Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आदिवासी संस्कृती समजून घ्यावी

$
0
0

राजेंद्र जोशी यांचे प्रतिपादन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी वारली जमात अभावग्रस्त असूनही कोणतीही तक्रार करीत नाही. निसर्गाच्या सानिध्यात साधी, सोपी, हव्यास नसलेली जीवनशैली जगतात व समाधानी असतात. शहरातील कलाप्रेमींनी वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यायला हवी, असे प्रतिपादन शंकराचार्य न्यास संचलित गोशाळेचे प्रमुख राजेंद्र जोशी यांनी केले.

ग्रीन केअर संस्था, विनर ग्रुप आणि वारली आर्ट फाउंडेशनतर्फे रविवारी 'चित्रांजली' वारली चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतींना समर्पित या प्रदर्शनाचे उद्घाटन राजेंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर उपस्थित होते. कुसुमाग्रज स्मारकातील कलादालनात झालेल्या या प्रदर्शनात ज्येष्ठ कलाशिक्षक पूर्णिमा आठवले, त्यांच्या विद्यार्थिनी शर्वरी देशपांडे, सिमरन संधू, श्रावणी शिंदे, हर्षाली पुनावाला, ओवी नानिवडेकर यांची ५० पेक्षा जास्त वारली चित्रे मांडण्यात आली. संजय देवधर यांनी कॅन्व्हासवर रंगवलेली पेंटिंग्ज आणि सिन्नरचे रवींद्र वैष्णव यांच्या आकर्षक पॉटसचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती गाडगीळ आणि कर्नल अरुण गाडगीळ होते. प्रारंभी पूर्णिमा आठवले यांनी स्वागत केले व संस्थेच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वाती गाडगीळ म्हणाल्या, की कलाकार बुद्धी, मन, हृदय आणि बोटांच्या समन्वयातून कलानिर्मिती करतात. माणसाचा 'मानव' होण्यासाठी कला महत्त्वाची ठरते हे वारली कलेतून प्रत्ययाला येते. संजय देवधर म्हणाले, की आदिम कलेतील सौंदर्य शहरी रसिकांपर्यंत नेतानाच आदिवासी बांधवांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला जातो. नाशिकमध्ये वारली चित्रसंग्रहालय व्हावे असा मानसही त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांमधून आदिवासी जीवनशैली, बहारदार निसर्ग, दैनंदिन जीवन, समृद्ध पर्यावरण यांचा प्रत्यय रसिकांना आला. सोनल चिनागी हिने सूत्रसंचालन केले. सलिम सय्यद यांनी मान्यवरांचे सत्कार केले. शर्वरी देशपांडे हिने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटीत बुधवारी निर्धार परिवर्तन यात्रा

$
0
0

इगतपुरी तालुक्यात गणनिहाय बैठका

■■

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे, एनसीपी कनेक्ट अॅपची माहिती देणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर सुरू असलेली निर्धार परिवर्तन संघर्ष यात्रा बुधवारी (दि. १६) घोटी येथे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्धार परिवर्तन मेळावा रविवारी झाला. याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन करण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी तालुक्यात गणनिहाय बैठका घेत आहेत.

राज्यभर काढण्यात येत असलेली निर्धार परिवर्तन - संघर्ष यात्रा घोटी बाजार समिती प्रांगणात येत आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री मधुकर पिचड, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मेळावा तालुक्यातील खेड गटातील खेडभैरव व धामणगाव येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समीर भुजबळ यांनी बैठक घेतली. यावेळी माजी आमदार जयवंत जाधव, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुने, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, बाळासाहेब वाघ, गोरख बोडके, सुनील वाजे, माजी उपसभापती पांडूरंग वारुंगसे आदिंनी निर्धार मेळावाबाबत माहिती दिली.

'राष्ट्रवादी युवक'ची कार्यकारिणी जाहीर

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

राष्ट्रवादी काँग्रेसची नाशिकरोड विभागीयस्तरीय बैठक जेलरोड येथील पाटीदार भवनमध्ये रविवारी झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नाशिकरोड विभागीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी सर्व पोलिंग एजंट आणि बुथ प्रमुखांचा आढावा घेतला.

नवीन कार्यकारिणीमध्ये नाशिकरोड अध्यक्षपदी सत्यम पोतदार, कार्याध्यक्षपदी सोनू वायकर, उपाध्यक्षपदी शाबीर शेख, सरचिटणीस रुपेश थोरात, प्रभाग अध्यक्ष सिद्धांत भवर, गणेश गांगुर्डे, अमित घोडे, सौरभ पवार, स्वप्नील फुले, संतोष पुंड, प्रसाद वाघ यांचा समावेश आहे. दरम्यान, निवडणुका जवळ आल्याने संघटन बांधणीवर भर द्यावा, असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले.

बैठकीस राष्ट्रवादीचे विभाग प्रमुख मनोहर कोरडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब मते, गजानन शेलार, कैलास मुदलीयार, गौतम पगारे, विशाल बने, संजय बोडके, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांनी भुजबळ यांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाज सेवा संघातर्फे मोरॅक स्पर्धा उत्साहात

$
0
0

समाज सेवा संघातर्फे

\Bमोरॅक स्पर्धा उत्साहात

\Bनाशिक : महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पहिली जिल्हा मोरॅक स्पर्धा विद्यालयात रविवारी उत्साहात पार पडली. संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे यांनी मोरॅक खेळासाठी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या खेळात विविध वयोगटातील खेळाडू सहभागी झाले. यावेळी नाशिक मोरॅक असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मराठे, मुंबई मोरॅक असोसिएशनचे सचिव छत्रपती पुरस्कारप्राप्त महेंद्र तांबे, उद्योगपती सुरेश अलई, सचिव सुधाकर साळी, सहसचिव शांताराम अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता टाकळकर, प्राथमिक मुख्याध्यापिका शीतल पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्योतिकलश’चा मिटेना वाद

$
0
0

तोडगा काढण्यासाठी मध्यस्ताची गरज

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्योतिकलश सभागृह महापालिकेने सील केल्याच्या घटनेला रविवारी सहा दिवस उलटून गेले. परंतु, या प्रकरणी काही तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक वर्तुळातील बड्या मंडळींनी चुप्पी का साधली आहे, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणात मध्यस्ती करून तो मिटवण्याची गरज आहे, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

कुसुमाग्रज यांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात आलेले हे सभागृह नाटकांच्या तालमीसाठी तसेच, इतर छोट्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगात आणले जाते. मात्र स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीवरून महापालिकेने हे सभागृह सहा दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता सील केले. या संदर्भात रहिवाशांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असून, कोणत्याही करारनाम्याची मुदत साधारण ३० वर्षे असते. लोकहितवादी मंडळाला ही जागा ताब्यात घेऊन ३८ वर्षे उलटली आहेत. या जागेवर उद्यान उभारून मगच सभागृह बांधावे, अशी करारनाम्यात अट आहे. मात्र तिचे उल्लंघन करण्यात आले आहे. या जागेची देखभाल केली जात नसल्याने तो मद्यपी, गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. सभागृह रहिवाशांना वापरासाठी दिले जात नाही. मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. कुसुमाग्रजांनी विशिष्ट उद्देशाने सभागृह बांधले असले, तरी त्यांच्या नावाचा भावनिक वापर करून लोकहितवादी मंडळ ताबा सोडण्यास तयार नाही. राका कॉलनीत सर्व रहिवासी सुसंस्कृत असून, कोणी दगडफेक वा फलक फाडण्याचे काम करणारे नाही. तरी त्यांची अकारण बदनामी केली जात आहे. उलट लोकहितवादी मंडळाकडूनच सभागृहाचा व्यावसायिक वापर केला जात असून, एका महिलेकडून ५० हजार रुपये जागाभाडे वसूल करण्यात आले. एका संस्थेला व्यावसायिक उद्देशासाठी सभागृह भाड्याने देण्यात आले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी रहिवाशांनी विरोध केल्यानंतर त्या संस्थेला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

...

लवकरच होणार संस्था स्थापन

राका कॉलनीतील नागरिक लवकरच संस्था स्थापन करीत असून, महापालिकेने सभागृह या संस्थेच्या ताब्यात द्यावे. या संस्थेच्या परवानगीने नाटकांच्या तालमींसाठीही सभागृह उपलब्ध करून दिले जाईल. अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूटपाथवरच्या नागरिकांना मायेची उब

$
0
0

फूटपाथवर ब्लँकेटवाटप

नाशिक : शहरात वाढत्या कडाक्याच्या थंडीत त्रिमूर्ती चौक परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. नाशिक ट्रान्सपोर्टकडून सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. दरवर्षी थंडीच्या हंगामात गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप केले जाते. यंदाच्या वर्षी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत उपक्रम राबविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्र जिवाचे’तर्फे मदतीचा हात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मैत्र जिवाचे फाउंडेशन, पंचवटी या सांस्कृतिक व सामाजिक संस्थेच्या वतीने माइल स्टोन फॉर स्पेशल चिल्ड्रन ट्रस्टला एक लाख २१ हजार रुपये, तर मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थेला २१ हजार रुपये निधी देण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिर येथे 'स्वर-श्रेया' हा नावीन्यपूर्ण संगीतमय कार्यक्रम झाला त्यात हा निधी देण्यात आला.

मैत्र जिवाचे फाउंडेशनतर्फे समाजहिताची परंपरा अखंडपणे सुरू ठेवत यंदाच्या वर्षी संस्थेतर्फे व काही समाजबांधवांच्या मदतीने व या कार्यक्रमाच्या रकमेतून माइल स्टोन फॉर स्पेशल चिल्ड्रन ट्रस्ट, नाशिक या संस्थेच्या सुमारे ४५ मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना तसेच मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था, विल्होळी, नाशिक या शाळेच्या ३२ विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले.

स्वर श्रेया कार्यक्रमात नाशिकच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मीना परूळकर-निकम व गायिका श्रेयसी रॉय तसेच सुप्रसिद्ध गायक चैतन्य कुलकर्णी, मुंबई यांनी गाणी सादर केली. सत्यम शिवम सुंदरम, सुन रहा है ना तू, बदमाश दिल ये, बैरी पिया बडा बेदर्दी, घुमर, बहारा, झुबी झुबी, अधीर मन झाले, मनवा लागे, सिंगार को रहने दो आदी गाण्यांचा समावेश होता.

कार्यक्रमात मैत्र जिवाचे फाउंडेशनच्या कामावर आधारित एक चित्रिफत दाखवण्यात आली. कार्यक्रमास संगीतकार प्रशांत महाबळ यांनी वाद्यवृंद संयोजन केले. निवेदन पुणे येथील निवेदक संदीप पंचवाटकर यांनी केले. फाउंडेशनच्या वतीने अ‍ॅड. अजय निकम, गणेश भोरे, सुनील बोरसे, हर्षद मटकर व महेश महंकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅकमेल होणारे सरकार नकोच!

$
0
0

अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीचे गुपीत बाहेर काढण्याची धमकी देशाच्या पंतप्रधानाला विदेशी कंपन्या देऊन ब्लॅमकेल करत आहे. जे सरकार आतापर्यंत दुसऱ्याला ब्लॅकमेल करत होते तेच सरकार ब्लॅकमेलला बळी पडले आहे. त्यामुळे असे ब्लॅकमेलिंग होणारे सरकार आपल्याला नको, असे सांगत भारीप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

अनंत कान्हेकर मैदानात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत बोलतांना त्यांनी हा आरोप केला. यावेळी आंबेडकर यांनी, नोटाबंदी जाहीर होण्याअगोदर विदेशी कंपन्याबरोबर जुलै महिन्यात डेबिट व क्रेडिट कार्ड बनवणाऱ्या कंपन्याबरोबर करार झाला होता. त्यानंतर नोटाबंदी करण्यात आली. पण, त्याचा वापर जास्त होत नसल्यामुळे सरकारने आठ दिवसापूर्वी पुन्हा दोन हजाराच्या नोट कमी छापण्याचा निर्णय घेतला. यामागे हे ब्लॅकमेलिंग असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने नोटाबंदी काळापैसा बाहेर काढण्यासाठी केली नाही तर ती आमच्याशी केलेल्या करारामुळे केली असे गुपीत आम्ही लोकांना सांगू, अशी धमकी या कंपन्यानी दिल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. या सभेत त्यांनी राफेल करारातही सरकार देशाच्या सुरक्षिततेशी भाजप खेळत आहे. विमाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणाताच करार न केल्यामुळे ती बिघडली तर ती कचऱ्यात जाणार असल्याचेही सांगितले.

राज्यात १६९ कुटुंबाचे सरकार

राज्यात सत्ता मराठ्यांची नाही तर ती फक्त १६९ कुटुंबाची आहे. कोणत्याही ठिकाणचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य घ्या त्यांचे नाते एकमेकांशी जोडलेले आहे. त्यामुळे राज्यात फक्त १६९ कुटुंबाभोवतीच राजकारण फिरते. त्यामुळे वंचितांना सत्तेत स्थान मिळत नाही. मराठ्यांचे सरकार असते तर कांदा रस्त्यावर आला असता का? आत्महत्या झाल्या असत्या का ? असा प्रश्न करून अॅड. आंबेडकर यांनी या कुटंबाच्या हातातून सत्ता काढा त्या दिवशी शेतकरी आत्महत्या थाबंतील, असे आवाहन वंचित मराठा समाजाला केले.

शिवसेनेचे भांडण प्रियकरांचे

शिवसेना व भाजपचे भांडण नवरा-बायकोचे आहे, असे बोलले जाते. पण, हे भांडण नवरा-बायकोचे नसून ते प्रियकर-प्रेयसीचे आहे. नवरा-बायकोचे भांडण झाले तर ते वेगळे होतात. पण, प्रियकर-प्रेयसीचे भांडण झाले तर ते अधिक मागून संपवात, असे सांगून यांच्या भांडणाकडे लक्ष न देता. वंचितांची सत्ता आणा असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावना नाही; पुरावे महत्त्वाचे

$
0
0

जिल्हा न्यायाधीश एस. सी. खती यांचे प्रतिपादन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायव्यवस्थेसाठी काम करताना खरं बोलण्याचे धाडस, दोन्ही बाजू ऐकून घेण्याचे सामंजस्य असावे. कायद्यात भावना नाही तर पुरावे महत्त्वाचे असतात. त्यामुळे जितक्या वेळा पुराव्यांचा अभ्यास करता येईल तितक्या वेळा तो करावा, असे प्रतिपादन जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. खती यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे एनबीटी लॉ कॉलेज व डी. टी. जायभावे प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १३व्या राष्ट्रस्तरीय मूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पारितोषिक वितरणाने या स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की, कायदा आणि वेळ यांचा मेळ घातल्यास आपण आदर्श व्यक्ती होऊ शकतो. स्पर्धांमधून भविष्याची तयारी होत असते. ही तयारी मूट ट्रायलमधून होईल असे सांगत स्पर्धक विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कायदा समजून घेण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

...

\Bस्पर्धेतील विजेते \B

- बेस्ट जजमेंट अॅवॉर्ड - अभिजित खोत (डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती)

- बेस्ट मेमोरिअल अॅवॉर्ड - दयानंद लॉ कॉलेज, सोलापूर

- बेस्ट विटनेस अॅवॉर्ड - राधिका पुरोहित, दीपेश सक्सेना, प्रतीक बानभेरू, आकाश जाधव

- बेस्ट व्हॉलेंटिअर अॅवॉर्ड - एन. बी. टी. लॉ कॉलेज, नाशिक

- बेस्ट एक्झामिनेशन ऑफ विटनेस अॅवॉर्ड - अभिषेक चौहान (डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती)

- बेस्ट क्रॉस एक्झामिनेशन - विशाखा सोनटक्के (डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती)

- बेस्ट अर्ग्युमेंट अॅवॉर्ड - आनंद राठोड (अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ)

- बेस्ट अॅडव्होकेट लेडी अॅवॉर्ड - ध्वीजा शाह (सिम्बॉयसिस लॉ कॉलेज, हैदराबाद)

- बेस्ट अॅडव्होकेट मेल अॅवॉर्ड - नवनीत डोगरा (सिम्बॉयसिस लॉ कॉलेज, हैदराबाद)

- रनर अप टीम अॅवॉर्ड - ऋषिकेश पानसरे, आनंद नेटावटे, श्रीलेखा भागवत (मविप्र समाज लॉ कॉलेज)

- विनर टीम अॅवॉर्ड - अभिषेक चौहाण, विशाखा सोनटक्के, अभिजित खोत (डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजमाता जिजाऊ शिवरायांच्या गुरू

$
0
0

शिवचरित्र व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

लहानपणापासून स्वराज्य निर्मितीच्या काळापर्यंत जिजाऊ माँ साहेब शिवरायांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले. शहरातील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झेड. बी. पाटील महाविद्यालयात शनिवारी (दि. १२) आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न देणाऱ्या राजमाता जिजाऊ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले की, जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळेच शिवाजी राजे घडले. युद्धाच्या नियोजनात जिजाऊ या शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. आदिलशाही, निजामशाही व कुतूबशाही यांच्या अन्याय व अत्याचाराने त्रस्त अशा समाजात आत्मविश्वास निर्माण करीत अत्यंत कठीण परिस्थिती जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करून स्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले, असेही ते म्हणाले.

या वेळी अध्यक्षस्थानी जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ. अरुण झुलालराव साळुंके होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, प्रा. सुधीर पाटील, संचालक अजितराव मोरे, नानाभाऊ कोर, अनिल चौधरी, शेखर सूर्यवंशी, स्मिता साळुंके, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कर्तृत्ववान युवक घडविणे मातेचे कार्य
वर्तमान परिस्थितीत युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेले सर्वोच्च समर्पण व शिवरायांचे कर्तृत्व याचे चिंतन युवा मनावर होणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रासाठी शिवरायांसारखा न्यायप्रिय, स्त्रियांचा आदर करणारा धैर्यवान, चारित्र्यवान, कर्तृत्ववान युवक घडविणे प्रत्येक मातेचे पवित्र कार्य आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी समाजात आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शिवबांना मार्गदर्शन केल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुणराव साळुंके म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलुतेदारांचे महत्त्व साहित्यातून उजागर करण्याची गरज

$
0
0

डॉ. चक्रपाणी चोप्पावार यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कारागिरांचे, बलुतेदारांचे महत्त्व साहित्यातून नव्याने उजागर करण्याची खरी गरज आहे. कारागिरांचे संवर्धन न झाल्यास समाज रसातळाला जाईल, असे स्पष्ट मत पहिल्या एक दिवसीय अ. भा. विश्वकर्मा साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. चक्रपाणी चोप्पावार यांनी व्यक्त केले. मराठी साहित्यात बलुतेदारांचे चित्रण आहे का, असा प्रश्न आहे. आजपर्यंत वंचित कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या व विश्वकर्मा समाजाच्या वेदनांवर फुंकर मारण्यापलीकडे काहीही झालेले नाही, असेही ते म्हणाले.

देवपूर येथील पद्मश्री बिल्डर्स व विश्वकर्मीय समाज संघटना परिवाराच्या विद्यमाने धुळ्यात रविवारी (दि. १३) पहिले एक दिवसीय अ. भा. विश्वकर्मा साहित्य संमेलन झाले. शहरातील राजर्षी शाहू नाट्यगृहात नागोजी सुतार नगरीत व श्री संत नरहरी मंचावर झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अलुतेदार, बलुतेदार या विषयाचे गाढे अभ्यासक तथा लेखक डॉ.प्रल्हाद लुलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कृष्णा पोतदार, डॉ. प्रकाश लोहार, यल्लारी सुतार, केदारनाथ धिमाण, अशोक थोरहाते, कथाकथनकार स्वामी दिव्यानंद बापू, इंदूमती सुतार, डॉ. चंद्रकांत मोरे, सुगन बरंठ, मयुर मिस्तरी आदी उपस्थित होते.

डॉ. चोप्पावार म्हणाले की, आपली अस्मिता आपणच जागृत करायला हवी. त्यासाठी आपल्या संतांची आपण माहिती करून घेतली पाहिजे. कारण संतांपासून आपल्याला उर्जा मिळते. आज विश्वकर्मा संस्कृतीला उजागर करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे. त्यात सर्व साहित्यिकांना स्थान दिल्यास चांगल्या साहित्याची निर्मिती होऊ शकते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी, जाती, धर्माचे राजकारण करणाऱ्या सरकारचा समाचार घेत बलुतेदारांना स्वाभिमानी जीवन जगण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आज प्रत्येक समाज इतर समाजाकडे संशयाच्यावृत्तीने पाहतांना दिसतो. प्रत्येकाची संमेलने, मेळावे वेगवेगळे होतात. कारण, व्यवस्थाच तशी निर्माण केली गेली आहे. बारा बलुतेदार एकत्र आल्यास निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. राममंदिर, मशिदीपेक्षा आमच्या पोटाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी आपण आधुनिक होणे गरजेचे आहे. या वेळी ऋचा बिरारी यांनी 'धन्य धन्य सुतार देवा' हे गीत सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.

पाच कलावंतांचा सन्मान
संमेलनात विविध समाजातील पाच कलावंतांचा सन्मान करण्यात आला. त्यात पापालाल पवार, वसंत आंबेकर, चंद्रकांत मोरे, जगदीश देवपूरकर, भारत रेघाटे यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देण्यात आले. त्यानंतर स्वामी दिव्यानंद बापू (गुजरात) यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी सुभाष अहिरे यांना समस्त गाडी लोहार समाजाच्यावतीने विश्वकर्मा पुराण लिहिलेले ताम्रपट देऊन समाजबांधवांतर्फे सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदांत भेद नको, भक्तीत खोट नको

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेदांत भेद नको व भक्तीत खोट नको, असे सांगत भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला तर काय होते, याची कथा सांगत श्रृंगेरी शारदापीठाचे जगदगुरू शंकराचार्य प. पू. विधूशेखर भारती यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले.

शंकराचार्य न्यास, धर्मजागरण पीठ, श्री शृंगेरी मठ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था, महर्षी गौतम गोदावरी वेद प्रतिष्ठान या शहरातील विविध संस्थांच्यावतीने श्रृंगेरी शारदापीठाचे जगदगुरू शंकराचार्य प. पू. विधूशेखर भारती स्वामी महाराज यांचा नागरी सत्कार करण्यात आला. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संकुलातील कुर्तकोटी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन धर्माच्या उत्थान व प्रसारासाठी होत असलेल्या विजययात्रेसाठी जगदगुरू शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती यांचे नाशिकला आगमन झाले असून, पंचवटीतील शृंगेरी मठात त्यांचे वास्तव्य आहे. दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, शृंगेरी चे ३६ वे आचार्य जगदगुरू शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांच्या कृपाशिर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी विधूशेखर भारती यांनी कर्नाटकमधून विजययात्रेचा प्रारंभ केला आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात आली असून शंकराचार्य संकुल येथे प्रवचनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी गायत्री यांनी स्वागतगीत सादर केले. शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी यांनी शंकराचर्यांचे स्वागत करून त्यांना न्यासाच्या कार्याबाबत माहिती दिली. शांतारामशास्त्री भानोसे यांनी शंकराचार्यांचा परिचय करून दिला. सन्मानपत्र वाचन व सूत्रसंचालन अतुल तरटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष निर्यातीसाठी धोरण ठरविणार

$
0
0

कृषिमंत्र्यांसह वाणिज्य मंत्र्याचे आश्वासन

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

द्राक्षाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळावा यासाठी वाणिज्य मंत्रालयाने धोरण ठरवावे तसेच जिल्ह्यातील निर्यातदार द्राक्ष उत्पादकांचे २०१० या वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी कृषी व वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. खा. चव्हाण यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली असून याबाबत धोरण ठरविणार असल्याचे आश्वासन मंत्र्याकडून देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील द्राक्षाच्या प्रश्नाबाबत खासदार चव्हाण यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, दिंडोरी लोकसभा भाजपाचे विस्तारक अजित ताडगे, नाशिक जिल्हा भाजप संघटक बापूसाहेब पाटील, कैलास भोसले आदींसह द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह दोन्ही कृषी मंत्री व वाणिज्य मंत्र्याची भेट घेतली उपस्थित होते. यावर दोन्ही मंत्र्याकडे बैठक झाली. याबाबत आंतरराष्ट्रीय बाजारातील नवीन व्हरायटी असलेल्या द्राक्ष उत्पादनासाठी पेटंट विकत घेऊन लागवड करणे तसेच सार्क देशांना निर्यात करणे कामी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येऊन यायाबबत लवकरच धोरण ठरविण्यात येईल, असे कृषी मंत्री, वाणीज्यमंत्री यांनी खा. चव्हाण यांना आश्वासन दिले.

एपेडा केंद्रीय कृषी प्राधिकरणाच्या चुकीमुळे २०१० या वर्षात अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान होऊनही निर्यातदार द्राक्ष उत्पादकांना नुकसानभरपाई मिळत नाही, याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर वाणिज्य मंत्री प्रभू यांनी नुकसान भरपाई प्रस्तावातील त्रुटी दूर करून २०१० मध्ये नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादककांना भरपाई देण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने कार्यवाही सुरू केल्याचे प्रभू यांनी शिष्टमंडळास कळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदूबाबाचा भांडाफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी अटक केली. संशयितांविरोधात महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ कलम ३ भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारात फिर्यादी महिलेने जीवावर उदार होऊन या प्रकारचा भांडाफोड करण्यासाठी प्रयत्न केला. यात तिला तिचे साथीदार अंधश्रद्धा विरोधात काम करणारे आणि छत्रपती सेनेचे तुषार गवळी, तानाजी शेलार, नीलेश शेलार, धीरज खोळंबे (रा. राणेनगर, नाशिक) यांनी महत्त्वाची साथ दिली. पीडित महिलेने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आणि पूजेसाठी स्वतःला मागणी घातल्याची बाब आपल्या साथीदारांना सांगितली आणि या प्रकाराचा पर्दाफाश करण्याची योजना आखली.

याबाबत पीडित महिलेने निफाड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या महिलेची आणि संशयित भोंदूबाबा योगेश नागरे याची प्रसाद जाधव याने निफाड येथे १२ जानेवारी रोजी शिवपार्वती लॉन्स येथे भेट घडवून आणली. या भेटीत बाबाने महिलेला शुद्धीकरण विधी व पूजा याची माहिती देऊन १३ जानेवारीला बोलावले. ही बाब महिलेने साथीदारांना सांगितली. यानंतर पीडित महिला प्रसाद जाधव आणि डॉ. योगेश सोनार यांच्यासह नाशिक येथून निफाड येथे आले. शिवपार्वती लॉन्सजवळ बाबाच्या अल्टो गाडी (एमएच १४, ईएक्स १५७९) मध्ये पीडित महिला व बाबा हे बसले. बाबा आपल्यासोबत काहीतरी वाईट करणार हे लक्षात आल्याने महिलेने तिच्या सहकाऱ्यांना एसएमएस केला. ही बाब सहकाऱ्यांनी पोलिसांना कळवली. भोंदूबाबाला व उपस्थितांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी या सर्व प्रकारची माहिती पीडित महिलेने सांगितली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी निफाड तालुक्यातील दोघांसह नाशिकमधील एकास ताब्यात घेतले. योगेश नागरे (शिवरे, ता. निफाड), योगेश सोनार (पवननगर, सिडको, नाशिक) प्रसाद जाधव (टाकळी विंचूर, ता. निफाड) या तिघांना सोमवारी पहाटे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश घोटाळ्याची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील शाळांमधील गणवेश खरेदीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश महासभेने दिले असतानाच, आता राज्यसरकारनेही चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जातात. सरकार यापूर्वी गणवेश खरेदीसाठी पालकांच्या बँक खात्यावर रक्कम देत होते. परंतु, ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने राज्य सरकारने यात बदल करून पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीमार्फत करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी प्रतिगणवेश असलेला दर २०० रुपयांवरून ३०० रुपयांवर नेला होता. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला सहाशे रुपयांत गणवेश खरेदी करण्याचे आदेश शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले. त्यानुसार महापालिकेने खरेदीची प्रकिया सुरू केली होती. परंतु, वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी पालिकेत विशिष्ट ठेकेदारांसाठी काही नगरसेवकांकडूनच लॉबिंग सुरू केले होते. ठेकेदाराने ३०० ऐवजी २०० रुपयांतच गणवेश दिल्याची चर्चा सुरू झाली. तत्कालीन अधिकाऱ्यांनीही मग या ठेका प्रकरणात वाजवीपेक्षा जास्त लक्ष घातल्याने पालिकेतील सर्व शाळांच्या गणवेश पुरवठा करण्याचे काम तीनच ठेकेदारांना देण्यात आले होते. शालेय व्यवस्थापन समितीवर दबाव टाकून विशिष्ट ठेकेदारांनाच काम दिले गेले. त्यामुळे या प्रकरणाबाबत नगरसेवकांकडूनच आरोप प्रत्यारोप होऊ लागले होते. गणवेश खरेदीत मोठी अनागोंदी झाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा दावा करीत, गणवेशांचे लॅबमधून तपासलेले सॅम्पलही बोगस असल्याचा आरोप केला, तर गणवेश खरेदीत अटीशर्तींचा भंग झाला असून, ठराविक निर्देशांनुसार गणवेश खरेदी केली गेली नसल्याने या प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन शिक्षणाधिकारी उपासनी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी १९ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या महासभेत करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र शिक्षण विभागाला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, कापडाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची तयारी सुरू केली होती. यात त्रुटी आढळली तर शालेय व्यवस्थापन समितीवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही अनेकांचे याबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे थेट राज्य सरकाकडेच याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत, राज्याच्या शिक्षण विभागाने महापालिकेच्या शिक्षण विभागाला २३ हजार ४८८ मुलांसाठी घेतलेल्या गणवेशांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. गणवेशाच्या कापडाची गुणवत्ता आणि दर्जा तपासला जाणार असल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

महासभेचा ठराव कुठे?

१९ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या महासभेत या विषयावर तब्बल दोन ते तीन तास चर्चा झाली होती. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी या खरेदीवरच संशय व्यक्त केला होता. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी महासभेत याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, हा आदेश कागदावरच राहिला आहे. महापौरांनी दिलेल्या आदेशाचे पुढे काय झाले याबाबत पालिका वर्तुळातच खमंग चर्चा आहे. महासभेत अचानक गाजलेले हे प्रकरण शांत कसे झाले, याबाबतची विचारणा आता नगरसेवकही करत आहेत. त्यामुळे सीमा हिरेंच्या तक्रारीने का होईना, सरकारला या खरेदीतल्या अनागोंदीची आठवण झाली असून, आता या चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, आता महासभेच्या ठरावालाही पाय फुटण्याची शक्यता आहे.

पदाधिकाऱ्यांची जवळीक

महापालिकेच्या ११० शाळांपैकी ८० टक्के शाळांमध्ये तीन ठेकेदारांनी गणवेशाचा पुरवठा केला आहे. शालेय व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदीचे स्वांतत्र्य असले तरी, संपूर्ण समितीला या तीन ठेकेदारांचे गणवेश कसे पसंत पडले, याबाबतची चौकशी केली जाणार आहे. या तीन ठेकेदारांसाठी पालिकेतील दोन पदाधिकाऱ्यांनी थेट शिक्षण विभागावर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सलगीमुळे आता शिक्षण विभागातील अधिकारी आणि शालेय समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक गोत्यात आले आहेत. कापडाच्या दर्जा आणि गुणवत्तेची तटस्थ चौकशी झाली तर, अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड पालिकेत राष्ट्रवादीचा राडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

विरोधी पक्षांचे मत विचारात न घेता एकापाठोपाठ एक विषय मंजूर करणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत सोमवारी मनमाड पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत राडा केला. मुख्याधिकाऱ्यांसह सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत समोरचे टेबल लाथाडल्याने पालिकेची सभा वादळी ठरली. थोड्यावेळानंतर सभेत मनमाड शहरात करंजवण धरण योजनेस, तसेच शहरात केटीवेअर बंधारे बांधण्यास मंजुरी हे दोन प्रमुख विषय सोमवारच्या पालिका सभेत मंजूर करण्यात आले.

मनमाड पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहुमतावर सगळेच विषय मंजूर करू नका, विरोधी पक्षांचे देखील मत विचारात घ्यावे, असा पवित्रा घेत आक्षेप नोंदवला. आरडाओरड करीत तसेच समोरची टेबले लाथाडत ट्री गार्डप्रश्नी नगरसेवक कैलास पाटील, अमजद पठाण यांनी पीठासनाकडे धाव घेतली. रुपाली पगारे, यास्मिन पठाण या नगरसेवकांनीदेखील सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. मनमाड पालिकेत ट्री गार्ड खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी नगरसेवकांनी केला. गळ्यात या संदर्भातील बोर्ड अडकवून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच डॉ. दिलीप मेनकर यांना ट्री गार्ड भेट देत जाब विचारला. या प्रश्नी चौकशी समिती नेमून सत्यता पडताळून पाहू असे आश्वासन डॉ. मेनकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांच्या सहाय्यात वाढ

$
0
0

जिल्ह्यातील चार सैनिक व ८६ विधवांना होणार लाभ

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : दुसऱ्या महायुद्धा भाग घेणाऱ्या जिल्ह्यातील चार हयात सैनिक व ८६ सैनिकांच्या विधवांना यापुढे राज्य सरकारकडून सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. सरकारने तीन महिन्यापूर्वीच यात वाढ केली असली तरी अद्याप हे अर्थसहाय्य मिळालेले नाही. त्यामुळे मार्च २०१७ पासून एकत्रित हे पैसे मिळणार आहेत. यापूर्वी हे अर्थसहाय्य तीन हजार होते.

१९३९ ते ४५ या कालावधीत हे दुसरे महायुद्ध झाले होते. तेव्हा भारतात ब्रिटिशांचे राज्य असल्याने भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली या युद्धात सहभाग घेतला. १९३९ मध्ये युध्द सुरू झाल्यानंतर त्यात दोन लाख ब्रिटीश भारतीय सैनिक होते. युद्ध संपल्यानंतर या सैनिकांची संख्या ३० लाख झाली होती. या युद्धात एकूण ८७ हजार सैनिक ठार झाले. चार हजार सैनिकांना पराक्रमासाठी शौर्य पदके तर ३१ सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस पदके मिळाली. ब्रिटीश भारतीय सैनिकांमध्ये भारतीय सैनिकांसह पाकिस्तान, बांगलादेश व नेपाळच्या गुरखांचा समावेश होता. नाशिक जिल्ह्यातील अनेक सैनिकांनीही या युद्धात सहभाग घेतला होता. त्यातील वाचलेल्या सैनिकांना केंद्र सरकारकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने राज्य सरकारने १९८९ मध्ये ३०० रुपये अर्थसहाय्य देण्यास सुरुवात केली. २०११ मध्ये त्यात वाढ करून ते तब्बल तीन हजार रुपये इतके केले. आता सात वर्षांनंतर त्यात दुप्पट वाढ करून ६ हजार करण्यात आले आहे.

अशी आहे नोंद

पहिल्या युद्धात भाग घेणाऱ्या जिल्ह्यातील ९७ सैनिकांची नोंद होती. त्यातील ७ सैनिक मृत पावल्यानंतर आता ९० सैनिकांची नोंद दिसते. पैकी चार सैनिक आजही जिवंत असल्याची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आहे. त्यात हिरालाल धनराज भावसार, दत्तात्रय पुणतांबेकर, दत्तू मल्हारी पवार, जने कृष्णा भोसले यांचा समावेश आहे. उर्वरित ८६ सैनिकांच्या विधवा पत्नी हयात आहेत.

ब्रिटिशांकडून मिळते पेन्शन?

ब्रिटिशांकडून लढणाऱ्या पहिल्या महायुध्दातील सैनिकांना ब्रिटीशांकडून पेन्शन मिळत होती. दुसऱ्या महायुध्दातील सैनिकांनाही ही पेन्शन देण्यात येते. पण, जिल्ह्यातील या सैनिकांना ही पेन्शन मिळते का? याची माहिती मात्र जिल्हा सैनिक कार्यालाकडे नाही.

दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतलेल्या सैनिक व त्यांच्या विधवांना राज्य सरकारने सहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील निधी अद्याप आला नसला तरी तो एकत्रित दिला जाणार आहे.

- विद्या रत्नपारखी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

लोगो : सैन्यदल विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेला प्राधान्य

$
0
0

स्वच्छतेला प्राधान्य

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सध्या शहरांचे सर्वेक्षण सुरू आहे. केंद्राचे पथक ४ ते ३१ जानेवारी दरम्यान गुप्तपणे शहरांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करणार आहेत. त्यामुळे गमे यांनी सोमवारच्या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षणाचाही आढावा घेतला. त्यात त्यांनी सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबत सूचना केल्या. पथकाकडून अनेक ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन नागरिकांनाही या स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जनजागृतीच्या सूचना यावेळी दिल्या. सध्या स्वच्छतेचे काम जोमाने सुरू असले तरी त्यात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग वाढवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

संघटनांचा आक्षेप

महापालिकेचे स्वच्छतेचे आऊटसोर्सिंग करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने आक्षेप घेतला आहे. महापालिकेने स्वच्छतेचे खासगीकरण रद्द केले नाही तर संपाचा इशारा दिला आहे. स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने ही बाब महापालिकेला परवडणारी नसल्याचे सांगत, खासगीकरणाची निविदा रद्द करण्याची मागणी सुरेश मारू यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे आणि अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्याकडे केली आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचनाची झाडाझडती

$
0
0

थेट कारवाईचा आयुक्तांनी दिला इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील त्रुटी दूर करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रलंबित तक्रारींवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगररचना विभागाकडे या विभागाशी संबंधित सातशेहून अधिक तक्रारी प्रलंबित असल्याने सहायक संचालकांना धारेवर तर तातडीने अडचणी दूर करण्याच्या सूचना केल्या. कारभारात सुधारणा झाली नाही तर थेट कारवाईचा इशारा गमे यांनी दिला आहे.

शहरातील बांधकाम क्षेत्र अनेक जाचक अटी ‌‌व शर्तीच्या फेऱ्यात अडकले असतांनाच, नगररचना विभागाच्या संथ कामाचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. ऑटो डीसीआर प्रणाली कशी तरी मार्गी लागत असतांना या विभागातील प्रलंबित तक्रारी मात्र सुटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गमे यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीतच नगररचना विभागाला धारेवर धरले. नगररचना विभागाचा आढावा घेताना प्रलंबित तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले. त्यामुळे सातशेहून अधिक बांधकाम प्रकरणे प्रलंबित कशी, अशी विचारणाच त्यांनी यावेळी केली.

नगररचना विभागाशी संबंधित अतिक्रमणांच्या तक्रारी देखील न सोडविल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आणि तक्रारी तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. विभागप्रमुखांनी अखर्चित निधी खर्च करण्यासाठी सादर केलेल्या यादीत प्राधान्याने करावयाच्या कामांना गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदासमध्ये अवतरणार ‘धगधगते शंभूपर्व’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शंभूराजांची जीवनगाथा कथन करणारी व्याख्यानमाला, स्वराज्याच्या वंशजांशी थेट भेट, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन व युद्धकला प्रात्यक्षिके असा भरगच्च उत्सव १८, १९ व २० जानेवारी रोजी, सायंकाळी पाच वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे होणार आहे

नाशिक महानगरपालिका व संस्कृती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीराजे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या 'धगधगते शंभूपर्व' या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेप्रसंगी शिवाजी महाराजांनी रायबाच्या गळ्यात घातलेली कवड्यांची माळ व वीर तानाजी यांची २६ किलोची तलवार नाशिककरांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता या दोन्ही ऐतिहासिक वस्तूंची रोकडोबा पटांगण ते कालिदास कलामंदिर यादरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

नगरसेवक शाहू खैरे यांच्या 'संस्कृती नाशिक' या संस्थेतर्फे, क्रांतीशाहीर प्रा. सचिन कानिटकर यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे छत्रपती श्री संभाजी राजांचा जीवनपट प्रा. कानिटकर श्रोत्यांसमोर मूर्तिमंत उभा करतात. 'गाथा शिवरायांची' या व्याख्यानमालेमुळे ते नाशिककरांना परिचित आहेत.

या व्याख्यानमालेस प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवरायांच्या सेनापतींच्या आजच्या पिढीचे प्रतिनिधी, म्हणजेच स्वराज्याचे वंशज उपस्थित राहणार आहेत. तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, संताजी घोरपडे यांचे वंशज श्रीमान घोरपडे सरकार, धनाजी जाधव यांचे वंशज विक्रमसिंह राजे जाधवराव, हिम्मतबहाद्दर चव्हाण यांचे वंशज संग्रामसिंह चव्हाण यांचा याप्रसंगी बहुमान करण्यात येणार आहे.

शिवरायांच्या सुप्रसिद्ध कवड्यांच्या माळेचे दर्शन हे या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याच्या गळ्यात साक्षात शिवरायांनी बांधलेली कवड्यांची माळ व तानाजीची २६ किलो वजनाची तलवार नाशिककरांना या उत्सवात प्रथमच पाहायला मिळणार आहे. उत्सवादरम्यान रोज शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके व शस्त्रांचे प्रदर्शन भरणार आहे.

रामशेज किल्ल्यापासून क्रांतिज्योत

२० जानेवारी रोजी रामशेज किल्ल्यावरून मोटारसायकल रॅलीद्वारे शहरात आलेल्या क्रांतिज्योतीचे स्वागत गोदाघाटावरील ऐतिहासिक रोकडोबा हनुमान मंदिरात करण्यात येईल. दुपारी ३ वाजता रोकडोबा पटांगणातून शोभायात्रा निघेल. या शोभायात्रेत विविध खेळ, कसरती, मैदानी खेळांची प्रात्यक्षिके यांचा समावेश असेल. छत्रपतींनी रायबाला दिलेली ऐतिहासिक कवड्यांची माळ व तानाजी मालुसरे यांची २६ किलो वजनाची तलवार वाजत गाजत या शोभायात्रेतून सभास्थळी कालिदास कलामंदिर येथे नेण्यात येणार आहे.

व्याख्यानमालेस नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन 'संस्कृती नाशिक'चे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताई बामणेला सुवर्णपदक

$
0
0

नाशिक : पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या ताई बामणे हिने पुन्हा एकदा नाशिकची मान उंचावली असून, महिला गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. ताई बामणे हिने ८०० मीटर अंतर २ मिनिटे १३ सेकंद व ३७ मायक्रो सेकंदात पूर्ण केले. ताई बामणेच्या या यशामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. दरम्यान, तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'खेलो इंडिया' या उपक्रमातून खेळाडूंचा शोध घेण्यात आला होता; त्यातून केंद्राने ताईची निवड केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images