टीम मटा : सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी जिल्हाभर अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले. सिन्नर, निफाड, दिंडोरी तालुक्यात गारपिटीने तांडव घातले आहे, तर उर्वरित तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली. कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सिन्नर तालुक्यात सलग दोन दिवस गारपीट झाली. यामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच निफाड तालुक्यात शुक्रवारी पाऊस तर शनिवारी गारपीट झाली. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. चांदवड व दिंडोरी तालुक्यातही गारपिटीने थैमान घालत होत्याचे नव्हते केले आहे. कळवण, मालेगाव, सटाणा, नांदगाव, येवला या तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.
निफाडला गारपिटीचा तडाखा
निफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा व गारपिटीचा कहर सुरूच असून, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्ण होता न होतात तोच पुन्हा शुक्रवारी व शनिवारी तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. सततची गारपीट, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने शेती व्यवसाय संकटात सापडल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक भागात तुफान पाऊस झाला, तर शनिवारी सायंकाळी लासलगाव, नैताळे, उगाव, शिवडी, निफाडच्या गोदाकाठातील औरंगपूर, भेंडाळी, भुसे, चापडगाव, आदी काही गावांमध्ये गारपीट झाली. गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसान द्राक्षबागांचे होणार असून, शनिवारी निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी समजल्या जाणाऱ्या उगाव - शिवडी परिसरातही गारपीट झाल्याने नुकसानीच्या आकड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निर्यातक्षम द्राक्ष, दर्जेदार कांदा, डाळिंब आदी पिकांचे उत्पादन घेण्यात व नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक शेती जोपासण्याकडे कल असलेल्या निफाड तालुक्यातील शेती व्यवसायाला या अस्मानी संकटामुळे जबरदस्त हादरा बसला असून, करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी अंगाचा थरकाप उडविणाऱ्या मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील लासलगाव, निफाड, विंचूर, नैताळे, शिवरे, नांदुरमध्यमेश्वर, भेंडाळी, औरंगपुर, सायखेडा, चांदोरी आदी गावांसह जवळपास २४ गावांमधील १२०० शेतकऱ्यांना फटका बसला असून नव्याने सुमारे ८०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, कांदा, गहू व इतर शेतमालाचे नुकसान झाले असून, शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी दिली.
उरल्यासुरल्या अपेक्षांवर पाणी
मालेगाव शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला. सतत ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते करणारा मुसळधार बेमोसमी पावसामुळे उरल्यासुरल्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपल्याने नक्की नुकसान झाले किती हे पहायला देखील काही शिल्लक नाही. रब्बी हंगामतील गहू हराभरा पिके अगदी काढणीवर आलेली असताना अवकाळी पावसाने कांदा, गहू, हराभरा पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात काही हाती आले नाही. रब्बीतही शेती व्यवसायावर अवकळा पसरल्याने शेतकरी हालदिल झाला आहे.
दरम्यान, मालेगाव वेधशाळेच्या अंदाजनुसार शनिवारी सायंकालपर्यंत ८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. आद्रतेचे प्रमाण लक्षात घेता येत्या २४ तासात सतत ढगाळ वातावरण कायम राहणार असून, अवकाळी पावसाची भीती कायम आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचा अंदाज घेतला जात असून, गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने तालुक्यात तीन गावात चार बैल मृत झाल्याचे समजते. अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतरच नुकसानीचा अंदाज येणार आहे.
गेल्या दोन दिवसात झालेला अवकाळी पाऊस म्हणजे निसर्गाचा प्रकोप म्हणावा की काय असे वाटत आहे. कधी कडकडीत ऊन पडते, तर अचानक काळेकुट्ट ढग उभ्या पिकावर तुटून पडत आहे. मात्र, खरीप तर गेला पण आता रब्बी हंगामात देखील होत्याच् नव्हतं झाल आहे.
- समाधान पवार, शेतकरी
सिन्नरला गारांचा खच
सिन्नरच्या पूर्व व पश्चिम भागातील गावांना शुक्रवारी दुपारी, तर शनिवारी सकाळी गारपीट आणि वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले. अवकाळीच्या पावसाने द्राक्ष, डाळिंब बागा आणि गहू, कांदा, ज्वारीसह इतर रब्बीच्या पिकांचे अतोनात झाले आहे. गेल्या दोन तीन दिवसात पावसाने शेतात उभ्या असलेल्या रब्बीच्या पिकाचा बोजवारा उडवला आहे. हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. वडांगळी, देवपूर, सांगवी, सोमठाणे, तसेच डुबेरे, सोनांबे, कोनांबे व सिन्नर शिवारातील उभ्या पिके शेतात आडवी झाली. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. गेल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. रब्बी हंगामातील पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. तसेच विघनवाडी, लक्ष्मणपूर, दहिवाडी, मिठसागरे, शहा, कारवाडी आदी भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. अवकाळीच्या तडाख्यात डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. भरतपूर येथील सुधाकर गोरडे यांची पाच एकर शेवग्याची बाग उद्ध्वस्त झाली. या परिसरात सुमारे १५ मिनिटे सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतातील गहू, हरभरा, मका, कांदे या पिकांबरोबरच द्राक्षे आणि डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वडांगळीसह कीर्तांगळी, सांगवी, सोमठाणे, खडांगळी, हिवरगाव, देवपूर, शहा, भरतपूर, गुळवंच, बारागावपिंप्री, निमगाव तसेच नांदूरमध्यमेश्वर उजव्या कालवा भागातील बागायती पट्ट्यातील गावांना तुफानी गारांचा फटका बसला. रस्त्यात शेतात गारांचा खच पडला होता. तुफान गारपीट व पावसाने या परिसरातील शेती पूर्णतः नामशेष झाली. आधीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नसताना पुन्हा अवकाळी पावसाने नुकसान झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट