प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प
महापालिका हद्दीतील पिंपळगाव खांब परिसरातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये येणारे दाढेगाव समस्यांचे आगार बनले असून, अगदी दारातील कचऱ्यापासून रस्त्यापर्यंत व पिण्याच्या पाण्यापासून सार्वजनिक शौयाचालयांपर्यंत असंख्य समस्यांना येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कामे करा अन्यथा आम्हाला महापालिका हद्दीतून वगळा, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.
केवळ नावापुरतेच महापालिकेत असलेले दाढेगाव अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिले आहे. हे गाव आता फक्त मतदानापुरतेच हिशेबात धरले जात असून, कधी कोणताही लोकप्रतिनिधी गावाच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिरकत नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटणाऱ्या महापालिका प्रशासनाला व सार्वजनिक बांधकाम खात्याला गावाकडे पाहायलादेखील वेळ मिळत नसून, या गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेली विकासकामे होण्यासाठी अजून किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. आमच्या गावापेक्षा एखाद्या ग्रामपंचायतीचा विकास जास्त झाला आहे, त्यामुळे एकतर गावाची रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लावा अन्यथा आम्हाला महापालिकेतून वगळा, अशी मागणी गावातील त्रस्त नागरिक करीत आहेत.
--
पुलावर जीवघेणी वाहतूक
या गावामधून वाहणाऱ्या वालदेवी नदीवर काही वर्षांपूर्वी बांधलेला एक पूल आहे. मात्र, त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत या गावाचा संपर्क शहराशी तुटतो. परिणामी गावातून शहराकडे जाण्यासाठी पिंपळगाव खांबमार्गे सुमारे ५ किलोमीटरचा वळसा घालून पाथर्डी फाट्याकडे जावे लागते. मात्र, अनेक जण धोकादायक पद्धतीने वाहत्या पाण्याखाली बुडालेल्या पुलावरून मार्ग काढताना दिसून येतात. गावातील शाळकरी विद्यार्थी व अंबड, सातपूरसारख्या जाणारा कामगारवर्ग यांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या रखडलेल्या पुलाच्या निर्मितीकरिता खासदार हेमंत गोडसे यांनी महापालिकेला गतवर्षी २८ नोव्हेंबर रोजी पुलाची उंची वाढविण्याकामी पत्र दिले आहे. मात्र, प्रशासनाला त्याचा विसर पडला की काय, असा प्रश्न सवाल उपस्थित होत आहे. अनेक नगरसेवक व आमदारांनी या पुलाची उंची वाढविण्यासाठी अनेकदा शुभारंभाचा नारळदेखील फोडला आहे. मात्र, अजूनही या कामाचा प्रारंभ होत नसल्याने परिसातून संताप व्यक्त होत आहे.
मध्यरात्री पाणीपुरवठा
महापालिकेने गावातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, येथे मध्यरात्रीनंतर पाणीपुरवठा केला जात असल्याची स्थिती आहे. मध्यरात्री १२ ते ३ वाजेदरम्यान होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वांनाच जागरण करून पाणी भरावे लागत आहे. येथून अवघ्या १.५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाथर्डी गावात लागेल तितका वेळ पाणीपुरवठा केला जातो. केवळ या गावासाठी रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा होत आहे.
घंटागाडीसाठी फोन
महापालिकेची घंटागाडी येथील कचरा उचलण्यासाठी चक्क १५ ते २० दिवसांनी एकदाच येते. काही नागरिक आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी गाडी पाठवा, असे पालिकेच्या संबंधित ठेकेदाराला फोन करून सांगतात, तेव्हा कुठे गाडी येते आणि कचरा नेते. ठेकेदार म्हणतात दिवसाआड गाडी येते, नागरिक म्हणतात पंधरा-वीस दिवसांतून एकदा गाडीचे दर्शन होते. त्यातही कचरा संपूर्णपणे घेऊन जात नाही. यामुळे गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते.
---
सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था
महापालिकेने साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या गावासाठी महिला व पुरुषांसाठी प्रतेयकी १० असे २० सीटचे सार्वजनिक शौचालय उभारून दिले आहे. त्यात सुरवातीला काही दिवस पाणीपुरवठा होत होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तेथे पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना घरून पाणी घेऊन शौचालयात जावे लागत आहे. २० शौचालयांपैकी केवळ ५ ते ६ शौचालय वापरात आहेत. बाकी सर्व शौचालयांचे दरवाजे, आतील भांडी फुटल्याने ती बंद आहेत.
घंटागाडीसाठी फोन
महापालिकेची घंटागाडी येथील कचरा उचलण्यासाठी चक्क १५ ते २० दिवसांनी एकदाच येते. काही नागरिक आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी गाडी पाठवा, असे पालिकेच्या संबंधित ठेकेदाराला फोन करून सांगतात, तेव्हा कुठे गाडी येते आणि कचरा नेते. ठेकेदार म्हणतात दिवसाआड गाडी येते, नागरिक म्हणतात पंधरा-वीस दिवसांतून एकदा गाडीचे दर्शन होते. त्यातही कचरा संपूर्णपणे घेऊन जात नाही. अशा समस्येमुळे गावात रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते.
नदीवरील बंधारा फुटला
गाव परिसरात अनेकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, येथील बंधारा गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या २ ऑगस्ट रोजी वाहून गेला. येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता जानेवारी महिन्यामध्ये स्वखर्चातून त्यात दगड, माती, ताडपत्री टाकून भराव टाकला होता. मात्र, तोही यावर्षी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना जमिनीसाठी लागणारे पाणी उपलब्ध होणे जिकिरीचे झाले आहे. याकामीदेखील खासदार गोडसे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला कार्यवाहीचे पत्र दिलेले आहे. मात्र, संबंधित विभाग पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.
गटारीचे पाणी नदीत
पालिकेने वालदेवी पात्रातून पंपिंग स्टेशनपर्यंत सिमेंटचे पाइप टाकून शहराच्या अंबड, सिडको भागातून येणारे गटारीचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, महापालिकेच्या सोयीसाठी येथील नदीपात्रातील चेंबरला छिद्र पाडून गटारीचे पाणी नदीपात्रात मिसळण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे गावात दुर्गंधीसह डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील मळे विभाग, शिव रस्ता, पीर बाबा मंदिररोड आदी भागात नागरिकांची शेती असून, या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. मागणी करूनही महापालिका उपाययोजना करीत नसल्याच्या तक्रारी आहेत.
--
आमच्या गावातील समस्या सुटण्याकामी आम्ही महापालिकेसह अनेक विभागांकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत. मात्र, आमच्या समस्या जाणून घ्यायला कोणाकडे वेळच नसल्याची परिस्थिती आहे.
-पंढरीनाथ भोर, नागरिक
--
पावसाळ्यात गावातील पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी व कामगारवर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. यंदाही तशीच स्थिती असून, महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्या समस्या सोडविण्याकामी पुढाकार घ्यावा.
-सागर भालके, नागरिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट