पाचशे व हजाराच्या नोटा बाद झाल्यानंतर ३७ दिवसांनी बँकांकडे असलेल्या चलनाचे वास्तव जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत समोर आले. जिल्ह्यातील एकूण ५२५ राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ६,४०० कोटींची मागणी केली होती. मात्र, आतापर्यंत त्यांना केवळ १,९६८ कोटी रुपये मिळाले आहेत.
या बँकांकडे केवळ ४१७ कोटी रुपये शिल्लक असून, त्यात ३४९ कोटी एकट्या स्टेट बँकेकडे आहेत, तर इतर बँकांकडे केवळ ६८ कोटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिकसह जिल्ह्यातील नागरिकांची चलनकोंडी आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
नोटा बाद झाल्यानंतर बँकांनी एकत्र माहिती दिली नसल्याने जिल्ह्यातील कॅश तुटवड्याचे हे भीषण चित्र सुरुवातीला समोर आलेच नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर हे आकडे समोर आले आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात या सर्व बँकांमध्ये पाचशेच्या नोटा केवळ १७ कोटी २५ लाख रुपये आतापर्यंत चलनात आले असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ९०३ पैकी स्टेट बँकेचेच ८० टक्के एटीएम सुरू होते, तर उर्वरित ५२४ बँकांचे एटीएम या काळात जवळपास बंदच होते. त्यातील तुरळक एटीएम चालू-बंद होते. अशा परिस्थितीत सरकारने एटीएम सुरू केल्याचा दावाही कसा फोल ठरला हेही समोर आले आहे.
शुक्रवारी या बँकांना रिझर्व्ह बँकेतून सायंकाळपर्यंत पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे तो आकडा समोर आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर बँकांची स्थिती खूपच भयावह असली तरी त्यासाठी नेमके काय करावे, याबाबत जिल्हाधिकारीही हतबल आहेत. याअगोदरच त्यांनी समान कॅश वाटप व्हावी यासाठी अधिकार देण्याचा प्रस्ताव पाठवला होता; पण त्याला सरकारने प्रतिसाद दिला नाही.
सात गावे घेतली दत्तक
कॅशलेस गावे व्हावी यासाठी प्रत्येक बँकेने एक गाव दत्तक घ्यावे, या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला सात बँकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये बँक ऑफ इंडियाने सय्यदपिंप्री, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दरी महिरवणी, महाराष्ट्र बँकेने चांदवड तालुक्यातील भोयेगाव, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने दिंडोरी तालुक्यातील अवनखेड, देना बँकेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली तर बँक ऑफ बडोदाने येवला तालुक्यातील अंदरसूल ही गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये आता कॅशलेस व्यवहार व्हावे यासाठी बँकांकडून बँकिंग सुविधाही देण्यात येणार आहेत.
वाटप १,२०० कोटी
जिल्ह्यात आतापर्यंत किती पैसे वाटले याचा आकडा अद्याप समोर आला नसला तरी या बैठकीत १,५५० कोटी रुपये वाटप झाल्याचा ढोबळ आकडा सांगण्यात आला. त्यात ३०० कोटींहून अधिक रुपये नाशिकमधील बँकांच्या करन्सी चेस्टमधून बाहेर जिल्ह्यात पाठवण्यात आले आहेत, तर आतापर्यंत केवळ १,२०० कोटींच्या आसपासच पैसे वाटप झाल्याची चर्चाही या बैठकीत होती. त्यामुळे जिल्ह्यात एकूण किती पैसे वाटले, याबाबतही ठळक आकडेवारी समोर आलेली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट