Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्मारक नूतनीकरण वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हुतात्मा स्मारकाला अवकळा आली असून, तातडीने या ठिकाणच्या दुरुस्तीला सुरुवात करावी, अशी मागणी जोर धरत होती. याची दखल घेऊन महापालिकेने या स्मारकाच्या दुरुस्ती कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, हे काम स्वातंत्र्यसैनिकांना अंधारात ठेवून केले जात असल्याचा थेट आरोप ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी केला आहे. त्यामुळे हे काम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि प्रेरणा देणारा साक्षीदार म्हणून हुतात्मा स्मारक ओळखले जाते. याच स्मारकाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने निविदा काढली आहे. ७ लाख ४६ हजार ११८ रुपये खर्चून या ठिकाणी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. मात्र, या कामाबाबत हुदलीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हुतात्मा स्मारकात स्वच्छतेसाठी केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. स्मारकाचे आवार मोठे आणि कर्मचाऱ्यांची संख्या एक असल्याने त्याच्या कामावर ताण पडतो. त्यामुळे हवी तशी स्वच्छता होत नाही. याबाबत महापालिकेत अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु, याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.

या ठिकाणी दुरुस्ती करण्याची तयारी काही आमदारांनी दर्शविली होती. परंतु, त्याकडे पुन्हा दुर्लक्ष होत आहे. एका आमदारांनी या ठिकाणचे झाडे तोडून इमारत बांधण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, स्वातंत्र्यसैनिकांच्या संस्थेने झाडे तोडण्याला मनाई केल्याने हे प्रकरण थांबवावे लागले होते. या ठिकाणची दुरुस्ती हवी आहे. परंतु, येथील झाडाझुडपांना हात लावू, नये असे स्वातंत्र्यसैनिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने या ठिकाणची नुकतीच पाहणी केली. परंतु, स्वातंत्र्यसैनिकांना विश्वासात घेतले नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आमच्या गरजेनुसार या ठिकाणी काम होणे आवश्यक आहे, असे हुदलीकर यांनी सांगितले.

--

अशी आहे सद्यस्थिती

या स्मारकाचे काम १९८० मध्ये करण्यात आले. याचा पाया मातीत असल्याने इमारत खचत आहे. अनेकदा काम करूनदेखील पाया मजबूत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या फरशा उखडल्या असून, पावसाळ्यात जमिनीखालून पाणी वर येते. सर्व स्मारकाची वायरिंग उखडली असून, बहुतांश लाइटचे पॉइंट बिनकामाचे झाले आहेत. या वायरिंगमुळे शॉक लागून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता येथील वायरिंगचे काम तातडीने करणे गरजेचे आहे. दरवाजांसह त्यांच्या फ्रेमही खराब झाल्या आहेत, तेदेखील बदलणे गरजेचे आहे.

--

महापालिका काही तरी काम करणार असल्याचे ऐकिवात आले आहे. याबाबत आमच्याशी संपर्क साधलेला नाही. आम्हाला विचारल्यास डागडुजी न करता सगळे काम करा, असा सल्ला आम्ही देणार आहोत.

-वसंतराव हुदलीकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात काँग्रेस-शिवसेना युतीचे संकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या १४ जून रोजी होत असून, गुरुवारी काँग्रेसकडून नगरसेवक रशीद शेख तर शिवसेनेकडून सखाराम घोडके यांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, निकालानंतर त्रिशंकू स्थिती झालेल्या पालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू असतांना काँग्रेस व शिवसेनेची युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

८४ नगरसेवक असलेल्या महापालिकेत निकालानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेस २८ जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. तर राष्ट्रवादी जनता दल आघाडीलादेखील २६ जागांवर विजय मिळाला. एक अपक्षही राष्ट्रवादीच्याच गोटात गेल्याने त्यांचे संख्याबळ २७ झाले. शिवसेनेला १३, भाजप ९ आणि एमआयएमला ७ जागा मिळाल्या. त्रिशंकू स्थितीत असलेल्या पालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना व एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सत्तेसाठी सेनेला सोबत घेण्याबाबत बोलणी सुरू असून, शिवसेनेला उपमहापौर पद हवे असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसकडून माजी आमदार तथा नगरसेवक रशीद शेख यांनी महापौरपदासाठी दोन अर्ज दाखल केले. त्यापैकी एका अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे नगरसेवक नारायण शिंदे तर अनुमोदक म्हणून गटनेते नीलेश आहेर यांची नावे आहेत. सेनेकडून उपमहापौरपदासाठी नगरसेवक घोडके यांनी देखील दोन अर्ज दाखल केले असून, त्यापैकी एका अर्जावर काँग्रेस नगरसेवक अन्सारी मो. अस्लम खालिद अहमद सूचक तर फकीर मो. शेख सादिक अनुमोदक म्हणून नावे आहेत. यावरून पालिकेच्या सत्ताकारनात काँग्रेस-शिवसेना युतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीनेदेखील महापौरपदाची आशा सोडली नसून, नगरसेवक नाबी अह. अहमदुल्ला यांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान सत्तेसाठी ४३ नगरसेवकांची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास ४१ इतके संख्याबळ होते. त्यामुळे त्यांना सत्तेसाठी एमआयएमला विश्वासात घ्यावे लागेल. एमआयएमचे सात नगरसेवक असून, त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास काँग्रेसचा महापौर व सेनेचा उपमहापौर होणे निश्चित मानले जात आहे.

एमआयएमला स्वीकृत नगरसेवक?

८४ नगरसेवक असलेल्या महापालिकेत ५ स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. या मध्ये सहगुनकाच्या आधारे काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे (मालेगाव महागठबंधन आघाडी) दोन, शिवसेनेचे एक याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. राष्ट्रवादी व जनता दलाच्या आघाडीमुळे भाजपचे स्वीकृत नगरसेवक पद जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसची सत्ता स्थापन व्हावी यासाठी एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यास त्यामोबदल्यात त्यांना काँग्रेसच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवक पद दिले जाऊ शकते.

गटनेत्यांची निवड

महापौर निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांनी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली असून, राष्ट्रवादी व जनता दल यांनी एकत्र येत मालेगाव महागठबंधन आघाडी स्थापन करून गटनोंदणी केली आहे. गटनोंदणी नंतर आघाडीच्या गटनेतेपदी जनता दलाचे बुलंद इक्बाल यांची निवड करण्यात आली. काँग्रेसने माजी महापौर ताहेरा शेख, शिवसेनेने नीलेश आहेर, एमआयएमने डॉ. खालिद परवेज, भाजपने सुनील गायकवाड यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थॅलेसेमियामुक्तीचे बळ

$
0
0

नाशिक : पोषण आहाराच्या अभावाने होणाऱ्या थॅलेसेमिया या आजारावर मात करण्यासाठी पॅरेंट असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्टच्यावतीने (पटूट) जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजेसमधील दहा हजार विद्यार्थ्यांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रसिध्द गझलगायक पंकड उदास यांनी भरघोस अर्थसहाय्य केले आहे.

पोषक आहाराअभावी अॅनेमिया व थॅलेसेमिया या आजारांची मुलांना लागण होते. या आजाराने विद्यार्थ्यांच्या शारिरीकच नाही तर मानसिक वाढीवरही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. ते अभ्यासातही मागे रहातात. यावर मात करण्यासाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात आहार आणि विहाराचे महत्त्व पटवून देतानाच जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांची मोफत अॅनिमिया आणि थॅलेसेमीयाविषयी आरोग्य तपासणी होणार आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट संस्था व पॅरेंट असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्टच्यावतीने या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. पॅरेंट असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्टचे विभागीय संचालक प्रकाश पांगम यांच्या पुढाकाराने विविध कॉलेजांमधील विद्यार्थ्यांची अॅनेमिया व थॅलेसेमिया तपासणी केली जाणार आहे. यासाठी लागणारे ऑटोमॅटिक ब्लड सेल काउंटर मशिन प्रसिद्ध गझलगायक पंकज उदास यांनी दिले आहे. तपासणीनंतर विद्यार्थ्यांचे सीबीसी रिपोर्ट काढले जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य आहार व विहार हिमोग्लोबीन वाढीसाठी जीवनसत्वाचा पुरवठा केला जाणार असून व्याख्यानांमधून आरोग्याचे धडेही दिले जाणार आहे.

यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या तपासणीत १२ मुले थॅलेसेमियाग्रस्त आढळली असून त्यापैकी ३ मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात दोन मुलांवर शस्त्रक्रिया होणार आहे. या उपक्रमाला ज्यांना अर्थसहाय्य करायचे असेल अशा व्यक्तीनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पांगम यांची मोलाची साथ
अॅनेमिया आणि थॅलेसेमिया आजारावर प्रकाश पांगम यांनी ४० वर्षात संशोधन केले आहे. त्यांनी अनेक संस्थांसोबत कामही केले आहे. मुंबईत झालेल्या मीनाताई ठाकरे ब्लड अभियानात एकाच दिवशी २५ हजार जणांची रक्त तपासणी करून नमुने संकलित केले होते. या उपक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली आहे. पांगम यांनी १२५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये रक्त विषयावर ७० संशोधनपर निबंध सादर केले आहेत. आतापर्यंतच्या सेवेत त्यांनी सातशेच्यावर शिबिरे घेतली असून ७५० हून अधिक मेडल मिळविले आहेत.

फॅमिली स्टडी होणार
थॅलेसेमिया तपसाणीत पॉझिटीव्ह आढळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांनाही आहारविषयी मार्गदर्शन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. अनेक खेळाडू खेळताना पुरेसा आहार घेत नाही त्यामुळे शरिरातील घटकांची झीज होत. कालांतराने मोठ्या आजारांना तोंड द्यावे लागते. यासाठी शहरातील खेळाडूदेखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्यांचे सत्र शहरात थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पंचवटीसह सातपूर व सिडको परिसरात चार घरफोड्या झाल्या असून यात चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरी केला आहे. या प्र्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पेठरोड भागातील दुर्गानगर परिसरात राहणारे ज्ञानेश्व रामराव गुंजाळ (रा. शिवराष्ट्र सोसायटी) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. ३१) गुंजाळ कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, साड्या, कॅमेरा व लॅपटॉप असा सुमारे ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक वाघचौरे करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना सिडकोतील गणेश चौक परिसरात घडली. यात चोरट्यांनी ५७ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरी केला. कैलास शिवराम गुरव (रा. एमएसईबी मागे, गणेशचौक) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी सकाळी गुरव कुटुंबीय घराबाहेर गेले होते. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा कापून त्यांच्या घरात प्रवेश केला. तसेच, कपाटातील सोन्याचे दागिणे, रोकड व मोबाइल असा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.

टीव्ही, मिक्सरची चोरी

सातपूर : सातपूर कॉलनीतील शिवनेरी गार्डन भागात राहणारे भाऊसाहेब शिवराम चव्हाण हे बुधवारी रात्री पाळीसाठी कामावर गेले होते. चोरट्यांनी त्यांचे व शेजारी राहणाऱ्या विशाल आहेर यांच्या बंद घरांचा कडीकोयंडा तोडला.
चोरट्यांनी चव्हाण यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ३१ हजाराचा तर आहेर यांच्या घरातून एलईडी टीव्ही, मिक्सर आणि रोकड असा हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
सातपूर कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका कंत्राटी कामगारांच्या घरातही चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, घरात काहीच न सापडल्याने चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त करीत पळ काढला. तसेच सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयाच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनतळावरून आयशर गाडीही चोरट्यांनी पळविली असल्याची तक्रारी रतन पवार यांनी सातपूर पोलिसात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटपूजेनंतर ओरबडले महिलेचे मंगळसूत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करून घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना नारायणबापू चौकात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा मधूकर कोकाटे (रा. रवीनारायणी रो हाऊस, श्रीरामनगर, जेलरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सीमा कोकाटे वा त्यांच्या जाऊबाई गुरूवारी (दि. ८) दुपारी वटपौर्णिमेनिमित्त नारायणबापू चौकात गेल्या होत्या. साडे तीन वाजेच्या सुमारास पूजा आटोपून घराकडे परतत असताना चोरट्यांनी संधी साधली. टाकळीरोडने घराकडे पायी परतत असताना लाल रंगाच्या दुचाकीवर समोरून दोन चोरटे आले. त्याच्यापैकी एकाने कोकाटे यांच्या गळ्यातील ७५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तोडले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

घरासमोरून गायींची चोरी

घरासमोर बांधलेल्या गायी चोरीला गेल्याची घटना वंजारवाडी (ता. जि. नाशिक) येथे घडली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदू पुंजा शिंदे (रा. राममंदिररोड, वंजारवाडी) यांच्या तक्रारीनुसार, शिंदे यांच्या प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीच्या दोन गायी बुधवारी रात्री त्यांच्या घरासमोर बांधलेल्या असतांना चोरी केल्या.

महिलेस धमकी

महिलेच्या फोटोचा वापर करीत बनावट फेसबुक अकाउंट सुरू करून महिलेस बदनामीची धमकी देणाऱ्या विकी श्रीवास्तव या संशयिताविरूध्द सायबर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील गुलमोहर कॉलनीत राहणाऱ्या २० वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपीने पीडीत महिलेच्या छायाचित्राचा गैरवापर करीत फेसबुकवर बनावट अकाउंट सुरू केले. काही दिवसातच हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. त्यानुसार पीडीत महिलेने संशयिताशी संपर्क साधला. मात्र, संशयिताने पीडीत महिलेला धमकी दिली. भेटण्यास यावे; अन्यथा पतीस सोशल मीडियाद्वारे तुझे फोटो पाठविले जातील, अशी धमकी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार खेळणारे २३ जण ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

वाल्मिकनगर येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. गुरुवारी (दि. ८) रात्रीच्या साडेदहा वाजेच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. त्यात ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.

वाल्मिकनगर येथील क्षीरसागर कॉलनीतील एका खोलीत काही दिवासंपासून अवैधरित्या जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस मुख्यालयास मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आपल्या सोबत सरकारी लवाजमा न घेता खासगी रिक्षाने या ठिकाणी येऊन छापा टाकला. त्यांनी सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक (गुन्हे) आनंद वाघ यांना बोलावून घेतले. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ३७ हजार रोख रकमेसह ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या छाप्यात बाळू पाटील, सतीश पाटील, मधुकर मोरे, बबलू थापा, मोहम्मद अन्सारी, संदीपकुमार प्रदीपसिंह, मोहन सोनवणे, दीपक पवार, राजू वाघमारे, राज बोंडे, नीलेश मलहा, राकेश पवार, उदय पाटील, गिरीश धोंगडे, दत्तात्रय मोरे, योगेश रणमाळे, दीपक पवार, किरण राजगुरू, मंहेश बैरागी या २३ जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस हवालदार प्रवीण कोकाटे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शाळेजवळ जुगार
नाशिक : महापालिका शाळेच्या आवारात जुगार खेळणाऱ्या चौघा तरूणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळा गणपत जाधव, मोहसीन शब्बीर शेख, सिराज रफिक शेख व कलाल रफिक शेख (रा. सर्व पंचशीलनगर, गंजमाळ) अशी संशयितांची नावे आहेत. पंचशीलनगर येथील महापालिका शाळा क्रमांक सहाच्या आवारात काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना बुधवारी रात्री मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी रात्री साडेदहा वाजता शाळेच्या आवारात छापा टाकला. यावेळी संशयित जुगार खेळत होते. संशयितांकडून जुगाराचे साहित्य व ६६० रुपये हस्तगत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोधासाठी मलेशियाकडे धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बिटकॉईन या इंटरनेटवरील व्हर्चुअल करन्सीचे शहरात जाळे पसरवणाऱ्या व्हिएतनामच्या नागरिकांकडे मलेशियन पासपोर्ट सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी मलेशियन दूतावासाला पत्र देऊन चौकशी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील सर्व संशयितांना जामीन मंजूर झाला. ते सायबर पोलिस स्टेशनला हजेरी लावत आहेत.

बिटकॉईन या इंटरनेटवरील व्हर्चुअल चलनाच्या वापरावर भारतात बंदी आहे. मात्र, परदेशात अनैतिक धंद्यासाठी सदर चलनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ड्रग्ज, हत्यारे खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये या चलनाचा विशेष वापर होतो. राज्याच्या पुणे, नागपूर, शिर्डी, औरंगाबाद या शहरांसह नाशिकमध्ये बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीस उद्युक्त करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली. संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात, वेगवेगळे आमीष दाखवून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जात असल्याचे समोर आले. भारतात या चलनाच्या वापरावर बंदी असताना संशयितांनी सदर उद्योग केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिस कोठडी संपल्यानंतर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या, सर्व संशयितांची जामिनावर सुटका झाली असून, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सायबर पोलिस स्टेशनला हजेरी लावत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी स्पष्ट केले. निशेद महादेवजी वासनिक (२९, रा. नागपूर), रोमजी बिन अहमद (मलेशिया), आशिष शंकर शहारे (२८, कोपरगाव, जि. नगर), दिलीप प्रेमदास बनसोड (२९, पाथर्डी फाटा), कुलदीप लखू देसले (३८, रा. खुटवडनगर, नाशिक) यांचा समावेश आहे. यातील रोमजी अहमद हा व्हिएतनाम येथील रहिवाशी आहे. मात्र, त्याच्याकडे मलेशिया देशाचा पासपोर्ट सापडला. मलेशिया व व्हिएतनाम शेजारी राष्ट्र आहेत. भारत आणि नेपाळ देशाप्रमाणे दोन्ही देशांमध्ये व्यवहार होतात. मात्र, या प्रकरणी कुठलीही कमी राहू नये, म्हणून मलेशियन दूतावासाला संपर्क केला आहे. स्थानिक तपास पूर्ण झाल्याने लवकरच संशयितांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीनांचे गुन्हे बेफाम!

$
0
0

नाशिक : अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत वर्षागणीक धक्कादायक वाढ होत असून, विधी संघर्षित बालकांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी ठोस उपाय होत नाही. मागील फक्त सात वर्षात तब्बल एक हजार ४७० मुले विविध गुन्हे करून निरीक्षणगृहात दाखल झाले आहेत. मागील १७ वर्षांचा विचार करता हा आकडा दोन हजार ७१३ इतका होतो.

उंटवाडी रोडवरील मुलांच्या निरीक्षण गृहात १९९९ पासून विविध गुन्हे दाखल असलेल्या अल्पवयीन मुलांना ठेवण्यात येते. कोर्टाने जामीन देईपर्यंत विधी संघर्षित मुले निरीक्षणगृहात राहतात. एखाद्या मुलाचा गुन्हा सिध्द झाल्यास त्याची रवानगी ब्रोस्टल स्कूलमध्ये होते. निरीक्षण गृहात दरवर्षी दाखल होणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय वाढते आहे. १९९९-२००० या वर्षात निरीक्षणगृहात ५३ विधी संघर्षित मुले आली होती. २००४-२००५ मध्ये प्रथमच हा आकडा १०० पर्यंत पोहचला. यानंतर, विधी संघर्षित मुलांची संख्येचा वाढलेला सेनेक्स पुन्हा खाली उतरलाच नाही. २०११-२०१२ या वर्षात शहरातील गुन्हेगारी प्रचंड फोफावली होती. अर्थात याचा थेट परिणाम अल्पवयीन मुलांच्या संख्येवर झाला. या वर्षात निरीक्षणगृहात तब्बल ३०० मुले दाखल झाली होती. २०१६-२०१७ या गत वर्षात हा आकडा २१६ इतका राहिला. निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, सुरक्षा व्यवस्थेत अल्पवयीन म्हणून मिळणारी सूट तसेच कायद्याचा धाकच नसल्याचा उलटा परिणाम होतो आहे. नुकतेच निरीक्षणगृहातील १० मुले खिडकीचे गज कापून पळून गेले. यातील आठ मुलांवर बलात्कार, घरफोडी, चोरी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल होते. या मुलांबरोबर दोन अनाथ मुलेही गेली असून, त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. फक्त संगतीमुळे ही मुले निरीक्षणगृहातून पळून गेली आहेत. २०१०-२०११ ते २०१६-२०१७ या सात वर्षाच्या काळात तब्बल एक हजार ४७१ अल्पवयीन मुले विविध गुन्ह्यांमुळे निरीक्षण गृहात दाखल झाले.

याबाबत बालकांच्या निरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदूलाल शहा यांनी सांगितले, की विधि संघर्षित बालकांची वाढलेली संख्या ही चिंतेची बाब आहे. विशेषतः १६ ते १८ वयोगटातील मुले गुन्हेगारीमध्ये सहजतेने सक्रिय होत आहे. अनेक मुले तर चार-चार वेळा निरीक्षणगृहात दाखल झाले आहेत. कमी वय असल्याने आम्हाला काही होणार नाही, याची जाणीव मुलांना असते. किंबहुना ते तसे बोलून दाखवितात. अशा मुलांची रवानगी ब्रोस्टल स्कूलमध्ये व्हायला हवी. राज्यातील सर्वच निरीक्षणगृहांची ही परिस्थिती आहे. मंजूर पदे भरली जात नाही, सरकारने याची दखल घेणे अपेक्षित असल्याचे मत शहा यांनी व्यक्त केले.

सरासरी सात वर्षातच

१९९९-२००० ते २००९-२०१० या १० वर्षात विविध गुन्हे केले म्हणून निरीक्षण गृहात एक हजार २४२ मुले दाखल झाली होती. यानंतर मात्र अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. २०१०-२०११ ते २०१६-२०१७ या सात वर्षांत तब्बल एक हजार ४७० विधी संघर्षित मुले निरीक्षणगृहात आली. तुलनात्मकदृष्ट्या विधी संघर्षित मुलांची संख्या काही वर्षात वाढल्याची दिसते. ही बाब गृह मंत्रालय, महिला व बालकल्याण विभाग किती गांर्भीयाने घेते याकडे समाजसेवी संघटनांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोरंगण घाटामध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या तोरंगण घाटात चांदवड तालुक्यातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रामदास पुंडलिक वाघ (३९, रा. तांगडी शिरूर, ता. चांदवड) असे तरुणाचे नाव आहे. वाघ हे वीज विभागात कार्यरत असल्याचे आढळून आले आहे.

प्रथमदर्शनी अपघात वाटावा अशी परिस्थती आढळली असली तरी पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरात वास्तव्यास असलेला होमगार्ड जवान त्र्यंबककडे येत होता. त्याला तोरंगण घाटात रस्त्याच्या कडेस मोटारसायकल (एमएच १५ डीटी ८५३१) आणि एक व्यक्ती आढळली. संबंधित जवानाने तातडीने त्र्यंबक पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तपासणी केली असता मृतदेहाच्या खिशात आढळून आलेल्या वीज बिलावर वाघ नाव आढळून आले. याबाबत चांदवडला चौकशी केल्यावर संबंधिताचे नाव स्पष्ट झाले.

वाहनाचा धक्का लागल्याने रामदासचा अपघाती मृत्यू झाला अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात आला होता. मात्र, नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करतांना त्याच्या गळ्यावर खुणा आढळून आल्याने घातपात संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान रामदासच्या कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर, उपनिरीक्षक सुरेश चौधरी, कैलास आकुले, दीपक पाटील आदी तपास करीत आहेत.

विदेशी मद्यसाठा जप्त

मालेगाव : संगमेश्वर भागातील मारुती मंदिरासमोर अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कारचालकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज बाळासाहेब बोरसे (रा. सटाणा नाका) असे संबंधित कारचालकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता कारमधून (एमएच १५ इ बी ३८१०) अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करताना आढळून आल्याने वाहनचालक बोरसे याला १५ हजार ९२० रुपयांच्या मद्याच्या बाटल्या आणि स्विफ्ट कार असा एकूण ३ लाख १५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमालसह अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी करिअर गायडन्स

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

‘महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रमांतर्गत ‘इंजिनीअरिंग क्षेत्रातील करिअरसंधी’ या विषयावर मंगळवार (दि. १३) करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सकाळी ११ वाजता सेमिनार होईल.

बारावीच्या निकालानंतर सीइटी आणि जेईईच्या गुणांनुसार इंजिनीअरिंगसाठीचे प्रवेश सुरू झाले आहेत. इंजिनीअरिंगकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल आहे. सोबतच दहावीनंतरही डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच सध्या अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्लेमसेंट उपलब्ध होत आहेत. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रातील करिअरसंधी, प्लेसमेंट, अभ्यासक्रम याविषयी माहिती दिली जाते. सध्या इंजिनीअरिंगच्या कॅप राउंडची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यभरातून सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी सीईटीची परीक्षा दिली आहे. जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील लाखातच आहे. या दृष्टीकोनातून इंजिनीअरिंगकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. सध्याच्या प्लेसमेंट्समध्ये सर्वाधिक नोकरीच्या संधी या इंजिनीअर्ससाठी असल्याचे दिसत आहे. देशाच्या बाहेरही चांगल्या पॅकेजच्या संधी इंजिनीअर्ससाठी मिळत आहेत. या सर्व करिअरसंधीची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी तसेच त्यांच्या मनातील शंकाचे निरसन व्हावे, यासाठी ‘मटा प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रमांतर्गत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मंगळवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता सेमिनार हॉलमध्ये ‘इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. सी. कुलकर्णी तसेच इंजिनीअरिंग एआरसी सेंटरचे अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सेमिनार मोफत असणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या सेमिनारमध्ये करिअरबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने दाणादाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाने देवळाली परिसरात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. तब्बल दोन तास कोसळलेल्या पावसामुळे महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यांवर चिखल निर्माण होऊन अनेक ठिकाणी डबकी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील कठीण झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने देवळालीवासीयांच्या जिवाची काहिली होत होती. त्यातच पाऊस हजेरी लावणार, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत तरी पावसाचे कुठलेही वातावरण नसताना अचानक दुपारी बाराच्या सुमारास काळ्याकुट्ट मेघांनी गर्दी केली. सुमारे दोन तास पावसाने हजेरी लावत दाणादाण उडवून दिली. देवळालीतील प्रमुख रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. शहरातील सतीश कॉम्प्लेक्स, संसरी नाका, रेस्ट कॅम्परोड, लामरोड, मेन स्ट्रीट, आनंदरोड, बनात चाळ परिसरात पाण्याचे लोट वाहत होते. नंतर अनेक ठिकाणी डबकी साचली होती.

दरम्यान, या पावसामुळे शिगवे बहुला, संसरी, भगूर आदींसह ग्रामीण भागातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले असून, खरीप हंगामाबद्दलच्या आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे पावसात सातत्य राहिल्यास बियाणे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडण्याची शक्यता आहे.

मुरूम पसरविला की दगड?

लामरोड परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर भूमिगत गटारींचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असताना नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मुरूम टाकण्यात आला आहे. त्यात मुरमापेक्षा दगडच अधिक असल्याने नागरिकांना मार्ग काढणे जिकिरीचे बनले होते. प्रशासनाने तत्काळ योग्य दर्जाचा मुरूम टाकून नागरिकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध, भाजीपाल्याची जिल्ह्यात वाहतूक सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी संपामुळे जिल्ह्यात निर्माण झालेला तणाव निवळला असून, आता पोलिस बंदोबस्ताशिवाय भाजीपाला आणि दुधाची वाहतूक जिल्ह्यात सुरळीत सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सुरक्षित मालवाहतुकीसाठी पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी एकही मागणी शुक्रवारी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शेतकरी संपामुळे गेले काही दिवस नाशिकमध्ये तणावाची परिस्थ‌िती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल वाहतुकीसाठी रस्त्यावर येताच तो आंदोलकांचे लक्ष्य ठरत होता. परिणामी बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक कमी होऊन दर वाढले. दुधाचे टँकरही मार्गातच अडविण्यात आल्याने वाहतूकदारांमध्ये दहशतीचे वातावरण होते. परिणामी या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक काही दिवस ठप्प झाली होती. जीवनमानावर त्याचा परिणाम होऊ लागल्याने वेळेप्रसगी पोलिस बंदोबस्तात शेतमाल, दूध आणण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दर्शव‌ली. शेतकरी, वाहतूकदारांचा माल बंदोबस्तात शहरात आणि जिल्ह्याबाहेर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. गेले तीन-चार दिवस गुजरात, मुंबई, मध्य प्रदेश इतकेच नव्हे तर नाशिक शहरात येणाऱ्या शेतमालाला पोलिस बंदोबस्त देण्यात आला. लोकांकडूनही त्यासाठी पोलिस बंदोबस्त मागितला जात होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाला येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यवहार पूर्वपदावर आले असून, भाजीपाला अथवा दुधाच्या एकाही वाहनाला पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला नाही.

जिल्ह्यातील परिस्थ‌िती पूर्वपदावर आली असून, भाजीपाल्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी एकाही शेतकऱ्याने अथवा वाहतूकदाराने मालाच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली नाही.

- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी लेट झाल्याने प्रवाशांचा उद्रेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
पंचवटी एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी मुंबईला जाताना कसारा घाटात थांबवून मंगला एक्सप्रेसला पुढे काढल्यामुळे संतप्त प्रवाशांनी कसारा स्थानकात स्टेशनमास्तरांना घेराव घातला. विशेष म्हणजे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा नाशिकच्या दौऱ्यावर असतानाच हे आंदोलन घडूनही त्यांनी दखल घेतली नसल्याचे प्रवाशांचा आरोप आहे.
पंचवटी एक्सप्रेस ही नाशिककरांची आवडती रेल्वेगाडी आहे. पासधारक, मुंबईला अप-डाऊन करणारे नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक या गाडीलाच प्राधान्य देतात. त्यामुळे या गाडीला वर्षभर चांगला प्रतिसाद असतो. ही इंटरसिटी दर्जाची गाडी असल्याने रेल्वेने वेळेत सोडणे सक्तीचे आहे. तरीही काही महिन्यांपासून पंचवटी या ना त्या कारणाने रोज लेट होत आहे.

का उडाला भडका?
पंचवटी एक्सप्रेस गुरुवारी सायंकाळी नाशिकला येत असताना इगतपुरीजवळ इंजिन फेल झाल्याने ४० मिन‌िटे लेट झाली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून मुंबईला जाताना नाशिकरोड स्थानकात पंचवटी गाडी थांबवून बंगालच्या दुरांतो एक्सप्रेसला पुढे चाल दिली जाते. त्यामुळे मुंबईला जाणारे नोकरदार लेट होत असल्याने त्यांना अडचणी येत आहेत. शुक्रवारी पंचवटी एक्सप्रेस सकाळी नऊच्या सुमारास कसारा घाटात येताच अचानक थांबली. मंगला एक्सप्रेसला पुढे जाण्यासाठी गाडी थांबविण्यात आल्याचे समजताच प्रवाशांनी कसारा स्थानकात पंचवटीची चेन खेचून स्थानकप्रमुखांना गाठले. तेथे त्यांना १५ मिन‌िटे घेराव घालून कडक शब्दांत जाब विचारला. गाडी वेळेत सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रवाशी शांत झाले.

राजकारण नको
पंचवटीबाबत गाडीबाबत कायम राजकारण होते, असा या गाडीतील प्रवाशांचा आरोप आहे. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री होत्या तेव्हापासून त्यांच्या आवडीची दुरांतो एक्सप्रेस पंचवटीच्या आधी सोडली जात आहे. नाशिकरोड स्थानकात पंचवटी सकाळी सव्वासातला येते. मात्र, आल्यावर गाडीत पाणी भरले जाते. त्यामुळेही गाडी लेट होते. वास्तविक पाणी भरण्याचे काम मनमाडला होत असते. भुसावळ विभागाचे डीआरएम म्हणून आर. के. यादव यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. ते आल्यापासून गाडी लेट होत आहे. याआधीचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता असताना गाडी वेळेत धावत होती. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आज गीतांजलीने नाशिक दौऱ्यावर येत होते आणि कसाऱ्यात पंचवटीचे प्रवाशी आंदोलन करत होते. शर्मा यांनी पंचवटी लेट का होते, याची दखल नंतर तरी घ्यायला हवी होती असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पंचवटी काही दिवसांपासून लेट होत आहे. वर्षभरापूर्वी आम्ही आंदोलन केले तेव्हा ही गाडी वेळेत धावत होती. तेव्हाचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी दखल घेतली होती. आता नवीन डीआरएम आले आहेत. आंदोलन केल्यानंतरच न्याय मिळणार असेल तर तेही करू.
- राजू फोकणे,
रेल्वे सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक घटल्याने दरात दुप्पट वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गेले आठ दिवस शेतकरी संपामुळे ठप्प पडलेले बाजार समितीतील व्यवहार शुक्रवारी (दि. ९) सुरळीत सुरू झाले. मात्र, संपाविषयी अजूनही ठोस निर्णय झालेला नसल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्‍थेत आहेत. संपाच्या आठ दिवसांनंतर भाजीपाल्याची प्रचंड आवक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नेहमीच्या तुलनेत केवळ पंचवीस टक्केच भाजीपाला दुपारच्या लिलावात विक्रीस आला. त्यामुळे भाजीपाल्याच्या आठ दिवसांपूर्वीच्या भावात दुप्पटीने वाढ झाली.

शेतकरी संप सुरू करण्याचे निश्चित झाल्यामुळे ३१ मे रोजी भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली होती. त्यामुळे दर कमी झाले होते. त्याउलट परिस्थिती शुक्रवारी (दि. ९) बघायला मिळाली. मागणी प्रचंड असताना भाजीपाल्याची आवक कमी असल्यामुळे बाजारभाव वाढले. नाशिक बाजार समितीत रोज साधारणतः १२०० ते १५०० टन भाजीपाल्याची आवक होत असते. त्यात १००० टन फळभाज्या असतात. शुक्रवारच्या लिलावात केवळ ४०० टन फळभाज्या विक्रीस आल्या. यामुळे दरवाढ झाली. शेतकरी संप सुरूच असल्याने भाजीपाला विक्रीसाठी आणावा की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमावस्‍थेत आहेत. याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. यामुळे दरही वाढले आहेत.

शिवार खरेदीवर व्यापाऱ्यांचा भर

शेतकरी संपाच्या काळात बाहेरील बाजारपेठेत भाजीपाला पाठविण्याची काही व्यापाऱ्यांनी तयारी ठेवली होती. यामुळे त्यांनी शिवार खरेदीवर भर दिलेला आहे. गावोगावी थेट शेतीवर जाऊन शेतमाल खरेदी करून तो बाहेरीत बाजारपेठेत पाठविला जात असल्यामुळे बाजार समितीत लिलाव सुरू होऊनही भाजीपाल्याची फारशी आवक होऊ शकली नाही.

लिलाव आजही सुरू राहणार

नाशिक बाजार समितीत शनिवारी फळभाज्यांचे लिलाव बंद असतात. मात्र गेली आठ दिवस संपामुळे बंद असल्यामुळे आज (दि. १०) भाजीपाल्याचे लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि आडतदार यांनी घेतला असल्यामुळे शनिवारी लिलाव सुरू राहणार आहेत. यामुळे आज आवक वाढण्याची शक्यता असून, दर आवाक्यात येऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीए’तर्फे जीएसटी सहाय्यता केंद्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वस्तू व सेवाकर अर्थात, जीएसटी येत्या १ जुलैपासून लागू होत आहे. ही करप्रणाली सामान्य व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी नाशिकच्या सीए शाखेने मोफत जीएसटी सहाय्यता केंद्राची स्थापना केली आहे.

जीएसटी सहाय्यता केंद्र गुरुवार (दि. ८)पासून सुरू झाले असून, ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक सप्ताहातील गुरुवारी, शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान हे सहाय्यता केंद्र सुरू राहणार आहे. सीए शाखेच्या आयसीएआय भवन, अशोका मार्ग, अशोका शाळेच्या मागे, पखालरोड येथील कार्यालयात हे सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले अाहे. नाशिक सीए शाखेचे जीएसटीवरील तज्ज्ञ सीए सहाय्यता केंद्रात येणाऱ्या व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या केंद्रात सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना जीएसटीविषयक आवश्यक माहिती मिळेल. जीएसटीअंतर्गत करावी लागणारी नोंदणी किती उलाढाल झाल्यावर करायची? ही नोंदणी सर्व व्यापाऱ्यांना गरजेचीच कशी आहे? या आणि इतर शंका व प्रश्नांबाबत केंद्राच्या माध्यमातून मदत करण्यात येईल. या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक सीए शाखेचे अध्यक्ष विकास हासे, शाखेचे सचिव रोहन वसंत आंधळे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


माहितीफलकाचे अनावरण

सहाय्यता केंद्राचे मुख्य समन्वयक म्हणून सीए पीयूष चांडक यांच्याकडे जबाबदारी आहे. दरम्यान, या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या केंद्राच्या विक्रीकर भवन, पाथर्डी फाटा येथील माहितीफलकाचे अनावरण विक्रीकर सहआयुक्त हेमलाल बाखरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विक्रीकर विभागाचे सर्व विक्रीकर उपायुक्त, तसेच सीए शाखेकडून राजेंद्र शेटे व पीयूष चांडक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वडपाडा’ जलस्वयंपूर्णतेच्या वाटेवर...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे काही गावांचा पाणीप्रश्न हाती घेऊन ते टँकरमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत पेठ तालुक्यातील वडपाडा गाव जलस्वयंपूर्णतेच्या वाटेवर असून, ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांतून पाण्याचा प्रश्न संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

सोशल मीडियावर दुष्काळासंदर्भात जनजागृती करून त्यानुसार मागील वर्षी तोरंगण, गढईपाडा, शेवखंडी, खोटारेपाडा आणि फणसपाडा या गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यात फोरमच्या टीमला यश आले होते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेगावचा पाणीप्रश्न एप्रिल २०१७ मध्ये सोडविण्यात आला. याचदरम्यान पेठ तालुक्यातील वडपाडा या गावाचे रहिवासी फोरमच्या टीमला भेटले आणि त्यांच्या गावाची समस्या कथन केली. त्यांची समस्या समजून घेऊन गावाला भेट दिल्यांनतर लक्षात आले, की गाव एका टेकडीवर आहे. गावाच्या जवळपास जानेवारीनंतर पाणी उपलब्ध असणारी एकही विहीर नाही. एकमेव पर्याय म्हणजे नाल्यांमध्ये झरे करून तासन् तास हंडाभर पाण्यासाठी वाट बघणे, दोन-तीन किलोमीटरवरील विहिरींवरून डोक्यावर पाणी आणणे किंवा टँकरने पाणीपुरवठा करणे. टँकर हे सरकारच्या कृपेवर सुरू होत असल्याने जिवावर उदार होऊन अन्य पर्यायांचा वापर करणे गावाच्या पाचवीला पुजले होते.

टेकडीच्या खाली दोन किलोमीटरवरील विहिरीला बारमाही पाणीही असते. पण, इतक्या खोलवरून टेकडीवर पाणी आणणे अशक्य बाब होती. गावात स्टोरेज टाकी बांधली, तर गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविणे शक्य होईल. हे जाणी फोरमने पाच लाख रुपये खर्चाचा अंदाज बांधला. यातील गावातील पाण्याची टाकी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून बांधण्याचे आणि पाइपलाइनसाठी श्रमदानातून चाऱ्या खोदण्याचे ठरवले. सोशल नेटवर्किंग फोरमने वीजपंप, पाइप्स, विजेची उपकरणे व अन्य साहित्य पुरविण्याची जबाबदारी घेतली. गावकऱ्यांनी गावात ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. पाइपलाइनसाठी चाऱ्या खोदून तयार आहेत आणि पाइपही गावात पोहोचले आहेत. या आठवड्यात पाइपची जोडणी करून येत्या ८ ते १० दिवसांत गावातील टाकीत पाणी पडून फोरमतर्फे सातवे गाव जलस्वयंपूर्ण होणार आहे. या उपक्रमाचे लोकार्पण गावातीलच ज्येष्ठ महिलांच्या हस्ते होणार आहे.


उपक्रमातील योगदान

अध्यक्ष प्रमोद गायकवाड, इंजिनीअर प्रशांत बच्छाव, डॉ. पंकज भदाणे, रामदास शिंदे, अॅड. गुलाब आहेर, स्पार्टन हेल्प सेंटर, सचिन शेळके, राजेश बक्षी-कतार, संदीप बत्तासे आणि वडपाडातील सर्व अबालवृद्ध.

पाणी प्रकल्पाचे आश्रयदाते

दिवंगत मातोश्रींच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक अशोक एकनाथ कदम यांनी वडपाडा उपक्रमासाठी भरीव मदत केली. स्पार्टन हेल्प सेंटर या तरुणांच्या संस्थेने वीजपंप घेऊन दिला. याशिवाय परफेक्ट डेव्हलपर्स, फेसबुकवरील तरुण, तसेच व्हॉट्सअॅपवर स्थापन झालेल्या पाणी या ग्रुपच्या सदस्यांनीही पाइप घेण्यासाठी भरघोस मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानपानाच्या साडीने मोडला संसार!

$
0
0

नवरीला सोडून जाणाऱ्या नवरदेवासह १० जणांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकलुती एक मुलगी. लग्नात काही कमी पडायला नको म्हणून तिच्या वडिलांनी हात उसने पैसे उभे करून लग्नाची जय्यत तयारी केली. पाहुण्या मंडळीच्या साक्षीने लग्न लागले. संध्याकाळच्या सुमारास मानपानाचा विषय उभा राहिला अन् होत्याचे नव्हते झाले. मानात मिळालेल्या साड्या चांगल्या नसल्याचे कारण पुढे करीत सासरच्यांनी चक्क पाच लाख रुपये मागितले. शब्दाला शब्द वाढत गेला अन् नवरीला सोडून नवरदेव एकटाच परत गेला. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

धीरज नागेश अहिरे, असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पांडुरंग किसन आहेर यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. नाशिकरोड परिसरातील एका शाळेत क्लर्क म्हणून काम करणाऱ्या आहेर यांना दोन मुले आणि एकच मुलगी. मुलीसाठी स्थळ पाहत असताना त्यांना जवळच्या नातेवाईकांनी मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील नागेश केदा अहिरे यांच्या धीरज या मुलाचे स्थळ दाखवले. ठाण्यात काम करणारा धीरज कल्याणला भावाकडे राहतो. मुली योग्य स्थळ वाटल्याने अधिक चौकशी न करता आहेर यांनी लग्नाची बोलणी केली. सासरच्यांनी दोन लाख रुपये रोकड आणि दोन तोळे सोने असा हुंडा घेतला. २४ एप्रिल रोजी दिमाखात साखरपुडादेखील झाला. ३१ मे रोजी औरंगाबादरोडवरील गोदावरी लॉन्स येथे विवाह ठरला. विधीपूर्वक सर्व पार पडले. विवाह आटोपल्यानंतर मुलीची पाठवणी करण्यापूर्वी आहेर कुटुंबीयांनी अहिरे कुटुंबातील महिलांना मानपान देण्यास सुरुवात केली. मात्र, इतक्या हलक्या साड्या नकोत, असे म्हणत सासरच्या महिलांनी वाद सुरू केला. नवरा मुलगा धीरज यांच्यासह इतर व्यक्तींनी शिवीगाळ सुरू केली. आहेर कुटुंबातील काही तरुणांनी त्यास विरोध केला. वाद वाढल्याने पांडुरंग आहेर यांनी मुलासह त्याच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीला सासरी पाठवयचे असल्यास पाच लाख रुपये देण्याची मागणी अहिरे यांनी केली. या दरम्यान, मुलीची आई तसेच वडील चक्कर येऊन पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या धावपळीत सासरच्या मंडळींनी पोलिस स्टेशन गाठून तिथून घराकडे धूम ठोकली. दोन दिवसांनी नुकसानभरपाई देण्याची तयारी सासरच्यांनी दाखवली. मात्र, नंतर ही मागणीदेखील फेटाळून लावण्यात आली.

दोघांना अटक; इतरांचा शोध सुरू

आडगाव पोलिसांनी धीरज अहिरे, नागेश अहिरे, पुष्पा अहिरे, दीपक अहिरे यांच्यासह केशव कुऱ्हाडे, प्रतिभा कुऱ्हाडे, भिका दयाराम अहिरे, ज्योती अहिरे, कैलास पातळे, भाग्यश्री पातळे यांच्याविरोधात फसवणूक, मारहाण, हुंडाबंदी अधिनियमातील कलम तीननुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आज पाणीपुरवठा नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरण पंप‌िंग स्टेशन येथील महावितरणक कंपनीच्या एक्सप्रेस फिडर लाइनच्या दुरुस्तीसह विविध कामांमुळे आज शनिवारी (दि. १०) दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. शिवाय रविवारी सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
एक्सप्रेस फिडरच्या देखभाल व दुरुस्तीसह शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या पंपसेट्सचे व्हॉल्व दुरुस्ती करणे, ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्ती करणे, चेहेडी पंपिंग स्टेशन येथील उर्ध्ववाहिनीची दुरुस्ती, कालिका पंपिंग स्टेशनमधील नवीन पॅनलची व केबलची जोडणी, कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्ती, गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन येथील नऊशे म‌िमी व्यासाच्या रायझिंग मेनवरील व्हॉल्वची दुरुस्ती आदी कामे पाणीपुरवठा विभागाकडून शनिवारी केली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारचा महावितरण कंपनीचा वीज पुरवठा सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर केंब्रिजवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शाळेतील विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्याचे कारण दाखवून थेट दीडशे विद्यार्थ्यांच्या घरी दाखले पाठविल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन केंब्रिज शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार देवयानी फरांदे यांनी शाळेला भेट देऊन प्रशासनाशी चर्चा केली. मात्र, यावेळी शाळेचे ट्रस्टी भारती रामचंद्रन यांचे पुत्र राहुल रामचंद्रन यांनी थेट आमदारांनाच अरेरावी केल्याने शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आमदार फरांदे यांनी दिला. इंदिरानगर पोल‌िस ठाण्यात ट्रस्टी भारती रामचंद्रन, राहुल रामचंद्रन आणि मुख्याध्यापिका सोनू नादेर यांच्यावर महाराष्ट्र ‌शिक्षण श्ुल्क कायद्यान्वये व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली म्हण्ून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी केंब्रिज स्कूलच्या वतीने सुमारे दीडशे विद्यार्थ्यांचे दाखले फी न भरल्याने पोस्टाने घरपोच पाठवले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी या विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी सतीश सोनवणे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, शाम बडोदे यांनीही शाळेच्या ठिकाणी जाऊन भेट दिली. यावेळी प्रशासनाच्या वतीने उडावाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी थेट मनपा आयुक्तांच्या दालनात धाव घेतली. यावेळी भाजपचे गटनेते दिनकर पाटील यांनी मध्यस्थी करुन या पालकांची समस्या सोडविण्याची मागणी केली. आयुक्तांनीही शाळेला पत्र दिलेले असताना शाळेने चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबद्दल चौकशीचे आदेश दिले. मात्र, यावेळीही समाधान न झाल्याने पालकांनी नाराजी व्यक्त करुन याबाबतची माहिती आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांना दिली. त्यानुसार या दोन्ही आमदारांनी शाळेत येण्याचे मान्य केल्याने पालकांनी पुन्हा शाळेकडे मोर्चा वळविला. यावेळी शाळेच्या विश्वस्तांनी अरेरावी केली. आमदार फरांदे शाळेत आल्यानंतर शाळेला कुलूप लावण्यात आले होते. यानंतर फरांदे यांनी शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. यावेळी आमदारांसमोरही प्रशासनाने उद्धट वर्तन केल्याने फरांदे यांनी पोल‌िसांना प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याने प्रशासनावर बालक हक्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासही सांगितले.

सोमवारी बैठक
शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सोमवारी बैठक घेऊन त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

पोलिस आयुक्तांशी चर्चा
शाळा नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ करीत असल्याच्या तक्रारीसह आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्यासह पालकांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेऊन चर्चा केली. यावर सिंगल यांनी कोणकोणत्या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांचे शोषण झाले आहे, याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेण्याविषयी पालकांना सांगितले आहे. सोमवारीही विद्यार्थ्यांना बाहेर ठेवले तर आम्ही वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना बसवू अशी भूमिका आमदारांनी यावेळी मांडली.

विश्वस्ताच्या मुलाची मुजोरी

आमदार देवयानी फरांदे यांनी शाळेला भेट दिल्यानंतर शाळेच्या विश्वस्ताच्या मुलाने लोकप्रतिनिधी व आमदारांना अरेरावीची भाषा वापरली. यामुळे संतप्त झालेल्या आमदार फरांदे यांनी थेट इंदिरानगरचे वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक फुलदास भोये यांना या मुलावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याचे आदेश दिले.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या विधानाबाबत संभ्रम

मनपा शिक्षणमंडळाचे प्रशासनाधिकारी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या विधानात संदिग्धता आढळून येत असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत. पालक, शाळा प्रशासन, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्याशी याप्रकरणी चर्चा करताना ते वेगवेगळी विधाने करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत होर्डिंग्ज रडारवर

$
0
0

खासगी जागांवरील १५८ होर्डिंगधारकांना नोटिसा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जसोबत खासगी जागांवर उभ्या राहिलेल्या बेकायदेशीर होर्डिंगविरोधात महापालिकेने उशिरा का होईना कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील तब्बल १५८ ठिकाणी खासगी जागेवरील होर्डिंगधारकांना अतिक्रमण विभागाने नोटिसा पाठविण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. दरम्यान, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनाही शेवटची संधी पालिकेने दिली असून, त्यानंतर अनधिकृत बांधकाम काढले नाही तर कारवाईचा इशारा दिला आहे.

महापालिकेला जाहिरात करातून मोठे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मात्र अनधिकृत होर्डिंग आणि बॅनरबाजीमुळे त्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. शहरात परवानगी घेऊन होर्डिंग व बॅनर लावण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पालिकेने जाहिरात कर बुडविणाऱ्या होर्डिंग व बॅनरबाजी विरोधात कारवाईचे अस्र उगारले आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या सूचनेनुसार पालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंगसंदर्भात नुकतेच सर्व्हेक्षण केले आहे. खासगी जागेवर मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य विनापरवाना होर्डिंग उभारण्यात आल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाने हे सर्व होर्डिंग रडारवर घेतले आहेत. या सर्व १५८ होर्डिंगच्या जागामालकांना तसेच होर्डिंग लावणाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. दंडात्मक कारवाईचा इशारा महिनाभरापूर्वीच दिला होता. तातडीने दंड भरून होर्डिंग नियमित केले नाही तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने एबीबी सर्कलवरील मोठ्या होर्डिंगवर कारवाई केली. त्याज सहा ट्रक लोखंड व गर्डर जप्त करण्यात आले. शहरातील नदीकाठावर मध्यवस्तीच्या अनेक ठिकाणी धोकेदायक होर्डिंग उभे असून, त्यांच्यावर तातडीने कारवाईची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेने सरसकट या होर्डिंगवर कारवाईची मोहीम सुरू करणे अपेक्षित आहे. परंतु, केवळ एका होर्डिंगवर कारवाई करून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मात्र कारवाईचे सोपस्कार पार पाडले आहेत.

अभय किती वेळा देणार?

शहरातील खासगी जागेवर अनधिकृतपणे होर्डिंग उभे करून पालिकेचा महसूल बुडवला जातो. त्यामुळे पालिकेने या सर्वांना नोटिसा देऊन कारवाई करण्याचे सोपस्कार अनेकदा पार पाडले आहेत. परंतु, दरवेळेस एखाद्या होर्डिंगवर कारवाई करून इतरांना मात्र अभय दिले जाते. त्यामुळे शुक्रवारी सुरू झालेली कारवाई एका होर्डिंगपुरती न थांबता सर्व होर्डिंगवर करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अनधिकृत बांधकामांनाही इशारा

बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्किंग व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना त्यांची बेकायदेशीर व अतिक्रमित असलेली बांधकामे काढून घेण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहीर आवाहनाव्दारे सूचना दिलेल्या आहेत. ज्या नागरिक, व्यावसायिक व विक्रेत्यांनी त्यांची अतिक्रमणे काढून घेतलेली नाहीत, त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे केलेली असल्यास त्यांनी ती काढून घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images