Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जनजागृतीसह प्रशिक्षणावर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरिता सुरू असलेल्या २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृतीसह वाहनचालकांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात झाली. अवैध प्रवाशी वाहतुकीवर विशेष कारवाई सुरूवात करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिस दलातर्फे सात मेपर्यंत जिल्ह्यातील ४० पोलिस स्टेशन तसेच आठ उपविभागीय कार्यालयानिहाय रस्ता सुरक्षा अभियान हाती घेण्यात येणार आहे. शहर पोलिस तसेच आरटीओप्रमाणे ग्रामीण पोलिसांचा जनजागृती, मार्गदर्शनावर भर आहे. जनजागृतीच्या टप्प्यानंतर हेल्मेट, सीटबेल्ट तपासणी, अवैध प्रवाशी वाहतूक, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, अवजड वाहने यावर लक्ष केंद्रीत करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर करावाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सर्व नियमांचे पालन करून अपघात आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.

दरम्यान, शहर पोलिस सतत कारवाईबरोबर जनजागृती करतात, असे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले. शहरात जेहान सर्कल येथे दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत जनजागृतीपर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने वाहनचालकांपर्यंत नियमांची माहिती पोहचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१५ दिवसांचा आराखडा

प्रादेशिक परिवहन विभागानेही १५ दिवसांचा आराखडा आखला असून, यात प्रशिक्षण तपासणी शिबिरांसह कारवाईवर जोर देण्यात आला आहे. विभागामार्फत प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रम होणार असून, जनजागृतीसह कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी विनय अहिरे यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विषय समित्या बिनविरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहा प्रभाग समित्यांपाठोपाठ महापालिकेतील चारही विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सभापती व उपसभापतिपदांची निवडही बिनविरोध झाली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी कावेरी घुगे, आरोग्य समितीच्या सभापतिपदी सतीश कुलकर्णी आणि शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदासाठी पूनम सोनवणे यांचा एकमेव अर्ज आला आहे. या समित्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

महापालिकेत महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात असताना भाजपने सत्तेत येताच नव्याने विधी, आरोग्य आणि वैद्यकीय सहाय्य, तसेच शहर सुधारणा या तीन विषय समित्या गठित केल्या होत्या. गेल्या वर्षी जुलै २०१७ मध्ये सदर विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. परंतु, यंदा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडणुकांसोबतच महिला व बालकल्याणसह चारही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदांसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला. त्यामुळे गेल्या वेळच्या पदाधिकाऱ्यांना केवळ नऊ महिन्यांचाच कालावधी मिळाला आहे.

येत्या २६ तारखेला या चारही सभापती व उपसभापतींची निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे पीठासीन अधिकारी राहणार आहेत. मंगळवारी (दि. २४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या समित्यांमध्ये भाजपचे बहुमताएवढे पाच सदस्य आहेत. त्यामुळे भाजपचेच सभापती व उपसभापती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सभापती व उपसभापतिपदांसाठी केवळ भाजपच्याच नगरसेवकांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केलेत. सभापती व उपसभापतिपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली असून, आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

---

यांनी केले अर्ज दाखल

शहर सुधारणा समिती सभापती : पूनम सोनवणे, उपसभापती : अंबादास पगारे

वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती : सतीश कुलकर्णी, उपसभापती : पल्लवी पाटील

महिला व बालकल्याण समिती सभापती : कावेरी घुगे, उपसभापती : सीमा ताजणे,

विधी समिती सभापती : सुनीता पिंगळे, उपसभापती : सुमन सातभाई

(लीड, महापालिका इमारत, निष्पक्षचा लोगो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा प्रचाराचा बिगुल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने दराडेंच्या प्रचाराची तयारीही सुरू केली आहे. दराडेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेतील धुसफूस शांत करण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत हे आज, बुधवारी (दि. २५) नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात पक्षातील मतभेद मिटविण्यासह विधान परिषद निवडणुकीचा बिगुल फुंकला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर केली असून, येत्या २१ मे रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने आघाडी घेत आपला उमेदवार जाहीर केला असून, नरेंद्र दराडेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत धुसफूस होऊन थेट गेल्या वेळेचे उमेदवार शिवाजी सहाणेंची हकालपट्टी पक्षाला करावी लागली होती. सहाणे यांनीही या उमेदवारीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरच आर्थिक तडजोडीचे आरोप केले होते. त्यामुळे शिवसेनेत मोठे वादळ उभे राहिले होते. सोबतच महानगरप्रमुखपदाचेही खांदेपालट झाले आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना बदलण्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी मतदार असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये नाराजी

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी शिवसेनेने भाजपला विश्वासात न घेताच एकतर्फी उमेदवाराची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेला भाजपच्या मदतीची गरज असून, शिवसेनेपाठोपाठ भाजपचे मतदार आहेत. परंतु, शिवसेनेने एकतर्फी उमेदवाराची घोषणा झाल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून, भाजपनेही उमेदवार द्यावा, अशा हालचाली आता पक्षाकडून सुरू झाल्या आहेत. भाजपकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, परवेज कोकणींसह माणिकराव कोकाटेंच्या नावाची चर्चा आहे. शिवाजी सहाणेसुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजपच्या नाराजीचा शिवसेनेला अपशकुन होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीतही दावेदार

दरम्यान, विधान परिषदेचे विद्यमान आमदार जयंत जाधव यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने राष्ट्रवादीने उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. शिक्षण समितीचे माजी सभापती अशोक सावंत यांच्या नावासह संदीप गुळवे यांच्या नावाचीही चर्चा आहे. सोबतच शिवाजी सहाणे भाजपसोबतच राष्ट्रवादीच्याही संपर्कात आहेत. त्यासाठी भाजपच्या निर्णयाची राष्ट्रवादीकडून वाट पाहिली जात आहे.

--

स्ट्रिप : विधान परिषद निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चीनसोबत मैत्रीतूनच विकास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राचीन काळापासून भारत आणि चीन ही दोन राष्ट्रे शेजारी म्हणून नांदत आहेत. या दोन्ही राष्ट्रांना मोठ्या संस्कृतीची पार्श्वभूमी असल्याने जगात त्यांची वेगळी ओळख आहे. दोन्ही राष्ट्रांच्या आपसांतील संबंधांवर आंतरराष्ट्रीय राजकारणातील मोठ्या घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे युरोप खंडातील देश या दोन्ही देशांना वेगवेगळे महत्त्व देतात. पण, मैत्रीचे नाते प्रस्थापित करणे हेच दोन्हीही राष्ट्रांच्या हिताचे आहे. त्यातच दोन्हीही राष्ट्रांचा फायदा आहे, असे मत श्रीरंग कोगेकर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित 'चायना इकॉनॉमी अॅण्ड कल्चर' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कोगेकर हे चीनमध्ये १२ वर्षांपासून वास्तव्यास होते. या वास्तव्यादरम्यान त्यांनी चीनमधील संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती, पर्यटन, तसेच तेथील उद्योग, व्यापार, व्यावसायिकतेचा सखोल अभ्यास केला. अनुभव कथनाद्वारे त्यांनी नागरिकांशी चीनबद्दल सांकृतिक आणि औद्योगिक व्यापारविषयक संवाद साधला.

कोगेकर म्हणाले, की विकासाच्या बाबतीत चीनची धोरणे अतिशय आक्रमक आहेत. देशाचे हित जपण्यासाठी आवश्यक ते कठोर निर्णय घेण्यास हा देश मागे हटत नाही, हे वैशिष्ट्य सांगता येईल. भारतामध्ये सोशल मीडियावर अर्थाचा विपर्यास होऊन अनेकदा जातीय दंगली होतात. तेथे मात्र यासारख्या माध्यमांवर संपूर्णत: बंदी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग विकासाला चीनने गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्राधान्य देऊन देशाचा विकास दर उंचीवर नेऊन ठेवला आहे. चीनच्या प्रगतीचा डंका जगात वाजत असला तरीही आजमितीस चीन कृषिमालासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी भारतावर बहुतांशी अवलंबून आहे. यासारखे अर्थकारण, विकास आणि सांस्कृतिक ऋणानुबंधांचे धागे विचारात घेतल्यास चीनसारख्या देशासोबतचे शत्रूत्व परवडणारे नाही. याउलट मैत्रीतूनच जितका विकास साधता येईल तितके दोन्हीही देशांचे हितच साधले जाईल, असे ते म्हणाले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल, सचिव मनीष चिंधडे, मंथ लीडर सुधीर जोशी, वैशाली रावत आदींसह नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत धर्म मान्यतेस विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिवा संघटनेचा लिंगायत धर्म मान्यतेच्या मागणीला तीव्र विरोध आहे. या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चात सामील होऊ नये, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे. माहेश्वरी बालाजी मंदिर मंगल कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वीरशैव आणि लिंगायत हे समान अर्थी शब्द आहेत. मूळ प्राचीन शब्द हा वीरशैव असून बोलीभाषेतील प्रचलीत शब्द लिंगायत असा आहे. त्यामुळे वीरशैव आणि लिंगायत हे वेगवेगळे होऊ शकत नाहीत. मात्र, सध्या कर्नाटकातील काही धर्मगुरू राज्यकर्त्यांच्य हातचे खेळणे बनून शब्दछल व बुद्धीभेद करून वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे असल्याचे सांगत लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळविण्याच्या गोंडस नावाखाली आमच्या धर्मात फूट पाडून वीरशैव-लिंगायत धर्माचा सात हजार वर्षांचा प्राचीन इतिहास पुसून काढण्याचे षडयंत्र करीत आहेत. त्यामुळे शिवा संघटनेला लिंगायत धर्म मान्यता मान्य नाही. लिंगायत धर्माच्या महामोर्चात कोणीही सामील होऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वीरशैव धर्म (संस्कृती) ही अत्यंत प्राचीन आहे. कालांतराने लिंगायत हे त्याचे पर्यायवाचक व प्रचलीत नाव रुढ झाले आहे. त्याचा गैरफायदा घेऊन शब्दछल व बुध्दीभेद करीत १२ व्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा वेगळा धर्म असल्याचे सांगून त्याचा वीरशैव धर्माशी संबंध नाही असे चुकीचे सांगत आमच्या धर्माचा प्राचीन इतिहास पुसून काढून समाजात फूट पाडण्याचे कटकारस्थान चालू आहे. लिंगायत धर्म मान्यतेसाठीच मोर्चे काढले जात आहेत. हे समाजाने समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शब्दछल व बुद्धीभेद करून समाजात फूट पाडण्याचे कटकारस्थान करणाऱ्यांना संधी मिळू नये म्हणूनच आम्ही वीरशैव-लिंगायत धर्म असे नाव एकत्रित मान्य करीत असल्याचे प्रा. धोंडे यांनी सांगितले. यावेळी पंडिताराध्य शिवाचार्य वडांगळीकर महाराज, शिवा संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस रुपेश होतराव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल कोठुळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक वादातून प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चेक न वटल्याच्या कारणावरून पाठलाग करुन दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. २३) रात्री चाडेगाव फाटा येथे घडली. या हल्ल्यात कोटमगाव येथील चंद्रभान शिवाजी घुगे गंभीर तर चंद्रकांत सुकदेव धात्रक (रा. हिंगणवेढे) किरकोळ जखमी झाले आहेत.

या प्रकरणी चंद्रभान घुगे यांनी फिर्याद दिली. घुगे आणि त्यांचा मावसभाऊ चंद्रकांत धात्रक हे दोघेजण सोमवारी सायंकाळनंतर सिन्नर फाटा सामनगाव रस्त्याने त्याच्या इनोव्हा कारने (एमएच १५ जीएफ २००७) कोटमगावच्या दिशेने जात होते. चाडेगाव फाटा येथे पांढऱ्या कारमधून संशयित आरोपी आले. भगवान धात्रक, हिरामण धात्रक, अक्षय धात्रक व त्यांचा एक जोडीदार अशा चौघांनी कार आडवी उभी करीत चेक न वटल्याचे कारण सांगून घुगे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. धात्रक यांनी घुगे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तर हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी केले. हल्ल्यात डोक्यात वार झाल्याने घुगे हे गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी इनोव्हा कारचीही तोडफोड केली आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लाखलगाव रस्त्याने पोबारा केला. हल्ल्यात घुगे यांचे साडेचार हजार रुपयेही गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्यातील हल्लेखोर उमराळे येथील आहेत. हल्लेखोरांचा नाशिकरोड पोलिसांकडून शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलत्या ऋतुचक्राचे शेतकऱ्यांपुढे आव्हान

$
0
0

कृषितज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जे शेतीवर बोलतात, ते शेती करत नाहीत, आणि जे शेती करतात ते बोलत नाही हे आजचे चित्र आहे. जगाचा पोशिंदा आज विवंचनेत आहे. अन्न हे प्रयोगशाळेत तयार होत नाही. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना ऋतुचक्रातील अनाकलनीय बदलांना तोंड देत सात्विक अन्न निर्माण करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य व कृषितज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे झालेल्या कृषी विस्तार सेवा प्रदाता प्रशिक्षणाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. सुमारे महिनाभर चाललेल्या कृषी विस्तार सेवा प्रदाता प्रशिक्षणाचा समारोप आणि आडगांवच्या पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित कृत्रिम रेतन सेवा दाता प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ प्रा. देसरडा तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

कृषी विस्ताराबाबत सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या या कार्यशाळेत ग्रामीण भागातील युवा शेतकरी सहभागी झाले. प्रा. देसरडा यांनी ढासळत्या जागतिक पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त करीत शेतकऱ्यांना बदलत्या ऋतुचक्रामुळे आव्हानात्मक बनलेली काळाची पावले ओळखावी. कोणत्याही गोष्टीचा विनाश न करता होतो त्यालाच विकास म्हणतात. रसायनांच्या बेसुमार वापरामुळे निकस आणि पार्थिव बनत चाललेल्या शेतजमिनीला पुन्हा कसदार बनवणे आणि त्यातून विषमुक्त शेती करणे हे तरुण शेतकऱ्यांपुढील आव्हान आहे, असेही ते म्हणाले. प्रा. रावसाहेब पाटील म्हणाले, की युवा शेतकऱ्यांनी आता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषिसेवादूत बनावे आणि महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध करावा. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देताना नैसर्गिक साधनांचा योग्य नियंत्रित वापर करायला शिकले पाहिजे.

कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, संजीवन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. संपतराव पाटील, मंगेश व्यवहारे, प्रा. परदेशी आदी उपस्थित होते. कृषी विस्तारचे विशेषज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी प्रास्ताविक केले. उद्यान विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. पशुसंवर्धनाचे विशेषज्ञ डॉ. शाम पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत मजूर जखमी

$
0
0

दुचाकीच्या धडकेत मजूर जखमी

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्ग पायी ओलांडणाऱ्या मजुरास दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना सिन्नर फाटा परिसरातील योगायोग वाहन बाजार येथे घडली. या अपघातात जगन्नाथ अभिमान मोरे (वय ३५, मूळ रा. आचळगाव, जि. जळगाव, सध्या रा. मोहदरी) हा डांबरकाम करणार मजूर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

----

(लोगो म. टा. इम्पॅक्ट)

दुभाजकातील झाडांना पाणी

जेलरोड : बिटको ते जेलरोडदरम्यान दुभाजकांत असलेल्या झाडांना पाणी मिळत नसल्याने ती कोमेजू लागली होती. याबाबतचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेचा उद्यान विभाग जागा झाला. नुकतेच या झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात आले. बिटको ते जेलरोडदरम्यानच्या दुभाजकांतील झाडे सुकू लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या झाडांना नियमितपणे पाणी देण्याची मागणी होत आहे.

--

विहितगाव येथे कोंडी

देवळाली कॅम्प : लग्नाच्या दाट तिथीमुळे मंगळवारी विहितगाव परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. येथील हांडोरे चौक येथून वडनेररोडवरील विविध लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

---

'वारली'वर कार्यशाळा (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड येथील ऋतुरंग परिवार आणि वारली आर्ट फाउंडेशनतर्फे सोमवारी (दि. ३०) आणि मंगळवारी (दि.१) वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. विजय संकलेचा व संतोष जोशी यांनी ही माहिती दिली. दत्त मंदिर चौकातील ऋतुरंग भवनमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेत अभ्यासक संजय देवधर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत बेसिक कोर्स होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत अॅडव्हान्स कोर्समध्ये कापड व पॉटवर वारली चित्रे कशी रंगवायची याचे मार्गदर्शन केले जाईल.

---

सर्वाधिक वाचलेली बातमी :

नाणार : शिवसेना एक पाऊल मागे

नाणार प्रकल्पाबाबत काढलेल्या अधिसूचनेवर मुख्यमंत्री ठाम असून ही अधिसूचना रद्द करण्यासाठी अखेर शिवसेनेला मुख्यमंत्र्यांकडे विनंती करावी लागली आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आचारसंहिता भंगाचे दडपण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्तांनी नाशिककरांवर लादलेल्या करवाढीचा बोजा उतरविण्यासाठी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या समस्त नगरपित्यांना आता मात्र आचारसंहिता भंगाची भीती वाटू लागली आहे. करवाढ रद्दचा प्रस्ताव तयार केल्यानंतर मंगळवारी दिवसभर नेतेमंडळी भीतीच्या छायेखाली वावरताना दिसून आली.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्तावित केलेल्या करवाढीस सर्वच स्तरातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. या करवाढी विरोधात राजकीय पक्षांसह नाशिककरांनी सोमवारी राजीव गांधी भवनबाहेर जोरदार निदर्शने केली. महासभेतही करवाढीचा मुद्दा चांगलाच गाजला. तब्बल १० तास सुरू असलेल्या महासभेत करवाढ रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. परंतु हा ठरावच आता अडचणीत आणतो की काय अशी भीती महापालिकेतील समस्त नेत्यांना वाटू लागली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही महासभा होती. महासभेत घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे पत्र जिल्हाधिकारी प्रशासनाने महापालिकेला दिले होते. महासभेमध्ये मतदारांवर प्रभाव पडेल असा कुठलाही निर्णय घेऊ नये असे कटाक्षाने या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या सभेमध्ये करवाढ रद्दचा ठराव करण्यात आला. परंतु यामुळे मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधींपुढील अडचणी वाढल्या आहेत. करवाढ रद्दच्या ठरावाचा निर्णय आचारसंहिता भंगमध्ये बसतो की नाही हे पाहण्यासाठी मंगळवारी दिवसभर लोकप्रतिनिधींची धावाधाव सुरू होती. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली जात होती. आचारसंहितेमधील तरतुदी समजून घेण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरू होता. हा ठराव अंतिम करण्यात आला तर तो आचारसंहिता भंग ठरण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या अडचणी वाढू शकतात अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'म. टा.' शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, हा प्रस्ताव स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाने नकार दिल्याची आवई उठविण्यात आल्याने गोंधळाच्या परिस्थितीत अधिकच भर पडली आहे.

प्रशासनाचे 'आयुक्त बचाव'

ही करवाढ आचारसंहितेच्या काळात झाली असल्याने हा आचारसंहितेचा भंग असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यावर आयुक्त तुकाराम मुंढे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ही चाल खेळली जात असल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. एकीकडे आयुक्त करवाढ मागे घेण्यास तयार नाहीत. दुसरीकडे नगरसेवकांनी व आमदारांनीही याला विरोध दर्शविल्याने मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करून या वादावर पडदा टाकावा लागणार आहे.

जनतेच्या भावना लक्षात घेऊन विशेष महासभेने करवाढीचा ठराव रद्द केलेला नाही तर स्थगित ठेवण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे हा ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार आहे.

रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने तरुणास गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवित भामट्यांनी सिडकोतील एका तरुणाकडून पावणे दोन लाख रुपये उकळले. या प्रकरणी भूषण गोटीराम राऊत (रा. नंदनवन चौक, सिडको) यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

भूषण राऊत यांना ५ डिसेंबर २०१७ रोजी भामट्यांनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून संपर्क साधला. एचडीएफसी बँकेत मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असून, तुम्हालाही तेथे नोकरी मिळू शकण्याचे आमिष दाखविण्यात आले. दोन-तीन दिवस सातत्याने संपर्कात राहून संशयितांनी राऊत यांचा विश्वास संपादन केला. नोकरी हवी असेल तर थोडे पैसे देण्याची तयारी ठेवा, असे त्यांना सांगितले. एसबीआय बँकेचा खातेक्रमांकही त्यांना देण्यात आला. या खात्यामध्ये राऊत यांनी १,७३,४५५ रुपये भरले. अनेक दिवस उलटूनही नोकरी न मिळाल्याने राऊत यांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. उपनिरीक्षक घुगे तपास करीत आहेत.

-

दिंडोरीरोडवर मोबाइल दुकान फोडले

नाशिक : दिंडोरी रोडवरील किशोर सूर्यवंशी मार्गालगतचे मोबाइल दुकान फोडून चोरट्यांनी ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. मेघराज रमेश भोसले (रा. हिरावाडी) यांनी फिर्याद दिली आहे. भोसले यांचे स्काय एजन्सी नावाचे मोबाइल विक्री आणि दुरूस्तीचे दुकान आहे. सोमवारी, रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून गल्ल्यातील दोन हजार रुपयांची रोकड आणि महागडे मोबाइल असा ४९,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

-

वृद्धेला मारहाण

नाशिक : दारू सेवनासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. ही घटना गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीतील डी. के. नगरमध्ये घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन संशयितांना अटक केली आहे. छोटू गोमाजी पहाडे (वय २५) व खंडू हिरालाल खरे (वय ४५, रा. डी. के. नगर) अशी संशयितांची नावे आहेत. डी. के. नगर येथील नायर गॅरेजसमोर राहणाऱ्या लिलाबाई रामकृष्ण मालखेडे (वय ६०) या सोमवारी, रात्री नऊच्या सुमारास घराच्या ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी संशयित छोटू पहाडे याने शिवीगाळ करीत त्यांच्याकडे दारू सेवनासाठी पैशांची मागणी केली. लिलाबाई यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. याचवेळी आलेल्या खंडू खरे या साथीदारासह पहाडे याने वृद्धेला बेदम मारहाण केली.

-

तरुणावर चाकू हल्ला

नाशिक : रस्त्याने चाललेल्या तरुणावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. कस्तूरबानगर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बाळकृष्ण साळवे (रा. सावळे मळा, मखमलाबाद) व रूतीक रामदास गायकवाड (रा. कस्तूरबा नगर) अशी चाकू हल्ला करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. साळवे याला पोलिसांनी अटक केली आहे. होलाराम कॉलनीतील बॉबी राजू वर्मा (२०) हा युवक मंगळवारी, (दि. २४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास कस्तुरबानगर येथील दत्ता वाघ यांच्या घरासमोरून पायी चालला असताना संशयितांनी त्याला अडविले. 'भावास दम का देतो', अशी विचारणा करून किरकोळ कारणातून त्याच्या पायावर धारदार चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

-

जाळपोळ प्रकरणी माजी चेअरमन गजाआड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोसायटीतील एका रहिवाशाच्या मोटरसायकलची जाळपोळ केल्याप्रकरणी सोसायटीच्या एका माजी चेअरमनला अंबड पोलिसांनी अटक केली. सावतानगर येथील खांडेनगरमध्ये हा प्रकार घडला.

जयप्रकाश भास्कर तोरवणे (वय ४२, रा. सदाशिव रेसिडेन्सी, लासुरे हॉस्पिटलसमोर खांडेनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. कैलास विष्णू जवांदे (रा. सदाशिव रेसिडेन्सी, खांडेनगर सावतानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. संशयित आणि आरोपी एकाच सोसायटीतील रहिवासी आहेत. संशयित तोरवणे हा सोसायटीचा माजी चेअरमन आहे. जवांदे यांची स्प्लेंडर मोटरसायकल सोमवारी रात्री पार्किंगमध्ये लावली असताना संशयिताने ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिल्याची तक्रार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून हा प्रकार घडल्याची जवांदे यांची तक्रार आहे.

-

अपघातात मोटरसायकलस्वार ठार

नाशिक : भरधाव मोटारसायकल दुभाजकावर आदळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. इंडियन टुल्सकडून महिंद्रा सर्कलकडे जाताना औद्योगिक वसाहत कर्मचारी कॉलनीजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी मोटारसायकल चालविणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील शनीशिंगणापूर येथील तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. विशाल प्रकाश प्रधान (वय १८ रा. संतोषी मातानगर,सातपुर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल व संशयित प्रतीक विष्णू गायकवाड हे दोघे मित्र सोमवारी, रात्री साडे दहाच्या सुमारास इंडियन टूल्स कारखान्याकडून मायको सर्कलच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत होते. औद्योगिक कर्मचारी वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ एप्रिल जागतीक हिवताप दिनानिमित्ताने जनजागृती मोहिम सातपूर

$
0
0

थोडक्यात

हिवताप दिनानिमित्त

सातपूरला जनजागृती

सातपूर : महापालिकेच्या सातपूर विभागाच्या वतिने जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून नागरिकांना हिवताप विषयी आजाराचे पत्रके वाटण्यात आली. तसेच डेंग्यू आजाराबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून उन्हाळ्यात पाणी साठवतांना काय काळजी घ्यावी याबाबत मलेरिया विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती देणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त दिवस पाण्याचा साठा करून ठेवू नये असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड पेखळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकाची मनमाडला आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहरातील विवेकानंदनगरमधील रहिवासी आणि जिल्हा परिषदेच्या मेसेन खेडे खुर्द (ता. चांदवड) येथील शाळेचे मुख्याध्यापक मुकुंददास शोभावत (वय ५४) यांनी सरकारच्या ऑनलाइन कामांना वैतागून बुधवारी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सरकारने शिक्षकांना दिलेल्या ऑनलाइन कामाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी लिहून शोभावत यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून गेल्या वर्षापासून कार्यभार सांभाळणारे शोभावत हे बुधवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती भरून केंद्र सरकारकडे मुदतीत पाठवण्याचे आदेश संस्था, शाळा मुख्याध्यापक यांना देण्यात आले होते. वार्षिक निकालाच्या कामासह हे काम शिक्षक करीत आहेत. शोभावत यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. या चिठ्ठीत ऑनलाइन व बांधकाम कामांचा ताण आल्याने कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शोभावत यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘न्यूड’मध्ये झळकणार नाशिकची कल्याणी

$
0
0

मटा विशेष

prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : बहुचर्चित मराठी चित्रपट 'न्यूड' उद्या, शुक्रवारी प्रदर्शित होणार असून, यात नाशिकची अभिनेत्री कल्याणी मुळे प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आर्ट फिल्ममध्ये काम करणारी ती नाशिकची एकमेव कलाकार ठरली आहे. प्रारंभापासून चर्चेत असलेला हा चित्रपट

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूचनेनुसार इफ्फीमधून (आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) वगळण्यात आल्याने गदारोळ उडाला होता.

गोव्याला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'इप्फी'च्या 'इंडियन पॅनारोमा सेक्शन'च्या १३ परीक्षकांनी २६ चित्रपटांमधून 'न्यूड'ची निवड केली होती. त्यामुळे या चित्रपट महोत्सवाच्या ओपनिंगचा मान 'न्यूड'ला मिळाला होता. मात्र केवळ चित्रपटाच्या शीर्षकामुळे तो नाकारण्यात आल्याच्या चर्चाही झडल्या होत्या. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत असून, यात न्यूड मॉडलिंग करणाऱ्या महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष चितारण्यात आला आहे. मुख्य भूमिकेत नाशिकची अभिनेत्री कल्याणी मुळे असल्याने नाशिककरांना चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.

कल्याणी मुळे ही मुळात नाट्य कलाकार असल्याने अनेक नाटकांमधून तिने काम केलेले आहे. अतिशय ताकदीचे 'अनसीन' शीर्षकाचे नाटक कल्याणी हिने केले असून, त्याचे इंग्रजीत आलेले परीक्षण वाचून रवी जाधवने या चित्रपटासाठी कल्याणीची निवड केली. नाशिकमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत हिरे यांच्यासोबत नाटकांमध्ये काम सुरू असतानाच कल्याणीला एनएसडीला (राष्ट्रीय नाट्य विद्यालय) जाण्याची संधी मिळाली होती. दिल्लीला गेल्यानंतर कठोर मेहनत घेऊन कल्याणीने स्वत:ला सिद्ध केले. अनेक हिंदी मराठी नाटकातून काम, मालिका तसेच अनेक जाहिरातींमधूनही ती झळकली आहे. 'न्यूड' चित्रपटात तिने 'यमुना' या मॉडेलची भूमिका साकारली आहे. त्यासाठी 'न्यूड' मॉडेल्सशी प्रत्यक्ष संवाद, कार्यशाळा याची तिला मदत झाली. 'न्यूड' हा आई आणि मुलाच्या नात्याचा चित्रपट असून, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई मनावर दगड ठेवून काय करू शकते, याचा प्रत्यय या चित्रपटातून येईल.

वेगळी व आव्हानात्मक भूमिका असल्याने 'न्यूड'ला चित्रपटाला होकार दिला. भूमिकेच्या अभ्यासासाठी पुस्तके वाचली, माहितीपट, लघुपट पाहिले. जे. जे. महाविद्यालयातील दोन मॉडेलशी चर्चा केली आणि यमुना साकारली.

- कल्याणी मुळे, अभिनेत्री

चित्रपटाची उत्सुकता

'नटरंग', 'बालगंधर्व', 'बालक पालक' असे सुपरडुपर हिट चित्रपट रवी जाधवने प्रेक्षकांना दिले आहेत. त्यामुळे 'न्यूड'विषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. स्वत: रवी जे. जे. स्कूल ऑफ अ‍ॅप्लाइड आर्टचा विद्यार्थी असल्याने 'न्यूड' मॉडेलविषयी त्याच्या मनात अनेक वर्षांपासून कुतूहल होते. ते या चित्रपटाच्या रुपाने पहायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉक विथ कमिशनर’ आता शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वॉक विथ कमिशनर या उपक्रमाअंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवार (दि. २८) रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक येथे सकाळी साडेसहा वाजता महानगरपालिका अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आयुक्त थेट सुसंवाद साधून नागरिकांच्या तक्रारी, सूचना जाणून घेणार आहेत व त्यावर उचित कार्यवाही करण्याबाबत प्रशासनास सूचना देणार आहेत. महापालिकेच्या वतीने 'वॉक विश कमिशनर' या उपक्रमाअंतर्गत जे नागरिक आपल्या तक्रारी, सूचना, संकल्पना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करू इच्छित आहेत, त्यांनी त्या साध्या कागदावर लेखी स्वरुपात उपक्रमस्थळी संबंधित विभागीय कार्यालय प्रतिनिधींकडे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजेपासून उपस्थित असणाऱ्या महानगरपालिका विभागीय कार्यालय प्रतिनिधीकडून टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

 बाल स्वास्थ्य योजना ठरली संजीवनी

$
0
0

लोगो- वर्षभरानंतर

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात १ एप्रिल २०१३ पासून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षी जिल्ह्यातील तब्बल १२ लाख २२ हजार ४२७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७५० बालकांवर किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ही योजना जिल्ह्यातील बालकांसाठी नवसंजीवनीच ठरली आहे. यापैकी १४५ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया तर उर्वरित ६०५ बालकांवर इतर आजारांशी संबंधित शस्त्रक्रियांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षीही जिल्ह्यातील ७२० विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

एप्रिल २०१३ पासून अंगणवाडी व शालेय मुलांच्या आरोग्य संवर्धन व विकासासाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करणे व आजारांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. वय वर्षे ० ते १८ या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी व त्यांच्या आजारांवर या योजनेतून मोफत उपचार केले जातात. जिल्ह्यात या योजनेद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आतापर्यंत ७५० विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. आणखी १२३ विद्यार्थ्यांवर हृदयशस्त्रक्रिया होणे बाकी आहे. यातील बहुतांश बालके आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी कुटुंबांतील आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्ह्यात सध्या ७५ पथके कार्यरत असून, प्रत्येक पथकात एक-एक पुरुष व महिला वैद्यकिय अधिकारी असे एकूण १५० वैद्यकीय अधिकारी, ७५ औषध निर्माता व ७५ परिचारिका अशा ३०० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. जन्मतःच व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासास विलंब व इतर आजार यांचे निदान व उपचार केले जातात.

अशी होते अंमलबजावणी

प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जातो. ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते त्यांच्यावर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ७५० विद्यार्थ्यांवर या योजनेतून शस्त्रक्रिया झाली.

 - डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेची प्रगती (२०१७-१८)

शाळा प्रकार- विद्यार्थी- तपासणी केलेले- हृदयरोग आढळलेले- हृदय शस्त्रक्रिया झालेले - किरकोळ व गंभीर शस्त्रक्रिया झालेले - एकूण शस्त्रक्रिया

अंगणवाडी- ४,८८,७११- ४,४७,३६५- १३२-८३-१९५-२७८

शाळा- ७,९५,११७- ७,७५,०६२-१३६-६२-४१०-४७२

एकूण- १२,८३,८२८- १२,२२,४२७- २६८-१४५-६०५-७५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरा मिळकतधारकांनी भरले पैसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने घरपट्टी थकलेल्या पन्नास मिळकतधारकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचे बुधवारी लिलाव आयोजित केले होते. यातील अकरा मिळकतधारकांनी आपल्याकडील थकबाकी भरल्याने त्यांच्या मालमत्ता परत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेने घरपट्टी वसुलीचे कडक धोरण स्वीकारले असून, ज्या मिळकत धारकांच्या अनेक वर्षांपासून थकबाकी आहे, अशा मिळकती जप्त करण्यात आल्या होत्या. या पन्नास मिळकतींचे लिलाव बुधवारी दादासाहेब गायकवाड सभागृह येथे होणार होते. सकाळपासून याची प्रकिया सुरू करण्यात आली. मात्र, यातील यशोधन हेल्थकेअर, के अँड एफ. के. कोकणी, नेम गुलामगेस कोकणी, आदमसो, महमदसो मंहमंद रफिक, निरामय फार्मास्युटिकल्स, मायक्रो मेकर्स, विशाल देशमुख, अभिजीत देशमुख, अरविंद पोतनीस, काशिनाथ जाधव, हीना शेरजाद शारुख यांनी आपल्याकडे असलेली थकबाकी भरून मालमत्तांचा होणारा लिलाव टाळला आहे. यानिमित्ताने मनपाला लाखो रुपयांची थकबाकी प्राप्त झाली आहे. उर्वरित ३९ थकबाकीदारांच्या लिलाव प्रक्रियेत कोणाकडूनही बोली न आल्याने त्या मिळकतींचा लिलाव तहकूब करण्यात आला आहे. या मिळकतींच्या लिलावाची तारीख जाहीर करून पुन्हा नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रेत्यांचा मनपास ठेंगा!

$
0
0

हॉकर्स झोनकडे जाण्यास नकार; जुन्याच जागी व्यवसायास पसंती

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेला कोर्टाने दिलेल्या आदेशावरून शहरात ठिकठिकाणी हॉकर्स झोनची उभारणी करण्यात आली. सातपूर परिसरातही मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यात आले. मात्र, या हॉकर्स झोनकडे विक्रेत्यांनी पाठ फिरवित महापालिकेला ठेंगा दाखविला आहे.

सातपूर परिसरात काही ठराविक ठिकाणीच विक्रेत्यांनी हॉकर्स झोनच्या ठरवून दिलेल्या जागेवर व्यवसाय करीत आहेत. तर ८० टक्के विक्रेत्यांनी जुन्याच जागेवर व्यवसाय करीत आहेत. हॉकर्स झोनची उभारणी करताना नको त्याठिकाणी जागा दिल्याचा आरोप विक्रेत्यांकडून नेहमीच केला जातो. या हॉकर्स झोनमध्ये महापालिकेने बदल करावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली.

शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने सर्वे करत हॉकर्स झोनची उभारणी केली होती. सातपूर भागातही मुख्य रस्त्यांच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोनची जागा निश्चित केली. विक्रेत्यांना देण्यात आलेल्या जागेवर ग्राहकच येत नसल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे. यामुळे पुन्हा जुन्याच जागी जाऊन विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. हॉकर्स झोनची जागा देताना ती किमान व्यवसाय करणे सोपे होऊ शकेल अशा ठिकाणी देणे तरी अपेक्षित होते. तशी न दिल्याने ग्राहक येत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

स्थानिक रहिवाशी त्रस्त

सातपूर गावात अनेकदा शिवाजी मंडईच्या पार्किंगमधील अतिक्रमणे महापालिकेने हटविली. यानंतर व्यवसाय करणाऱ्यांना मंडईत जागा देण्यात आली. त्याठिकाणी विक्रेत्यांनी जाणे टाळल्याने पुन्हा मंडईच्या बाहेर पार्किंगच्याच जागेत व्यवसाय सुरू झाल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांचे सायंकाळी रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याने स्थानिक सातपूरवासीयांना घराकडे जाणे अवघड होते. यावर महापालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे मत सातपूरवासीयांनी व्यक्त केले आहे.

सातपूर गावात प्रवेश करताना अतिक्रमणांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने अनेकदा अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली. परंतु, पुन्हा काही दिवसात त्याच ठिकाणी विक्रेते व्यवसाय करतात. याप्रश्नी महापालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे.

- सोपान बंदावणे, स्थानिक रहिवाशी, सातपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लिंबू मिरची आंदोलन

$
0
0

'आप' कडून कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये खडे आणि रत्न देणाऱ्या मात्रिकांचा वावर वाढला असून, त्यामुळे शहराची आणि वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलिन होते आहे. या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गळ्यात लिंबू मिरची बांधून अनोखे आंदोलन केले. यापुढे असे प्रकार घडू नयेत याकरीता जिल्हा रुग्णालयात कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडे केली.

गळ्यात लिंबू आणि मिरचीच्या माळा अडकवून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दाखल झाले. 'आता रोगावर इलाज, लिंबू मिरची','कशासाठी हवी औषधोपचारावर खर्ची, 'हरले डॉक्टर हरले विज्ञान जिंकला मांत्रिक कधी होणार सज्ञान', अशी घोषवाक्य असलेले फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते. रुग्णालयात मांत्रिकांना बंदी घालावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनातील अधिकारी डॉ. होले यांच्याकडे करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांनी घडलेला प्रकार चुकीचाच असल्याची कबुली देत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

रुग्णालयात वैद्यकीय आणि वैद्यकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असून, त्यामुळे कर्मचारी आणि डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण येतो. येथे तातडीने भरती प्रक्रिया राबवून रिक्त जागा भराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आरोग्य क्षेत्रात जगाला हेवा वाटेल, असे काम करत असताना पुरोगामी महाराष्ट्रात सरकारी अनास्थेमुळे आरोग्य क्षेत्रच 'आयसीयू'मध्ये असल्याबाबत आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. राज्याला आरोग्यमंत्री आहे की नाही, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. सरकारी आरोग्य व्यवस्था संपवून खासगी कॉर्पोरेट लोकांच्या हातात पूर्ण राज्याची आरोग्य व्यवस्था देण्याचा राज्यकर्त्यांचा घाट आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. आंदोलनात जितेंद्र भावे, जगबीर सिंग, गिरीश उगले, नितीन शुक्ल, विकास पाटील, पद्माकर अहिरे, राजेश जाधव, रफिक शेख, विनायक येवले, संतोष राऊत, अश्विनी चोमल, प्रमोदीनी चव्हाण आणि एकनाथ सावळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासिका जुनी; देखभाल कमी

$
0
0

मटा मालिका : परीक्षा अभ्यासिकांची

प्रेरणा अभ्यासिका

अधिकारी घडविणाऱ्या अभ्यासिकेकडे तरुणांचा ओढा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य आणि देशाच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी घडविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा ठरणारी प्रेरणा अभ्यासिका शहरातील जुन्या अभ्यासिकांपैकी एक आहे. प. सा. नाट्यगृहासमोार नेहरू उद्यानाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या प्रेरणा मंडळाच्या या इमारतीने सत्तरच्या दशकांपासून स्पर्धा परीक्षार्थींना अभ्यासाच प्रेरणा दिली आहे. कर्तृत्व सिद्ध केलेल्या परीक्षार्थींचे लाभणारे मार्गदर्शन ही या अभ्यासिकेची जमेची बाजू असली तरीही देखभालीचा अभाव सहन करतच परीक्षार्थी वर्षानुवर्षे येथे अभ्यास करत असल्याचे चित्र आहे.

प्रेरणा अभ्यासिकेच्या या इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतानाच नजरेला पडणारा कचरा, अस्वच्छ स्वच्छतागृह आणि अभ्यासिकेच्या अंगणातील कोपऱ्यांमध्ये कोळ्यांनी विणलेले जाळे नव्या उमेदवाराला कोड्यात टाकते. अंधारलेल्या जिन्यातून चाचपडत अभ्यासिकेच्या अभ्यास कक्षात पोहचल्यानंतरचे वातावरण जरा दिलासा देणारे आहे. जागोजागी असलेल्या कचऱ्याचा मुद्दा वगळल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी असली तरीही येथे त्यांच्या नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र जाणवते. अभ्यासिकेच्या बाहेरील रस्ता प्रमुख वर्दळीचा असल्याने या परिसरात बाहेरून गोंगाट जाणवतो. पण अभ्यासिकेच्या आतील वातावरण शांततापूर्ण आहे.

जुन्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन प्रेरक

अभ्यासिकेची स्थापना १९९२ मध्ये झाली. अभ्यासिकेचे औपचारिक उद्घाटन १९९७ मध्ये झाले. प्रेरणा अभ्यासिकेने राज्य आणि देशाला आजवर असंख्य अधिकारी, डॉक्टर्, इंजीनिअर्स, प्राध्यापक दिले. उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमधून बहुतांश विद्यार्थी काही असुविधांकडे दुर्लक्ष करून प्रेरणा अभ्यासिकेला प्राधान्य देतात. या अभ्यासिकेतून यशस्वीपणे बाहेर पडलेले विविध खात्यातील अधिकारी नव्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने मार्गदर्शन करतात. अभ्यास साहित्याच्या उपलब्धतेपासून तर वैयक्तिक संवाद साधण्यापर्यंत या अधिकारी वर्गाचे पाठबळ येथील विद्यार्थ्यांना मिळत असल्याने जिल्हा व उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी या अभ्यासिकेची निवड करताना दिसत आहेत.

अभ्यासिकेचे ४७२ विद्यार्थी अधिकारी म्हणून सेवेत

प्रेरणामध्ये अभ्यास करून आजवर सुमारे ४७२ विद्यार्थी अधिकारी शासनाच्या विविध विभागात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देत आहेत. प्राधान्याने कष्टकरी कामगार वर्ग आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले या अभ्यासिकेचा लाभ घेतात. सध्या सुमारे ३६ विद्यार्थी तेथे नियमित अभ्यास करत आहेत. या अभ्यासिकेतील विद्यार्थी खासगी क्लास लावल्याशिवाय गटचर्चांमधून अभ्यासाची तयारी करतात.

अभ्यासिकांसमोर आव्हाने

अभ्यासिका चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. हे पूर्णत: सामाजिक काम असून यातून कुठलाही नफा नसल्याने उपलब्ध साधनात अभ्यासिकेचा मेंटेनन्स ठेवणे आव्हानात्मक झाले आहे, असे प्रेरणा अभ्यासिकेचे संस्थापक व संचालक राजेंद्र बागूल यांनी सांगितले. अभ्यासिका सामाजिक उद्देशाने असली तरीही वीज बिलासही कमर्शिअल दर लागू होतात. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने बाहेरील लोकांच्या त्रासासह अनेक आव्हानांना आजवर अभ्यासिका समोर गेली आहे. सुविधापूर्ण खोल्या आणि अभ्यासास पोषक वातावरण यामध्ये तडजोड नाही. म्हणूनच आजवर येथून शेकडो नामवंत अधिकारी घडू शकले आहेत. शासनानेही अभ्यासिकांच्या आव्हानांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी बागूल यांनी केली आहे.

ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नाशिकमध्ये आलो. तीन वर्षांपासून प्रेरणा अभ्यासिकेचा सदस्य आहे. अभ्यासास पोषक असे वातावरण आणि उपलब्ध सुविधांमुळे लवकरच माझ्या उद्दिष्टापर्यंत मी पोहोचेल.

- दशरथ झनकर, अभ्यासिका विद्यार्थी

एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी चार वर्षांपासून प्रेरणा परिवाराचा सदस्य बनलो. अनुकूल वातावरणामुळे मला ही अभ्यासिका बदलण्याची गरज कधी वाटली नाही. जुन्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि सोबतच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य यामुळे प्रेरणा परिवाराची साथ प्रेरक ठरते.

- तुषार कानकाटे, अभ्यासिका विद्यार्थी

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल

$
0
0

आरोपीला फाशी देण्याची सरकारी वकिलांकडून मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर एमआयडीसीलगत कार्बन नाका परिसरातील दुहेरी हत्याकांडाची बहुचर्चित घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. समाजमनावरही अशा घटनांचा विपरीत परिणाम होत असल्याने आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद बुधवारी सरकारी पक्षाकडून जिल्हा न्यायालयात करण्यात आला. या खटल्याचा निकाल गुरुवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता सुनावण्यात येणार आहे.

कार्बन नाका परिसरातील कचरू संसारे हे आपल्या कुटुंबीयांसह आरोपी रामदास शिंदे याच्या घरातील एका खोलीत पोटभाडेकरू म्हणून रहात होते. एप्रिल २०१६ च्या दुसऱ्या पंधरवड्यात ते पत्नी, मुलगा आणि तीन मुलींसह नगर जिल्ह्यातील राहुरी जवळच्या आपल्या मुळगावी गेले. मुलींना गावी ठेऊन १७ एप्रिल २०१६ रोजी पत्नी पल्लवी (वय ३२) आणि मुलगा विशाल (वय ६) यांसह सातपूरला परतले. कचरू संसारे रात्रपाळीसाठी कामावर गेले. घरात पल्लवी आणि विशालच होता. मध्यरात्री रामदास मागील दरवाजा उघडून घरात आला. त्याने पल्लवी यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. पल्लवी यांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर चाकूने वार केले. या झटापटीमुळे विशाल जागा झाला. त्याच्यावरही वार करण्यात आले. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर दरवाजाला कुलूप लावून आरोपी पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी संसारे कामावरून परतले तेव्हा ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

या खटल्यामध्ये एकही प्रत्यक्षदर्शी नसताना पोलिस आरोपी शिंदे याच्यापर्यंत पोहोचले. घटनेनंतर लावलेल्या कुलूपाची चावी, रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना तपासादरम्यान मिळून आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे याला दोषी ठरविण्यात आले होते. बुधवारी त्याला शिक्षा सुनावण्यात होणार होती. त्यासाठीच्या युक्तीवादाला सुरुवात झाली. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. एक निर्बल महिला आणि तिच्या निरागस बालकावर अत्यंत निर्दयीपणे वार करणे ही दुर्मिळ घटना आहे. प्रत्यक्षदर्शी पुरावा राहू नये याच हेतूने बालकाचाही खून करण्यात आला. त्यामुळे अत्यंत थंड डोक्याने केलेला हा गुन्हा असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हा सरकारी वकील अजय मिसार यांनी केली.

स्पेक्ट्रोग्राफी अहवालामुळे निकालाकडे लक्ष

घटनेनंतर आरोपीने त्याच्या मित्राला फोन केला. या फोनचा एकमेव धागा पकडून पोलिसांनी हत्याकांडाचा तपास केला. सरकारी पक्षाने आरोपीने फोनवर दिलेली कबुली महत्त्वाची मानली. मोबाइलवरील आवाज आणि आरोपीचा आवाज एकच असल्याची बाब स्पेक्ट्रोग्राफी अहवालात समोर आली. स्पेक्ट्रोग्राफीच्या आधारावर निकालावर आलेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये आरोपीला काय शिक्षा होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images