कवितेची विहीर
---
कला-साहित्य
मेट्रो व्ह्यू
ऐश्वर्य पाटेकर
---
खूप दिवस खपलीखाली निपचित पडून राहिलेलं बियाणं एकदम रुजून वर यावं, तसंच काहीसं साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं माझं आयुष्य लख्खं उजेडात आणलं. अकादमीमुळेच वाङ्मयीन भूगोलात माझ्या नावाचा नवा चिमुकला प्रदेश उगवून आला. माझ्या समकालात खूप चांगलं अन् सकस लिहिणारे ‘लिहिते हात’ आहेत, याची मला जाणीव आहेच. पण, हे दान कुणाच्या पदरात पडेल सांगता येत नाही. आता पडलंच आहे तर त्याच्यावर माझ्या एकट्याचा हक्क थोडाच आहे. नाहीतरी तुम्ही कमावलेली भाकर तुमच्या एकट्याची नसतेच; तिचे वाटे ठरलेले असतात. तसंच काहीसं या पुरस्काराच्या बाबतीत सांगता येईल. मी जगलो त्या प्रदेशाचा त्यात वाटा आहे. वाङ्मयीन भूमीतील ज्या लेखक कवींनी माझ्यावर संस्कार केले त्यांचाही वाटा आहेच. ज्या कृषिवल परिवेशात मी वाढलो, तेथील चिडीपाखरांचा, झाडाझुडपांचा, जीवजित्रबांचाही वाटा यात आहे. माझा वाटा कसा मोजायचा? माझ्या आसपासचे कोण कोण काय काय झाले. मी मात्र, कवी झालो. माझा जमीनजुमलाही कविता. माझा बँकबॅलन्सही कविताच. आयुष्यभराचं फिक्स्ड डिपॉझिटही कविताच. म्हणून तिच्याविषयी माझ्या काही धारणा आहेत. भाकरीला जसा भूकेचा वास येतो किंवा भाकर भुकेचा वास घेऊनच जन्माला येते. तसेच कवीने मनाच्या वावरात आपल्या नावची जी माती सांभाळली आहे तिला सृजनाचाच वास यायला हवा आहे आणि कवीजवळ कवितेशिवाय सांगायला दुसरं काही असूच नये, या मताचा मी आहे. कवीच्या रेशनकार्डवर, आधारकार्डवर, रहिवाशी दाखल्यावरही कविताच असावी. माझ्याजवळ कवितेव्यतिरिक्त सांगायला दुसरी कुठलीच संपत्ती नाही. कवितेचाच ऐवज मी जपतो आहे. माझे वय चाळीस. माझ्या कवितेचे वय सव्वीस वर्षे. आतापर्यंत एवढ्या दिवसांत कवितेचाच झरा उपसत आलोय. तिच्यापेक्षा वेगळा जगलो नाही. स्वत:च्या कातडीइतकी ती मला जवळची. मान्य आहे, कवी कविता लिहितो त्या दरम्यान जगामध्ये खूप काही घडत असतं. जाळपोळ, बॉम्बस्फोट, युद्ध, दहशतवादी कारवाया, घातपात, आंदोलने, मोर्चे आणि मी फक्त कविता लिहितोय. कारण, कविता हीच एकमेव अशी गोष्ट आहे, जी मी हक्काने हट्टाने करू शकतो. खूप काही कमावलं, तेवढच काही गमावलंही. कमावल्या-गमावल्याची बेरीज-वजाबाकी म्हणजे माझी कविता नाही. मी फक्त खोदत नेतोय कवितेची विहीर. माझ्या सातबाराच्या उताऱ्यावर एवढीच एकमेव गोष्ट माझ्या मालकी हक्काची. या विहिरीविषयी सांगणं म्हणजे माझ्या कवितेविषयी बोलणं..
स्वत:च्याच कवितेविषयी कवीने असं पोटतिडकीने सांगितले पाहिजे का? तिच्या विस्तवाच्या शेकोटीशी अस्वस्थ ठणकणारं अंग शेकवून घेतलं पाहिजे का? मेंदूत खोल रुतून बसलेली अनुभवाच्या गांधील माशांची पोळे नव्यानं अशी डिवचली पाहिजे का? या प्रश्नांची उत्तरे होय अशीच आहे. अनुभव एकापास एक उभे केले, की त्याची बनते कविता. जळतेच्या जळते अनुभव मीही ठेवले एकपास एक. कविता जास्तच चटके देवू लागली. तिच्यापासून पाळता थोडंच येतं? कृषिजन संस्कृतीच्या परिक्षेत्रात वाढलो, याच पर्यावरणातील प्रतिमा-प्रतीकांचं ‘वारुळ’ अंगावर घेऊन उठलो. वास्तवाच्या विस्तवाच्या चिंतनाच्या जहाराच्या हजारो मुंग्यांनी पोखरून काढलं माझं शरीर. ते फेडून नवंच धारण केलं कवितेचं शरीर! मनाच्या वावराची चांगली मशागत केली. त्यामुळेच अस्सल प्रतिमांचं पीक जीवनानुभवातून घेण्याचं कसबही माझ्यात मेहनतीतून आलं. आणखी पिकाला इजा न होऊ देता त्यात वाढलेलं ‘तणकट’ अचूक निंदता आलं. काटेकुटे वेचून गव्हाळीच्या रानासारखी कविता निर्मळ केली. तिच्या आत्म्याची बोली नितळ करण्याची तसदी घेत राहिलो. जगात अनेक गोष्टींची खरेदी-विक्री करता येते, पण संवेदनशीलता माणूस विकू शकत नाही अन् खरेदीही करू शकत नाही. तरीही मी गव्हाची ओंबी, बाजरीचे दाणे, हरबऱ्याचे चणे, तुरीच्या शेंगा, भुईमूगाच्या शेंगा, गवताचा भारा, कडब्याची पेंढी, ज्वारीचे ताटे, असा ऐवज आणलाय कवितेत कालवून. त्यास नागरीचं लेबल लावायचं का ग्रामीणचं? हे मात्र ज्याला त्याला सुचू शकतं ज्याच्या त्याच्या वकुबानुसार. अर्थात कुठलंही जगणं, कुठलीही समस्या, कुठलीही दु:खे ही लेबलांपलीकडचीच असतात. गावाशिवाचा एकत्रित प्रदेश आखता येतो. मात्र आनंदाचा, व्यथेचा, दु:खाचा, करुणेचा, वात्सल्याचा, प्रदेश कसा आखणार? तो आखताच येत नाही. आभाळाला खांब लावता येत नाही. मला तरी निर्मितीच्या कळा एका साच्यात ठेवता येत नाही. समुद्राला बांध घालता येत नाही. एक शेत एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवर नेवून ठेवता येत नाही. या गोष्टींची पुष्टी आहेच.
हे सर्व ठेवलंय कवितेच्या विहिरीत. कवितेची विहीर उतरून आल्याशिवाय कसं पोहोचता येईल कवितेपर्यंत? त्यासाठी तळठाव घेण्याचं कसब आपल्या अंगी असलंच पाहिजे. ही तर प्रथम अट आहे कवितेच्या विहिरीची. विहिरीला जर चारी बाजूनी पाण्याचे पाझर फुटलेले असतात अन् झरे खळखळत असतात. त्यांचा सुगावा घ्यायचा असेल तर पोहता तरी यायला हवं. कवितेचा जर का पोत ठरवायचाच आहे तर घ्या सूळकती उडी. विहिरीतल्या पाण्याने ओंजळ केलीय..!
(लेखक हे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट