कृषी विभागासह विविध विभागांनी जलयुक्त शिवार योजनेत केलेली कामे आणि त्याला ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसहभागाची मिळालेली साथ यामुळे कळवण तालुक्यातील वाडी गाव टँकरमुक्त झाले आहे. यंदा २१२ हेक्टर क्षेत्रात रब्बीची लागवडदेखील झाली आहे.
वाडी गावात हिवाळ्यातच टँकरची गरज भासत असे. गेली चार वर्षे अशा परिस्थितीमुळे ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागला. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये प्रथम टप्प्यात गावाची निवड करण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे आणि तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार फेरीद्वारे कामांची निवड करण्यात आली. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे योजनेला प्रतिसाद दिल्याने कामे वेगाने सुरू झाली.
फळबाग लागवड
गावात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा साठवण गृह अनुदानावर देण्यात आली आहेत. गावात ४७ कांदा चाळी आहेत. रोजगार हमी योजने अंतर्गत ७.५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कांदे, गहू, मका, हरबऱ्याची लागवड केली आहे. गावातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून संपूर्ण शिवार हिरवेगार दिसते आहे. जलयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना प्रामुख्याने लाभ झाल्याने शेतकरी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात.
गाळ काढला, बांध घातले
कृषी विभागामार्फत माथा ते पायथा या संकल्पनेनुसार मजगीची २४ कामे करण्यात आली. त्यामुळे पाणी जिरण्यास मोठी मदत झाली. शिवाय लागवडीच्या क्षेत्रारतही वाढ झाली. तीन सिमेंट नाला बांध उभारण्यात आल्याने गावातील जेवणा ओहळ या नाल्यात आजही पाणीसाठा दिसून येतो. याशिवाय गावातील पाझर तलावातील गाळ काढण्यात आला आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेद्वारा पुनर्भरणाची ५ कामे आणि लघुपाटबंधारे विभागाने कोल्हापूरी बंधारा दुरुस्तीची केल्यामुळे गावाच्या पिण्याची पाण्याची समस्या दूर झाली आहे. पूर्ण झालेल्या कामांमुळे ५२६ टीसीएम पाणी अडविण्यात आल्याने रब्बी क्षेत्राला त्याचा फायदा झाला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट