Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भाजपकुमार थापाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे थापाड्यांचे सरकार असून, त्यांना सत्तेचा व पैशाचा माज आला असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केली. नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त शुक्रवारी गोल्फ क्लब मैदानावर ठाकरे यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.

भाजपव टीकास्त्र सोडताना राज ठाकरे म्हणाले, की भारतीय जनता पक्षाने पैशांच्या गोण्या ओतून लोकांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत. अशा लोकांच्या हातून विकास होऊच शकत नाही. जनतेला वेड्यात काढण्याचे काम हे सरकार करीत असून, थापा कशा मारायच्या हे भाजपकडून शिकावे. ज्याप्रमाणे राज्यात परिस्थिती आहे तशीच परिस्थिती केंद्रात आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, असे आश्वासन दिले होते. कुठे गेले १५ लाख? त्यातील १५ रुपयेदेखील नागरिकांच्या हातात पडले नाहीत. नाशिक शहरात मेट्रो रेल्वे आणू, अशी घोषणा केली होती. तीदेखील पूर्ण होऊ शकलेली नाही. विमानतळ बांधून तयार आहे. त्यावर विमानं मात्र नाहीत. ती उतरवून दाखवा, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, की कॉँग्रेसने शिवस्मारकाची केलेली घोषणा हे सरकार पूर्ण करणार आहे. त्यासाठी ८ ते १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या खिशात पैसे नाहीत, तेव्हा हे स्मारक कसे पूर्ण करणार आहे? जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम हे सरकार करीत आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक करायचे झाल्यास राजांचे गडकिल्ले व्यवस्थित करा, हेच त्यांचे स्मारक ठरेल.

या वेळी त्यांनी नाशिकमध्ये मनसेने केलेल्या विकासकामांचे प्रेझेंटेशन सादर करताना सांगितले, की आम्ही नाशिक महापालिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण नाही. शहरात ५१० किलोमीटरचे रस्ते बांधले आहेत. शहरात अनेक वर्षांपासून फोफावत असलेले अतिक्रमण हटवण्याचे साहस कुणी दाखवले नाही. ते काम केवळ मनसेमुळे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला साजेसे असलेले संग्रहालय स्थापन व्हावे अशी इच्छा होती. ती नाशिकमध्ये साकार झाली आहे. शहरात देशाला भूषणावह ठरेल असे बॉटनिकल गार्डन, गोदा पार्क अशी अनेक उदाहरणे देता येतील, अशी सुशोभीकरणाची कामे केली आहेत. शहरात इतर कोणत्याही पक्षाला निवडून दिल्यास नागरिकांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. शहराचा विकास साधायचा असेल तर मनसेशिवाय पर्याय नाही, अशी साद त्यांनी मतदारांना घातली.

विस्थापित करणारी नियमावली आली कशी?

नाशिक शहराची विकास नियमावली प्रकाशित न होता बाहेर पडली आहे. व्हायरल झालेल्या या नियमावलीतील तरतुदींनुसार शहरातील नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. १६ लाख लोकसंख्येपैकी दोन लाख लोकांना शहराबाहेर जावे लागणार आहे. ही नियमावली रद्द करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी करावे किंवा ती खोटी असल्याचे जाहीर करावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. भाजपने ७७ नव्हे, तर ८८ गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे. १९५२ मध्ये स्थापन झालेल्या भाजपसारख्या पक्षाला उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षण संस्थेचे स्थलांतर

$
0
0

तत्कालीन शिक्षण उपसंचालकांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे बनावट कागदपत्रांद्वारे शैक्षणिक संस्थेचे स्थलांतर केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यासह ११ जणांविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात कागदपत्र शिंदखेडा, शहादा, धुळे आणि नंदुरबार पंचायत समिती व शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यात असून, यामुळे सरकारची फसवणूक झाली आहे. धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक प्रमोद पाटील यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?

१७ जुलै २००७ ते ५ ऑगस्ट २०१६ या कालावधीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चौगाव येथील महात्मा फुले युवक विकास मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काकरदे येथे स्थलांतरीत करण्यात आले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष रमेश बाबुराव सोनवणे, कार्याध्यक्ष चारुशिला रमेश सोनवणे, उपाध्यक्ष अन्नपूर्णा आसाराम पाटील, मंगला रमेश सोनवणे, सचिव पितांबर ताराचंद खैरनार, सदस्य प्रमिला सूर्यकांत चव्हाण, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी धुळे व शिरपूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी जी. के. साळुंखे, डी. बी. पाटील, तत्कालीन सेवानिवृत्त प्रभारी शिक्षणाधिकारी जे. के. ठाकूर, तत्कालीन सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, तत्कालीन निवृत्त शिक्षणाधिकारी दिनेश लाला साळुंखे या ११ जणांनी संगनमताने २००७ ते २००९ याकाळात बनावट कागदपत्र तयार केली होती. विद्यालयाच्या स्थलांतरासाठी संस्थेच्या लेटरहेडवर प्रमिला चव्हाण यांना सचिव दाखवून प्रस्ताव सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजेरीपत्रकावर खाडाखोड करणारा लिपिक बडतर्फ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कामावरील हजेरीपत्रकात खाडाखोड करून काम न करता आर्थिक फायदा घेतल्याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यालयातील लिपिकाला बडतर्फ करण्यात आले आहे.

धुळे विभागीय कार्यालयातील लिपिक व्ही. बी. येलेकर यांनी कामावरील त्यांच्या हजेरीपत्रकावर जानेवारी २००७ ते डिसेंबर २००९ या दोन वर्षांच्या कालावधीत रजा असा शेरा असताना, व्हाइटनरचा वापर करून खाडाखोड केली. तसेच काम न करता ३८,०१२ रुपयांचा आर्थिक फायदा घेतला. त्यामुळे येलेकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कामात अफरातफर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी चौकशीअंती ते दोषी असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संप मागे घ्या; अन्यथा गुन्हे दाखल करणार

$
0
0

धुळे मनपा कर्मचारी आंदोलनाबाबत आयुक्तांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेत गेल्या तीन दिवसांपूर्वी कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष अतिक्रमण विभागातील लिपिक प्रसाद जाधव यांना आयुक्तांनी निलंबित केले होते. याबाबत कर्मचारी समन्वय समितीतर्फे शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आयुक्तांच्या मनमानी कारभारामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याचे कर्मचारी समन्वय समितीचे म्हणणे आहे. तर आयुक्त संगीता धायगुडे यांनी अखेर शनिवारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारून, आणि संप मागे न घेतल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा कर्मचारी समन्वय समितीला दिला आहे.

सोमवारी वाद उफाळणार?

मनपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून कामगारांच्या विविध मागण्यांवरील आंदोलनातून आयुक्त विरुद्ध कर्मचारी संघटना असा संघर्ष सुरू झाला आहे. कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव यांना निलंबित करण्यात आले. यासोबतच निलंबनानंतर संपात सामील कामगारांचे दोन दिवसांचे वेतन कपातीचे आदेशही आयुक्तांनी दिले. यानंतरही समन्वय समितीने कामबंद आंदोलन आणि मनपा आवारात धरणे आंदोलन सुरू केले. शुक्रवारी सहाय्यक उपायुक्त अविनाश जाधव यांनी कर्मचाऱ्यांना जाधव यांचे निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शनिवारी आयुक्तांनी याप्रकरणी कोणतेही आदेश काढले नाहीत उलट कर्मचाऱ्यांना दंड आकारून सोमवारी कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले आहे. यामुळे मनपा आयुक्त व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये सोमवारी मोठा वाद उफाळण्याची निर्माण शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज यांची कृष्णकुंज, उद्धव यांची लेना बँक!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

मतदान म्हणजे पाच वर्षांची सुरक्षित गुंतवणूक असते. त्यामुळे ही गुंतवणूक चांगल्याच बँकेत झाली पाहिजे, असे नमूद करताना भाजप ही विकास करणारी बँक आहे. त्याच बँकेत आपल्या मतांची गुंतवणूक करा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकच्या मतदारांना केलं. उद्धव आणि आदित्यची नुसती लेना बँकच आहे. राष्ट्रवादीची बँक सध्या बंद आहे आणि राज ठाकरे यांची कृष्णकुंज ही एकमेव बँक आहे. या बँकेची अन्यत्र कुठेही शाखा नाही, असा सणसणीत टोलाच फडणवीस यांनी यावेळी लगावला.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांची नक्कल करून ते भाजपकुमार थापाडे आहेत, अशी तोफ डागली होती. त्याचा आज मुख्यमंत्र्यांनी यथेच्छ समाचार घेतला. राज ठाकरे हे उत्तम नकला करतात आणि या नकलाकाराकडे निवडणुकीनंतर फक्त तेवढंच काम शिल्लक राहणार आहे, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. पाच वर्षांपूर्वी राज यांनी छगन भुजबळ यांची नक्कल केली होती. तेव्हा लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र आता नाशिककरांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यांच्या नकलांना नाशिककर पुन्हा भुलणार नाहीत, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले...

- कुंभमेळ्याचं सर्व नियोजन आम्ही केलं. पैसा सरकारने दिला. महापालिकेकडे पैसा नव्हता २२१९ कोटी निधी आम्ही दिला. या पैशांतूनच नाशिकचा विकास झाला. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नियोजनाचा अभ्यास करून उज्जैनच्या कुंभमेळ्याचं नियोजन करण्यात आलं.

- नाशिककरांना विस्थापित करण्याचा प्रश्नच येत नाही. हा विरोधकांचा बोगस प्रचार आहे. लबाडांच्या भूलथापांना बळी पडू नका.

- उद्धव ठाकरे म्हणतात कर्जमाफी झाली पाहिजे. हि आमचीही भूमिका आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करू आणि त्यानंतर कर्जमाफी करू.

- रतन टाटांना बोलावून काय केलं? तर बोटॅनिकल गार्डन केलं. राज ठाकरे कल्पक आहेत, पण ते त्यांची कल्पकता भलत्याच ठिकाणी वापरतात.

- २०१९पर्यंत प्रत्येक गरजूला घर देणार. गरजूला जात-पात-धर्म नसतो. मागेल त्या प्रत्येक गरिबाला घर हे आमचे धोरण आहे.

- राज्य सरकारच्या माध्यमातून १२०० आजारांकरिता मोफत उपचार केले जात आहेत. स्टेन्टची किंमत ८५ टक्क्यांनी मोदींनी कमी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणधुमाळी अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. ७ गट व १४ गणांसाठी माघारीनंतर देखील एकूण ९४ उमेदवार रिंगणात असून, अखरेच्या दिवसामध्ये सर्वच गट गणात कमालीची चुरस वाढली आहे. निवडणुकीच्या अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय फेरबदल होत असल्याने गट व गणात कोण विजयी होणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच गटात शिवसेना, भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यासह अपक्ष रिंगणात आहेत. त्यामुळे वरकरणी सामना शिवसेना भाजप असा रंगणार असला, तरी आघाडी आणि अपक्ष उमेदवार त्यात रंगत आणणार आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे, भाजपचे अद्वय हिरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

रावळगाव, दाभाडी, कळवाडीत चुरस

गट आरक्षणानुसार रावळगाव सर्वसाधारण तर दाभाडी, कळवाडी, सौंदाणे सर्वसाधारण महिला असल्याने या गटातील लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. रावळगाव गटात ५ उमेदवार असले तरी भाजपचे समाधान हिरे, सेनेचे रमेश आहिरे, आघाडीचे अशोक शिरोळे यांच्यात खरी चुरस आहे. रिपाईचे प्रशांत गरुड हे एकमेव उमेदवार याच गटातून आपले नशीब आजमावत आहेत. माघारी पूर्वी सर्वाधिक उमेदवारांची संख्या या गटात असल्याने आधीपासूनच रावळगाव गट चर्चेत आहे. यानंतर लक्षवेधी लढत कळवाडी गटात होत आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे, भाजपचे लकी गिल यांच्या आई बलबीरकौर गिल यांच्यात चुरशीची लढत होईल. मात्र या दोन्ही उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील असून स्थानिक नाहीत. तर आघाडीच्या शालूबाई देसले स्थानिक आहेत. त्यामुळे गटातील राजकारणात जातीय समीकरणे, मतदार संघ असे अनेक फॅक्टर महत्त्वाचे ठरणार आहेत.

तिकडे दाभाडी गटात तर देराणी-जेठाणी असा अनोखा सामना होत आहे. शेतकी संघाचे माजी उपाध्यक्ष अशोक निकम यांच्या पत्नी विद्या निकम या शिवसेनेकडून तर बाजार समिती संचालक संजय निकम यांच्या पत्नी संगीता निकम भाजपकडून लढत आहेत. आघाडीच्या उमेदवार अंजना संजय देवरे या दाभाडीतीलच आहेत. त्यामुळे गावातील मतदारांपुढे नाते, भाऊबंदकी असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या जाऊबाईंच्या लढतीत कोण विजयी होते? याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.

निमगाव गटात चौरंगी टक्कर होत आहे. भाजप बंडखोर संतोष मोरे यांनी स्वतंत्र आघाडी उघडून सेना भाजपपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. शिवसेनेकडून मधुकर हिरे व भाजपकडून अब्जधीश जे. डी. हिरे, आघाडीचे दीपक आहिरे येथे नशीब आजमावत आहेत. त्यामुळे हिरे, मोरे आणि आहिरे यांच्यात बाजी कोण मारते? याबद्दल उत्सुकता आहे.

सौंदाणे गटात सेनेच्या वैशाली पवार, भाजपच्या मनीषा पवार, आघाडीच्या पुष्पा देसाई यांच्यात तिरंगी लढत असून, दोन अपक्ष महिला रिंगणात आहेत. तालुक्यातील ७ पैकी ५ गटात लक्षवेधी लढत होत असून झोडगे व वडनेर या दोन गटात मात्र आरक्षणाने अनेकांचा हिरमोड झाला आहे. झोडगे गटात शिवसेनेचे दादाजी शेजवळ, भाजपचे भरत वाघ, आघाडीचे दिनेश डांबरे यांच्यात तिरंगी लढत आहे. वडनेर गटात विद्यमान स्वाती ठाकरे यांचे पती पवन ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून श्रावण काळू पवार, सेनेकडून राजेंद्र सोनावणे तर आघाडीकडून भावराव सोनावणे नशीब आजमावत आहेत.

शिवसेनेपुढे भाजपचे कडवे आव्हान

जिल्हा परिषदेच्या सात गटांइतकीच चुरस पंचायत समितीच्या १४ गणात पाहायला मिळते आहे. गणात देखील गतासारखीच स्थिती असून सेना भाजप आघाडी सोबत अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. पंचायत समितीवर सलग १५ वर्ष राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात सेनेचे वर्चस्व कायम आहे. गेल्यावेळी पंचायत समितीची सत्ता अवघ्या काही जागांनी हुकल्याने यावेळी भाजपकडून जोर लावला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेरॉक्स उमेदवारांना प्रतिसाद मिळणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांसह माजी सदस्यांनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरवून आठ दिवसांत प्रचारात आघाडी घेतली असली, तरी मतदार या झेरॉक्स उमेदवारांना किती प्रतिसाद देतात हे लवकरच समोर येणार आहे.

बागलाणमध्ये सात गट आहेत. या पैकी ठेंगोडा गटात विद्यमान सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी सौभाग्यवती सारीका पाटील यांना आपले राजकीय वारसदार म्हणून पुढे केले आहे. पाटील या उच्चविद्याविभूषित असून, त्यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे. प्रशासनाची उत्तम जाण आहे. त्यांच्या विरोधात जि. प. चे माजी सभापती यशवंत पाटील यांनी त्यांच्या सौभाग्यवती माजी जि. प. सभापती संगीता पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. या ठिकाणी दुरंगी लढत रंगणार आहे.

वीरगांव गटात जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती उषाताई बच्छाव राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरल्या आहेत. जिल्हा परिषदेतील राजकीय कारकीर्द सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे. जायखेडा गटात विद्यमान जि. प. सदस्य यतीन पाटील हे पुनश्च राष्ट्रवादीकडून नशीब अजमावित आहेत. त्यांना तिरंगी सामना करावा लागणार असला तरीही या गटात राष्ट्रवादीने आव्हान उभे केले आहे. तर पठावे दिगर गटात विद्यमान सदस्या सिंधुबाई सोनवणे यांच्या ऐवजी त्यांचे पती संजय सोनवणे हे राष्टवादीकडून रिंगणात उतरले आहेत.

ब्राह्मणगाव गटात विद्यमान सदस्य प्रशांत बच्छाव यांनी आपल्या सौभाग्यवती वर्षा बच्छाव यांना तर डॉ. विलास बच्छाव यांनी आपल्या सौभाग्यवती माजी जि. प. सभापती लताताई बच्छाव यांना रिंगणात उतरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उगाव गटात प्रतिष्ठेची लढत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड नगरपंचायतीची निर्मिती झाल्याने नियमानुसार निफाड जिल्हा परिषद गट रद्द होऊन त्याऐवजी नवीन उगाव गटाची निर्मिती झाली. या गटाच्या पहिल्याच निवडणुकीसाठी काट्याची लढत होणार असून, या गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून राखीव आहे.

निफाड हा नेहमीच चर्चेत असलेला गट होता. निफाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने आजपर्यंत बहुतांशी जि. प.सदस्य हे निफाड शहरातील आहेत. या गटात सरकारी योजना आणणारा सदस्यांना उमेदवार पसंती देतात. उगाव गटात शिवसेनेतर्फे लासलगाव कृउबाचे संचालक बाळासाहेब क्षीरसागर, काँग्रेसकडून कृउबाचेच संचालक भास्कर पानगव्हाणे, शेतकरी विकास आघाडीतर्फे लासगाव कृउबाचे संचालक राजेंद्र डोखळे, भाजपतर्फे दिंडोरी तासचे सरपंच संदीप तासकर व अपक्ष म्हणून लासलगाव कृउबाचे माजी संचालक बबन सानप अशी पंचरंगी लढत होत आहे. बाळासाहेब क्षीरसागर यांनी यांच्यासोबत कोठूरे गणातून शिवसेनेच्या संगीता कराड तसेच उगाव गणातून सोमनाथ रामदास पानगव्हाणे यांना सोबत घेतले आहे. भास्कर पानगव्हाणे यांच्यासोबत उगाव गणातून बाळासाहेब वाघ आहेत. कोठूरे गणातील काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी कराड या राजेंद्र डोखळेंच्या शेतकरी विकास आघाडीत सामील झाल्याने पानगव्हाणे यांना कोठूरे गणातून अपक्ष उमेदवार संगीता मोगल यांना जोडीला घ्यावे लागले आहे. भाजपचे संदीप तासकर यांच्या सोबत कोठूरे गणातून अलका बोरगुडे तर उगाव गणातून सुनील मधुकर पानगव्हाणे आहेत. दुसरीकडे लासलगाव कृउबाचे संचालक व अपक्ष उमेदवार राजेंद्र डोखळे यांनी खेळी करीत कोठूरे गणातून काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी सुभाष कराड यांना व उगाव गणातून शिवसेनेचे बंडखोर भीमराज काळे यांना सोबत घेतले आहे. मागील वर्षी काँग्रेसमधून नुकतेच पक्षात आलेल्या बबन सानप यांना भाजपने डावलल्याने त्यांनी अपक्ष म्हणून या गटात राजकीय जुगार खेळला आहे. या गटातील निवडणूक आमदार कदम यांच्या दृष्टीने कसोटीची ठरणार आहे. क्षीरसागर यांना काँग्रेसमधून शिवसेनेत कदम यांनी आणले आहे. क्षीरसागर यांनी काँग्रेसमध्ये राहून आमदार कदम यांना विधानसभेच्या निवडणुकीत उघडपणे मदत केली. आमदार कदम हे क्षीरसागर यांना निवडून आणण्यासाठी जंग पछाडतील यात शंका नाही. परंतु, काँग्रेसचे उमेदवार भास्कर पानगव्हाणे यांचे बंधू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर राजेंद्र डोखळे हे ऐनवेळी कोणता राजकीय फासा फेकतील हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सॅटर्डे ठरला रॅली डे!

$
0
0



टीम मटा

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज, रविवारी (दि. १९) सायंकाळी साडेपाच वाजता थंडावणार असल्यामुळे शनिवारीच बहुतांश उमेदवारांनी आपल्या प्रभागात रॅली काढून प्रचाराचा धुरळा उडवला. एकीकडे या रॅली सर्वत्र सुरू असतानाच शिवसेनेचे युवा नेते अादित्य ठाकरे यांच्या रोड शोनेसुद्धा त्यात भर टाकत प्रचारात रंगत आणली. सिडकोच्या एका प्रभागात चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी सहभाग नोंदवत हा प्रचार बहुरंगी केला, तर काही ठिकाणी प्रमुख नेत्यांनी आपला सहभाग नोंदवत उमेदवारांना दिलासा दिला.


शक्तिप्रदर्शनाने वेधले लक्ष

महापालिकेच्या ३१ प्रभागांत १२२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ८२१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात २० ते २५ उमेदवारांची संख्या असल्याने या रॅलींनी शहरातील रस्ते गजबजून गेले होते. काही प्रमुख रस्त्यांवर तर एकाच वेळेस तीन-तीन रॅली असल्याचे चित्रही दिसून आले. घोषणा, प्रचाराचे गाणे, गळ्यात चिन्ह असलेली पट्टी मिरवणारे कार्यकर्ते याद्वारे शक्तिप्रदर्शन घडविणाऱ्या रॅलींनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांनीसुद्धा रॅली काढून अनेकांना धडकी भरवत प्रचार केला.



सातपूरला कामगारांशी संवाद

सातपूर ः शनिवारी कामगारांना सुटी असल्याने सर्वच पक्षांनी सातपूर विभागात भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे शनिवारचा दिवस संपूर्ण सातपूर विभाग रॅलींनी गजबजला होता. प्रभाग ८, ९, १० व ११ या चारही प्रभागांत विविध पक्षांसह अपक्षांनीही रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



नाशिकरोड गजबजले

देवळाली कॅम्प : नाशिकरोडमध्ये सर्वपक्षीयांसह अपक्ष उमेदवारांकडून रॅलींद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मतदानाच्या आधीचे दोन दिवस सवार्थाने महत्त्वाचे असतात. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रॅलींद्वारे करण्यात आला. काही उमेदवार आपल्या युवा कार्यकर्त्यांसह प्रभागात मोटरसायकल रॅलीद्वारे अभिवादन करीत होते, तर काही प्रभागांत नेतेमंडळींना सोबत घेऊन उमेदवारांनी चौक सभा, गाठीभेटींद्वारे आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंकडून कंपन्यांशी प्रतारणा!

$
0
0



fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

उदयोन्मुख खेळाडूंच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रायोजक कंपन्या पुढे येत नसल्याची नेहमी ओरड केली जाते. मात्र, काही खेळाडू अनेकांकडून प्रायोजकत्व घेऊन मूळच्या प्रायोजक कंपन्यांची फसवणूक करीत असल्याची बाब पुढे आली आहे. अशा प्रकारांमुळे असंख्य गुणी खेळाडूंवर मात्र केवळ पैशाअभावी खेळ सोडण्याची वेळ आल्याचेही दिसून येत आहे.

जास्तीत जास्त तरुणांनी खेळात करिअर करावे यासाठी केंद्र, राज्य सरकार, तसेच राष्ट्रीय कंपन्या, महामंडळे, एलआयसी यांसारख्या संस्था खेळाडूंना आपल्या सेवेत सामावून घेत असून, खेळांना प्रोत्साहन देत आहेत. अनेक कंपन्या आपल्याकडे नोकरीला असलेल्या खेळाडूंवर कामाचा बोजा न टाकता त्यांनी फक्त खेळाकडे लक्ष केंद्रित करावे व आपल्या कंपनीचे नाव उज्ज्वल करावे यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, काही खेळाडू केवळ नोकरीला लागण्यापुरते कंपनीच्या व्यवस्थापनाची मनधरणी करीत असतात. खेळाडू एकदा नोकरीला लागली, की तो इतर कंपन्यांकडून प्रायोजकत्व घेऊन नोकरीला असलेल्या कंपनीशी प्रतारणा करताना दिसतो. नाव मोठे झाल्यानंतर ज्या ठिकाणी नोकरीला आहे अशा कंपन्यांच्या नावाचादेखील उच्चार करीत नसल्याचे पुढे आले आहे.

व्यवस्थापनाची विचारणा

राज्यातील अनेक खेळाडू रेल्वे, एअर इंडिया, ओएनजीसी यांसारख्या कंपन्यामध्ये नोकरी करीत आहेत. मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्याचप्रमाणे राज्यभर होत असलेल्या स्पर्धांमध्ये सातत्याने या खेळाडूंचा सहभाग असतो. नाशिक शहरातील काही राष्ट्रीय व आंततराष्ट्रीय खेळाडू सातत्याने स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. त्यांना नाशिकमधील एका मोठ्या कंपनीने प्रायोजकत्व दिले आहे. मात्र, यातील अनेक खेळाडू हे इतरत्र नोकरीला असूनही यासारख्या अनेक कंपन्यांचे प्रायोजकत्व स्वीकारत आहेत. यातील अनके खेळाडूंना ज्या ठिकाणी नोकरीला आहेत त्यांना तेथील व्यवस्थापनाने जाब विचारला असल्याचे समजते. यावर लवकरच त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

सेवेत घेण्यास नाखूश

याअगोदरही ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत हिने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा न देता ओएनजीसीमध्ये नोकरी स्वीकारली होती. कविता राऊत हिने ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिला लवकरच महाराष्ट्र सरकारच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहे. मात्र, आजही रेल्वे प्रशासनाकडे तिने राजीनामा दिलेला नसल्याने तिच्याविरुद्धचा दावा प्रलंबित आहे. खेळाडूंच्या प्रायोजकत्वावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने खेळाडूंनी मनमानी करीत असल्याचे काही क्रीडा संघटनांचे म्हणणे आहे. नाव कमावलेल्या खेळाडूंकडून कंपन्यांची प्रतारणा होत असल्याने अनेक कंपन्या खेळाडूंना आपल्या सेवेत सामावून घेण्यास नाखूश आहेत.

--

अनेक कंपन्यांची फसवणूक

नाशिकमधील खेळाडू अदानी ग्रुप, महिद्रा अॅण्ड महिंद्रा, ओएनजीसी, नाशिक रन, एलआयसी यांसारख्या एकापेक्षा अनेक संस्थांकडून मदत घेत असून, त्यांच्याकडे व त्यांच्या प्रशिक्षकांकडे येत असलेल्या पैशाची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

--

याबाबत मला काहीही माहिती नाही. मी नव्यानेच या ठिकाणी आलो आहे. मला अभ्यास करून याची माहिती घ्यावी लागेल. नियमांचीदेखील माहिती घेतली जाईल.

-प्रदीप शेनॉय, वरिष्ठ विभागीय अधिकारी, एलआयसी

--

खेळाडूंकडून नाही, तर त्यांच्या प्रशिक्षकांकडून गैरव्यवहार केला जात आहे. ज्या खेळाडूंना खरोखरच गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचतच नाही. खेळाडूंना मदत करायची असेल, तर ती त्या खेळाच्या असोसिएशनमार्फत करावी.

-हेमंत पांडे, व्हाइस प्रेसिडेंट, जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्षांनी वाढविली चलबिचल

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात विविध राजकीय पक्षांच्या तुलनेत अपक्ष उमेदवारांनी अनेक प्रभागांत प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांची चलबिचल वाढली असून, सुरुवातील त्यांना सोपी वाटणारी निवडणूक आता तशी राहिली नसल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण ८२१ उमेदवारांपैकी २७५ उमेदवार अपक्ष म्हणून नशीब अाजमावत आहेत. बहुसदस्यीय पद्धतीत या उमेदवारांना फारसे महत्त्व नसेल, असे सुरुवातीला राजकीय पक्षांना वाटत होते. मात्र, असंख्य अपक्षांनी प्रचारात घेतलेली आघाडी व मतदारांशी थेट साधलेला संवाद अनेक प्रभागांत बहुतांश राजकीय पक्षांची झोप उडविणारा ठरत आहे.

अनेक अपक्ष उमेदवारांनी आपल्या प्रचारातही नावीन्य दाखवत मतदारांना आकर्षित करत आहेत. काही उमेदवार पक्षाने आपल्यावर कसा अन्याय केला, असे सांगून मतदारांची सहानुभूती मिळवत आहेत. ‘माझे काय चुकले?’ ही टॅगलाइन वापरून कॉलेजरोड भागातील मातब्बर बंडखोर अपक्षाने आकर्षक जाहिरातींवर भर दिला आहे. सिडकोत मामा-मामीची जोडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाम्पत्याने रॅली व प्रचाराचे रान उठवत राजकीय पक्षांना घाम फोडला आहे. नाशिकरोड येथे भाजपकडून पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविकेनेही अपक्ष उमेदवारी करीत आपला प्रभाव निर्माण केला आहे. एका प्रभागात ब्रेड चिन्हाच्या उमेदवाराने घरोघरी प्रचार करून मतदारांना साद घातली आहे.


आजी-माजी नगरसेवकांचा समावेश

विशेष म्हणजे या अपक्षांमध्ये काही उमेदवार हौशे-नवशे आहेत, तर काही उमेदवार तगडे व मातब्बर आहेत. यात आठ नगरसेवक व १३ माजी नगरसेवकांसह विविध पक्षांच्या बंडखोरांचा समावेश आहे. काही ठिकाणी नेत्यांचे नातेवाईक व कुटुंबातील सदस्यही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


चार उमेदवारांची मोट

अपक्षांनी बहुसदस्यीय पद्धतीत एकट्यावर ताण पडू नये म्हणून चार अपक्षांना एकत्र घेत आघाडी तयार केली आहे. काही ठिकाणी तर अपक्ष उमेदवारांनी चक्क राजकीय पक्षांच्या उमेदवारांबरोबरच आघाडी केली आहे. त्यामुळे अपक्षांचा बोलबाला या निवडणुकीत कायम राहतो, की त्यांना स्थान मिळत नाही, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.


तुमचे मत गृहित धरू का?

काही अपक्षांनी फोनवरून मतदारांशी संपर्क साधत ‘तुमचे मत गृहित धरू का?’ असा प्रश्न विचारून मतदारांना भंडावून सोडले आहे. या प्रश्नावर मतदारांचाही गोंधळ उडत आहे. त्यामुळे काही जण ‘असे कसे विचारता?’ असा सवाल करून संताप व्यक्त करीत आहेत. काही जण मात्र ‘आमचे मत तुम्हालाच’ असे सांगून आपली सोडवणूक करून घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे बंधूंवर घणाघात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार शेरेबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या सभांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंची देना नव्हे तर लेना बँक आणि राज ठाकरेंची बँक कृष्णकुंजपुरतीच मर्यादित असून, राष्ट्रवादीची बँक बंद पडल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आमची बँक ही विकासाची बँक असल्याचे सांगत महापालिकेची सत्ता भाजपकडे एकहाती देण्याचे मतदारांना आवाहन केले.

महापालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा घेऊन राज व उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव व राज ठाकरेंवर जोरदार प्रहार करीत योग्य बँकेत मतांची गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. आमची बँक विकासाची असून, तिचे प्रमुख नरेंद्र मोदी असल्याचे सांगत उद्धव व आदित्य ठाकरेंची देना नव्हे तर लेना बँक असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच राज ठाकरेंची बँकेची कुठेही शाखा नसून ती कृष्णकुंज पुरतीच मर्यादित आहे, तर राष्ट्रवादीची बँक काही दिवसासाठी बंद पडल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज यांच्या आपल्यावरील नकलेला प्रतिउत्तर देत, ते उत्तम नकलाकार असून निवडणुकीनंतर त्यांना नकलाच कराव्या लागणार असल्याचा टोला लगावला. एकदा छगन भुजबळांची नक्कल करून जनता त्यांना भुलली. परंतु, पाच वर्षे नकलेच्या आधारावर मते घेता येत नसल्याचे सांगत गणेशोत्सवात त्यांना नकलेसाठी बोलविण्याचा सल्ला त्यांनी दिला. नाशिकसाठी भरपूर दिल्याचे सांगत आपला आकडा चुकत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. कुंभमेळ्यासाठी राज ठाकरेंनी फोन केल्यानंतरच निधी दिल्याचे सांगत तुम्ही विसरले पण आम्ही विसरलो नसल्याचे त्यांनी सांगितले. कुसुमाग्रजांच्या नावाने मते मागितलीत पण पाच वर्षांत त्यांच्यासाठी काय केले असा सवाल करीत नाशिककर आता तुमच्या पक्षाला बाहेरचा रस्‍ता दाखवतील, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची काळजी आहे, तर त्यांनी जिल्हा परिषदेत सभा का घेतल्या नाहीत असा सवाल उप‌स्थित करीत त्यांना मोठ्या बजेटच्या ठिकाणीच रस असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांचा कळवळा आहे, तर त्यांच्‍यासाठी तुम्ही किती सभा घेतल्यात ते सांगा असा प्रश्न करीत निवडणूक झाल्यानंतर योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. तसेच आचारसंहिता संपल्यानंतर कांद्याचा प्रश्न सोडवू असे सांगत सन २०१९ पर्यंत नाशिकमध्ये प्रत्येकाला घर देऊ असा दावा त्यांनी केला. तसेच यापुढे नाशिकची काळजी आपणच घेणार असल्याचे यावेळी त्‍यांनी सांगितले.

कुंभमेळ्याचं सर्व नियोजन आम्ही केलं, डीसीपीआर बनावट, शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करू, स्टेन्टची किंमत ८५ टक्क्यांनी मोदींनी कमी केली, महिंद्रा १५०० कोटींची गुंतवणूक करतंय, रामदेवबाबांचे फूड पार्क नाशिकला, विमानतळ लवकरच सुरू होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार आज थंडावणार

$
0
0

महापालिकेसाठी साडेपाच, तर जिल्हा परिषदेसाठी रात्री १२ पर्यंत प्रचाराची मुदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणसंग्रामाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. गेले काही दिवस सातत्याने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा रविवारी (दि. १९ फेब्रुवारी) महापालिका क्षेत्राात सायंकाळी साडेपाच वाजता, तर जिल्हा परिषदेसाठी रात्री १२ वाजता थंडावणार असून, आता सर्वांचेच लक्ष मतदानाकडे लागले आहे.

महापालिकेच्या ३१ प्रभागांच्या १२२ जागांसाठी, तर जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी मंगळवारी (दि.२१ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच, मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा गड सर करता यावा, यासाठी गेले काही दिवस प्रचाराचा धुरळा उडविण्यात आला. खेड्यापाड्यांत आणि वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी जीवाचे रान केले. पक्षांनी उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक बंडखोरांनी सवता सुभा निर्माण करीत पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. गण आणि गटांमधील शेकडो उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत प्रचारावर जोर दिला. निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच उमेदवारीचे दावेदार असलेल्या इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली होती. परंतु, माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हे निश्चित झाल्याने प्रचाराला अधिक धार चढली. जिल्हास्तरीय नेतेमंडळींकडून सभांद्वारे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी आता त्यासाठी अवघा एकच दिवस उमेदवारांच्या हाती उरला आहे.

रविवारी रात्री १२ पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू राहणार आहे. मात्र पोलिसांनी ध्वनिक्षेपक वापरास रात्री दहापर्यंतच परवानगी दिली आहे. त्यामुळे जाहीर प्रचार रात्री दहापर्यंतच करता येणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार रविवारपर्यंतच उमेदवारांना जाहिरातबाजी करता येणार आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर जाहिरातबाजीलाही बंदी असल्याचे आयोगाचे निर्देश असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

आता अर्थपूर्ण छुपा प्रचार

जाहीर प्रचाराची रविवारी रात्री सांगता होणार असली तरी सोमवारचा पूर्ण दिवस आणि रात्रीचा उपयोग उमेदवार आणि त्यांच्या खंद्या कार्यकर्त्यांकडून छुप्या प्रचारासाठी केला जाण्याची दाट शक्यता आहे. एका रात्रीतून वातावरण बदलण्याची क्षमता अशा प्रचारात असल्याची उमेदवारांना पूर्ण खात्री असते. त्यामुळेच रविवारी रात्रीपासूनच अशा प्रचारात आघाडी घेतली जाण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवशी पार्ट्या तसेच अन्य आमिषांद्वारे आचारसंहिता भंग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा गैरप्रकारांकडे प्रशासन आणि पोलिसांचे लक्ष असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधांच्या गोपनीय मतदानावर प्रश्नचिन्ह

$
0
0

घोषणापत्राद्वारे गोपनीयता ठेवण्याचा आयोगाचा अजब कारभार

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : ashwinikawaleMT

नाशिक : लोकशाही बळकटीकरणासाठी निवडणूक ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. याच प्रक्रियेत मतदार हा राजा असून, त्याला मतदानाच्या हक्काबरोबरच मत गोपनीय ठेवण्याचाही अधिकार प्रदान करण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे अंध व्यक्तींना त्यांचे मत हे त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने देण्याची वेळ आली आहे. ही प्रक्रिया गोपनीय ठेवण्यासाठी घोषणापत्राचा वापर करण्याचा अजब प्रकार समोर आला असून, यामुळे निवडणूक आयोगच मतदान हक्काची पायमल्ली करीत असल्याची बाब स्पष्ट होत आहे.

ज्या व्यक्ती अंध आहेत, अशा व्यक्ती मतदानाचा हक्क कसा बजावणार? हा प्रश्न उभा राहतो. देशाचे नागरिकत्त्व असतानाही शारीरिक व्यंगामुळे व मतदान प्रक्रियेतही त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने त्यांच्या हक्कावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या वर्गाला मतदान करता यावे, यासाठी त्यांना स्वतःसोबत एक सहकारी घेऊन यावा लागणार आहे. या सहकाऱ्याकडून गोपनीयतेचे घोषणापत्र लिहून घेतले जाईल. परंतु, मुळातच अतिशय गोपनीय असलेल्या या प्रक्रियेत घोषणापत्र भरूनही तितकी पारदर्शकता राहील का, ही बाब समोर येत आहे.

चुका टाळण्यासाठी निर्णय

मतदानाच्या काही मशिन्सवर ब्रेल लिपी आहे, तर काही मशिन्सवर नाही. यामध्ये एकाखाली एक मतपत्रिका लावल्या जातात. ‘नोटा’ या पर्यायानंतर ती मतपत्रिका कट होऊन त्यानंतर पुढची मतपत्रिका येत असते. यामध्ये अंध व्यक्तींचा गोंधळ होण्याची शक्यता अधिक असल्याने व गेल्या निवडणुकांवेळी यामध्ये चुका होत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे सहकारी सोबत आणण्याचा उपाय शोधून काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अंध व्यक्तींना मतदान करण्यासाठी स्वतःसोबत एक सहकारी आणावा लागणार आहे. त्याच्या माध्यमातून त्यांना मतदान करता येणार आहे. ही प्रक्रिया गोपनीय राहावी, यासाठी त्याच्याकडून ऑन द स्पॉट घोषणापत्र लिहून घेतले जाणार आहे.

- प्रदीप पठारे, निवडणूक निर्णायक अधिकारी

अंध व्यक्ती सहकारीसोबत घेऊन गेली तर ती प्रक्रिया कोणत्याही अर्थाने गोपनीय राहूच शकत नाही. विधानसभा निवडणुकीदरम्यान ब्रेल लिपीची सुरुवात करण्यात आली होती. ती आता का बंद झाली हे ठाऊक नाही. परंतु, यामुळे गोपनीयतेवर शंका उपस्थित होईल.

- रामेश्वर कलंत्री, अध्यक्ष, नॅब महाराष्ट्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार मिळताच कारवाई

$
0
0

पोलिस आयुक्तांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगप्रकरणासह सोशल मीडियाच्या दुरूपयोगाबाबत नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी लागलीच अॅप अथवा व्हॉट्सअॅपवर संपर्क साधावा. तक्रारींची लागलीच शहानिशा करून कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहेत. प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावतील. यानतंर राजकीय पक्षांकडून प्रचार सुरूच ठेवला जातो. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील ४८ तास महत्त्वाचे असून, पोलिसांनी त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. पोलिस आयुक्तालयात आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यात एक अधिकारी व चार कर्मचारी २४ तास लक्ष ठेवून आहत. या कक्षामार्फत निवडणूक आयोगाच्या COP citizen on patrol या अॅप्लिकेशनवर तसेच व्हॉट्सअॅप क्रमांकांवर (९७६२१००१००) येणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणुकीसंदर्भात कामकाज पाहणारे सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी यांचा एक ग्रुप तयार करून त्याद्वारे निवडणुकीसंदर्भात येणाऱ्या तक्रारींची विशेष दखल घेण्यात येणार आहे. अद्यापपर्यंत या कक्षामध्ये तीन तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यावर लागलीच कारवाई झाल्याचे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले.

सायबर गुन्हे शाखेमध्ये सोशल मीडिया अंमलबजावणी कक्षदेखील कार्यन्वित करण्यात आला आहे. याद्वारे सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, टेलिग्राम इत्यादींमध्ये होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी एक अधिकारी व दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

सोशल मीडियावरही लक्ष

सोशल मीडियावर समाजात दुही निर्माण करणारा, निवडणुकीबाबत अफवा पसरवणारा मजकूर प्रसिध्द झाल्याचे दिसून आल्यास लागलीच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकांनीही सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह आढळल्यास सायबर सेलशी संपर्क साधावा. उमेदवारांकडून पैसे, मद्य, भेटवस्तू वाटपाबाबत, तसेच मतदानाच्या दिवशी वाहनांचा वापराबाबत नागरिक तक्रारी करू शकतील.

कोट फोटो आहे.

मतदानाच्या दिवशी नागरिकांनी लवकरात लवकर मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा. तसेच अॅप किंवा व्हॉट्सअॅप क्रमाकांचा वापर करून तक्रारी कराव्यात. तक्रारदाराच्या नावाबाबत गोपनीयता बाळगण्यात येईल.

- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्दीसाठी सीएम वेटिंगवर!

$
0
0

गोल्फ क्लब मैदान शेवटपर्यंत भरलेच नाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोल्फ क्लब मैदानावर भाजपची जाहीर सभा घेण्याचे धाडस स्थानिक नेत्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, गर्दीसाठी मुख्यमंत्र्यांना तब्बल दीड तास वेटिंग करण्याची वेळ आली. गर्दीअभावी साडेचार वाजेची सभा साडेसहा वाजता सुरू झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर सभास्थळी चिटपाखरूही नसल्याने पुण्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांची ही सभाही गुंडाळण्याची वेळ येते की काय अशी स्थिती निर्माण झाली. परंतु, शेवटच्या क्षणी स्थानिक नेत्यांनी धावाधाव करीत कशीबशी गर्दी जमवली. दीड तासानंतर मुख्यमंत्री सभास्थळी आल्यावर स्थानिक नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गोल्फ क्लब मैदानावर केवळ ठाकरे बंधूच सभा यशस्वी करतात असा आजपर्यंतचा इतिहास. परंतु, हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या चांगलाच अंगलट आला. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांची सभा या मैदानावर प्रथमच होणार होती. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. प्रेक्षकांअभावी मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सभा रद्द झाली होती. त्यामुळे नाशिकच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. स्थानिक नेत्यांनी जाहीर सभेची वेळ साडेचार वाजेची ठेवली. मुख्यमंत्र्यांची मुंबईत सात वाजेला सभा असल्याने मुख्यमंत्री पाच वाजता नाशिकमध्ये दाखल झाले. परंतु, तोपर्यंत गोल्फ क्लबवर चिटपाखरूही नव्हते. त्यामुळे पुण्याची पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानाचा कार्यक्रम आखला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आशीर नहार यांचे घर गाठून चहापान घेत सभेचा अंदाज घेणे पसंत केले.

मुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी धावपळ करीत प्रेक्षकांची जमवाजमव सुरू केली. बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे या आमदारांनी उमेदवारांना फोन करून प्रेक्षकांना आणण्याचे फर्मान सोडले. साडेपाच वाजेनंतर प्रेक्षकांनी मैदानावर येण्यास सुरुवात केल्याने नेत्यांचा जीव भांड्यात पडला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्यानंतर उमेदवारांनीही मग आपल्या ताकदीप्रमाणे प्रेक्षक आणले खरे मात्र मैदान भरले नाही. त्यामुळे अखेरीस मुंबईला जाण्याची घाई असल्याने मुख्‍यमंत्र्यांनी साडेसहा वाजता सभेला सुरुवात केली. अगोदरच मैदानाची व्याप्ती कमी केल्यानंतरही शेवटपर्यंत पूर्ण मैदान भरू शकले नाही.

नेत्यांनी घालवले, मुख्यमंत्र्यांनी सावरले

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाजपकडून चार दिवसांपासून तयारी सुरू होती. परंतु, शेवटपर्यंत मैदान भरू शकले नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी त्यांची इमेज घालवण्याचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्र्यांनी भाषणातून स्वतःसह पक्षाची इमेज सावरली. शैलीदार भाषण व उत्तम फटकेबाजीने त्यांनी उपस्थितांसह नाशिककरांची मने जिंकली.

उमेदवारांचीही दांडी

मुख्यमंत्र्यांच्या सभेला प्रेक्षकांची नव्हे तर उमेदवारांचीही जमवाजमव स्थानिक नेत्यांना करावी लागली. भाजपने शहरात जवळपास ११९ उमेदवार दिले होते. परंतु, जाहीर सभेच्या ठिकाणी कसेबसे ९०च उमेदवार उपस्थित होऊ शकले. त्यामुळे मैदानाप्रमाणेच सभास्थानी उमेदवारांसाठी तयार केलेला मंडपही रिकामाच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशा रंगतील प्रमुख लढती

$
0
0

प्रभाग १- ब (एसटी मह‌िला)

- रंजना भानसी (भाजप)

- जयश्री चव्हाण (शिवसेना)

तब्बल चार वेळा नगरसेवक राह‌िलेल्या भाजपच्या रंजना भानसी यांचा सामना उच्चशिक्ष‌ित असलेल्या जयश्री चव्हाण यांच्याशी आहे. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने भाजपसह भानसी यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. चव्हाण या उच्चशिक्ष‌ित असल्याने त्याही महापौरपदाच्या शर्यतीत आहेत. शिक्षण समितीचे उपसभापती गणेश चव्हाण यांच्या त्या पत्नी असून, ही लढत अटीतटीची आहे. प्रभागाचा विस्तार झाल्यामुळे विजय सोपा नसल्याने दोघींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रभाग २ - क (ओबीसी)

- उद्धव निमसे ( भाजप)

- जे. टी. शिंदे (शिवसेना)

- अनंत सूर्यवंशी (मनसे)

क गटात एक आजी व दोन माजी नगरसेवकांमध्ये प्रतिष्ठेची लढत आहे. उद्धव निमसे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कमळ हातात घेतले आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार माजी नगरसेवक जे. टी. शिंदे आणि मनसेच्या अनंत सूर्यवंशी यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. शिंदे आणि सूर्यवंशी दोन्ही माजी नगरसेवक असल्याने त्यांनीही आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे भाजपच्या तिक‌िटावर हॅटट्र‌िक करण्याच्या तयारीत असलेल्या निमसेंसाठी निवडून येणे सोपे नाही. शिंदे आणि सूर्यवंशी यांचा मतदारसंघात जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे निमसेंसमोर कडवे आव्हान उभे राह‌िले आहे.


प्रभाग ३ अ (ओबीसी)

- मच्छिंद्र सानप (भाजप)

- विलास आव्हाड (शिवसेना)

- समाधान जाधव (राष्ट्रवादी)

या गटातील निवडणूक ही भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीने चर्चेत आली आहे. सानप यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत भाजपमधील बंडखोर शिवसेनेला जावून मिळाले आहेत. आमदार सानप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. सानप यांच्यासमोर सेनेचे विलास आव्हाड तसेच राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. जाधव हे विद्यमान नगरसेवक आहेत, तर शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपातीलच काहींचे बळ आहे. त्यामुळे सानप यांना मतदारसंघातच ख‌िळवून ठेवण्यासाठी विरोधकांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे सानप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

प्रभाग ६ ड (जनरल)

- अशोक मुर्तडक (मनसे)

- दामोदर मानकर (भाजप)

- दीपक पिंगळे (शिवसेना)

पालिकेतील सत्ताधारी मनसेचे महापौर अशोक मुर्तडक यांच्यामुळे या गटातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. माजी नगरसेवक व भाजपचे उमेदवार दामोदर मानकर आणि शिवसेनेचे उमेदवार दीपक पिंगळे अशी तिंरगी लढत या गटात होत आहे. मुर्तडक यापूर्वी सलग चारवेळा या भागातून निवडून आले आहेत. परंतु, प्रभागाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाल्याने त्यांच्या पुन्हा निवडून येण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागली आहे. भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली असून, आमदार बाळासाहेब सानप यांनी मानकर यांच्या पाठीशी आपले बळ उभे केले आहे. त्यामुळे मुर्तडक यांच्यासाठी रात्र वैऱ्याची आहे.


प्रभाग ७ अ (ओबीसी)

- अजय बोरस्ते ( शिवसेना)

- नरेंद्र पवार (भाजप)

शिवसेनेचे महानगरप्रमुख असलेल्या अजय बोरस्ते यांच्यासमोर भाजपने नरेंद्र पवार यांच्या रुपाने नवखा उमेदवार दिला आहे. परंतु बोरस्तेंच्या विरोधात स्वपक्षातील विरोधकांनी पवार यांना बळ पुरवण्याची छुपी रणनीत‌ि खेळली आहे. त्यातच बोरस्ते विरुद्ध आमदार देवयानी फरांदे यांच्यातही संघर्ष आहे. फरांदे यांच्या मतदारसंघात हा प्रभाग असल्याने त्यांनीही आपली प्रतिष्ठा भाजपच्या मतदारांसाठी खर्ची केली आहे. त्यामुळे बोरस्तेंसमोर तगडे आव्हान विरोधकांनी उभे केले आहे.


प्रभाग ७ ड ( जनरल)

- गोकुळ पिंगळे ( शिवसेना)

- योगेश हिरे ,(भाजप)

भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे भाजपकडून निवडणूक रिंगणात असून, त्यांच्यासमोर विरोधकांसह स्वपक्षीयांनीही दंड थोपटले आहेत. आमदार हिरे आणि आमदार फरांदे यांच्यात फारसे सख्य नाही. त्यातच फरांदे यांचे समर्थक असलेल्या मधुकर हिंगम‌िरे यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे. माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे बंधू माजी नगरसेवक गोकूळ पिंगळे शिवसेनेच्या वतीने रिंगणात आहेत. पिंगळे आणि हिंगमिरे यांनी हिरे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केल्याने आमदार हिरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन आमदारांमधील संघर्षात कोणाचा विजय होतो, याकडे नजरा लागून आहेत.

प्रभाग ९ ड (जनरल)

- दिनकर पाटील ( भाजप)

- साहेबराव जाधव (शिवसेना)

- प्रेम पाटील ( अपक्ष)

काका पुतण्यातील लढाई असे या गटातील निवडणुकीकडे बघ‌ितले जात आहे. माजी महापौर दशरथ पाटील आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक व शहर उपाध्यक्ष दिनकर पाटील आणि दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील यांच्या लढत होत आहे. सोबतच शिवसेनेच्या वतीने साहेबराव जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असले तरी, मुख्य लढत ही दिनकर पाटील व प्रेम पाटील यांच्यात लढत होत असून काका जिंकतात की पुतण्या जिंकतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



प्रभाग १२ ड (जनरल)

- शैलेश कुटे ( काँग्रेस)

- शिवाजी गांगुर्डे (भाजप)

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक शैलेश कुटे आणि भाजपचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांच्यात थेट सामना आहे. विशेष म्हणजे दोघांचे मूळ हे काँग्रेस असून गांगुर्डे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करत भाजपकडून उमेदवारी केली आहे. त्यामुळे या दोघा काँग्रेसींमधला सामना रंगतदार झाला आहे. महापालिकेत कुटे कुटुंबियांचा प्रत्येक वेळी एक सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे कुटेंसाठीही प्रतिष्ठेची लढाई असून, गांगुर्डे यांच्यासमोरही हॅटट्रिक करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे दोन काँग्रेसींमधल्या या लढाईत कोण जिंकते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रभाग १३ क (ओबीसी)

- अॅड. यतीन वाघ ( शिवसेना)

- गजानन शेलार (राष्ट्रवादी)

- मृणाल घोडके ( भाजप)

प्रभाग १३ मधील सर्वाधिक चुरशीची व प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात आहे. माजी महापौर असलेले व पक्षांतर करून शिवसेनेत आलेल्या अॅड. यतीन वाघ यांच्यासमोर राष्ट्रवादीचे नेते व माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. भाजपनेही मृणाल घोडके यांना रिंगणात उतरवले आहे. पंरतु, खरी लढत ही वाघ आणि शेलार यांच्यातच असून, दोघांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. रविवार कारंजा परिसरात वाघ यांची तर भद्रकाली परिसरात शेलार यांची ताकद आहे. त्यामुळे या ‘व्हीआयपी’ लढतीत कोण बाजी मारते, यासाठी पैजा लागल्या आहेत.

प्रभाग १५ क (जनरल)

- सचिन मराठे (शिवसेना)

- प्रथमेश ग‌िते (मनसे)

- गुलजार कोकणी (काँग्रेस)

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत ग‌िते यांचे पुत्र प्रथमेश गीते यांच्या उमेदवारीमुळे या गटातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. ग‌िते यांचा सामना दोन वेळा नगरसेवक राह‌िलेल्या सचिन मराठे यांच्यासह काँग्रेसच्या गुलजार कोकणी यांच्याशी आहे. सोबतच मनसेचे संदीप लेनकरही मैदानात आहेत. प्रथमेश ग‌िते यांना भाजपमधीलच एका गटाचा विरोध आहे. त्यामुळे वारसदाराच्या विजयासाठी वसंत ग‌िते यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिवसेनेच्या मराठे यांचे या भागात चांगले नेटवर्क आहे. मुस्लीम एकगठ्ठा मतांमुळे काँग्रेसचीही ताकद वाढली आहे. त्यामुळे ग‌िते यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.


प्रभाग १६ ड (जनरल)

- राहुल दिवे (काँग्रेस)

- कुणाल वाघ (भाजप)

- विजय ओहोळ (शिवसेना)

या प्रभागात जवळपास ९आजीमाजी नगरसेवक रिंगणात असल्याने निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. जनरल गटातील निवडणुकीत दोन आजी व दोन माजी नगरसेवक आमने-सामने आहेत. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसच्या राहुल दिवे यांच्यासमोर भाजपचे विद्यमान नगरसेवक कुणाल वाघ, माजी नगरसेवक विजय ओहोळ, रमेश जाधव यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. दिवे कुटुंबाची ताकद या भागात असली तरी, प्रथमच त्यांच्यासमोर विरोधकांनी आव्हान उभे केल्याने त्यांची कसोटी पणाला लागली आहे.

प्रभाग २२ अ ( एसटी महीला)

- नयना घोलप ( शिवसेना)

- सरोज अहिरे (भाजप)

शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या व माजी महापौर नयना घोलप यांच्या उमेदवारीमुळे या गटातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. घोलप यांच्यासमोर भाजपच्या सरोज अहिरे यांचे आव्हान असून, माजी आमदार बाबुलाल अहिरे यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे दोन प्रतिष्ठित व माजी आमदारांच्या मुलींमधील ही लढाई आहे. घोलप यांनी शिवसेनेच्या महापौर म्हणून अडीच वर्ष काम पाहिले आहे. बबन घोलप यांचे या भागावर एकतर्फी वर्चस्व राह‌िले आहे. प्रथमच त्यांच्यासमोर भाजपने तगडा उमेदवार देऊन आव्हान उभे केल्याने या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौर बग्गांसमोर पाटील यांचे आव्हान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महानगरपालिका निवडणुकीत पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक पाचच्या सर्वसाधारण जागेवर उपमहापौर गुरुमित बग्गा व माजी खासदार माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल बागूल यांनीसुध्दा कडवे आव्हान उभे केल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्यामुळे येथे भाजप - शिवसेना व बग्गा यांच्या आघाडीतच सामना रंगणार आहे. बग्गांच्या आघाडीत दोन अपक्ष व दोन मनसेचे उमेदवार आहेत.

या प्रभागात ३८ हजार ५२९ मते असून, येथे मराठा, वंजारी, ब्राह्मण, गुजराती, गवळी समाजाचे प्राबल्य आहे. इतर समाजाचाही येथे प्रभाव आहे. या प्रभागात अनुसूचित जाती व जमातीचेही ४५०० च्या आसपास मतदान आहे. त्यामुळे येथील जातीय समीकरणही मोठा प्रभाव पाडणार असल्यामुळे निकाल धक्कादायक असणार आहे. तब्बल तीन वेळा नगरसेवक झालेले बग्गा यांच्यासाठी ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे. बहुसदस्यीय पध्दतीमुळे, त्यांच्या मूळ प्रभागात नवीन प्रभाग जोडल्यामुळे ‌बग्गा यांना कसरत करावी लागत आहे. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी घेत आव्हान दिले आहे. या ठिकाणी पाटील कुंटुबाचे असलेले प्राबल्य,त्याचप्रमाणे मराठा मतदान व जनलक्ष्मी बँकेमुळे असलेला संपर्क याचा फायदा पाटील यांना मिळणार आहे. शिवसेनेचे अनिल बागूल यांनीसुध्दा शिवसैनिकांच्या बळावर या निवडणुकीत आपला प्रभाव व संपर्क ठेवला आहे.

बग्गा, पाटील व बागूल यांच्या लढतीबरोबरच या प्रभागातील इतर प्रवर्गात नागरिकांचा मागासवर्ग असलेल्या प्रवर्ग ‘अ’मध्ये मनसेचे धनवटे यांचा सामना शिवसेनेचे मनोज अद्यप्रभू, भाजपचे कमलेश बोडके व अपक्ष उमेदवार शकुंतला निकम यांच्याबरोबर आहे. ‘ब’मध्ये नंदिनी बोडके यांचा सामना भाजपच्या सीमा राजपूत, शिवसेच्या तांबे रागिणी व अपक्ष उमेदवार रंजना थोरवे यांच्यासोबत आहे. ‘क’मध्ये विमल पाटील यांचा सामना भाजपच्या चंद्रकला धुमाळ, शिवसेनेच्या संजीवनी वराडे यांच्याशी आहे.


असा आहे प्रभाग

कुमावतनगर, भक्तिधाम, पेठ नाका परिसर, चित्रकुट सोसायटी, दिंडोरीरोड कृषी उत्पन्न समितीमागील परिसर, एरंडवाडी, मखमलाबाद नाका परिसर, मालेगाव स्टॅण्ड, अशोक थिएटर परिसर, रामकुंड परिसर, पंचवटी वाचनालय, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर, सीतागुंफा परिसर, ढिकलेनगर, नाग चौक असा परिसर असलेल्या या प्रभागात भाजपाच्या बाजूने बऱ्याच जमेच्या बाजू असल्या तरी आघाडी व शिवसेनेने या निवडणुकीत रंग भरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केल्यास मिळणार हॉटेल बिलावर सवलत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नाशिक जिल्हा हॉटेल असोसिएशननेदेखील पुढाकार घेतला असून, मतदानाच्या दिवशी मतदान केलेल्या नागरिकांना बिलावर दहा टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने केलेल्या अावाहनास प्रतिसाद देत हॉटेलमालक-चालक असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीधर शेट्टी यांनी नाशिकमधील असोसिएशनमध्ये नोंदणी असलेल्या हॉटेलांमार्फत अन्नपदार्थांच्या एकूण बिलावर दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मतदान करून आलेल्या नागरिकांना दहा टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे.

महापालिकेतर्फे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावला म्हणून हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या बिलावर मतदारांना १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान केल्याबाबतची बोटावरील शाईची खूण दाखवावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘होय, मी मतदान करणारच!’

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून ‘होय, मी मतदान करणारच!’ या मोहिमेंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिकेच्या वतीने रविवारी शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सोबतच विविध संघटनांच्या माध्यमातून मतदारांसाठी सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीतील २००७ मधील मतदानाची टक्केवारी ६० टक्के होती. त्यानंतर २०१२ च्या निवडणुकीत ही टक्केवारी तीन टक्क्यांनी घटून ५७ टक्के झाली. येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी कमी न होता मोठ्या प्रमाणावर वाढावी, या हेतूने महापालिकेने विविध संस्थांच्या मदतीने मतदार जागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गतच नाशिक महापालिका व कविता राऊत फाऊंडेशन, नाशिक सिटिझन्स फोरम (एनसीएफ), नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), नाशिक येझदी-जावा क्लब (एनवायजेसी) आणि क्रूझिंग गॉड्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे मतदार जागृतीसाठी रविवारी सकाळी १० वाजता मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कविता राऊत हिचा सहभाग या रॅलीचे विशेष आकर्षण ठरला.


मतदार सेल्फी स्पर्धा

युवावर्गामध्ये सध्या मोबाइलद्वारे सेल्फी काढण्याचे प्रमाण अधिक आहे. याचा विचार करून युवा मतदार आकर्षित होण्यासाठी कविता राऊत फाऊंडेशन, नाशिक सिटिझन्स फोरम, नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, क्रेडाईतर्फे मतदार सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नाशिककरांनी मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर स्वतःच्या मोबाइलवरून ७७६८००२४२४ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे मतदान केल्याच्या हाताच्या बोटावरील शाईच्या खुणेसह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील भाग्यवान मतदारांना विविध सामाजिक संस्थांमार्फत बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षिसांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.

--

महापालिका निवडणुकीत मतदानाची जास्तीत जास्त टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. मतदार जनजागृतीसाठी विविध संस्था व सामाजिक संघटनांनीही महापालिकेला सहकार्य केले असून, गेल्या वेळेपेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न आहे.

-अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images