जिल्ह्यात गारपिटीचा धिंगाणा सुरूच; १० हजार शेतकऱ्यांचे नुकसान
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घालत शेतपिके मातीमोल केली आहेत. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब ही पिके जमीनदोस्त झाली असून, शेतात गारांचा खच पडला होता. लिंबूच्या आकाराच्या गारांनी होत्याचे नव्हते केले असून, शुक्रवारच्या पावसाने एकट्या सिन्नर तालुक्यात ८ हजार २५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अजूनही पेठ, बागलाण, मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नुकसानाचा प्राथमिक अंदाज अद्याप मिळाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर शनिवारच्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर निफाडमधील एका शेतकऱ्याचा गारपिटीमुळे बळी गेला आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरूच असून शुक्रवारी (दि. १३) त्यामुळे १४४ गावांमधील सुमारे दहा हजार शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्यात २३ गावांमधील २७५० हेक्टरवरील पिकांना बसला आहे. त्यातच शनिवारी (दि. १४) मध्यरात्रीपासून पावसाने धुडगूस घातल्याने शेतकरी गलितगात्र झाला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री आणि दिवसभरात झालेल्या गारपीटीने सिन्नर आणि निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. सिन्नर, येवला व चांदवड तालुक्यालाही गारपिटीचा सामना करावा लागला. द्राक्ष, डाळिंब बागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मालेगाव, कळवण, सटाणा या भागात शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. नाशिक शहरातही शनिवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
पावसाने जिल्ह्यातील एकाही तालुक्याला सोडलेले नाही. सर्वच १५ तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला आहे. पंचनामे करायला जावे तर त्यावेळीही पाऊस थैमान घालत असल्याने हे पंचनामे करण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतपिकांच्या पंचनाम्यांचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. तालुका आणि गाव पातळीवरील यंत्रणा कामाला लावूनही पंचनामे आटोपण्याच्या कामाला गती मिळत नसल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना सहन करावे लागले आहे. सुमारे साडे आठ हजार शेतकऱ्यांचे द्राक्ष, डाळींब, टरबुज, कांदा, गहू, मका, हर रा या पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतमजुराचा मृत्यू
निफाड तालुक्यातील शेतमजूर लक्ष्मण जनक कांबळे (वय ५५, रा. रानवड) यांचा मृत्यू घराचे शेड अंगावर पडल्यामुळे झाला. तुफान गारपिटीमुळे जिल्ह्यात घरांच्या पडझडीने अनेक प्रकार झाल्याचा अंदाज आहे. तर विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पाच बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला. ही संख्या वाढू शकते असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. इगतपुरी येथे मुसळधार पावसादरम्यान वीज अंगावर पडून एका गायीचा मृत्यू झाला. याखेरीज दिंडोरी, निफाड, मालेगाव, चांदवड आणि नाशिक तालुक्यात वीज पडून ५ बैल दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट