म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बालभारतीच्या पन्नास यशस्वी वर्षांचे साक्षीदार असलेल्या पेन्शनर्सला एक हजार रुपये प्रति महिना वाढ आणि दरवर्षी एक डीए, तसेच एक महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अधिक देण्यात येईल. बालभारतीची वैभवशाली परंपरा यशस्वीरित्या पुढे नेत असलेल्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार भेट म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा बालभारतीचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभप्रसंगी व बालभारतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी शनिवारी गुरू गोविंद सिंग कॉलेजमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
तावडे म्हणाले, बालभारतीचे गेल्या चार पाच पिढ्यांमधीले योगदान मोठे आहे. त्यामुळे बालभारतीच्या उपक्रमांची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या बालभारतीची रचना पाहण्यासाठी सहलीच्या माध्यमातून त्यांना न्यायला हवे, असेदेखील त्यांनी सुचवले. बालभारतीच्या किशोर मासिकाच्या डिजिटायझेशन उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच कॉफी टेबल बुक, निफाडमधील वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ‘बालमनोन्मेष’ या हस्तलिखिताचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, वर्षा तावडे, बालभारतीचे संचालक सुनील मगर, गायक स्वप्नील बांदोडकर, गुरू गोविंदसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरूदेवसिंग बिरदी, हरजितसिंग, बलविरसिंग, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जयवंत जाधव आदी उपस्थित होते. विवेक गोसावी यांनी आभार मानले.
डिजिटल कनेक्टिव्हिटीवर भर
१९८० साली ज्ञानरचनावाद जगाने स्वीकारला भारताने मात्र तो २००६ साली स्वीकारला. ज्ञानरचनावादाप्रमाणेच राज्यातील अभ्यासक्रम बदलणे आवश्यक असल्याने शिक्षणपद्धतीत काही बदल होत आहेत. या बदलाने विद्यार्थ्यांना गाइडशिवाय परिक्षेला सामोरे जाणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इ-लर्निंगला प्राधान्य देण्यासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या वर्षभरात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट