आमदार बच्चू कडू यांचा इशारा म. टा. वृत्तसेवा, येवला राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तत्काळ न सोडविल्यास, आम्ही राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन घेवून त्यात येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेवू. तसेच मतदान केंद्रांवर कांदा ठेवून निषेध नोंदवू, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी येवल्यात दिला. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने येवल्यात आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी सोमवारी (दि. २८) आलेल्या आमदार बच्चू कडू यांनी मेळाव्यापूर्वी येवला शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांची बाजू मांडतानाच आमदार कडू यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कांदा प्रश्नाबाबत कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी प्रस्ताव तयार करण्याची गरज असताना या बाबतीत राज्य सरकारची उससिनता दिसून आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारला कुठलेही गांभीर्य नाही. तातडीचा निर्णय म्हणून अनुदान वाढवून देताना त्याची मुदत वाढवून दिली पाहिजे, असे यावेळी बच्चू कडू म्हणाले. कांद्याचे भाव वाढले होते, तेव्हा भाजपचे सरकार पडले होते. याची सरकारला भीती वाटते. मात्र, आता कांद्याचे भाव पडले आहेत. म्हणून तुमचे खासदार पडले, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे, असी पुस्ती कडू यांनी जोडली. सरकारच्या आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकरी मरतोय. कांदा जीवनावश्यक वस्तूत कसा मोडतो? हे सरकारने एका तरी उदाहरणासह दाखवून द्यावे. एक जरी उदाहरण दिले तरी हा बच्चू कडू आमदारकीचा राजीनामा देईल, असेही ते म्हणाले. दानवेंचा पराभव हेच 'लक्ष्य' लोकसभा निवडणुकीत जे काय व्हायचे ते होईल. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव हेच आमचे लक्ष्य असणार आहे. दानवे यांच्याशी माझे कुठलेही वैर नाही. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हंटले होते. कुठलाही राजकारणी ज्यांची मते घेतो त्यांना 'साले' म्हणत असेल तर त्यास धडा शिकविणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत दानवे उभे राहोत अथवा नाहीत, कुणाला तरी मदत करून त्यांचा पराभव करणे हेच आमचे उद्धिष्ट आहे, असा निश्चय कडू यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट