Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एमबीए प्रवेश परीक्षेला अडीच हजार विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमबीए अभ्यासक्रमासाठी शनिवारी झालेल्या प्रवेश परीक्षेला उत्तर महाराष्ट्रातून जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दोन सत्रात झालेली ही परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली. रविवारीही दोन सत्रात ही परीक्षा पार पडणार आहे.

तंत्रशिक्षण विभागातर्फे एमबीए या अभ्यासक्रमासाठी शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस दोन सत्रात प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. सकाळी दहा ते दुपारी दीड आणि दुपारी २ ते साडेचार या वेळात ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेचा शनिवारी पहिला दिवस होता. नाशिक शहरातील मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही सत्रात एकूण १६८, गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निकमध्ये एकूण ३२३, गुरू गोविंद सिंग इंजिनिअरींग कॉलेजमध्ये एकूण २०३ आणि संदीप फाऊंडेशनमध्ये एकूण ८८५ विद्यार्थी उपस्थित होते. तर, धुळे येथील भारती बहुद्देशीय संस्थेच्या ठिकाणी झालेल्य़ा परीक्षेला दोन्ही सत्रात अनुक्रमे ८७ आणि ८८ विद्यार्थी उपस्थित होते. जळगावच्या रायसोनी इंजिनीअरींग कॉलेजमध्ये झालेल्या परीक्षेला दोन्ही सत्रात अनुक्रमे २७८ आणि २८५ विद्यार्थी हजर होते. नंदुरबारच्या एमआयटी कॉलेजमध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेला दोन्ही सत्रात प्रत्येकी २१ विद्यार्थी उपस्थित होते. नाशिकमध्ये एकूण १५३९, धुळ्यात १७५, जळगावमध्ये ५६३ तर नंदुरबारमध्ये एकूण ४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. रविवारीही दोन सत्रात ही परीक्षा पार पडणार असल्याचे तंत्र शिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर एका दिवशी एकच पेपर

$
0
0

लॉसाठी पुणे विद्यापीठाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लॉच्या अभ्यासक्रमाचे दोन पेपर एकाच दिवशी नियोजित करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अखेर जाग आली असून, एका दिवशी एकच पेपर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार नेहमीच चर्चेत राहतो. यंदाही विद्यापीठाने लॉचे दोन पेपर एकाच दिवशी ठेवून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होता. विद्यापीठाच्या वेबसाईटवर आगामी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले होते. त्यात ही बाब उघड झाली होती. त्याची दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे, महेश सोनवणे, अमोल सरोदे, दीपक भुसाळ आदींच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या उपकेंद्राचे समन्वयक रावसाहेब शिंदे याची भेट घेतली होती. विद्यापीठाने लॉच्या १२ वी नंतरच्या ५ वर्षांच्या अभ्यासक्रमांचे आणि पदवीनंतर ३ वर्षांच्या अभ्यासक्रमांचे एप्रिल-मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांचा गेल्या सेमिस्टरचा राहिलेला पेपर आणि यंदाच्या सेमिस्टरचा पेपर हे दोन्ही एकाच दिवशी नियोजित करण्यात आला होता. बीसीएल-४ या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाचे २८ एप्रिल रोजी ११ ते २ या वेळेत मागील सत्राचा फॅमिली-२ या विषयाचा ३ ते ६ या वेळेत न्यायतत्वशास्त्र असे दोन पेपर एकाच दिवशी होते.

विद्यार्थ्यांना दोघांपैकी एका विषयाचाच अभ्यास करता येणार असल्याने या दोन्ही विषयांपैकी एका विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थींचे हे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पेपर एकाच दिवशी न ठेवता वेगवेगळ्या दिवशी ठेवावेत, अशी मागणी राविकाँने निवेदनात केली. त्याची दखल घेऊन एकाच दिवशी एकच पेपर घेण्याचे विद्यापीठाने जाहिर केल्याचे गाढे याने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नायपर’साठी आज बैठक

$
0
0

कृती समितीची होणार स्थापना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल फार्मा एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (नायपर) नाशिकमध्ये स्थापन व्हावी यासाठी उंटवाडी येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्समध्ये रविवारी महत्त्वपूर्ण बैठकत होत आहे. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

गेल्यावर्षी मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) आणि कृषी अनुसंधान केंद्र हे महाराष्ट्रात स्थापन करण्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही संस्था नाशिकच्या वाट्याला आल्या नाहीत. आयआयएम हे नागपूरला तर कृषी अनुसंधान केंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचे निश्चित झाले. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी जाहीर झालेली नायपर ही संस्था नाशकात यावी, यासाठी आता जोरदार मागणी होऊ लागली आहे. त्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'नेही पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मोठी जनचळवळ उभी राहिली होती. त्याचप्रमाणे नायपरसाठीही कृती समिती स्थापन करण्याच्या उद्देशाने रविवारी सकाळी साडेअकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व पक्षांचे पदाधिकारी, शहर परिसरातील विविध स्वयंसेवी संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. या कृती समितीद्वारे येत्या काळात नायपरसाठी आवश्यक तो पाठपुरावा राज्य आणि केंद्र सरकारकडे केला जाणार आहे. नायपरमुळे नाशिकच्या विकासाच्या वाटा अधिक विस्तीर्ण होतानाच उच्च शिक्षणाच्या संधी नाशिकमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहेत. या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात रस्त्यांचे मायक्रो प्लॅनिंग

$
0
0

पोलिस यंत्रणा सज्ज; ७० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी​, ना​शिक

कुंभमेळ्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या सात प्रमुख मार्गावरील भाविकांची गर्दी, बॅरकेडींग आणि बंदोबस्तासाठी पोलिसांनी मायक्रो प्लॅ​निंगची सुरूवात केली आहे. यासाठी ७० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून, १५ मार्च रोजी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना आढावा सादर करण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक शहरात दाखल होण्याची शक्यता असून, प्रत्येक विभागामार्फत मायक्रो प्लॅनिंग होणे आवश्यक आहे. सध्या, शहर पोलिसांमार्फत शहराशी सलंग्न असलेल्या प्रमुख सात मार्गांवर बंदोबस्त तैनात करण्याच्या दृष्टीने प्लॅ​निंग केले जाते आहे. यात बॅरेकेडींग, नो इंट्री झोन, नो व्हेईकल झोन, बाह्य आणि आतील पार्किंगमधील भाविकांचा ओघ आदी बाबींचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना पोलिस सूत्रांनी सांगितले की, मुंबई आग्रा हायवेवरील राजुर बहुला येथे ७२ एकर जागेत बाह्य पार्किंग उभारले जाणार आहे. तेथून एसटी बसेसच्या मदतीने शहरातील पार्किंग मध्ये म्हणजे महामार्ग बस स्टॅण्ड येथे भाविकांना आणले जाईल. याबरोबर ना​शिक-पुणे हायवेवरील चिंचोली आणि मोहगाव येथून सिन्नर फाटा येथील मार्केट यार्डपर्यंत भाविकांना बसेसने आणण्यात येणार आहे. औरंगाबादरोड वरील माडसांगवी येथे, धुळेरोडवरील आडगाव येथे तर दिंडोरीरोडवर म्हसरूळ येथे बाह्य पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेठरोडवर मखमलाबाद येथे वाहने पार्क करून भाविकांना शरदचंद्र पवार मार्केट यार्डापर्यंत आणण्यात येईल.

गंगापूररोडवरील दुगाव फाटा येथे बाह्य वाहनतळ उभारण्यात येणार असून, तेथून भाविकांना सातपूर बस स्टॉपपर्यंत नेण्यात येईल. शाही स्नानावेळी ३६ तासापर्यंत शहरातील मुख्य रस्ते नो व्हेईकल झोन ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार आहेत. या कामांत सुमारे ७० अधिकारी आणि कर्मचारी गुंतले असून, आज कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १५ मार्च रोजी या कामाचा सविस्तर अहवाल पोलिस आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक

रेल्वे विभाग शहर पोलिसांच्या मदतीने मायक्रो प्लॅ​निंग तयार केले जाणा आहे. यासाठी आज, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. रेल्वेच्या मदतीने किमान दीड ते दोन लाख भाविक कुंभमेळ्यासाठी शहरात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन परिसरात सुरक्षा, बाहेर पडण्याचे प्रशस्त मार्ग, स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी एसटी बसेसची सुविधा आदी प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. दोन ते तीन दिवसांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी शहरात दाखल होणार असून, त्यांच्या समवेत चर्चा केल्यानंतरच रेल्वेच्या मायक्रो प्लॅनिंगचे काम गती पकडेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरफुटीवर मनसे आक्रमक

$
0
0

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बारावीच्या अकाऊंट पेपर फुटीप्रकरणी आणि शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयात घोषणाबाजी करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षण विभागातील गोंधळाला शिक्षणमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याच मतदारसघांत बारावी अकाऊंटचा पेपर फुटला. व्हॉट्सअपवर थेट प्रश्नपत्रिका फिरल्या. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित नसल्याने मनसे शिक्षण मंत्र्यांविरोधात रस्त्यावर उतरली आहे. नाशिकमध्ये मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या १२ वीच्या परीक्षांचा सध्या राज्यात बोजवारा उडाला आहे. पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच, मात्र पालकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला. शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभाराला शिक्षणमंत्री जबाबदार असल्याच आरोप करीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयात गोंधळ घातला.

राष्ट्रवादीतर्फे व्यसनमुक्ती अभियान

जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. १६) सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक, नाशिक येथे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी दिली. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व अन्य व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उध्दवस्त झाली. यापुढे तरुण पिढी व्यसनाधिन होऊ नये म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी मोठे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा भाग म्हणून सोमवारी दि. १६ मार्च रोजी हुतात्मा स्मारक, नाशिक येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम करण्यात येत असून, यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रेरणा बलकवडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचे पुतळा प्रेम!

$
0
0

नुकसान पाहणी दौरा ऐनवेळी रद्द; जळगावमध्ये कार्यक्रमाला हजेरी, शेतकरी संतप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले असतांनाच शेतकऱ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांना मात्र शेतकऱ्यांचे सोयरसुतक उरले नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अवकाळीचे थैमान सुरू असताना पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांंमध्ये अगोदरच सतांपाची लाट आहे. शेतकऱ्यांच्या संतापात महाजन यांनी शनिवारी आणखी भर टाकली. शनिवारचा नियोजित पाहणी दौरा रद्द करून जळगावमध्ये दिवंगत प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले.

पंधरा दिवसांपासून होत असलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांंचे प्रंचड नुकसान झाले असताना शासकीय पातळीवरून त्यांच्या सात्वंनासह त्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शासकीय पातळीवर कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे, तर ज्यांच्यावर शेतकऱ्यांना संकटात धीर देण्याची जबाबदारी आहे, त्या शासनकर्त्यांची वर्तणुक निरोसारखी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला गेला आहे. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत असल्याच्या घटनेचा प्रत्यय सत्ताधाऱ्यांकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे. जिल्ह्यात चार वेळा गारपीट होवूनही महाजन शेतकऱ्यांकडे फिरकलेले नाहीत.

पालकमंत्र्यांच्या या दुर्लक्षावर टीका होताच, महाजन यांनी शुक्रवारी नाशिकच्या सिंहस्थ कामांच्या पाहणीसाठी शेतीच्या नुकसान पाहणीचा दौरा निश्चित केला. शासकीय यंत्रणेकडून त्यांच्या दौऱ्याची तयारीही पूर्ण करण्यात आली. शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. मात्र, ऐनवेळी रात्री त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप प्रशासनाला मिळाला. पालकमंत्र्यांना दौरा रद्द करण्याचे कारण अधिकारी देऊ शकले नाहीत. काही तरी मोठे कारण असेल असे संगळ्यानाच वाटले. मात्र, पालकमंत्री महोदयांनी नाशिकचा दौरा रद्द करून जळगावमध्ये स्व. प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला हजेरी लावणे पसंद केले. नाशिकचा शेतकरी अस्मानी संकटाने रडत असतांना, महाजन मात्र पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हास्यविनोदात रंगले होते.

पदाधिकाऱ्यांच्या दबावानतंर आली जाग

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आणि व्यथांकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यावर टीका होत असल्याची बाब स्थानिक पदाधिकाऱ्यांंनी गंभीरतेने घेत, पालकमंत्र्यांना तातडीने येण्याचे निरोप धाडले. पदाधिकाऱ्यांंच्या दबावानंतर पालकमंत्र्यांना पाझर फुटला असून, शनिवारी रात्रीपर्यंत ते नाशिकला पोहचत असल्याचे सांगण्यात आले. रविवारी ते जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, असा दावाही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा घायकुतीला !

$
0
0

जिल्ह्यात गारप‌िटीचा धिंगाणा सुरूच; १० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घालत शेतपिके मातीमोल केली आहेत. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब ही पिके जमीनदोस्त झाली असून, शेतात गारांचा खच पडला होता. लिंबूच्या आकाराच्या गारांनी होत्याचे नव्हते केले असून, शुक्रवारच्या पावसाने एकट्या सिन्नर तालुक्यात ८ हजार २५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अजूनही पेठ, बागलाण, मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नुकसानाचा प्राथमिक अंदाज अद्याप मिळाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर शनिवारच्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर निफाडमधील एका शेतकऱ्याचा गारप‌िटीमुळे बळी गेला आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरूच असून शुक्रवारी (दि. १३) त्यामुळे १४४ गावांमधील सुमारे दहा हजार शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्यात २३ गावांमधील २७५० हेक्टरवरील पिकांना बसला आहे. त्यातच शनिवारी (दि. १४) मध्यरात्रीपासून पावसाने धुडगूस घातल्याने शेतकरी गलितगात्र झाला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री आणि दिवसभरात झालेल्या गारपीटीने सिन्नर आणि निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. सिन्नर, येवला व चांदवड तालुक्यालाही गारपिटीचा सामना करावा लागला. द्राक्ष, डाळिंब बागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मालेगाव, कळवण, सटाणा या भागात शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. नाशिक शहरातही शनिवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

पावसाने जिल्ह्यातील एकाही तालुक्याला सोडलेले नाही. सर्वच १५ तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला आहे. पंचनामे करायला जावे तर त्यावेळीही पाऊस थैमान घालत असल्याने हे पंचनामे करण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतपिकांच्या पंचनाम्यांचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. तालुका आणि गाव पातळीवरील यंत्रणा कामाला लावूनही पंचनामे आटोपण्याच्या कामाला गती मिळत नसल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना सहन करावे लागले आहे. सुमारे साडे आठ हजार शेतकऱ्यांचे द्राक्ष, डाळींब, टरबुज, कांदा, गहू, मका, हर रा या पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतमजुराचा मृत्यू

निफाड तालुक्यातील शेतमजूर लक्ष्मण जनक कांबळे (वय ५५, रा. रानवड) यांचा मृत्यू घराचे शेड अंगावर पडल्यामुळे झाला. तुफान गारप‌िटीमुळे जिल्ह्यात घरांच्या पडझडीने अनेक प्रकार झाल्याचा अंदाज आहे. तर विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पाच बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला. ही संख्या वाढू शकते असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. इगतपुरी येथे मुसळधार पावसादरम्यान वीज अंगावर पडून एका गायीचा मृत्यू झाला. याखेरीज दिंडोरी, निफाड, मालेगाव, चांदवड आणि ना‌शिक तालुक्यात वीज पडून ५ बैल दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीए प्रवेश परीक्षा शांततेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमबीए अभ्यासक्रमासाठी झालेल्या प्रवेश परीक्षेला उत्तर महाराष्ट्रातून सव्वा तीन हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. सलग दोन दिवस आणि दोन सत्रात झालेली ही परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली.

तंत्रशिक्षण विभागातर्फे एमबीए या अभ्यासक्रमासाठी शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस दोन सत्रात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. सकाळी दहा ते दुपारी दीड आणि दुपारी २ ते साडेचार या वेळात ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा शनिवारी पहिला दिवस होता. नाशिक शहरातील मुंजे इन्स्टिट्यूट, गुरु गोविंदसिंग पॉलिटेक्निक, गुरू गोविंद सिंग इंजिनीअरिंग आणि संदीप फाऊंडेशनमध्ये परीक्षा झाली. तर, धुळे येथे भारती बहुद्देशीय संस्था, जळगाव येथे रायसोनी इंजिनीअरिंग कॉलेज आणि नंदुरबारच्या एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली.

नाशिकमध्ये एकूण १७३१, धुळ्यात ३४७, जळगावमध्ये ११२७ तर नंदुरबारमध्ये एकूण ४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्याची माहिती तंत्र शिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकची बाजी

$
0
0

'न हि वैरेन वैरानी' नाटकास तीन लाखांचा पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या ५४ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेत यंदा नाशिकने बाजी मारली आहे. नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने सादर केलेल्या 'न हि वरेन वैरानी' या नाटकाला पहिल्या क्रमांकाचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.

सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने सोमवारी हा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत व्दीतीय क्रमांक नागपूरच्या अंकुर मानव समाज उत्थान केंद्राने सादर केलेले 'विठाबाई' या नाटकाने पटकावला.

पुण्यातील ध्यास या संस्थेच्या 'परवाना' या नाटकास तृतीय पारितोषिक मिळाले. व्दीतीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे दोन व एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे.

१६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. यात एकूण २१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या नाटकांमधून नाशिकने बाजी मारली.

दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रकाश योजनेतील पारितोषिकेही लोकहितवादी मंडळाच्या नाटकाने पटकाविली आहेत.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

दिग्दर्शन : मुकूंद कुलकर्णी : न हि वैरेन वैरानी प्रथम (५० हजार)

व्दीतीय : संजय जीवने : विठाबाई (४० हजार)

तृतीय : श्रीकांत भिडे : परवाना (३० हजार)

नेपथ्य : प्रथम : (१५ हजार) : किरण समेळ : न हि वैरेन वैरानी)

प्रकाश योजना : प्रथम : (१५ हजार) : विजय रावळ : न हि वैरेन वैराणी

रंगभूषा : प्रथम : (१५ हजार) , प्रशांत कुलकर्णी : एक चादर मैलीसी

संगीत दिग्दर्शन : प्रथम विभागून : (१५ हजार) : निषाद कुलकर्णी / प्रसाद भालेराव : न हि वैरेन वैरानी

उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक व रू.१० हजार असे पारितोषिक पुरूष कलाकारांमधून हेमंत देशपांडे, दिपक अमोणकर,ओमकार तिरोडकर, गजानन नार्वेकर यांसह आदींनी तर स्त्री कलाकारांमध्ये सांची जीवने, श्रुती अत्रे, पूजा वेदविख्यात आदींना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाईनरी घेणार शेतकऱ्यांची द्राक्ष

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उद्योजकांकडून प्रतिसाद

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वाईन उत्पादकांनी गारपिटीत वाचलेली चांगली द्राक्ष विकत घेऊन द्राक्षांचे गाळप करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी केले.

कुशवाह यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वाईन उत्पादकांची बैठक घेतली. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक एस. एल. कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, भारतीय द्राक्षे प्रक्रिया महामंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर, अखिल भारतीय वाईन उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी आहेर, आयजीपीबीचे संचालक सुरेश देशमुख, नीरज अग्रवाल, अखिल भारतीय वाईन उत्पादक असोसिएशनचे सचिव राजेश जाधव आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकूण वाईन साठवणूक क्षमता १.२० कोटी लिटर इतकी असून, एकूण १८ हजार टन द्राक्षांचे गाळप या हंगामात होणार आहे. त्यापैकी साधारण १० हजार टन द्राक्ष हे शेतकऱ्यांच्या कराराची असून, शिल्लक ८ हजार टन द्राक्ष ही अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांकडून घेऊन गाळप होऊ शकते, अशी माहिती वाईन उत्पादकांनी कुशवाह यांना दिली. वाईन उत्पादकांनी त्यापैकी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या ४ हजार टन द्राक्षांचे गाळप केले असून, उर्वरित ४ हजार टन द्राक्ष तातडीने गाळप करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी वाईन उत्पादकांना केले.

सांगली, बारामती आणि पुणे येथे असलेल्या वाईनरिजमध्ये गाळपाच्या शक्यतेबाबत संबंधित जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करून शक्य तितके द्राक्ष गाळप करून नुकसानाची तीव्रता कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे कुशवाह यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना सहकार्यप्राप्तीसाठी अखिल भारतीय वाईन उत्पादक संघाचे समन्वयक मनोज जगताप (मो. क्र. ९८२२४३९०५१) यांचा मोबाइल क्रमांक देण्यात आला आहे. २००९ मध्ये अशा प्रकारे द्राक्ष खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही वाईनरी उद्योगांनी प्रतिसाद दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बैठकीस मांउटन व्ह्यू वाईनरीचे हनुमंत फडतरे, विंचूरा वाईनरीचे प्रल्हाद खंडागळे, शिवप्रसाद वाईनरीचे प्रभाकर वाघ, सोमा वाईनरीचे प्रदीप पाचपाटील, एआयडब्ल्यूपीएचे समन्वयक मनोज जगताप, हेमंत वाळूंज, सागर पाटील, कैलास शिंदे, कैलास पाटील, संदिप वाळके, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वच्छ अन् गलिच्छ कारभार

$
0
0

महिलांसाठीच्या मोफत मुताऱ्यांची ओंगळवाणी अवस्था

गायत्री काळकर, नाशिक

महिलांसाठी ११० मुताऱ्या मोफत उपलब्ध करून दिल्याचा ठामपणे दावा करणाऱ्या महापालिकेला शहरातील केवळ २ विभागातील ६ मुताऱ्यांबाबत माहिती असल्याचे ‍वास्तव आहे. या माहितीनुसार काही ठिकाणांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, हा केवळ अस्वच्छ आणि गलिच्छ कारभार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

मुताऱ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी तर सोडाच, पण आरोग्य विभागाकडे या मुताऱ्यांची कागदोपत्री नोंदही नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सातपूर महापालिका विभागात नावालाच मुताऱ्या उभ्या असल्याचे दिसून आले. पाणी आणि दरवाजांशिवाय असणाऱ्या या मुताऱ्यांचा वापर अर्थात महिलांकडून वर्षानुवर्षे केला जात नसल्याची माहिती परिसरातील दुकानदार व व्यावसायिकांनी 'मटा'ला दिली. इतकेच नव्हे तर सातपूर एमआयडीसी भागात महिलांसाठी असलेल्या मुताऱ्या पुरुषच वापरत असल्याचेही आढळून आले.

आरोग्य अधिकारी सुनील बुकाणे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच महिलांसाठीच्या मुताऱ्यांना भेट देऊन आढावा घेतल्याची माहिती दिली होती. परंतु, या ठिकाणांची सद्यस्थिती पाहता आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती तसेच त्यांच्या जबाबदारीबद्दल शंका उत्पन्न होत आहे. या मुताऱ्या बांधून दिल्यानंतर त्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारी पूर्णत: आरोग्य विभागाकडे येते. सफाईकामगारांमार्फत सफाई तसेच स्वच्छता होणे अपेक्षित असते. परंतु, अशी कोणतीही स्वच्छता होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भानुदास पालवेंची तडकाफडकी बदली

$
0
0

नाशिक : येथील अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पाच्या गाऱ्हाणे निवारण विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून त्यांची बदली झाली आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वीच झालेली ही बदली राजकीय हस्तक्षेपाचा भाग असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात आहे. स्पष्टवक्तेपणा आणि पारदर्शकपणा या वैशिष्ट्यांमुळे पालवे सतत चर्चेत असत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या आसामींनी कोट्यवधी थकवले!

$
0
0

विनोद पाटील,नाशिक

नाशिक महापालिका एकीकडे सर्वसामान्य थकबाकीदारांना नोटिसा देवून मालमत्ता कराची वसुली जोमात करीत असताना, शहरातील धनदांडग्यांनी मात्र मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेच्या यंत्रणेला जेरीस आणले आहे. शहरातील प्रतिष्ठीत २० जणांकडे सहा कोटी रुपयांच्या करांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांवर पालिकेने आता वॉरंटची कारवाई केली आहे. काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यालयासह शासकीय कार्यालये, राजकीय नेते व मोठ्या उद्योगपतींचा त्यात समावेश आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता करांसह पाणीपट्टी वसुलीवर जोर दिला आहे. मालमत्ता कराचे शहरातील ११० कोटींचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावली असतानी बड्यांनी मात्र या मोहिमेलाच खोडा घातला आहे. महापालिकेने जवळपास ७४ हजार ५३० थकबाकीदारांना नोटिसा बजावल्यात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना नोटिसा काढताच तब्बल १३ कोटींची थकबाकी पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. सर्वसामान्य नागरिक नोटीस मिळताच आपल्या इभ्रतीसाठी लगोलग थकबाकी भरत असतांना बड्या आसामी दाद देत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस कार्यालयाकडे तब्बल १३ लाख एक हजार २४१ रुपयांची थकबाकी आहे. तर शिवसेना कार्यालयाच्या मालकाकडे सव्वा दोन लाखांची थकबाकी आहे. डी. ए. पिंगळे अॅन्ड ब्रदर्सकडे चार लाख ७४ हजाराची थकबाकी आहे. प्रदीप डी. पवार अॅन्ड सुनिता डी यांच्याकडे १२ लाखांची थकबाकी आहे. एशियन इलेक्टॉनिक्स चार लाखाची थकबाकी आहे. सुभद्रादेवी बी. कपाडीया यांच्याकडे साडे आठ लाखांची थकबाकी आहे. एशियन इलेक्ट्रॉनिक्सकडे साडेतीन लाखाची मालमत्ताकराची थकबाकी आहे.

टॉप टेन थकबाकीदार

> विभागीय महसुल आयुक्तालय- २ कोटी ५० लाख

> सिक्युरीटी प्रेस- २ कोटी २५ लाख

> शहर काँग्रेस कार्यालय- १३ लाख

> शिवसेना कार्यालय- सव्वा दोन लाख

> पवार प्रदीप डी अॅन्ड सुनिता डी- १२ लाख ३ हजार

> धात्रक कमल पी अॅन्ड जाधव बी. आर कंपनी- ८ लाख २२ हजार

> सुभ्रदादेवी बी. कपाडीया- ८ लाख ५९ हजार

> गोखले श्रीविजय श्रीराम- २०लाख

> नाशिक लॅन्डेड प्रॉपर्टीज अॅन्ड इनवेस्ट- १२ लाख २३ हजार

> नाशिक कॉलेज अॅन्ड हॉटेल मॅनेजमेंट- २ लाख २३ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निखिलची न्यूयॉर्कमध्ये नृत्यभरारी

$
0
0

>> फणिंद्र मंडलिक

न्यूयॉर्क येथे होणाऱ्या 'कोरिओग्राफ कॅनव्हास'च्या वार्षिक महोत्सवात सादरीकरणाची संधी नाशिकच्या निखिल गोसावी याला मिळणार आहे. या महोत्सवासाठी जगभरातून निवडल्या गेलेल्या १५ १५ कोरिओग्राफर्समध्ये निखिलचाही समावेश आहे. न्यूयॉर्कमध्ये येत्या २६ एप्रिलला होणाऱ्या या महोत्सवात गणेशोत्सव ही थिम घेऊन निखिल कोरिओग्राफी सादर करणार आहे. इंडियन फोक, कंटेम्पररी, सेमी क्लासिकल नृत्यांचा वापर करून त्याने ही कोरिओग्राफी केली आहे. यानिमित्ताने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

निखिल सध्या न्यूयॉर्क येथील जगविख्यात 'ब्रॉडवे डान्स सेंटर' येथे नृत्याचे धडे घेत आहे. इंडियन क्लासिकल नृत्याबरोबरच पाश्चात्य नृत्यातही त्याने विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. लहानपणापासूनच नृत्य व संगीताची आवड असलेल्या निखिलने मोखाडा या आदिवासी भागात शालेय स्तरापासूनच नृत्य स्पर्धा गाजविण्यास सुरुवात केली. आदिवासी व महाराष्ट्रातील

लोकनृत्याचा अभ्यास केल्यानंतर त्याने पुण्यामध्ये शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. पुण्यातील 'नवले इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत असतानाच तो 'एक्सटर्नल फोर्स डान्स अॅकेडमी'मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत होता. त्याच्या संघाला स्ट्रीट डान्स स्पर्धा, आयआयटी पवई, मुड इंडिगो अशा स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळालेली आहेत. गोव्यातील 'बीट इट स्ट्रीट' या चॅनल व्ही फेस्टीव्हलमध्येही त्याने आपल्या नृत्याने रसिकांना मोहीत करीत पारितोषिक पटकावले. टाटा, एसओएस, फिसर्व्ह, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट, एमआयटी, व्हीआयटी, कमिन्स अशा अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्येही त्याने बॉलिवूड आणि भारतीय फोक डान्सची कोरिओग्राफी केली आहे.

रॉबर्ट टेलर, टोनी मायस, जस्टीन बोकीटो, डर्क मिशेल, रेयन डेनियल बेक, कार्ल्स नेटो या जगविख्यात कलाकारांनी निखिलच्या नृत्याची प्रशंसा केलेली आहे. 'ब्रॉडवे डान्स सेंटर'तर्फे त्याला आऊट स्टॅँडींग स्टुडन्ट अॅवॉर्डने सन्मानित केले आहे. निखिलचे वडील अशोक गोसावी मोखाडा येथे वैद्यकीय व्यवसाय करीत असून, आई शोभा या सुध्दा डॉक्टर आहेत. आपल्या मुलाने डॉक्टर न होता इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण घेऊनही कोरिओग्राफीत नाव कमावल्याचा अभिमान असल्याचे ते सांगतात. निखिलला नृत्याबरोबरच विविध वाद्ये वाजवण्यात तसेच गायनातही रूची आहे.

जगातील १५ कोरिओग्राफर्समध्ये निवड झाल्याचा मला निश्चितच मला अभिमान आहे. माझ्या यशात आई-वडिलांबरोबरच मित्र परिवार व नातलगांचाही मोलाचा वाटा आहे. आम्ही डॉक्टर आहोत म्हणून तू हेच कर, तेच कर असे पालकांनी मला कधीही म्हटले नाही. सुरुवातीपासून मुक्त वातावरण मिळाल्याने मी इथपर्यंत पोहचू शकलो. - निखिल गोसावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शन‌ीमंदिरातील चोरीचा तपास सीआयडीकडे द्या!: भुजबळ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन शनी पिठांपैकी आद्य व पूर्ण शानीपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर मंदिरातील चोरीचा तपास गुन्हे अन्वशेष विभाग (सी.आय.डी) कडे देण्याची मागणी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार पंकज भुजबळ यांनी विधानसभेत केली.

आमदार भुजबळ म्हणाले, 'नस्तनपूर शनीमंदिरात २६ फेब्रुवारी २०१५ रोजी चोरीची घटना घडली. या चोरीमध्ये दानपेटीतील १ लाखाहून अधिक रुपये व शनीमूर्तीवरील सुमारे चार किलो वजनाची चांदीची छत्री असा ऐवज चोरट्यांनी लुटला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आजतागायत या घटनेचा स्थानिक पोलिसांना गुन्हेगारांचा शोध लावण्यास अपयश आले आहे. त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेचा लवकरात लवकर तपास लागण्यासाठी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या चोरीचा तपास गुन्हे अन्वशेष विभाग (सी.आय.डी) कडे द्यावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


`नायपर`साठी विशेष सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल फार्मा एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (नायपर) ही राष्ट्रीय संस्था नाशिकला यावी यासाठी द नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशननेही पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच विशेष सर्वसाधारण सभा घेऊन `नायपर` नाशिकला देण्याचा ठराव करण्याचे असोसिएशनने निश्चित केले आहे.

नाशिक हे एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला येत असतानाच `नायपर`सारखी उच्च शिक्षण देणारी आणि संशोधनाला वाव मिळवून देणारी राष्ट्रीय संस्था नाशिकला यावी यासाठी शहरातील विविध संस्था-संघटना आता पुढे सरसावल्या आहेत. द नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशननेही येत्या २४ मार्चला विशेष सभा घेण्याचे जाहीर केल्याची माहिती अध्यक्ष गोरख चौधरी यांनी दिली आहे. २४ मार्चला दुपारी ३ वाजता गोळे कॉलनीतील काका गद्रे मंगल कार्यालयात

ही बैठक होणार आहे. `नायपर`मुळे फार्मसी क्षेत्रात नाशिकचा नवलौकिक वाढणार असल्याचा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय संस्थेचा फायदा केवळ नाशिकला नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा भागाला होईल. तसेच, या भागातील फार्मसी उद्योगालाही चांगले दिवस येतील, असे चौधरी यांनी सांगितले आहे. असोसिएशनच्या जिल्ह्यातील दोन हजार सभासदांना सभेचे पत्र पाठविण्यात आल्याचे चौधरी यांनी कळविले आहे.

आज पत्र पाठवणार

`नायपर`साठी मोठी चळवळ उभारण्यासाठी आगामी काळातील कृती कार्यक्रम जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार १८ मार्चला (बुधवार) जिल्ह्यातील सर्व फार्मसी कॉलेजच्यावतीने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय रसायन मंत्री, राज्याचे राज्यपाल, नाशिकचे पालकमंत्री यांना पत्र पाठविले जाणार आहे. `नायपर` नाशिकलाच देण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी इंग्रजी शाळेत प्रवेशप्रक्रिया सुरू

$
0
0



अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक विभागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २४ एप्रिलपर्यंत पालकांनी आदिवासी विकास भवनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया आदिवासी विकास विभागाने सुरू केली आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सक्षम अधिकाऱ्याकडून अनुसूचित जमातीचा दाखला प्राप्त करून घ्यावा. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा. कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लाख रुपये इतकी असून, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ५ वर्षे पूर्ण असावे. अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे. विद्यार्थ्याचे पालक कोणीही सरकारी किंवा निमसरकारी नोकरदार नसावेत. पालकाने कोणतीही खोटी माहिती दिल्यास व ती तपासणीत आढळून आल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे विभागाने सांगितले आहे. १ ते २४ एप्रिल दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या गडकरी चौकातील कार्यालयात पालकांना अर्ज सादर करता येतील. कागदपत्र पडताळणीसाठी पालकांनी व पाल्यांनी २१ मे रोजी पेठरोड येथील पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागातही इंग्रजीचे आकर्षण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांचे आकर्षण वाढू लागल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असल्याची बाब अखिल भारत शिक्षण संघर्ष यात्रेच्या निमित्ताने उघड झाली आहे. या यात्रेचा उत्तर महाराष्ट्र आढावा आणि कृती कार्यक्रम आखणीचे दोन दिवसीय शिबिर पार पडले.

शिबिराच्या पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता यात्रेच्या प्रवासावर आधारीत सीडी सर्वांना दाखविण्यात आली. त्यानंतर भोपाळ संमेलनाचा वृत्तांत सांगण्यात आला. प्रश्न इंग्रजीच्या माध्यमाचा या विषयावर दुपारी २ वाजता, तर मराठी शाळांची सद्यस्थिती या विषयावर दुपारी ४ वाजता चर्चासत्र घेण्यात आले. त्यात अखिल भारत शिक्षण अधिकार मंचच्या अध्यक्ष मंडळाचे सदस्य डॉ. अनील सदगोपाल, अखिल भारतीय नई तालिम समितीचे सरचिटणीस प्रा. प्रदीप दास, प्रा. मिलिंद वाघ, छाया देव, मुकुंद दीक्षित, संजय पाटील, अविषा कुलकर्णी, वसंत एकबोटे, सचिन मालेगावकर, प्रियदर्शनी भारती, दत्ता ढगे यांनी सहभाग घेतला.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात सरकारी शाळांचे वास्तव या विषयावर सकाळी ९ वाजता, अल्पसंख्याकांच्या शिक्षणातील समस्या या विषयावर सकाळी ११ वाजता, आदिवासींच्या शिक्षणातील समस्या या विषयावर दुपारी दीड वाजता, नई तालिम-नव्या जगात या विषयावर दुपारी साडेतीन वाजता चर्चासत्र होणार आहे. तर भाषिक विविधता, शिक्षणाचे माध्यम व बाजार या विषयावर डॉ. अनिल सदगोपाल यांचे संध्याकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. डॉ. सदगोपाल यांच्या हिंदी पुस्तकाचा छाया देव यांनी केलेला अनुवाद शिक्षणातील पीपीपी या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय नई तालिम समितीचे सरचिटणीस प्रा. प्रदीप दास यांच्या हस्ते होणार आहे. हे सर्व कार्यक्रम हुतात्मा स्मारकात होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या मृत्यू प्रकरणात नेचर क्लब संस्थेची उडी

$
0
0



दोषींवर कारवाईची केली मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चांदवड येथील कोंबडेवाडी परिसरात राजेंद्र कासलीवाल यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला आवश्यक साहित्याच्या अभावामुळे जीव गमवावा लागला आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.

या संस्थेने वनाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोणत्याही वन्य प्राण्याला विहिरीत भूल न देण्याचे मार्गदर्शक तत्व असताना अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून केलेली कार्यवाही संशयास्पद असून, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पाच बिबट्यांचा मृत्यू झाला असून, दिंडोरी तालुक्यातील ननाशी क्षेत्रात नियोजन नसल्याने नागरिकांकडून तो मारला गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. काही वन्य जीवांना वाचविण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू व्हॅन घेतली असून, ती धूळखात पडली आहे. विहिरीत भूल दिल्यानंतर पाण्यात जाळी टाकणे आवश्यक असताना तसे न केल्याने चांदवड येथील बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नेचर क्लबने केला आहे. निष्काळजीपणे भूल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची आठ दिवसांच्या आत चौकशी न झाल्यास संस्थेचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वनविभागीय अधिकारी डी. डब्लू. पगार यांनी निवेदन स्विकारले असून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारप‌ीटग्रस्तांना ‘सायलो’चा आधार

$
0
0

तडे गेलेल्या द्राक्षांना चांगला भाव देऊन दिला दिलासा

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

निफाड, दिंडोरी, येवला, चांदवड, मालेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारप‌टिीमुळे तडे गेलेल्या द्राक्षांची चांगल्या भावात खरेदी करून पिंपळगाव बसवंत येथील सायलो वाईन्सचे संचालक विश्वासराव मोरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

द्राक्ष व्यापारी, बेदाणा उत्पादक यांनी पाऊसामुळे तडे गेलेले द्राक्ष खरेदी करणे एकिकडे नाकारले जात आहे. त्यामुळे द्राक्ष फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आधार देत किमान त्यांच्या खर्चाचा मेळ बसावा म्हणून पिंपळगाव बसवंत येथील सायलो वाईन्सचे संचालक विश्वासराव मोरे यांनी पुढाकार घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची द्राक्ष समाधानकारक भावात खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले संकट दूर झाले आहे.

यंदा द्राक्ष बागांची ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस व गारप‌टिीने शेतकऱ्यांची परीक्षा घेत कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. द्राक्ष खरेदीसाठी निर्यातदारांनी तर पाठ फिरविलीच मात्र स्थानिक व्यापारी व बेदाणा उत्पादकांनीही तडे गेलेले द्राक्ष खरेदी करण्यात नकार दिला. अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले द्राक्षबाग अर्धवट सोडून दिले व व्यवहार रद्द करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना द्राक्ष फेकून देण्याशिवाय पर्याय नव्हता; मात्र सायलो वाईन्सने आधार दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तडे गेलेले सहा हजार क्व‌िंटल द्राक्ष चांगला भाव देऊन खरेदी केली आहे. मात्र सध्या द्राक्ष खरेदी थांबवली आहे. टँकची पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर पुन्हा द्राक्ष खरेदी करून शेतक ऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू.

- विश्वासराव मोरे, संचालक,

सायलो वाइन्स, पिंपळगाव बसवंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images