Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नंदुरबार

देशातील उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, गुजरात तसेच मध्य व उत्तर महाराष्ट्रात १७ ते २१ मे कालावधीत उष्णतेच्या लहरी पसरण्याची शक्यता असून, या लाटेपासून जनतेने सावध राहून काळजी घ्यावी, असे आवाहन नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

देशातील काही राज्ये, तसेच महाराष्ट्रात १६ मे पर्यंत उष्णतची लाट वाढण्याची शक्यता आहे. ही लाट मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही पसरण्याची शक्यता असल्याचे अनुमान राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाद्वारे कळविण्यात आले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या सूत्रांशी बोलताना नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी म्हणाले की, देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि तेलंगणा या भागात उष्णतेच्या लहरी १६ मे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही लाट १७ मे ते २१ मे, २०१६ या कालावधीत देशातील उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, गुजरात आणि मध्य व उत्तर महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जनतेने या उष्णतेच्या लाटेपासून सावध राहण्याचा इशारा राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाद्वारे देण्यात आला आहे.

नागरिक व जनतेने वाढत्या उष्णतेच्या लाटेपासून स्वत:ची काळजी घ्यावी व आरोग्य राखण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,

जिल्हाधिकारी, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असह्य उकाडा अन् खंडित वीजपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

वीज कंपनीने पावसाळी काम हाती घेतल्याने शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित होता. त्यातच सूर्यानेही आग ओकल्याने तापमानात असहाय्य वाढ झाली होती. या सर्व कारणांमुळे व्यावसायिकांसह नागरिकांची लाही लाही झाली.

पावसाळा जवळ आल्यावर वीज कंपनी विविध कामे हाती घेते. वादळी पावसामुळे विजेच्या तारांवर आलेल्या फांद्यामुळे वीज प्रवाह खंडित होतो. तसेच, तारा तुटून नागरिक व पशुपक्षी यांच्या जीवावर बेतल्याचे प्रसंग घडतात. त्यामुळे वीज कंपनी पावसाळ्याच्या आधी म्हणजे मे महिन्यात पावसाळी कामे हाती घेते. मात्र, त्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. आज नाशिक, गंगापूररोड, म्हसरूळ, नाशिकरोड, सिडको, पंचवटी असा अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. गंगापूररोड, चांदशी, सावरकरनगर, दादोजी कोंडदेवनगर, आनंदवली या परिसरात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. नाशिकरोडलाही वीजपुरवठ्यात व्यत्यत येत होता. पाच दिवसांपूर्वी शहरात गारांसह वादळी पाऊस झाला तेव्हाही वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर गेल्या चार दिवसात कारण नसतानाही वीजपुरवठा खंडित होत आहे. आज तर कळसच गाठला गेला.

‌भूमिगत तारा टाका वीज कंपनीने विजेच्या तारा काही ठिकाणी भूमिगत केल्या आहेत. अनेक ठिकाणी अद्याप खांबावरच तारा आहेत. त्यामुळे झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी मनुष्यबळ व पैसा खर्च करावा लागतो. निसर्गाचीही हानी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्वॉलिटी कंट्रोलची नावालाच तपासणी

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

रस्ते, पुल, इमारत, बंधारे व इतर शासकीय बांधकामात कामाचा दर्जा घसरू नये म्हणून शासनाने क्वॉलिटी कंट्रोलच्या प्रयोगशाळेतून बांधकाम साहित्याची तपासणी करणे सक्तीचे केले असले, तरी या विभागातून परीक्षण केलेले बांधकाम साहित्य बहुतांश ठेकेदार प्रत्यक्षात वापरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या प्रयोगशाळा आहे, तर नगरपालिका व इतर काही संस्थेने केलेल्या कामांसाठी वापरलेल्या बांधकाम साहित्याचे परीक्षण हे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून केले जाते पण या प्रयोगशाळेत तपासणी केलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे, असा एकही प्रकार आढळला नसल्याचे समोर आले आहे. साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असेल, तर रस्ते व इतर काम निकृष्ट दर्जाचे होतेच कसे हाही प्रश्न आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक ते कळवण, नाशिक ते सटाणा, चांदवड ते देवळा, चांदवड ते मनमाड रस्ते अतिशय खराब झाले आहेत. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहेत. त्यासाठी जर उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असेल, तर ते खराब झाले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय कामात सर्वाधिक कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून, यासाठी नाशिक येथील त्र्यंबकरोड येथे बांधकाम भवनच्या तिसऱ्या मजल्यावर १९९० साली दक्षता व गुण नियंत्रक मंडळाची (क्वॉलिटी कंट्रोल) स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या अंतर्गत नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

या मंडळातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करणाऱ्यात येणाऱ्या रस्ते, पुल, इमारती या कामांची गुणवत्ता विषयक नमुना तपासणी करून अहवाल तयार करण्याचे काम केले जाते. त्याचप्रमाणे शासनस्तर किंवा मुख्य अभियंत्याकडून आलेल्या बांधकामाच्या तक्रारीबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यास अहवाल दिला जातो. या मंडळात अधीक्षक अभियंता, दोन कार्यकारी अभियंता आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडे नाशिक व नगरचा भार तर दुसऱ्याकडे धुळे, जळगाव व नंदुरबार आहे. त्याचप्रमाणे या मंडळात पाच उपअभियंते व प्रत्येक क्षेत्रीय मंडळासाठी नियंत्रण शाखेचे स्वतंत्र उपअभियंत्याचे पद आहे. नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहे.

अधिकारी व ठेकेदारांचे लागेबांधे

क्वॉलिटी कंट्रोलकडून साहित्याचे परीक्षण हे ठेकेदारांनीच करायचे असल्यामुळे ते या प्रयोगशाळेत दर्जेदार मटेरीयलचे नमुने देतात आणि त्यानंतर प्रत्यक्षात मात्र, निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरतात. गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची थेट तपासणी व सुपरव्हीजन केले जात असले तरी त्यात अधिकारी व ठेकेदारांचे लागेबांधे असल्यामुळे हे काम गुणवत्ता नियंत्रकाच्या प्रयोगशाळेतून निरीक्षण केलेल्या मटेरीयलप्रमाणे होत नाही.

कोय काय म्हणाले?

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रक मंडळाच्या प्रयोगशाळेतून गेल्या वर्षभरात २६६ कामे झाली. त्यातून या मंडळाला चार कोटी ५३ लाख रुपये मिळाले. डांबर, खडी, वाळू, सिमेंट यासह बांधकामाचे सर्व बांधकाम साहित्याचे परीक्षण या मंडळात केले जाते. चाचणीसाठी येणारे बांधकाम साहित्य चांगल्या दर्जाचेच असते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य असलेले प्रकार जवळपास नाहीच.

- एस. जी. पाटील, शाखा अभियंता, गुण नियंत्रक मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांची जाळपोळ चालूच

$
0
0

महालक्ष्मीनगरमधील घटना; महिला वॉचमनच्या सतर्कतेमुळे टळली जीवितहानी

म. टा. प्रतिनिधी, सिडको

महालक्ष्मीनगरमधील गाड्या जाळणारे आरोपी अजूनही मोकाट असताना याच ठिकाणापासून दुसऱ्या गल्लीतील एका सोसायटीत सहा दुचाकी जाळण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी, पहाटेच्या सुमारास घडला. समोरच्या इमारतीमधील वॉचमनच्या हा प्रकार लक्षात आल्याने जीवितहानी टळल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी पोलिस चौकीच्या मागणीसाठी काही वेळ रास्तारोको केले. शनिवारच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील निलांजन नील अपार्टमेंटच्या पार्किंगमधील सहा दुचाकी जळून खाक झाल्या, तर एक चारचाकी काही प्रमाणात जळाली आहे. शुक्रवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास या इमारतीच्या समोरील इमारतीत वॉचमन म्हणून काम करणाऱ्या महिलेला आग लागलेली दिसली. त्यांनी आरडाओरड करून नीलांजन नील अपार्टमेंटमधील जनाबाई यांना जागे केले. या दोघींनी मिळून रहिवाशांना उठविले. त्यांनी तातडीने आग विझविण्यास सुरुवात केली. अग्निशमन दल पोहचेपर्यंत नागरिकांनी अक्षरशः इमारतीच्या टाक्यांमधील पाण्याने ही आग विझविली. आगीच्या घटनेवेळी तोंडाला काळे फडके बांधून पळणाऱ्या एकाला काही जणांनी पाहिले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर व सहकारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे, आमदार सीमा हिरे, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथ, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे हे देखील घटनास्थळी आले. यावेळी संतप्त रहिवाशांनी पोलिस चौकीसाठी रास्तारोको केले. पोलिस आयुक्तांनी चौकी उभारण्याचे आश्वासन दिले.

जळालेल्या दुचाकी

या घटनेत कृष्णा कुळकर्णी यांची एमएच १५ डीपी ४३५२, दिलीप वडवजे एमएच १५ बीएस ८२३०, रेखा वडवजे एमएच १५ सीक्यू ९६४०, दिनकर चव्हाण एमएच १५ ईआर ४६२४, गौरव जाधव एमएच १५ एएल ९८८६, रोहन सिंग एमएच १५ सीपी ९१८० या सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. एक अल्टो गाडीही काही प्रमाणात जळाली आहे.

पोलिसांचा वचक संपला आहे का?

जी तत्परता राजकीय गुन्हे दाखल करण्यात व तपासात दिसते ती जाळपोळ, चेनस्नॅचिंग, घरफोडी आदी गुन्ह्यांच्या तपासात का दाखवत नाही?

एखाद्या मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याकडे गुन्हे घडल्यासच गांभीर्य येईल का?

पोलिस फक्त नेत्यांचे मागेपुढे फिरून त्यांना खूश करण्यात धन्यता मानतात का?

सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेवनू कार्यवाही करण्यात स्वारस्य नाही का?

अशा घटनांमध्ये जबाबदारी निश्चित करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई करण्यात पोलिस प्रशासनाला स्वारस्य नाही असे समजावे का?

जनतेचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडितांची घटनस्थळी जावून भेट घेतली आहे का?

या घटनांच्या तपासासाठी व प्रतिबंधासाठी पोलिस दलाचा उपयोग करून कृती आराखडा तयार केला का?

असेल तर त्याच्या अंमलबजावणीचे फलित काय?



कोण काय म्हणाले,

रात्री तीन वाजेच्या सुमारास वॉचमन महिलेने आम्हास इमारतीत आग लागल्याचे सांगितले. आम्ही खाली येऊन पाहिले तेव्हा सर्व गाड्या जळत असल्याचे पाहिले.

- रवींद्र जगताप

रात्री समोरच्या इमारतीमधील महिलेने सांगितल्याने मी तातडीने सोसायटीतील रहिवाशांना उठविले. त्यांनी आग विझविली. मात्र, या प्रकारामुळे आता आम्हाला खूप भीती वाटू लागली आहे.

- इंदूबाई चित्ते, वॉचमन

अंबड पोलिस ठाण्यात कर्मचारी वाढविले पाहिजे. त्याचबरोबर कायमस्वरूपी पोलिस चौकी या भागात उभारली पाहिजे. समाज मंदिरातील मोकळ्या जागेत होत असलेल्या प्रकारांमुळेच हे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आरोपींना अटक करावी.

- अॅड. तानाजी जायभावे, नगरसेवक

इमारतीमागे असलेल्या समाजमंदिराच्या खुल्या जागेत अनेकदा रात्री काही जण मद्यपान करीत असतात. हे समाजमंदिर एका संस्थेच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेने या समाजमंदिराच्या आवारात एका वॉचमनची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

- धनाजी लगड

रात्री झोपेत असताना एक व्यक्ती माझ्याजवळून पळत गेल्याचे जाणवले. त्यामुळे जाग येऊ समोर पाहते तो आग लागलेली दिसली. आरडाओरड करून नागरिकांना उठविले. पळून जाणाऱ्या व्यक्तीने तोंडाला काळे फडके बांधले असल्याचे बघितले आहे.

- जनाबाई गवळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स ग्रुप’तर्फे एज्युफेस्ट

$
0
0

२१, २२ मे रोजी नाशिकमध्ये आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तम शिक्षणाने आयुष्याला चांगली कलाटणी मिळते. शिक्षणाच्या जोरावरच विद्यार्थ्यांचे चांगले करिअर घडू शकते, हा विचार समोर ठेवून 'टाइम्स ग्रुप'ने 'टाइम्स एज्युफेस्ट २०१६' या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शहरातील गंगापूररोडवरील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये दि. २१ व २२ मेदरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे.

हे दोनदिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, यामध्ये फॅशन आणि इंटेरियर डिझायनिंग, एमबीए, इंजिनीअरिंग, डेंटल, हॉटेल मॅनेजमेंट, आयआयटी, फॉरेन लँग्वेज, दहावी व बारावी कॉमर्स आणि सायन्स कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, स्टडी अॅब्रॉड, बोर्डिंग आणि इंटरनॅशनल स्कूल या अन् शिक्षण क्षेत्रातील इत्थंभुत माहिती एकाच छताखाली नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. दोन‌ दिवस खास विद्यार्थ्यांसाठी सेमिनारचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.

प्रदर्शनात पहिल्या दिवशी दि. २१ मे रोजी प्रदर्शनाच्या उदघाटनानंतर दुपारी १२ वाजता इयत्ता दहावीनंतर करिअरचे पर्याय या विषयावर मुग्धा शेट्ये (ग्रोथ सेंटर, मुंबई) तसेच, दुपारी ३ वाजता इयत्ता बारावीनंतर करिअरचे पर्याय या विषयावर मुग्धा शेट्ये मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४.३० वाजता इयत्ता दहावी व बारावीनंतर स्पर्धा परीक्षांमधील करिअर कसे निवडावे, कसे घडवावे, या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दि. २२ मे रोजी सकाळी १० वाजता मुलांच्या क्षमता आणि यश या विषयावर श्यामा कुलकर्णी या मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ वाजता स्पर्धात्मक परीक्षांबाबत रोहन नामजोशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त नाशिककरांनी 'टाइम्स ग्रुप'च्या 'टाइम्स एज्युफेस्ट २०१६' या प्रदर्शनात आणि सेमीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठकाबा बोलतात पशुपक्ष्यांची भाषा

$
0
0

बुधवारी 'मटा संवाद' कार्यक्रम; वाचकांना उपस्थितीचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चिवचिवाटामधून चिमणी काय सांगतेय ते अगदी सहजतने कळतेय, कावळ्याच्या कावकाव मधून त्याचे संदेश समजताहेत. पोपट, कबूतर हे केवळ पक्षीच नाही तर मांजर, कुत्रा यासह आणखीही काही प्राणी काय बोलताहेत हे कळतेय म्हटल्यावर काही काळासाठी ही फॅण्टसी वाटण्याची शक्यता आहे. परंतु हे खरे आहे. 'त्यांना' पशुपक्ष्यांची भाषा कळते. झऱ्याचे, धबधब्याचे आवाज काढता येतात. इतकेच नाही तर निसर्गातील कोणतीही हालचाल टिपून त्याचा अर्थ 'त्यांना' कळतो. तो अर्थ ते समोरच्याला उलगडून सांगू शकतात.

शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी उभे आयुष्य व्यतीत झाल्याने निसर्गाची भाषा अवगत झालेले ठाकर आदिवासी अवलिया कलाकार ठका कृष्णा गांगड 'मटा'वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. निमित्त आहे 'मटा संवाद' या कार्यक्रमाचे. बुधवार १८ मे रोजी, सकाळी ११ वाजता एच. आर. केटरर्स संचालित ऋग्वेद मंडळाचा ऋग्वेद हॉल, तिडके कॉलनी, इंदिरानगर-कॅनॉलरोड या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगात धुंव्वाधार बरसणारा पाऊस, रोरावत वाहणारा बेफाम वारा, कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज, ओढ्यानाल्यांचा खळखळाट, बिबट्यांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे, पशुपक्ष्यांचे मंजूळ आवाज असे निसर्गसंगीत ऐकतच ठकाबाबा लहानाचा मोठा आणि आता वृध्द झाले. जंगलात गुरे चारायला गेल्यानंतर पशुपक्ष्यांचे आवाज सभोवतालच्या नीरव शांततेत कानावर पडल्यावर तसेच आवाज काढत प्रतिसाद देण्याची त्यांना सवय लागली. त्यातूनच अनेक वन्यप्राणी, पक्ष्यांच्या हुबेहूब आवाजाचे कौशल्य ठकाबाबाने लीलया आत्मसात केले. पर्यटकांपासून तर थेट दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत अनेकांनी त्यांच्या या कलेची प्रशंसा केली. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी ठकाबाबाला राज्य सांस्कृतिक पुरस्कारही प्रदान केला. कार्यक्रमात ठकाबाबांचा जीवनपट उलगडणार असून ते पशुपक्ष्यांचे आवाज काढून दाखवणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठकाबांची ओळख

आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या ठकाबाबांचे वय आता ८० वर्षांहून अधिक आहे. सह्यकड्याच्या पंचक्रोशीत ठकाबाबा हीच त्यांची ओळख. अकोले तालुक्यातील उडदावणे या दुर्गम गावात सन १९३२ मध्ये ठकाबाबांचा जन्म झाला. नगर जिल्ह्यातील पश्चिमेच्या टोकाकडील भंडारदरा धरणापासून १२ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावातच खडकाळ माळरानावर २ ते ३ एकर शेती आहे. पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज आणि अंगी बाणलेल्या 'नाना कळा' हेच ठकाबाबांचे आयुष्याचे भांडवल, अगदी सहजगत्या ते जीभ नाकाला टेकवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोकामधील फी वाढीस विरोध

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोका स्कुलने सन २०१६ -१७ या शैक्षणिक वर्षांसाठी केलेल्या फी वाढीविरोधात पालक एकवटले आहेत. फी वाढीला विरोध कायम राहणार असल्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. सीबीएस येथील हुतात्मा स्मारकात शनिवारी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने अशोका युनिव्हर्सलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेतली. या सभेत पालकांनी शाळेतर्फे आकारण्यात येत असलेल्या टर्म फी आणि इतर शुल्कवाढीबाबत नाराजी व्यक्त केली. फी वाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक पालकाला फी च्या तपशीलासह इतर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच याबाबत वर्ग शिक्षकांना पत्र लिहून त्यांच्याकडून तपशीलवार माहिती घेण्यात यावी, असेही बैठकीत ठरले. बैठकीमध्ये शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे सचिव डॉ. मिलींद वाघ यांना पालकांना मार्गदर्शन केले. मंचच्या छाया देव, मुकुंद देव यांच्यासह पालक उपस्थित होते. याबाबत अशोका स्कुलनेही त्यांचे म्हणणे कळविले आहे. आम्ही राज्य शैक्षणिक संस्था कायदा २०११ आणि हाय कोर्टाच्या निर्देशांनुसारच शुल्क आकारणी करीत आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हाच स्कूलचा उद्देश असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुझ्या गळा, माझ्या गळा..

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

देशात आणि राज्यपातळीवर काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी एकमेकांना शत्रू समजत असले तरी, नाशकात शनिवारी मात्र काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी 'तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा...'असंच वातावरण तयार केलं. निम‌त्ति होते दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या विश्रामगृहावरील एकत्र‌ति आगमनाचे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांचे दिलदारपणे स्वागत केले. तर, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही तसाच दिलदारपणा दाखवत पालकमंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत केले.
काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश हे शनिवारी नाशिकमध्ये आले होते. कळवणमध्ये परिषद संपल्यानंतर त्यांनी नाशिकच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद आयाजित केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे नेते व महिला पदाधिकारीही उपस्थित होते. नेमके याच वेळी पालकमंत्री गिरीश महाजन हे विश्रामगृहावर येणार होते. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याच वेळी काँग्रेसच्या मोहन प्रकाश यांचे आगमन झाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही शत्रुत्त्व बाजूला ठेवत प्रकाश यांचे स्वागत केले. भाजपच्या या स्वागताने काँग्रेसचे पदाधिकारीही भारावले.

तर चव्हाण यांच्या स्वागतासाठी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील थांबल्या होत्या. त्याचवेळी गिरीश महाजन यांचेही आगमन झाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षधर्म पाळत महाजन यांचे स्वागत केले. त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याचा दिलदारपणाही दाखवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोदी-फडणवीस सरकारची संवेदना बोथट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

दुष्काळग्रस्त लातूरला पाठविलेल्या पाण्याचे ४ कोटीचे बिल पाठवणाऱ्या मोदी व फडणवीस सरकारची संवेदना बोथट झाली असून, इंदिरा गांधींनी आदिवासी, गरीब जनतेसाठी सुरू केलेल्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. शेतकरी वर्गाला संपूर्ण कर्जमाफी मिळावी व आदिवासी जनता आपल्या हक्कांपासून वंचित राहू नये म्हणून भाजप-सेनेच्या सरकारच्या विरोधात या आदिवासी वनहक्क परिषदेच्या माध्यमातून रणशिंग फुंकले असून, सरकार जागे होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा इशारा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.

कळवण येथील आर. के. एम. विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आदिवासी वन हक्क परिषद व शेतकरी मेळाव्यात खासदार चव्हाण बोलत होते. मंचावर काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, रामकिसन ओझा उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले कि, इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी सुरू केलेली इंदिरा आवास घरकुल योजना व अनेक शासकीय व आदिवासींच्या अनुदानित योजना बंद करण्याचा सपाटा सत्ताधारी भाजप-सेना सरकारने सुरू केला आहे. आदिवासी जनतेचे अधिकार कोणी काढून घेणार असतील तर आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ. संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी व गरीब बांधवांसाठीच्या योजना व त्यांची माहिती सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. सध्या शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टातून पिकवलेल्या कांद्याचे वांदे केले असून कांद्याला २००० रुपये हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. सत्ताधारी पक्षातील खाकी चड्डीवाले व काळी टोपीवाले हे कुणाचेच भले करू शकत नाहीत याचे गांभीर्य लक्षात ठेवून संवेदना व जाणीव नसलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी व गोरगरीब जनतेने एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. पद्माकर वळवी यांनी केले व या वन हक्क परिषदेमागील उद्देश स्पष्ट केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएस, एनआयएचा तपास जनतेसमोर आणा

$
0
0

अशोक चव्हाण यांची मोदी-फडणवीस सरकारवर टीका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव बाँम्बस्फोटातील आरोपींवरील मोक्का हटवण्याच्या एनआयएच्या निर्णयावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. या प्रकरणातील सरकारी वकील रोहिधणी सालीयन यांच्यावरील दबावानंतर आरोपी सुटणार याची चाहूल लागली होती असे सांगत, मालेगाव स्फोटाचा एटीएस व एनआयएने केलेला तपास लोकांसमोर सरकारने मांडावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

केंद्र सरकार दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचे सांगत, सरकारे बदलली की, तपासही बदलतात असा आरोप त्यांनी केला. दोन तपास यंत्रणा वेगवेगळया तपास कसा करू शकतात? असा प्रश्न विचारत मालेगाव स्फोटातील आरोपी सुटणे हे गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी राज्यसरकावर टीका करत संपूर्ण कर्जमाफीची पुन्हा मागणी केली आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना, चव्हाण यांनी मालेगाव स्फोटातील आरोपींवरील मोक्का हटवण्याच्या एनआयएच्या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. हा निकाल गंभीर असून शहीद हेमंत करकरे यांनी मेहनत घेवून हा तपास केला होता. परंतु, सरकार बदलताच या प्रकरणातील आरोपींना सोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. सरकारी वकील रोहिनी सालीयन यांनी सहा महिन्यांपूर्वीच या प्रकरणात दबाव येत असल्याचे म्हटले होते. परंतु, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. केंद्रसरकार दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहे असा चव्हाण यांनी केला. राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी राज्यसरकावर तीव्र टीका केली. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाला दुष्काळसंदर्भात आदेश द्यावे लागत आहे. तरीही सरकार निष्क्रीय आहे. विरोधकांना विश्वासात घेतले जात नाही. दुष्काळावर कर्जमाफी हा एकमेव उपाय आहे. परंतु, सरकार केवळ पुनर्गठन करत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. तरीही सरकार गंभीर नाही. त्यामुळे सरकार संपूर्ण कर्जमाफीसाठी आणखी कशाची वाट पाहत आहे, असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. दुष्काळाच्या नावाखाली टँकरमाफीया सक्रीय असून विरोधकांनी दुष्काळावर विविध उपाययोजना सुचविल्यात. परंतु, सरकार विरोधकांना प्रतिसाद देत नाही असा आरोपही त्यांनी केला.

जलयुक्त शिवार खासगी तत्त्वावर

राज्यसरकारतर्फे जलयुक्त शिवारतर्फे विविध कामे केल्याचा दावा करत आहे. प्रत्यक्षात ही कामे खासगी संस्थांकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाकडून या कामांसाठी निधी दिला जात नाही. सरकार केवळ श्रेय घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परश्या-आर्चीसाठी पब्लिक सैराट!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

'सैराट'फेम आर्ची आणि परश्याची अर्थातच रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी रविवारी नाशिकमध्ये हजेरी लावली आणि नाशिककरांची प्रचंड गर्दी उसळली. परश्या व आर्चीची एक झलक पाहण्यासाठी उसळलेली गर्दी बेकाबू झाल्याने अनेकांना लोटालोट, चेंगराचेंगरीचा फटका बसला. धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड टेक्नॉलॉजी कॉलेजतर्फे इंटर्नल इलेगन्स या मेगा फॅशन शोसाठी रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी रविवारी दुपारी नाशिकच्या चोपडा लॉन्सवर हजेरी लावली.

या म्युझिक, मस्ती आणि ग्लॅमरस फॅशन शोचे खास आकर्षण होते 'सैराट'फेम परश्या आणि आर्ची. राज्यभरातील सर्व प्रेक्षकांना याड लावलेल्या या जोडीला भेटायला नाशिककर प्रचंड उतावीळ झालेले दिसून आले. दुपारपासूनच लॉन्सच्या परिसरात यंगस्टर्सचा कल्ला होता. आर्ची... परश्या... असा सतत जल्लोष सुरू होता. या वेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त देत परिसराला छावणीचे स्वरूप देण्यात आले होते. जसजसा फॅशन शो सुरू होत रंगत वाढवत गेला, तसतशी यंगस्टर्समध्ये या जोडीला पाहण्याची झिंग चढली. प्रचंड उत्सुकतेनंतर आर्ची-परश्याची स्टेजवर एंट्री होताच नाशिककर अक्षरशः 'सैराट' झाले. ही गर्दी नंतर पोलिसांनाही जुमेनाशी झाली.

असे झाले परफॉर्मन्स

इंटरनल इलेगन्स या फॅशन शोमध्ये अनेक प्रकारच्या फॅशनचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. या वेळी शेरवानी, पटियालासोबतच राजस्थानी, दाक्षिणात्य पद्धतीच्या पेहरावांचे प्रदर्शन करण्यात आले. सोबतच पेशवेकालीन आणि शिवकालीन साड्यांसोबत त्या काळच्या ज्वेलरीचेही बहारदार सादरीकरण झाले. या वेळी सिंगल आणि कपल फॅशन रॅम्प वॉक सादर झाले. गीता शेवाळे माळी हिने सादर केलेल्या 'पिंगा' आणि 'दिवाणी हो गयी' या गाण्यावर नाशिककरांनी ताल धरला.

माऊथ म्युझिक अन् मिमिक्री

फॅशन शोमध्ये एका परफॉर्मरने झिंगाट गाणं माऊथ मिमिक्रीने फक्त म्युझिकच्या आधारे सादर केले, तर ठका गांगड यांच्या पक्षी, प्राणी यांच्या अस्सल आवाजाने आणि चेहऱ्यावरील हावभावाने नाशिककरांनी उत्स्फर्त दाद दिली.

सुरक्षारक्षक, पोलिसांची अरेरावी

उसळलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रशासनही हतबल झाले. या वेळी अनेकांकडे पास नसल्याने प्रवेशद्वारावर तुफान लोटालोट आणि चेंगराचेंगरी झाली. प्रवेशद्वार तोडत नाशिककरांनी बेफाम झाले होते. या वेळी पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी लाठीचा वापर सुरू केला, तसेच अनेकांना धक्काबुक्कीही केली. या वेळी अनेक महिला आणि तरुणी गर्दीत चेंगरल्या गेल्या. या वेळी पत्रकारांनाही वेठीस धरत पोलिसांनी अरेरावी केली.

नाशिककरांच्या उत्साहावर विरजण

गेल्या दोन दिवसांपासून नाशिककर आर्ची आणि परश्याच्या जोडीला भेटायला उत्सुक झाले होते. मात्र, काही यंगस्टर्स आणि नाशिककरांनी ही जोडी स्टेजवर आल्यावर त्यांना तिथेच गराडा घातल्याने आयोजकांना तत्काळ कार्यक्रम थांबवावा लागला. या वेळी पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी गर्दीला हटवण्याच्या प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. यामुळे मात्र नाशिककराच्या आनंदावर विरजण पडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ निवारणाचे अनुदान लवकरच मिळणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दुष्काळ निवारणासाठी मालेगाव तालुक्यास आतापर्यंत ५० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून, उर्वरित अनुदान लवकरच प्राप्त होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत पाटणे (ता. मालेगाव) येथील परसूल नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती भरत पवार, रामा मिस्तरी, कैलास तिसगे आदी यावेळी उपस्थित होते. भुसे पुढे म्हणाले, की दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात कोरडवाहू शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यास दुष्काळ निवारण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे.

राज्यातील २५ हजारांवर गावांना टंचाई व दुष्काळाची झळ बसली आहे. मालेगाव तालुक्यातही काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत विकास साधला पाहिजे. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी परिश्रम घ्यावेत, असे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होणारी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. आगामी पावसाळ्यात पाण्याचा प्रत्येक थेंब अडवावा, जेणेकरुन जलसाठा निर्माण होईल, असेही भुसे यांनी नमूद केले. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बंधारा, तलावांचीही होणार दुरुस्ती

मालेगाव तालुक्यातील देवारपाडे, भिलकोट, गुगुळवाड, जळकू, कंधाणे, अस्ताणे, मोहपाडा, कौळाणे (गा.), वनपट, टिंगरी, गाळणे, कजवाडे, पोहाणे, दुंधे येथे नदी पुनर्जीवन, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाझर तलाव दुरुस्ती, सिमेंट काँक्रीट बंधारा, केटीवेअर दुरुस्ती आदी कामांचे भूमिपूजन भुसे यांच्या हस्ते झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर भरायलाही मिळेना पाणी!

$
0
0

निफाडमधील लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना अडचणीत

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुका भीषण पाणीटंचाईला सामोरा जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. तालुक्यातील ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने अधिकारीही हैराण झाले आहेत. त्यामुळे टँकर भरायला कोणी पाणी देत का? पाणी.. असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे.

पाणीटंचाईची सर्वात जास्त झळ तालुक्याच्या पूर्व आणि दक्षिण भागाला बसत आहे. तालुक्यातील जवळपास १२ गावांना १४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तालुक्यातील मानोरी येथे दिवसातून पाणीटँकरच्या दोन खेपा होत आहेत. गोंदेगाव येथे सात वेळा, पाचोरे खुर्द येथे दोन वेळा, पाचोरे बु. येथे पाच वेळा, मरळगोई खुर्द येथे तीन वेळा, मरळगोई बु. येथे तीन वेळा गोळेगाव येथे दोन वेळा, वाहेगाव येथे दोन वेळा, भर्वस येथे तीन वेळा दिवसातून पाणीपुरवठा करावा लगत आहे. पिंपळगाव नजिक, चितेगाव, औरंगपूर येथे पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव आलेले असल्याचे पंचायत समितीचे ल. पा. चे अधिकारी गोरे यांनी सांगितले.

पाणी आणायचे कुठून?

टँकरमध्ये पाणी भरायचे कुठून हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. निफाड तालुक्यात खासगी टँकरला ७०० ते १००० रुपये एका खेपेला द्यावे लागत आहेत. तर, सरकारच्या पाणीपुरवठा टँकरने दिवसाला कितीही खेपा झाल्या तरी, त्याला फक्त ४०० रुपये दिले जात आहेत. शासकीय टँकरला पाणी उपलब्ध करणे अवघड झाले असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले.

धरणाच्या गावातच टंचाई

धरणाचे गाव असलेल्या नांदूरमध्यमेश्वरला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येते. तालुक्यात कानळद, वाकद, शिरवाडे, धारणगाव, देवगाव, सावरगाव, रेडगाव आदी गावांमध्येही तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. तालुक्यातील नद्या, नाले, कालवे, पाझर तलाव पूर्णता आटल्याने अनेक ठिकाणी शेतकरी उभे-आडवे बोर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाश‌िक : पाऱ्याने ओलांडली चाळीशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उकाड्यामूळे हैराण झालेल्या नाशि‌ककरांना आता पुढील तीन दिवस तप्त उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. रविवारी नाशिकमधील तापमानाच्या पाऱ्याने चाळ‌िशी पार गेला. नाशिक ४०.३, तर मालेगाव ४३.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. बुधवारपर्यंत नाशिकचा पारा ४३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाशिककर गेल्या दीड दोन महिन्यांपासून तापमानातील चढउतार अनुभवत आहेत. एरवी एप्रिल आणि मेमध्ये ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणारा तापमानाचा पारा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच येथे पोहोचला होता. २५ मार्चला राज्यातील सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद जिल्ह्यातील मालेगावात झाली होती. त्यांनतरच्या दोन चार दिवसांत नाशिकचे तापमानही ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत हे तापमान ३५ ते ३९.९ अंश सेल्सियसच्या आसपास राह‌िले आहे. त्यामुळे कधी तप्त उन्हाच्या झळा, तर कधी प्रचंड उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ३१ मेपर्यंत जिल्हावासीयांनाच नव्हे; तर उत्तर महाराष्ट्रातील रहिवाशांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार आहे. तेलंगणा, विदर्भ आणि राजस्थानात ‍तापमान वाढले असून, त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील तापमानावरही होतो आहे.

रविवारी जिल्ह्यात ४०.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. बुधवारी १८ मेपर्यंत हे तापमान वाढत जाऊन ४१ अंश सेल्सियसच्या वर पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उष्णतेची ही लाट मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही पसरण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा दरामुळे आंबे आंबट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षय तृतीयेमुळे फळांचा राजा आंब्याची मागणी वाढल्याने दरही वाढले होते. मात्र, अक्षय तृतीयेनंतरही आंब्यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. यंदा अजूनही आंब्यांचे दर कमी झालेले नाहीत. सुमारे ५० रुपयांपासून १२० रुपये किलोपर्यंत आंबे खरेदी करावे लागत आहेत. यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. इतर फळांच्या किमतीही अधिक असल्याने दुष्काळात फळांचा आस्वाद घेणे महागात पडत आहे.

शहरात आंब्यांची भरपूर आवक होत असली तरी दर मात्र कमी झालेले नाहीत. केशर, लालबाग, कर्नाटकचा हापूस, देवगड आदी जातीचे आंबे बाजारात उपलब्‍ध आहेत. मात्र, दरामुळे सर्वसामान्यांना आंबे आंबट झाली आहेत. केशर ८० रुपये, तर लालबाग ५० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. कर्नाटक हापूस आंबा १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे खरेदी करावा लागत आहे. गावठी आंब्याची अद्याप आवक न वाढल्याने दर कमी झाले नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. आणखी आठवडाभर तरी आंब्यांच्या दरात घट होण्याची शक्यता कमी असल्याने विक्रेत्याने सांगितले. सफरचंदचे दरही वाढले असून १४० ते १६० रुपयांप्रमाणे विक्री होत आहे. चिकू, संत्री, पपई, अननस, डाळिंब यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही.

किलोचे दर आंबे - ५० ते १२०, सफरचंद - १२० ते १६०, चिकू - ६०, संत्री - ६०, अननस - ५० रुपयाला एक, किवी - ३० ला एक, केळी - ३० रुपये डझन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गझल एक तरल जीवनाभूती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जी गझल ऐकणाऱ्याला एक तरल जीवनाभूती देऊन जाते, अंतरिक संवेदनांना छेदून जाते त्या गझलला उत्तम गझल असे म्हणता येईल. गझलमधून निघणारा भावार्थ समजवून घेतल्यास तिचे रसग्रहण चांगल्या पध्दतीने होते, असे प्रतिपादन गोव्याचे ख्यातनाम गझलकार दत्तप्रसाद जोग यांनी केले. लोकहितवादी मंडळातर्फे ज्योतीकलश सभागृहात रविवारी आयोजित 'गझल मैफल आणि गप्पा टप्पा' या कार्यक्रमात ते बोलत होते.

गझल कशी समजावून घ्यावी, त्याचे रसग्रहण कसे करावे, त्याची निर्मिती कशी होते, त्यातील व्याकरण अशा एक ना अनेक अंगांचे मार्गदर्शन त्यांनी 'गझल मैफल आणि गप्पा टप्पा' या कार्यक्रमातून केले. ते पुढे म्हणाले की, गझल हा प्रकार आपला नाही तो उर्दू, फारसी, परशीयन या माध्यमातून मराठीत आला आहे. मराठीत गझालला मानाचे स्थान सुरेश भटांनी मिळवून दिले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गझल कशी सहजगत्या तयार होऊ शकते, याचे उदाहरण त्यांनी मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून स्पष्ट केले. कोणत्याही मोठ्या शब्दांच्या मोहात न पडता सोप्या शब्दात आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे परेश नाईक यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना सुभाष पाटील यांनी, तर जोग आणि नाईक यांचे स्वागत लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. यावेळी जोग व नाईक यांनी कार्यक्रम गप्पांमधून पुढे नेला. गायत्री वारुंगसे यांनी सूत्रसंचालन, तर स्वाती शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णींसह रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमधील कचरा अखेर हटवला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरासाठी डोकेदुखी बनलेला तहसील कार्यालयाजवळील कचरा हलविण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१५ पासून येथे कचरा साचला होता. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही शहराची प्रमुख समस्या बनली होती.

नगरपारिषद आणि परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरलेला हा कचरा एकदाचा हलविण्यात आला आहे. नव्याने कचरा डेपोसाठी जागा निश्चित करण्यात येत असून, येत्या काही दिवसांत कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी कायमस्वरूपी जागा ताब्यात घेणार असल्याची माहिती नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी दिली.
येत्या काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याकरिता जागोजागी खड्डे खोदण्यात येत आहेत. सेवाभावी संस्थांकडून ट्रिगार्ड मिळविण्यात येत आहेत. एकूणच स्वच्छ शहर, सुंदर शहर, हिरवे शहर अशी संकल्पना राबवत आहोत, असे नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी सांगितले. नागरिकांनी नगरपालिकेच्या या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले आहे. दानशुरांनी मोठ्या प्रमाणात रोख अथवा ट्रॅक्टर, जेसीबी उपलब्‍ध करून मदत देऊ केली आहे.
विहिरी, तलावांचे पुनरुज्जीवन

शहरास विहिरी आणि तलाव यांचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी नगरपालिकेने लोकसहभागातून या विहिरी व तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. अहिल्या धरणाचा गाळ काढण्यात येत आहे. त्याचसोबत बल्लाळेश्वर मंदिराशेजारी असलेली विहीर, इंद्राळेश्वर तलावचे सूर्यकुंड यांचा गाळ काढला आहे. आता मुकुंदेश्वर तलावाचा गाळ काढण्यात येणार आहे. त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चणकापूर, हरणबारीतील गाळ काढावा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. यामुळे चणकापूर व हरणबारी या धरणांमधून गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्यात यावी. भविष्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र होऊ नये, यासाठी सरकार व प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

कसमादेसाठी वरदान ठरलेल्या चणकापूर व हरणबारी या धरणांमधून गेल्या अनेक वर्षांपासून गाळ काढण्यात आलेला नाही. यामुळे दोन्ही धरणांच्या क्षमतेत घट झाली आहे. चणकापूर धरणात २७१४ तर हरणबारी धरणात ११६६ दलघफू पाणीसाठा होतो. मात्र, चणकापूर धरणात २८७ दलघफू गाळ साचला आहे. ही आकडेवारी २०१२ ची असून, या तीन वर्षांचा विचार केला तर, त्यात आणखी भर पडली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती सिंचनालाही पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. जलशिवार योजनेंतर्गत तलावातील गाळांचा उपसा केला जात आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण ४४८ तलावातील गाळ काढण्यात आला आहे. एकूण २४ लाख ४३ हजार ९११ घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे तलावांची जलसाठवण क्षमता २३ लाख ३८ हजार २१८ घनमीटरने वाढली आहे. अशी कामे चणकापूर व हरणाबारी या धरणांमध्येही केली, तर धरणसाठ्यात वाढ होऊन पाणी उपलब्ध होईल. यामुळे कसमादेचा विकास करता येईल, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईवर नांदगावकरांचे मंथन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणीटंचाईची गंभीर समस्या नांदगाव शहराला भेडसावतेय. आता तरी नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून थेंब अन् थेंब पाण्याचे नियोजन केले पाहिजे. पुढच्या पिढीचा विचार करून आताच पाणी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे, असा सूर नांदगाव येथील जनसेवा मंडळाने आयोजित केलेल्या नागरिकांच्या जल जागरण अभियान बैठकीत व्यक्त करण्यात आला.

पाणीटंचाईच्या प्रश्नावर सुजाण जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन पाण्याबाबत व्यक्त केलेले विचार मंथन आणि जन जागरण वैशिष्ट्यपूर्ण ठरले. जनसेवा मंडळाच्या जल जागरण अभियानाची बैठक ज्ञानेश्वर मंदिरात झाली. या बैठकीत नांदगावच्या पाणीप्रश्नाबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. नांदगावच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाणी समस्या सोडविण्याबाबत विविध उपाय सुचवले. दुष्काळाच्या झळा व पाणीटंचाई या मुद्द्यावर कायमच्या उपाययोजनेसंदर्भात वक्त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर, अॅड. जयकुमार कासलीवाल, महावीर पारख, संतोष गुप्ता, जनसेवा मंडळाचे राजेश कवडे आदींनी विविध सूचना केल्या. डॉ. गणेश चव्हाण, पद्माकर दुसाने, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, श्रीकांत परदेशी, भैय्या चव्हाण, वसंत नागरे, गोरख जाधव, बाळासाहेब शेवरे, राहुल शेळके आदींनी विविध मुद्दे मांडून पाणीटंचाई दूर करण्याबाबत चर्चेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणमध्ये २५ टँकर्स भागवताहेत तहान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यात मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला असून, तालुक्यात ठिकठिकाणी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील १७१ गावांपैकी २८ गावे व ४ वाड्यांना सुमारे २५ टँकर सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात १५ टँकर्स वाढण्याची शक्यता आहे.

बागलाण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह नामपूर, काटवन परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात २५ टँकर सुरू असून, पैकी ५ शासकीय तर १९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठ ठिकाणच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन टँकर भरण्यासाठी व पाच गावांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील सारदे, तरसाळी, सुराणे, रामतीर, बिजोरसे, इजमाणे, रातीर, नवेगांव, पिंपळकोठे, अजमीर सौंदाणे, कऱ्हे, वरचे टेंभे, चौगाव, पिंपळदर, चिराई, राहुड, जुनीशेमळी, नामपूर, कातरवेल, बहिराणे, मळगाव भामेर, भाक्षी, देवळाणे, आखतवाडे, श्रीपूरवडे, वडेखुर्द, टिंगरी, खमताणे या गावांसह लोणारवाडी, वघाणे पाडा, किरायतवाडी, जामनवाडी या चार वाड्यांचा समावेश आहे. आराई, बिजोटे, ठेंगोडा, चौंधाणे, नवी शेमळी, इंदिरानगर, निताणे, या आठ ठिकाणी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. सटाणा शहरात देखील सद्यस्थितीत आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images