राज्य सरकारला अधिकार नसतानाही नायपर ही राष्ट्रीय संस्था नागपूर येथे स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नायपरसाठी सर्वोत्तम ठिकाण हे नाशिकच असल्याने ती नागपूरला जाण्याचे तसे कारण नाही. त्यामुळे नायपर नाशिकला आणण्यासाठी आपल्या सर्वांना एकजूट करुन आक्रमक प्रयत्न करावे लागतील...
लोकसभेत या वर्षीचं अंदाजपत्रक सादर करताना केंद्र सरकारनं नायपर महाराष्ट्राला देण्याचे जाहीर केलं. औषध निर्माण शास्त्रातील संशोधन आणि शिक्षणाच राष्ट्रीय केंद्र म्हणजेच नायपर नाशिक येथे स्थापन व्हावे, अशी अपेक्षा आणि मागणी नाशिकने सर्वप्रथम केली. नाशिक शहरातील वृत्तपत्रांनी ही मागणी प्रामुख्याने केली. नाशिक शहरात करन्सी नोट प्रेस, हिंदुस्थान एरोनेटीक्सचा प्रकल्प या केंद्र सरकारच्या संस्था आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठ ही दोन विद्यापीठे आहेत. जगातील नव्याने विकसीत होणाऱ्या शहरांपैकी नाशिक शहर आहे अशी या शहराची ओळख आहे. देशातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक शहरात उद्योग विश्वाचाही चांगला विकास झालेला आहे. वाहतुकीची केंद्र दळणवळणाची साधने, चांगले हवामान, संशोधनाला पूरक वातावरण, शिक्षण संस्थांचे निर्माण झालेल जाळं अशा अनेक दृष्टीनं नाशिक हेच अग्रक्रमानं नायपर स्थापन करण्यासाठी योग्य असेलेल शहर आहे. सध्या त्यासंबधीची चर्चा जोरात चालू आहे.
अर्थात नायपर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्यामुळे ते महाराष्ट्रात कोठे स्थापन करायचे याचाही निर्णय केंद्र सरकारच घेणार आहे. केंद्र सरकारने नायपर नाशिक येथे स्थापन करावे यासाठी नाशिकने त्यासाठीचा जोरदार पाठपुरावा करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत ही स्तुत्य बाब म्हणावी लागेल. नाशिक जिल्हा हा भाग्यवान एवढयासाठी म्हणावा लागेल की या जिल्हयाला सुरूवातीला सर्वच क्षेत्रात चांगले नेतृत्व लाभले. स्व.भाऊसाहेब हिरे, गो. ह. देशपांडे वसंतराव नाईक यांचा उल्लेख करावा लागेल. १९६२-६७ या काळात स्व. यशवंतराव चव्हाण यांना नाशिकने लोकसभेवर बिनविरोध निवडून दिले. त्यांनी एच.ए.एल चा सर्वात मोठा प्रकल्प नाशिकला दिला. त्यानंतर राज्यात जेव्हा पहिले कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला तेव्हा हे विद्यापीठ नाशिक जिल्ह्यात स्थापन व्हावे, यासाठी त्यावेळच्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले पण ते अपूर्ण ठरले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला स्थापन व्हावे, म्हणून जिल्हयाने मोठा आवाज उठविला. मराठा विद्या प्रसारक समाजाने जिल्ह्यातील सर्वच शिक्षण संस्थांना बरोबर घेऊन आंदोलन उभे केले पण, त्या विद्यापीठाची स्थापना जळगाव येथे झाली. परंतू नाशिकमधील राजकीय नेत्यांनी एकमुखी आवाज उठविला तेंव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा निर्णय घेतला. युती सरकारच्या काळात महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाची स्थापना झाली. हे विद्यापीठ नाशिक येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राज्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री होते डॉ. दौलतराव आहेर त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता.
आज नायपर नाशिकला स्थापन व्हावे, ही औषध निर्माण शास्त्रातील तज्ज्ञ व उद्योजक यांचे बरोबर सर्व नाशिक जिल्ह्याची मागणी आहे, यासाठीचा आवाज सर्वच क्षेत्रातून उठला पाहिजे. नाशिकमध्ये उद्योग क्षेत्राची वाढ होत आहे, त्याचे श्रेय बाबूशेठ राठींना दयायला हवे. आज या उद्योगक्षेत्राने नायपर मागणीसाठी एलबीटीसारखे पुढे यायला हवे. शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतीक, आर्थिक इ. क्षेत्रांबरोबरच राजकीय इच्छाशक्ती व नेतृत्व ही महत्त्वाचे आहे. प्लाय ओव्हर, ओझर विमानतळ यासारखे भव्य दिव्य प्रकल्प भुजबळांच्या बाहूबली नेतृत्वामुळे कुठलेही आंदोलन न करता विनासायास नाशिकला मिळू शकले. ती जबाबदारी गिरीश महाजन निभावीत आहेत. महाजन हे जळगावचे आहेत त्यांनी पालकमंत्री या नात्याने पुढाकार घ्यायला हवा. तसेच विविध पक्षांमध्ये विखूरलेल्या व संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सर्वच प्रतनििधींनी या कामी पालकमंत्र्यांना साथ दयायला हवी. खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि हेमंत गोडसे यांनी या कामी केंद्र सरकारकडे आग्रह धरायला हवा. ही उच्च दर्जाची संशोधन संस्था नाशिकमध्ये स्थापन होऊ शकेल, अशा संस्थेसाठी नाशिक हेच सर्वार्थाने योग्य ठिकाण आहे. हे केंद्र सरकारला पटवून देणे आवश्यक आहे.
नायपरची स्थापना सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या नाशिकला व्हावी व मंत्र, यंत्र व संशोधन केंद्र हा प्रवास होण्यासाठी सर्व नाशिककर व शिक्षण-उद्योग विश्वासह सर्व पक्षीय राजकीय नेते एकजूट दाखवतील असा विश्वास वाटतो.
(लेखक हे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यापरिषद सदस्य आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट