म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
पंचवटी परिसरात सायंकाळच्या वेळी भरणारे भाजीबाजार हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. सिंहस्थाच्या काळात बनविलेले भव्य रस्ते भाजीबाजाराला जणू आंदण दिल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे.
चार-पाच वर्षांपूर्वी पंचवटीत सकाळी भरणारा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणि गोदाघाटावर असे दोनच भाजीबाजार होते. सिंहस्थ कुंभमेळ्यांच्या पर्वण्यांनंतर गोदाघाटावर भाजीविक्रेत्यांना बसण्यास मनाई करण्यात आली. त्यांच्यासाठी गणेशवाडी रोडलगत सहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भाजी मार्केट यार्डमध्ये त्यांनी भाजीपाला विक्री करावी असे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, विक्रेते या बाजारात भाजीविक्री करण्यास तयार नाहीत. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजी विक्री होत नाही. पंचवटी परिसराच्या वाढत्या विस्तारामुळे जवळच भाजीपाला उपलब्ध व्हावा ही ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन रस्त्यावरच ठिकठिकाणी भाजीबाजार सुरू झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
नाशिकचा बुधवारी भरणारा आठवडे बाजाराचा पसारा प्रचंड वाढला आहे. पूर्वी म्हसोबा पटांगण आणि गौरी पटांगणापूरता मर्यादीत असलेला बाजार आता नदी ओलांडून मुक्तेश्वर पटांगण, रोकडोबा पटांगण, नाशिक अमरधाम रस्ता, गाडगे महाराज धर्मशाळेसमोर, गणेशवाडी रस्त्यावरून थेट पंचवटी अमरधाम रस्त्यापर्यंत वाढत चालला आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले भाजी मार्केट धूळखात पडून आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर भाजीविक्रेते बसत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी होत आहे. गणेशवाडी रस्त्याच्या कडेला नव्हे तर मध्यभागीही भाज्या विक्रीस ठेवण्याचे प्रकार होत असल्याने दर बुधवारी या ठिकाणाहून वाहने कशी घेऊन जायची हा प्रश्न पडतो.
कोणार्कनगरला आठवड्यातून दोनदा
कोणार्कनगरमध्ये भरणाऱ्या भाजीबाजारामुळे तेथील काही सोसायट्या, बंगले यांच्या प्रवेशव्दारासमोरच विक्रेते ठाण मांडून बसत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यामुळे येथील भाजीबाजाराचे अतिक्रमण काढण्याचा दोनदा प्रयत्न झाला. भाजीविक्रेत्यांनी स्थानिक रहिवाशांना त्रास होणार नाही अशी ग्वाही दिल्यामुळे हा बाजार पुन्हा सुरू झाला. जत्रारोडपासून ते कोणार्क नगरच्या परिसरातील रस्त्यावर आठवड्यातून दोनदा हा बाजार भरतो.
जागा असूनही रस्त्यावर ठाण
पूर्वी हनुमाननगरजवळच्या परिसरात भरणारा भाजीबाजार राजकीय सत्तांतर झाल्यामुळे निलगिरी बाग येथे स्थलांतरीत करण्यात आला. महापालिकेची ही जागा सिंहस्थ कुंभमेळ्यात बस स्थानकासाठी उपयोगात आणण्यात आली होती. या मोकळ्या जागेत हजारोंच्या संख्येने विक्रेते बसू शकतील, अशी क्षमता आहे. तरीही विक्रेते थेट रस्त्यावरच भाज्या मांडून बसत असल्याचे चित्र दर बुधवारी आणि रविवारी नजरेस पडते. भाजी विक्रेते रस्त्यावर, त्या खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर आणि खरेदी करताना ग्राहकांची गर्दीही रस्त्यावरच अशी स्थिती होते. औरंगाबाद रोड ते मुंबई-आग्रा महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडवर भरणाऱ्या या भाजीबाजाराच्या पूर्वेला परफेक्ट कृषी डाळिंब मार्केट आहे. येथे आता टोमॅटो, सफरचंद यांचीही खरेदी विक्री सुरू झालेले आहे. या मार्केटमध्ये येणारी वाहने, महामार्गाकडे जाणारी वाहने अशा अनेक वाहनांची या बाजारामुळे कोंडी होते. येणारे ग्राहक आपल्याकडेच यावेत या हेतूने बाजार रस्त्यावर लांबवर पसरत आहेत.
येथे भरतात बाजार
-दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी थिएटर ते दिंडोरी नाक्यापर्यंत
- पेठरोडला दुतर्फा फुलेनगरचा परिसर
- आडगावातील होळी चौक, कोणार्क नगर
- नांदूरला निलगिरी बाग
- बुधवारच्या आठवडे बाजारात गणेशवाडी रस्ता, म्हसरुळला पादचारी मार्ग
- मखमलाबाद-म्हसरुळ लिंकरोड
- दिंडोरी रोडला आरटीओ कॉर्नर
- हिरावाडी रस्ता
- मखमलाबाद बस स्थानकाजवळ, शांतीनगर, हनुमानवाडी मारुतीमंदिर परिसर
- मुंबई-आग्रा महामार्गाच्या सर्व्हिस रोडलगत बहिणाबाई चौधरी महाविद्यालयाजवळ
- रामसेतू पूलापासून कपूरथळा मैदानापर्यंत
शेतकरी आणि भरेकरी वाद
प्रत्येक भाजीबाजारात शेतातून भाजीपाला काढून तो थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची रस्त्यावरील भाजीबाजारातील संख्या वाढत आहे. बाजार समितीतून भाजीपाला भरून ते या बाजारात विक्रीस करण्यास येणाऱ्या भरेकऱ्यांचीही संख्या मोठी आहे. दर आठवड्याला ठराविक जागा आपली आहे, असा जणू भरेकऱ्यांनी ठरवूनच घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर इतरांना बसू दिले जात नाही. त्यामुळे प्रत्येक बाजारात शेतकरी आणि भरेकरी यांच्या जागेवरून वाद होतात.