म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दिंडोरीतील नाराजीनाट्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जिल्ह्यात तयार केलेली समन्वय समिती अखेर विसर्जित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नाशिकमधील मनोमिलन मेळाव्यापुरतीच ही समन्वय समिती असल्याचे ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या समितीवरून नाराजीनाट्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट करीत यापुढे लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वय समिती गठित केली जाणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभानिहाय मेळावे घेतले जाणार असून, त्यातून प्रचाराला प्रारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याची घोषणा केल्यानंतर गेली साडेचार वर्षे एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचे नियोजन युतीकडून करण्यात आले होते. त्यासाठी विभागनिहाय नेत्यांवर जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक विभागातील समन्वयाची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांच्यावर टाकण्यात आली होती. त्यानुसार गेल्या रविवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत होणाऱ्या मनोमिलन मेळाव्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मेळाव्याचे नियोजन व समन्वयासाठी दोन्ही पक्षांतर्फे १५ जणांची समिती जाहीर केली होती. त्यात भाजपचे आठ, तर शिवसेनेचे सात पदाधिकारी होते. पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, दादा जाधव, सचिन ठाकरे, प्रशांत जाधव यांचा त्यात समावेश होता. परंतु, या समितीवरून दिंडोरीत नाराजीनाट्य झाले होते. जिल्ह्यासाठी असलेल्या या समितीत दिंडोरी मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. या समितीत दिंडोरीतील दोन्ही जिल्हाप्रमुख, तसेच एका आमदारालाही डावलण्यात आले, अशी चर्चा शिवसेनेतही सुरू झाली होती.
--
आता लोकसभानिहाय समिती
या नाराजीनाट्यावर मंत्री भुसे यांनी पडदा टाकला आहे. सदरची समन्वय समिती केवळ मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यासाठीच होती, असे सांगत सध्या ही समिती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले. आता लोकसभानिहाय मेळावे होणार असल्याने लोकसभानिहाय समन्वय समिती गठित करून मेळावे घेतले जाणार असल्याचे भुसेंनी स्पष्ट केले. त्यामुळे या समितीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---
पक्षीय समतोल साधणार
नाशिक जिल्ह्यात तयार केलेल्या समन्वय समितीत नाशिकमधील सदस्यांचा भरणा असल्याने, तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याने नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे आता लोकसभानिहाय समित्या तयार करताना पक्षीय समतोल साधला जाणार आहे. शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समान स्थान दिले जाणार असून, त्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आमदारांनाही स्थान दिले जाणार आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन करण्यासह उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारीदेखील टाकण्यात आली आहे.