म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ एकलहरे केंद्राच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी (दि. २३) विविध कामगार संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकारने एकलहरे केंद्राबाबतचे उदासीन धोरण मागे न घेतल्यास येत्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा सर्व कामगार संघटनांनी यावेळी दिला. वीज उत्पादनासाठी जास्त खर्च येत असल्याच्या कारणास्तव राज्यातील काही वीजनिर्मिती प्रकल्प येत्या दोन वर्षांत टप्प्या-टप्प्याने बंद करण्याचा प्रस्ताव कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. त्यात नाशिकच्या एकलहरेसह भुसावळच्या वीजनिर्मिती प्रकल्पाचाही समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांना येत्या दोन वर्षांत कायमचे टळे लावून विदर्भातील उमरेड येथे नवीन वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्याचे निश्चित झालेले आहे. या निर्णयानुसार एकलहरे येथील वीजनिर्मिती केंद्र बंद झाल्यास येथे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. एकलहरे येथील दोन संच २०११ सालीच बंद करण्यात आलेले आहेत. त्या बदल्यात एकलहरे येथे नवीन ६६० मेगा वॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प मंजुर करण्यात आला होता. मात्र, आता हा नवीन वीजनिर्मिती प्रकल्पही मृगजळ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प वाचविण्यासाठी सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. एकलहरे वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत राज्य सरकारचे धोरण उदासीन असल्याचा आरोप या द्वार सभेत सहभागी कामगारांनी केला. एकलहरे प्रकल्प बंद करण्यात येऊ नये. राज्य सरकारने हा प्रकल्प बंद करण्याचा प्रस्ताव रद्द न केल्यास येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या द्वार सभेत एकमुखाने संमत करण्यात आला. एकलहरे वीजनिर्मिती केंद्र बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून या कामगारांकडून आठवडाभर काळ्या फिती लावून काम सुरू आहे. गुरुवारच्या द्वारसभेत विनायक क्षीरसागर, सुभाष कारवाल, प्रभाकर रेवगडे, सूर्यकांत पवार, श्रीधर मुळाणे, एस. आर. पाटील, विठ्ठल बागल, हरिष सोनवणे आदी सहभागी झालेले होते. येत्या सोमवारी या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठेकेदारांकडील कर्मचारीही एकलहरे येथे आंदोलन करणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट