म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील विविध प्रकारच्या तब्बल १४९ कॉलेजेसमध्ये सध्या बहुविध प्रकारच्या परीक्षा सुरू असल्या तरी अवघ्या दोन पथकांद्वारे त्यावर नजर ठेवली जात आहे. शहरी आणि ग्रामीण भागासाठीच्या या पथकांद्वारे परीक्षा कालावधीत नक्की योग्य कामगिरी बजावली जाते आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात विविध कॉलेजेस कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात ८५ आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज, ४ लॉ कॉलेज, १८ इंजिनीअरींग कॉलेज, ४ आर्किटेक्ट कॉलेज, २३ बीएड कॉलेज आणि १५ फार्मसी कॉलेज असे एकूण १४९ कॉलेजेस आहेत. सद्यस्थितीत पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीच्या विविध वर्षांच्या आणि शाखांच्या लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत. त्यामुळेच कॉलेज कॅम्पसमध्ये अत्यंत शुकशुकाट दिसून येत आहे. परीक्षेच्या दरम्यान कॉपी करण्याच्या प्रकारांसह मोबाईलचा वापर किंवा नियमांना हरताळ फासणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी विद्यापीठाकडून दक्षता पथकाची (स्कॉड) नियुक्ती केली जाते. नाशिक जिल्ह्यात तब्बल १४९ कॉलेज असले तरी विद्यापीठाने अवघी २ पथके उपलब्ध करुन दिली आहेत. एक पथक नाशिक शहरासाठी तर दुसरे पथक नाशिक जिल्ह्यासाठी आहे. प्रत्येक पथकात चार ते पाच जणांचा समावेश असतो. हे सर्वजण वेगवेगळ्या कॉलेजचे प्राध्यापकच असतात. त्यातील एक जण पथकाचे नेतृत्व करतो. गेल्या अनेक वर्षांपूर्वीही दोनच पथके विद्यापीठाद्वारे कार्यरत होती. आता जिल्ह्यात कॉलेजची संख्या प्रचंड वाढली असली तरी पथके तेवढीच ठेवण्यात आली आहेत. लेखी परीक्षेचा कालावधी सर्वसाधारणपणे ३ तासांचा असतो. मात्र, शहरातील एका पथकाला या तीन तासांमध्ये तीन ते चार कॉलेजलाच भेट देता येते तर ग्रामीण भागातील पथकाला केवळ एक ते दोन कॉलेजचीच तपासणी करता येते. त्यामुळे अशा परिस्थितीत लेखी परीक्षेवर या दोन्ही पथकांना ठेवणे कसे शक्य होते, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
दादरा-नगर हवेलीचीही जबाबदारी
दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात एकूण चार कॉलेज आहेत. हे कॉलेजही पुणे विद्यापीठाच्याच कार्यकक्षेत येतात. या चारही कॉलेजच्या परीक्षांची तपासणी करण्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीणच्या पथकावरच देण्यात आली आहे. त्यामुळे हे पथक नक्की किती कार्यक्षमतेने कार्य करत असेल, अशी शंका आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट