पुलवामा हल्ल्यानंतर टूर एजंट्समध्ये संताप ... म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर येथे पर्यटन सहल न काढण्याचा निर्णय काही ट्रॅव्हल एजन्सींनी घेतल्यामुळे यावर्षी तब्बल २० हजारांहून अधिक पर्यटकांची संख्या घटणार आहे. या हल्लात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभर संतापाची लाट पसरली. त्यानंतर काश्मीरमध्ये सैन्यावर होणारी दगडफेक हे स्थानिक नागरिक करीत असल्यामुळे त्यांना रोजगार का द्यावा, असे प्रश्नही उपस्थित होऊ लागले. त्यामुळे या सहलीवर बहिष्कार टाकावा व पर्यटन येथे करूच नये, असे मुद्देही चर्चेत आले. पण, टुर्स एजन्सींनी सरसकट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला नसला तरी काही एजन्सींनी मात्र येथे पर्यटन सहल काढण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक व परिसरातून दरवर्षी २५ हजारांहून अधिक पर्यटक काश्मीर येथे जात असतात. या सहलीला सर्वसामान्य पर्यटकांची पसंती आहे. पण, काश्मीर येथे वातावरण सतत बिघडत असल्यामुळे येथे पर्यटन सहल काढणे धाडसाचे असते. काही दिवसांपासून काश्मीरचे वातावरण अस्वस्थ असल्यामुळे पर्यटकांना येथे नेणे जबाबदारीचे आहे. पुलवामा हल्ल्यानंतर तर यात अधिक वाढ झाली आहे. या हल्ल्यानंतर शिवसेनेने टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या संघटनेला निवेदन पाठवून काश्मीरच्या टूरवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. त्यामुळे टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सची बैठक झाली. त्यात या विषयावर चर्चा झाल्यानंतर बहिष्कार न टाकता प्रत्येकाने स्वत: निर्णय घेण्याचे ठरले. त्यामुळे काही एजन्सींनी या पर्यटन सहली रद्द केल्या आहेत. .... पुलवामा हल्ल्यानंतर आमची बैठक झाली. त्यात बहुतांश एजन्सींनी कश्मीर येथे पर्यटन सहल न काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी काश्मीर येथे २५ हजार पर्यटक जातात. पण, यावेळेस संख्या २० हजारांहून अधिक घटणार आहे. - दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट