Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लांडग्यांच्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

देवपूर शिवारात मंगळवारी रात्री मेंढ्यांच्या कळपावर चार ते पाच लांडग्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार तर सहा मेंढ्या जखमी झाल्या. देवपूर येथील राजेंद्र रामनाथ गडाख यांच्या शेतात ही घटना घडली. वावी येथील दत्तू जाधव यांच्याकडे मेंढ्या आहेत. या मेंढ्यांच्या चारापाण्याच्या शोधात ते चार-पाच महिन्यांपासून देवपूर परिसरात होते. मंगळवारी रात्री देवपूर शिवारात कळप मुक्कामी होता. रात्री जाधव शेजारील घराकडे गेले असता दबा धरून बसलेल्या लांडग्यांनी आठ मेंढ्या ठार केल्या. तर सहा मेंढ्यांचे लचके तोडले. पशुवैद्यकीय अधिकारी मिलींद भनगे यांनी पंचनामा केला. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पी. बी. सोनवणे, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, सरपंच गडाख, ग्रामसेवक आदींनी घटनास्थळी भेट दिली. साधारण शंभर ते दीडशे मेंढ्यांचा कळप असल्याने पंधरा एक मेंढ्या लांडग्यांच्या भितीमुळे कळप सोडून फरदापूर, देवपूर शिवारात पळून गेल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेडिकलमध्ये २७ टक्के आरक्षण द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र केंद्रीय वैद्यकीय समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या १५ टक्के राखीव जागांमधील केवळ दोन टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून डावलण्याचे शासनाचे अन्यायकारक धोरण यापुढे सहन केले जाणार नाही. राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींना त्यांच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भुजबळांनी म्हटले आहे की, शासनाकडून मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण बेकायदेशीररित्या कमी केल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची आकडेवारी लक्षात घेता ओबीसींना राष्ट्रीय कोट्यात एक टक्काही आरक्षण देण्यात आलेले नाही. राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांत ओबीसींना आरक्षणच देण्यात आले नाही. तर मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील वैद्यकीय संस्थांमध्ये राष्ट्रीय कोटा ठेवण्यात आलेला नाही.

देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी ६३,८३५ जागांमधून १५ टक्के जागा राष्ट्रीय स्तरावर आरक्षित ठेवण्यात आलेल्या होत्या. देशातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयात केंद्राच्या १५ टक्के आरक्षणानुसार एकंदर ३ हजार ७११ जागा आहेत. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार १००२ जागा आरक्षित असायला पाहीजे. परंतु केवळ ७४ जागा नावापुरत्या ओबीसींना आरक्षित करून देण्यात आल्या आहेत. ही टक्केवारीही केवळ १.८५ टक्के एवढीच आहे. त्या खालोखाल ५५५ जागा एससी व २७७ जागा एसटीला त्यांच्या आरक्षणानुसार आरक्षित ठेवलेल्या आहेत. खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी २,८११ जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनारक्षित जागांची टक्केवारी ७५.७४ टक्के एवढी आहे, असे भुजबळांनी निदर्शनास आणुन दिले आहे.

मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी २७ टक्के, एससी १५ टक्के व एसटी ७.५ टक्के, असे घटनात्मक आरक्षण आहे. परंतु आरक्षणाचे सर्व निकष, सुचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून केंद्रिय मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त ७४ जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. ओबीसींच्या वाट्याच्या ९२८ जागांसह एकुण २८११ जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे भुजबळांचे म्हणणे आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे २७ टक्के आरक्षण देवून महाराष्ट्रासह देशातील केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणाच्या १००२ जागांवर त्यांना प्रवेश देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग दिनाचा मुख्य कार्यक्रम केटीएचएमच्या मैदानावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयुष मंत्रालयाने नाशिक शहरात आयोजित केलेला आतंरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ७ वाजता मराठा शिक्षण प्रसारक समाज संचलित केटीएचएम कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. बी. गीते, मराठा शिक्षण प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, वैशाली झनकर, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक भगवान गवई, मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणाधिकारी संजय शिंदे व सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा मुख्य कार्यक्रम केटीएचएम कॉलेजच्या प्रांगणात होणार असून, एकाच वेळी सर्व शासकीय कार्यालये, तालुका क्रीडा संकुले, योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्था यात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजा प्रकरणी दोघांना जळगावातून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्यांवरील कारवाईचे सत्र सुरूच असून नाशिक पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून दोघांना अटक केली आहे. सुरेश रामसिंग बेलदार आणि सुखदेव शहादेव पवार (दोघे रा. पारोळा, जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

न्यायालयाने दोघा संशयितांना शुक्रवारपर्यंत (दि. २२) पोलिस कोठडी सूनावली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी गांजा बाळगल्याप्रकरणी अनेकांवर कारवाया केल्या आहेत. १२ जून रोजी ६७१ किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर सिन्नर येथूनही ३९० किलो गांजा ताब्यात घेण्यात आला. राज्यभर गांजा पुरविणाऱ्या अकबर सरवल खान (रा. जयपोर, ओडिशा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकमध्ये एका महिलेने दोन व्यक्तींच्या मदतीने गांजा मागविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांत ४२ कोटींची कामे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्तपदाचा भार घेतल्यापासून गेल्या चार महिन्यांत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ४२ कोटी ५७ लाखांची विविध विकासकामे मार्गी लावल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. त्यात रस्ते खडीकरण, डांबरीकरण, स्वच्छतागृहे बांधणे व दुरुस्ती अशा ४३ कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे आयुक्त मुंढे येण्यापूर्वीचीच असून, मुंढे यांनी केवळ त्या कामांना गती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे जुन्या कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नांवरून सत्ताधाऱ्यांकडून त्यांना जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.

मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून केवळ निलंबन, बरखास्तीच्या कारवायांचीच चर्चा सुरू आहे. मुंढे यांच्याकडून विविध विकासकामांचाही आढावा घेतला जात असला तरी, पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कारवाईनेच सध्या पालिकेचा कारभार गाजत आहे. मुंढे यांनी प्रलंबित कामांवर जोर दिला असून, दर आठवड्याला बैठका घेऊन ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विशेषत: बांधकाम विभागाच्या वतीने बऱ्याच कालावधीपासून कामे प्रलंबित ठेवण्यात आली होती. आयुक्तांनी या कामांना चालना देऊन ती चार महिन्यांत मार्गी लावल्याचा दावा केला आहे. त्यात बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले रस्त्यांचे अस्तरीकरण करणे, रस्ते काँक्रिटीकरण अशी सुमारे २८ कोटींची १९ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. डीपी रस्त्याच्या साइडपट्ट्यांना पेव्हर ब्लॉक बसविणे, सार्वजनिक शौचालयांची बांधणी व दुरुस्ती, विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे वॉटरप्रुफिंग, खुल्या जागेस चॅनलिंग फेन्सिंग, पावसाळी गटारी, जॉगिंग ट्रॅक तयार करणे, मनपा शाळा दुरुस्ती, मनपाच्या मोकळ्या जागेत ग्रीन जिम व्यायाम साहित्य बसवणे, गोविंदनगर येथे क्रीडांगण अशी १४ कोटींची २४ कामे केली आहेत. एकूण ४२ कोटी रुपयांची ४३ कामे नाशिक बांधकाम विभागाच्या वतीने कामे पूर्ण करण्यात आली आहेत. विविध सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या तक्रारी कमी होऊन समाधान व्यक्त केले जात असल्याचा दावा मुंढे यांच्याकडून करण्यात आला आहे.

ही कामे जुनीच

मुंढे यांनी बांधकाम विभागाच्या वतीने ४२ कोटींची कामे चार महिन्यांत मार्गी लावण्याचा दावा केला असला तरी, या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश जुनेच आहेत. मुंढे यांनी बैठकांचा जोर लावत ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे प्रयत्न केले आहेत. यातील अनेक कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणे आवश्यक होते. ठेकेदारांकडूनही वेळेत कामे करून घेण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. मात्र, विरोधकांनी मुंढे यांच्या दाव्यास विरोध केला आहे. आयुक्तांनी या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा दावा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केला आहे. यावरून महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती संचालकांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती, तीन संचालकांसह सचिवावर सरकारी वाहनाचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि संचालकांनी मंगळवारी (दि. ५) बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज आटोपून पिंपळगाव येथील १०० एकर जागेत असलेल्या बाजार समितीला भेट पाहणी दौरा करण्याचे नियोजन केले. यामध्ये सभापती शिवाजी चुंभळे हे आपल्या खासगी वाहनाने काही संचालकांना घेऊन तर उपसभापती संजय तुंगार यांनी संचालक दिलीप थेटे, रवींद्र भोये, युवराज कोठुळे तसेच बाजार समिती सचिव अरुण काळे यांना आपल्यासोबत घेत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे वाहनामध्ये (एमएच १५-ईएक्स ३७९५) बसून पिंपळगावकडे प्रस्थान केले. पिंपळगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन बाहेर फोटोसेशन करून पुन्हा त्याच वाहनात बसून बाजार समितीच्या १०० एकर जागेत बांधलेल्या विविध कामकाजांची पाहणी केली. दीड-दोन तासांच्या पाहणी दौऱ्यानंतर पुन्हा सभापती, उपसभापती, संचालक मंडळाने वाहनात बसून नाशिककडे प्रस्थान केले होते.

सध्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी सरकारी वाहनांचा वापर न करता ही वाहने कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. असे असताना बाजार समितीच्या उपसभापती व अन्य संचालकांनी बाजार समितीच्या वाहनाचा सर्रासपणे वापर करून आचारसंहितेचा भंग केला. याची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी माने यांनी गुरुवारी (दि. १४) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना कारवाईचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीचे चार दिवस कोरडेच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 'ड्राय डे' घोषित केला आहे. या आदेशांमुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत तळीरामांची पंचाईत होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडून आतापासूनच मद्याचा पुरेसा साठा करून 'गैरसोय' टाळण्याची 'सोय' केली जात असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या २५ जून रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या कारणास्तव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये नाशिक जिल्ह्यात 'ड्राय डे'बाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशांनुसार प्रत्यक्ष मतदान संपण्यापूर्वी ४८ तास म्हणजेच दि. २३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून आणि मतदानाच्या आधीचा दिवस म्हणजेच दि. २४ जून, मतदानाच्या दिवशी दि. २५ जून रोजी मतदान संपेपर्यंत व दि. २८ जून रोजी मतमोजणी संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे वरील आदेश जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती, देशी/विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्ती सीएल-३, सीएलएफएलटीओडी-३, एफएल-२, एफएल-३, एफएल-४, एफएल/बीआर-२, ताडी नीरा, एफएलडब्ल्यू-२, नमुना ई आणि नमुना ई-२ या प्रकारातील सर्व अनुज्ञप्तींना लागू असणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे नियम ५४ १ (सी) नुसार कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यात मद्यविक्रीच्या सुमारे ८५० अनुज्ञप्ती असून, या सर्वांना या आदेशांचे पालन करावे लागणार आहे.

मद्यसाठ्यावर भर

शिक्षक मतदार संघ निवडणुकीमुळे चार दिवस जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार असल्याने जिल्ह्यातील तळीरांमांची पंचाईत होणार आहे. मात्र, यातून दिलासा मिळण्यासाठी बहुतेकांनी ड्राय डेपूर्वीच मद्य खरेदी करून पुरेसा साठा करण्यावर भर दिला आहे. आज आणि उद्या मद्य विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ड्राय डेबाबतचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जिल्ह्यातील सर्व प्रकारचे मद्यविक्री परवाने चार दिवस बंद ठेवले जाणार आहेत.

- चरणसिंग राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसे, महाजन, जैन सारखेच!

$
0
0

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा जळगावात आरोप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मी कुणासाठीही काम करीत नसून भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे. आमदार खडसेंवर जेवढा राग आहे तेवढाच तो मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावरही आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी (दि. २०) जळगावला केला.

माझ्यासाठी हे सर्व सारखेच असल्याचा आरोपही दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. बांधकाम व्यावसायिक खटोड यांनी एका मोठ्या गटाचे प्लॉट पाडून ते साधना महाजन, रोहिणी खडसे व नातेवाइकांना दिल्याचा आरोपाचा पुनरूच्चार त्यांनी केला. आमदार खडसेंनी माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असून, मी त्यासाठी जळगावात आले आहे, असे त्यांनी सांगत हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे आव्हानही बोलताना दिले.

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयामार्फत अंजली दमानिया, गजानन मालपुरे यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यासंदर्भात जबाब देण्यासाठी अंजली दमानिया यांनी बुधवारी जळगावात आल्या होत्या. या दौऱ्यात पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दमानियांनी आमदार खडसेंवरील बेहिशेबी संपत्ती, भोसरी जमीन प्रकरण, बेन्चमार्क कंपनीकडून खात्यात वर्ग झालेले पैसे यासंदर्भातील आरोपांचा पुनरूच्चार केला.

ज्या डीडीसंदर्भात आमदार खडसेंनी गुन्हा दाखल करायला लावला, मुळात त्याची माहिती त्यांना आधीच कशी मिळाली. खडसेंविरुद्ध आम्ही मुंबई येथे ११०० पानांची जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांनी त्या ठिकाणीच का नाही धाव घेतली, असा सवालही दमानियांनी उपस्थित केला. मुक्ताईनगर न्यायालयामार्फत १५६ (३) प्रमाणे आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. खडसेंकडून माझा छळवाद सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. हायकोर्टात हे डी. डी. मी दाखल केले. तेव्हाच त्यांच्या कॉपी खडसेंना मिळाल्या होत्या. मात्र, त्यांनी नंतर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी हे षडयंत्र रचले. मुक्तार्इनगर कोर्टाचीदेखील त्यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार खडसेंनी पत्रकार परिषदेत एका मंत्र्याचा उल्लेख केला होता. पण, मी कुणा मंत्र्याची प्यादी नाही. मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेश जैन हे सगळे राजकारणी सारखेच आणि भ्रष्टाचारी असल्याचा आरोपही त्यांनी शेवटी केला.

...तर न्यायलयीन लढा द्या
आमदार एकनाथ खडसे यांची शक्ती हिरावली गेल्यामुळे ते माझ्यावर खोटेनाटे आरोप करीत आहेत. मी स्वत: जबाब देण्यासाठी जळगावात आले आहे. मी चोरी केली असेल तर मला अटक करून दाखवा, आमदार खडसे मर्द असतील तर त्यांनी न्यायालयीन लढा लढून दाखवा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. खोटी केस दाखल केल्याप्रकरणात खडसेंवर कारवाई करा, असे दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच आमदार खडसेंविरुद्ध विधानसभेच्या सभापतींकडेदेखील तक्रार करणार असून, त्याचे आमदारपद निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचे दमानिया म्हणाल्या.

मुख्यमंत्री फडणवीस खडसेंना घाबरतात म्हणून क्लीन चीट?

भोसरी जमिनीच्या खरेदी प्रकरणात लाखो रुपयांच्या रकमा या आमदार खडसेंच्या खात्यातून मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे पुरावे आहेत. असे असतानाही आमदार खडसेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून क्लीन चीट मिळालीच कशी? मुख्यमंत्री खडसेंना घाबरतात की काय? असे प्रश्‍नही दमानिया यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

सध्या भारतीय जनता पक्षाची विकेट पडल्याने जळगाव जिल्हा व मुक्तार्इनगरातील लोक नाराज होऊ नये म्हणून क्लीन चीट दिली असावी, असाही आरोप त्यांनी केला. आमदार खडसे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यासाठी मुक्तार्इनगरचे पोलिस निरीक्षक कडलग जबाब घेण्यासाठी मुंबर्इत आले होते. त्यांना मी जळगावात येऊन जबाब देते असे सांगितले होते त्यानुसार मी आले. आता पोलिस अधीक्षक कार्यालयात जात असून, मी गुन्हेगार असेल तर त्यांनी मला अटक करावी. अन्यथा तपास करून खोटा गुन्हा असल्यास खडसेंवर कारवार्इची हिंमत दाखवावी, असेही त्यांनी सांगितले.

दहा भुजबळ व दहा खडसेंना पुरून उरणार
आमदार खडसेंकडून माझा सातत्याने छळ सुरू आहे. आता खडसे आणि भुजबळ ओबीसींसाठी एकत्र येणार आहेत. पणे ते त्यांच्यासाठी एकत्र येत नाही, असेही दमानिया यांनी सांगितले. तसेच असे दहा भुजबळ आणि दहा खडसे आले तरी त्यांना पुरून उरणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या वेळी पत्रकार परिषदेस शिवसेनेचे गजानन मालपुरे, रोशनी राऊत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आधुनिक औषधशास्त्र’साठी प्रवेश

$
0
0

होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांना होणार लाभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी 'आधुनिक औषधशास्त्र' (मॉडर्न फार्माकोलॉजी) या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाचा फायदा राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांना होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराची महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियमाअंतर्गत महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे नोंदणी असणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता उमेदवारास विद्यापीठाकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे.

महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेने दिलेल्या निर्णयानुसार प्रथम ४० हजार क्रमांकाच्या नोंदणी केलेल्या होमिओपॅथी वैद्यक व्यवसायिकांसाठी शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करीता प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक उमेदवाराने अर्जामध्ये प्रसंतीक्रमासाठी किमान एक व जास्तीत जास्त २४ कॉलेजेसचे प्राधान्यक्रम देणे बंधनकारक आहे. एकदा दिलेल्या पसंतीक्रमात नंतर बदल करता येणार नाही. महाराष्ट्र होमिओपॅथी व्यवसायी परिषदेकडे असणारी व्यवसाय नोंदणीची सेवा जेष्ठता क्रमांक प्रवेशासाठी गुणवत्ता म्हणून विचारात घेण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर कुठलीही गुणवत्ता विचारात घेतली जाणार नाही. सद्यस्थितीत राज्यातील २४ कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नवीन कॉलेज संलग्नित झाले अथवा प्रवेश क्षमतेत वाढ झाल्यास पात्र उमेदवारांकडून किंवा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रमाचे अर्ज मागविण्यात येतील.

येथे करा अर्ज

विद्यापीठाच्या muhs.ac.in या वेबसाइटवर 'आधुनिक औषधशास्त्र प्रवेशसंबंधी आवष्यक माहितीपत्रक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वेबसाइटवरील माहितीपत्रकात विहित नमुना अर्ज, प्रवेश प्रक्रिया शुल्क, अटी व शर्ती आदी बाबींची तपशीलवार माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या कॉलेजेसमध्ये सुविधा

राज्यात विविध मेडिकल कॉलेजांमध्ये अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये गव्हर्नर्मेंट मेडिकल कॉलेज (मुंबई), राजीव गांधी मेडिकल कॉलेज (ठाणे), बी. के. एल. वाळवलकर मेडिकल कॉलेज (चिपळूण), बी. जे. मेडिकल कॉलेज (पुणे ),महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च मेडिकल कॉलेज (पुणे), शासकीय मेडिकल कॉलेज (मिरज), व्ही. एम. शासकीय मेडिकल कॉलेज (सोलापूर), आश्विनी रुरल मेडिकल कॉलेज (सोलापूर), राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेज (कोल्हापूर), प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च (इस्लामपूर), एस. बी. एच. मेडिकल कॉलेज (धुळे), डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज (जळगाव), एस. एम. बी. टी. मेडिकल कॉलेज (नाशिक), शासकीय मेडिकल कॉलेज (औरंगाबाद ), शासकीय मेडिकल कॉलेज (नांदेड), स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय मेडिकल कॉलेज (आंबेजोगई), महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च मेडिकल कॉलेज (लातूर), शासकीय मेडिकल कॉलेज (लातूर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च मेडिकल कॉलेज (जालना), शासकीय मेडिकल कॉलेज (नागपूर), इंदिरा गांधी शासकीय मेडिकल कॉलेज (नागपूर), डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती मेडिकल कॉलेज (अमरावती), वसंतराव नाईक शासकीय मेडिकल कॉलेज (यवतमाळ) आणि शासकीय मेडिकल कॉलेज (अकोला) येथे सदर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धवट रस्ताकामाने कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणादरम्यान पळसे गावाजवळ उभारण्यात आलेल्या पुलाखालील रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून पावसाच्या पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पुलाखालील अर्धवट रस्ताकामामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे.

महामार्ग रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. या कामादरम्यान पळसे गावाजवळील नाल्यावर पूल उभारण्यात आला. या पुलाखालून येण्या-जाण्यासाठी महामार्गाच्या कडेला सर्व्हिसरोडचेही काम करण्यात आलेले आहे. मात्र, पुलाखालील रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या पुलाखालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बाभळेश्वर आणि पळसे गावातील शिवारातून पळसे गावात येणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुलाखालूनच महामार्ग ओलांडावा लागतो. परंतु, महामार्गाचे काम केलेल्या चेतक एंटरप्रायझेस या ठेकेदार कंपनीने या पुलाखालील रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने या भागातील शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी जीव धोक्यात घालून या पुलाखालील रस्ता ओलांडण्याची वेळ आली. यातील काही विद्यार्थी लहान असल्याने त्यांना अक्षरशः कमरेइतका गाळ व पाण्यातून मार्ग काढावा लागला.

ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष

पळसे गावाजवळील पुलाखालील रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले होते. मात्र, चेतक एंटरप्रायझेस या ठेकेदार कंपनीने या पुलाखालील रस्त्याचे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पहिल्याच पावसानंतर या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल झाले. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी पळसे चौफुलीवरून महामार्ग ओलांडत शाळा गाठली. या चौफुलीवर आतापर्यंत अनेकदा अपघात झालेले असून, काही नागरिकांचा हकनाक बळीही गेलेला आहे.

--

महामार्ग रुंदीकरणादरम्यान येथील पुलाखालून महामार्ग ओलांडता यावा यासाठी सर्व्हिसरोड तयार करण्यात आले आहेत. मात्र, या पुलाखालील रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने पूर्ण केलेले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून येथून प्रवास करण्याची वेळ आली.

-संजय डहाळे, नागरिक

------------

(लीड... फोटो आहे. गरज पडल्यास समस्येच्या फोटोटी चौकट वापरणे.)

----

पर्यावरणपूरक पिशव्यांचे आठवडेबाजारात वाटप

पंचवटी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने बुधवारच्या आठवडेबाजारात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले. बाजारात भाजीपाला नेण्यास याच पिशव्यांचा वापर करण्याविषयी सांगितले. मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, शहर उपाध्यक्ष राहुल क्षीरसागर, शहर सचिव मोनिष पारेख, राहुल घोडे, सचिन दप्तरे आदी उपस्थित होते.

---

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेने हटवले अनधिकृत बांधकाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील हकीम नगर नवी वस्ती भागातील अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई येथील महानगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने केली. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले.

शहरातील इक्बाल अह. अन्सारी यांनी २०१२ मध्ये उच्च न्यायालयात हकीमनगर येथील सर्वे न १६० बाबत याचिका दाखल केली होती. त्यानुसार ४९ मिळकत धारकांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा त्यांनी केला होता. याबाबत न्यायालयात याबाबत वेळोवेळी सुनावणी झाल्या. यात ४९ पैकी ८ मिळकत धारकांनी बांधकाम परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. सदर आठ अनधिकृत बांधकाम पालिकेकडून हटविण्यात आले. तर उर्वरित ४१ मिळकत धारकांना परवानगी नसलेले बांधकाम स्वतःहून काढण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान कर उपायुक्त राजू खैरनार, किशोर गिडगे, संजय जाधव, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक दीपक हदगे, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे आदींसह पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण पथक येथे दाखल झाले होते. मिळकतधारकांकडून काही काळ विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र पथकाने समजूत काढत न्यायालयीन आदेशानुसार कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले. दुपार नंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई पूर्ण केली. येत्या २२ जून रोजी सुनावणी दरम्यान पालिका कारवाईचा अहवाल न्यायालयापुढे सादर करणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमोहित करून युवकाला गंडविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या युवकाला संमोहित करून त्याच्याकडील ४५ हजार रुपये आणि मोबाइल दोघांनी लंपास केला. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी त्र्यंबक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इलेक्ट्रानीक वस्तूंच्या दुकानात काम करणारा भिमा भास्कर दिवे हा युवक दुकानाचे 45 हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी गुरुवारी येथील स्टेट बँकेत आला होता. बँकेत गर्दी होती. त्याने काऊंटर पलीकडे उभ्या असलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्याकडे ४५ हजार रुपये भरण्यासाठी दिले. मात्र त्याच वेळी कॅशियर आणि भरणा करत असलेला अन्य एक नागरिक यांच्यात वाद झाला. त्यामुळे संबंधित बँक कर्मचाऱ्याने भिमाकडे ४५ हजार परत केले. या घटनेकडे पाठीमागे उभ्या असलेल्या दोन व्यक्तींनी पाहिले. त्यानंतर त्यांनी भिमाकडे रूमालात बांधलेले पुडके देऊन हे दोन लाख रूपये आहेत. आम्हाला बँकेची स्लीप भरून दे, अशी विनंती केली. भिमाने खाते क्रमांक विचारला असता त्यांनी भिमाचा मोबाइल घेतला. मोबाइलवर ते काही बोलले नाहीत. त्यानंतर त्यांनी तो परत केला. इतक्यात दोघांपैकी एकाने भिमाच्या गळ्यात हात घातला. त्यानंतर भिमाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला पुढे काय झाले याबाबत काहीच समजले नाही. तो त्या दोघांसह बँकेच्या बाहेर जवळपास एक कि.मी. अंतरावर असलेल्या गजानन महाराज चौक, जव्हाररोडपर्यंत पायी चालत आला. तेथे त्या दोघांनी त्याच्याकडे मोबाइल आणि पैसे मागितले असता त्याने पंचेचाळीस हजार आणि मोबाइल त्यांना दिला. तेथून ते दोघे निघून गेले. तेव्हा भिमाने जवळच्या पिशवीत असलेले रुमालात बांधलेले दोन लाखांचे पुडके उघडून पाहिले असता त्यात घड्या घातलेले कागद होते. भानावर आलेल्या भिमाने तेथे चौकशी केली असता काळी पिवळी वाहन चालकांनी ते दोघे नसून तीन जण होते होते आणि त्यांच्यात वाद सुरू होता असे सांगितले. दरम्यान पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे घटनास्थळासह सर्वत्र शोध घेतला मात्र कोणीही आढळले नाही. दरम्यान बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या भामट्यांचा शोध तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरीशंद्र चव्हाण यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची मुंबई येथे राजभवनात येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील पाणी प्रश्नांशी संबंधित विविध योजनांवर चर्चा करुन त्या त्वरीत सुटाव्या, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या भेटीत खासदार चव्हाण यांनी दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे फेर नियोजन करुन सदर पाणी हे तुटीच्या पालखेड धरण समूहात वळविणेबाबत संबंधिताना त्वरित सूचना द्याव्यात, गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक राज्य जल आराखडयात केलेली तरतूद वगळण्यात यावी व किमान लघु पाटबंधारे प्रकल्प घेण्यास निर्बंध घालू नयेत, अशी मागणी केली.

दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत चालू आहे. एकदरे गाव पेठ तालुक्यातील दमणगंगा नदीवर आहे. एकदरेला लागून कादवा खोरे (पालखेड धरण समुह) आहे. त्यातील वाघाड हे धरण एकदरे धरणाच्या जवळ आहे. त्यामुळे एकदरे धरणाचे पाणी वाघाड धरणात आणणे अगदी सोयीचे आहे. त्यानंतर हे पाणी वाघाड ते करंजवण आणि नंतर करंजवण ते ओझरखेड असे प्रवाही बोगद्याद्वारे पाणी पालखेड समूहात आणता येईल. पालखेड समूहाची सिंचन क्षमता ७० हजार हेक्टर आहे. पालखेड धरण समूह हे तुटीचे खोरे आहे. यातील धरणे दरवर्षी भरत नाहीत. सदर तूट भरुन काढण्यासाठी वरीलप्रमाणे योजना केल्यास दिंडोरी, निफाड, चांदवड, नांदगांव, येवला व अवर्षणप्रवण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, असे सांगितले.

जल आराखडयाची तरतूद वगळा

तर गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक राज्य जल आराखडयात केलेली तरतूद वगळण्यात यावी व किमान लघु पाटबंधारे प्रकल्प घेण्यास निर्बंध घालू नयेत, अशी मागणी केली. गोदावरी खोऱ्यात एकात्मिक राज्य जल आराखडा अंतिम करण्यात येते असल्याचे समजते. सदर आराखड्यातील पृष्ठ क्रमांक २७३ वर उल्लेख केल्यानुसार जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात नवीन पाण्याचे साठे निर्माण करण्यात येऊ नयेत. जायकवाडी धरण भरण्याच्या प्रक्रियेस खीळ बसू नये. तसेच ज्या प्रकल्पांचे लाभक्षेत्र १ हेक्टर ते २ हजार हेक्टर क्षमता आहे. अशा सिंचन क्षमता आहे, अशा सर्व योजना हाती घेऊ नयेत असे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात आता एकही जलसाठा निर्माण होणार नाही व या भागात पाण्याचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मोठा जनक्षोभ या भागात उसळू शकतो. यासाठी सदर जल आराखडयातून वर उल्लेख केलेली तरतूद वगळण्यात यावी व किमान लघु पाटबंधारे प्रकल्प घेण्यास निर्बंध चालू नयेत, अशी विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवनातील झोपड्या हटविल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित असलेल्या तपोवनातील औरंगाबाद रोडलगतच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण वाढले होते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी (दि.२१) येथे झोपड्या उभारणाऱ्यांना काढून घेण्यास सांगितले. त्यानुसार अतिक्रमणधारकांनी झोपड्या काढून घेण्यास सुरुवात केली. बांबू आणि ताडपत्र्यांच्या साह्याने उभारलेल्या झोपड्या स्वतःहून काढून घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. झोपड्या हटविल्या असल्या तरी येथील लोक उघड्यावर साहित्य ठेवून सायंकाळपर्यंत त्याच जागेवर बसून होते.

शहर परिसरातील अतिक्रमण निर्मूलन करण्यात येत असताना महापालिकेच्या जागेवर तपोवनात झोपड्यांचे अतिक्रमण वाढत होते. जडीबुटी विकणारे, म्हशी, उंट आदी प्राणी पाळणाऱ्या लोकांनी येथे मोठी वस्ती केली होती. या झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना तसेच येथे वारंवार अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जात असताना पुन्हा झोपड्या उभ्या राहत होत्या. या झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला पिटाळून लावण्याचा प्रकारही याअगोदर घडला होता. त्यामुळे गुरुवारी अतिक्रमण काढण्यासाठी जाताना महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त मागविला होता.

सकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्याअगोदरच झोपड्या काढून घेण्यास सांगण्यात आल्यानंतर झोपड्यांच्या ताडपत्र्या, प्लास्टिक कागद काढून घेण्यास सुरुवात केली. दुपारनंतर पालिकेने येथील अतिक्रमित झोपड्या हटविण्यास सुरुवात केली.

पथकाला शिवीगाळ

दुपारी येथील काही नागरिकांनी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत दगडफेक केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी त्या नागरिकांना रोखले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून झोपड्या काढून घेतल्या. निवाऱ्यासाठी उभारलेले सर्व पाल, झोपड्या काढल्यानंतर महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक तेथून निघून गेले. झोपड्या काढल्या असल्या तरी आपले साहित्य तेथेच उघड्यावर ठेऊन सर्व तेथेच बसून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या योगाचार्याचा दिल्ली दरबारी सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योग विद्या धाम नाशिक व द योग इन्स्टिट्यूट, मुंबईचे योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांना केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान पुरस्कार जाहीर जाहीर झाला आहे. योग पदोन्नती व विकासासाठी उल्लेखनीय योगदानाबद्दल २०१८ साठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. सरकारकडे आलेल्या १८६ नामांकनांमधून मंडलिक यांची निवड करण्यात आली आहे. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि २५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून २०१६ रोजी चंदीगड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योग उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, योगाच्या पदोन्नती आणि विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना, संस्थाना हा पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. आयुष मंत्रालयाने पुरस्कारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली. कागदपत्रांची सत्यता आणि पुरस्काराची निवड यासाठी दोन समित्या स्थापन केल्या. यामुळे पुरस्कारार्थींची निवड पारदर्शी पद्धतीने केली जाते. खुल्या जाहिरातीद्वारे या पुरसकारासाठी अर्ज मागवण्यात आले/

आयुष मंत्रालयाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १८६ अर्जांमधून मंडलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अतिरिक्त प्रधान सचिव, परराष्ट्र सचिव, सचिव (आयुष), डॉ एच.आर. नागेंद्र, ओ.पी. तिवारी आणि डॉ. बी. एन. गंगाधर यांनी सदस्य म्हणून या समितीत काम पाहिले. संस्था आणि व्यक्ती यांच्या योगदानाचे विश्लेषण करून २०१८ या वर्षाचा पुरस्कार विश्वास मंडलिक (वैयक्तिक श्रेणी - राष्ट्रीय) आणि योग संस्था, मुंबई (श्रेणी संघटनेत - राष्ट्रीय) यांना देण्यात आला आहे.

५५ वर्षांची तपश्चर्या

विश्वास मंडलिक हे ५५ वर्षांपासून प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करीत असून पतंजली, हठयोग, भगवत गीता आणि उपनिषद यांचे त्यांनी सखोल ज्ञान प्राप्त केले. १९७८ मध्ये त्यांनी योग विद्या धामची पहिली शाखा स्थापन केली. आज त्यांची देशभरात १६० केंद्रे आहेत. १९८३ मध्ये त्यांनी योग शिक्षण परिषदेसाठी योगा विद्या गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली. योग चैतन्य सेवा प्रतिष्ठान, १९९४ मध्ये भारताच्या विविध भागांमध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्याकडून एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला. त्यांनी ४२ पुस्तके लिहिली आहेत आणि विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी ३०० सीडी विकसित केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीजटंचाईचे सावट!

$
0
0

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

झारखंडसह कोळशांच्या खाणी असलेल्या ईशान्य भारताच्या काही भागांत झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कोळसा उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे पुरेशा कोळशाअभावी राज्यातील महाजनकोच्या प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांपैकी चार केंद्रांची स्थिती सुपरक्रीटिकल, तर तीन केंद्रांची स्थिती क्रीटिकल झाली आहे. सुपरक्रीटिकल स्थितीतील केंद्रांत नाशिकच्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्राचाही समावेश आहे. तातडीने कोळसा उपलब्ध होण्याची चिन्हे नसल्याने राज्यावर वीजटंचाईचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडच्या अहवालानुसार राज्यातील महाजनकोच्या वीजनिर्मिती केंद्रांवर पुरेशा प्रमाणात कोळशाचा पुरवठा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कोळशाची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्याचे राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांकडील कोळशाच्या साठ्यावरून उघड झाले आहे. महाजनकोच्या डब्ल्यूसीएलशी २०१७-१८ मध्ये झालेल्या करारानुसार १.१९ लाख टन कोळसा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ९५ हजार ७७३ टन कोळसा प्राप्त झाल्याचा दावा महाजनकोने केला आहे. परिणामी राज्यात दररोज १९ टक्के कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोळशाच्या पुरवठ्यात घट झाल्याने राज्यातील वीज उत्पादनातही घट निर्माण झाली आहे. ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या पाच महिन्यांच्या काळातही कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने राज्यातील वीज केंद्रांची स्थिती अधिक बिकट होत गेली आहे.

एकलहरेत दीड दिवसाचा कोळसा

कोळसा उत्पादनात घट आल्याने राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे संकटात आली आहेत. महाजनकोच्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्रात सध्या दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे, तर परळी येथे अवघा एक दिवसाचा आणि खापरखेडा, पारस येथे तीन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲथॉरिटीच्या (सीईए) नियमांनुसार औष्णिक वीज निर्मिती केंद्रांवर चौदा दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा असला पाहिजे. चार दिवसांपेक्षा कमी दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा झाल्यास अशा केंद्राची स्थिती सुपरक्रीटिकल, तर सात दिवसांपेक्षा कमी दिवस पुरेल इतका साठा झाल्यास क्रीटिकल स्थिती तयार होते. या नियमानुसार राज्यातील परळी, एकलहरे, पारस आणि खापरखेडा सुपरक्रीटिकल, तर भुसावळ, चंद्रपूर आणि कोराडी या केंद्रांची स्थिती क्रीटिकल झाली आहे. एकलहरे केंद्राला एक दिवसाला ६ हजार मेट्रिक टन कोळसा आवश्यक असतो. सध्या येथील पाचपैकी दोन वीजनिर्मिती संच कायमस्वरुपी बंद पडलेले असून, उर्वरित तीनपैकी १८० मेगावॅट क्षमतेचे केवळ दोन संच प्रत्यक्ष कार्यरत आहेत.

कोट

एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रात दररोज आवश्यक असणाऱ्या कोळशाचा सध्या पुरवठा होत आहे. मात्र, सध्या दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. ही परिस्थिती गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. लवकरच कोळशाचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे.

- उमाकांत निखारे

मुख्य अभियंता, वीजनिर्मिती केंद्र, एकलहरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागर योगाचा...

$
0
0

जागर योगाचा...

टीम मटा, नाशिक

आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुवारी शहरासह विविध उपनगरांत योग प्रात्यक्षिकांसह योग प्रसार करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी संस्था-संघटनांतर्फे ठिकठिकाणी योगाचा जागर करण्यात आला.

छायाचित्रे : प्रशांत धिवंदे, नवनाथ वाघचौरे,

----

महापालिका अधिकाऱ्यांचे हस्तासन (फोटो)

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथील रेकॉर्ड हॉलमध्ये योगशिक्षिका तेजस्विनी वझरे-लहामगे, वैष्णवी गांगुर्डे व डॉ. सुहास आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध प्रकारची योगासने प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आली. या कार्यक्रमात योगप्रवेश, योग परिचय, योग प्रबोध आदींविषयी मार्गदर्शन करून अर्धचक्रासन, पाद हस्तासन, शवासन, भद्रासन, वज्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, शितली प्राणायाम आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, महेश बच्छाव, मुख्य लेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, रामसिंग गांगुर्डे, नगररचना सहाय्यक संचालक आकाश बागूल, उद्यान अधीक्षक महेश तिवारी, सहाय्यक आयुक्त ए. पी. वाघ, नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे, जनसंपर्क अधिकारी हिरामण जगझाप आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगशिक्षिका तेजस्विनी वझरे-लहामगे, वैष्णवी गांगुर्डे यांना झाडाचे रोप भेट देऊन गौरविण्यात आले.

--

एस. के. पांडे विद्यालय (फोटो)

नाशिकरोड : चेहेडी येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एस. के. पांडे विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये योगशिक्षक महेंद्रसिंग पाटील यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला. प्राचार्य रमाकांत महाजन यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. धनंजय पाठक यांनी प्रास्ताविक केले. मनोहर भोर यांनी आभार मानले.

--

पळसे शाळा (फोटो)

नाशिकरोड : पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल आणि भाग्योदय प्राथमिक विद्यामंदिर या दोन्ही शाळांतील ९०० विद्यार्थ्यांनी योगासनांच्या सादरीकरणात सहभाग घेतला. मुख्याध्यापक टी. के. गाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगाभ्यासाची प्रतिज्ञा दिली. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, सहसचिव शिवाजी गायखे, सोमनाथ ढेरिंगे, मुख्याध्यापक एस. व्ही. बोरसे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. योगशिक्षक व्ही. वाय. पवार, वाय. पी. देवराळे यांनी विद्यार्थ्यांपुढे विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनीही या योगासनांचा आनंद घेतला.

---

शक्तिविकास अॅकॅडमी

युवा कार्यक्रम भारत सरकार नेहरू युवा केंद्र नाशिक संलग्न शक्तिविकास अॅकॅडमी या बहुउद्देशीय संस्थेतर्फे युवा नेता पडोस सांसद कार्यक्रमांतर्गत युवक-युवतींना योग व ध्यान या विषयांवर संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप यांनी मार्गदर्शन केले. दिलीप राठोड, गुडलक रॉय, चंद्रकांत चव्हाण, रोहित शेवाळे, शुभम गायकर, मोनाली चव्हाणके, पूजा थालकर, रेणुका साने आदी उपस्थित होते.

…..

मेरी जॉगर्स क्लब

मेरी परिसरातील मेरी जॉगर्स क्लबच्या वतीने योगासन, प्राणायाम प्रात्याक्षिके झाली. क्लबचे सदस्य गोपीनाथ गायकवाड, रमेश वाघ, प्रकाश पवार, रमाकांत सोनवणे, धंनजय आहेर, सोमनाथ बोरसे, रमाकांत जाधव, राजाभाऊ गायकवाड, सिराजभाई हवालदार, केशव देवरे आदी उपस्थित होते.

--

आदर्श विद्यामंदिर

नाशिकरोड : समता समाज विकास संस्था संचलित आदर्श विद्या मंदिर शाळेत योगासन प्रात्यक्षिकांसह रोटरी क्लब ऑफ वेस्टतर्फे शालेय दप्तरांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. रोटरी क्लबच्या अध्यक्षा सीमा पछाडे,सचिव पराग पाटोडकर,सदस्य प्रदीप पछाडे यांच्यासह संस्थापक रमेशचंद्र औटे,ऑनररी सेक्रेटरी प्राचार्या मनीषा विसपुते,शालेय समन्वयक रविकिरण औटे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.शिक्षक विजय बागुल यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांकडूनही करवुन घेतली.

०००००००००००००००००

(फोटो)

'...…तर भावीपिढी सुदृढ'

--

देवळाली कॅम्प परिसरात योग प्रात्यक्षिकांना प्रतिसाद

--

म. टा.वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नियमित योगासने आणि प्राणायाम केल्यास धकाधकीच्या जीवनात व्यायामाची जाणवणारी कमी व वाढलेला मानसिक तणाव दूर होऊन भावीपिढी सुदृढ बनेल, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

कॅन्टोन्मेन्ट बोर्डातर्फे येथील हायस्कूलच्या मैदानावर योग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व देवळालीवासीयांना ते संबोधित करत होते. यावेळी

पतंजली योगपीठाचे जिल्हा विभागीय अधिकारी सुदेश आमेसर, देवळाली विभागीय अधिकारी सुनीता सिंग, राजू फल्ले, ज्योती दलवाणी यांनी उपस्थित चौदाशे विद्यार्थ्यांसह देवळालीवासीयांना योग प्रात्यक्षिकांचे धडे दिले. नगरसेविका आशा गोडसे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोडसे, कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर, डॉ. चंद्रकांत बावस्कर यांच्यासह विद्यार्थ्यांनी योगासनाच्या प्रात्यक्षिकांत सहभाग घेतला. उपस्थितांकडून भद्रासन, वज्रासन, उष्ट्रासन,

अरद्धचक्रासन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वक्रासन, शवासन आदींसह प्राणायामातील कपालभाती, नाडीशोधन,अनुलोमविलोम, शीतली, भ्रामरी आदी प्रकार करवून घेण्यात आले.

प्रारंभी मुख्याध्यापिका नलिनी लोखंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. राजेंद्र यशवंते यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करूनआभार मानले. व्ही. पी. शिंदे, रोहिणी पाटील, माधव कुटे, आर. जे. पाटील आदींनी संयोजन केले.

खंडेराव टेकडी परिसर

खंडेराव टेकडी येथे अण्णाज ग्रुपच्या वतीने आयोजित योग प्रात्यक्षिक शिबिरात योगशिक्षक दीपक तोलानी, मिलिंद भुतडा यांनी ग्रुपच्या सदस्यांना योगाचे धडे दिले. त्यात अण्णाज ग्रुपचे सर्व सदस्य व टेकडी परिसरात नित्यनेमाने व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकही सहभागी झाले होते.

सिंधी पंचायत, हॉस्पिटल

पतंजली जिल्हा योग समिती, सिंधी पंचायतच्या वतीने पंचायत हॉल येथे आयोजित योगप्रात्यक्षिक शिबिरात छगन अग्रवाल व दर्शनलाल चड्डा यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात लष्करी जवानांसह डॉक्टर व नर्सेस यांना सुदेश आमेसर, सुनीता सिंग, राजू फल्ले, ज्योती दलवाणी यांनी योग प्रात्यक्षिके सादर करीत त्याचे महत्त्वही समजावून सांगितले. संसरी ग्रामपंचायत, पोलिस स्थानक, विविध शाळा व सामाजिक संस्थांच्या वतीनेही योग प्रात्यक्षिके झाली.

तेजुकाया महाविद्यालय

श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात योगगुरू रमेश गांधी, योगशिक्षिका निवेदिता अथनी यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके झाली. प्राचार्य डॉ. विजय मेधने, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

००००००००

(फोटो)

'योगसाधक वाढणे गरजेचे'

--

'मटा'च्या २१ दिवसीय प्रशिक्षणवर्गाचा समारोप

--

म. टा. वृत्तसेवा,देवळाली कॅम्प

योगसाधनेने मनुष्याचे आरोग्य सुधारते. त्यासाठी प्रत्येकाने योगसाधना केली पाहिजे व इतरांनाही ती करण्यास भाग पाडले पाहिजे, ज्यामुळे योगसाधक वाढतील, असे प्रतिपादन योग प्रशिक्षक सुनील जाधव यांनी केले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त योग विद्या धामच्या सहकार्याने गेले एकवीस दिवस शहराच्या विविध भागात घेण्यात आलेल्या योग शिबिराचा समारोप नाशिकरोड येथील जय भवानीरोडवरील योग विद्या धाममध्ये करण्यात आला. गत २१ दिवस दररोज सव्वातास सहभागी साधकांना सुनील जाधव, सोनाली पाटील, अर्चना भावसार, नलिनी कड, सचिन कुमावत आदींनी योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्काराचे धडे दिले. दरम्यान, सहभागी झालेल्या साधकांची परीक्षादेखील घेतली जाणार असून, सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

000

व्हा योगी, राहा निरोगी!

--

पंचवटीत घोषणाबाजीत रंगली योगसाधना

--

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये योगासनाची प्रात्याक्षिके करण्यात आली. योगासनाविषयीचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सूर्यनमस्कार, ताडासन, मकरासन, व्रजासन, शलभासन, भुजंगासन आदी आसनांचे प्रात्याक्षिकाबरोबरच योगाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणाबाजीनंतर नियमित योगासने करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

शिक्षण संस्थांत प्रात्यक्षिके

श्रीराम विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापक एस. टी. शिंदे आणि सर्व शिक्षकांनी योगासनाचे प्रात्यक्षिके केली. 'योग भगाये रोग' आणि 'व्हा योगी, राहा निरोगी' अशा घोषणा देण्यात आल्या. पंचवटीतील आरपी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, नर्गिस दत्त विद्यालय, स्वामिनारायण विद्यालय आदी शाळांमध्ये, तसेच हिरे महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय आदी महाविद्यालयांत योग प्रात्यक्षिके झाली.

वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आयुष संचालनालय, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद महाविद्यालय, सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय आणि आरोग्यभारती यांच्यातर्फे तपोवनातील भारत सेवाश्रम संघ येथे योग प्रात्यक्षिके झाली. आरोग्य भारती सिचे सचिव डॉ. विजय भोकरे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. दासरी, भारत सेवाश्रम संघाचे स्वामी संपूर्णानंद महाराज, प्राचार्य डॉ. मिलिंद आवारे, योगशिक्षक पिराजी नरवडे आदी उपस्थित होते. डॉ. शिवानंद तोंडे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य कमलेश महाजन यांनी आभार मानले.

आडगाव नाका येथील ओमनगर येथील गार्डन हॉलमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या केंद्रात मोहन उमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली. पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना योगदिनाविषयीची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामे धोरणाला मुदतवाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली मुदत ३१ मे रोजी संपुष्टात आल्यानंतर आता पुन्हा पालिकेच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण, २०१७ ला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, महापालिका हद्दीत मुदतवाढ द्यायची की नाही, याचे सर्वस्वी अधिकार महासभा किंवा आयुक्तांना बहाल करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातील अध्यादेश नगररचना विभागाने काढला असून, या मुदतवाढीमुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. हा कालावधी पुन्हा सहा महिन्यांचा असणार आहे.

सरकारने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत कम्पाउंडिंग चार्जेस भरून ३१ मे २०१८ पर्यंत अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्याची मुदत देण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीच्या कालावधीत पालिकेच्या नगररचना विभागात २९२३ प्रस्ताव दाखल झाले. परंतु, शहरात कपाट कोंडीमुळे जवळपास साडेसहा हजार इमारती अडकल्या आहेत. एवढे अर्ज कमी आल्याने काहींनी या धोरणात अर्ज केले नसल्याचे चित्र होते. त्यामुळे मुदतवाढीची मागणी केली जात होती. राज्य सरकारने त्यापूर्वी महापालिकेमार्फत भिवंडी महापालिकेला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या धर्तीवर सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. प्रस्ताव दाखल करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर बुधवारी नगरविकास विभागाने यासंदर्भात नवीन आदेश काढला. त्यात नाशिकसह भिवंडी, बृहन्मुंबई महापालिकांच्या प्रस्तावानुसार प्रशमित संरचन धोरणाला मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, किती मुदतवाढ द्यायची याचा निर्णय स्थानिक नियोजन प्राधिकरणावर सोपवला आहे. त्यामुळे आयुक्त किंवा महासभा काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

२०२० पर्यंत संरक्षण

राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणामध्ये यापूर्वी समाविष्ट न झालेल्या महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांसाठी देखील संधी देण्यात आली आहे. त्यासाठी १९ ऑगस्ट २०१८ पासून पुढे सहा महिने अनधिकृत बांधकामे अधिकृत करता येणार आहेत. त्यापुढे एक वर्ष म्हणजे १८ फेब्रुवारी २०२० पर्यंत सर्वेक्षण करून, कंपाउंडिंग चार्जेस भरण्याची मुदत देण्यात आली आहे. नाशिकमध्ये २९२३ प्रस्ताव कंपाउंडिंगसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे या प्रस्तावांवर आता २०२० पर्यंत काम करता येणार असल्याने त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई करता येणार नाही. त्यामुळे सिडकोसह इतर इमारतींना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश नवमीनिमित्त शोभायात्रा, सत्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथे माहेश्वरी समाजातर्फे श्री महेश नवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये समाजाच्या महिला, युवती यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले. यानिमित्त समाजातील गुणवंताचा सत्कार करण्यात आला.

माहेश्वरी समाजातर्फे दोन दिवस महेश नवमीचे कार्यक्रम झाले. लालचंद तापडिया, अशोक तापडिया, गणेश झंवर, कमलकिशोर राठी, डॉ. सुनीता टावरी, विजयकुमार जाजू, रामदयाल मुंदडा, संतोष चांडक, जगतनारायण माहेश्वरी, सुरेश माहेश्वरी यांच्याहस्ते भगवान शंकराची पूजा झाली. खोले मळ्यातील माहेश्वर भवनमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा समाजबांधवांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. माहेश्वरी प्रगती मंडळ अध्यक्ष श्रीनिवास लोया, रामेश्वर मालाणी, निशा सोमाणी, कविता राठी, महेश बूब, अमर मालपाणी, अच्युत राठी, संकेत राठी, प्रणाली भट्टड, निकिता मालाणी, संकेत राठी, प्रणाली भट्टड, अनिल नावंदर, मिताली भट्टड आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिकरोड बसस्थानवर समाजातर्फे गुरुवारी सकाळी सरबत वाटप करण्यात आले. जवाहर मार्केटसमोरील श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून सजवलेल्या बग्गीमध्ये सायंकाळी साडेचारला शंकराच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका सीमा ताजणे व समाजातील ज्येष्ठ महिलेने केले. शोभायात्रा देवी चौक, शिवाजी पुतळा, बिटको चौक, मुक्तीधाम, अनुराधा चौक, आर्टिलरी सेंटररोडमार्गे माहेश्वरी भवनमध्ये आली. तेथे विविध कार्यक्रम झाले. जयंतीलाल लाहोटी, रामेश्वर जाजू, अनिल मालपाणी, जयंती लाहोटी, विजय जाजू, विजय केला, विश्वनाथ भट्टड, सोमनाथ भट्टड, बंकटलाल राठी, सुनील जाजू, दिनेश करवा, पुष्पक कलंत्री आदी उपस्थित होते.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आजी आठवताना’चा प्रथम पुरस्काराने गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ललितेतर साहित्य प्रकारात साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या धारा भांड-मालुंजकर लिखित 'आजी आठवताना' या पुस्तकाला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुण्यातील पद्मजी सभागृहात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे यांच्यावतीने "जीवनगौरव", "साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार" आणि "उत्कृष्ट ग्रंथ निर्मीती -२०१७" पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम पार पडला. ललितेतर साहित्य प्रकारात साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या धारा भांड-मालुंजकर लिखित 'आजी आठवताना' या पुस्तकाला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष जेष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ लेखक व संपादक भानू काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र, मानचिन्ह, एक पु्स्तक आणि श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी मंचावर परचुरे प्रकाशन मंदिरचे सर्वेसर्वा अप्पा परचुरे आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images