वाढदिवस १६ डिसेंबर -- सूरज बिजली .......पोलिस निरीक्षक, आडगाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
वाढदिवस १६ डिसेंबर -- सूरज बिजली .......पोलिस निरीक्षक, आडगाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक जिल्ह्यात कोठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्या भागातील प्रभारी पोलिस अधिकारी आणि बीट अंमलदार यांना लागलीच नियंत्रण कक्षात पाठविण्याचा निर्णय जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी घेतला आहे. एकीकडे अवैध धंद्यांविरोधात कारवाई होत असताना, दुसरीकडे काही पोलिसच अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याने दराडे यांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आठ उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांचे पथक, तसेच सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी यांची अवैध धंदे चालविणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आगामी काळात ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस स्टेशन हद्दीतून अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार आल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून खुलासे मागवण्यात येत आहेत. अवैध धंदे आढळल्यास संबंधित प्रभारी अधिकारी व बीट अंमलदारांची तत्काळ नियंत्रण कक्ष, मुख्यालयात बदली करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात विशेष मोहीम सुरू झाल्यापासून पोलिस स्टेशननिहाय अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. यात मद्यविक्री व वाहतूक करणारे, तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करणाऱ्या एकूण ५६० संशयितांवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ३१ लाख ३८ हजार ७०३ रुपयांचा अवैध मद्यासाठा, हातभट्टी, गावठी दारू व साहित्य साधने जप्त करण्यात आली आहेत. विशेषत: जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी, वाडिवऱ्हे, त्र्यंबकेश्वर, कळवण, अभोणा, हरसूल, देवळा व मालेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेले गावठी दारू हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मुंबई जुगारबंदी कायद्यानुसार एकूण १०८ केसेस करण्यात आल्या. याद्वारे सुमारे १५० जुगारींना अटक करण्यात आली. जुगाराचे साहित्य साधने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख ३७ हजार ९०९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या ठिकाणी करा तक्रार जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत तक्रार करण्यासाठी पोलिस अधीक्षक दराडे यांनी व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. आपल्या भागात अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी ९१६८५५११०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्षाच्या ०२५३-२३०९७१५ किंवा स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२५३- २३०९७१० या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
कायद्यातील तोकड्या तरतुदींने नोंदणी बनली ऐच्छिक म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेकडून गेल्या दहा वर्षांत शहरातील ७५ हजार भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असतांना पाळीव कुत्र्यांची संख्या मात्र अल्प आढळून आली आहे. शहरात एकीकडे पाळीवर कुत्र्यांची संख्या हजारोच्या घरात असतांना पशुसंवर्धन विभागाकडील पाळीव कुत्र्यांची नोंदणी मात्र अवघी १४०३ इतकी आहे. श्वान नोंदणीकडे अनेक मालक दुर्लक्ष करत असल्याने पाळीव कुत्र्यांची संख्या शेकड्यातच मर्यादित राहिली आहे. महापालिका हद्दीत घरात पाळीव कुत्र्यांसाठी महापालिकेकडून परवाना घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विहित नोंदणी शुल्क आकारून महापालिकेच्या वतीने अशा पद्धतीचा परवाना दिला जातो. तसेच, दरवर्षी या परवान्याचे नुतनीकरणही केले जाते. पाळीव कुत्र्याला ॲन्टिरेबीज लस दिली आहे किंवा नाही याची खात्री केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या परवान्याचे नूतनीकरण पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून केले जाते. सध्या उच्चभ्रू वस्तीत कुत्रे पाळण्याची क्रेज दिसून येत असून घरोघरी पाळीव कुत्रे असल्याचे चित्र आहे. प्रत्येक सोसायटीत एक घरी तरी, पाळीव कुत्रा असतो. मात्र, या पाळीव कुत्र्यांची महापालिकेच्या दप्तरी नोंद केली जात नसल्याचे चित्र आहे. शहरात जेवढ्या संख्येने पाळीव कुत्रे आहेत त्या तुलनेत जेमतेम एक टक्का लोकांनीच आपल्या पाळीव कुत्र्यांची महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी केल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आतापर्यंत नोंदणी केलेल्या पाळीव कुत्र्यांची संख्या अवघी १४०३ इतकी आहे. शहरात एकीकडे भटक्या कुत्र्यांचीच संख्या हजारोच्या संख्येने असतांना पाळीव कुत्र्यांची संख्या एवढी कमी का, असा सवाल उपस्थित होत आहे. नुतनीकरणाकडे पाठ पाळीव कुत्र्याची नोंदणी करण्यासह नोंदणी केलेल्यांकडून परवाना नुतनीकरणाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. शहरात १ एप्रिल ते १२ डिसेंबर २०१८ या दरम्यान महापालिकेकडे जेमतेम १५५ पाळीव कुत्र्यांची नोंदणी झाली आहे. तर याच काळात जेमतेम १६९ पाळीव कुत्र्यांच्या परवान्यांचे नूतनीकरणासाठी आले आहेत. विनापरवाना कुत्रे पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची कुठलीही यंत्रणा पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध नसल्यानेच पाळीव कुत्र्यांची नोंदणी व नुतनीकरण अत्यल्प ठरली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
सात-बारा कोरा असण्याची सहकार प्राधिकरणाकडून अट म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या दोन संचालकांच्या जागांसाठी अटी व शर्तींचे पत्र पाठवल्यानंतर इच्छुकांनाही कात्री लागली आहे. इच्छुकांचा सात-बारा कोरा असण्याची अट घालण्यात आल्याने धनदांडग्या इच्छुकांच्या तयारीला वेसन लागले आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत नियमानुसार संचालक घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी २६ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या संचालक मंडाळाची मासिक सभा शुक्रवारी अध्यक्ष केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात राज्य सहकारी सहकार निवडणूक प्रधिकरणाने संचालक घेण्याबाबत आलेल्या पत्रावर चर्चा झाली. जिल्हा बँकेचे माजी संचालक अपूर्व हिरे (ओबीसी गट) व अद्वय हिरे (मालेगाव तालुका गट) यांनी गेल्यावर्षी राजीनामा दिला. तत्कालीन संचालक मंडळाने हे दोन्ही राजीनामे मंजूर केले होते. त्यामुळे या दोन्ही रिक्त जागा भरण्साठी राज्य सहकारी सहकार निवडणूक प्रधिकरणाने बँकेला पत्र पाठविले आहेत. यात रिक्त जागा, ज्या प्रवर्गातील आहेत त्याच प्रवर्गातील पात्र सदस्यांमधून स्वीकृतीने संस्थेच्या समितीकडून संचालक मंडळाच्या सभेमध्ये निर्णय घेऊन भरण्याचे आदेश दिलेले आहे. त्यासाठी प्राधिकरणाने कार्यपद्धती ही नमूद केलेली असून इच्छुक हा थकबाकीदार नसावा, तो ज्या संस्थेचा प्रतिनिधी असेल त्या संस्थेचाही सात-बारा कोरा असावा, अशा अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाखोंची बोली लावून संचालक पद भरण्याच्या संचालक मंडळांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. २६ पर्यंत अर्जमदत प्राधिकरणाच्या अटी शर्तीमुळे वशिलाबाजीने संचालक घेण्यास संचालकांनी तीव्र विरोध दर्शविला असल्याचे समजते. त्यामुळे संचालकांना खुश करून संचालक होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. दरम्यान या संचालक पदासाठी २६ डिसेंबरपर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. राज्य सहकारी सहकार निवडणुक प्रधिकरणाने बँकेला पत्र पाठविले असून यात दोन संचालक घेण्याबाबत स्पष्ट नियम व कार्यपद्धती दिलेली आहे. त्यानुसाराच प्रक्रिया राबवून संचालक घेतले जातील. याकरिता संचालक मंडळाची विशेष सभा होईल. वशिलाबाजीने संचालक घेणार नाही. - केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने आयोजित एनसीए अंडर-२१ इमर्जिंग ट्रॉफी स्पर्धेत सीसीएन विरुद्ध एसजीसीए संघात झालेला सामना अनिर्णित राहिला असला, तरी या सामन्यात अष्टपैलू हर्षल सेनभक्त याच्या दमदार खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले. हर्षलने प्रथम डावात ८, तर दुसऱ्या डावात ३ गडी बाद करीत सामनावीराचा बहुमान पटकावला. एनसीएच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात सीसीएन संघाने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावा केल्या. यात राहुल भागडे याने ९८ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात एसजीसीए संघ १३२ धावांत गारद झाला. एनसीसीच्या हर्षलने उत्कृष्ट गोलंदाजी करीत २१ षटके टाकताना ७२ धावांत ८ गड्यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले. यामुळे एसजीसीएचा संघ झटपट बाद झाला. दुसऱ्या डावात सीसीएनने १७२ धावा केल्या. या इनिंगमध्ये राहुलने पुन्हा ३२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर हर्षल सेनभक्त यानेही फलंदाजीचे कौशल्य दाखवताना २२ चेंडूंत ४० धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार ठोकला. यानंतर एसजीसीएच्या फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आले. हर्षलने अखेरच्या इनिंगमध्ये पुन्हा तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत सामन्यावर पकड निर्माण केली. सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या इनिंगच्या जोरावर सीसीएनने वर्चस्व गाजवले. सीसीएनच्या सौरभ गडाख आणि एसजीसीएच्या मंथन सोमवंशी यांनीही आपल्या संघासाठी चांगले योगदान दिले. दोन्ही इनिंगमध्ये ११ बळी घेत ४८ धावांचे मोलाचे योगदान देणाऱ्या हर्षलने सामनावीराचा किताब मिळवला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. वृत्तसेवा, धुळे
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमाने सारंगखेडा येथील प्रख्यात एकमुखी दत्ताच्या अश्व यात्रेला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला असून, यंदाच्या चेतक फेस्टिवलला साडे चार ते पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. चेतक फेस्टिवल हे देशातील महत्त्वाचा महोत्सव व्हावा या साठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या दि. २२ डिसेंबर रोजीच्या दत्त जयंतीपासून यात्रेस प्रारंभ होत असून, यात्रेचा कालावधी यंदापासून एक महिन्याचा करण्यात आला आहे. पूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. फेस्टिवल दर्जेदार ठरून देशभरातील पर्यटक व अश्व प्रेमीं लाखोच्या संख्येने भेट देण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या सर्व सुविधांची जय्यत करण्यात आली आहे.
या यात्रेसाठी चेतक फेस्टिवलच्या प्रांगणात प्रवेशासाठी पश्चिमेला व दक्षिणेला दोन प्रशस्त प्रवेश प्रवेशद्वार बनविण्यात आले आहेत. यांची रचना प्रशस्त किल्याच्या प्रवेशाद्वारासारखी करण्यात आली असल्याने आपण एखाद्या भव्य भुईकोट किल्याच्या परिसरात प्रवेश करतो आहे असे वाटते. घोड्यांच्या शर्यतीसाठी व त्यांच्या परीक्षणासाठी अश्व बाजाराच्या मधोमध रुंद अशी प्रशस्त धावपट्टी तयार करण्यात आली आहे. तर धावपट्टीच्या दोन्ही बाजूला सुरक्षेचे कठडे लावण्यात आले आहे. तर यात्रेकरूंना ते सहज पाहता यावे या साठी दर्शक दीर्घा तयार करण्यात आल्या आहेत. येथे उभे राहून अश्व शर्यती पाहता येणार आहेत.
‘अश्वकला’ पॅव्हेलियनची उभारणी
यात्रेत अश्वांच्या विविध करतबी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते या अश्वकालेचा आनंद घेता यावा यासाठी प्रशस्त अश्वकला पॅव्हेलियन उभारण्यात आले आहे. आतापावेतो यात्रेत सुमारे बाराशे घोड्यांचे आगमन झाले आहे तर सुमारे पाच हजार घोडे येण्याची शक्यता आहे. दररोज सुमारे चाळीस ते पन्नास हजार पर्यटक यात्रेत हजेरी लावतील या हिशोबाने तयारी करण्यात आली आहे. येथे बसून दररोज घोड्यांच्या विविध करतबी पाहता येणार आहे. तसेच विविध अस्सल प्रजातीच्या २५ घोड्यांचे प्रदर्शनही एका वेगळ्या ढंगात ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अन्न छत्रासाठी सुसज्ज राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. यंदा यात्रेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र पांडाल उभारण्यात आले आहे. जगभरातील विविध घोड्यांच्या प्रजातींचा पर्यटकांना परिचय व्हावा, घोड्यांची परिपूर्ण माहिती पर्यटकांना व्हावी या साठी येथे छायाचित्र प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात जगातील नामवंत अश्व छायाचित्रकारांनी काढलेले छायाचित्रे ठेवण्यात हेणार आहे.
‘चेतक व्हिलेज’ आकर्षण
देश-विदेशातील पर्यटक फेस्टिवलला भेट देण्याची शक्यता पाहता तापी बॅरेज लागत नदीच्या नयनरम्य काठी चेतक व्हिलेज उभारण्यात आले आहे. या व्हिलेज मध्ये निवासाच्या सुमारे ६५ ते ७० अत्याधुनिक वातानुकूलित सर्व सुविधांयुक्त राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. या राहुट्यामध्ये पर्यटकांना परिवारासह राहता येणार आहे. त्याच प्रमाणे या परिसरात महिला व लहान मुलांच्या मनोरंजनासाठीही विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. तर तारांकित दर्जाचे रेस्टोरेंट व खानावळची सुविधा देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तापी नदीत बोटिंग, स्पीड बोटिंग, पॅरामोटरींग, पॅरासिलिंग आदीची सुविधा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या यात्रेला सामान्य जनता मोठ्या प्रमाणात मुक्कामाला येत असल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून अवघ्या कमी दरात निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
लोहार युथ फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव नाशिक : लेखानगर येथील वेदांत मंगल कार्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ३५हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. तसेच पतीच्या निधनानंतर घरातील जबाबदारी उत्तमरित्या पार पाडणाऱ्या महिलांनाही या कार्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील लोहार समाज बांधव, महिला विद्यार्थी आणि नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातील लोहार युथ फाउंडेशनचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील लोहार महिला बचत गटांचादेखील गौरव पुरस्काराने करण्यात आला. - - अॅन्युअल सेरेमनीचे आयोजन नाशिक : दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स, नाशिक लोकल सेंटरतर्फे 'अॅन्युअल अवॉर्ड सेरेमनी'चे आयोजन करण्यात आले आहे. द गेट वे हॉटेल, मुंबई - आग्रा रोड येथे १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी सारस्वत को ऑप बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर व दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स इंडिया, कोलकाता येथील टी. एम. गुनाराजा यांची उपस्थिती असणार आहे. - - -
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
\Bकामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा निर्धार \B म. टा. प्रतिनिधी, नाशिक जानेवारीत होऊ घातलेला संप केवळ कामगारांचा नाही. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांनी त्रासलेल्या प्रत्येकाचा हा संप आहे. या संपाद्वारे लोकांची राजकीय भावना बदलायला हवी. त्यामुळे संपात अधिकाधिक लोक सहभागी होतील, या दृष्टीने तयारीला लागण्याचा निर्धार कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. ८ आणि ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या संपाबाबत चर्चा करण्यासाठी गोळे कॉलनीतील काका गद्रे मंगल कार्यालयात बैठक झाली. यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंचावर 'सिटू'चे डॉ. डी. एल. कराड, इंटकचे राजू देसले, श्रीधर देशपांडे, सिताराम ठोंबरे, ज्योती नटराजन, अरुण म्हसके, सखाराम दुर्गुडे, व्ही. डी. धनवटे, नामदेव बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. कराड म्हणाले, की १२ मागण्यांसाठी हा देशव्यापी संप करण्यात येतो आहे. कामगार ज्या मागण्या करीत आहेत त्याविरोधातील निर्णय मोदी सरकार घेते आहे. जानेवारीत होणाऱ्या देशव्यापी संपामध्ये ९९ टक्के मागण्या जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडीत आहेत. महागाई कमी व्हावी, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, रेशन व्यवस्थेला बळ द्यावे, कंत्राटी कामगारांना कायम करावे, १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे यासारख्या मुख्य मागण्यांसाठी हा संघर्ष आहे. प्रत्येक नागरिकाशी निगडीत प्रश्नांसाठी हा संप असून त्यास राजकीय स्वरूप दिले जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी संघटना पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. रेल्वे स्टेशनही खासगी कंत्राटदारांना चालविण्यास देण्याचा घाट घातला जात असून मोदींनी देश विकायला काढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अर्थव्यवस्थेला, सार्वजनिक व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारे सरकार कशासाठी ठेवायचे, असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. भाजपच्या एकाधिकारशाहीला शह देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि एकदिलाने संपात सहभागी व्हावे, असे आवाहन देशपांडे यांनी केले. कामगार वस्तीत बैठका संपामध्ये अधिकाधिक लोक सहभागी व्हावे, ते मोर्चांमध्ये उतरावेत यासाठी शहराच्या प्रत्येक भागात बैठका घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ८ जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्यासह सिडको, सातपूर, नाशिकरोड परिसरात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तर ९ जानेवारी रोजी सकाळी गोल्फ क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मोदी सरकार जावे आणि येणाऱ्या नवीन सरकारचे डोकेही सुरुवातीपासूनच ठिकाणावर रहावे, यासाठी हा देशव्यापी संप असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कृती समितीचे पुनर्गठण करावे मोदी सरकारच्या हुकूमशाहीला उत्तर देण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यामध्ये उतरावे, असे आवाहन राजू देसले यांनी केले. कृती समितीमध्ये क्रियाशील कार्यकर्त्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय कृती समितीचे पुनर्गठण व्हायला हवे, अशी अपेक्षा देसले यांनी व्यक्त केली. फोटो : पंकज चांडोले
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
जुन्या पेन्शनचा मुद्दा अग्रक्रमीच शिक्षक परिषदेत राजेंद्र सुर्वे यांनी व्यक्त केला विश्वास म. टा. प्रतिनिधी, नाशिक जुन्या पेन्शनच्या प्रश्नासाठी शिक्षकवर्ग मोठ्या कालावधीपासून लढत आहे. मात्र, अद्याप तो मान्य करण्यात आलेला नाही. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत जुनी पेन्शन लागू करणे हा मुद्दा अग्रक्रमी घेणार व तो सोडवणार, असा विश्वास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेंद्र सुर्वे यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची राज्य कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी संयुक्त बैठक राज्याध्यक्ष राजेंद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली रुंग्टा हायस्कूल हॉल नाशिक येथे रविवारी पार पडली. यावेळी राज्याध्यक्ष सुर्वे बोलत होते. परिषदेचे राज्यकोषाध्यक्ष संजय पगार यांनी शिक्षकहिताचे जुनी पेन्शन, चौदावा वित्त आयोग निधी मुद्दा या बैठकीत मांडला. सभेत सातवा वेतन आयोग लागू करुन एक लाख रुपये मागील फरक रोख स्वरुपात द्यावा, शाळांचे लाईट बिल जिल्हा परिषद शेषनिधीतून भरावे, जिल्हांतर्गत बदली त्रुटी दूर करणे, एमएससीआयटी स्थगितीबाबत कार्यवाही त्वरित राबवणे हे मुद्दे सोडविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर, २३ ऑक्टोबरचा चटोपाध्याय वेतनश्रेणी बाबत जाचक शासननिर्णय रद्द करणे, सर्व जिल्ह्यांत मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देणे, कॅशलेस मेडिक्लेम त्वरीत सुरू करणे याबाबत योग्य ती कार्यवाही होणे, जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्तता, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना उपशिक्षणाधिकारी परीक्षेस विनाअट प्राधान्य आदी विषयांवर चर्चा करुन सकारात्मक ठराव मंजूर केला. या सभेत मागील सभेचे इतिवृत वाचून कायम करून, संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले. या सभेस शिक्षक परिषद विभागीय कार्यवाह डी. यू. अहिरे, दत्ता पाटील, राज्य कार्यवाह सुधाकर म्हस्के, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव पगार, मधुकर उन्हाळे, संघटनमंत्री सुरेश दंडवते आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन कार्यवाह रमेश गोहील यांनी केले. तर आभार रावसाहेब जाधव यांनी मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी सकल नाथपंथी समाज संघटनेच्या विभागीय मेळाव्यात संघटनेचा उद्देश आणि संघटनेची बांधणी या विषयावर चर्चा करण्यात आली. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचा अजेंडा मांडण्यात आला. नाशिक विभागातील सकल नाथपंथी समाज संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गोविंद इंगळे होते. अमृतधाम येथील शिवगोरक्ष योगपीठ येथे झालेल्या कार्यक्रमास सकल नाथपंथी समाज संघटनेचे नाशिक येथील राज्य सचिव चंद्रकांत देवगुणे, जालना येथील राज्य सचिव सखाहरी चंद्रहास, जळगाव येथील राज्य सचिव प्रा. डॉ. एस. के. जोगी, मुंबई येथील राज्य सचिव सुनीता महाले आदी उपस्थित होते. समाज संघटनेची बांधणी करणे कसे गरजेचे आहे, या बांधणी मागील उद्देश याची राहुल बोरकर यांनी माहिती दिली. किशोर लाड यांनी संघटनेने केलेल्या कामाचा आढावा मांडला. अतुल सोनारे, प्रवीण चव्हाण, राहुल रुद्रवंशी, शंतनू शिंदे, ज्ञानेश्वर सोमोसे, मधुकर शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. भाऊसाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विनायक लाड यांनी प्रास्ताविक केले. माणिक कानडे यांनी आभार मानले. समाज प्रबोधनाची गरज नाथपंथी समाजाला आजही प्रबोधनाची गरज आहे. समाज प्रबोधनाची काम समाजातील नेते आणि साधुसंतांनी करायला पाहिजे. समाजाच्या पतपेढी, बँक, शिक्षणसंस्था असावी. वस्ती, गाव, रस्ता, चौक यांनी नवनाथांची नावे दिली जावी. समाजाच्या संप्रदायाची परंपरा, ग्रंथ, उपासना यांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, असे डॉ. एस. के. जोगी यांनी सांगितले. लोगो : सोशल कनेक्ट
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
Prashant.bharvirkar@timesgroup.com Tweet : bharvirkarPMT नाशिक : मराठी रंगभूमी दिन असो की शहरातील कोणताही पुरस्कार सोहळा, तेथे 'बागेश्री' वाद्यवृंदांची नांदी सादर होणार नसेल तरच नवल! नाशिक शहरातील कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत तब्बल ११८५ नांदी सादर करण्याचा विक्रम बागेश्रीने केला असून, त्यातून ७५० हून अधिक कलाकारांना रंगमंचावर संधी दिली आहे. लवकरच हे वाद्यवृंद ११८६ वी नांदी सादर करणार असून, हा विक्रम अद्याप कोणी मोडला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गेल्या १० वर्षांपासून बागेश्री वाद्यवृंद नांदी सादर करीत असून, मराठी संगीत रंगभूमीवर १५० वर्षे पूर्ण झालेल्या संगीत मानापमान या नाटकातील 'नमन नटवरा विस्मयकारा' ही नांदी ८०० हून अधिक ठिकाणी त्यांनी सादर केली आहे. नटराजाच्या अभिवादनाची ही नांदी सादर करीत असताना प्रत्येकवेळी नवीन कलाकाराला संधी देण्याचादेखील विक्रम त्यांनी केला असून, त्यातूनच अनेक गायक, गायिका पुढे आल्या आहेत. आता ते स्वतंत्रपणे कार्यक्रम करीत आहेत. भालजी पेंढारकर, राम मराठे, प्रभाकर पणशीकर, जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार, हृदयनाथ मंगेशकर, डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, श्रीधर फडके, मोहन जोशी, प्रशांत दामले यांसह अनेक दिग्गज कलाकारांसमोर बागेश्रीच्या वाद्यवृंदांनी नांदी सादर केली असून त्यांनी अनेक बालकलाकारांना आशीर्वाददेखील दिले आहेत. नाट्य परिषदेचा रंगभूमी दिन, सावाना रंगभूमी दिन, संगीत नाट्य महोत्सव, राज्य नाट्य महोत्सव, कामगार कल्याण नाट्य महोत्सव, जनस्थान पुरस्कार या कार्यक्रमांत नांदी सादरीकरण केले आहे. यात संगीत मानापमान, संगीत सौभद्र, संगीत जयजय गौरीशंकर, संगीत कान्होपात्रा, संगीत शाकुंतल, संगीत रणदुदुंभी, संगीत बावणखणी, संगीत पंडितराज जगन्नाथ, संगीत होनाजी बाळा, संगीत स्वयंवर या नाटकांमधील नांदी हे वाद्यवृंद सादर करतात. कुसुमाग्रजांनी एकटाकी लिहिलेली नांदी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कार सोहळ्यात बागेश्रीच्यावतीने 'हे नटराज देवाधिराज' ही नांदी सादर करण्यात आली होती. ही नांदी खुद्द कुसुमाग्रजांनी संगीत संयोजक मोहन करंजीकर यांच्या सांगण्यावरून मागताक्षणी एकटाकी लिहून दिली असून, करंजीकर यांनी तिला लगेच चाल लावून त्यांच्यासमोर सादर केली. ती नांदी बागेश्री वाद्यवृंद सगळीकडे सादर करीत असून नाशिकचा नावलौकिक वाढवत आहेत. आतापर्यंत गायन कला क्षेत्रातील ७५० हून अधिक कलाकारांना बागेश्रीने व्यासपीठ मिळवून दिले आहे. नांदी सादर करण्यामध्ये आमचा हातखंडा असून वेगवेगळ्या नाटकातील नांदी आम्ही सादर केली आहे. आता आम्ही ११८६ वी नांदी सादर करणार आहे, हा विक्रमच. -चारूदत्त दीक्षित, संस्थापक, बागेश्री
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक अवैध वाहतूक करणारे, तसेच हेल्मेट, सीटबेल्ट न घालणारे, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ग्रामीण पोलिस दलाने रडारवर घेतले आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने आतापर्यंत ७,५५७ जणांवर कारवाई केली असून, तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांची संख्या लक्षणीय असून, दरवर्षी सरासरी सातशे व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात. जिल्ह्याच्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रात मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गासह नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद, नाशिक- गुजरात असे महामार्ग जातात. या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण मोठे आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी याचमुळे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वळविले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन, तसेच वाहतूक शाखेला नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. हेल्मेट व सीटबेल्ट वापराबाबत वेगवेगळ्या स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, मालेगावची शहर वाहतूक शाखा, तसेच पोलिस स्टेशननिहाय वाहतूक पोलिसांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. विनाहेल्मेट व सीटबेल्ट, मोबाइलवर बोलणारे चालक, नो पार्किंग झोन, ड्रंक अँड ड्राइव्ह, अवैध वाहतूक, तसेच भरधाव वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करून ७,५५७ केसेस दाखल करण्यात आल्या, तसेच १५ लाख २० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. २५ परवाने निलंबित हायकोर्टाच्या आदेशानुसार, वाहन चालवताना बोलणारे, राँग साइड वाहन चालवणारे, तसेच सिग्नल तोडणाऱ्यांचे परवाने थेट निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २,८४२ केसेस करण्यात आल्या. त्यापैकी ६९ वाहने जप्त करण्यात आली. यापैकी २५ वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यात आले असून, ३० वाहनांचे निलंबन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. दृष्टिपथात कारवाई ७५५७ जणांवर कारवाई १५,२०,८०० रुपयांचा दंड वसूल ६९ वाहने जप्त २५ चालकांचे परवाने निलंबित ३० परवान्यांवर निलंबनाचा प्रस्ताव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच्या दोन्ही लिफ्ट अचानक बंद पडल्या असून, रविवारी सकाळी एका महिलेची लिफ्टजवळच प्रसुती झाली. यावेळी हॉस्पिटलमधील इतर विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन महिलेची मदत केली. दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने मात्र लिफ्ट बंद असण्याचा आणि त्या महिलेची वाटेतच प्रसुती होण्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. निफाड तालुक्यातील खांडगाव येथील गर्भवती महिलेला सकाळच्या सुमारास त्रास सुरू झाला. दुसऱ्यांदा माता होणाऱ्या आणि मुदतीपूर्वीच अचानक त्रास सुरू झालेल्या महिलेच्या मदतीला गावातील आशा सेविका धावून आली. आशा सेविकेने तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला फोन केला. अॅम्ब्युलन्स वेळेत आली. कुटुंबातील एकही सदस्य यावेळी महिलेबरोबर नव्हते. अॅम्ब्युलन्सने महिलेला जवळच्या चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, मुदतीपूर्व प्रसुतीसाठी आलेल्या मातांना विशेष उपचारांची गरज असते. त्यामुळे चांदोरी येथून महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले. अॅम्ब्युलन्सने महिलेला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल गाठले. बाळंतपण केव्हाही होण्याची स्थिती असल्याने असल्याने तिला लागलीच अॅडमिट करणे गरजेचे होते. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुती कक्ष पहिल्या मजल्यावर असून, महिलेला तिथे लिफ्टने घेऊन जाणे गरजेचे होते. त्यामुळे ही महिला आणि तिच्या मदतीला आलेले इतर कर्मचारी तब्बल १० मिनिटे लिफ्टजवळ थांबले. महिलेला मोठी कळ आल्याने हॉस्पिटलमधील आहार विभागाच्या कर्मचारी शिला कांबळे पुढे आल्या. परिचारिकांची धावपळ यानंतर सर्व परिचारिकांची धावपळ झाली. साऱ्यांनी तिकडे धाव घेतली. कांबळे यांनी पोर्चमधील सर्व पुरुषांना बाहेर काढले. पोर्चचे दोन्ही बाजूकडील गेट बंद करून गादीच्या कापडांनी आडोसा निर्माण केला. तोपर्यंत पोहचलेल्या प्रसुती विभागातील परिचारिकांनी लिफ्टच्या बाहेरच बाळाला जन्म दिलेल्या महिलेवर उपचार सुरू केले. त्यानंतर वॉर्डबॉय यांनी झोळी करून प्रसूत झालेली महिला व बाळाला प्रसूती कक्षात दाखल केले. बाळाचे वजन अडीच किलो असून, माताही सुखरुप असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लिफ्ट बंद असल्याची माहितीच नसल्याने हा गंभीर घडल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकाराबाबत सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे म्हणाले की, लिफ्ट बंद असल्याने हा प्रकार झालेला नाही. महिला शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये पोहचली. लिफ्ट सुरू असती तर ती लिफ्टमध्ये प्रसूत झाली असती. हॉस्पिटलची पेशंटसाठी असलेली लिफ्ट शनिवारी रात्री तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. रविवारी दुपारपर्यंत ती सुरू झाली असल्याचे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
नाशिककर खवय्यांच्या मेळाव्यातील सूर म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक आणि खवय्येगिरी, हे समीकरणचं अनोखे असून, फूड ब्लॉगर्सची संख्या नाशिकमध्ये अधिक आहे. फूड ब्लॉगर्स शहराची खाद्यसंस्कृती सर्वत्र पोहोचविण्याचे काम करत असूनही, त्यांना हवा तितका सन्मान दिला जात नाही. त्यामुळे शहरातील सर्व फूड ब्लॉगर्सनी एकत्र येणे गरजेचे असून, फूड ब्लॉगिंगचे महत्त्व मेट्रो सिटीप्रमाणे नाशिकमध्ये वाढविण्याची गरज असल्याचा सूर नाशिककर खवय्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. खवय्येगिरीचे वेड असलेल्या नाशिकच्या मृणाल भिडे या तरुणीने, इन्स्टाग्रामवर काही महिन्यांपासून 'फूड इज लाइफ शून्य शून्य एक' हा फूड ब्लॉग सुरू केला आहे. या ब्लॉगवर आतापर्यंत ४०१ हून अधिक पदार्थांच्या पोस्ट अपलोड केल्या असून, ९ हजार ५१४ खवय्ये हा ब्लॉग फॉलो करत आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून एकत्र आलेल्या नाशिकच्या चोखंदळ खवय्यांचा मेळावा कॉलेजरोडवरील दि हॅप्पी फिस्ट कॅफमध्ये रविवारी रंगला. यावेळी सुमारे ८० हून अधिक खवय्ये आणि फूड ब्लॉगर्स या मेळाव्यात सहभागी झाले. मेळाव्यात खवय्यांनी एकमेकांचा परिचय करून घेत नाशिकच्या खवय्येगिरीवर चर्चा केली. त्यावेळी शहरातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचविण्यासाठी सोशल मीडियावरील फूड ब्लॉग हा उत्तम पर्याय आहे. नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांनीही फूड ब्लॉगर्सला प्रोत्साहित करण्याची गरज आहे. तसेच फूड ब्लॉगर्सनी ओळख देऊन पदार्थांची चव चाखण्यापेक्षा, पहिल्यांदा खवय्ये म्हणून पदार्थाची चव घ्यावी. त्यानंतर ब्लॉग लिहिण्यासाठी व्यावसायिकांची परवानगी घ्यावी, असे या मेळाव्यात ठरविण्यात आले. नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी चोखंदळ खवय्ये आणि फूड ब्लॉगर्सनी एकत्र येत सोशल मीडियावर ही चळवळ उभी करत सर्वांच लक्ष वेधून घ्यावे, असे यावेळी ठरविण्यात आले. \Bखवय्येगिरी जपणार \B फूड ब्लॉगर्सची चळवळ व्हावी आणि खाद्यसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी फूड ब्लॉगर्स दर तीन महिन्यांनी एकत्र येणार आहेत. तसेच खवय्येगिरी जपण्यासाठी आहारासंदर्भात लिहिणाऱ्या तज्ज्ञांनाही फूड ब्लॉगशी जोडणार आहे. इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर नाशिकचे फूड ब्लॉग अधिक लोकप्रिय करण्यासाठी सर्व खवय्ये आणि ब्लॉगर्सला एकत्रित आणण्याचा निर्धार मेळाव्यात खवय्यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
'जोडी पखवाज'च्या तालाने रंगले श्रोते! म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक तबल्याच्या तुलनेत मोठा, जोरकस व गंभीर आवाज असणाऱ्या जोडी पखवाजच्या तालात नाशिककर रंगले. पंडित सुखविंदर सिंग यांचे शिष्य ग्यानसिंग नामधारी यांच्या हाताने पखवाज वादनात आणलेली जादू नाशिककरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. पवार तबला अकादमी, नाशिक आयोजित आणि एस. डब्ल्यू. एस. फायनान्शिअल सोल्युशन्स प्रा.लि. प्रस्तुत पं. भानुदास पवार स्मृती समारोह रविवारी झाला. या संगीत समारोहाचे हे २१ वे वर्ष होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. मृदंगापासून उत्पन्न झालेले जोडी पखवाज या वाद्याविषयी नाशिककरांना कमालीची उत्सुकता होती. यावेळी ग्यानसिंग यांनी सांगितले की, हे वाद्य पंजाबी पखवाज म्हणून देखील ओळखले जाते. शिखांचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या दरबारातील दोन संगीतकार सत्ता आणि बलवंद यांनी या वाद्याची निर्मिती केली, असे मानले जाते. तीनशे वर्षांपूर्वी कोणतीही ध्वनिव्यवस्था नसल्याने गुरुद्वाराबाहेरील कीर्तनात हजारो लोकांना ऐकू येईल, असे असा आवाज असणारे वाद्य सध्या तितकेसे वापरात नाही. ग्यानसिंग यांनी धमार तालात पारंपरिक पंजाब घराण्याचा पखवाजचा बाज असलेले ठाह के बोल, चलन, लयकारी, रेला आणि तीन तालात पारंपरिक बंदिशी सादर केल्या. त्यांना प्रशांत महाबळ यांनी संवादिनीवर साथ केली. कार्यक्रमाचा प्रारंभ युवा पिढीतील आघाडीच्या तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या कन्या व शिष्या सावनी तळवलकर-गाडगीळ यांच्या एकल तबलावादनाने झाला. त्यांना पुष्कराज भागवत यांनी संवादिनीवर साथसंगत केली. सावनी यांनी ताल तीन तालात परंपरेनुसार पेशकार, कायदे, रेले, चलन, रव, गत, तुकडे आणि चक्रदार सादर केले. प्रारंभी रघुवीर अधिकारी, मनिषा अधिकारी व नितीन पवार, डॉ. अविराज तायडे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. मध्यंतरात नाशिकच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी कल्याण पांडे, बल्लाळ चव्हाण, अद्वय पवार, देवश्री नवघरे यांचा सत्कार ग्यानसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
रणजी करंडक म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्यात महाराष्ट्राला फॉलोऑन मिळाला. डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाच्या सहा बळींच्या जोरावर सौराष्ट्राने रविवारी तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा पहिला डाव २४७ धावांत गुंडाळला. त्यानंतर महाराष्ट्राला फॉलोऑन देण्याचा निर्णय सौराष्ट्राने घेतला. तत्पूर्वी, सौराष्ट्राने पहिल्या डावात ३९८ धावसंख्या रचली होती. दिवसाचा खेळ थांबल्यानंतर फॉलोऑनसाठी उतरलेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात तीन गडी बाद १५७ धावा केल्या. यामुळे यजमानांना सहा धावांची आघाडी मिळाली आहे. अद्याप महाराष्ट्राकडे सात फलंदाज बाकी आहेत. पहिल्या डावात केदार जाधवचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. महाराष्ट्राने सकाळी तीन बाद ८३ धावांवरून पहिल्या डावाला सुरुवात केली. शनिवारी ३८ धावांवर नाबाद असलेल्या केदार जाधवचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने ९९ धावांच्या खेळीत १ षटकार आणि १२ चौकार लगावले. मकवानाने त्याचा त्रिफळा उडवला. केदारच्या ९९ धावांच्या खेळीनंतरही यजमानांचा संघ फॉलोऑनपासून वाचू शकला नाही. सकारियाने पहिल्या डावात ६४ धावांच्या बदल्यात सहा गडी बाद केले. दुसऱ्या डावात यष्टिरक्षक रोहित मोटवानीच्या नाबाद ६५ धावांमुळे महाराष्ट्राने तीन बाद १५७ धावसंख्या उभारली. खेळ थांबला तेव्हा कर्णधार अंकित बावणे १३ धावांवर खेळत होता. रोहित त्रिपाठीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने ३६ चेंडूंत पाच चौकारांसह ३० धावा केल्या. मात्र सकारियाने त्याचा अडसर दूर केला. चिराग खुरानानेही ७७ चेंडूंत ४ चौकारांसह ३० धावा केल्या. सत्यजित बच्छावला घरच्या मैदानावर पुन्हा अपयशी ठरला. त्याला एकही बळी मिळू शकला नाही. मात्र, त्याने फलंदाजी करताना चांगला खेळ केला. २५ चेंडूंत ४ चौकारांसह २१ धावा केल्या. सुरुवातीला आलेल्या जय पांडेने १५ धावा केल्या. मात्र, सकारियाने त्याला हार्विक देसाईकरवी झेलबाद केले. महाराष्ट्राचा खेळ संपला तेव्हा २४७ धावसंख्या झाली होती. सौराष्ट्राची महाराष्ट्रावर १५१ धावांची आघाडी होती. दुसऱ्या पारीला सुरुवात करताना सौराष्ट्राने महाराष्ट्राला खेळण्याची संधी दिली. जय पांडेने डावाची सुरुवात केली. त्याने ६० चेंडूंत २६ धावा केल्या. मात्र, सकारियाने त्याला अर्पित वासवदाकरवी झेलबाद केले. त्याच्याबरोबर असलेल्या चिराग खुराणाने २४ चेंडूत १५ धावा केल्या. रविवारचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राची धावसंख्या ३ बाद १५७ इतकी होती. नाशिकची धावपट्टी चांगली आहे. रविवारी आम्ही पाच विकेट घेण्याचा डाव आखला होता; मात्र तीन गडी बाद करू शकलो. सोमवारी सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त खेळाडू बाद करण्यावर आमचा भर राहील. जयदेव उनाडकट, कर्णधार, सौराष्ट्र
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
४६ कोटींच्या पाणीपट्टी वसुलीसाठी कारवाई म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील ४६ कोटी ३२ लाखांपर्यंत पोहचलेल्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी अवघे तीन महिने शिल्लक राहिले आहेत. महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकलेल्या तब्बल ३६,२०९ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून ३३ कोटी ८० लाखांच्या थकबाकीसह तब्बल ४६.३२ कोटी रुपयांची वसुली केली जाणार आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली रोडावली आहे. महापालिकेने एकीकडे घरपट्टी वसुलीवर जोर दिल्याने पाणीपट्टीची देयके वाटपाला उशिर झाला आहे. त्यातच थकबाकीदारांची संख्याही मोठी असल्याने घरपट्टीची वसुली यंदा चांगली झाली असली तरी पाणीपट्टीची वसुली मात्र थंडावली आहे. देयके मिळत नसल्याने नळजोडणीधारकांकडून केल्या जाणाऱ्या दिरंगाईमुळे पाणीपट्टी थकबाकीचा आकडा ४५ कोटींचा पल्ला पार गेला आहे. पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर कारवाईसाठी महापालिकेने टप्पे निश्चित केले असून पहिल्या टप्प्यात पाच हजारांपेक्षा अधिक पाणीपट्टी असणाऱ्या नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नळजोडणीधारकांची संख्या ३६ हजार २०९ एवढी आहे. असे आहेत थकबाकीदार विभाग............. थकबाकीदार संख्या पंचवटी .......... ८,८११ नाशिक पूर्व ....... ७,३१५ सातपूर .............. ६,५७५ नाशिकरोड ....... ५,९३० सिडको ....... ५,९१२ नाशिक पश्चिम ....... १,६६६ एकूण...............३६,२०९
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
शांताबाईंचे चळवळीत येणे ही मोठी गोष्ट ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांचे प्रतिपादन म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शांताबाई दाणी यांचे आयुष्य अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. त्यांचे वडील नशेच्या आहारी गेले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लहानग्या शांताबाईंना त्यांची आई व आजी यांनी कष्टाने वाढवले, त्यांचे शिक्षण केले. दलित स्त्रियांची स्थिती अत्यंत बिकट असताना, सुशिक्षित असलेल्या शांताबाईंचे दलित चळवळीत येणे, ही मोठी गोष्ट होती, असे प्रतिपादन दलित चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले. सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ग्रंथालय सप्ताहाचे दुसरे पुष्प डांगळे यांनी गुंफले. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डांगळे यांनी 'शांताबाई दाणी यांचे सामाजिक योगदान' या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, रिपब्लिकन चळवळीत अनेक गट-तट असताना, शांताबाई दाणी खंबीरपणे उभ्या राहून काम करीत राहिल्या. त्यांची विचारधारा एका समाजासाठी नव्हे, तर सर्वव्यापक होती. त्यांच्या कर्तृत्वातून त्यांचे लखलखते तेजस्वीपण उठून दिसते. प्रारंभीच्या काळात त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे समर्थपणे नेतृत्व केले. तेव्हाच्या पुरुषप्रधान मानसिकतेच्या काळातही शांताबाई पुरुषांच्या बरोबरीने काम करीत. त्या अत्यंत धीट होत्या. त्या कोणाला घाबरत नसत. स्वभावातील बंडखोरपणा त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याकडून घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही शांताबाईंचा चळवळीतील दृष्टिकोन आवडत असे. यंदाच्या बी. लिब. परीक्षेत प्रथम येणार्या छाया जाधव, तर एम. लिब. परीक्षेत प्रथम येणाऱ्या प्रिया केदार यांना कै. मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते विचारमंचावर उपस्थित होते. डॉ. धर्माजी बोडके यांनी प्रास्ताविक केले. बी. जी. वाघ यांनी परिचय करून दिला. प्रा. गंगाधर अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र सांगळे यांनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
लोगो - सोशल कनेक्ट आदिवासी पाड्यावर कपडे वाटप म. टा. प्रतिनिधी, नाशिक अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था आणि जिल्ह्यातील सर्व शिंपी समाज मंडळांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पाड्यावर कपडे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वर परिसरातील हरसूल येथील कुळवंडी आणि खर्डी पाडा या ठिकाणी संस्थेच्यावतीने स्वेटर, ब्लँकेट यांसह दैनंदिन जीवनात वापराचे कपडे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील निकुंभ, जिल्हाध्यक्ष संदीप खैरनार, महिला कार्याध्यक्ष वंदना जगताप, जिल्हाध्यक्ष सुनीता शिंपी यांनी पाड्यावरील नागरिकांशी संवाद साधला. या उपक्रमाच्यावेळी पाड्यावरील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्यावतीने समाजपयोगी उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असून, आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही संस्था उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संजय खैरनार, महिंद्र जगताप, राजेंद्र खैरनार, गोकुळ बोरसे, सोनल नेरे यांसह संस्थेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. -- नेत्रतपासणीही होणार नाशिक लायन्स क्लब आणि अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्यावतीने येत्या काही दिवसांत हरसूल येथील बांधवांसाठी नेत्रतपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात डोळ्यांचे विकार आणि मोतीबिंदूची तपासणी केली जाणार असून, नेत्ररोग असणाऱ्यांना संस्था मदत करणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
टीम मटा, नाशिकरोड नाशिकरोड रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) या दोन्ही यंत्रणांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. प्रवासी व रेल्वेगाड्यांची वाढलेली संख्या, नवीन जबाबदाऱ्या आदींमुळे ताण वाढला आहे. मनुष्यबळवाढीचे पत्र वरिष्ठांना देऊनही कार्यवाही झालेली नाही. भुरटे चोर, गुंड, समाजकंटक त्याचा फायदा घेत असल्याने प्रवाशांना भुर्दंड बसत आहे. नाशिकरोड स्थानकातून दिवसाला दीडशे तर महिन्याला सुमारे ४५०० रेल्वेगाड्या धावतात. दिवसाला पंधरा हजार आणि महिन्याला लाखो प्रवासी प्रवास करतात. या सर्वांच्या सुरक्षेसाठी आरपीएफचे केवळ ४९ जवान आहेत. ८१ जवानांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, देवळाली येथे मेल, एक्स्प्रेसही थांबू लागल्याने आरपीएफचे नवीन दूरक्षेत्र देवळालीत सुरू झाले. आरपीएफचे अकरा जवान तिकडे देण्यात आले. त्यामुळे नाशिकरोडला फक्त ३८ कर्मचारी उपलब्ध आहेत. कमी मनुष्यबळात अडीचशे किलोमीटर हद्दीतील बारा रेल्वेस्थानके व परिसरात गस्त घालावी लागते. धावत्या रेल्वेगाडीतही जवान द्यावे लागतात. दोन गाड्यांवर देखरेखीची पूर्ण जबाबदारी नाशिकरोड आरपीएफवर आहे. त्यात पाच जवान द्यावे लागतात. साप्ताहिक सुटी, रजा, आजारपणांमुळे सर्व ३८ जवान उपलब्ध होत नाहीत. नाशिकरोड स्थानकात पार्किंगवर लक्ष ठेवण्यासाठी जवानच नाहीत. वरिष्ठ अधिकारी आल्यावर मनुष्यबळ द्यावे लागते. नाशिकरोड आरपीएफची हद्द इगतपुरीपासून ओढ्यापर्यंत होती. आता कसबे सुकेणे व खेरवाडीचा भाग आल्याने काम वाढले आहे. या हद्दीत एकूण आठ स्थानके येतात. चेन पुलिंग, लूटमार, गाडीतून प्रवासी पडणे, घातपात आदी घटना वाढल्या आहेत. रेल्वे प्रवाशांसह रेल्वे मालमत्तेचे रक्षण करणे, स्थानकातील व रेल्वेतील गुंडगिरीला आळा घालणे आदी जबाबदारी आरपीएफची आहे. हे जवान स्थानकाबरोबरच गाड्यांमध्येही गस्त घालतात. लूटमार, गुंडगिरी करणाऱ्यांना प्रतिबंध करतात. पोलिसांवरही ताण आरपीएफप्रमाणेच नाशिकरोड रेल्वे पोलिसांची गत आहे. रेल्वे पोलिस ठाण्यात दोन उपनिरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक व ३४ कर्मचारी आहेत. यात सात महिला आहेत. कर्मचारी संख्या ६० हवी. कसबे सुकेणे ते लहवित अशी या ठाण्यांची हद्द आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. तपासी अंमलदार संख्या कमी आहे. एका ठाणे अंमलदाराकडे वर्षाला वीस गुन्हेही खूप होतात. मात्र, नाशिकरोड पोलिस ठाण्यात किमान ३० तपास असतात. एका तपासासाठी अनेक महिने लागतात. येथे तर महिन्याला तीन प्रकरणांचे तपास करावे लागतात. बारा तास काम, ढासळते आरोग्य, लोकांची टीका, वाढते गुन्हे, अपुरे मनुष्यबळ, अपुरी जागा, स्वच्छतागृहाची वानवा, मोडकळीस आलेली निवासस्थाने अशा समस्यांना तोंड देत हे पोलिस कर्तव्य बजावत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट