म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक एकाहून एक सरस विषय... प्रख्यात साहित्यिकांचे अधिष्ठान... वेळप्रसंगी सकारात्मक वाद आणि संवाद घडविणारी त्यांची मत-मतांतरे... एकूणच या सर्वांचा कोलाज असलेली 'मटा मैफल' रविवारी रंगली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या स्मरण कार्यक्रमांतर्गत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या विद्यमाने झालेल्या या मैफलीत सारस्वतांची मांदियाळीच जणू अवतरली होती. कुसुमाग्रज स्मारकाच्या प्रत्येक पायरीगणिक साहित्यविषयक चर्चा झडत होती. रसिकांनी कानांत प्राण आणून साहित्यकांचे मनोगत ऐकले. अशा मंतरलेल्या माहोलमध्ये सुरू झालेला मैफल कार्यक्रम उत्तरोतर रंगत गेला. सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांच्या हस्ते 'मटा मैफल'चे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर, वनाधिपती विनायकदादा पाटील, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, तसेच जहागीरदार फूड्सचे संचालक मिलिंद जहागीरदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी गुरू ठाकूर म्हणाले, की भाषेच्या जगण्यासाठी तिच्यामध्ये संवाद घडण्याची गरज असते. संवाद घडला, की भाषा संपत नाही. फेसबुकच्या भिंती भरून वाहताहेत, लोकांना फक्त व्यक्त व्हायचे आहे. त्यांना कुणीतरी ऐकून घेण्याचीही गरज आहे. 'मटा मैफल'सारखे कार्यक्रम झाले पाहिजेत. मैफलमध्ये पुस्तकेही वाचता येतात. कुटुंबे छोटी होत असताना आणि मोबाइलवर चोवीस तास खेळण्याच्या नादात वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु, त्यांना सकस वाचायला द्या, ती वाचतील हे नक्की. एखाद्या नदीप्रमाणे भाषेचे प्रवाह होत राहिले पाहिजेत. 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर यांनी 'मटा मैफल'विषयी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे चिंतनगर्भ सूत्रसंचालन शब्दमल्हार मासिकाचे संपादक स्वानंद बेदरकर यांनी केले. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी आभार मानले. -- पंचशिलेदारांचा सन्मान 'मटा मैफल' कार्यक्रमात तारुण्यात साहित्याचा वसा घेऊन काम करणाऱ्या पूजा प्रसून, चिन्मय मोघे, कृष्णा पाचोरे, अमोल गुट्टे व शरयू पवार यांचा विशेष सन्मान गुरू ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्याकडे पाहून असे वाटते, की आपण जरा उशिरा सुरुवात केली, असे गौरवोद्गार या पंचशिलेदारांविषयी गुरू ठाकूर यांनी काढले. -- हे छोटेखानी संमेलनच मकरंद हिंगणे म्हणाले, की 'महाराष्ट्र टाइम्स' व कुसुमाग्रज स्मारक यांच्या विद्यमाने होणारी 'मटा मैफल' हे छोटेखानी साहित्य संमेलनच आहे. समाजाचे प्रतिबिंब साहित्यात पडते असे म्हणतात, ते खरेही आहे. त्यामुळे खरे तर साहित्याचा विकासच होत जातो. -- भाषेला लोकाश्रयही गरजेचा विनायकदादा पाटील म्हणाले, की महाराष्ट्रातला माणूस अधिक उत्सवप्रिय आहे आणि 'मटा'ने त्याच्यासाठी हा साहित्यदेवीचा उत्सव घडवून आणलेला आहे. भाषेचा विकास व्हायचा असेल, तर ती सर्वसामान्यांपर्यंत जाणे महत्त्वाचे असते. मैफलच्या माध्यमातून तेच काम होत आहे. भाषेला राजाश्रय असणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच लोकाश्रय मिळणेही गरजेचे आहे. किंबहुना लोकाश्रयच अधिक गरजेचा आहे. आपल्या आधीच्या शंभर पिढ्या मराठी बोलत होत्या आणि येथून पुढीलही शंभर पिढ्या मराठीच बोलणार आहेत. त्यामुळे भाषा मरणार आहे वगैरे झूठ आहे. भाषा एकमेकांच्या संवादातून जिवंत राहते. मराठीमध्ये इतर भाषांतून आलेले शब्द स्वीकारले पाहिजेत. कालपरत्वे भाषा बदलत जाते याचा स्वीकारही आपण केला पाहिजे, असेही विनायकदादांनी नमूद केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट