म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या म्हणजे २९ ऑगस्टच्या आदल्या दिवशीच बॅरकेडींग करून 'नो इंट्री' तसेच 'नो व्हेइकल झोन' तयार करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद होणार असले तरी पोलिसांनी 'क्रॉस ओव्हर पॉईंट' निर्माण केल्याने एका भागातील नागरिकांना शहराच्या दुसऱ्या ठिकाणी पोहचता येणार आहे.
पर्वणी काळात किमान ६० लाखांपेक्षा अधिक भाविक शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पर्वणीच्या आदल्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्ट रोजी रामकुंडाकडे येणारे तसेच भाविकांचा राबत असलेल्या मार्गावर 'नो इंट्री झोन' लागू होईल. रात्री आठ वाजता या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येईल. 'नो इंट्री'साठी गंगापूररोड परिसरातील सर्वाधिक रस्ते बंद ठेवण्यात येतील. यानंतर, रात्री १० वाजता रामकुंड परिसरातील साधारणतः २ ते ३ किलोमीटर अंतराच्या परिघात 'नो व्हेइकल झोन' जाहीर करण्यात येईल. म्हणजे पर्वणीच्या आदल्या दिवसापासूनच रस्त्यावर एकही वाहन राहणार नाही, याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाणार आहे. या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी आपली वाहने घराच्या आवारात लावली तर अडचण नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर वाहन लावू देणार नाही, असे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी स्पष्ट केले. 'नो व्हेईकल झोन'मध्ये सीबीएस, अशोकस्तंभ, रामवाडी, मखमलाबाद नाका, पेठनाका, दिंडोरी नाका, काट्या मारुती मंदिर, संतोष टी पॉईंट (आडगाव नाका), कन्नमवार पूल, द्वारका सर्कल, सारडा सर्कल, खडकाळी सिग्नल आणि पुन्हा सीबीएस अशा वर्तुळाकार पध्दतीने 'नो व्हेइकल झोन' असणार आहे.
असे आहेत नो इंट्री झोन
गंगापूरोडवरील बालगणेश मंदिर, पाटील लेन क्रमांक १ ते ५, टिळकवाडी रोड, रामायण बंगला, धन्वंतरी हॉस्पिटल, अरिहंत फ्रुटस, त्र्यंबकरोडवरील जलतरण सिग्नल, गोल्फ क्लब मैदानाची मागची तसेच पुढची बाजू, सुयश हॉस्पिटल, राज स्विटस, एसएसके सॉलिटर हॉटेल, भागानगरकडे जाणारा मार्ग, हॉटेल किनाराजवळील मार्ग, साहिल लॉन्स, अशोक हायस्कूल, तुलशी आय हॉस्पिटल, समाज कल्याण भवन, समर्थनगर, औरंगाबादरोडवरील मिर्ची ढाबा, कॅनॉलरोड, मिनाताई ठाकरे स्टेडीयम, स्वामी नारायण चौकी, हिरावाडी पूल, दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टी, पेठरोडवरील फुलेनगर झोपडपट्टी, मखमलाबाद रोडवरील मधूबन कॉलनी, सुदर्शन कॉलनी इत्यादी.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. नागरिकांची कमीतकमी गैरसोय व्हावी, या दृष्टीने नियोजन केले असून यात सर्वांचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. लक्षावधी भाविकांच्या सुरक्षेला प्राधन्य देताना सर्वसामन्य नागरिकांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाताना अडचण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.
- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट