेषत: राठोड यांनी सिन्नर तालुक्यात केलेल्या पाहणीत दोन गावांमध्ये टँकर्सची आवश्यकता असूनही ते पुरविले जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या. या गावांमध्ये तातडीने टँकर पुरविण्याची व्यवस्था करा, असे आदेश राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पुरवठ्यासाठी १३ कोटींचा खर्च

जिल्हा परिषदेने ऑक्टोबर २०१५ ते जून २०१६ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील ९८२ गावे आणि ११११ वाड्या अशा २ हजार ९३ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई जाणविण्याची भीती त्यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नऊ प्रकारच्या उपाययोजना करण्यात येणार असून त्यावर ३० कोटी १२ लाख १३ हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. प्रगतीतील नळ योजना पूर्ण करणे, विंधन विहिर घेणे, नळयोजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, विंधन विहिर विशेष दुरुस्ती, विहिर खोल करणे, खासगी विहिर अधिग्रहण करणे आणि टँकर्स किंवा बैलगाडीसारख्या साधनांद्वारे पाणी पुरवठा करणे यांसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. ४१७ गावे आणि ८०० वाड्या अशा १२१७ ठिकाणी २६८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. केवळ टँकर्सद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

अधिकारांचे हस्तांतरण

टँकर्स वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असले तरी पाणी पुरवठा निर्णय प्रक्रियेत वेळ जाऊ नये, स्थानिक पातळीवर तत्काळ निर्णय घेऊन टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करता यावा यासाठी हे अधिकारी तहसीलदारांकडे हस्तांतरीत करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच दिले. मात्र, जिल्ह्यातील तहसीलदारांना हे अधिकार अद्याप प्राप्त झाले नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. अधिकार हस्तांतरणाबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते प्राप्त होताच कार्यवाही करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी राठोड यांना दिली.

... तर त्यांची वेतनवाढ रोखा!

केवळ १६ हजार रुपये थकीत असल्याने त्र्यंबकेश्वर येथील प्रसुतीगृहाला १० वर्षांपासून सील ठोकण्यात आल्याचे ऐकून शिवसेना मंत्रिगटाने तोंडात बोटे घातली. प्रशासनाच्या दोन विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे १० वर्षांत ‌‌किती रुग्णांची गैरसोय झाली असेल याचा विचार केला का? असा संतप्त सवाल संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. मनुष्यबळाच्या अभावामुळे निलंबनाची नाही मात्र संबंधित अधिकाऱ्याची एक वेतनवाढ रोखायला हवी, अशी सूचना राज्यमंत्री राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला केली.

बायोमेट्रीक घेणार हजेरी

वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी त्यांना ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बायोमेट्रीक मशिन बसविण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

अधिकारी धारेवर

मुंडेगाव आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार होऊन पाच वर्ष उलटली; मात्र अजुनही तेथे वीज व पाणी नाही, अनेक सरकारी दवाखान्यांत वैद्यकीय अधिकारी, परिचारीकाच उपस्थित नसतात, महावितरण व वैद्यकीय विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे त्र्यंबकेश्वरमधील प्रसुतीगृह १० वर्षांपासून बंद अशा तक्रारींचा पाढा शिवसेना मंत्रिगटाने जिल्हाधिकारी कार्यालयात वाचून दाखविला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची लक्तरे त्यामुळे वेशीवर टांगली गेली.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शिवसेना मंत्रिगट समितीने शनिवारी विविध तालुक्यांमधील अनेक गावांना भेट दिली. सर्वाधिक तक्रारी सरकारी दवाखाने आणि महावितरण संदर्भात प्राप्त झाल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले. ग्रामीण भागात नेमणुकीवर असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अनेकदा तेथे हजर नसतात. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होतात अशी कैफियत ग्रामस्थांनी मांडली. जिल्हा परिषदेमधील वैद्यकीय अधिकारी सुशील वाघचौरे आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना यामुळे चांगलेच धारेवर धरले. राज्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांनी प्रश्नांची सरबत्ती करीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची दुरवस्था याकडे लक्ष वेधले. अधिकारी, कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागातच निवासाची व्यवस्था असतानाही अनेकजण तेथे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना रात्री अपरात्री उपचार मिळत नाहीत. तुम्ही संबंधितांवर काय कारवाई केली असा सवाल उपस्थित करण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद असल्याचे पाहणीत आढळून आले. मात्र, हे केंद्र सुरू असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी वाघचौरे यांनी केला.

'आम्ही खोटे बोलत आहोत का?' असा प्रश्न राज्यमंत्री राठोड यांनी केला. इगतपुरी तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. पाच वर्ष उलटूनही अद्याप तेथे वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा नाहीत. केंद्र गावापासून दूर असून केंद्रासमोर स्मशानभूमी असल्याने कर्मचारी येथे थांबत नसल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. हे केंद्र दिवसभर सुरू राहील याची खबरदारी घ्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी करणार आश्रमशाळांची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना दयनीय अवस्थेमध्ये ठेवले जात असल्याचे पाहून शिवसेना मंत्रीगटासमवेत आलेल्या आमदारांचा संताप अनावर झाला. आश्रमशाळांमधील गैरसोयींबद्दल तक्रारींचा पाऊस पडल्याने जिल्हाधिकारी यांनी स्वत: या आश्रमशाळांची पाहणी करून तेथे उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

आदिवासी तालुक्यांमध्ये पाहणीसाठी गेलेल्या आमदारांनी तेथील आश्रमशाळांमधील विदारक वास्तव प्रशासनासमोर कथन केले. कळकटलेल्या भिंती, आश्रमशाळांची झालेली दुरवस्था, सुरक्षारक्षकाच्या ‌अभावामुळे धोक्यात आलेली मुलींची सुरक्षितता, ऐन हिवाळ्यात सुस्थितीतील गाद्या आणि चादरींचा अभाव, पाणी तसेच स्वच्छतागृहाअभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय गणवेषाशिवायच शाळेत जाणारी मुले अशी परिस्थिती आमदारांना पहावयास मिळाली. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पत्र्याच्या पेट्याही मोडकळीस आल्या असून त्यांना टुथपावडर, साबण, तेलही सुमार दर्जाचे दिले जात असल्याचे पाहणीत आढळून आले. सरकार या मुलांच्या सुविधांसाठी पैसे मोजत असेल तर त्याचा योग्य विनयोग व्हायला हवा अशी अपेक्षा राज्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांनी व्यक्त केली. अशा गैरसोयींमुळे सरकारची बदनामी होत असून ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील आश्रमशाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आपण स्वत: सर्व आश्रमशाळांची पाहणी करू अशी ग्वाही कुशवाह यांनी दिली. पाहणी करून असुविधा व दुरवस्था असलेल्या आश्रमशाळांच्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता शेतकरी आत्महत्येचा कलंक नको!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील तानाजी महादू बऱ्हे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि बँकेच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली. आता हेच कर्ज वसुलीसाठी बँक त्याच्या मुलाकडे तगादा लावत असून तो ही त्रासला आहे. आणखी एका शेतकरी आत्महत्येचा कलंक जिल्ह्यावर लागू नये यासाठी तातडीने पाऊले उचला, असे आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याला १०० टक्के टँकरमुक्त आणि शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचे उद्दिष्ट्य ठेवा, अशी सूचनाही करण्यात आली.

राज्य सरकारने सामान्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना जिल्ह्यात किती प्रभावीपणे राबविल्या जातात याचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्यासह महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि शिवसेनेचे काही आमदार जिल्हा दौऱ्यावर आले होते. दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. रात्री साडेदहापर्यंत ही बैठक सुरू होती. अजूनही सरकारच्या योजना शेवटच्या सामान्य नागरिकापर्यंत पोहाचत नसल्याबद्दल शिंदे यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. सरकारी यंत्रणेच्या गलथान कारभाराचे दर्शन घडल्यामुळे जिल्हा परिषद, वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

यावेळी शिंदे म्हणाले, की कोणतीही योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी असा सरकारचा उद्देश असतो. त्यासाठीच सरकार योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, अजूनही योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. शेतकरी आत्महत्येसारखे दुर्दैवी प्रकार रोखण्यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान आवश्यक आहे. त्यांना आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागेल असे मतही शिंदे यांनी व्यक्त केले.

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर काही वर्ष घालविणाऱ्या आणि निवृत्तीनंतर शेती करणाऱ्या इगतपुरी तालुक्यतील वाघेरे येथील कृष्णा शिंदे या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते याबद्दल शिंदे यांनी खेद व्यक्त केला. व्हिसेरा आणि तत्सम तांत्रिक कारणांमुळे आपण किती दिवस शेतकरी कुटुंबाला मदतीपासून वंचित ठेवायचे? शेतकरी कुटुंबांची फरफट होऊ देऊ नका, त्यांना हेलपाटे मारायला लावू नका अशा सूचना त्यांनी दिल्या.

मग का होणार नाहीत आत्महत्या?

दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी मंत्री तसेच आमदारांची भेट घेऊन कैफियत मांडली. विहिरींवर मोटारी बसविल्या असल्या तरी विहिरीत पाणी नाही. मोटारी बंद असतांना मोठ्या रकमेचे वीजबील दिले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. शेतकऱ्यांना तुम्ही असे अंदाजे बील देऊ लागलेत तर शेतकरी आत्महत्या का करणार नाही, असा संतप्त सवाल शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला. अशी अंदांजित बीले कमी करण्यासाठी तातडीने पाऊले उचला असे आदेशही त्यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅमेझॉनवर मराठी बुकस्टोअर

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

पूर्वी मराठी पुस्तके खरेदीसाठी साहित्य संमेलन वा प्रदर्शनाची वाट पहावी लागे. काळाच्या ओघात पुस्तके दुकानांमध्ये विक्रीस आली. सध्याच्या धावपळीच्या युगात सगळे काही घरबसल्या मागवता येते आणि आता यात भर पडली आहे ती मराठी पुस्तकांची. मराठी पुस्तके सर्वात मोठ्या साईटवर एका क्लिकमध्ये उपलब्ध होणार आहेत.

ऑनलाइन मराठी पुस्तके या पूर्वी बुकगंगासारख्या वेबसाइटद्वारे मिळविता येत होती. आता अॅमेझॉनवरही मराठी बुकस्टोअर लाँच करण्यात आले. त्यामुळे कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, धार्मिक, आर्थिक, बालसाहित्य, पाककला यांसारख्या विविध विषयांवरील विविध मराठी पुस्तके घरबसल्या मागविता येणार आहेत.

१० ते ५० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटही अॅमेझॉन देत आहे. अगदी ५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत पुस्तकांची किंमत आहे. हार्डकवर, पेपरबॅक व बोर्डबुक या फॉरमॅटमध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत. गिफ्ट देण्यासाठी हार्डकवर व हाताळण्यासाठी पेपरबॅक हे फॉरमॅट उपयुक्त आहे. पुस्तक खरेदी करताना तुम्हाला पुस्तकाच्या विस्तृत माहितीबरोबरच पुस्तक वाचलेल्यांचे रिव्ह्यू जाणून घेता येतील. प्रामुख्याने विश्वास पाटील, रणजित देसाई, व. पू. काळे, पु. ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी या साहित्यिकांचे पुस्तके या साईटवर उपलब्ध आहेत. शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, वि. स. खांडेकरांच्या ययाति, कुसुमाग्रज यांच्या नटसम्राट व भालचंद्र नेमाडेंच्या कोसला या कादंबरीला सर्वात जास्त मागणी व पसंती आहे. ऑनलाइन शॉपिंगधारकांनीही यावर समाधान व्यक्त केले आहे.

अॅमेझॉनवर मराठी पुस्तकांची विक्री होणार ही बातमी मराठी साहित्यविश्वाला व लेखक वाचकांना सुखावणारी आहे. यातून मराठी पुस्तकांची विक्रीही वाढेल. गाजलेल्या पुस्तकांसह नवोदितांच्या पुस्तकांनाही मागणी उपलब्ध होईल. - किरण भावसार, लेखक

मराठी पुस्तके शॉपिंग साईट्सवर अधिक उपलब्ध नव्हते. पण अॅमेझानवर आता मराठी बुकस्टोअर वाचकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मराठी साहित्यविश्वाला चांगले दिवस येतील हे नक्की. घरबसल्या मराठी पुस्तके वाचता येणार आहे. - सुरज गावंडे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समूह गायनाची घेणार ‘झेप’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील झेप संस्था आणी नाशिक महापालिकेच्या शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५) ११ हजार मुलांचे देशभक्तीपर समूह गायनाचा घेणार आहे. संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची तयारी सध्या सुरू आहे. 'झेप'तर्फे होणारा हा कार्यक्रम विक्रम असणार असल्याची माहिती उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी दिली आहे.

झेप संस्थेच्या वतीने नाशिककरांना विविध देशभक्तीपर कार्यक्रमाची मेजवानी दिली जाते. येत्या प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुद्धा नाशिककरांना देशभक्तीची आठवण करून देणारा अनोखा कार्यक्रम करण्याची कल्पना संस्थेतर्फे पुढे ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी उपमहापौर बग्गा यांच्या दालनात संगितकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांचा अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात समूहगाण कार्यक्रमाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहवून देशभक्ती रुजवावी अशी अपेक्षा चंद्रात्रे यांनी व्यक्त केली. उपमहापौर बग्गा यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी समूहगायन कार्यक्रम सुरू झाला. मागील वर्षी ७ हजार विद्यार्थ्यांनी समूहगायन कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. आता हा सहभाग ११ हजार मुलांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला बग्गा यांच्यासह चंद्राते, के. के. झोटिंग, .रो. नि. गोसावी, वि. वा. निपानेकर, एस. आट. पिंगळे, के. डी. हेमंत, अरुणा काकड, एम. एन. निकम, सुप्रिया कुलकर्णी, प्रशांत धामने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेध’मधून उलगडले व्यवसायाचे सूत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बुध्दीमत्ता ही कोणत्याही विशिष्ट क्षेत्राची मक्तेदारी नाही. कोणत्याही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवायचा असल्यास ध्यास व प्रयत्नांची सांगड घालावी लागते हे सूत्र वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेतून उलगडले.

पाच वर्षांपासून नाशिकमध्ये होत असलेल्या वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेत रविवारी बहुरंगी बुध्दीमत्ता या विषयावर मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी अतिशय रंगतदार पध्दतीने या मुलाखती घेतल्या. विविध क्षेत्रातील पाच प्रकारची माणसे या परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र आली होती. ऊर्जा क्षेत्रात संशोधन करणाऱ्या डॉ. प्रियदर्शन कर्वे यांनी सामान्य माणसांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी निर्माण केलेल्या निर्धूर चुलीची माहिती दिली. सायकलिस्ट महाजन बंधू आणि डॉ. सुनील वर्तक यांनी रेस अॅक्रॉस अमेरिका या विक्रमी सायकल शर्यतीचे अनुभव लोकांपुढे मांडले. दुपारच्या सत्रात डॉक्टर विदाऊड बॉर्डर या संस्थेतर्फे आपत्तीग्रस्त लोकांना मानसिक आधार देणाऱ्या डॉ. कामिनी देशमुख यांनी आपले अनुभव कथन केले. त्यांनी विविध देशात केलेले काम उपस्थितांसमोर सांगितले. महाराष्ट्रातील एका खेड्यात राज्यातील पहिली डिजिटल शाळा चालवणाऱ्या संदीप गुंड या तरुणाच्या मुलाखतीने कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. वेधची सांगता मधूर पडवळ या तरुणाच्या सत्राने झाली. जगभरातील लोकवाद्य जमा करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तरुणाने जमा केलेली लोकवाद्य ऐकणे व अनुभव ऐकणे हा एक रंगतदार अनुभव होता. यापल्या खुमासदार शैलीने या मुलाखती डॉ. नाडकर्णी यांनी एका उंचीवर नेऊन ठेवल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातील अश्विनी भार्गवे आणि त्यांच्या विद्यार्थीनींनी वेधचे गीत सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीटंचाईवर फुंकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मोसम खोऱ्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची तीव्रता लक्षात घेता मोसम खोऱ्यासह मालेगाव तालुक्यातील बहुतांश गावांना लाभ मिळण्यासाठी हरणबारी धरणाचे पहिले आवर्तन सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

गत पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाने सर्वत्र पिण्याच्या पाण्याची आगामी काळात भीषण टंचाई लक्षात घेता हरणबारी धरणातील संपूर्ण जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आमदार दीपिका चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार, शशिकांत कोर यांनी आंदोलनाद्वारे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. यामुळे अखेर सकाळी सहा वाजेच्या सुमारास हरणबारीचे पहिले आवर्तन सुमारे २८८ दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडण्यात आले.

मालेगाव शहरापर्यंत पाणी पोहच झाल्यास आवर्तन बंद केले जाणार असून, या काळात नदीकाठावरील मोटारी बंद करण्यात आल्या आहेत. मोसम खोऱ्यातील नामपूरसह मालेगाव तालुक्यातील १०० गावांना पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा व कांदा पिकांचा प्रश्न मार्गी लागणार असून, रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे.

बालागण तालुक्यात सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुुरू आहे. मात्र, पाण्याअभावी नदीकाठावरील लागवड खोळंबली होती. आवर्तनामुळे नदीकाठच्या विहिरींना फायदा होणार आहे. यामुळे कांदा लागवडीला लवकरच जोमाने सुरुवात होणार असून, लागवड झालेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. अनेक शेतक-यांनी नदीकाठी विहिरी खोदून ठेवल्या आहेत. यामुळे मोसम खो-यातील रब्बी पिकांना हे आवर्तन फलदायी ठरणार आहे. तसेच जनावरांच्या चा-यांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आवर्तन सोडल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे आणखी काही दिवस पाणीटंचाईपासून सुटका होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंब‌‌कमध्ये सेना-भाजपात रस्सीखेच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अंजनाबाई मधुकर कडलग आणि भाजपच्या विजया दीपक लढ्ढा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन्ही गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामुळे सेना विरुध्द भाजप अशी सरळ लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गत आठवड्यात नगरसेवकांच्या एका गटाने मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विविध प्रकाराच्या चर्चांना उधाण आले आहे. शह-काटशहाच्या राजकारणाने परिसिमा गाठली आहे. सोमवारी अंजना मधुकर कडलग यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत नाशिक मनपा शिक्षणमंडळ सदस्य बाळासाहेब कोकणे उपस्थित होते. तसचे, नव्याने सेनेत दाखल झालेले सर्व नगरसेवक व तृप्ती धारणे, शकुंतला वाटाणे, सिंधू मधे, अलका शिरसाठ, रवींद्र सोनवणे, ललित लोहगावकर आदी उप‌स्थित होते. त्याचप्रमाणे शिवसेना शहरप्रमुख छोटू पवार, गणपत कोकणे, पंकज धारणे, संजय हरळे, मनोहर महाले आदी समर्थकही उपस्थित होते.

भाजपच्या विजया लढ्ढा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे शहराध्यक्ष उदय दीक्षित, उपाध्यक्ष शामराव गंगापुत्र, माजी नगराध्यक्ष मांगीलालशेठ सारडा, दत्तूशेठ कदम, भरतशेठ नार्वेकर, संजयशेठ लढ्ढा, माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार, किरण अडसरे, गिरीश जोशी, युवराज कोठुळे उपस्थित होते.

विजया लढ्ढा यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका अर्जास त्यांच्या गटासोबत असलेले शिवसेना नगरसेवक संतोष कदम हे सुचक आहेत. विजया लढ्ढा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संतोष कदम यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. सेना-भाजप यांच्यात सरळ लढत होणार असेल, तर सेनेचे संतोष कदम अर्ज दाखल करण्याच्या घटकेपर्यंत भाजपच्या गोटात असल्याचे दिसून येत आहेत. मतदानाच्या दिवशी काय घडेल ते तेव्हाच स्पष्ट होईल.

नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सेनेची दावेदारी मजबूत मानली जात आहे. मात्र, त्र्यंबक नगरपालिकेचा इतिहास पाहता ऐनवेळी भाजपही वरचढ ठरू शकतो. आपल्या पक्षातील नगरसेवकांची मर्जी सांभाळण्याबरोबरच विरोधी गटातील नगरसेवक फोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐनवेळी कोण कोणाच्या गटात जाते, हे आैत्सुक्याचे ठरणार आहे. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांमध्येच नगराध्यक्षपदासाठी लागलेल्या चढाओढीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भू करमापकास लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापक गणी अहमद शेख याला २५०० रुपयांची लाच घतांना नाशिक लाचलुचपत विभागाने सोमवारी (२१ डिसेंबर) रंगेहाथ पकडले.

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापक गणी अहमद शेख यास एसीबीने सापळा रचून लाच घेताना पकडले. तक्रारदार यांची तालुक्यातील साकूर येथील शेती (गट नंबर १८९) आहे. या शेतीची मोजणी करण्यासाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय मालेगाव येथे योग्य ते शुल्क भरून अर्ज केला होता. त्यानुसार १६ डिसेंबर रोजी अहमद शेख यांनी शेती मालकांच्या शेतीची मोजणी केली. हद्दखुणा दाखविणे आणि नवीन नकाशा देण्यासाठी शेतीमालकाने विनंती केली असता गणी शेख याने त्यांच्याकडे चार हजार रुपयांची मागणी केली. याबाबत शेती मालकांनी एसीबी नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली. सोमवारी दुपारी मनमाड चौफुली येथे लाचखोर गणी अहमद शेख यास अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या संदर्भात कॅम्प पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनकर पॅनलला पराभवाचा धक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मविप्र संचालक दिलीप मोरे, संस्थेचे सचिव बाळासाहेब जाधव व युवानेते सतीश मोरे यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलने तेरापैकी आठ जागा जिंकत नेत्रदीपक विजय प्राप्त करीत स्पष्ट बहुमत मिळविले. माजी आमदार ‌दिलीप बनकर व भास्कर बनकर यांच्या पॅनलला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले.

गत दहा दिवसांपासून नम्रता व विकास पॅनलच्या वतीने निफाड, दिंडोरी व चांदवड या तालुक्यात प्रचाराचा धडाका उडवला होता. दोन्ही पॅनलकडून शिक्षण संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. माजी आमदार दिलीप बनकर व भास्कर बनकर यांच्यासाठी मातब्बर नेते शिरीष कोतवाल, श्रीराम शेटे आदी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यामुळे निवडणुकीत चुरस वाढली होती. बनकर पॅनलची दावेदारीही मजबूत मानली जात होती. मात्र, मतदारांनी त्यांच्याविरोधात कौल दिला. नम्रता पॅनलसाठी मविप्र संचालक दिलीप मोरे यांनी तरुणांना हातीशी घेत एकहाती झुंज दिली. निवडणुकीख निकाल जाहीर झाल्यानंतर नम्रता पॅनलच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी माणिकराव बोरस्ते, पंढरीनाथ देशमाने, दिलीप मोरे, सतीश मोरे, शिवाजीराव निरगुडे, संपतराव डोखळे, साहेबराव मोरे, रमाकांत जाधव, शशिकांत जाधव, सतीश देशमाने, दिलीप देशमाने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण तालुक्यात मजुरांची टंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

पाण्याची टंचाई असूनही थोड्याफार पाण्यावर शेतकरी कांदा लागवडीला पसंती देत आहे. एकाचवेळी कांदा लागवड सुरू असल्याने कळवण तालुक्यात मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच, मजुरीचे दरही वाढविले आहेत. कांद्याला भाव नसतानाही मजुरी वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

मजूर टंचाईमुळे त्यांचा भाव वधारून स्पेशल वाहनातून त्यांची वाहतूक करावी लागत आहे. त्यातच दिवसा लाईट नसल्याने कांदा लागवडीनंतर रात्रीचे पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यंदा शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

बेज, पाटविहीर, खेडगाव, नाकोडे, रवळजी, मोकभणगी, निवाणे, शिरसमणी, अभोणा आदी भागातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे. यामुळे मजुरांची मागणी वाढली आहे. त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागत आहे. ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना देखील भाडेत्‍त्वावर वाहन करून मजुरांना येण्या जाण्याची सोय करावी लागत आहे. तसेच वाढीव मजुरीही द्यावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images