म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला आहे. त्यातच हवामान खात्याने जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदा पाऊस चांगला राहील या आशेने शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीस प्रारंभ केला होता. गेल्या एका महिन्यात मालेगाव तालुक्यात जवळपास ८० टक्क्यांहून अधिक पेरणीची कामे देखील पूर्ण झाली आहेत. साधारणतः पंचवीस जूननंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यात तर संपूर्ण तालुक्यात पावसाचे वातावरण निवळून कडक उन्हाचे चटके बसू लागल्याने पेरणी झालेली पिके आता कुठे वर येत असतांना कडक उन्हमुळे ती करपण्याची भीती वाढली आहे.
पावसाने दडी मारल्याने कमाल तापमान ३४ अंशापर्यंत वाढले आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर, शेतकरी चिंतातूर झाला आहे. पेरणीनंतर साधारणतः १५ दिवसात पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची हजेरी अपेक्षित असते. गेल्या संपूर्ण महिन्याभरात मालेगाव तालुक्यात फक्त १०५.४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, पंधरवड्यात पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे.
६४ हजार २०० हेक्टरवर पेरणी
तालुक्यातील खरिपाच्या ८० हजार ९७५ हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार २०० हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात सर्वाधिक लागवड मका पिकाची झालेली आहे. मात्र, आगामी महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने हुलकावणी दिल्यास शेतकरी दुबार पेरणी संकटात सापडू शकतो.
पावसाची हजेरी
१ ते १५ जून कलावधीतील पाऊस - ४९.७८ मिमी
१५ ते २४ जून कलावधीतील पाऊस - ५४.८६ मिमी
२५ जून नंतर १ मिमी देखील पाऊस झालेला नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट