गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, उत्तर महाराष्ट्रातील धुळे यासह राज्यातील अनेक ठिकाणी माहेश्वरी समाजातील कुटुंबांना दरोडा, खंडणी, हत्या व प्राणघातक हल्ला अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. या घटनांमुळे मुळचा शांतताप्रिय व व्यापारी असलेल्या माहेश्वरी (मारवाडी) समाजामध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे. याकडे लक्ष वेधत समाजाला न्याय देण्यासाठी घटनेचे गुन्हे हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी येवला तालुक्यातील माहेश्वरी समाज संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील समाज बांधवांनी येवला तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून तहसीलदारांना एक निवेदन सादर केले. मागील काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथील व्यापारी कैलास जाजू व परिवाराच्या घरावर दरोडा टाकून त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे असलेल्या माहेश्वरी बजाज कुटुंबाकडून खंडणीची मागणी केली गेली आहे तर जालन्यातील अंबड येथील गगराणी परिवारातील तरुणाची हत्या केली गेली. हिंगोली येथील तोष्णीवाल कुटुंबावरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला, याकडे या निवेदनाद्वारे माहेश्वरी समाजबांधवांनी लक्ष वेधले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारे घटना घडू नये यासाठी उपाययोजना कराव्या, असे आवाहनदेखील या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या वेळी येवला तालुका माहेश्वरी समाज संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, दिनेश मुंदडा, नितीन काबरा, नंदकिशोर आट्टल, मनीष काबरा, पुरुषोत्तम काबरा, पुरुषोत्तम राठी, निशांत सोनी, अजय सोमाणी आदींसह शहर व तालुक्यातील माहेश्वरी समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट