मोटरसायकलपासून ट्रकसारख्या अवजड वाहनांपर्यंत सर्वच प्रकारची वाहने चोरणारे चोरटे शहरात सक्रिय झाले आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल होत असून, चोरट्यांना पकडणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे. गेल्या आठवडाभरात शहरातून १४ वाहने चोरीस गेली असून, त्यामध्ये मोटरसायकल्सची संख्या अधिक आहे.
वाहन ही चैनेची नव्हे तर जीवनावश्यक वस्तू बनली आहे. अशा वाहनांना चोरट लक्ष्य करीत असून शहरात दररोज वाहनचोरीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणांवरून वाहने चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. सिटी सेंटर मॉल, गोदाघाट, पवननगर बाजारपेठ, थिएटर तसेच हॉस्पिटल्स जवळील परिसर अशा ठिकाणांवरून वाहने चोरीस जाण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. आता मात्र चोरट्यांनी रहिवाशी वस्तीमधून वाहने चोरण्याकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या आठवडाभरात शहरातून १४ तर दोन दिवसांत सात वाहने चोरीस गेल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे.
गंगापूर रोडवरील केटीचएम कॉलेजच्या पार्कींगमधून राहुल कैलास गोडसे (२३, रा. संसरीगाव) यांची मोटरसायकल चोरीस गेली आहे. २० दिवस उलटूनही ती अद्याप मिळू शकलेली नाही. मेरी लिंकरोड परिसरात रासबिहारी शाळेमागे राहणाऱ्या गणेश गोविंद सोनवणे (१९) यांची मोटरसायकल चोरीस गेली आहे. वडाळा नाका परिसरातून अफजल रजमूल चौधरी (२८) यांची मोटरसायकल ३ सप्टेंबर रोजी चोरीस गेली. शोधाशोध करूनही ती न मिळाल्याने अखेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. भद्रकाली भाजी मार्केट परिसरात राहणाऱ्या सुधीर मोतीराम कार्लेकर (५८) यांच्या घराजवळून त्यांची मोटरसायकल आठ दिवसांपूर्वी चोरीस गेली आहे. चोरीस गेलेल्या या वाहनांचा पोलिस अद्याप शोध लावू शकलेले नाहीत.
टाकळीरोडवरून ट्रकची चोरी
टाकळीरोडवरील तिगरानिया कंपनीसमोरून ट्रक (एमएच १५ इजी ३५१५) चोरीस गेला आहे. रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी साडेआठ या कालावधीत चोरीची घटना घडल्याचे रस्मीन बाळकृष्ण तांबट (४०, रा. काठे गल्ली) यांनी भद्रकाली पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट