दहावीची परीक्षा दिल्यानंतर चांगले गुण मिळविण्याचे व कॉलेजला जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द या छोट्याशा गावातील वैभव सांगळे निकालाची डोळ्यात प्राण आणून वाट पहात होता. पण, काही दिवसांपूर्वी शेतात कांदे झाकत असताना अंगावर वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालात त्याला ७७.८० टक्के गुण मिळाले. वैभवचा हा निकाल पाहताना गावकरी व मित्रांना त्याच्या आठवणींनी उचंबळून आले, तर त्याचे अवघे घर आपले गुणी लेकरू या जगात नाही आता या गुणांचे काय करायचे? या भावनेने आसवात बुडाले.
जळगाव खुर्द येथून रोज नांदगावच्या व्ही. जे. हायस्कूलमध्ये शिक्षणाच्या ओढीने येणारा व शिकून खूप मोठं होण्याची आस बाळगून असणारा वैभव सांगळे ७७.८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. हे पाहून त्याच्या शाळेतील शिक्षकांनाही गहिवरून आले. वैभवचे आईवडील, कुटुंबीय, मित्र आणि शाळेतील शिक्षक यांना वैभवच्या या यशाचा अभिमान वाटत आहे. पण, आपला हा निकाल पाहायला तो स्वतःच या जगात नाही, हे वास्तव त्यांचे काळीज कुरतडून टाकत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यात अचानक आलेल्या वादळाने शेतात कांदे झाकण्यासाठी वैभव गेला आणि काही फुटांवर उभ्या असलेल्या आईवडिलांच्या डोळ्यांदेखत अंगावर वीज कोसळून क्षणार्धात वैभवचा मृत्यू झाला.
शेतीकाम करून शिक्षण घेणाऱ्या वैभवने दहावीचे पेपर दिले होते. निकालाची त्याला आस होती, पण आपला निकाल पाहणे त्याच्या नशिबात नव्हते. हुशार वैभव दहावी पास झालाय पण आनंदाश्रूपेक्षा दुःखाश्रूने पालकांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या आहेत. आता या हुशार पण आपल्यात नसलेल्या गुणी विद्यार्थ्यांची गुणपत्रिका पंधरा जून रोजी मिळाल्यानंतर त्याच्या घरी जाण्याचा मनोदय व्ही. जे. हायस्कूलचे पर्यवेक्षक डी. डी. आहिरे, गिलाणकर यांनी व्यक्त केला आहे.
वैभवच्या आठवणींनी आज सारे भावविवश झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीने गुणी, हुशार मुलाच्या आयुष्याची दोरी कापली गेली. निकालाची प्रतीक्षा करीत महाविद्यालयात जाण्याचे इमले बांधणाऱ्या वैभवच्या स्वप्नांवरच जणू कोसळली आहे. या हुशार मुलाची सतत आठवण येत राहील. - डी. डी. आहिरे, नांदगाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट