म. टा. वृत्तसेवा, पंचवटी औरंगाबादरोड आणि मुंबई-आग्रा महामार्ग अशा दोन्ही प्रमुख रस्त्यांच्या लगत असलेल्या लॉन्स आणि मंगल कार्यालयांमुळे वाहतूक कोंडी या परिसराच्या पाचवीलाच पूजलेली आहे. औरंगाबाद नाक्यापासून ते मानूर-आडगाव शिवारापर्यंत रस्त्यालगत लॉन्स-मंगल कार्यालये आहेत. दाट लग्नतिथीच्या काळात येथे वऱ्हाडींची प्रचंड गर्दी होते. या गर्दीचा ताण वाहतुकीवर येतो. लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडींकडे चारचाकी वाहनांची संख्या जास्त असते. अनेकदा पार्किंगची जागाही कमी पडते. वाहनधारकांना लग्न समारंभातून लवकर निघण्याची घाई असल्यामुळे ते वाहने सोयीनुसार लवकर काढता येतील या दृष्टीने रस्त्यावरच पार्क करतात. इतरही वाहने त्याचप्रमाणे पार्क केली जात असल्यामुळे वाहनांची ही गर्दी वाढत जाते. ही गर्दी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रासदायक ठरते. महापालिकेने लॉन्सधारकांना नियमानुसार पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची अट घातली आहे. त्यानुसार अनेक लॉन्सधारकांनी पार्किंगसाठी तशी जागा उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरीही वाहने शिस्तबद्धपणे पार्क करण्यात येत नाहीत. त्यासाठी लॉन्सधारकांनी वाहनधारकांना सक्ती करण्याची गरज आहे. त्यासाठी निदान दाट लग्नतिथीला तरी खास सुरक्षारक्षकांची नेमणूक करायला हवी. मात्र, असे होत नसल्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला प्रवाशांना तोंड द्यावे लागते. लॉन्सची संखा वाढतीच औरंगाबाद रोडला नवीन आडगाव नाक्यापासून ते मानूर शिवारापर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीत रस्त्यालगत १८ लॉन्स आहेत. आणखी काही नवीन लॉन्स तयार होत आहेत. या रस्त्याला जोडणाऱ्या रिंगरोडलगत ९ लॉन्स आहेत. मंबई-आग्रा महामार्गालगत औरंगाबाद नाका ते आडगाव शिवारापर्यंत महापालिकेच्या हद्दीत ४ लॉन्स आहेत. दाट लग्नतिथीच्या वेळी या सर्व लॉन्सवर हजारोंच्या संख्येने वाहने येत असतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी लग्न सोहळ्यास हजेरी लावण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे औरंगाबाद रोड आणि मुंबई-आग्रा महामार्ग या दोन्ही रस्त्यांना ट्रॅफिक जॅम होते. (क्रमश:)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट